Monday 28 September 2020

अभ्यास आणि एम.पी.ए.टी.जी.एम.... विनीत वर्तक ©

अभ्यास आणि एम.पी.ए.टी.जी.एम.... विनीत वर्तक © 

गेल्या आठवड्यात डी.आर.डी.ओ. ने दोन वेगवेगळ्या प्रणाली च्या चाचण्या घेतल्या. सिमेवर भारत आणि चीन च्या सेना समोरासमोर उभ्या असताना ह्या प्रणाली ची गरज सगळ्यात जास्ती जाणवत आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या दोन्ही चाचण्यांना खूप महत्व आहे. ह्या दोन्ही चाचण्या वेगवेगळ्या प्रणाली च्या घेतल्या गेल्या आहेत. त्यातील एक आहे ज्याला अभ्यास असं म्हणतात. तर अभ्यास एक (HEAT) म्हणजेच high-speed expendable aerial target आहे. तर दुसरी होती एम.पी.ए.टी.जी.एम (Man Portable Anti-Tank Guided Missile) ह्या दोन्ही चाचण्या अतिशय यशस्वी ठरल्या आहेत. तर नक्की काय आहे ह्या अभ्यास आणि एम.पी.ए.टी.जी.एम प्रणाली हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. 

अभ्यास म्हणजेच (HEAT) high-speed expendable aerial target हे एक प्रकारच ड्रोन आहे. आता आपण विचार करू इतकी सगळी ड्रोन असताना डी.आर.डी.ओ. ने नक्की कोणत्या प्रकारचं ड्रोन बनवलं आहे? अभ्यास कळण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. २६ फेब्रुवारी २०१९ च्या भल्या पहाटे भारताची काही लढाऊ विमान पाकिस्तान च्या दिशेने निघाली. पाकिस्तान च्या हद्दीत गुपचूप जाण्यासाठी पाकिस्तान ला गंडवावं लागणार होतं. ह्यासाठी भारताची दोन सुखोई लढाऊ विमाने पाकिस्तान च्या हद्दीजवळ पोहचली. पाकिस्तान च्या एवॉक्स प्रणाली म्हणजेच रडारवर ती दिसताच पाकिस्तान ची सुरक्षा यंत्रणा ह्या विमानांच्या मागे लागली. तेवढ्यात पाकिस्तान च्या रडार ला गंडवून भारताच्या मिराज २००० विमानांनी बालाकोट इकडे आपलं लक्ष्य पूर्ण केलं. आपण फसवले गेल्याच लक्षात येईपर्यंत भारताने आपलं मिशन फत्ते केलं होतं. भारताने जाणून बुजून सुखोई विमानांना पाकिस्तान च्या सीमेजवळ पाठवलं होतं. 

पण प्रत्येकवेळी आपण आपली लढाऊ विमान आणि आपले वैमानिक ह्यांचा जीव धोक्यात घालायचा का? असा प्रश्न समोर उभा राहिला. एखाद्या शत्रू राष्ट्राची रडार सिस्टीम अथवा क्षेपणास्त्र सुसज्जता ओळखण्यासाठी असं एखादं विमान बनवता आलं की ते शत्रुच्या हद्दीत घुसून ही सगळी माहिती आपल्याला देईल त्या शिवाय शत्रुच्या रडार ला असा चकवा देईल की शत्रूच लक्ष्य त्याच्याकडे जाईल आणि तेवढ्या वेळात आपण आपलं लक्ष्य पूर्ण करू शकू त्याचवेळी आपण कोट्यवधी रुपयांची लढाऊ विमान आणि वैमानिक ह्यांचा जीव धोक्यात न घालता हे पुर्णत्वाला नेऊ. ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर म्हणजेच अभ्यास. 

अभ्यास (HEAT) high-speed expendable aerial target ड्रोन आहे. हे ड्रोन ध्वनीच्या अर्ध्या वेगात प्रवास करते. (६१७ किलोमीटर / तास ) आणि जवळपास ४०० किलोमीटर च अंतर कापू शकते. हे ड्रोन पुर्णतः स्वयंचलित आहे. ह्यावर जी.पी.एस., नेव्हिगेशन प्रणाली असुन हे स्वतः आपला रस्ता ठरवू शकते किंवा लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी हवा तो बदल करू शकते. जसं वर लिहिलं तसं ह्याचं मुख्य उदिष्ठ हे खोट लक्ष्य बनणं आहे. ह्याच रडार क्रॉस सेक्शन जवळपास ५० पट वाढवलेलं आहे. त्यामुळे रडारवर ते एखाद्या लढाऊ विमानाप्रमाणे दिसून येते. नक्की आपल्यावर काय चाल करून येत आहे ह्याचा अंदाज न आल्याने शत्रुची फसगत होते आणि शत्रूचं लक्ष दुसरीकडे वळवण्यात अभ्यास यशस्वी ठरते. ह्या शिवाय अभ्यास चा वापर सबसॉनिक मिसाईल म्हणून पण करता येऊ शकतो. एखाद्या बिल्डिंग च्या खिडकीला ही हे लक्ष्य करू शकते. भारत अशी अचूक प्रणाली स्वबळावर निर्माण करणाऱ्या मोजक्या देशात ह्या चाचणीने समाविष्ट झाला आहे. अभ्यास च्या येण्याने भारताच्या हवाई सुरक्षिततेला अजून धार येणार आहे. 

 एम.पी.ए.टी.जी.एम म्हणजेच Man-Portable Anti-Tank Guided Missile System. एखादा सैनिक घेऊन जाऊ शकतो असं शत्रुचा रणगाडा नष्ट करणारी मिसाईल प्रणाली ची चाचणी डी.आर.डी.ओ ने नुकतीच घेतली. ह्या मिसाईल ने एका ट्रायपॉइड लॉंचर वरून उड्डाण केलं आणि काही क्षणात एका रणगाड्याला  नष्ट केलं. ह्या मिसाईल ची क्षमता जवळपास २.५ किलोमीटर ची आहे. भारत आजवर असे मिसाईल इस्राईल कडून आयात करत होता पण ह्या प्रणाली च्या यशस्वी चाचणीने भारताने आत्मनिर्भर होणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

अभ्यास आणि  एम.पी.ए.टी.जी.एम च्या यशस्वी निर्मितीमागे कष्ट घेणाऱ्या डी.आर.डी.ओ. च्या अभियंते, शास्त्रज्ञ ह्यांच अभिनंदन. भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही यशस्वी चाचण्यांनी नक्कीच भारतीय सेनेचा आणि भारतीयांच्या आत्मविश्वासाला नक्कीच बळ मिळालं आहे.

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




  

Wednesday 23 September 2020

आमचे हिरोच चुकले... विनीत वर्तक ©

आमचे हिरोच चुकले... विनीत वर्तक ©

अरे ओ सांबा! कितने आदमी थे? 

पिटर, तुम लोग मुझे बाहर ढूंढ रहे हो, और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हू.... 

अश्या काही डायलॉग ने आमच्या पिढीची सुरवात झाली होती. गब्बरसिंग असो वा दिवार मधला विजय ह्या सारख्या अनेक पात्रांनी अनेकांच्या मनात खलनायकाची ते अँग्री यंग मॅन ची प्रतिमा तयार केली. दूरचित्रवाणी वरच दुरदर्शन ते ७० एम. एम. चा पडदा ह्यातल अंतर निदान माझ्या पिढीत तरी खुप मोठं होतं. चित्रपट बघायला मिळणं ही पर्वणी असायची. त्यातल्या त्यात दयावान सारख्या मादक दृष्यांच्या चित्रपटासाठी तर अनेक दिव्य करावी लागायची. पण नकळत हे कलाकार आणि त्यांच आयुष्य आमच्यासाठी आणि आमच्या नंतर येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श बनत गेलं. प्रत्येकाच्या प्रतिमा वेगळ्या असल्या तरी त्यांच्या आयुष्याचं आकर्षण मात्र सगळ्यांना वाटायला लागलं. कुठेतरी चित्रपटाच्या पडद्यावर अदाकारी साकारणारे ते कलाकार आमचे हिरो झाले. 

काळ बदलत गेला. चित्रपट गृह एकावरून मल्टिप्लेक्स होत गेली. भिरभिरणाऱ्या पंख्यांची जागा आता वातानुकुलीत संयत्रांनी घेतली. साधा येणारा आवाज आता डॉल्बी झाला. भारताच्या मातीत रमणारे आमचे हिरो आता दुल्हनिया न्यायला युरोप मध्ये जाऊन थडकले. आमच्यासाठी सर्वस्व असणाऱ्या क्रिकेट वरचा चित्रपट ऑस्कर च्या रांगेत जाऊन पोहचला. लाखात मानधन घेणारे आमचे हिरो आता कोटी मोजायला लागले. दस का बीस करणारी तिकीटबारी आता पांचसो का हजार मोजायला लागली. आमचे हिरो मोठे झाले पण त्यातला कलाकार मात्र छोटा होत गेला. ज्या प्रतिमेवर आम्ही भाळत होतो त्याची प्रतिभा मात्र छोटी होत गेली.आता चित्रपट कोटीचे आकडे गाठत होते आणि आमचे हिरो त्या कोटी रुपयांन मध्ये इतके हरवले की आता आपल्या प्रतिमा जपण्यासाठी त्यांना नशेची गरज लागायला लागली. दारू आणि सिगरेटने तर आमच्या आधीच्या पिढीत वर्दी दिली होती. पण आता त्या पलीकडे मजल जाऊ लागली. 

आमच्या पिढीला कलाकारांच्या प्रतिभेने भुरळ घातली होती पण आजच्या पिढीला त्यांच्या प्रतिमेने भुरळ घातली. मग अनुकरण करायच्या नादात नशेचे वेगवेगळे रस्ते सामान्य लोकांच्या आयुष्याचा भाग झाले. चिल यार!!... म्हणत आमची पिढी एका वेगळ्याच मृगजळाकडे धावायला लागली. आज जेव्हा ह्याच प्रतिमेला तडा जातो आहे तेव्हा कुठेतरी आपण आपल्या पुढच्या पिढीकडे हिरो आणि आदर्श देण्यात चुकलो तर नाही न असं वाटायला लागलं आहे. प्रत्येकाला आयुष्यात मोठ, समृद्ध, सुखी व्हायचं असते आणि कोणाचं तरी समृद्ध, सुखी आयुष्य बघून आपण तसं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. असं आयुष्य जगत असलेल्या व्यक्ती आपल्यासाठी हिरो असतात. पण खायचे दात वेगळे आणि दिसणारे दात वेगळे ह्यातला फरक आता समोर उघडा पडला आहे. तो फरक आत्ता कळला असं नाही कारण तो आधीच माहीत होता पण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण करणार? 

आम्ही हिरो म्हणून आम्ही आमच्या पुढल्या पिढीला आमचे कलाकार दाखवले पण आमचे खरे हिरो दाखवायला कुठेतरी कमी पडलो. खुप पैसे कमावणारे खूप सुखी आणि समाधानी असतात हे सांगताना समाधान हे पैश्यावर आणि ऐहिक सुखांवर कधीच अवलंबुन नसते हे सांगायला कमी पडलो. देशाच्या रक्षणासाठी सिमेवर रक्त सांडणारा भले लाखो रुपये कमावत नसेल पण आपल्या रक्ताचा थेंब आणि थेंब आपण देशासाठी दिला ह्याच समाधान शब्दात सांगता येत नाही न कोणता महाल बांधून दाखवता येते. कोट्यवधी रुपये कमावलेला बिल गेट्स जितका समाधानी असेल त्याच्या पेक्षा थोडं जास्तीच आमचे आमटे कुटुंब समाधानी आहे हे सांगण्यात आमची पिढी नक्कीच कमी पडली. आमचे हिरो हे फक्त पडद्यावर युरोप च स्वप्न दाखवत गाडीच्या मागे प्रेयसीसाठी धावणारे ठरले. आमचे हिरो हे पैश्यासाठी देश्याला विकणारे लोक होते पण देशासाठी रक्त सांडणाऱ्या कोणालाच आमच्या हिरोंच्या व्याख्येत स्थान मिळालं नाही. 

आज आमच्याच हिरोंच्या मृगजळाच्या प्रतिमेला तडा जाताना बघणं पण आम्हाला नको वाटते कारण त्यांच आयुष्य आमच्याच 'कुल' वाटणाऱ्या आयुष्याचा भाग झालं आहे. त्यामुळे आज आमचीच प्रतिमा आमच्या नजरेत उतरली आहे. पण ते स्वीकारण्याची आमची मानसिकता आहे का? आमचे हिरोच चुकले तिकडे त्या हिरोंकडून घेतलेले आदर्श तरी कसे चांगले असतील ह्याचा विचार आता तरी आपण करणार आहोत का? आता तरी खऱ्या हिरोंचे आदर्श आयुष्यात बाळगणार आहोत का? आता तरी पुढल्या पिढीला खऱ्या हिरोंची ओळख करून देणार आहोत का? हा प्रश्न तुमच्या आमच्या पैकी प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा कारण आपले हिरोच कुठेतरी चुकले आहेत......  

 सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे 

Sunday 20 September 2020

शुक्रांच्या ढगात... विनीत वर्तक ©

 शुक्रांच्या ढगात... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीमुळे खगोल संशोधकांच्या मध्ये नवीन कुतूहल निर्माण झालं आहे. ही बातमी म्हणजेच संशोधनातील निष्कर्ष हे आशेची एक नवीन पालवी फुटल्यासारखे आहेत. आजवर मानव गेली अनेक शतके पडलेल्या मूलभूत प्रश्नाचं उत्तर तो शोधत आहे. तो प्रश्न म्हणजे आपल्या शिवाय पृथ्वी पलीकडे सजीवांच अस्तित्व आहे का? गेल्या काही दशकातील प्रगतीमुळे ह्या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी खुप सारे प्रयत्न जागतिक पातळीवर होऊ लागले आहेत. पृथ्वी सारख्याच आपल्या सौर मालेतील अजून कोणत्या ग्रहांमध्ये आपण राहू शकतो का? किंवा सजीव कोणत्या प्रकारे अस्तित्वात आहेत का? ह्याचा कसून शोध सुरु आहे. मंगळ हा ग्रह जवळपास पृथ्वीसारखा असल्याने तिकडे सजीव तसेच सजीवांच्या उत्पत्तीसाठी लागणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी खुप साऱ्या मोहिमा आखल्या गेल्या आहेत. चंद्रावर ही मानवाने पाऊल ठेवून पाण्याचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. पण ह्या सगळ्या संशोधनात नेहमीच लपलेला ग्रह म्हणजे 'शुक्र'. 

शुक्र आजवर मानवी मोहिमांपासून अलिप्त राहण्यामागे काही कारणं आहेत. आपल्या सौर मालेतील दुसरा ग्रह असणारा शुक्र जवळपास पृथ्वी च्या आकाराचा आहे. शुक्राचे वस्तुमान पृथ्वीच्या ८०% इतकं आहे. शुक्राचे वातावरण खुप दाट आहे. ह्या दाट वातावरणामुळे शुक्रवार येणारी सूर्याची उष्णता शुक्रावर अडकून राहते. सूर्याच्या सगळ्यात जवळ नसताना पण शुक्राचं तपमान ४७१ डिग्री स्लेसिअस इतकं तप्त आहे. शुक्राच्या वातावरणात कार्बन डायऑक्साइड असुन स्लफुरीक ऍसिड च्या ढगांच आवरण आहे. संशोधनातून असं ही सिद्ध झालं आहे की इकडे विजा चमकतात तसेच खुप सारे ज्वालामुखी आजही सुरु आहेत. शुक्र स्वतः भोवती २४३ दिवसात प्रदक्षिणा घालतो पण त्याचवेळी तो सूर्याभोवती २२५ दिवसात प्रदक्षिणा घालतो. ह्याचा अर्थ शुक्रावर दिवस हा वर्षापेक्षा मोठा असतो. शुक्राच्या ढगांच कुतूहल आजवर संशोधकांना वाटत आलेलं आहे. शुक्राच्या ह्या ढगात काय गुपित दडलेली आहेत ह्या बद्दल अजूनही संशोधन सुरु आहे. 

शुक्र हा सौरमालेतील सगळ्यात तेजस्वी ग्रह आहे. पण त्याची हिच प्रखरता संशोधनासाठी मारक ठरते. शुक्राच्या प्रचंड तपमानामुळे कोणतच यान त्याच्यावर जास्त काळ टिकू शकत नाही. शुक्राच तपमान यानावरील सगळ्या साधनांना बेचिराख करते. ह्यामुळे शुक्रावर काही जिवसृष्टी असेल का? ह्याबद्दल जास्ती संशोधन अथवा मोहिमा आखल्या गेल्या नाहीत. पण गेल्या आठवड्यात जे निष्कर्ष समोर आले त्यामुळे शुक्र ग्रह पुन्हा एकदा संशोधकांच्या रडारवर आला आहे. शुक्राच्या ढगात फॉस्फाईन नावाचा गॅस आढळून आला आहे. फॉस्फाईन गॅस मध्ये एका फॉस्फोरस च्या अणु भोवती तीन हायड्रोजन चे अणु बांधलेले असतात. हा गॅस पृथ्वीवर ही आढळतो. हा गॅस तयार होण्याची शक्यता पृथ्वीवर दोन प्रकाराने आहे. एक म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्ट. दुसरी म्हणजे एनएरोबिक जिवाणू. ह्या शिवाय ह्या गॅस ची निर्मिती पृथ्वीवर होतं नाही. शुक्राच्या ढगात ह्या गॅस च अस्तित्व एकाच पद्धतीने शक्य आहे ते म्हणजे एनएरोबिक जिवाणू. शुक्राच्या वातावरणात १ बिलियन भागात २० भाग ह्या गॅस चे आढळले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या गॅस ची निर्मिती शुक्राच्या ढगात असणं कुठेतरी सजीव सृष्टीकडे निर्देश करत आहे. 

शुक्रावर एनएरोबिक जिवाणू असण्याची फक्त शक्यता ह्या गॅस च्या मूल्यमापनातून व्यक्त केली आहे. व्हायचा अर्थ तिकडे जिवसृष्टी आहे असा होत नाही. ह्या शिवाय फॉस्फाईन गॅस शुक्रावर असण्यासाठी अन्य काही कारणं आहेत का ह्याचा ही अभ्यास होणं गरजेचं आहे. शुक्राचे वातावरण बघता सजीव सृष्टीसाठी लागणारं वातावरण अतिशय प्रतिकूल आहे. पण ह्या संशोधनातून अश्या प्रतिकुल वातावरणात जर अश्या पद्धतीचे जिवाणू जगत असल्याच सिद्ध झालं तर इतर ग्रहांवरील अश्याच वातावरणात सजीव सृष्टीचे दाखले मिळण्याची शक्यता वाढणार आहे. ह्यामुळे शुक्र पुन्हा एकदा जगातील संशोधकांच्या रडारवर आला आहे. ह्या संशोधनाच्या पुष्टीसाठी अनेक मोहिमा शुक्रवार आखल्या जाणार आहेत. भारत ही ह्या संशोधनात मोलाची भुमिका बजावणार आहे. भारताने २०१७ साली 'शुक्रयान' ची घोषणा केली असुन २०२३ पर्यंत भारताची इसरो शुक्रावर आपलं यान पाठवणार आहे. शुक्राच्या ढगात उद्याची बीज आहेत की नाही ह्याची शहानिशा करणार आहे. 

फोटो स्रोत :- नासा 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday 16 September 2020

ओझोन... विनीत वर्तक ©

 ओझोन... विनीत वर्तक ©

१६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ओझोन हा शब्द सामान्य माणसाला ऐकून माहीत असतो. पृथ्वीच्या वातावरणात ओझोन नावाच काहीतरी असते आणि त्याची टक्केवारी कमी झाल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो अथवा प्रदुषण हे त्याच प्रमुख कारण असते इतकच  ज्ञान सामान्य माणसाला असते. पण आपल्या पृथ्वीवरच्या अस्तित्वात अतिशय महत्वाची भुमिका बजावणारा ओझोन नक्की काय आहे? अचानक असं काय झालं की जगभर ओझोन बद्दल चिंता वाटू लागली? चांगला ओझोन आणि वाईट ओझोन म्हणजे काय? आजच्या दिवशीच ओझोन दिवस साजरा का करायचा? आपण एक सामान्य माणूस म्हणून ओझोन च्या संवर्धनासाठी काय करू शकतो? अश्या अनेक गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. आजचा ओझोन दिवस हा तुमच्या आमच्यासाठी नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. 

ओझोन हा एक रेणू आहे. ऑक्सिजन चे ३ अणू मिळून ओझोन चा एक रेणू तयार होतो. Ozone (O3) हे त्याच रसायनशास्त्रातील नाव आहे. पृथ्वीच्या वातावरणात ह्याच प्रमाण इतर वायूंच्या तुलनेने खूप अत्यल्प असलं तरी पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी अतिशय महत्वाच आहे. ओझोन नक्की करतो काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं पृथ्वीच्या वातावरणाचे थर समजून घ्यायला हवेत. जमिनीपासून ते साधारण १० किलोमीटर उंचीवरच्या वातावरणाला ट्रोपोस्पियर असं म्हणतात. १० किलोमीटर ते ५० किलोमीटर उंचीवर असणाऱ्या वातावरणाला स्ट्रेटोस्पियर तर ५० किलोमीटर ते ८० किलोमीटर उंचीवर असणाऱ्या वातावरणाला मेसोस्पियर म्हणतात. ह्या सगळ्यात ओझोन असतो साधारण २५ किलोमीटर उंचीवर स्ट्रेटोस्पियर मध्ये. ओझोन काय करतो तर सूर्यापासून निघालेले (अल्ट्राव्हॉयलेट) अतिनील किरण जेव्हा ह्या स्ट्रेटोस्पियर मधून प्रवास करतात. तेव्हा त्यांची ऊर्जा वातावरणातील ऑक्सिजन अणू शोषून घेतात आणि त्यांची साखळी तुटते. ऑक्सिजन हा दोन अणूपासून बनलेला असतो (O2). जेव्हा ही साखळी तुटते तेव्हा त्याला ऍटोमिक ऑक्सिजन असं म्हणतात. 

हे विलग झालेले ऑक्सिजन चे अणू आजूबाजूच्या ऑक्सिजन च्या अणू सोबत आपली मैत्री करतात. त्यांच्या मैत्रीतून जन्माला येतो ओझोन (O3). आता हा ओझोन जेव्हा पुन्हा एकदा सूर्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने ऊर्जा घेऊन येणाऱ्या (अल्ट्राव्हॉयलेट) अतिनील किरणांची ऊर्जा शोषून घेतो. ऊर्जा मिळाली की पुन्हा एकदा ओझोन आपली मैत्री तोडतो. ह्यात ऑक्सिजन तयार होतो म्हणजे (O2) आणि एक मोकळा ऑक्सिजन चा अणू. आता हा मोकळा ऑक्सिजन चा अणू पुन्हा एकदा दुसऱ्या ऑक्सिजन च्या अणू शी मैत्री करतो आणि पुन्हा ओझोन (O3) तयार होतो. थोडक्यात काय तर ओझोन-ऑक्सिजन सायकल चालू रहाते. पण ह्या सगळ्यात जी महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे सूर्याकडून आलेल्या (अल्ट्राव्हॉयलेट) अतिनील किरणांची सगळी ऊर्जा ह्या ओझोन- ऑक्सिजन खेळात संपून जाते. पृथ्वीवरील सजीवांसाठी अत्यंत हानिकारक असलेले हे अल्ट्राव्हॉयलेट किरण पृथ्वीच्या जमिनीवर पोहचू शकत नाहीत. हाच ओझोन जेव्हा पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या थरात येतो म्हणजे ट्रोपोस्पियर मध्ये तेव्हा तो आपल्या फुफुसांना आणि वनस्पतींना अपायकारक ठरतो. म्हणून ओझोन-ऑक्सिजन च प्रमाण वातावरणात व्यवस्थित राहणं अतिशय गरजेचं आहे. 

 गेली लाखो वर्ष हा खेळ पृथ्वीच्या वातावरणात सुरळीत चालू होता. जितक्या ओझोन ची निर्मिती होतं होती. तितका ओझोन पुन्हा नष्ट होत होता. ह्यामुळे ओझोन च पृथ्वीच्या वातावरणातील प्रमाण हे व्यवस्थित होतं. मानवाने जेव्हा पृथ्वीच्या खालच्या वातावरणात जेव्हा प्रदूषण करायला सुरवात केली तेव्हा ह्यातील काही कण हे पृथ्वीच्या ह्या वरच्या वातावरणात येऊन पोहचले. त्यातील एक महत्वाचा घटक होता  chlorofluorocarbons (CFCs) क्लोरोफ्लुरोकार्बन. हा घटक वातानुकूल संयंत्रात, एअर फ्रेशनर,  वापरला जात होता. हा घटक जेव्हा ओझोन शी आपली मैत्री करू लागला तेव्हा ओझोन च अस्तित्व धोक्यात येऊ लागलं. जेव्हा सी.एफ.सी. ओझोन सोबत मैत्री करतात तेव्हा ते ओझोन ला संपवून ऑक्सिजन ची निर्मिती करतात. ह्यामुळे ओझोन चा थर झपाट्याने कमी होऊ लागला. ओझोन कमी झाल्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर येण्याचा रस्ता मोकळा झाला आणि ह्याचे परीणाम पृथ्वीवर दिसायला सुरवात झाली. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावर जिकडे अतिशीत तापमान असते तिकडे सी.एफ.सी. ने झपाट्याने ओझोन चा खात्मा केला. पृथ्वीच्या ध्रुवावर अक्षरशः ओझोन च होल तयार झालं. 

कुठेतरी ओझोन ला वाचवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत हे लक्षात आल्यावर जगातील सर्व देशांनी १६ सप्टेंबर १९८७ ला The Montreal Protocol on Substances that Deplete the Ozone Layer (the Montreal Protocol) ह्या प्रोटोकॉल ची अमंलबजावणी केली. ह्या नुसार chlorofluorocarbons (CFCs) क्लोरोफ्लुरोकार्बन चा वापरावर पूर्णतः बंदी आणण्यासाठी प्रत्येक देशाने प्रतिबद्ध व्हाव अशी रचना केली गेली. ह्या कायद्यात अनेक पुढचे बदल करताना ग्रीन हाऊस गॅसेस आणि सी.एफ.सी. च्या वापरावर अनेक प्रकारे निर्बंध आणले गेले. ह्या कराराचा परीणाम म्हणून ओझोन चा थर आता आपला पर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. युनायटेड नेशन च्या अंदाजानुसार २०५० पर्यंत तो थर आपल्या १९८० च्या पातळीवर पुन्हा एकदा जाईल असा अंदाज आहे. ओझोन चा थर घटल्यामुळे माणसाला कॅन्सर, मोतीबिंदू सारखे आजार होण्याचा धोका खूप प्रमाणात वाढला आहे.     

आपण एक सामान्य नागरीक म्हणून ह्या ओझोन च्या थराला वाचवण्यासाठी आपलं योगदान देऊ शकतो. आपल्या घरातील वातानुकूलित संयंत्र व्यवस्थित ठेवणं, हेअर स्प्रे, रूम फ्रेशनर आणि इतर कोणत्याही गोष्टी ज्या वातावरणात सी.एफ.सी. सोडतात त्यांचा वापर पूर्णपणे बंद करणं आपल्या हातात आहे. २०१० पूर्वीच्या ए.सी. मध्ये आर २२ नावाचा गॅस वापरला गेला आहे जो सी.एफ.सी. वातावरणात सोडतो. अशी युनिट बंद करून नवीन ए.सी. युनिट ज्यात आर ४१० नावाचा गॅस वापरला जातो ते आपण बसवू शकतो. ओझोन ला नष्ट होउ न देणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे तेव्हा ती आपण आपल्या परीने पूर्ण करायला हवी. आजच्या ओझोन दिवसाच्या निमित्ताने ओझोन ला वाचवण्यासाठी आपण वचनबद्ध होऊयात. 

फोटो स्रोत :- नासा, गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 13 September 2020

ये नया हिंदुस्तान है... विनीत वर्तक ©

 ये नया हिंदुस्तान है... विनीत वर्तक ©

'ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी'

गेल्या काही दिवसापासून भारत - चीन युद्धाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. प्रत्येक पुढच्या क्षणाला काय होणार आहे ह्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अनेक बैठका प्रत्येक पातळीवर झाल्या आहेत. सुरु आहेत. पण ह्या सगळ्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एकीकडे चीन चर्चेच गुऱ्हाळ लावतो आहे तर दुसरीकडे भारत - चीन सरहद्दीवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करत आहे. नुकत्याच आलेल्या एका रीपोर्ट नुसार जवळपास ५०,००० सैनिक चीन ने पॅंगॉंग टेसो भागात आणले आहेत. ह्या सोबत खूप मोठ्या प्रमाणात रणगाडे, रडार, तोफा, लढाऊ विमान असा सर्व लवाजमा तैनात केला आहे. चीन चर्चेच गुऱ्हाळ लावून एकीकडे आपली सैन्य स्थिती मजबुत करत आहे. पण हे सगळं करून सुद्धा चीन च्या सैन्यात आत्मविश्वासाची कमी जाणवत आहे. 

कागदावर आपली ताकद दाखवून जगाला नमतं घ्यायला लावणाऱ्या चीन च्या सेनेच्या कमी आत्मविश्वासाला अनेक कारणे आहेत. कम्युनिस्ट असलेल्या चीन च्या राजकारणाची पकड चीन च्या सेनेवर आहे. राजकारणी लोकांची हीच पकड एखाद्या सेनेसाठी भारी पडते. आपला राजकीय फायदा आणि महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी केला जातो. त्यात आज चीन ची सेना कात्रीत पकडली आहे. एकीकडे कोरोना सारखी महामारी हाताळण्यात चीन चं नेतृत्व कमी पडलं अशी भावना चीन च्या लोकांमध्ये प्रबळ होते आहे. एकेकाळी राजकीय पटलावर आपलं वर्चस्व दाखवत पटलावर आलेले शी जिनपिंग ह्यांच नेतृत्व आज जागतिक पातळीवर टिकेचा धनी झालेलं आहे. ज्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आणि आर्थिक वर्चस्वाचा चीन ला माज होता त्याला कोरोनामुळे कुठेतरी ब्रेक लागला आहे. त्याही पेक्षा ज्या पद्धतीने चीन च्या व्यापाराला अनेक देशांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे ती चीन ची खरी डोकेदुखी आहे. कारण अर्थव्यवस्थेचा वेग कमी जास्त होऊ शकतो पण तुमचा बाजार उठला तर तुमचा सत्यानाश व्हायला वेळ लागत नाही. आज चीन ज्यामुळे पुढे आला ती बाजारपेठ खुंटत जाते आहे. 

जपान, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, भारत ह्या सारख्या मोठ्या बाजारपेठेत चीन च्या मालावर कडक निर्बंध टाकण्यात आले आहेत किंवा त्यांना पद्धतशीररीत्या बाहेरचा रास्ता दाखवला जात आहे. भारतासारखी बाजारपेठ गमावणं चीन ला परवडणार नाही. ह्यासाठीच कुठेतरी भारतावर अंकुश ठेवून आपलं स्थान चीन च्या राजकारणात बळकट करण्यासाठी चीन च्या राज्यकर्त्यांनी लडाख मध्ये आपलं सैन्य भारताच्या दिशेने घुसवणाच्या दिशेने पावलं टाकली. १९६२ च्या युद्धात ज्या पद्धतीने आपण भारतीय सैन्याला धुळ चारली आणि त्यांच्या आत्मविश्वासाला तडा दिला त्याच्या आठवणी अजुनही त्यांच्या मनात असतील असा विचार करून चीन च्या सैन्याने भारताच्या सिमेवर आपलं मार्गक्रमण सुरु केलं. चीनच्या गर्वाला तडा गेला तो गल्वान इकडे. भारतीय सैन्याला आणि सरकारला अंधारात ठेऊन भारताच्या भूमिवर कब्जा करण्याच्या चीन च्या स्वप्नांना भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाने उधळून लावलं. ह्या लढाईत भारताचे २० पराक्रमी सिंह वीरगतीला प्राप्त झाले पण चीन ने जवळपास ४३ ते ६० सैनिकांना गमावलं. 

गल्वान इकडे भारतीय सेनेने केलेला प्रतिकार चीनसाठी मोठा झटका होता. एकतर चीन चे सैन्य आणि चीन च्या राजकीय शक्तींनी भारताच्या अश्या प्रतिसादाचा विचार स्वप्नात सुद्धा केला नव्हता. त्यामुळे गल्वान नंतर चीन पूर्णपणे एक पाऊल मागे गेला. भारताला मदतीसाठी अमेरीका, जपान, फ्रांस सारखी राष्ट्र उभी राहीली. त्यामुळे चीन चोहोबाजूने कोंडीत अडकला. चीन ला भारतीय सैन्याच्या ताकदीचा थोडा अंदाज आला. चीन ला तयारीसाठी वेळ हवा होता मग त्याने नेहमीप्रमाणे चर्चेच गुऱ्हाळ सुरु ठेवलं. चर्चा करताना मागच्या बाजूने चीन ने आपल्या सैन्याची जमवाजमव सुरु केली. चीन दगाफटका करणार ह्याचा अंदाज भारतीय नेतृत्वाला होता. भारताचे जेम्स बॉण्ड म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवाल ह्यांची निती भारताने अंगिकारली. ती निती म्हणजेच 'ऑफेन्सिव्ह डिफेन्स' आपण समोरच्याने काही करण्याची वाट बघण्यापेक्षा आपलीच भिती समोरच्याच्या मनात निर्माण करायची. ह्याचाच भाग म्हणून २९-३० ऑगस्ट ला भारतीय सेनेनी ब्लॅक टॉप सह इतर शिखरांवर भारताचा तिरंगा फडकावला. भारत असे काही करेल ह्याचा अंदाज चीन च्या सैन्याला अजिबात आला नाही. त्यांनी जोवर  प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तोवर भारतीय सैन्याने डाव कधीच पलटवला होता. 

भारताच्या आक्रमक भूमिकेने चीन च नेतृत्व पुन्हा एकदा त्यांच्या जनतेसमोर तोंडघाशी पडलं. शी जिनपिंग ह्यांना कसाही करून विजय हवा आहे. पण त्यासाठी त्यांनी ची पावलं टाकली त्यामुळे आता ते गोत्यात आले आहेत. एकतर चिनी सैन्याला युद्धाचा कोणताही अनुभव नाही. १९७९ च्या व्हिएतनाम युद्धात चीन च्या सैन्याला खूप मोठा पराभव चाखावा लागला होता. त्यात १९७९ ते २०२० ह्या मध्ये चीन चे सैनिक कोणतीच लढाई लढलेले नाहीत. अतिउंचावरील युद्धाचा चीन च्या सैनिकांकडे अनुभव नाही. त्यात पुढल्या महिन्यात थंडीमुळे इकडे युद्ध सोडाच पण उभं राहणं पण कठीण असेल. त्यामुळे वेळेचं बंधन चीनवर आहे. पुढल्या ३-४ आठवड्यात मर्यादित युद्ध करून भारताला मागे नेण्याचा चीन चा प्लॅन आहे. पण भारतीय सैनिक ज्या पद्धतीने समोर उभे आहेत ते बघता हे जवळपास अशक्य आहे. जशास तसे ह्याप्रमाणे भारताने आपले ५०,००० सैनिक, रणगाडे, क्षेपणास्त्र, रडार, लढाऊ विमाने असा सगळा फौजफाटा उभा केला आहे. भारतीय सैनिक आता उंचीवर आहेत तर खाली चीन आहे. त्यामुळे युद्ध झाल्यास भारताचं पारडं जड आहे ह्यात शंका नाही. चीन ला दोन्ही बाजूने अतिशय प्रतिकूल स्थिती आहे. एकतर त्यांचं सैन्य कमी उंचीवर आहे त्यात निसर्ग ज्या प्रमाणे बदलत जाणार आहे त्यात वर बसलेल्या भारतीय सैनिकांना टक्कर देणं जवळपास अशक्य आहे. 

चीन च नेतृत्व खरं तर भारताच्या ह्या भूमिकेमुळे पूर्णपणे कात्रीत सापडलं आहे. त्यामुळेच आपल्या पिळवळीला त्याने सक्रिय केलं आहे. ह्यातील काही भाग म्हणजे नेपाळ सरहद्दीवर केलेल्या कुरबुऱ्या आणि भारतातील सहिष्णुतेच कातड घेऊन उभी राहीलेली पिलावळ. पण सगळीकडे चीन ला मात देण्यात तूर्तास भारत यशस्वी झाला आहे. चीन च्या मालावर टाकलेले निर्बंध, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला वाढता पाठिंबा आणि लडाख च्या सरहद्दीवर चीन सैन्याचा उतरलेला माज ह्या सगळ्यामुळे चीन च्या नेतृत्वावर त्यांच्याच पक्षातून शंका उभ्या राहील्या आहेत. ज्या कागदावरच्या सैनिकी संख्येचा चीन ला माज होता तो कुठेतरी उतरला आहे. ह्याचे दूरगामी परीणाम चीन ला साऊथ चायना सी मध्ये भोगावे लागू शकतात. लडाख मधलं चीन च पाऊल ह्या नव्या भारताने सध्यातरी पूर्णपणे मागे घ्यायला लावलं आहे. चीन ला ह्या उलट आपला काही भूभाग गमावण्याची नामुष्की येऊ शकते अशी सध्या परीस्थिती भारतीय सेनेने चीन ची केली आहे. त्यामुळेच चीन ने आता काही केलं तरी ही चुक त्याला महागात पडणार हे निश्चित आहे.  

कमांडर्स, इंडियन आर्मी ने ये जंग शुरू नहीं की थी बट वी विल ब्लडी हेल फिनिश इट!...... 

जय हिंद!!!  

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday 11 September 2020

माणुसकी असलेला माणूस... विनीत वर्तक ©

 आज जवळपास २ वर्ष झाली ह्या घटनेला पण गेल्या दोन वर्षात मी जगाच्या कोपऱ्यात कुठेही असलो तरी प्रत्येक १० दिवसाला साळुंके काकांचा फोन माझ्या मोबाईल वर वाजत असतो. गेल्या २ वर्षाच्या काळात विदेशात असताना सुद्धा काकांचे फोन मला येत होते. इंटरनॅशनल रोमिंग असो वा मुंबई काका नेहमीच आपल्या धारधार आवाजात सुरवात करतात. अहो वर्तक !....... 

माणुसकी असलेला माणूस... विनीत वर्तक ©

अहो वर्तक ! मी पटकन मागे वळून बघितलं. व्हीलचेअर वर बसलेला एक ६० वर्षाचा तरुण मला हाक मारत होता. तरुणच ते एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्या प्रत्येक शब्दात आणि कृतीत मला जाणवून गेला. बाबा आमटे ह्यांनी सुरु केलेल्या आनंदवन प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. आनंदवन प्रकल्पाला भेट देताना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आम्हाला साळुंके काका आले होते. पहिल्या नजरेत साळुंके काकांनी मला आपलसं केलं. पांढरी खुरटी दाढी, डोळ्यावर गॉगल, इस्त्री च शर्ट, इलेक्ट्रिक वर चालणारी त्यांची खुर्ची, त्यावर एका पायाची मांडी घालून त्यावर मस्त एक रुमाल आणि सगळ्यात आकर्षून घेतलं त्यांच्या आवाजाने.

एक जरब असणारा आवाज पण त्यात कुठेतरी आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगातून सावरून पायावर उभं राहून आयुष्य जगल्याच समाधान झळकत होतं. भेट होताच आनंदवनात कोणीच कामाशिवाय नसते. आयुष्यात कठीण प्रसंग आले तेव्हा माणूस म्हणून समाजाने इथल्या प्रत्येकाला वाळीत टाकलं. मग जे आमचं घर झालं ते म्हणजे आनंदवन. हे सांगताना आनंदवना बद्दलचा आदर प्रत्येक शब्दात दिसून येत होता. जुजबी ओळख झाल्यावर त्यांचा पहिला प्रश्न होता अहो वर्तक ! कुठले हो तुम्ही? मी म्हंटल मुंबई. मुंबई बोलताच डोळ्यात एक वेगळी चमक आली. अहो मी पण मुंबईचा. मग आमची गट्टी जमायला वेळ लागला नाही.

मी उरणचा. सामान्य आयुष्य जगताना नियतीच्या मनात वेगळच होतं. अचानक दिवस बदलले. समाजाने वाळीत टाकायला वेळ घेतला नाही. पण आनंदवनात मला घर मिळालं, माणसं मिळाली. बाबा देवमाणूस. माझ्यासारख्या किती लोकांना त्यांनी पुन्हा जगण्याची उर्मी दिली. कुष्ठरोग असो वा महारोग, अपंग असो वा समाजाने झिडकारलेला असो त्यांनी सगळ्यांना आपलसं केलं. आज २२ वर्ष झाली इकडे आहे. सगळ्यांना आनंदवन फिरवतो. मी आणि माझी इलेक्ट्रिक खुर्ची. बोलताना थरथरणारा आवाज आणि हात वयाची जाणीव ह्या तरुणाला करून देत होते. पण हरेल तर ते साळुंके काका कुठले? दुसऱ्या सेकंदाला पुन्हा एकदा त्यांचा ट्रेडमार्क आवाज, अहो वर्तक ! काय करता तुम्ही? म्हंटल लिहितो. लगेच मला तुमच पुस्तक हवं आहे. मी म्हंटल हो देतो. सोबत आणलेल्या काही कॉपीज आहेत त्यातली एक देतो.

आनंदवन पूर्ण फिरून झाल्यावर स्वरसंगीत कार्यक्रमाला जाताना माझ्या अभिविनीत पुस्तकाची एक कॉपी मी माझ्या जवळ ठेवली होती. साळुंके काका दिसताच त्यांना माझं पुस्तक भेट दिलं. पण काका लगेच पुन्हा एकदा त्याच आवाजात, अहो वर्तक ! ह्यावर तुमची स्वाक्षरी कुठे आहे? मी म्हंटल, अरे हो विसरलोच, लगेच स्वाक्षरी केली. पण त्यावर समाधान नाही झालं साळुंके काकाचं. पुन्हा एकदा, अहो वर्तक ! मला काहीतरी त्यावर लिहून द्या. मी म्हंटल, “आयुष्य जगलेल्या तरुणाला मी काय संदेश देऊ”? एक छोटीशी हास्य लकीर काकांच्या आणि माझ्या दोघांच्या चेहऱ्यावर बघताना आम्ही शब्दांशिवाय बोललो.

तिकडून निघालो तेव्हा परत एकदा आवाज अहो वर्तक ! मी म्हंटल काय झालं? तुमचा नंबर द्या. वाचून सांगतो पुस्तक कसं वाटलं ते. माझ्या मोबाईल मध्ये तुमच नाव आणि नंबर सेव करून द्या. माझा हात सतत हलतो त्यामुळे टाईप नाही करता येत. मी लगेच माझा नंबर त्यात सेव्ह करून दिला. काकांची रजा घेऊन मी पुढल्या प्रवासाला निघालो. दोन दिवस झाले. नागपूर वरून मुंबईच्या विमानात बसलो. विमान उड्डाण भरायच्या तयारीत होते. साधारण ५ मिनिटे होती. तेवढ्यात मोबाईल वर एक अनोळखी नंबर. कॉल घ्यावा की नाही? ह्या विचारात असताना नंबर बी.एस.एन.एल चा बघून कॉल घेतला. हेमलकसा इकडे ते एकमेव नेटवर्क चालू असल्याने तिथून कोणाचा असावा अस वाटून तो रिसीव्ह केला. समोरून तोच आवाज, अहो वर्तक ! मी साळुंके बोलतो आहे. माझी ट्यूब लगेच पेटली. मी म्हंटल कसे आहात काका? अरे ते सोड तू कुठे आहेस? म्हंटल आता निघत आहे मुंबई ला. प्रवास कसा झाला? तुझा कार्यक्रम कसा झाला? मी म्हंटल उत्तम. काका लगेच खुश झाले. अहो वर्तक ! काय पुस्तक लिहिलं आहे तुम्ही. खूप आवडलं. अजून अर्ध वाचून झालं पण तुम्हाला फोन करून दाद देण्याचा मोह आवरला नाही.

विमान आकाशात उडाल पण मनात मात्र साळुंके काका घर करून राहिले. आयुष्यात साक्षात मृत्यू आणि टोकाची अवहेलना झेललेला हा माणूस. शारीरिक व्यंगामुळे समाजाने वाळीत टाकून सुद्धा आज आनंदवन सारख्या संस्थांमुळे आयुष्य जगतो आहे. आयुष्य जगत नाही तर त्याचे रंग अनुभवतो आहे. कोण कुठचा मी? पण एका नजरेत त्यांनी मला ओळखलं. दुसऱ्या क्षणाला मला आपलसं केलं. पुस्तक मिळालं नाही म्हणून ओरड करणारे पुस्तक मिळालं तरी ते सांगण्याची तसदी घेत नसताना आपल्या शारीरिक व्याधीमुळे फोन वरील बटन दाबता येत नसताना अगदी आठवणीने पुस्तक वाचून अभिप्राय देणारे साळुंके काका कुठे? माणसाला माणुसकी शिकायला कोणत्या डिग्री ची गरज नसते. त्याला ते जाणवण्यासाठी ते जिवंत मन हवं. माणुसकी असणारा माणूस आपला व्हायला कोणतीही ओळख लागत नाही. शब्दांशिवाय संवाद पण माणुसकीची मन जोडू शकतो हे आज पुन्हा एकदा बघायला मिळालं.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday 10 September 2020

मनचला…मन चला तेरी ओर... विनीत वर्तक ©

 मनचला…मन चला तेरी ओर... विनीत वर्तक ©

सकाळच्या सूर्याची कोवळी तिरीप अंगावर झेलत त्या शांत आसमंताला अनुभवत वाळूच्या जमीनीवर आपली पावलं उमटवत माझा सकाळचा वॉक सुरु होता. निरभ्र आकाश अनुभवताना एक डोळा घड्याळ्यावर पावलं मोजत असताना कानात मात्र एक आवडत गाण सुरु होत. गाण्याचा आणि माझा संबंध तसा खूप लांबचा आहे. कारण सूर- ताल हे कधीच कळले नाहीत. जे मनाला भावत ते चांगल ही माझी आवड गाण्यापुरती मर्यादित आहे. त्या गाण्याच्या शब्दांनी मात्र कुठेतरी विचारात टाकलं. शफ़कत अमानत अली चा तो आवाज कुठेतरी आत साद घालत होता... 

दुनिया जहां की बन्दिशों की ये कहाँ परवाह करे

जब, खींचे तेरी डोर, खींचें तेरी डोर

मनचला, मन चला तेरी ओर

आयुष्यात अशी अनेक माणस येतात आणि त्यांच्यासोबत येताना खूप सार चैतन्य आणि ऊर्जा घेऊन येतात. त्यांच येण कधीतरी रटाळ बनलेल्या आपल्या आयुष्याला असं काही वळण लावते की पुन्हा एकदा त्या निरस झालेल्या आयुष्यात रंग भरतात. कुठेतरी असं वाटते की आता जगण्यासाठी एक नवी उमेद मिळाली. ते क्षण आपल्या वाट्याला किती काळ असतील ह्याचा अंदाज मात्र कोणाला नसतो. अश्याच एखाद्या अवचित क्षणी आणि एखाद्या वळणावर ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाते. तर कधी आपण त्या व्यक्तीपासून लांब होतो. कारणं काही असोत पण त्या क्षणाच्या आठवणी मात्र मनात घर करून राहतात. 

पुलाखालून बरचसं पाणी वाहून जाते. एका नवीन वळणावर आणि आयुष्याचा प्रवासात अनेक नवीन फाटे फुटतात पण कधीतरी नकळत पुन्हा त्या आठवणी समोर येतात ह्या ओळींसारखीच, 

खामोशियों की सूरतों में

ढूँढे तेरा शोर, ढूँढे तेरा शोर

सकाळच्या त्या शांततेत मी  त्या व्यक्तीला पुन्हा शोधू लागतो पुन्हा एकदा माझं मन त्याच शेवटच्या क्षणाकडे थांबते जेव्हा मी तो प्रवास थांबवला होता. कोण चूक आणि कोण बरोबर ह्यापेक्षा आपल्या आयुष्याचा ती व्यक्ती भाग होती कुठेतरी काही क्षण का होईना आपल्या जवळ होती हे मनात कुठेतरी येत रहाते. आपण घेतलेला निर्णय चूक होता की बरोबर? घडलेला प्रसंग थांबवू शकलो असतो का? बदलवू शकलो असतो का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात ज्याची उत्तर ना आपल्याजवळ असतात ना त्याच्याजवळ. उत्तर देणारा काळ मात्र फक्त पुढे सरकत असतो. त्याच क्षणी पुढच्या ओळी आपल्या मनात रुंजी घालू लागतात.

सीखे फिर भी कभी नहीं साज़िशें

तेरे लिए आज खुद से ही भागे हैं

हिम्मत के टुकड़े बटोर

हो भागे ज़माने से छुप के दबे पाँव

जैसे कोई चोर, जैसे कोई चोर

त्या चोराप्रमाणे आपण हळूच मनाच्या त्या कोपऱ्यात मी गुपचूप जाऊन येतो. हाताशी पुन्हा एकदा काहीतरी नवीन घेऊन बाहेर येतो आणि स्वतःशी म्हणतो, 

 मनचला…मन चला तेरी ओर......   

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Wednesday 9 September 2020

हायपरसॉनिक भारत... विनीत वर्तक ©

 हायपरसॉनिक भारत... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी भारताच्या डी.आर.डी.ओ. ने यशस्वीरीत्या (hypersonic technology demonstrator vehicle (HSTDV) स्वनातीत वेगाने जाणाऱ्या प्रक्षेपाची चाचणी केली. अमेरीका, रशिया आणि चीन नंतर असं तंत्रज्ञान स्वबळावर बनवणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. मुळातच हायपरसॉनिक प्रक्षेपक म्हणजे काय? हायपरसॉनिक तंत्रज्ञान अवगत केल्यामुळे नक्की काय संदर्भ बदलले आहेत? ह्या तंत्रज्ञानाचा वापर भारत कुठे आणि कसा करू शकतो? तसेच ह्या तंत्रज्ञानाचे दूरगामी फायदे हे सगळं आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.

स्वनातीत वेग हा ध्वनीच्या हवेतील वेगाशी निगडित आहे. ध्वनी हवेतून साधारण १२२५ किलोमीटर/ तास ह्या वेगाने प्रवास करतो. जेव्हा एखादी वस्तू ह्या वेगाच्या पुढे प्रवास करते तेव्हा त्याला स्वनातीत असं म्हणतात. ध्वनीच्या १ ते ५ पट स्वनातीत वेगात ज्याला मॅक असही म्हणतात जेव्हा एखादी वस्तू प्रवास करते तेव्हा त्याला सुपरसॉनिक असं म्हणतात. सुपरसॉनिक वेग हा जास्तीत जास्त ६१७४ किलोमीटर / तास इतका असू शकतो. ह्याच्या पलीकडे जेव्हा एखादी वस्तू प्रवास करायला लागते तेव्हा त्या वेगाला हायपरसॉनिक असं म्हंटल जाते. १९९८ साली भारत आणि रशिया ह्या दोघांनी करार करून सुपरसॉनिक वेगाने जाणारं क्षेपणास्त्र बनवण्याच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. ह्याचेच फळ म्हणजे जगातील सगळ्यात वेगाने जाणारं सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्राह्मोस'. ब्राह्मोस साधारण मॅक ३ वेगाने ३७०० किलोमीटर / तास वेगाने प्रवास करते. हा वेग ह्या क्षेपणास्त्राला सगळ्यात घातक बनवतो. कारण इतक्या प्रचंड वेगाने जाताना जेव्हा हे आपल्या लक्ष्याचा वेध घेते तेव्हा त्याच्या क्षमतेपेक्षा कित्येक पट आघात हा त्याच्या गतिशील उर्जेमुळे (कायनेटिक एनर्जी) होतो. 

ब्राह्मोस क्षेपणास्त्राने हा वेग गाठणं हे अतिशय किचकट तंत्रज्ञान आहे. सुपरसॉनिक वेग गाठण्यासाठी इंधनाचे ज्वलन पण त्याच वेगाने होणं गरजेचं असते. इंधनाचं ज्वलन वेगाने होण्यासाठी हवा म्हणजेच ऑक्सिजन ही त्याच वेगाने इंजिन मध्ये जाणं अपेक्षित असते. अश्या प्रचंड वेगासाठी जी इंजिन वापरण्यात येतात त्यांना रॅमजेट इंजिन म्हणतात. ह्या इंजिनामध्ये क्षेपणास्त्राच्या वेगामुळे आत येणाऱ्या हवेचा वेग कमी करून त्याचा  प्रज्वलनासाठी वापर केला जातो. ह्याचा अर्थ रॅमजेट इंजिन ही एका विशिष्ठ वेगानंतर वापरली जाऊ शकतात. ब्राह्मोस मध्ये आधी जेट इंजिनाचे प्रज्वलन करून एक विशिष्ठ गती क्षेपणास्त्राला दिली जाते. त्यानंतर ब्राह्मोस च रॅमजेट इंजिन प्रज्वलित होऊन त्याला त्याचा स्वनातीत वेग देते. रॅमजेट इंजिन साधारण मॅक ५  (६१७४ किलोमीटर / तास) एखाद्या क्षेपणास्त्राला वेग देऊ शकते. त्यापुढे ही वेग हवा असल्यास ह्यावर मर्यादा येतात. 

ध्वनी पेक्षा ५ पट अधिक वेगाने जाण्यासाठी तंत्रज्ञानातील एक वरचं पाऊल टाकावं लागते ते म्हणजे स्क्रॅमजेट इंजिन. स्क्रॅमजेट इंजिन हे रॅमजेट इंजिना प्रमाणे काम करते पण ह्यात एक वेगळी गोष्ट असते ती म्हणजे हे इंजिन सुपरसॉनिक वेगाने आत येणाऱ्या हवेला वापरून इंधनाच प्रज्वलन करत जवळपास मॅक १५ म्हणजे जवळपास १८,५२२ किलोमीटर / तास इतका प्रचंड वेग गाठू शकते. भारताच्या डी.आर.डी.ओ. ने यशस्वीरीत्या (hypersonic technology demonstrator vehicle (HSTDV) चाचणी केली. ह्यात ह्या प्रक्षेपकाने हायपरसॉनिक म्हणजे जवळपास मॅक ६ पेक्षा ( ७४०० किलोमीटर / तास ) अधिक वेगाने यशस्वी प्रवास केला. ह्यामुळे भारताने अतिशय किचकट असं स्क्रॅमजेट इंजिन तंत्रज्ञान मिळवलं आहे. ह्याचा वापर भारत आंतरखंडीय क्षेपणास्त्र तसेच ब्राह्मोस २ मध्ये करणार आहे.  

हायपरसॉनिक वेगाने क्षपणास्त्राची घातकता कित्येक पट वाढणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एक ध्वनीच्या वेगाने म्हणजे मॅक १ वेगाने लक्ष्यावर आदळणार क्षेपणास्त्र जेव्हा मॅक ६ वेगाने लक्ष्यावर आदळेलं तेव्हा त्याने केलेल्या हानीची तीव्रता तब्बल ३६ पट जास्त असेल. म्हणजे ३६ क्षेपणास्त्र सोडण्याऐवजी एकच क्षेपणास्त्र मॅक ६ वेगाने तितकाच आघात करू शकत. आता लक्षात आलं असेल की जेव्हा ब्राह्मोस २ हायपरसॉनिक वेगाने आपल्या लक्ष्यावर प्रहार करेल तेव्हा विध्वंसाची तिव्रता किती प्रचंड असेल. इतक्या प्रचंड वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्राला शोधणं आणि त्याला निष्प्रभ करणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळेच आज भारताने हायपरसॉनिक युगात प्रवेश केला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 

ता. क. :- ब्राह्मोस १ हे जगातील सगळ्यात घातक आणि सगळ्यात वेगाने जाणारं क्षेपणास्त्र असून असं क्षेपणास्त्र आकाश, जमीन, पाणी अश्या सर्व स्तरातून डागता येणारा भारत जगातील एकमेव देश आहे. ब्राह्मोस मॅक ३ वेगाने जमिनीपासून अवघ्या १० मीटर उंचीवरून आपल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. आजवर ह्या क्षेपणास्त्राच्या ७० पेक्षा अधिक चाचण्या झाल्या असून ह्याच्या अचूकतेने अनेक देशांना अचंबित केलेलं आहे. ब्राह्मोस २ हे हायपरसॉनिक पुढलं व्हर्जन असून ते तब्बल मॅक ७ ( ८६०० किलोमीटर / तास ) वेगाने लक्ष्याकडे कूच करण्यास सक्षम असेल. 

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Sunday 6 September 2020

बर्फातले सिंह 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स'... विनीत वर्तक ©

 बर्फातले सिंह 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स'... विनीत वर्तक ©

२९-३० ऑगस्ट २०२० रोजी भारताने चीन विरुद्ध केलेल्या कारवाईमुळे चीन पूर्णपणे एक पाऊल मागे गेला आहे. ह्या कारवाई च श्रेय ज्या सैनिकांकडे गेलं आहे ते सैनिक आहेत 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स'. चीनसह पाकीस्तान ने ह्या नावाचा धसका घेतला आहे. ह्यामागे काही कारण आहेत जी समजून घ्यायला आपल्याला त्यांचा इतिहास, कार्यपद्धती आणि हिमालयाच्या अतिउंचीवरील लढाईतील त्यांच महत्व लक्षात घेतलं पाहीजे. पाकीस्तान तर सोडाच पण चीन ला ही गेली ४० वर्ष भारतीय सेनेची अशी कुठली फोर्स अस्तित्वात आहे ह्याची भनक सुद्धा नव्हती. खरे तर इतके वर्ष भारतीयांना ही असं कुठलं भारतीय सेनेचा भाग असलेलं युनिट अस्तित्वात आहे ह्याची माहिती नव्हती. तर ही 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' म्हणजे नक्की काय आहे? भारतीय सेना असताना ह्या युनिट ची गरज आणि ह्याचा इतिहास? इतके वर्ष गुप्ततेत ठेवलेल्या ह्या युनिट ला आता जगाच्या पातळीवर आणण्यामागची भुमिका ह्या सगळ्या आपण समजून घ्यायला हव्यात. 

'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ची स्थापना १४ नोव्हेंबर १९६२ मध्ये झाली. १९६२ च्या युद्धानंतर भारत- चीन सिमेवर गुप्त सैनिकी कारवाया करण्यासाठी ह्याची स्थापना केली गेली. मेजर जनरल सुजान सिंग उबान हे त्याचे पहिले कमांडिंग ऑफिसर झाले. आधी ह्या युनिट च नाव 'एस्टॅब्लिश २२' असं ठेवण्यात आलं होतं. ह्या फोर्स चा इतिहास समजुन घ्यायचा असेल तर थोडं मागे जावं लागेल. १९५९ साली चीन ने तिबेटवर अनधिकृतरीत्या कब्जा केल्यावर तिबेटी धर्मगुरू 'दलाई लामा' ह्यांना भारत सरकारने भारतात आश्रय दिला. त्यांच्यासोबत आलेल्या अनुयायांना सुद्धा भारताने आश्रय दिला. आपलं घर, आपला देश, आपलं सर्वस्व गमावून बसलेल्या अनेक तिबेटी नागरीकांच्या मनात चीन विरुद्ध असंतोष खदखदत होता. १९६२ ला भारताने एक मोठा भूभाग चीन ला गमावल्या नंतर त्या रक्तरंजित आठवणी ताज्या असताना आय.बी. चे तत्कालीन डायरेक्टर बी.एन.मुलीक ह्यांनी ह्या तिबेटी लोकांची फोर्स बनवावी अशी कल्पना मांडली. अमेरीकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए. च्या मदतीने ह्या असंतोषात धुमसत असलेल्या तिबेटी नागरीकांची एक सिक्रेट फोर्स बनवण्याला भारत सरकारने मान्यता दिली. त्यातून जन्म झाला 'स्पेशल फ्रंटिअर फोर्सचा'. ह्यांच चिन्ह आहे 'इन्सिग्निया' म्हणजेच 'बर्फातले सिंह'.  

ह्या फोर्स ची निर्मिती करताना त्याला पूर्णपणे स्वायत्तता देण्यात आली. त्याची गोपनियता राहावी म्हणून ह्यातील सर्व सैनिक हे तिबेटी नागरीक तर भारतीय सेना आणि एस.एफ.एफ. ह्या दोघांमध्ये समन्वय राहावा म्हणून ह्याची कमांड मेजर जनरल हुद्द्यावरील भारतीय सेनेच्या अधिकाराच्या हातात देण्यात आली. ही फोर्स भारताच्या  Intelligence Bureau (IB), Research and Analysis Wing (RAW),  intelligence agency  अश्या गुप्तचर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली काम करते. ह्याचे कमांडिंग ऑफिसर भारताच्या पंतप्रधानांना रीपोर्ट करतात. ह्याचा सरळ अर्थ आहे की ह्याच्या सर्व कारवायांची जबाबदारी आणि निर्देश हे पंतप्रधान कार्यालयातून दिले जातात. भारतीय सेनेचा भाग नसल्याने ह्यांच्या सर्व कारवाया ह्या अतिशय गुप्ततेने चालतात. ह्या 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ची गुप्तता इतकी राखली गेली होती की अशी कोणती फोर्स भारताची आहे ह्याचा अंदाज चीन ला यायला ४० वर्षाचा कालावधी जावा लागला. 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ची गणना जगातील सगळ्यात घातक समजल्या जाणाऱ्या फोर्स मध्ये होते. ह्यातील सैनिक हे मृत्यूलाही घाम फोडणारे असतात. कोणत्याही स्थितीत आपलं लक्ष्य पुर्ण केल्याशिवाय किंवा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या ध्येयापासून ह्यांना कोणीही परावृत्त करू शकत नाही. ह्या फोर्समध्ये पुरुष आणि महिला असे दोन्ही सैनिक असून त्यांची संख्या क्लासिफाईड म्हणजे गुप्त ठेवलेली आहे.  

'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' च चिन्ह म्हणजे 'बर्फातले सिंह' हे त्यांच्या अस्मितेचं प्रतीक आहे ज्याने चीन आणि पाकीस्तान च्या सैन्याला घाम फुटतो. ज्या प्रमाणे सिंह हा जंगलाचा राजा असतो त्या प्रमाणे हे सैनिक बर्फीय प्रदेशातील सिंह आहेत. अति उंचीवरील विरळ वातावरणात, बर्फीय प्रदेशात ह्या सैनिकांना कोणीही मात देऊ शकत नाही. ह्याच कारण त्यांची शारीरीक क्षमता. हे सर्व सैनिक तिबेट मधील आहेत. मुळातच ह्यांच्या अनेक पिढ्या १५०००-१६००० फुटावर राहत होत्या. ह्या कारणामुळे ह्याच्यात अनुवंशकीय असे बदल आहेत की ज्यामुळे हे सैनिक इतक्या अतिउंचीवर सहजरीत्या शारीरीकदृष्ट्या कठीण काम करू शकतात. त्यात ह्या सैनिकांना ट्रेनिंग आधी अमेरीकेच्या सी.आय.ए. आणि आता भारताच्या गुप्तचर संस्थेच्या निर्देशानुसार दिलेलं असुन हे कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत असामान्य कामगिरी करू शकतात. त्यामुळेच ह्यातील एक सैनिक हा शत्रुच्या १० सैनिकांच्या तोडीस तोड समजला जातो. १९७२. १९७५, १९९९ अश्या सर्व युद्धात ह्या फोर्स ने आपलं योगदान दिलेलं आहे पण त्यांच्या गुप्ततेमुळे सामान्य लोकांमध्ये ह्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. जेव्हा भारताने 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ही भारत-चीन सरहद्दीवर तैनात केली आहे असं चीन ला समजल्यावर चीन च्या सैनिकांचा आत्मविश्वास तिकडेच गळून पडलेला आहे. 

इतके वर्ष अतिशय गुप्ततेने आपलं मिशन पुर्ण करणाऱ्या 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' आता जगाच्या रडारवर आणण्यामागे खुप सारे हेतू आहेत. चीन ज्या भागातून भारताविरुद्ध उभा आहे तो भाग ह्या सैनिकांची मातृभुमी आहे. आपल्या मातृभूमी ला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ह्यातील प्रत्येक सैनिक हा आसुसलेला आहे. ह्या जमिनीचा कोपरा न कोपरा ह्या सैनिकांना माहीत आहे. त्याच शिवाय इथल्या वातावरणात म्हणजेच थंडीत हे लोकं गेली कित्येक दशके राहत आलेले आहेत. चीन आता भारतापुढे वाटाघाटीसाठी मागेपुढे करतो आहे. चीन इतका नमला आहे की त्याच्या संरक्षण मंत्र्यांना भारताच्या संरक्षण मंत्र्यांशी रशिया इकडे बोलण्यासाठी वेळ मागावी लागली. त्यांच्या हॉटेल ला जाऊन त्यांची भेट घ्यावी लागली. जो चीन मस्तवाल होऊन जगाला झुकवतो आहे त्याचा संरक्षणमंत्री भेटीसाठी वेळ मागतो आहे ह्यातच चीन किती पावलं मागे गेला आहे हे लक्षात आलं असेल. हे सगळं कशासाठी तर ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या थंडीचा सामना करण्याची ताकद चीन च्या सैन्याकडे नाही न त्यांच्याकडे तशी व्यवस्था आहे. उलट भारताची सेना कित्येक दशके ह्या तपमानात रहात आलेली आहे. त्यात 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' च्या येण्याने भारताची शक्तीत १००% वाढ झालेली आहे. अश्या प्रतिकूल परीस्थितीत आपली सेना बंदूक काय मागे पळायला पण शिल्लक राहणार नाही ह्याची पुर्ण जाणीव चीन ला आहे. 

'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' च्या जागतिक पटलावरील उदयाने तिबेटी जनतेला भारताने एक संदेश दिला आहे. तिबेटी लोक भारताच्या सहकार्याने तिबेटसाठी उभी ठाकली आहेत. तिबेट ला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर भारतासोबत या. हा संदेश चीन ला अस्वस्थ करणारा आहे. कारण तिबेटी लोकांच्या सहकार्याशिवाय आपला इकडे टिकाव लागणार नाही तसेच तिबेटी जनतेचा उठाव आपल्याला भारी पडू शकतो ह्याची पूर्ण जाणीव त्याला आहे. एकूणच काय तर 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ने आपल्या पराक्रमाने तिबेट सोबत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत ठेवला आहे. 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' मधील बर्फातील सिंहांना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या युद्धगीतामधील काही पंक्ती ज्यात भारताचा गौरव दिसून येतो त्या इकडे लिहितो आहे, 

“The Chinese snatched Tibet from us, and kicked us out from our home; Even then, India kept us like their own... Our young martyrs have no sadness whatsoever; Whether it is Kargil or Bangladesh; We will not lose our strength; Whenever opportunities arise; We will play with our lives.”

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



Friday 4 September 2020

बदललेला शिक्षक... विनीत वर्तक ©

 बदललेला शिक्षक... विनीत वर्तक © 

५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. शाळेत असताना शिक्षक बनून त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला आहे. नेहमीच बेंच वर बसून समोर लक्ष द्यावं लागताना एकदा वेगळ्या रोल मध्ये स्वतःला अनुभवण्याचा दिवस मला नेहमीच आवडायचा. त्याकाळी समोर उभ राहून ५०-६० विद्यार्थांना समजवण इतक सोप्प नसते हे कळून चुकल होत. सगळेच सारखे अस बघता येण तितक सोप्प नसते ह्याची जाणीव तेव्हा झाली होती. ते प्रेम, ती आपुलकी शिक्षक बनून एका दिवसात इतक समाधान देत असे कि ती पुंजी अगदी कित्येक वर्ष पुरायची.  

काळाच्या ओघात शिक्षक बदलत गेले. एकेकाळी आपल्या विद्यार्थांवर प्रेम करणारे शिक्षक आता इतिहासजमा झाले आहेत. नोकरी म्हणून जेव्हा शिक्षकी पेशा झाला तेव्हा त्यातली आत्मीयता पण तितकीच आटत गेली. मला आठवते एकेकाळी विद्यार्थांना समजेस्तोवर समजावून सांगणारे शिक्षक आता परीक्षेपुरती शिकवतात. आपण काय देतो? ह्यापेक्षा आपल्या बँक अकाऊंट मध्ये किती जमा होतात ह्याची काळजी त्यांना जास्ती असते. हट्टाला पेटून ज्ञानार्जन करणारा शिक्षक आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतकाच शिल्लक राहिला आहे. एकूणच आपली शिक्षण पद्धती जेव्हा कारकून घडवण्याच्या स्पर्धेत ढकलली गेली त्याला गुणवत्तेपेक्षा जातीच, मार्कांचं सर्टिफिकेट लागायला लागल तेव्हा शिक्षक पण त्याच वेगाने त्यात ढकलले गेले. 

आता अनेक स्नेहसंमेलन होतात. शाळेतले शिक्षक भेटतात. पण सगळ्यांची खंत हीच कि कुठेतरी विद्यार्थी बदलत गेला. तो बदलला तसेच शिक्षक बदलत गेला आणि त्याचं नातही. आधी शाळेपलीकडे असणार आणि जपवलेल नात आता फक्त त्या वर्गांच्या भिंती पुरतीच मर्यादित राहायला लागल. शिक्षक जसा जसा फक्त मार्गदर्शक ह्या साच्यातून फक्त ठरलेला अभ्यासक्रम पूर्ण करणारा बनत गेला तसतस विद्यार्थी घडवण बाजूला राहून वर्ष संपवण हेच कर्तव्य बनत गेल. शाळेची, कॉलेजांची वाख्या जेव्हा ज्ञानाच भांडार सोडून सर्टिफिकेट मिळवण्याचा धंदा झाला तेव्हाच शिक्षक संपला. 

आता तर त्यात पण कोर्पोरेट कल्चर आल आहे. शाळेचा आणि कॉलेजांचा वार्षिक बाजार भरतो. बोली लागतात. मग विद्यार्थी करार करतात. आता शिक्षकांपेक्षा करार पूर्ण करणाऱ्या कोर्पोरेट शिक्षकांची खोगीर भरती केली जाते. ठरलेल्या तासांपेक्षा जास्ती आणि ठरवलेल्या अभ्यासाशिवाय जोवर बँकेच अकाऊंट भरत नाही तोवर जास्ती काहीच नाही अन्यथा आपला करार संपुष्टात. प्रेम, आत्मीयता, शिक्षक-विद्यार्थी नात आता सगळच मागे जाऊन शोधाव लागते. बघा शाळेचे किती शिक्षक लक्षात आहेत? आणि कॉलेज मधील किती? आताच्या पिढीला तर शाळेत पण कोण होत हे आठवावे लागेल इतक ते नात धूसर झाल आहे. 

आजचा दिवस शिक्षकांन विषयी असलेला आदर व्यक्त करण्याचा दिवस, ते नात जपण्याचा दिवस, ते नात टिकवून ठेवण्याचा दिवस पण आजच्या काळात हे नातच संपुष्टात आल आहे ते जपणार कुठे? शिक्षक बनायला आज मुलांना समजून घेण्याची मानसिकता, गुणवत्ता नाही तर कारकून बनवण्याची तुमची तयारी किती आहे त्यावर अवलंबुन आहे तिकडे ते नात तयार होणार कुठे? आजही माझे शाळेतले शिक्षक आवर्जून माझ्या लेखावर लिहतात, माझे लेख फेसबुक किंवा व्हाट्स अप वर शेअर करतात तेव्हा मिळणारं समाधान हे मिळालेल्या १००० लाईक पेक्षा जास्ती असते. कारण आमच्या वेळी ते नात होत. ते नात जपणारे शिक्षक होते. आजही तसे काही शिक्षक आहेत. पण बाजारू बनलेल्या शिक्षणपद्धतीला आणि कॉर्पोरेट कल्चर ला जर आटोक्यात आणलं नाही तर पुढे येणारा शिक्षकदिन हा फक्त नावासाठीच आणि कारारापुरती शिल्लक राहील ह्यात शंका नाही.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

चेक की चेकमेट?... विनीत वर्तक ©

 चेक की चेकमेट?... विनीत वर्तक ©

चीन चं विस्तरवादी धोरण जगापासून लपलेलं नाही. आर्थिक महासत्तेच्या दिशेने चीन चा गेल्या दशकात झालेल्या प्रवासाने चीन ला आर्थिक आणि सैन्य तसेच तांत्रिक वर्चस्व दिलेलं आहे. ह्याचाच परीणाम म्हणजे चीन कधी नव्हे तो आपल्या छुप्या महत्वाकांक्षेला पुर्ण करण्यासाठी जागतिक पटलावर वाटचाल करायला लागला आहे. कोरोना च पडघम जागतिक पटलावर वाजण्यापूर्वी चीन ला आपल्या ताकदीचा माज आणि गर्व झालेला होता. आपण आपल्या ताकदीच्या जोरावर संपूर्ण जगाला झुकवू शकतो हा आशावाद आणि गर्व चीन च्या राज्यकर्त्यांना होता. तो अगदीच खोटा होता असं नाही कारण आपल्या ह्याच ताकदीने चीन ने अनेक राष्ट्राच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात घेऊन त्यांच्या सार्वभौमत्तेला आव्हान दिलेलं आहे. पण ह्याच विजयाचा उन्माद चीन च्या डोक्यात गेला आणि आपण संपूर्ण जगावर राज्य करत आहोत अश्या अविर्भावात तो बेडकाप्रमाणे फुगला होता. कोरोना च्या उद्रेकानंतर जागतिक परिस्थितीत खुप बदल झाले आणि होत आहेत. कोरोनामुळे आर्थिक आघाड्यांवर अनेक राष्ट्र कमजोर असताना आपल्या अपूर्ण महत्वाकांक्षाना पूर्ण करण्याची हीच संधी आहे असा समज चीन ला झाला आणि त्याने विस्तारवादाची पावलं टाकायला सुरवात केली. 

विस्तारवादाची पावलं टाकताना चीन च्या राजकर्त्यांकडे १९६२ ची भारताची निर्माण झालेली दुबळी प्रतिमा होती. शांतीची कबुतर उडवणारा भारत आणि भारतीय सेना आपल्या विरुद्ध काही प्रतिकार करू शकणार नाही. आपल्या ताकदीला घाबरून स्वतःच्या भागात रस्ते, दळणवळण यंत्रणा न उभारणारा भारत आता सुद्धा आपल्या दबावाखाली दबून व्हीव्हळण्या पलीकडे काही करेल असा विश्वास चीन ला होता. चीन ने बुद्धिबळाच्या पटलावर भारताला चेक दिला. आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजेच भारताला दोन पावलं मागे घ्यायला लावेल असा विचार करून चीन आपली चाल खेळला होता. गावात आपलं कुंपण रोज इंच इंच पुढे घेत पूर्ण शेत आपल्या घशात घालणारे अनेकजण आपण पहिले असतील. चीन भारताविरुद्ध अगदी अशीच चाल १९६२ साली खेळाला आणि त्याने इंच नाही पण कित्येक हजारो किलोमिटर चा प्रदेश आपल्या घशात घातला. पण १९६२ चा भारत आणि आताचा भारत ह्यात खूप फरक आहे. राजकीय, आर्थिक, सैनिकी ताकद ह्यात भारत आता ज्या पातळीवर आहे त्याचा अंदाज चीन ला नव्हता असं नाही. पण भात्यातली आपली अस्त्र, शस्त्र वापरण्याची मानसिकता भारताची कशी असेल ह्याबाबतचा त्याचा अंदाज पूर्णपणे चुकला हे नक्कीच. 

गेल्या काही दिवसात लडाख इकडे एल.ए.सी. (लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल) वरती अनेक घटना घडलेल्या आहेत. भारत आणि चीन च्या सेना एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या आहेत. गाल्वान खोऱ्यात जे घडलं त्याने संपूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलवला आहे. आजवर आपल्या मस्तीत आणि गर्वात वावरणारा चीन पुर्णपणे एक पाऊल ह्या घटनेमुळे मागे गेला आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहीजे की कोणाचे किती सैनिक मारले गेले ह्यापेक्षा मानसिकतेत झालेला बदल हा चीन साठी सगळ्यात मोठा धक्का होता. संपूर्ण जगाला जर ह्या घटनेतून काही शिकायला मिळालं असेल तर, 'एक मुंगी सुद्धा हत्ती ला नाचवू शकते' हा खूप मोठा मेसेज संपूर्ण जगात गेला. चीन च्या प्रतिमेला त्यामुळे तडा तर गेलाच पण चीन च्या मदमस्तीपणाला कुठेतरी वेसण घालण्याची गरज आहे हे जगाला कळलं. त्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्नांना सुरवात झाली. भारतासोबत अमेरीका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रांस सारखे देश उभे राहिले. कुठेतरी चीन ह्या सगळ्यात एकाकी पडत चालल्याच चित्र निर्माण झालं. अमेरीकेने चीन च्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवताना आपल्या दोन महाकाय युद्धनौका साऊथ चायना सी मध्ये आणल्या. चीन ला चारी बाजूने कोंडीत पकडण्याचे जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु झाले. 

चीन गप्प बसणार नाही ह्याचा अंदाज भारताला आला किंबहुना चीन इंच-इंच करून आपला विस्तार करण्याची चाल पुढे सुरु ठेवणार हे भारताला कळून चुकलं होतं. गेल्या काही वर्षात सुमारे ४००० किलोमीटर च्या भारत-चीन एल.ए.सी. वर भारताने खूप काही गोष्टी बदलल्या आहेत. दळणवळण, रस्ते, पायाभूत व्यवस्था ह्या सगळ्या बाबीवर भारताने लक्ष केंद्रित केल्यामुळे भारताने गाल्वान घटनेनंतर आपली संपूर्ण यंत्रणा अतिशय वेगाने सिमेजवळ नेली. चीन कोणकोणत्या पद्धतीने आपल्या क्षेत्रावर कुरघोडी करेल? त्याला आपण कश्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो? एकाचवेळी पाकीस्तान आणि चीन ह्यांनी भारताविरुद्ध आघाडी उघडली तर आपण कश्या पद्धतीने उत्तर देणार आहोत? पारंपारीक युद्धसोबत, आण्विक अथवा जैविक हल्ला झाल्यास त्याला प्रतिउत्तर देणाऱ्या यंत्रणा कश्या असतील? चीन ने कुरघोडी करण्याअगोदर आपण एक पाऊल टाकून चीन ला चेक देऊ शकतो का? हा क्रांतिकारी विचार २०२० मधला भारत करत होता हे समजायला चीन ला उशीर झाला. 

आपल्या सिमेजवळच नाही तर चीन च्या दुखऱ्या नसेवर अंकुश ठेवण्यासाठी भारताने आपली युद्धनौका साऊथ चायना सी मध्ये तैनात केली. तिकडे आर्थिक पातळीवर चीन ला कोंडीत पकडताना चीन च्या भारतातील आर्थिक व्यवहारांवर, मालावर तसेच चीन शी निगडित असणाऱ्या सगळ्याच गोष्टींवर भारताने अंकुश ठेवायला सुरवात केली. चीन ला जागतिक स्तरावर एकटं पाडण्यासाठी राजनैतिक स्तरावर भारताने अनेक बड्या राष्ट्रांना चीन विरुद्ध एकटवण्याचा प्रयत्न सुरु केला. भारताने उचललेल्या प्रत्येक पावलाला जागतिक महासत्तांचं पाठबळ लाभेल हे बघणं अतिशय गरजेचं होतं. एक हुशार बुद्धिबळपटू चेक पेक्षा चेकमेट च्या चाली खेळतो. कारण नुसतं चेक देऊन सामना जिंकता येतं नाही. समोरच्याला आपल्याला हवं तस खेळण्यासाठी पुढल्या दहा चालींचा विचार तो करत असतो. ह्याचप्रमाणे भारताने गेल्या २ महीन्यात पावलं टाकली होती. एका दिवसात उठून तुम्ही युद्ध अथवा शत्रूवर कुरघोडी करू शकत नाही. योजना आखून त्या प्रमाणे प्रत्येक चाल व्यवस्थित खेळावी लागते. काहीवेळा आपल्या काही गोष्टी त्यात स्वाहा ही होतात आणि आपलं नुकसान ही होते पण पुढच्या काही चालींसाठी ती गरज असते. 

गाल्वान नंतर भारतीय सेनेने उन्माद न करता आपल्या रणनीती प्रमाणे सिमेजवळ चीन ला तोडीस तोड सैन्य आणि इतर गोष्टी उभ्या केल्या. एकीकडे चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवताना भारताने आपली स्वयंसिद्धता वाढवत नेली. कागदावर कोण किती वरचढ ह्यापेक्षा तिथल्या भौगोलिक परिस्थिती आणि तिथल्या गोष्टींचं आकलन करून त्या प्रमाणे युद्धनिती आखण हे खूप महत्वाचं होतं. २९-३० ऑगस्ट ला भारताने अतिशय चपळाईने एल.ए.सी. मधील महत्वाची ठिकाण हस्तगत केली. ह्या ठिकाणावर हक्कामुळे भारताला चीन च्या सर्व सैनिकी कारवायांवर नजर ठेवता येणार आहे. चीन आणि भारताच्या सेनेने साधारण एकाचवेळी ह्या ठिकाणावर हक्क दाखवण्यासाठी चढाई सुरु केली होती. पण कुठले सैनिक कुठे पाठवायचे ह्यात भारतीय सेनेची रणनीती वरचढ ठरली. भारतीय सैन्याला मदत करणाऱ्या विकास रेजिमेंटमुळे हे शक्य झालं आहे. तिबेटी आणि गोरखा सैनिकांनी बनलेली ही रेजिमेंट उंच पर्वतरांगांनमधील युद्धासाठी जगात सर्वोत्तम समजली जाते. हे सैनिक अतिशय प्रतिकूल वातावरणात प्रशिक्षित असल्याने शत्रूच्या दहा सैनिकांपेक्षा वरचढ ठरतात. हा फरक चीन ला ही त्या दिवशी समजुन चुकला. चीन चे सैनिक माथ्यावर जायच्या आधी भारताचा तिरंगा तिकडे फडकत होता. चिनी सैनिकांना माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 

ह्या भागात जो उंचावर त्याच पारड जड पण त्याचसोबत ऑक्टोबर पासून कडाक्याची थंडी ह्या भागात सुरु होईल. एका महिन्यानंतर इकडे रहाणं कठीण होईल तिकडे युद्ध तर लांबची गोष्ट. जोवर थंडी संपेल तोवर भारताने आपली उंचावरची ठिकाण अजुन सुरक्षित केलेली असतील. पुढल्या वर्षी ही ठिकाण भारताचा अधिकृत भाग झालेली असतील. भारताने गेल्या आठवड्यात चीन ला चारी बाजूने कोंडीत पकडण्याचा डाव खेळला आहे. अर्थात सहजासहजी चीन आपल्या जाळ्यात अडकेल असं नक्कीच नाही. पण भारताने केलेली कुरघोडी चीन च्या वर्मावर घातलेला घाव नक्कीच आहे. चीन आता येत्या ४-५ आठवड्यात काय पावलं टाकतो ह्यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतील. चीन ची एल.ए.सी. वरचा चेक हा भारताची शक्ती बघण्यासाठी होता? भारतावर अंकुश ठेवण्यासाठी होता? की जागतिक मंचावर आपण किती एकाकी पडू हे बघण्यासाठी होता? हे येणार काळ सांगेलच. पण तूर्तास भारताने चीन ला चेक देऊन एक पाऊल मागे घ्यायला लावलं आहे हे नक्की. आता चीन कोणती पावलं टाकतो ह्यावर तो ह्या चेक पासून वाचतो की चेकमेट होतो हे ठरणार आहे.  

तळटीप :- ह्या पोस्टचा उद्देश राजकीय नसून कोणीही त्याचा वापर राजकीय कुरघोडी अथवा पक्षीय राजकारणासाठी करू नये. 

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Tuesday 1 September 2020

दहा वर्ष एक वेळ खाऊन अर्जुन पुरस्कार मिळवणारी सारीका काळे... विनीत वर्तक ©

 दहा वर्ष एक वेळ खाऊन अर्जुन पुरस्कार मिळवणारी सारीका काळे... विनीत वर्तक ©

उद्याचा वेळ कसा घालवायचा?, शेअर्स चे भाव वाढतील का घटतील?, उद्याच्या भागात तो तिला सांगेल का?, ट्रम्प जिकंतील का? ते सुशांत सिंग च्या केसचा निकाल काय लागेल? असा विचार करून रोज झोपणाऱ्या भारतात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारे लोक आहेत हे अनेकांच्या ध्यानीमनी नसते. स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षानंतर ही माणसाच्या मुलभूत गरजा ह्या भारतात पुर्ण होत नाहीत हे वास्तव चटका लावणारं आहे. खेळामध्ये योग्य मार्गदर्शन, योग्य साधन न मिळाल्यामुळे आजवर अनेक तारे काळाच्या ओघात आपलं असित्व दाखवू शकले नाहीत. क्रिकेट सारख्या खेळाच्या तेजोवलयात आजवर अनेक खेळांवर अन्याय झाला आहे. त्यामुळेच म्हणावं तसं ह्या खेळांना आणि खेळांमध्ये जाण्यासाठी तरुण पिढीला प्रोत्साहन मिळालं नाही. ह्यामुळेच क्रिकेट शिवाय आजही इतर भारतीय खेळांना कमी दर्जाच समजलं जाते. 

कोणताही खेळ देशासाठी, प्रांतासाठी खेळणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूच स्वप्न असते ते म्हणजे अर्जुन पुरस्कार मिळवणं. १९६१ पासुन भारत सरकार खेळात देशासाठी असामान्य कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देते आहे. १५ लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्रकासह सन्मानचिन्ह हे ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे. खेळाडूंच्या खेळातील प्रावीण्या पलीकडे त्या खेळाडूंनी खेळाडूवृत्ती, लिडरशिप तसेच त्यांच वर्तन कसं देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे ह्या गोष्टींचा ही हा पुरस्कार देताना विचार केला जातो. ह्या वर्षी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या खेळाने भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकत ठेवणाऱ्या रुईभर उस्मानाबाद, महाराष्ट्र इथल्या सारीका काळे ची निवड ह्या पुरस्कारासाठी झालेली आहे. गेलं पुर्ण एक दशक एक वेळच जेवण करून खो- खो सारख्या दुर्लक्षित झालेल्या खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील सारीका काळे चा प्रवास थक्क करणारा आणि प्रोत्साहन देणारा असाच आहे. 

महाराष्ट्रातील उस्मानाबाद इकडे एका गरीब कुटुंबात सारीका चा जन्म झाला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या घरात घराची जबाबदारी तिच्या आईवर होती. वडील दिव्यांग असल्यामुळे घर चालवण्यासाठी सारीका च्या आईला शिवणकाम ते दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करावी लागत. आई बाहेर काम करत असताना तिच्या आजीने घराची जबाबदारी घेतली होती. अश्या खडतर परिस्थितीचे चटके सोसताना आपण घरासाठी काय करू शकतो? हा विचार तिच्या मनात कुठेतरी सतत चालू होता. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी आपल्या शाळेत तिने खो- खो मध्ये भाग घेतला. त्या दिवसानंतर सुरु झाला एक खडतर प्रवास. खो- खो खेळताना त्या काळात तिला फक्त एक वेळच जेवण मिळत असे. आपली भूक भागवण्यासाठी तिची भिस्त टोमॅटो आणि मॅगी वर असायची. कधीतरी एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी अथवा कॅम्प ला गेल्यावर तिला दोन वेळच जेवण नशिबाने मिळत असे. 

ह्याच काळात तिची ओळख आपले कोच डॉक्टर चंद्रजीत जाधव ह्यांच्याशी झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात खो- खो हा खेळ शालेय स्तरावर खूप आवडीने खेळला जातो. ह्यामुळे ह्या खेळात राज्य स्तरावर निवड होण्यासाठी खूप मोठी रांग होती. पण सारीका ने आपल्या खेळाची चुणूक दाखवताना दोन वर्षात राज्य स्तरावर आपल नाव नोंदवलं. २०१४-१५ ला कॉलेज मध्ये शिकत असताना घरच्या हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून तिने खो- खो ला सन्यास घ्यायचा निर्णय घेतला. स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं पण तिचे कोच डॉक्टर चंद्रजीत जाधव ह्यांनी तिची खुप समजुत घातली. तिचा हा निर्णय तिच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला. २०१६ ला तिची निवड राष्ट्रीय संघात झाली आणि त्या संघाच प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ही तिच्यावर आली. १२ व्या साऊथ एशियन गेम मध्ये गुवाहाटी इकडे तिने आपल्या खेळाने संघाला गोल्ड मेडल मिळवून दिलं. तर २०१६ साली आशिया पातळीवर इंदोर इकडे झालेल्या खो- खो स्पर्धेत तिच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने गोल्ड मेडल जिंकताना बांग्लादेश ला धुळ चारली. विशेष म्हणजे ह्या संपुर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. सारीका काळे चा सर्वोत्तम खेळ आणि सांघिक नेतृत्वाची ह्या विजयामागे निर्णायक भुमिका होती. ह्याच स्पर्धेत तिची निवड सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून झाली. तिला रुपये ५१ हजार रोख बक्षिसाने गौरवण्यात आलं. तिच्या यशाचा आलेख असाच चढता राहिला आणि २०१७ साली इंग्लंड मध्ये सर्वोत्तम खो- खो खेळाडू म्हणून तिला गौरवण्यात आलं. 

सारीका काळे चा रुईभर, उस्मानाबाद इथून सुरु होऊन इंग्लंड पर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, घरी हलाखीची परिस्थिती. मुलगी म्हणून घरच्यांचा दबाव पण ह्या सगळ्याला तिने मात दिली ती आपल्या जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्ती च्या जोरावर. ह्यात तिच्यामागे उभ्या राहिल्या त्या दोन स्त्रियाच. तिच्या आई आणि आजीने कोणालाही न जुमानता सारीका ला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कोच डॉक्टर चंद्रजीत जाधव ह्यांनी सारीका ला घडवण्यात घेतलेल्या मेहनतीमुळे आज महाराष्ट्राच्या एका छोट्या गावात असणाऱ्या सारीका काळे ला तब्बल २२ वर्षांनी खो- खो ह्या खेळात राष्ट्रीय स्तरावर अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. तिच्या ह्या प्रवासाची दखल जशी केंद्र सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन घेतली तशीच महाराष्ट्र सरकारने तिला खेळ अधिकारी म्हणून तुळजापुर इकडे सरकारी नोकरीवर नियुक्ती करताना गेल्या कित्येक वर्षांचा तिच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. 

खो- खो सारख्या भारताच्या मातीतील खेळाला २२ वर्षांनी अर्जुन पुरस्कार मिळतो ह्यावरून क्रिकेट ने किती खेळाची गळचेपी केली आहे हे लक्षात येईल. आशिया स्तरावर सर्वोत्तम ठरलेल्या खेळाडुला नाममात्र ५१ हजार रुपये मिळतात पण कोणत्यातरी क्लब मध्ये खेळणारा फालतू खेळाडू सुद्धा २०-२० मध्ये रातोरात कोटी रुपयांचे मानधन घेतो. ज्या २०-२० स्पर्धेत कोणताच खेळाडू देशाच अथवा एखाद्या राज्याच प्रतिनिधित्व करत नाही त्याची बोली लावायला सुरवात कोटीच्या आकड्यापासून होते. कुठेतरी एक सुजाण प्रेक्षक, खेळाडू, खेळाचा आनंद घेणारे सगळेच ह्यांनी आपला फोकस बदलण्याची गरज आहे. खो-खो सारखा खेळ ऑलम्पिक मध्ये नसला म्हणून काय झालं? जपान चा सुमो कुस्ती तरी कुठे आहे? पण आज जपान आपल्या मातीतील खेळाला आपलस करून आहे. आम्ही मात्र गोऱ्या लोकांच्या सभ्य खेळाला आमचा धंदा बनवून बसलो आहोत. 

सारीका काळे चा प्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच तो वेदना देणारा पण आहे. सारीका काळे सारखे कितीतरी खेळाडू आज इतिहासाच्या पानात कधी आले, कधी गेले कळले पण नाहीत. जिकडे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही तिकडे खेळाचा दर्जा तरी कसा उंचावणार आहे? नक्कीच आपण कुठेतरी आपल्या आत मध्ये झाकून बघण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षात जर एक खेळाडू एक वेळ जेऊन देशाचा तिरंगा सातासमुद्रापार फडकावू शकते तर जेव्हा त्या खेळाडूला योग्य ती साधन मिळतील तेव्हा खेळाचा दर्जा किती उंचावेल. आज अर्जुन पुरस्कार मिळाल्यावर ही माझा महाराष्ट्र आणि मी मराठी करणाऱ्या किती मिडीया नी ही बातमी दाखवली? महाराष्ट्राची अस्मिता आपल्याच उरावर घेऊन सोशल मीडियावर लढणाऱ्या किती मावळ्यांना सारीका काळे माहीत आहे? कुठेतरी आपण सगळेच चुकत आहोत. 

दहा वर्ष एक वेळच जेवण खाऊन महाराष्ट्राच्या एका मराठी मुलीने देशाचा मोठा खेळ पुरस्कार मिळवला आहे त्यासाठी तिचं मनापासून अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. तिच्या ह्या यशात खारीचा वाटा उचलणारे तिचे कोच डॉक्टर चंद्रजीत जाधव ह्यांचही विशेष अभिनंदन. 

फोटो स्रोत :- गुगल ( फोटोत अर्जुन पुरस्कार विजेती सारीका काळे सोबत तिचे कोच डॉक्टर चंद्रजीत जाधव )

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.