Tuesday 30 November 2021

बर्फातला वाघ... विनीत वर्तक ©

 बर्फातला वाघ... विनीत वर्तक ©


आजवर पोकळ डरकाळ्या फोडणारे वाघ आपण अनेकदा बघितले असतील पण आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने शत्रूला चारी मुंड्या चीत करणारा बर्फातील एक ढाण्या वाघ मात्र अजूनही भारतीयांच्या नजरेपासून दुर्लक्षित आहे. हिमालयाच्या कुशीत ही एक वेगळा भारत वसलेला आहे जो बाकीच्या भारताच्या नजरेत कधीच भरत नाही. ही गोष्ट आहे अश्याच एका बर्फातील वाघाची ज्याने संपूर्ण कारगिल युद्धाची लय बदलवून टाकली. पाकिस्तान ने पाठीत खुपसलेल्या खंजिराला आस्मान दाखवत आपल्या वाघनखांनी पाकिस्तान च आतडं बाहेर काढलं होतं. हा बर्फातील वाघ म्हणजेच 'कर्नल सोनम वांगचुक'.  


१९९९ सालच्या मे महिन्यात पाकिस्तान ने छुप्या रीतीने भारताच्या प्रदेशावर कब्जा केला होता. पाकिस्तानी सैन्य भारताच्या हद्दीत कुठवर शिरलं आहे याचा अंदाज भारताला आला नव्हता. आपल्या वार्षिक सुट्टीवर असलेल्या मेजर सोनम वांगचुक यांना २६ मे १९९९ ला देशाच्या संरक्षणासाठी तात्काळ हजर राहण्याचे आदेश मिळाले. दोन दिवसांनी हांडेन ब्रॉक या चोरबाट ला ( ला म्हणजे पास ) इथल्या बी.एस.एफ. चौकीवर ते हजर झाले. ही चौकी १६,८६६ फूट (५१४१ मीटर) उंचीवर आहे. खरे तर सामान्य माणसाला इथे जायचं असेल तर निदान २-३ दिवस इथलं वातावरण जुळवून घेण्यासाठी लागतील. पण मेजर सोनम वांगचुक हे लेह इथले असल्याने या वातावरणाची त्यांना सवय होती. पाकिस्तानी सैन्य किती तयारीनिशी भारतीय हद्दीत आलं आहे याचा काही अंदाज नसताना मेजर सोनम वांगचुक यांनी अवघे ३० सैनिक घेऊन भारतीय सरहद्दीवरील अगदी शेवटच्या चौकीवर जी तब्बल १८,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर होती तिच्याकडे कूच केलं. 


हा रस्ता सोप्पा नव्हता. १८,००० फुटावर हवा इतकी विरळ आणि ऑक्सिजन इतका कमी असतो की श्वास घेणं पण कठीण असते तिकडे मेजर सोनम वांगचुक आणि त्यांचे ३० बहादूर सैनिक ८० अंशाचा सरळसोट चढण उणे -३० डिग्री सेल्सिअस तपमानात चढत होते. त्यांच्या टीमवर दबा धरून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी अचानक हमला केला. मशिनगन ने गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर पाकिस्तान च्या बाजूने व्हायला लागला. या गोळीबारात एक ऑफिसर जखमी झाला. खरे तर त्यांना युद्ध करण्याचा कोणता आदेश नव्हता. त्यांना माघारी फिरून बेस कॅम्प वर परतता आलं असतं. पण तसं  केलं असतं तर पाकिस्तान च्या बाजूने 

वरच्या चौकीकडे जाणाऱ्या सैनिकांना फायदा मिळाला असता. कदाचित भारत ती चौकी कायमसाठी गमावून बसला असता. मेजर सोनम वांगचुक यांनी मागचा  पुढचा विचार न करता जखमी झालेल्या ऑफिसर सोबत एक सैनिक संरक्षणासाठी आणि बेस कॅम्प ला माहिती देण्यासाठी ठेवून आपल्या लक्ष्याकडे कूच केलं. 


मेजर सोनम वांगचुक आणि त्यांची टीम पाकिस्तान च्या बाजूने होणारा गोळीबार चुकवत आपल्या लक्ष्याकडे चढाई करू लागली. ३ तासांच्या जीवघेण्या धुमश्चक्रीनंतर मेजर सोनम वांगचुक आणि त्यांची टीमने आपलं लक्ष्य पूर्ण केलं. त्यांनी खालून पाकिस्तान च्या दिशेने चढाई करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर वर दगड टाकले. पण त्यांच्या लक्षात आलं की हा तात्पुरता इलाज आहे. पाकिस्तानी सैनिकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी वाघा सारखं दबा धरून बसायला हवं. त्या प्रमाणे त्यांनी वर चढणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना आपल्या टप्यात येऊ दिल. अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्यात ४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. त्यांच्या बंदुका, दारुगोळा भारतीय सैनिकांनी हस्तगत केला. १८,००० फुटावर कोणत्याही बोफोर्स गन च्या मदतीशिवाय त्यांनी पाकिस्तानी सैनिकांनी केलेले सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तान ला बटालिक सेक्टर मधे घुसखोरी करण्यासाठी चोरबाट ला पासवर ताबा मिळवणं गरजेचं होतं .पण मेजर सोनम वांगचुक आणि त्यांच्या टीम ने त्यांच्या स्वप्नांना धुळीस मिळवलं. संपूर्ण जगाशी फक्त एका वॉकी टोकी च्या सोबत जोडलेलं असताना एक आठवडा कोणत्याही मदतीशिवाय रात्रंदिवस उणे -३० ते -४० डिग्री सेल्सिअस तपमानात १८,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर त्यांनी भारतीय तिरंगा त्या डोंगर रांगांवरवर फडकावत ठेवला. 


कारगिल युद्धात भारताला मिळालेला हा पहिला विजय होता. मेजर सोनम वांगचुक यांनी लीड फ्रॉम द फ्रंट या युक्तीला जागत भारतीय सेनेच्या पराक्रमाच, बहादुरीच एक उदाहरण पाकिस्तानी सेनेला दाखवलं ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास धुळीला मिळाला. याच विजयानंतर भारताने कारगिल युद्धाचं पारडं आपल्या बाजूने झुकवलं. मेजर सोनम वांगचुक यांना त्यांच्या पराक्रमासाठी भारतीय सेनेतील दुसरा सगळ्यात मोठा सन्मान महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. २०१८ साली आपली प्रदीर्घ सेवा भारताला दिल्यानंतर कर्नल या पदावरून सोनम वांगचुक निवृत्त झाले. पण त्यांनी बर्फात गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना 'लायन ऑफ लडाख' ही उपाधी देण्यात आली. 


कर्नल सोनम वांगचुक यांच्या पराक्रमाला माझा कडक सॅल्यूट. तोंडाच्या वाफा घालवणारे वाघ खूप बघितले पण आपल्या सारखा बर्फात पराक्रम गाजवणारा खरा वाघ तुम्हीच. तुमच्या या पराक्रमासाठी प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे. 


जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :-  गुगल 


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Sunday 28 November 2021

आज नगद कल उधार... विनीत वर्तक ©

आज नगद कल उधार... विनीत वर्तक ©

'आज नगद कल उधार' अशी पाटी सध्या पाकिस्तान ला आंतरराष्ट्रीय मंचावर सगळीकडे बघायला मिळत आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानला सध्या भिकेचे डोहाळे लागलेले आहेत. स्वतःच्या घरात अन्नाचा दाणा मिळण्याची अडचण पण दुसऱ्यांच्या घरात काय चालू आहे हे झाकून बघणारा पाकिस्तान सध्या आर्थिक कडेलोटावर उभा आहे. काही दिवसांपूर्वी याची स्पष्ट कबुली खुद्द त्यांच्या पंतप्रधानांनी दिली आहे. कर्ज घेऊन माज करणाऱ्या आणि कोणतंही व्हिजन नसलेल्या फक्त धार्मिक तेढ वाढवून भारताशी शत्रुत्व जपणाऱ्या राजकीय नेतृत्वामुळे पाकिस्तान ची वाटचाल झपाट्याने आर्थिक दिवाळखोरीकडे होत आहे. भिकेचा कटोरा घेऊन जिथून मिळेल तिथून आणि चढ्या भावाने गेल्या काही वर्षात कर्ज घेतं सुटला आहे. या घेतलेल्या कर्जाचा विनियोग आणि त्याचा परतावा कसा करणार याबद्दल काहीच विचार न करता हळूहळू या कर्जाच्या विळख्यात आता तो पूर्णपणे अडकला आहे. 

एका घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी दुसरं कर्ज आणि त्याची परतफेड करण्यासाठी तिसरं कर्ज अश्या तर्हेने आता परिस्थिती अशी आली आहे की कर्जासाठी तारण म्हणून ठेवायला काही बाकी राहिलेलं नाही. तसेच आंतरराष्ट्रीय कर्ज देणाऱ्या संस्थांनी 'आज नगद कल उधार' ची पाटी पाकिस्तान ला दाखवली आहे. पाकिस्तान वर असलेल्या विदेशातून दिलेल्या कर्जाचा आकडा तब्बल ११६ बिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात गेला आहे. ( १ बिलियन म्हणजे १०० कोटी). या प्रचंड कर्जाचा हप्ता फेडायला आणि राष्ट्र चालवायला आज पाकिस्तानकडे पैसे नाहीत. हे पैसे कुठूनतरी जमा करण्यासाठी शेवटी पाकिस्तान ने आपल्याच बँकेकडून कर्ज घेण्याची नामुष्की ओढवली आहे. प्रत्येक देशात एक सेंट्रल बँक असते. तशी पाकिस्तानातील सेंट्रल बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ पाकिस्तान कडून पाकिस्तान ने आपल्या राष्ट्रीय सकल उत्पनाच्या २% कर्ज उचलण्याची तयारी केली. 

पाकिस्तान कर्जाच्या विळख्यात इतका अडकला आहे की तिथल्या सरकारला आपल्याच बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आय.एम.एफ. म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या मंजुरीची गरज आहे. पुढल्या वित्तीय वर्षात पाकिस्तान च्या तिजोरीत एक पैसे शिल्लक नसल्याने त्यांना देश चालवण्यासाठी पैश्याची गरज आहे. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांची कर्ज घेण्याची विनंती धुडकावून लावली. पाकिस्तान ने यावर आपल्या बँकेतून कर्ज घेण्याचा आपला हक्क असल्याचं कळवलं. पण त्यांच्या या मुद्याला ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केराची टोपली दाखवली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पष्ट केलं की जोवर पाकिस्तान वर असलेला कर्जाचा बोजा आणि कश्या पद्धतीने पाकिस्तान यातून बाहेर पडणार याचा रोडमॅप तयार होत नाही तोवर पाकिस्तान ची ही स्वायत्तता संपुष्टात आलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की पाकिस्तान आता आर्थिक कडेलोटावर स्पष्टपणे उभा आहे. 

पाकिस्तान ला त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतपेढ करण्यासाठी ते पैसे पाकिस्तानी जनतेकडून उभारावे लागणार आहेत. पाकिस्तान मधील जनतेवर अजून जास्ती  कर लावून तसेच अधिक जनतेला कराच्या क्षेत्रात आणून हे पैसे उभारण्याची योजना आहे. पण आधीच पाकिस्तानी जनता आर्थिक दृष्ट्र्या आधीच दारिद्र्यात अडकलेली आहेत. त्यांच्यावर अजून अधिभार म्हणजे ते अजून गरिबीत लोटले जाणार. त्याशिवाय जीवनाशक्य वस्तूंवर कर लावल्याने महागाईचा दर गगनाला भिडणार आहे सर्वश्रुत आहे. पाकिस्तान ला २०२१-२२ वर्षात २३.६ बिलियन अमेरिकन डॉलर तर २०२२-२३ वर्षासाठी तब्बल २८ बिलियन अमेरिकन डॉलर च्या मदतीची गरज आहे. पाकिस्तान हे पैसे कसे उभे करणार हे अजूनतरी कोणाला स्पष्ट झालेलं नाही. जोवर हे स्पष्ट होत नाही तोवर पाकिस्तान ला अजून पैसे कर्जाच्या रूपात देण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि इतर सर्व मार्ग हात झटकणार हे ठरलेलं आहे. त्याचीच एक सुरवात आंतरराष्ट्रीय नाणेधिनीने केली आहे. एक अशी वेळ लवकरच येईल की आपल्याच कर्जाच्या डोंगराखाली पाकिस्तान संपूर्णपणे कोलमडून जाणार आणि या कडेलोटाकडे पाकिस्तान झपाट्याने वाटचाल करत आहे. 

आज नगद कल उधार अश्या पाट्या पाकिस्तान च्या तोंडावर जागतिक संघटनांकडून आपटायला सुरवात झाली आहे. भारताला रोज उठून युद्धाच्या दर्पोक्त्या भरणाऱ्या कंगाल पाकिस्तानला आज दोन वेळच्या जेवणाची सोय कशी करायची याची चिंता आहे. पाकिस्तान च असा कडेलोट होणं भारताला परवडणारं नसलं तरी यातून काही चांगल्या गोष्टी ही घडू शकतात. चीन याचा फायदा घेईल असा मतप्रवाह असला तरी ते धार्मिक आंधळे असलेल्या पाकिस्तानात तितकं सोप्प नाही. अर्थात या जर तर च्या गोष्टी आहेत. तूर्तास पाकिस्तान चे करंटा घेऊन भीक मागण्याचे ही सर्व मार्ग झपाट्याने बंद होत आहेत आणि पाकिस्तान ला आज नगद कल उधार अश्या पाट्या तोंडावर मारल्या जात आहेत. त्यांचे पंतप्रधान टेलिव्हिजन वर येऊन आपल्या या व्यथेचे वर्णन संपूर्ण जगाला सांगत आहेत. यामुळेच येत्या १-२ वर्षात पाकिस्तान चे तुकडे झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.










Wednesday 24 November 2021

भविष्य बदलणारी टक्कर... विनीत वर्तक ©

 भविष्य बदलणारी टक्कर... विनीत वर्तक ©

आज नासाने एका वेगळ्या मोहिमेचा श्रीगणेशा केला आहे. आजवर नासाने अनेक अंतराळ मोहिमा अवकाशात पाठवल्या आहेत पण या सगळ्यांपेक्षा आजची मोहीम खूप वेगळी आणि भविष्याला कलाटणी देणारी आहे. आजवर माणसाच्या तांत्रिक क्षमतेमुळे विश्वात होणाऱ्या घटनांचे साक्षीदार होणं इतपत आपलं स्थान होतं पण आजच्या मोहिमेमुळे त्या घटना होऊ न देण्याची किंवा त्यात बदल करण्याची तांत्रिक क्षमता मानवाकडे येण्याची शक्यता आहे. तर एकूणच आजची मोहीम ही संपूर्ण मानवजातीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तर काय आहे ही भविष्य बदलणारी टक्कर? त्यातून काय हाताशी लागणार आहे? एकूणच या मोहिमेच यश- अपयश आपल्या प्रत्येकाशी कसं जोडलेलं आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. 

साधारण ६.५ कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर एक अभूतपूर्ण घटना घडली. संपूर्ण पृथ्वीचं भविष्य त्या घटनेने बदलवून टाकलं. ती घटना होती पृथ्वीवर टक्कर दिलेल्या एका अशनीची. या टक्करीतून झालेल्या स्फोटात पृथ्वीवर अधिराज्य करणारे डायनॉसरांच अस्तित्व एका क्षणात पुसलं गेलं. विश्वाच्या या अथांग पसाऱ्यात ही खूप मोठी खरं तर एक शुल्लक घटना होती. पण या शुल्लक घटनेने पृथ्वीतलावर सजीवांचे भविष्य बदलवून टाकलं. खगोलशास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांच्या मते अश्या घटना पृथ्वीच्या भूतकाळात अनेकवेळा घडलेल्या आहेत. तसेच येणाऱ्या भविष्यात ही अनेकदा घडू शकतात. अनेक वैज्ञानिकांच्या मते गेल्या काही लाखो वर्षात अशी मोठी टक्कर पृथ्वीशी झालेली नाही. अश्या घटनांच्या परत होण्याचा कालावधी बघता नजीकच्या भविष्यात अशी एखादी मोठी टक्कर अपेक्षित आहे. जर अशी एखादी टक्कर होण्याचं आधी आपल्याला लक्षात आलं तर आपण ती टक्कर तंत्रज्ञानाच्या साह्याने रोखू शकतो का? तर या का च उत्तर शोधण्यासाठी नासाने आज Double Asteroid Redirection Test spacecraft (DART) डार्ट नावाचं यान आज अवकाशात प्रक्षेपित केलं आहे. 

डार्ट हे एका फ्रिज च्या आकाराचं साधारण ५५० किलोग्रॅम वजनाचं यान आहे. ज्याला फाल्कन ९ रॉकेट ने आज प्रक्षेपित केलं आहे. डार्ट हे यान पुढल्या वर्षी डीडीमॉस या पृथ्वीच्या लघुग्रहाच्या जवळ पोहचेल. डीडीमॉस ला एक अवघा १६० मीटर व्यासाचा डिमॉर्फोस नावाचा एक उपग्रह आहे. जो साधारण ११ तास ५५ मिनिटात त्याच्या भोवती प्रदक्षिणा करत आहे. डार्ट या डिमॉर्फोस वर पुढल्या वर्षी सप्टेंबर २०२२ मधे २४,००० किलोमीटर / तास वेगाने आदळेल. या टकरीमुळे डिमॉर्फोस चा डीडीमॉस भोवती प्रदक्षिणा करण्याचा कालावधी साधारण १० मिनिटांनी बदलेल. या टकरीमधून नासा अनेक तंत्रज्ञान पहिल्यांदा वापरणार आहे. 

सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर डीडीमॉस ची सूर्याभोवतीची कक्षा १०.९ किलोमीटर इतकी प्रचंड अंडाकृती स्वरूपात आहे. त्याचवेळी त्याचा वेग ६.६ किलोमीटर / सेकंद इतका वेगवान आहे. (साधारण १५,००० मैल/ तास) आता या वेगात जाणाऱ्या आणि त्या भोवती फिरणाऱ्या अवघा १६० मीटर व्यास असणाऱ्या डिमॉर्फोस ला लक्ष करणं हे अतिशय कठीण आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की या लघुग्रहाचा पृथ्वीला भविष्यात धोका नाही त्यामुळेच नासाने याची निवड केली आहे. कारण गणित केल्याप्रमाणे जर गोष्टी घडल्या नाहीत तरी त्याने पृथ्वीला कोणताही धोका निर्माण होणार नाही. डिमॉर्फोस कसा बनला आहे? त्यावर कश्या पद्धतीचा पृष्ठभाग आहे याबद्दल नासा च्या वैज्ञानिकांना जास्ती माहिती नाही. पण गणित केल्याप्रमाणे जर त्याचा पृष्ठभाग टणक असेल तर या टकरीमधून त्याची कक्षा कमी बदलेलं आणि जर तो जर मऊ असेल तर या टकरीमधून त्याची कक्षा जास्ती प्रमाणात बदलेल. 

नासाचे वैज्ञानिक यातील प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून असणार आहेत. या टकरीच्या १० दिवस आधी या यानामधून इटली ने बनवलेलं LICIACube नावाच यान वेगळं होईल त्यातील दोन कॅमेरे ही टक्कर साधारण ५४ किलोमीटर वरून बंदिस्त करतील. त्या शिवाय डिमॉर्फोस वर असलेला कॅमेराही टकरीच्या २० सेकंद अधीपर्यंत फोटो घेऊन ते नासा ला पाठवत राहील. या टकरीमधून नासा ला हे स्पष्ट होईल की अश्या पद्धतीच्या टकरीमधून आपण डिमॉर्फोस च्या कक्षेला किती बदलवू शकलो. भविष्यात असा एखादा लघुग्रह जर पृथ्वीवर चाल करून आला तर त्याची कक्षा बदलण्यासाठी कश्या पद्धतीची पावलं उचलावी लागतील. टक्कर करण्यासाठी गणित कश्या पद्धतीने मांडावे लागेल. कश्या पद्धतीने पृथ्वी ला वाचवता येईल. या मोहिमेसाठी नासाने तब्बल ३२४ मिलियन अमेरिकन डॉलर मोजले आहेत. या मोहिमेच्या यश- अपयशावर मानवाचं अस्तित्व बदलण्याची ताकद आहे. त्यामुळेच नुसती नासा नाही तर संपूर्ण मानवतेच्या दृष्टीने या मोहिमेचं महत्व खूप आहे. 

भविष्यात जर अमेरिकेने इतर देशांना अश्या टकरीपासून वाचवण्यासाठी पैसे मागितले तर तो त्यांनी आज इन्व्हेस्ट केलेल्या पैश्याचा परतावा असेल. अमेरिकेचा मूळ हेतू  अमेरिकेला सुरक्षित करणं हा असला तरी अश्या मोहिमेतून संपूर्ण मानवजातीला वाचवण्याचं तंत्रज्ञान मानव बनवू शकणार आहे. विश्वाच्या या अनंत पसाऱ्यातून कोणतं संकट आपल्यापुढे पुढे ठाकेल याच भविष्य आजही आपण वर्तवू शकत नाहीत. पण जर याची कल्पना आपल्याला वेळेत म्हणजे १० वर्ष ते २० वर्ष आधी जर कल्पना आली तर कदाचित आज मानव अश्या वैश्विक संकटापासून पृथ्वीला वाचवू शकेल. तूर्तास नासाच्या या मोहिमेला आणि नासाच्या संशोधकांना खूप खूप शुभेच्छा. 

फोटो शोध सौजन्य :-  नासा / गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Thursday 18 November 2021

#कोपेश्वरच्या_अंतरंगात भाग २... विनीत वर्तक ©

 #कोपेश्वरच्या_अंतरंगात भाग २... विनीत वर्तक ©

कोपेश्वर मंदीराच्या खांबांची रचना जशी वैशिष्ठपूर्ण आहे तशीच प्रत्येक खांब हा गणिताच्या दृष्टिकोनातून वैशिष्ठपूर्ण आहे. एकाच खांबात गोलाकार, चौकोनी, षट्कोनी असे विविध आकार बसवलेले आहेत. त्या आकारांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात याच खांबांवर १६ किर्तीमुख कोरलेली आहेत. विविध पक्षी, प्राणी, फळ, फुलं, नर्तकी आणि रामायण, पंचतंत्रापासून ते गौतम बुद्धांपर्यंत आपल्याला सगळं इकडे सजीव झालेलं दिसून येते. ज्याची माहिती इथे असणारे अनेक स्थानिक गाईड सांगत असतात. मी ही अश्या एका गाईड करून मंदिराची ओळख करून घेतली आणि आश्चर्य म्हणजे तो माझ्या लिखाणाचा चाहता निघाला. माझे अनेक लेख वाचल्याचं त्याने नमूद केलं. त्याने सांगितलेल्या गोष्टीत मी गोष्टींची भर घातली तेव्हा माझं नाव घेतल्यावर त्याने चक्क माझ्याकडून कोणतंही शुल्क घेण्यास नकार दिला. त्याने सांगितलेली माहिती मात्र खूप सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी होती. श्री. शशांक रामचंद्र चोथे असं त्याच नाव असून या मंदिरावरील एक पुस्तक ही मी त्याच्याकडून विकत घेतलं. सोशल मिडियामुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहचू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. 

मंदिराच्या खांबांच जर नक्षीकामा व्यतिरिक्त बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल कि खांबांची रचना ही जवळपास सारखी आहे. हे खांब एकसंध नसल्याचं तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजे एक खांब हा विविध भागात बनवून त्याला बॉक्स-पिन पद्धतीने जोडलेलं आहे. असं असलं तरीसुद्धा ज्या पद्धतीने आकारांचा मेळ खांबात साधला आहे तो अचूक आहे. इतकच काय मी चक्क त्या आकारांची उंची आणि व्यास मोजून बघितला तर तो निदान काही मिलीमीटर मधे अचूक आहे. याचा सरळ अर्थ आहे की हे १०८ खांब एखाद्या असेम्ब्ली लाईन मधे तयार केले गेले आहेत. ज्या पद्धतीने आज हजारो कार बनवल्या जातात. एकच गोष्ट अनेकवेळा बनवण्यासाठी जगात प्रसिद्ध असणारी असेम्ब्ली लाईन पद्धत भारतात १००० वर्षापेक्षा आधी अस्तित्वात होती. असेम्ब्ली लाइनमुळेच अश्या खांबांच एकत्रित निर्माण शक्य आहे. 

ज्या प्रमाणे मी वर लिहिलं की यात वेगेवेगळे आकार कोरलेले आहेत. त्यातील चौकोनी,षट्कोनी आकार हे चिनी-हतोड्याने एक वेळ बनवता येतील. पण गोलाकार आकारातील कॉन्सन्ट्रिक सर्कल मात्र हाताने बनवणं शक्य नाही. त्यातही त्यावरील फिनिश जर १००० वर्षांनी तुम्ही अनुभवली तर ती लेथ मशीनवर बनवली गेली असल्याचं कोणीही सांगेल. याचा अर्थ असेम्ब्ली लाईन मधे लेथ मशीन सारखी उपकरण किंवा व्यवस्था ज्यात कित्येक टन वजन असणारी दगडाची शिळा गोलाकार फिरवून तिला एखाद्या टूल म्हणजेच डायमंड ने कापून तिच्या बाह्य भागावर अशी कॉन्सन्ट्रिक सर्कल बनवली गेली आहेत. आता प्रश्न येतो की जेव्हा जग १००० वर्षापूर्वी प्राथमिक अवस्थेत होत तेव्हा भारतात असेम्ब्ली लाईन मधे लेथ मशीन सारख्या एखाद्या व्यवस्थेतून कोपेश्वर मंदिराचे १०८ खांब बनवण्याचं उत्पादन सुरु होतं. आता त्याकाळी अश्या प्रचंड मोठ्या दगडाच्या शिळा कश्या गोलाकार फिरवल्या गेल्या असतील? कोणत्या पद्धतीचे टूल या दगडांना आकार देण्यासाठी वापरले गेले असतील? हा अभ्यासाचा विषय आहे. या शिवाय असेम्ब्ली लाईन ची ही संपूर्ण व्यवस्था मंदिराच्या आसपास निर्माण केली गेली असेल. त्यामुळे दळणवळणाचा आणि तयार झालेल्या खांबाला इजा न पोहचवता मंदिरात बसवलं गेलं असेल. 

खांबांच उत्पादन हा एक भाग झाला. पण जो दगड बसाल्ट स्वरूपाचा कातळ यात वापरला गेला आहे तो नक्कीच सह्याद्री मधून आणला गेला आहे. तस असेल तर सह्याद्री जवळपास १०० किलोमीटर पेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे या दगडांना सह्याद्री मधून फोडण्याची व्यवस्था केली गेली असेल. तसेच हे दगड सह्याद्री ते खिद्रापूर पोहचवण्याची व्यवस्था केली गेली असेल. हत्तीचा वापर किंवा कृष्णा नदीच्या पात्रातून या प्रचंड मोठ्या दगडांच्या शिळांच वहन केलं गेलं असेल. आज अश्या प्रचंड मोठ्या दगडी शिळा सह्याद्री मधून विलग करण्यासाठी स्फोटके लागतात. त्याकाळी कश्या पद्धतीने हे सर्व विलग केलं गेलं असेल? कश्या पद्धतीने अश्या मधे भेग नसणाऱ्या दगडी शिळा शोधल्या गेल्या असतील? हे खांब बनवताना चुका ही झाल्याच असतील म्हणजे असेम्ब्ली लाईनमध्ये जास्तीच उत्पादन ही केलं गेलं असेल? असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतील जेव्हा आपण स्वतः हे मंदिर उभारण्याचा विचार करू. जेव्हा आपण या सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार करू तेव्हा कोपेश्वर मंदिराचा अवाका आपल्याला लक्षात येईल. ज्यात आपण विचार करू त्या पेक्षा उच्च प्रतीचं विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि स्थापत्य शास्त्राचा वापर केला गेला आहे. कारण त्याशिवाय अशी निर्मिती ही शक्य नाही. 

मंदिर उभं करणं एक गोष्ट आणि त्यात आपली शिल्पकला आणि संस्कृतीचा मेळ घालणं हा दुसरा भाग आहे. कोपेश्वर इकडे या दोन्ही गोष्टींचा मेळ अतिशय सुंदरपणे घातला गेला आहे. खांबांच्या वर कल्पकतेने कोरलेली कीर्तिमुख तसेच अनेक सुंदर शिल्प, नृत्यांगना, द्वारपाल, अगदी शंकराच्या पिंडीभोवती गाभाऱ्यात असलेल्या १८ सुंदर तरुणी पूजेचं साहित्य घेऊन आपल्या देवाला प्रसन्न करताना उभं करणं हे सगळच काळाच्या पुढचं आहे. कोरलेल्या शिल्पातील सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांची नख सुद्धा आपण १००० वर्षानंतर स्पष्ट बघू शकतो. कमनीय बांधा, अंगावर असणारी सुंदर आभूषणे आणि चेहऱ्यावर अगदी भुवईच्या टिपलेल्या अदा त्याकाळच्या कलाकारांच आपल्या कामाप्रती निष्ठा दाखवते. कोपेश्वर मंदिराचा इतिहासात जवळपास ७ मोठी राज्यकर्ते घराणी झाली. त्या सोबत कित्येक परकीय, मुघल, मुस्लिम शासकांची आक्रमण या मंदिराने झेललली असतील. औरंगजेबाने आणि इतर मुघल शासकांनी इथल्या मुर्त्यांचे चेहरे विद्रुप करून मंदिराची शोभा घालवण्याचा प्रयत्न केला. पण भारताची हिंदू संस्कृती त्या सर्वाला आजही पुरून दिमाखात उभी आहे. काही ठिकाणी खांबावर नक्षीकाम अर्धवट ठेवल्याचे दाखले मिळतात. अनेक इतिहासकारांच्या मते मंदिराचं काम अर्धवट राहिलेलं आहे. पण असं असलं तरी जे काही आहे उभं राहिलेलं आहे ते अविश्वसनीय असं आहे. 

कृष्णा नदीला गेल्या काही वर्षात आलेल्या पुरामध्ये मंदिर अक्षरशः ५-७ फूट पाण्यात बुडालेले होते. पण असं असूनही मंदिराच्या बांधकामाला कोणताही धोका पोहचलेला नाही. पण अश्या स्वर्गीय अनुभव देणाऱ्या मंदिराची वारसा म्हणून जतन करण्यात कमी पडतो हे नक्की. कट्यार काळजात घुसली मधलं गाणं कुठे चित्रित झालं हे आपल्या लोकांना जाणून घेण्यात जास्ती स्वारस्य दिसून आलं. जे समोर उभं आहे ते समजून घेण्यासाठी मात्र वेळ आणि इच्छा दोन्हीची कमतरता जाणवली. अनेक लोकं स्वर्गमंदिरात सेल्फी घेण्यात रमलेले दिसले. पण ते सौंदर्य आपल्या आत बंदिस्त करण्यात मात्र त्यांना अजिबात रस नव्हता. इतक्या प्रचंड इतिहासाचा वारसा जपणाऱ्या मंदिरासाठी एका स्वच्छ टॉयलेट ची व्यवस्था पुरातत्व खात, राज्य अथवा केंद्र सरकार करू शकत नाही याच खूप वाईट वाटलं. अर्थात ते बनवलं तरी ते स्वच्छ ठेवण्याचा सिविक सेन्स आपल्या समाजात नाही हे पण तितकच खरं आहे. 

अजून खूप काही लिहिण्यासारखं आहे पण सगळच मी सांगितलं तर तिकडे जाण्याची इच्छा निर्माण होणार नाही. मी मला जाणवलेल्या काही गोष्टी आणि प्रश्न तुम्हा सर्वांसोबत शेअर केले. त्याची उत्तर मात्र आपण प्रत्येकाने शोधायची आहेत. मंदिराची सुंदर माहिती देणारे आणि माझे वाचक श्री. शशांक रामचंद्र चोथे यांचा मनापासून आभारी आहे. महाराष्ट्रात दैवी वरदहस्त लाभलेली जी मंदिर आहेत त्यातील वेरूळच्या कैलास मंदिरासोबत खिद्रापूर च कोपेश्वर मंदिर ही एक आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की एकदा आपल्या मनात प्रश्न घेऊन हे मंदिर बघा. मंदिराचे जे स्वर्गीय स्वरूप तुम्हाला जाणवेल ते नक्कीच अविश्वनीय असे असेल याची मला खात्री आहे. 

समाप्त... 

फोटो :- विनीत वर्तक  

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Tuesday 16 November 2021

#कोपेश्वरच्या_अंतरंगात भाग १... विनीत वर्तक ©

 #कोपेश्वरच्या_अंतरंगात भाग १... विनीत वर्तक ©

खिद्रापूर इथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या आणि तब्बल १००० वर्षाचा इतिहास असणाऱ्या कोपेश्वर मंदिराला भेट देण्याचा योग आला. इतक्या प्राचीन इतिहासाला आपल्यासोबत जपलेल्या मंदिराच्या अंतरंगात अवघ्या काही तासात प्रवेश करणं अशक्य आहे. तरीपण त्या मंतरलेल्या क्षणात कोपेश्वर च एक वेगळं सौंदर्य मला अनुभवयाला मिळालं. मंदिर म्हंटल की आपले हात आपसूक जोडले जातात. श्रद्धा आणि भक्ती याचा सुंदर मिलाफ म्हणजे मंदिर. पण या पलीकडे मंदिर बघण्याचा एक दृष्टिकोन तो म्हणजे विज्ञानाचा असतो जो खेदाने आपल्या समाजात आढळून येत नाही. जेव्हा मी या मंदिराला भेट दिली तेव्हा हाच विज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन मंदिरात प्रवेश केला आणि त्यानंतर त्याच जे सौंदर्य माझ्या समोर आलं ते मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेलं. 

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मी स्वतःला एक प्रश्न विचारला की उद्या जर मला अश्या पद्धतीचं मंदिर उभं करायला सांगितलं तर? जेव्हा प्रश्न घेऊन मी आत शिरलो तेव्हा त्या मंदिराचं रूप मला निशब्द करून गेलं. समजा आज मला हे मंदिर उभारायचं असेल तर आधी माझ्या डोक्यातील कलाकृती समोरच्या पर्यंत योग्य रीतीने पोहचवावी लागेल. डिझायनर किंवा आर्किटेक्चर अभियंता त्याच एक मॉडेल तयार करेल. त्या मॉडेल च स्ट्रक्चरल टेस्टिंग करावं लागेल की त्यातील खांब,पाया, कळस हे काळाच्या कसोटीवर टिकून राहील. ते उभारण्यासाठी जागा शोधावी लागेल. त्या जागेच धार्मिक, सामाजिक आणि स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने मूल्यमापन करून घ्यावं लागेल. हे झाल्यावर मंदिर उभारण्यासाठी कच्चा माल, कारागीर, दळणवळणाची साधन याची व्यवस्था करावी लागेल. मंदिर असल्याने त्याची विधिवत पूजा, दिशा आणि श्रद्धा या सर्वांचा सन्मान राखत काम करावं लागेल. हे सगळं करण्यासाठी त्या प्रमाणात पैश्याची तजवीज करावी लागेल. 

कोपेश्वर मंदिरात शिरताना जर तुम्ही हे प्रश्न घेऊन आत शिरता तेव्हा त्या १००० वर्षाच्या वास्तूच महत्व आपल्याला एका क्षणात लक्षात येतं आणि अश्या अनेक गोष्टी नजरेत येतात ज्या सामान्य लोकांना दिसणार पण नाहीत. कोपेश्वर मंदिराचे प्रमुख ४ भाग पडतात. ज्यात स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा येतात. आपण मंदिरात स्वर्गमंडपातून प्रवेश करतो. याची रचना गोलाकार आहे. १३ फूट व्यासाची अखंड रंगशिळा आपल्या पायाशी जाणवते तर त्याचवेळी बरोबर आकाशाच्या दिशेने १३ फूट व्यासाचे गवाक्ष आहे.  गवाक्ष आणि रंगशिळा या मधील उंची साधारण २० फूट ते २५ फूट असेल. इतक्या उंचीवर असूनसुद्धा या दोन्ही गोष्टी एका सरळ रेषेत आहेत. मी पैजेवर सांगेन की आजच्या काळात अगदी लेझर बीम ने याची अचूकता मोजली तरी ती परिपूर्ण असेल. इतकी अचूकता त्या काळात त्या कारागिरांनी कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय कशी काय साध्य केली असेल? वर्तुळाचा आकार मग तो रंगशिळेचा असो वा गवाक्षाचा एकदम अचूक आहे. गवाक्ष हे अनेक साध्यांनी जोडलेलं आहे तर रंगशिळा अखंड आहे. पण असं असताना सुद्धा त्यामध्ये अचूकता आणण्यासाठी कामाचा दर्जा किती उच्च असेल याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो. हे मी फक्त स्वर्गमंडपाच्या बांधकामा बद्दल बोलतो आहे. त्यावरील कलाकुसर, नक्षीकाम, मुर्त्या हा अजून एक वेगळाच विषय आहे. 

कोपेश्वर मंदीराला तुम्ही आतून किंवा बाहेरून बघितलं तर लक्ष वेधून घेतात ते इथले खांब. या खांबांवर एक मालिका होईल इतकं त्यांच्या बद्दल लिहिण्यासारखं आहे. सगळ्याच गोष्टी इकडे लिहिणं शक्य नाही पण काही गोष्टी मांडतो. कोपेश्वर मंदिर हे गणितावर आधारित आहे असं जर म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कारण या मंदिराचा प्रत्येक खांब हा एक वेगळं गणित आहे. प्रत्येक खांबाची रचना वर्तुळाकार, षटकोनी, अष्टकोनी, चौकोनी अश्या वेगवेगळ्या गणितातल्या आकारांनी सजलेला आहे. स्वर्गमंडप हा ४८ खांबांवर उभा आहे. हे सर्व खांब गोलाकार रचनेत आहेत. प्रत्येक रचनेतील खांबांची संख्या ही एक अभ्यासाचा विषय ठरू शकेल. १२-१६-१२-८  अश्या रचनेत हे ४८ खांब उभारलेले आहेत. तर सभामंडपात एकूण ६० खांब आहेत. सर्व खांबांची बेरीज केली तर ती होते १०८. 

(तर या १०८ आकड्यामागे काय महत्व आहे, ते मी या आधीच्या लेखात लिहिलं होतं, ते इकडे देतो आहे. १०८ या आकड्याचा संबंध आपल्याशी निगडित असणाऱ्या पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्याशी आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट सूर्याचा व्यास आहे, तर सूर्य आणि पृथ्वी ह्यामधील अंतर १०८ पट सूर्याच्या व्यासाइतके आहे. चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.(मी गणित करून बघितलं, तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या व्यासाला १०८ ने गुणले तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर. प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे ३ लाख ८४ हजार किलोमीटर) ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुराणे आहेत तर १०८ उपनिषदे आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहीता येतात.)

कोपेश्वर मंदिरात १०८ या अंकाच महत्व पुन्हा एकदा स्पष्ट होते. आता पुढे जाण्याआधी मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येतो. जर का मंदिर बनवायचं असेल तर ते १०८ खांबात बसलं पाहिजे ही अट मंदिर निर्मात्यापुढे ठेवण्यात आली असेल. याचा अर्थ मंदिराचं डिझाईन करण्याआधी १०८ या अंकाला स्थान देऊनच मंदिराच डिझाईन केलं गेलं असेल. त्याच सोबत त्याची विभागणी (४८ स्वर्ग मंडप आणि ६० सभामंडप) आणि त्यांची रचना (१२-१६-१२-८) ज्यातील शेवटचे ८ हे मंदिराच्या ४ प्रवेशद्वारांपुढे असतील अशी रचना करणं हेच सिद्ध करते की मंदिराची रचना कोणी एका दिवसात नाही केली तर मंदिर उभारताना गणित, विज्ञान, स्थापत्यशास्त्र या सर्वांचा अगदी बारकाईने विचार केला गेला आहे. हे सर्व प्रत्यक्षात उतरवताना त्यात एकही चूक केली गेलेली नाही. हे शक्य होते जेव्हा तुमची संस्कृती वैज्ञानिक दृष्ट्या खूप प्रगत आहे. 

पुढील भागात कोपेश्वर मंदिराच्या अंतरंगातील जाणवलेल्या अजून काही गोष्टी 

क्रमशः 

फोटो :- विनीत वर्तक  

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 15 November 2021

पद्माची पावलं... विनीत वर्तक ©

 पद्माची पावलं... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात पद्म सन्मान सोहळा पार पडला. या वर्षीचा हा सोहळा अनेक अर्थाने वेगळा ठरला. गेल्या काही वर्षात पद्म सन्मान ज्या व्यक्तींना दिले गेले आहेत त्यामुळे एकूणच पद्म सन्मानाची उंची वाढली आहे. काही वर्षापूर्वी पद्म सन्मान म्हणजे ज्यांची सरकार दरबारी ओळख आहे किंवा ज्यांनी लोकांची, पक्षाची अथवा सरकारी यंत्रणेतील लोकांची हुजरेगिरी केली आहे. त्यांच्या कृतीचा सन्मान करण्या इतपत त्यांच अस्तित्व होतं. काही सन्मानीय अपवाद सोडले तर पद्म मिळणाऱ्या व्यक्तींची नाव बघितल्यावर वर उल्लेख केलेली समानता दिसून येते. पण गेल्या काही वर्षात यात बदल झाले आणि पद्माची पावलं अगदी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचली. 

या वर्षी झालेल्या पद्म सोहळ्यात या गोष्टीची प्रचिती देशातील आणि विदेशातील सर्वांनीच अनुभवली कारण यावेळी पद्म सन्मान स्वीकारणारे सामान्यांमधील असामान्य होते. त्यामुळेच राष्ट्रपती भवनातील लाल गालिच्यावर पडलेली त्यांची अनवाणी पावलं सुद्धा कौतुकाचा विषय ठरली. असामान्य लोकांचं सामान्य वर्तन, पोशाख आणि एकूणच त्यांचा वावर हा कुतूहलाचा विषय ठरला. वर्षोनुवर्षे सुटाबुटातील आणि झगमटात उच्चभ्रू संस्कृतीचा दाखला देणारा हा सोहळा या वर्षी खरं तर गेल्या काही वर्षात अश्या संस्कृतीला फाटा देणारा ठरतो आहे. त्यामागे निश्चितच निवड झालेल्या सामान्य लोकांच कर्तृत्व कारणीभूत आहे. 

भारतासारखा जवळपास १३९ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात समाजातील अतिशय दुर्लक्षित घटक सुद्धा देशाच्या नागरी सन्मानासाठी स्वतःहून आपल्या कामाचा, कार्याचा गवगवा न करता कोणत्याही सरकारी संस्थेचे उंबरठे न झिजवता आणि कोणत्याही पक्ष, नेता यांची हुजरेगिरी न करता निवडला जाऊ शकतो हा विश्वास या निमित्ताने पुन्हा एकदा जनसामान्यात बळकट झाला यात कोणाचं दुमत नसेल. त्यांची वेशभूषा, त्यांचे अनवाणी पाय ते अगदी त्यांनी भारताच्या सर्वोच्च व्यक्तिमत्वाला दिलेले आशीर्वाद असो वा काढलेली दृष्ट सगळच आतवर पोहचलं कारण ते आतून सहजतेने आलं होतं. त्यात नाटकीपणा नव्हता, त्यात ना कोण बघेल याची धास्ती होती. त्यामुळेच या प्रत्येक व्यक्तीने सन्मान स्वीकारतानाचे क्षण प्रत्येकवेळी डोळ्यांच्या कडा आपसूक ओले करून जातात. 

डोळ्यांच्या कडा ओल्या होणं असो, मनात कुठेतरी समाधान वाटणं असो किंवा या सर्व व्यक्ती आपल्याच आजूबाजूला असण्याचा भास असो हे मला वाटते पद्म सन्मानाची उंची आता या सामान्य पावलांमुळे किती वाढली आहे याची जाणीव करून देणारी आहे. कोणताही सन्मान किती लहान-मोठा हे तो ज्या व्यक्तींना दिला जातो त्यावरून ठरतो. गेल्या काही वर्षात त्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. नक्कीच अजूनही दोन, तीन अपवाद असे आहेत ज्यावर वाद अथवा मतभिन्नता होऊ शकेल. येत्या काळात नक्कीच योग्य त्या व्यक्तींना हा सन्मान दिला जाईल आणि अपवाद ही नाहीसे होतील अशी अपेक्षा आहे. 

पद्माची ती सामान्य पावलं आज राष्ट्रपती भवनात उमटली असली तरी त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात घर केलं आहे. यातील प्रत्येक व्यक्तिमत्व हे असामान्य आहे. सगळ्या झगमटापासून कोसो लांब आहे. त्यांच्या निरपेक्ष कार्याने त्यांना ही उंची गाठून दिली आहे. आज त्याच पावलांनी हळूच पद्म सन्मानाची उंची एव्हरेस्ट इतकी उंच केली आहे. या क्षणांचे व्हर्च्युअल का होईना साक्षीदार होता आलं हा मी माझा सन्मान समजतो. १३९ कोटी भारतीयांन मधून अश्या असामान्य कर्तृत्व असणाऱ्या लोकांना धर्म, जात, पैसा, स्टेटस किंवा राजकीय व समाजातील उंची यापलीकडे जाऊन सन्मानित करता येते हेच आमच्या संविधान आणि लोकशाहीचं यश आहे असं मला मनापासून वाटते. लोकशाहीची व्याख्याच मुळी लोकांपासून सुरु होते आणि जेव्हा अश्या लोकांना सर्वोच्च सन्मान दिला जातो तेव्हा ती मुळापासून मजबूत होते. 

पुन्हा एकदा सर्वच पद्म सन्मान मिळालेल्या असामान्य कर्तृत्व असणाऱ्या लोकांच अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday 2 November 2021

ओसोवोग... विनीत वर्तक ©

 ओसोवोग... विनीत वर्तक ©

ओसोवोग (OSOWOG) One Sun, One World, One Grid या भारताने मांडलेल्या भूमिकेवर युनायटेड नेशन च्या क्लायमेट कॉन्फरन्स मधे इंग्लंड ने भारतासोबत येण्याचं मान्य करून आंतरराष्ट्रीय ग्रिड मधला आपला सहभाग निश्चित केला. मुळातच ओसोवोग (OSOWOG) हा काय प्रकार आहे? त्यात भारताची भूमिका आणि एकूणच या प्रयत्नांमुळे भारताच्या प्रतिमेत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय फरक पडणार आहे हे लक्षात आपण घ्यायला हवं. 

पृथ्वीच्या कोणत्याही भागावर कोणत्याही क्षणी सूर्य हा तळपत असतो. एकीकडे सूर्यास्त होतो त्याचवेळी दुसरीकडे सूर्योदय झालेला असतो. सूर्य हा हिट च्या रूपात पृथ्वीवर सतत ऊर्जेचा पुरवठा करत असतो. जर ही ऊर्जा आपण सोलर पॅनल वापरून इलेक्ट्रिसिटी मधे रूपांतरित केली तर आपला ऊर्जेचा प्रश्न सुटेल.  आता हे सगळं आपण शाळेत शिकलो असलो तरी भारताने २०१८ साली International Solar Alliance (ISA) च्या मिटिंग मधे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव म्हणजेच ओसोवोग (OSOWOG). 

ओसोवोग (OSOWOG) म्हणजे जर आपल्याला हे माहित आहे की सूर्य नेहमीच कुठेतरी जगाच्या पाठीवर तळपत असतो तर त्या अक्षयपात्र ऊर्जेचा संपूर्ण जगाने एकत्र येऊन वापर करावा. जर संपूर्ण जगाने एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय ग्रीड ची स्थापना केली तर सर्व जगाला नेहमीच ऊर्जेचा पुरवठा हा अखंडितपणे सुरु राहील. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा भारतात सूर्य तळपत असेल तेव्हा भारतात तयार झालेली वीज ही अमेरिकेला दिली जाईल आणि जेव्हा भारतात अंधार असेल तेव्हा अमेरिकेत तयार होणारी वीज भारताला दिली जाईल. जर सोलर पॅनल च असं आंतरराष्ट्रीय जाळ आपण निर्माण केलं तर सर्व जगाला आपण क्लीन ऊर्जेचा पुरवठा करू शकू. 

जेव्हा सर्व जग संपत जाणाऱ्या इंधन साठ्यांमुळे हैराण झालेलं आहे. इंधन प्रदूषणाचे दुष्परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. निसर्गाची घडी विसकटली आहे. त्यावेळी अश्या प्रकारची कल्पना मांडणे हाच एक मैलाचा दगड होता असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून देशादेशात वाद होतात. तेव्हा संपत चाललेले इंधन साठे, प्रदूषण या सर्वांवर मात करायची असेल तर सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे अशी स्पष्ट भूमिका भारताने या निमित्ताने मांडली होती. २०१९ आणि २०२० साली कोरोना च्या प्रकोपात जगाला कधी नव्हे ते एकत्र येण्याची गरज दिसून आली. भारताने २०१८ सालीच क्लीन ऊर्जेच्या निमित्ताने मांडलेली भूमिका किती दूरदर्शी आणि शाश्वत आहे याची सुद्धा जाणीव जगाला झाली. 

ओसोवोग (OSOWOG) च्या पहिल्या टप्यात भारताची ग्रीड ही आखाती राष्ट्र आणि साऊथ ईस्ट एशिया देशांशी जोडली जाईल. दुसऱ्या टप्यात हाच विस्तार युरोप ते आफ्रिका पर्यंत नेला जाईल. तर तिसऱ्या टप्यात हा विस्तार संपूर्ण जगात नेला जाईल. ही योजना पूर्णपणे सुरु झाल्यावर संपूर्ण जगात शाश्वत ऊर्जेचा पुरवठा सुरु राहील. भारताने मांडलेली आणि भारताने जगाला दखल घ्यायला लावलेली योजना यामुळे जागतिक मंचावर निश्चितपणे भारताचं स्थान आणि प्रतिमा मजबूत झाली आहे यात शंका नाही. 

जय हिंद !!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.