Wednesday 28 June 2023

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २७)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २७)... विनीत वर्तक © 

 'To other countries I may go as a tourist, but to India I come as a pilgrim'... Martin Luther King Jr.

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर चे हे शब्द आजही तितकेच खरे आहेत. अनेक भारतीयांना मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर हे कोण आहेत माहित नसेल. तर मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांनी आपल्या मागे ठेवलेला विचारांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. आज अमेरिका जगातील सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून ओळखली जाते. लोकशाही च्या समानतेच्या तत्वांना अंगिकारणारा पहिला देश म्हणजे अमेरिका आणि याची चळवळ अमेरिकेत फोफावण्याचं श्रेय आहे ते मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर यांचं यासाठीच ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. ज्यांच्या विचारांवर ज्या एका देशाचा प्रभाव होता तो देश म्हणजेच भारत. त्यामुळेच अमेरिकन इतिहासात भारताचं महत्व वेगळं आहे. 

भारत जगातील सगळ्यात मोठ्ठा लोकशाही देश आहे. यापलीकडे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगातील सगळ्यात प्रगत देश आणि क्रमांक एक ची अर्थव्यवस्था असणारा असा अमेरिका आणि जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाचे सर्वोच्च नेते जेव्हा राज्य भेटीसाठी एकत्र येतात तेव्हा त्याचे दूरगामी परीणाम जगाच्या एकूणच पटलावर पडत असतात. नुकताच झालेला भारतीय पंतप्रधानांचा अमेरिकन दौरा ही याला अपवाद नव्हता. या दौऱ्याने नक्की काय साधलं हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. 

गेल्या काही दशकांचा विचार केला तर जग दोन प्रमुख गटांमध्ये विभागलेलं होतं. एका बाजूला अमेरिका तर दुसऱ्या बाजूला रशिया. या दोन महासत्तांमधील शीत युद्धाचा काळ जसा सरला तशी जगाच्या पटलावर अनेक देश असे होते जे वेगाने महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. अमेरिका, रशिया, युरोपियन युनियन, नंतर जागतिक पटलावर चीन च आगमन झालं. चीन ज्या वेगाने पुढे येत होता ते बघता येणाऱ्या काळात तो अमेरिकेला मागे टाकणार असं धुसर चित्र दिसायला लागलं. चीन च आगमन झालं तरी जागतिक पटलावर महासत्तेच वर्चस्व हे पृथ्वीच्या उत्तर भागातील देशांकडे राहिलेल होतं. पण गेल्या एका दशकात चित्र एकदम बदलायला लागलं. चीन अमेरिकेला मागे टाकणार हे स्पष्ट झालं तर त्याच वेळी ज्या प्रमाणे चीन ने प्रगती केली त्याच पावलांवर पाऊल टाकत भारत वेगाने पुढे यायला लागला होता. २०१९ च्या कोरोना महामारी आणि गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या रशिया - युक्रेन युद्धामुळे एकीकडे रशिया आणि युरोपियन ची वाताहत होताना स्पष्ट दिसत आहे तर त्याचवेळी अमेरिका आणि चीन यांच्यामधील महासत्तेचा संघर्ष शिगेला पोहचलेला आहे. या सगळ्यात जागतिक पटलावर दक्षिण देशांचं प्रतिनिधित्व करणारा पहिला देश असं चित्र एका देशाचं रंगायला सुरवात झालेली होती. एका नवीन देशाचा उदय झालेला होता तो देश म्हणजे 'भारत'. 

चीन च्या महत्वाकांक्षी पंखांना जर कात्री लावायची असेल तर त्याला तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी तयार करणं गरजेचं आहे हे अमेरिकेला चांगलं माहित आहे. त्याचवेळी ज्या लोकशाही तत्वांवर अमेरिका उदयास आली त्याच लोकशाही तत्वांचा सगळ्यात मोठा पुरस्कर्ता असलेल्या भारताशी संबंध वृद्धिंगत करण ही अमेरिकेची गरज होती. त्यामुळेच आत्ता झालेला भारतीय पंतप्रधानांचा दौरा हा विशेष महत्वाचा ठरतो. या दौऱ्यात काय गमावलं यापेक्षा काय मिळवलं हे जाणून घेतलं पाहिजे. या दौऱ्यात अमेरिका आणि भारत यांच्यात रक्षा, सेमी कंडक्टर, स्पेस रिसर्च, आर्टिफिशियल इंटिलिजिन्स अश्या महत्वाच्या क्षेत्रात करार झाले. अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक आणि हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड यांच्यात झालेला जेट इंजिनाचा करार खूप महत्वाचा आहे. जेट इंजिन जगात फक्त चार देश बनवू शकलेले आहेत. अमेरिका, रशिया, यु.के. आणि फ्रांस. यांच्या पलीकडे जपान आणि चीन ने जरी जेट इंजिन बनवली असली तरी त्याच संपूर्ण तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही किंवा जागतिक दर्जाचं नाही. अश्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तंत्रज्ञान हस्तांतरणासह जेट इंजिन भारतात बनवण्यासाठी केलेला करार अतिशय महत्वाचा ठरतो. 

स्पेस हे असं एक क्षेत्र आहे ज्यात अमेरिकेचं वर्चस्व कोणीच नाकारू शकत नाही. भारत अजूनही ह्युमन स्पेस फ्लाईट तंत्रज्ञानात चाचपडतो आहे. गगनयान मोहिमेची घोषणा जरी भारताने केली असली तरी भारताला अजून अनेक तंत्रज्ञान हस्तगत करायचं आहे. त्यासाठी कदाचित १० वर्षाचा कालावधी ही जाऊ शकतो. चीन आणि भारत यांच्यात अवकाश तंत्रज्ञानात असणारं अंतर खूप आहे. त्यामुळेच भारताला झपाट्याने हे अंतर कमी करण्याची गरज होती. नुकत्याच झालेल्या नासा आणि इसरो यांच्यातील संयुक करारामुळे हे साध्य होणार आहे. नासा भारतीय अंतराळ यात्रींना त्यांच्या ह्युस्टन इथल्या केंद्रात संपूर्ण प्रक्षिशण देणार आहे. त्या शिवाय अंतराळाचा अनुभव घेण्यासाठी भारतीय अंतराळयात्री २०२४ मधे अंतराळ स्थानकात नेण्याचं अमेरीकेने मान्य केलं आहे. याच्याशिवाय अनेक ह्युमन स्पेस फ्लाईटसाठी लागणाऱ्या अनेक महत्वपूर्ण तंत्रज्ञानांचं हस्तांतरण नासा कडून इसरो ला होणार आहे. यात दोन्ही देशांचा फायदा आहे. एकीकडे भारत आणि चीन यांच्यामधील स्पेस क्षेत्रातील अंतर कमी होणार तर अमेरीकेला चीन च्या अवकाश क्षेत्रातील आव्हानाला शह देता येणार आहे. 

सेमी कंडक्टर, आर्टिफिशियल इंटिलिजिन्स यांच्यासह अजून एक क्षेत्र ज्या बद्दल मिडियात जास्त बोललं नाही गेलं त्या क्षेत्रात अमेरीका आणि भारत सहकार्य करून पुढे जाणार आहेत. ते क्षेत्र आहे क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम कंप्युटींग. आपण सध्या वापरत असलेल्या कम्प्युटर चा चेहरा मोहरा बदलणारं कोणतं क्षेत्र असेल तर ते क्वांटम कम्प्युटिंग असणारं आहे. अश्या क्षेत्रात अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्य दोन्ही देशांसाठी अतिशय महत्वाचं राहणार आहे. या शिवाय ३५ वेगेवेगळ्या प्रकारच्या संशोधनात सहकार्य, ५ जी आणि ६ जी सारख्या दूरसंचार क्षेत्रात सहकार्य भारत आणि अमेरिकेने करण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे जगातील मिडिया ते जेवले काय किंवा त्यांनी एकमेकांना गिफ्ट काय दिलं, किंवा कोणी कोणाची सही घेतली याच्या बातम्या करण्यात व्यस्त असला तरी या भेटीने जागतिक पटलावर अनेक वेगळ्या समीकरणांना जन्म दिला आहे. 

या भेटीतून भारत आणि अमेरिका यांनी आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांना नक्कीच एक वेगळी उंची दिली आहे. याचे दूरगामी परिणाम काय होतील ते येणाऱ्या काळात स्पष्ट होतीलच. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं कोणी कोणासाठी उपकार म्हणून करत नाही. काळाची गरज म्हणा अथवा स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अनिच्छेने टाकलेलं पाऊल म्हणा पण यात दोन्ही देशांचा फायदा आहे. दोन्ही देश स्वतःचा फायदा बघून पुढे जात आहेत. कोणी मिठी मारली अथवा कोणी कोणाचे पाय धरले यातून व्यक्तिगत आदर व्यक्त होतो पण गोष्ट जेव्हा द्विपक्षीय सहकार्य, करार आणि जागतिक पटलावर खेळल्या जाणाऱ्या चालींची असते तेव्हा प्रत्येक देश आपला फायदा बघत असतो हे उघड सत्य आहे. पण काही असलं तरी येणाऱ्या काळात भारत - अमेरिका संबंधाचे खारे वारे आणि मतलई वारे येणाऱ्या मान्सून ची वर्दी देत आहेत हे नक्की. तूर्तास आपण त्याची वाट बघुयात. 

क्रमशः

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday 16 June 2023

एका वादळाशी झुंज... विनीत वर्तक ©

 एका वादळाशी झुंज... विनीत वर्तक  ©


निसर्गाच्या रौद्र रुपापुढे मानव नेहमीच खुजा ठरत आलेला आहे. आपलं विज्ञान किंवा आपला अभ्यास कितीही प्रगत झाला तरी निसर्गात घडणाऱ्या अनेक विध्वंसक गोष्टींची भविष्यवाणी अजूनही आपल्याला योग्य रीतीने करता येत नाही. त्यामुळेच अश्या नैसर्गिक आपत्ती मधे सगळ्यात महत्वाचं ठरते ते आपत्ती व्यवस्थापन आणि त्या आपत्ती चा मागोवा घेणं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील वातावरणात प्रचंड बदल गेल्या काही वर्षात झाले आहेत. तपमानात होणारे उतार-चढाव अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळेच वारे, पाऊस आणि एकूणच त्यांची निर्मिती यांच्या चक्रावर याचा खूप मोठा परीणाम होतो आहे. या सर्व बदलांचा परीणाम म्हणजे चक्रीवादळ.

भारताला ७५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर तर एका टोकाला हिंद महासागर अश्या तिन्ही बाजूने भारत पाण्याने वेढलेला आहे. साहजिक वातावरणातील बदलांचा प्रभाव हा भारतावर पडणार हे उघड आहे. चक्रीवादळांच्या निर्मितीत अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यातील सगळ्यात महत्वाचं असते ते समुद्राच्या पाण्याचं तपमान. भारताच्या पूर्व किनारपट्टी वरील पाण्याचं तपमान हे पश्चिम किनारपट्टीपेक्षा जवळपास २ ते ३ डिग्री सेल्सिअस ने जास्ती असते. त्यामुळेच आजवर प्रत्येक वर्षी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती होत होती. पण गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंग ने अरबी समुद्राचं तपमान हे वाढत चाललं आहे. त्यामुळेच क्वचित येणाऱ्या चक्रीवादळांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास असं दर्शवतो की अरबी समुद्रावरील वादळांच्या संख्येत ५२% टक्के तर चक्रीवादळांच्या निर्मितीत तब्बल १५०% टक्यांची वाढ दिसून आली आहे.

एखादं चक्रीवादळ निर्माण झालं तर ते किती संहारक असेल? त्याचा रस्ता कसा असेल? किंवा त्याने किती नुकसान होईल? याचा निश्चित अंदाज आजही बांधता येत नाही. कारण चक्रीवादळ मजबूत किंवा कमकुवत होण्यास मदत करणार्‍या विशिष्ट चढउतारांमुळे त्याचे मॉडेल्स त्याच्या तीव्रतेचा फारसा आधीच अंदाज लावू शकत नाहीत. जिकडे त्याची निर्मिती होते तिथली अप्पर एअर डायव्हर्जन्स, विंड शीअर आणि कोरडी हवा यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याला रोखता येणं अशक्य आहे. ते आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टींची व्हिलेव्हाट लावल्याशिवाय उसंत घेत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच जेव्हा अशी चक्रीवादळं नागरी वस्तीच्या दिशेने येणार असतील तर त्याचा अंदाज जर आपल्याला आधी बांधता आला तर खूप मोठी मनुष्य आणि वित्त हानी टाळता येऊ शकते.

गेल्या काही दशकात याच कारणांसाठी भारताने अनेक उपग्रह अवकाशात वातावरणाच्या या बदलांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आहेत. भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशात वातावरणात होणाऱ्या अनेक बदलांचा वेध घेऊन हे उपग्रह सतत याची माहिती भारतात प्रसारित करत असतात. याच माहितीच्या आधारे चक्रीवादळांची निर्मिती आणि त्यांची दिशा तसेच त्यांच्या शक्तीचा अंदाज लावला जातो. भारताच्या याच तांत्रिक प्रगतीमुळे ११ जून २०२३ ला भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) ने अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचं स्पष्ट केलं. १२ जून २०२३ उजडतं नाही तोच भारताच्या उपग्रहांच्या मिळालेल्या माहितीतून या चक्रीवादळाचं रूपांतर (Extremely severe cyclone) अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाल्याचं स्पष्ट केलं. या तीव्र चक्रीवादळाचं नामकरण 'चक्रीवादळ बिपरजॉय' असं करण्यात आलं. बिपरजॉय हे नाव बांगलादेश ने दिलेलं होतं. याचा बांगला भाषेत अर्थ होतो 'आपत्ती' (disaster). अत्यंत तीव्र चक्रीवादळात एखाद्या वादळाचा तेव्हाच समावेश होतो जेव्हा त्यातील वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १६८ ते २२१ किलोमीटर / तास इतका प्रचंड वाढलेला असतो.

चक्रीवादळ बिपरजॉय भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडक देणार हे लक्षात आल्यावर तातडीने या वादळाच्या ताकदीचा अंदाज केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आला. महाराष्ट्र किंवा गुजरात या राज्यांना सगळ्यात जास्त धोका असल्याचं स्पष्ट झालेलं होतं. पण नक्की कुठे ते धडक देणार याबद्दल अंदाज बांधता येणं कठीण होतं. १३ जून आणि १४ जून ला त्याने घेतलेल्या वळणामुळे हे वादळ गुजरात मधील कच्छ, सौराष्ट्र भागात धडक देणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर वेगाने सर्वच पातळीवर सरकारी आणि प्रायव्हेट यंत्रणांना सावध केलं गेलं. या चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता यात प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्त हानी होण्याची  शक्यता होती. पण केंद्र सरकार ज्यात पंतप्रधानांपासून, रक्षा मंत्री, गृह मंत्री, पंतप्रधान कार्यालय आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने वेळीच नागरिकांना सतर्क केलच पण त्यापलीकडे एका मोठ्या बचाव मोहिमेला सुरवात केली.

ज्या भागात चक्रीवादळ बिपरजॉय धडकणार होतं तो भाग इंडस्ट्रिअल हब होता. जामनगर मधे जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी कार्यरत आहे तर इतर अनेक इंडस्ट्रिअल कंपन्या आणि तेल, वायू क्षेत्रातील ऑइल रीग्स इकडे कार्यरत होत्या. त्या सर्वांना वेळीच सावध करून त्या सर्वांचं काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्रीवादळ बिपरजॉय साधारण १५ जून २०२३ च्या संध्याकाळी त्या भागात आदळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याच्या दोन दिवस आधीच या सर्व कामांना बंद करण्यात आलं. ज्यातून होणारं नुकसान हे तब्बल ५०० कोटी प्रत्येक दिवसाला इतकं जास्त होतं. या शिवाय एकही मनुष्य हानी न होऊ देण्याचं लक्ष्य सर्व सरकारी यंत्रणांना देण्यात आलं होतं. भारतीय सेना, वायूदल, नौदल, तटरक्षक दल यांच्या सह एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. च्या सर्व टीम ना सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले होते. अवघ्या २ दिवसात सुमारे १ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

चक्रीवादळ बिपरजॉय च्या येण्याने कोणत्याही नैसर्गिक स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व स्तरावर कार्यंवित करण्यात आली. मग तो धुवाधार पाऊस असो वा वारा, पूर असो वा भूस्खलन. ६३१ मेडिकल टीम्स, ३०० पेक्षा अजस्ती ऍम्ब्युलन्स, ३८५० हॉस्पिटल बेड्स कोणत्याही जखमी व्यक्तींना उपचारांसाठी तयार ठेवण्यात आले. तब्बल ११४८ गरोदर महिलांना हॉस्पिटल मधे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दाखल करण्यात आलं. त्यातील ६८० जणींची प्रसूती झाली. या शिवाय सर्व स्तरावर अभूतपूर्व अशी उपाय योजना केली गेली. त्यामुळे अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय ने गुजरातच्या किनारपट्टीला काल रात्री अंदाज लावल्याप्रमाणे धडक दिल्यावर सुद्धा आज हा लेख लिहला जाई पर्यंत कोणतीही मनुष्य हानी झाल्याचं वृत्त नव्हतं. ( दोन जणांना आपल्या गुरांना वाचवताना मृत्यूला सामोरं झाल्याची घटना घडलेली आहे. पण त्याचा संदर्भ चक्रीवादळाशी आहे का हे स्पष्ट झालेलं नाही.)

भारत इसरो आणि इतर अवकाशीय यंत्रणांवर कोट्यवधी रुपये का खर्च करतो याच उत्तर द्यायला काल दिलेली वादळाशी झुंज पुरेशी आहे. इसरो च्या आधुनिक उपग्रहांमुळे वातावरणात घडणाऱ्या अश्या घटनांचा योग्य वेळी अंदाज आल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अचूक अंदाज, केंद्र सरकार आणि राज्य सरकराची योग्य वेळेत टाकली गेलेली पावलं, अतिशय सुयोग्य नियोजन, भारताच्या तिन्ही दलांन सोबत एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. आणि तटरक्षक दलाच्या लोकांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी यामुळे भारताने अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय ला मात दिली आहे. या वादळाशी एकदिलाने भारतीय होऊन झुंज देणाऱ्या त्या अनामिक लोकांना माझा कडक सॅल्यूट.

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल    

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 12 June 2023

'काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती'... विनीत वर्तक ©

 'काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती'... विनीत वर्तक ©

असं म्हणतात, "मारने वाले से बचाने वाला हमेशा बड़ा होता हैं " या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा संपूर्ण जगाने घेतली आहे. ही घटना आहे कोलंबिया देशात घडलेली. ज्या घटनेने संपूर्ण जगाला एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. १ मे २०२३ रोजी एक आई आपल्या ४ मुलांना घेऊन कोलंबिया देशामधल्या अमेझॉनच्या  जंगलात असलेल्या अराराकुआरा या गावातून सॅन जोस डेल ग्वाविअरे इकडे एका प्रायव्हेट विमानाने निघाली. १ पायलट, १ लोकल लिडर आणि १ या मुलांची आई मॅग्डालेना मुकुटुय व्हॅलेन्सिया अशी ३ प्रौढ माणसं आणि तिच्या सोबत असलेली ४ मुलं ज्यात 13 वर्षाची लेस्ली जेकोबॉम्बेअर मुकुटुय आणि तिची ९ आणि ४ वर्षाची भावंडं तर एक अगदी ११ महिन्याचं बाळ असे ७ जण या विमानात होते.

सेस्ना सिंगल-इंजिन प्रोपेलर विमानाने उड्डाण केल्यावर काही वेळाने त्याच्या इंजिनात बिघाड झाला. एकच इंजिन असल्याने विमान कोसळण्या पलीकडे दुसरा कोणताच पर्याय पायलटकडे नव्हता. त्यांनी तात्काळ रेडिओवर डिस्ट्रेस सिग्नल पाठवला. "मे डे,,, मे डे...मे डे... असा शेवटचा संदेश पाठवत ते विमान अमेझॉन च्या घनदाट जंगलात कोसळलं. विमान कोसळल्या नंतर विमानाचा कोणताही मागमूस लागला नाही. तब्बल २ आठवडयांनी १६ मे ला हे विमान अमेझॉन च्या घनदाट जंगलात शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. अनेक प्रयत्ना नंतर कोसळलेल्या विमानाचे अवशेष शोध पथकाला मिळाले. विमानांच्या त्या अवशेषात शोध पथकाला ३ प्रेत सापडली. दोन पुरुष आणि प्रवास करणाऱ्या त्या महिलेचे प्रेत तर सापडलं पण त्या ४ मुलांचा कोणताही मागमूस लागला नाही. आसपास शोध घेतल्यावर पण हाताशी काही लागलं नाही. पण तिकडे काही अंतरावर पडलेल्या काही बॉक्स वरून अपघातानंतर ही मुलं जिवंत असल्याचे पुरावे शोध पथकाला मिळाले.

चार मुलं अमेझॉन च्या जंगलात जिवंत असल्याचा अंदाज येताच कोलंबियन सरकारने कोलंबियन आर्मीला शोध कार्यात जुंपलं. कोलंबियन आर्मी ची १५० लोकांची टीम अमेझॉन च्या जंगलात या ४ मुलांचा जीव वाचवण्यासाठी २४ तास शोध कार्याला लागली. कोलंबिया हा देश युद्धाच्या ज्वरात होरपळतो आहे. आर्मी आणि सामान्य नागरीक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचलेला आहे. पण त्या ४ मुलांना वाचवण्यासाठी आपली दुश्मनी बाजूला ठेवत गावातील सर्वसामान्य लोक ही या शोधकार्यात सहभागी झाले. गावातील लोकांना आर्मीपेक्षा अमेझॉन च्या जंगलाचा जास्ती अंदाज होता. त्यानंतर जवळपास दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ अमेझॉन च्या जंगलाचा कित्येक किलोमीटर चा प्रदेश पिंजून काढल्यानंतर ४० दिवसांनी ही ४ मुलं सुखरूप अवस्थेत एक चमत्कार म्हणता येईल अश्या स्थितीत शोध पथकाला सापडली.

तब्बल ४० दिवस ती ४ मुलं एकमेकांना साथ देत अमेझॉन च्या जंगलात मच्छर, पशु, हिंस्त्र प्राणी, साप, विंचू ते पाऊस अश्या सगळ्याचा धैर्याने सामना करत जिवंत होती. ४० दिवस ते कसे जिवंत राहिले याची कहाणी ऐकल्यावर तर शोध पथकाच्या जवानांच्या हातावर काटे उभे राहिले. या ४ मुलांना जिवंत ठेवण्यात प्रमुख वाटा होता तो १३ वर्षीय लेस्ली जेकोबॉम्बेअर मुकुटुय हिचा. १३ वर्षाची लेस्ली आई सोबत गावाच्या बाजूला असलेल्या घनदाट अमेझॉन च्या जंगलात वावरली असल्याने जंगलात काय खाल्लं जाऊ शकते याच ज्ञान तिला होतं, रानटी फळ, गवत आणि झाड खाऊन या ४ जणांनी एक दोन नाही तर तब्बल ४० दिवस काढले. रात्रीच्या वेळी जंगली श्वापदांपासून वाचण्यासाठी त्यांनी झाडाच्या ढोलीचा आसरा त्यांनी घेतला. विमानाचा अपघात झाल्यानंतर त्यांची आई ४ दिवस जिवंत होती. जखमी असलेल्या आईने आपल्या मुलांना काही झालं तरी जंगलात एकत्र रहा असं सांगितलं.

४० दिवसात या मुलांनी जंगलात ५ किलोमीटर चा प्रवास केला. जेव्हा ते सापडले तेव्हा त्यांची अवस्था खूप दयनीय होती. योग्य अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे  ते सर्वच अशक्त झाले होते. त्या ११ महिन्याच्या बाळाला सांभाळत या मुलांना पुढे चालणं ही अशक्य झालं होतं. मुलांचा शोध लागल्यानंतर आर्मीने त्यांना त्वरीत हेलिकॉप्टर ने हॉस्पिटल ला हलवलं. शारीरीक त्रासातून हळूहळू ही मुलं सावरत असली तरी गेल्या ४० दिवसांच्या जिवघेण्या अनुभवानंतर ही मुलं अजून त्यातून सावरली नाहीत.

जंगलाचं थोडं ज्ञान, साक्षात समोर आलेल्या यमाला परत पाठवून ही मुलं तब्बल ४० दिवसांनी पृथ्वी वरील एका घनदाट जंगलातून सुखरूप बाहेर पडली ही घटना विलक्षण अशीच आहे. मुलांची वय जास्ती ही नव्हती. अगदी १३ वर्षाची लेस्ली सगळ्यात मोठी तर बाकीची सगळी अगदी त्यांच्या बालपणात होती तर एक मुलं  तर अवघे ११ महिन्यांचे होते. त्यामुळेच त्यांचा ४० दिवसांचा संघर्ष जगात प्रसिद्ध झाला आहे. संपूर्ण जगातून या मुलांच्या धैर्याला सलाम आणि कुर्निसात केला जातो आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सुद्धा या मुलांना भेट देऊन त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. या चारही मुलांना माझा कडक सॅल्यूट आणि येणाऱ्या अनेक पिढयांना त्यांनी दिलेली मृत्यूशी झुंज प्रेरणादायी ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

फोटो शोध सौजन्य :- गुगल    

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.