Sunday 22 January 2017

लेट ईट गो... विनीत वर्तक
जन्माला आलेला प्रत्येक माणूस आपल्या परीने वेगळा असतो. बनवणार्याने बनवताना चेहरा, ठेवण, रंग एक नाही ठेवला. तर प्रत्येक माणसाचे मन, विचार कसे एक असतील? प्रत्येक जीव जन्माला येताना स्वताचे एक अस्तित्व घेऊन येतो. आपल्या मनाच्या आंतरिक रचनेनुसार प्रत्येक माणूस आपली आवड- निवड, चांगल-वाईट, इच्छा-भिती ह्या वेगवेगळ्या भावनांचं कुंपण स्वतःभोवती घालून घेतो. आपल वेगळ असणाच्या गुणधर्मामुळे प्रत्येक माणसाची भावनिक कुंपण वेगवेगळी असतात. त्या कुंपणाच्या आत त्याची विचारशक्ती विहार करत असते. त्याच्या पलीकडे जाणून घ्यायची आपली तयारी नसते.
खरे तर हि भावनिक कुंपण आपली ओळख असतात. ह्यावरून माणसाचे स्वभाव ठरतात. त्यामुळेच प्रत्येक माणूस एक असून सुद्धा वेगळा असतो. ह्या वेगळेपणातून आपण प्रश्नांना जन्म देतो. ते प्रश्न दिसून येतात नातेसंबंधानमद्धे. जडणघडण आणि भावनिक भिंती पूर्णतः वेगळ्या असताना वैचारिक मतभेद आलेच. कोणत्याही नातेसंबंधाचा पाया हा समजून घेण्यावर अवलंबून असतो अस आपण नेहमी म्हणतो. पण हे समजून घेण म्हणजे काय? वैचारिक प्रगल्भतेने भले आपल्या प्रोफेशनल आयुष्यातील प्रश्न सुटत असतील पण वैयक्तिक आयुष्यात ते तितकस लागू पडत नाही.
समजून घेण किंवा वैचारिक प्रगल्भता देते ते म्हणजे तात्पुरता आराम. पेन रिलीफ ची गोळी घेतल्यावर मिळतो तसा. पण मुळात रोगावर उपचार होतच नाही. जवळच्या आपल्या नात्यात मतभेद जास्ती दिसून येतात ह्याला कारण हि तसेच आहे. आपल्या प्रोफेशनल आयुष्यात आपण सतत एका रस्त्याने चालतो. आपल्यातील अनेक भावनांना आपण मोकळ करत नाही. कारणे अनेक असतील. पण आपल्या माणसाकडे आपण उघड होतो. आपल्या आतील आपल्याला बनवणाऱ्या मनाची कवाड आपण उघडी करतो. तेव्हाच दोन माणसांना वेगळे करणारी भावनिक कुंपण दिसून येतात.
वैचारिक पातळी, समजून घेण हे एका सिमेनंतर निष्प्रभ होते. आधी छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आता मोठ्या होऊन खटकू लागतात. आपल माणूस, आपल नात हे आयुष्यभर पुरणारी असतात. त्यामुळे ह्या गोष्टींची फ्रिक्वेन्सी, खोली, तीव्रता, खूप जास्ती जाणवत राहते आणि वाढत रहाते. कधीकधी त्याचा कडेलोट होतो. अश्यावेळी मग एकतर ते नात कोमजते किंवा तुटून जाते. अगदी काही नाही झाल तरी त्यातली सहजता तरी नेहमीच संपून जाते.
मग ह्यावर काही उपाय? तर “लेट ईट गो” सोडून देण. म्हणजे माणूस नाही तर आपण बनवलेली भावनांची कुंपण. चांगल- वाईट, आवड-निवड ह्यांच्या बंधनातून स्वताला मुक्त करण. आता वाचयला अवघड वाटत असल तरी ते समजून घेण सोप्प आहे. एखाद्या व्यक्तीकडे तटस्थ राहून बघण. त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना आपला चष्मा बाजूला ठेवून बघण. जेव्हा आपण आपण कुंपण तोडतो तेव्हा मनात अनेक नवीन गोष्टीना जागा रिकामी होते. आपण त्या रिकामी जागेत अनेक गोष्टीना सामावून आणि तटस्थ नजरेने बघू शकतो. तेव्हा पुढल्या वेळेस आपल्या भावनांच्या भिंती एकदा “लेट ईट गो” करून एका नव्या रुपात नातेसंबंधांकडे बघूया.

No comments:

Post a Comment