Monday 30 November 2020

तो जीवघेणा क्षण... विनीत वर्तक ©

 तो जीवघेणा क्षण... विनीत वर्तक ©

प्रत्येक  व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी तो जीवघेणा क्षण येतोच. जेव्हा आजूबाजूचं सगळच निरर्थक वाटायला लागते. आजवर जे आयुष्य जगलो, आजवर जे कमावलं मग तो पैसा, पद, प्रतिष्ठा काहीही असो सगळ्याची किंमत ही शून्य वाटायला लागते. कुठून आलो, कुठे जाणार असे प्रश्न मनाचा ठाव घेतात आणि भविष्यकाळ अंधारमय किंबहुना येणारा क्षण सुद्धा नकोस होतो तो एक क्षण कधीतरी जीवघेणा ठरतो. प्रत्येकाच्या मनात कशाची टोचणी आहे ह्याचा ठाव कोणीच घेऊ शकत नाही. आपल्याला निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी द्यायची ताकद ठेवतात. मग ती कलाटणी आयुष्य घडवणारी असू शकते किंवा आयुष्य संपवणारी असू शकते. 

मन हलकं करा, कोणाशी तरी बोला, शेअर करा हे सांगणं जितकं सोप्प असते तितकच ते करणं कठीण. जर प्रेम ठरवून होत नाही तर संवाद तरी ठरवून कसा होणार? प्रेम कधी कोणत्या वयात होऊ शकते तसं तो संवाद ही कोणत्याही वयात होऊ शकतो आणि जोवर तो होत नाही तोवर त्या टोचणाऱ्या क्षणांचे घाव आपणच परतवून लावायचे असतात. आयुष्यात पुढे गेल्यावर हे जीवघेणे क्षण खूप छोटे वाटतात. त्याकाळी आपण वेडे होतो, मूर्ख होतो किंवा कधी कधी आपलच आपल्याला हसायला येते पण खरच तसं असते का? कारण त्या क्षणांना त्याकाळी जर आपण परतवलं नसतं तर आज आपण आजचा दिवस बघू शकलो नसतो हे तितकच खरं असते. 

सगळं असूनसुद्धा सगळं नसण्याची पोकळी जाणवू शकते. कधीतरी आयुष्यात अश्या घटना घडतात ज्या आपली गाडी रुळावरून खाली उतरवतात. पुढे घडत जाणाऱ्या अजून काही घटना ह्या घसरलेल्या गाडीला निराशेच्या खाईत न्यायला पुरेश्या असतात. अचानक आश्वासक वाटणारं आयुष्य एकदम भकास वाटू लागते. त्याचवेळी त्या तुटलेल्या झाडाला वाऱ्याची झुळूक सुद्धा पूर्णपणे उद्ववस्थ करू शकते. पण त्याचवेळी एखादी सर सुद्धा त्या भकास वाटणाऱ्या आयुष्यात नवचैतन्य आणू शकते. ती सर काहीही असू शकते अगदी एखादा अनपेक्षितपणे अनोळख्या व्यक्तीशी झालेला संवाद, भेट, स्पर्श, कॉल ते अगदी चित्रपट आणि संगीत सुद्धा. आयुष्यात कितीतरी वेळा असे जीवघेणे क्षण येतात. पण कडेलोट करणारा एखादाच असतो आणि त्याचवेळी गरज असते ती एका सरीची. त्यावेळी जर ती नाही जाणवली तर आयुष्य संपवणं हा पर्याय सोयीस्कर वाटतो किंबहुना तो एकच पर्याय समोर असतो. त्यावेळी जर ती सर नाही आली तर आयुष्य संपवण्याच्या त्या खोल गर्तेत आपण उडी घेतो पुन्हा कधी बाहेर न येण्यासाठी.   

 अशी उडी घेणारी माणसं खरच मनाने कमकुवत असतात का?  मन कमकुवत का कठीण हे परिस्थिती ठरवतं असते. कठीण आणि संकटाच्या काळी पण आयुष्यात सरी असतील तर आपण कोणत्याही प्रसंगाला सामोर जाण्याच बळ मिळते पण जेव्हा त्याच नसतात तेव्हा म्हंटल तसं एक झुळूक पण सगळं उद्ववस्थ करू शकते. स्टेडियम मध्ये बसून समोरून येणार बॉल कसा खेळावा हे कोणीही सांगू शकते पण मैदानात उतरून जेव्हा समोरून बॉल येत असतो तेव्हा काय करायचं हा निर्णय हे त्या क्षण अनुभवणाऱ्या फलंदाजाने ठरवायचं असते. कारण आउट झाला किंवा सिक्सर लागली तरी दोन्ही गोष्टींची जबाबदारी त्यालाच उचलावी लागते. प्रेक्षक म्हणून आपण फक्त आपलं मत सांगून दुसऱ्या क्षणाला ते विसरून पण जातो. 

तो जीवघेणा क्षण टाळता येऊ शकतो का? त्या सरी ला आपण निर्माण करू शकतो का? ह्याची उत्तर ज्याची त्याने शोधायची कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा तो जीवघेणा क्षण ही वेगळाच. आपल्या सरी आपण निर्माण करायच्या, ज्या त्या क्षणात आपल्याला साथ देतील, सोबत करतील. मग ती सर एखादी व्यक्ती असेल, गोष्ट असेल, चित्रपट अथवा संगीत असेल किंवा एखाद चित्र पण असेल. तो जीवघेणा क्षण येणाच्या अगोदर आपली वर्दी देतो ती ओळखता आली तर कदाचित त्याला सामोरं जाण्याची ताकद आपण स्वतःमध्ये निर्माण करू शकू. त्यासाठी कोणतं जागतिक उत्तर नाही तर ते प्रत्येकाने स्वतः शोधायचं असते.  

फोटो स्त्रोत:- गुगल 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Saturday 28 November 2020

खारे वारे मतलई वारे (भाग ४)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग ४)... विनीत वर्तक ©

काही आठवड्यापूर्वी भारताचे सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांनी नेपाळ ला भेट दिली होती. भारत- चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अनेक दृष्टीने महत्वाची होती. नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेने तसेच नेपाळ ने आपल्या नकाशात केलेल्या बदलांमुळे भारत- नेपाळ संघर्ष ताणले गेले होते. लिंपियाधुरा, कालापानी, लिपूलेख सारखा प्रदेश नेपाळ ने आपल्या भागाचा हिस्सा दाखवला होता ज्याला भारताने अधिकृतरीत्या आक्षेप घेतला होता. अजून ह्या गोष्टीवर तोडगा निघालेला नाही. पण अश्या परिस्थितीचा फायदा चीन ने घेतला नसेल तर नवलच. 'दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है' असं म्हणत चीन ने नेपाळच्या राजकारणावर आपली पकड घट्ट करण्याची तयारी केली. 

चीन चा नेपाळ मधील वाढता हस्तक्षेप भारतासाठी एक धोक्याची घंटा होती. नेपाळच्या राजकारण्यानी काय पावलं उचलावी ह्यावर भारत अंकुश ठेवू शकत नाही पण भारताने काय करावं ज्याने ह्या गोष्टी बदलल्या जातील ते करण्याची चाल भारत यशस्वीरीत्या खेळला. चीन ची नेपाळ सरहद्दीवर असलेली अरेरावी खुद्द नेपाळ मधील लोकांना नको आहे. त्यामुळेच नेपाळ मधील लोक आजही भारतासोबतच्या संबंधांना जास्ती महत्व देतात. १९४७ साली भारत, नेपाळ आणि ब्रिटिश सरकार ह्यांच्या मध्ये एक करार झाला होता. त्या करारा नुसार तत्कालीन ब्रिटिश सैन्यात असलेल्या ११ गोरखा रेजिमेंट पैकी ७ रेजिमेंट ह्या भारतीय सैन्याचा भाग झाल्या होत्या तर उरलेल्या ४ रेजिमेंट नी ब्रिटिश सैन्याचा भाग राहणं स्वीकारलं होतं. त्यामुळेच नेपाळ हा जगातील एकमेव असा देश आहे ज्यांचे सैनिक भारतीय सेनेचा भाग आहेत. भारतासाठी आजवर आपल्या जीवाचं बलिदान करत आलेले आहेत. 

आज ह्या ७ रेजिमेंट मध्ये ४०,००० गोरखा सैनिक भारताच्या रक्षणासाठी सदैव तयार आहेत. गोरखा रेजिमेंट भारतीय सेनेतील अतिशय नावाजलेली रेजिमेंट आहे. ह्या रेजिमेंट ला आत्तापर्यंत २ वेळा परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. ह्याशिवाय गोरखा रेजिमेंट च्या अनेक अधिकाऱ्यांकडे भारतीय सेनेचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, चीफ जनरल दलबीर सुहाग ह्यांच्यासह भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत हे ह्याच रेजिमेंट मधून आलेले आहेत. गोरखा आपल्या पराक्रमासाठी जगात नावाजलेले आहेत. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा ह्यांच अतिशय गाजलेलं वाक्य, 

"If anyone tells you he is never afraid, he is a liar or he is a Gurkha.”  

गोरखा च्या पराक्रमाची साक्ष आजही देते. 

१९५० पासून भारत आणि नेपाळ ह्यांच्यामध्ये मानद पद एकमेकांच्या सैन्य प्रमुखांना देण्याची प्रथा आहे. अर्थात हा मान कधी द्यायचा हे दोन देशांच्या त्यावेळच्या संबंधावरून ठरवलं जाते. सर्वात प्रथम हा मान भारताचे त्या काळचे सैन्य प्रमुख के.एम.करीअप्पा ह्यांना देण्यात आला होता. नेपाळ च्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी ह्यांनी हा मान भारताचे तत्कालीन सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांना देत असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी भारताचे सैन्य प्रमुख हे नेपाळ ला गेले होते. पण हा मान नावापुरता नाही तर ह्या सोबत नेपाळी सेनेचं नेतृत्व आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेचा ही जनरल नरवणे हे भाग असणार आहेत. चीन साठी ही बातमी चेक मेट सारखी समजली जात आहे. कारण हा सन्मान देण्याच्या आगोदर पंतप्रधान ओली ह्यांनी आपल्या देशाचे संरक्षण प्रमुख इश्वर पोखरलाल ह्यांची त्या पदावरून उचलबांगडी करत त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. जनरल नरवणे हे नेपाळ ला जाण्याच्या २४ तास अगोदर रॉ Research and Analysis Wing (R&AW) चे प्रमुख सामंत कुमार गोयल हे काठमांडू ला भेट देऊन आले होते. 

नेपाळ सरकारचा हा निर्णय अश्या वेळी आलेला होता ज्यावेळी भारत आणि नेपाळ ह्यांचे संबंध खूप ताणले गेलेले होते. अश्या वेळी भारतीय सेनाप्रमुखांना काठमांडू इकडे मानद पद देण्याचा कार्यक्रम होणं हे भारताने चीन च्या नाकावर टिच्चून आपण आपल्या गल्ली चा राजा आहोत हे दाखवणं होतं. भारतातल्या मिडियाने ह्या गोष्टीची दखल नेहमीप्रमाणे घेतली नाही. एखादा पुरस्कार सोहळा असावा अशी ही गोष्ट दाखवण्यात आली पण ही गोष्ट घडवण्यामागे ज्या चाली खेळल्या गेल्या आहेत त्याने चीन तोंडावर आपटला आहे. जनरल नरवणे ह्यांच्या नेपाळ दौऱ्याने दोन्ही देशातील थंड पडलेल्या संबंधांना पुन्हा एकदा संजीवनी दिली आहे. अर्थात ह्याचे परीणाम काय होतील ते येत्या काळात स्पष्ट दिसून येतीलच. तूर्तास भारताचे सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांच ह्या मानद पदासाठी अभिनंदन. 

फोटो स्त्रोत:- गुगल 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Thursday 26 November 2020

अक्षयपात्र... विनीत वर्तक ©

 अक्षयपात्र... विनीत वर्तक © 

अक्षयपात्र म्हणजे अशी थाळी जिच्या मधील अन्न कधीच संपत नाही. तुम्ही कितीही जणांना खायला घाला पण त्यात अन्न हे तयार होत रहाते. ऊर्जा ही मानवाच्या  मूलभूत गरजांपैकी आज एक आहे. ऊर्जेची मागणी ही वाढत जाणार आहे. ऊर्जा निर्मिती करणारी साधनसंपत्ती येत्या काही काळात संपणार आहे. मग नंतर काय? हा प्रश्न भारतासह संपूर्ण जगापुढे आज उभा आहे. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर भारत मागील दोन दशकापेक्षा जास्त काळ काम करत आहे. येत्या डिसेंबर २०२० किंवा पुढल्या वर्षात भारत आपलं अक्षयपात्राची थाळी सुरु करतो आहे. भारताचं अक्षयपात्र म्हणजेच 'प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिऍक्टर'. जवळपास ५०० मेगावॉट ऊर्जेची निर्मिती ह्यातून होणार आहे. पण ऊर्जेपेक्षा महत्वाचं हे आहे की जेवढं इंधन ही ऊर्जा निर्माण करायला खर्च होईल त्यापेक्षा जास्ती इंधन ऊर्जा मिळाल्यावर तयार होणार आहे. हे तंत्रज्ञान वाचायला सोप्प वाटलं तरी प्रत्यक्षात निर्माण करणं अतिशय किचकट आहे म्हणून जगाने ह्या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवल्यावर सुद्धा भारताने ह्याच्या निर्मितीचा ध्यास सुरूच ठेवला आहे. त्यामागे काही कारण आहेत. ह्याला अक्षय पात्र का म्हंटल जाते? जगाने नापसंत केलेल्या तंत्रज्ञानावर भारत का काम करतो आहे? तसेच भारताच्या दृष्ट्रीने ते का महत्वाच आहे? हे समजावून घेण गरजेचं आहे.

अणु विखंडन करून अणुउर्जेची निर्मिती होते हे सर्वश्रुत आहे. जगात असणाऱ्या सगळ्याच अणुभट्टी मध्ये युरेनियम २३५ हे इंधन म्हणून वापरल जाते. ह्याच्या अणुच विखंडन करून उर्जा मिळवली जाते. पण युरेनियम २३५ तसच त्याच्या एनरीच स्वरूपाचे साठे जगात अत्यंत कमी आहेत. भारतात तर अतिशय नगण्य स्वरूपात हे मिळते. त्यामुळेच भारताला हे वेगवेगळ्या देशांकडून अणुभट्टी सुरु ठेवण्यासाठी आयात करावे लागते. युरेनियम आयात करताना अनेक जाचक अटी लादलेल्या असतात. ह्याच्या प्रत्येक ग्रॅम इंधनाचा वापर कसा, कुठे झाला हे त्या देशाला सांगाव लागते वेळ प्रसंगी दाखवावं लागते. युरेनियम २३५ चा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जात नाही ह्यासाठी ही सगळी बंधन असतात. तसेच हे इंधन म्हणून द्यायला कोणताही देश कधीही नकार देऊ शकतो. ह्या सगळ्या अडचणीमुळे ऊर्जेच्या स्वायत्तेवर बंधन तर येतातच पण आपल्या स्व रक्षणासाठी आणि तंत्रज्ञानासाठी ह्याचा वापर केला जाऊ शकत नाही. ह्याच युरेनियम चे चुलत भाऊ म्हणजेच युरेनियम २३८ आणि थोरियम. युरेनियम चे चुलत भाऊ आपल्या भारतात मुबलक प्रमाणात सापडतात. युरेनियम २३८ वेस्ट प्रॉडक्ट म्हणून तयार होते तर जगातील सगळ्यात जास्ती थोरियम नैसर्गिकरीत्या भारतात आढळते. एका अंदाजानुसार भारतात जवळपास ६,५०,००० टन थोरियम सद्यस्थितीला उपलब्ध आहे. जर हे थोरियम आपण वापरू शकलो तर ६०,००० वर्ष संपूर्ण भारताची उर्जेची गरज भागवली जाईल. इतके हे प्रचंड मोठे साठे आहेत.

युरेनियम २३८ किंवा थोरियम २३२ चा जर इंधन म्हणून वापर केला तर ह्यातून उर्जा निर्माण झाल्यावर जे निर्माण होतो तो अखंड उर्जेचा स्त्रोत म्हणजेच अक्षयपात्र.  इंधनाचा वापर करून ऊर्जा निर्मिती झाली तरी पुन्हा आपण जेवढं इंधन खर्च केलं त्यापेक्षा जवळपास ३०% जास्ती इंधन ऊर्जा निर्मिती झाल्यावर मिळते. ऊर्जानिर्मिती नंतर तयार होते युरेनियम २३३ आणि प्लुटोनियम २३९. ह्याचा सरळ अर्थ आहे जर आपण युरेनियम २३८ आणि थोरियम २३२ इंधन वापरून अणुभट्टी सुरु केली तर आपल्या बाकीच्या अणुभट्टीनां लागणार इंधन आणि अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्बसाठी लागणार इंधन आपण भारतात तयार तर करूच ह्या शिवाय उर्जेची निर्मिती होईल ती वेगळीच. म्हणूनच ह्या तंत्रज्ञानावर आधारीत अणुभट्टी ला अक्षय पात्र म्हणजेच न थांबता सतत उर्जा आणि इंधन देणारी अणुभट्टी अस संबोधले जाते. भारताने अश्या अक्षयपात्राच्या निर्मितीसाठी एक त्रिसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. ज्याच्यावर आपण एक पाऊल हळू का होईना पुढे टाकत आहोत. 

थोरियम २३२ किंवा युरेनियम २३८ जरी अक्षय उर्जा देणारे असले तरी त्याचं पात्र निर्माण करणे अतिशय कठीण आणि खर्चिक काम आहे. ह्यांच्या अणुच सामान्य पद्धतीने विखंडन करण कठीण आहे. ह्या चुलत भावांच्या अणुचे बंध तोडण्यासाठी खुप जास्त ऊर्जेची गरज असते आणि हे काम करण्यासाठी ह्यांना गरजेचे असतात ते फास्ट न्युट्रॉन. फास्ट न्युट्रॉन म्हणजे काय तर ह्या न्युट्रॉन मधील उर्जा खूप जास्ती असते आणि त्यांचा वेग सामान्यतः वापरण्यात येणाऱ्या न्युट्रॉन पेक्षा खुप जास्त असतो. हे फास्ट न्युट्रॉन युरेनियम २३८ किंवा थोरियम २३२ वर आदळून अणु विखंडन करतात. भारत कश्या पद्धतीने ह्या त्रिसूत्री कार्यक्रमावर काम करतो आहे तर पहिल्या स्टेज मध्ये आपल्याकडे इतर अणुभट्टी मधून तयार झालेलं प्लुटोनियम २३९ आणि युरेनियम २३८ ह्या अणुभट्टीत वापरून त्यातून अजुन प्लुटोनियम २३९ ची निर्मिती केली जाईल. (प्लुटोनियम इंधन वापरून पुन्हा प्लुटोनियम ची निर्मिती हे फास्ट ब्रीडर रिऍक्टर मध्ये शक्य आहे. म्हणून ह्याला 'ब्रीडर' असं म्हंटल जाते. ) दुसऱ्या स्टेज ला हे प्लुटोनियम २३९ भारताच्या इतर अणुभट्टीत इंधन म्हणून वापरलं जाईल त्याचवेळी थोरियम २३८ आणि युरेनियम २३२ जे भारतात खनिजांत मिळते ते वापरून युरोनियम २३३ ची निर्मिती केली जाईल. तिसऱ्या स्टेज ला ह्याच युरेनियम २३३ आणि थोरियम चा वापर करून पुन्हा थोरियम २३२ ला युरेनियम २३३ मध्ये बदलण्याची प्रक्रिया निरंतर सुरु राहील.   

भारताने अस फास्ट ब्रीडर रिऍक्टर १९८५ सालीच प्रायोगिक तत्वावर सुरु केल होतं. जगातील हे तंत्रज्ञान अवगत असणारा भारत त्याकाळी ७ वा देश होता. इतके वर्ष वेगवेगळ संशोधन करून आणि अभ्यास करून एक कमर्शियल फास्ट ब्रीडर रिऍक्टर बनवण्याचा निर्णय भारताने घेतला. त्यावर काम २००४ साली सुरु झाल. प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिऍक्टर कल्पकम इकडे बांधून पूर्ण होत आल असून डिसेंबर २०२० किंवा पुढल्या वर्षात ते कार्यान्वित होईल. ५०० मेगावॉट इतकी उर्जेची निर्मिती करताना त्याच वेळी भारताच्या इतर अणुभट्टीसाठी इंधनाची निर्मिती हे अक्षयपात्र सुरु करेल. वाचताना हे सोप्प वाटल तरी फास्ट न्युट्रॉन सांभाळण सोप्प नाही. ह्या फास्ट न्यूट्रॉन ना स्लो करण्यासाठी १७५० टन इतक्या प्रचंड लिक्विड सोडियम ची गरज लागते. लिक्विड सोडियम साठवण सोप्प नाही. त्याचा पाण्याशी संबंध आला तर त्याचा स्फोट होतो आणि हवेशी संपर्क आला तर तो जळतो. अश्या स्थितीत हवा आणि पाण्यापासून त्याचा साठा वेगळं करण खूप मोठ कठीण काम आहे. भारताने आपल्या जोरावर हे शिवधनुष्य पेललं आहे. ह्या अणुभट्टी मध्ये सुरक्षेसाठी दोन वेगळ्या यंत्रणा असून अवघ्या एका सेकंदात अणुभट्टी ला बंद करू शकतात. तसेच निर्माण होणार तापमान राखण्यासाठी ४ वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. अनेक देशांनी ह्या तंत्रज्ञाना पासून पाठ फिरवली ती ह्याच्या निर्मितीत येणाऱ्या खर्चामुळे आणि जगात उपलब्ध असणाऱ्या युरेनियम २३५ मुळे. पण भारतासाठी युरेनियम २३५ चा पर्याय सोप्पा नाही त्यामुळेच भारत ह्या तंत्रज्ञानावर काम करतो आहे. संपूर्ण जगात एकट्या रशियाने ह्यावर आधारित कमर्शियल अणुभट्टी बनवली जी १९८० पासून सुरु आहे. पण नंतर रशिया आर्थिक संकटात सापडल्यावर त्यांनी अश्या अणुभट्टी उभारण्याचा नाद सोडून दिला. चीन सारखा देश पण ह्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापासून दशकभर मागे आहे.

भारताने मात्र आपल संशोधन सुरूच ठेवल आणि त्यामुळेच आज भारताने असं कठीण तंत्रज्ञान प्रत्यक्षात निर्माण करून दाखवलं आहे. अक्षयपात्रा सारखी ही  अणुभट्टी भारताच्या उर्जेची गरज येणाऱ्या अनेक वर्षात तर भागवेलच पण तितक्या वर्षात दुसऱ्या अणुभट्टीन साठी इंधनाचा स्रोत ही बनणार आहे. ह्यामुळेच जगातील अनेक देश भारताने ह्या तंत्रज्ञानात अग्रेसर होऊ नये ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. ह्या अणुभट्टीच्या सुरक्षितेतचा प्रश्न समोर आणत आहेत. इकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की अक्षयपात्र नुसती भारताची ऊर्जेची गरज भागवणार नाही तर भारताला विपुल प्रमाणात प्लुटोनियम २३९ उपलब्ध करून देणार आहे. जगातील हायड्रोजन बॉम्ब मध्ये प्लुटोनियम २३९ वापरण्यात येतं आणि हीच त्यांची खरी पोटदुखी आहे. तरीसुद्धा उशिरा का होईना भारत ह्या तंत्रज्ञानावर पुढे जातो आहे. ह्या त्रिसूत्री कार्यक्रमाचं स्वप्न बघितलेले डॉक्टर होमी जहांगीर भाभा तसेच बी.ए.आर.सी आणि आय.जी.का.र चे संशोधक, अभियंते, वैज्ञानिक ह्या सर्वाना माझा सॅल्यूट. मला खात्री आहे की येत्या काही शतकात अक्षयपात्र भारताची ऊर्जेची गरज पूर्ण करत राहील. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल 

 सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 23 November 2020

दि फॉरगॉटन हिरो.. आबिद हसन सॅफ्रॉनी... विनीत वर्तक ©

 दि फॉरगॉटन हिरो.. आबिद हसन सॅफ्रॉनी... विनीत वर्तक © 


भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासात केवळ एका कुटुंबाच्या नावासाठी असे अनेक हिरे लुप्त केले गेले, अथवा लपवले गेले ज्यांचं कर्तृत्व एव्हरेस्टपेक्षाही उंच होतं. आपलं संपूर्ण आयुष्य देशाला स्वतंत्र करण्यासाठी वेचताना त्यांनी पुढच्या पिढीला एक आदर्श घालून दिला, ज्याचं पालन आपण आजही करतो. आज इतक्या वर्षांनंतरही आपल्या देशाबद्दल वाटणारं प्रेम आणि अभिमान वाटणारे दोन शब्द कोणते असतील तर ते म्हणजे, 

"जय हिंद!!"

नुसते शब्द उच्चारले, तरी देशभावना जागृत होते. देशाबद्दल प्रेम, समर्पण, आदर, आनंद, अभिमान अश्या सगळ्याच भावना त्यातून व्यक्त होतात. आजही देशाचा प्रत्येक सैनिक आणि नागरिक जेव्हा एकमेकांना कुठे भेटतात, तेव्हा हे दोन शब्द देशाबद्दलच्या सगळ्याच भावना त्याच तीव्रतेने व्यक्त करतात. भारतातील ६ धर्मांना, २२ प्रमुख भाषांना, ५००० जाती-जमातींना एकत्र धरून ठेवणारा शब्द म्हणजेच "जय हिंद". याच शब्दाने भारतातील विविधतेतील एकतेला स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतर आजतागायत बांधून ठेवलं आहे. हा शब्द भारतीयांना देणारे ते महापुरुष म्हणजेच, 'आबिद हसन सॅफ्रॉनी'. 

१९४१ चा काळ होता. नेताजी सुभाषचंद्र बोस बर्लिन, जर्मनी इकडे हिटलरकडून मदत घेण्यासाठी पोहोचले. नेताजींचं एक स्वप्न होतं, ते म्हणजे आझाद हिंद सेनेची स्थापना. आझाद हिंद सेना, अशी एक सेना ज्यामध्ये जवळपास ५०,००० सैनिक असतील आणि यांतील प्रत्येक सैनिक ब्रिटिश सैनिकांना पुरून उरेल, असा त्यांना बनवायचा होता. याच सेनेच्या मदतीने भारताला स्वातंत्र्य देण्याचं स्वप्न नेताजी बघत होते. आझाद हिंद सेनेतील प्रत्येक सैनिकाला सर्वोत्तम बनवण्यासाठी हिटलरकडून मदत मागण्यासाठी नेताजी जर्मनी मध्ये आले होते. नेताजी इकडे भारतीय युद्धकैद्यांना भेटत असताना त्यांची भेट आबिद हसन यांच्याशी झाली. आबिद हसन गांधीवादी विचारांचा पगडा घेऊन, हैद्राबादहून जर्मनीमध्ये अभियांत्रिकी शिकण्यासाठी आले होते. पण जेव्हा त्यांची गाठ नेताजींशी झाली, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाने ते इतके प्रभावित झाले, की आपलं शिक्षण सोडून त्यांनी नेताजींसोबत आझाद हिंद सेनेच्या निर्माणात भाग घेण्याचं नक्की केलं.  

आबिद हसन नेताजींसोबत त्यांच्या जर्मनीमधील वास्तव्यात कायम सोबत राहिले. नेताजींसाठी त्यांनी दुभाषी म्हणून काम केलं. नेताजींनी त्यांना आपलं वैयक्तिक सचिव बनवलं. आझाद हिंद सेनेची स्थापना होत होती, पण एक पेच नेताजींसमोर होता तो म्हणजे आपल्या सेनेची घोषणा काय असावी. आझाद हिंद सेनेमध्ये सर्व धर्मांचे, जातींचे लोक होते, त्यामुळे सर्वांना आवडेल आणि कोणत्याही धर्माला दुजाभाव दिला जाणार नाही, अशी एक घोषणा असावी ज्यामुळे सैनिकांना स्फुरण चढेल, तसेच आपल्या धर्मातून एकमेकांचं स्वागत करण्यापेक्षा, ही घोषणा त्यांचं सर्वांचं ब्रीदवाक्य असेल, अशी घोषणा नेताजींना हवी होती. त्याचवेळी आबिद हसन सॅफ्रॉनीनी जे दोन शब्द सुचवले, ज्याला १९४१ मध्ये आझाद हिंद सेनेची घोषणा, आणि स्वातंत्र्यानंतर भारताचं घोषवाक्य म्हणून स्वीकारण्यात आलं, ते दोन शब्द म्हणजे, 

'जय हिंद!!!'

१९४२ साली आबिद हसन सॅफ्रॉनी यांनी नेताजींसोबत एक ऐतिहासिक यात्रा केली, ज्याचं महत्व इतिहासाच्या पानात लुप्त झालेलं आहे. ती यात्रा म्हणजे नेताजींनी जर्मनी ते टोकियो, जपान इकडे जर्मन पाणबुडीतून (Unterseeboot 180) मधून केलेला प्रवास. हा प्रवास इतिहासाला एक वेगळं वळण देणारा ठरला. जपान मध्ये पोहोचताच नेताजींनी आझाद हिंद सेनेची सूत्रे आपल्या हातात घेतली, आणि पुढे जे झालं तो इतिहास आहे. आझाद हिंद सेनेचा ध्वज काय असावा यात भारतीय लोकांमध्ये रंगावरून मतभेद होते. हिंदू सैनिकांना भगवा रंग हवा होता तर मुस्लिम सैनिकांना हिरवा. या पेचातून तोडगा काढताना हिंदू सैनिकांनी ध्वज भगव्या रंगाचा असावा ही आपली अट मागे घेतली. त्यांच्या या दानशूरपणाला कुर्निसात करताना आबिद हसन यांनी आपल्या नावापुढे 'सॅफ्रॉनी' जोडलं(इंग्रजी मध्ये भगव्या रंगाला सॅफ्रॉन म्हणतात). आबिद हसन सॅफ्रॉनी यांनी मुमताज हुसेन आणि जे.आर.भोसले यांच्यासोबत आझाद हिंद सेनेच्या राष्ट्रगीताला  बांगला भाषेतून हिंदीमध्ये अनुवादित केलं. 

"शुभ सुख चैन की बरखा बरसे, भारत भाग है जागा
पंजाब, सिन्ध, गुजरात, मराठा, द्राविड़ उत्कल बंगा
चंचल सागर, विन्ध्य, हिमालय, नीला जमुना गंगा
तेरे नित गुण गाएँ, तुझसे जीवन पाएँ
हर तन पाए आशा।
सूरज बन कर जग पर चमके, भारत नाम सुभागा,
जए हो! जए हो! जए हो! जए जए जए जए हो!॥"

 १९४५ च्या त्या दुर्दैवी प्रवासात नेताजींच्या सोबत आबिद हसन सॅफ्रॉनीही असणार होते, पण शेवटच्या क्षणी काही कामामुळे त्यांनी हा प्रवास केला नाही. नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांना लगेच देशविघातक कारवायांसाठी अटक केली गेली. त्यांच्यावर खटला भरला गेला. १९४७ साली त्यांची आरोपातून मुक्तता करण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यावर वाणिज्य राजदूत म्हणून त्यांनी अनेक देशांमध्ये काम पाहिलं. १९६९ साली आपल्या सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी एक शांत आयुष्य हैद्राबाद इकडे व्यतीत केलं. ५ एप्रिल १९८४ ला आबिद हसन सॅफ्रॉनी हे पंचतत्वात विलीन झाले. 

स्वतंत्र्य भारतात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद सेनेचं महत्व हे मुद्दामहून कमी लेखलं गेलं. पण आझाद हिंद सेनेमुळे, हिंदुस्थानला  आपण शक्ती आणि सैन्याच्या जोरावर जास्त काळ पारतंत्र्यात ठेवू शकत नाही, याची जाणीव ब्रिटिशांना झाली, हा इतिहास आहे. नेताजींच्या अनेक निर्णयांमध्ये आबिद हसन सॅफ्रॉनी यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग राहिलेला होता. नेताजींना इतकं जवळून ओळखणारे हे हिरो स्वतंत्र भारतात कायम दुर्लक्षित ठेवले गेले. आज त्यांनी दिलेल्या दोन शब्दांना बोलताना देशप्रेमाचे स्फुरण चढते, रक्त सळसळते पण खेदाने त्या शब्दांना जन्म देणारे हे हिरो मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झाले आहेत. आबिद हसन सॅफ्रॉनी यांच्या स्मृतीस माझं वंदन आणि त्यांना माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल, बेटर इंडिया 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday 21 November 2020

एका गावाची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका गावाची गोष्ट... विनीत वर्तक ©

भारतात सध्या ४ जी चा जमाना आहे पण ह्या ४ जी च्या काळात ही भारतात असं एक गाव आहे जिकडे आजही फक्त पी.सी.ओ. संवाद साधला जाऊ शकतो. आजही ३ रुपये/ मिनिट ह्या दराने फोन लावावा लागतो. जिकडे मोबाईल २ जी, ४ जी वगैरे सगळं कोसो लांब आहे. जिकडे एका मिठाच्या पॅकेट ची किंमत २५० रुपये आहे तर एक किलो साखरेसाठी २०० रुपये मोजावे लागतात तर एक सिमेंट ची गोण तब्बल ७००० रुपयांना मिळते. ह्या गावात एकच सरकारी शाळा आहे जिकडे शिक्षक येणं हेच मुलांसाठी मोठी गोष्ट असते आणि १० ची परीक्षा देण्यासाठी तब्बल ९ दिवस ट्रेक करून डोंगर पार करावे लागतात. तेव्हा कुठे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी पोहचू शकतो. ह्या गावातल्या लोकांना एखाद वाहन अथवा चित्रपटगृह किंवा ट्युबलाईट बघण्यासाठी १५० किलोमीटर च अंतर कापावं लागते. आज २०२० मध्ये सगळ्या सुविधा आपल्या पायाशी उभ्या आहेत तर तिकडे साधारण आयुष्य जगण्यासाठी भारतातल्या एका गावाला संघर्ष करावा लागतो आहे. ह्या गावात राहणाऱ्या लोकांनी त्याची निवड नाही केली तर ते स्विकारलं आहे भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी. वाचून आश्चर्य वाटेल पण ह्या गावात राहणाऱ्या २०० कुटुंबीयांनी इकडे स्थलांतर केलं ते भारत सरकारच्या आदेशावरून. २७ नोव्हेंबर १९६१ ला इकडे भारतीय सेनेने तिरंगा फडकावला होता आणि त्या दिवसापासून ते आजतागायत हे गाव भारताचा अविभाज्य अंग आहे ते त्या २०० कुटुंबियांमुळे ज्यांनी सगळ्या विपरीत परीस्थितीत ह्या भागात आपलं आयुष्य काढलं. 

१९६१ च्या काळात जेव्हा भारतीय सेनेच्या आसाम रायफल ने भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशावर आपली मोहीम फत्ते केली तेव्हा आसाम रायफल चे माजी अधिकारी मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांना एक असा प्रदेश दृष्टीक्षेपात आला ज्याचं महत्व भारताच्या सिमेच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. ह्या प्रदेशात फक्त जंगल होतं, इथे कोणतीही मनुष्यवस्ती नव्हती. ह्या भूभागाच्या तिन्ही बाजूने भारताला एका देशाने वेढलेलं होतं तो म्हणजे म्यानमार (पूर्वीचा ब्रह्मदेश किंवा बर्मा). भारताचा हा प्रदेश जर सुरक्षित ठेवायचा असेल आणि हा भारताचा भूभाग आहे हे जागतिक मंचावर सिद्ध करायचं असेल तर तिकडे भारतीय लोकांची वस्ती दाखवणं हे अतिशय गरजेचं होत. मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांनी भविष्यातला धोका ओळखताना अतिशय चातुर्याने एक पाऊल उचललं ज्याचा फायदा भारताला आजतागायत होतो आहे. भारताच्या आसाम रायफल च्या २०० सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांनी इकडे वस्ती करण्यासाठी आदेश दिला. ह्या नवीन वस्तीच नाव त्यांनी आपल्या मुलाच्या 'विजय' ह्या नावावरून ठेवताना भारताच्या नकाशावर एका नवीन गावाचा उदय झाला 'विजयनगर'.

भारताच्या अरुणाचल प्रदेश मध्ये विजयनगर वसलेलं आहे. निसर्गचा वरदहस्त लाभलेल्या हे गाव भारतासाठी खूप महत्वाचं आहे. ह्या गावात रस्ते नाहीत जवळच गाव हे म्यानमार मधील पुटाओ हे ४० किलोमीटरवर आहे तर भारतातील रस्ते असलेलं मिओ हे जिल्ह्याचं ठिकाण १५७ किलोमीटर लांब आहे. विजयनगर ला जायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे भारतीय हवाई दल. रस्ते नसलेल्या ह्या गावात भारतीय वायु दलाची धावपट्टी आहे. Advanced Landing Ground (ALG) ही इकडे येण्याचा एकमेव मार्ग आहे. इकडे येणारं प्रत्येक सामान हे भारतीय वायु दलाच्या हेलिकॉप्टर किंवा कुलीन मार्फत आणलं जाते. ९ दिवसांच ट्रेकिंग केल्याशिवाय इकडे येण्याचा मार्ग नाही म्हणून इकडे येणारी प्रत्येक वस्तूची किंमत ही जवळपास ३ ते ४ पट आहे. इकडे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ह्याच दिव्यातून पुढे जावं लागत आहे. 

समुद्रसपाटीपासून जवळपास ५००० फूट उंचीवर वसलेलं विजयनगर हे भारताचं अविभाज्य अंग आहे. पण आज त्या अंगाला भारताशी नाळेप्रमाणे जोडून ठेवणारी ती २०० कुटुंब आणि त्यांच्या पिढ्या आजही सर्वसामान्य सुविधांपासून वंचित आहेत. आज भारताच्या स्वातंत्र्याला जवळपास ७३ वर्ष झाली. ह्या ७३ वर्षात अनेक सरकार बदलली पण विजयनगर मात्र आजही त्याच सुविधांच्या अपेक्षेत आस धरून बसलं आहे. इथल्या लोकांकडे भारतीय पासपोर्ट आहे. भारतीय नागरीकत्व आहे. त्याच जोरावर आज तिन्ही बाजूने म्यानमार ने वेढलेला भाग भारताचं अस्तित्व राखून आहे पण अश्या अतिशय महत्वाच्या प्रदेशाकडे गेल्या ७० वर्षात ना कोणत्या राज्यकर्त्याचे लक्ष गेलं न इकडे काही विकास झाला. 

भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इकडे बदललेल्या वाऱ्यांच अस्तित्व जाणवायला लागलं आहे. भारताने गेल्या काही वर्षात आपल्या अतिपूर्वेकडील राज्यांकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. इकडे दळवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे  Arunachal Pradesh Frontier Highway जवळपास २००० किलोमीटर लांब आणि ४०,००० कोटी रुपये किंमत असलेला हा रस्ता अरुणाचल प्रदेश सोबत विजयनगर इथल्या लोकांच्या अंधारमय आयुष्यात एक सोनेरी पहाट बनेल अशी आशा इथली लोक बाळगून आहेत. विजयनगर वर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. नांदाफा नॅशनल पार्क ला खेटून विजयनगर वसलेलं आहे. ( Namdapha National Park is a 1,985 km2 (766 sq mi) large protected area in Arunachal Pradesh of Northeast India.) त्यामुळे जर रस्ता झाला तर पर्यटनाच्या दृष्टीने विजयनगर जागतिक पटलावर आपलं नाव उमटवू शकेल. रोजगाराच्या अनेक संधी सैनिकांच्या कुटूंबियांना उपलब्ध होतील. 

भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांना जंगलात नेऊन तब्बल ६० वर्षापेक्षा जास्त काळ वनवास जगणाऱ्या विजयनगरच्या त्या ४४३८ पेक्षा जास्ती भारतीय लोकांना माझा साष्टांग नमस्कार. आज त्यांच्यामुळे विजयनगर भारताचा भाग आहे. आज त्या जंगलाच्या मध्यभागात माझा तिरंगा मोठ्या दिमाखाने झळकतो आहे. त्या सर्वाना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Saturday 7 November 2020

पाकिस्तान ला हादरवणार फॉक्सबॅट... विनीत वर्तक ©

पाकिस्तान ला हादरवणार फॉक्सबॅट... विनीत वर्तक ©

भारतीय सैन्याच्या शौर्याच्या इतिहासात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य जनतेच्या समोर येत नाहीत. भारतीय हवाई दलाच्या फक्त एका लढाऊ विमानाने संपुर्ण पाकिस्तान ला हादरवलं होत आणि त्यांना अमेरीकेकडून मिळालेल्या नवीन एफ १६ नी सर्व शक्ती पणाला लावून पण भारताच्या एका लढाऊ विमानाला ते पकडू शकले नव्हते. भारताची हवेतील ताकद काय आहे हे त्या दिवशी पाकिस्तान कळून चुकलं होतं. २७ मे १९९७ च्या दिवशी इस्लामाबाद, पाकिस्तान च्या आकाशात एक बॉम्बस्फोटा सारखा आवाज झाला. संपुर्ण इस्लामाबाद त्या आवाजाने हादरून गेलं. इस्लामाबाद च्या रस्त्यावर लोक घाबरून उतरले. तो आवाज केला होता भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाने ज्याचं नाव होतं 'फॉक्सबॅट'. 

२७ मे १९९७ ह्या दिवशी फॉक्सबॅट म्हणजेच मिग २५ आर ह्या विमानाने दिवसाढवळ्या इस्लामाबाद, पाकिस्तान च्या आकाशात जाणूनबुजून सॉनिक बूम निर्माण केली. सॉनिक बूम ही एक शॉक व्हेव आहे. एखादी गोष्ट जेव्हा ध्वनी पेक्षा जास्त वेगाने हवेतून प्रवास करते तेव्हा निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी एकमेकांवर आपटून ध्वनी ची ऊर्जा आवाजाच्या रूपाने बाहेर पडते. हा आवाज कानठळ्या बसवणारा एखाद्या स्फोटासारखा असतो. पाकिस्तान च्या आकाशात भारताच्या 'फॉक्सबॅट' ने जाणून बुजून ध्वनी ची रेषा ओलांडली आणि पाकिस्तान ला त्याची जागा दाखवली. ह्या नंतर पाकिस्तानी रडार ने भारतीय विमानाला टिपल्यावर पण पाकिस्तान च्या एकाही लढाऊ विमानाला त्याला पकडणं तर सोडाच पण त्याला साधी भिती पण निर्माण करता आली नाही. भारताच फॉक्सबॅट इस्लामाबाद च्या आकाशात राजा सारखं आपल अस्तित्व दाखवून शांतपणे भारतात बरेली इकडे आपल्या बेस वर परत आलं. पाकिस्तान ची तेव्हा नवीन असलेली एफ १६ सुद्धा हात हलवत सीमेवरून परत गेली होती. 

फॉक्सबॅट (मिग २५ आर) असं एक ब्रह्मास्त्र भारतीय हवाई दलाकडे होत ज्याचं उत्तर देण्याची ताकद जिकडे अमेरीकेकडे नव्हती तिकडे पाकिस्तान काय करणार? फॉक्सबॅट (मिग २५ आर) मध्ये असं काय होतं की ज्याची कल्पना पाकिस्तान सोडाच पण भारतीय हवाई दलातील लोकांना नव्हती. खरे तर अशी कोणती लढाऊ विमान भारतीय वायु दलाचा भाग आहेत हेच एक मोठं गुपित होतं. बरेली इकडे भारतीय वायु दलाचा एखादा बेस आहे हेच त्याकाळी माहित नव्हतं. फॉक्सबॅट (मिग २५ आर) हे रशिया निर्मित लढाऊ विमान सोव्हियत युनियन च्या काळात बनवलं गेलं होतं. अमेरीकेच्या एस आर ७१ (ब्लॅकबर्ड) च उत्तर म्हणजेच फॉक्सबॅट (मिग २५ आर). 

४०,००० किलोग्रॅम (४० टन) उड्डाण करतानाच वजन घेऊन हवेत झेपावणार फॉक्सबॅट हवेत ५० किलोमीटर च अंतर अवघ्या एका मिनिटात कापायचं. बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगात उड्डाण भरताना ध्वनीपेक्षा ३ पट वेगाने (३७०० किलोमीटर/ तास) जाण्याची त्याची क्षमता होती. त्याहीपेक्षा महत्वाचं होत ते ज्या उंचीवरून ते उड्डाण भरू शकत होत. जवळपास ७५,००० ते ९०,००० फूट उंचीवरून त्याची उड्डाण भरण्याची क्षमता होती. (एफ १६ जिकडे ४०,००० ते ५०,००० फूट उंचीपर्यंत उड्डाण भरू शकते.). ३ मॅक चा वेग आणि एव्हरेस्ट पेक्षा तिप्पट उंचीवरून उडताना पण त्यावरील १२०० मी. मी. चा कॅमेरा पंजाब आणि काश्मीर मधून उडताना संपुर्ण पाकिस्तान आणि चीन चा तिबेट ह्याचा वेध घेऊ शकत होता. एका भारतीय लढाऊ पायलट ने फॉक्सबॅट बद्दल सांगितलं होत, 

"From the height at which we fly, you can see the entire Himalayan range at one go. No aircraft has ever been able to achieve for us what the Foxbat has".

 ७०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवरून उड्डाण करण म्हणजे जवळजवळ अवकाशातून वेध घेण्यासारखं होत ह्यासाठी ह्या विमानाच सारथ्य करणाऱ्या वैमानिकांना स्पेससूट प्रमाणे वेगळा युनिफॉर्म घालावा लागत होता. भारताने रशियाकडून १० फॉक्सबॅट विकत घेतली होती. जवळपास ४२ वैमानिकांनी ह्याच सारथ्य केलं ज्यांची नाव आजही गुप्त ठेवलेली आहेत. हे सगळे वैमानिक विंग कमांडर ह्या कमीतकमी श्रेणीतील होते तर उड्डाणाचा अतिशय अनुभव आणि त्यांच्या कारकिर्दीत एकही डाग नसणं हे बंधनकारक होतं. ह्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की फॉक्सबॅट च सारथ्य करणारे सर्वोत्तम मधले सर्वोत्तम होते. 

पाकिस्तान ने एफ १६ घेतल्यावर तो भारतावर कुरघोडी केल्याच्या आनंदात असताना भारतीय वायू दलाच्या फॉक्सबॅट ने ७५,००० फुटावरून पाकिस्तान गाठून मुद्दामून सॉनिक बूम तयार केली आणि नुसत्या सॉनिक बूम ने पाकिस्तान ला हादरवून सोडलं होतं. फॉक्सबॅट ने आपलं अस्तित्व दाखवेपर्यंत पाकिस्तान ला त्याची काहीच कल्पना नव्हती. फॉक्सबॅट चा वेग आणि त्याची उंची गाठणं पाकिस्तान च्या एफ १६ ला शक्य नसल्याने त्याला बघण्यापलीकडे पाकिस्तान काही करू शकला नव्हता. असं म्हंटल जाते की कित्येक वेळा फॉक्सबॅट ने अवघ्या काही उड्डाणात संपुर्ण पाकिस्तान चा काना-कोपरा पिंजून काढला होता आणि त्याची छोटीशी कल्पना सुद्धा पाकिस्तान ला कधी आली नव्हती. फॉक्सबॅट चा वेग हे त्याच अस्त्र असलं तरी त्यासाठी एका फेरीत तब्बल २३,००० लिटर इंधन त्याची इंजिन पिऊन टाकत होती. ७० च्या दशकात हेरगिरी करण्यासाठी बनवलं गेलेलं फॉक्सबॅट काळाच्या ओघात त्याचे जुने होणारे भाग आणि देखभालीचा खर्च ह्यामुळे महाग झालं होतं. त्यात ड्रोन तंत्रज्ञानामुळे त्याची गरज कमी झाली होती. २००६ साली भारताने आपल्या ब्रह्मास्त्राला भात्यातून निवृत्त केलं. 

फॉक्सबॅट चा धसका आजही पाकिस्तान विसरू शकलेला नाही. फॉक्सबॅट भारतीय वायू दलाचं एक असं अस्त्र होतं ज्या बद्दल कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती. आज निवृत्ती नंतर फॉक्सबॅट ला आपण दिल्ली इकडे भारतीय हवाई दलाच्या म्युझिअम मध्ये बघु शकतो. आपल्या नुसत्या रौद्र आवाजाने पाकिस्तान ला सळो की पळो करून सोडणाऱ्या फॉक्सबॅट ला माझा कुर्निसात. फॉक्सबॅट च सारथ्य करणाऱ्या त्या सर्व वैमानिकांना माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल, इंडियन एअर फोर्स. 

माहिती स्रोत:- गुगल, बेटर इंडिया, इंडियन एअर फोर्स

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Friday 6 November 2020

एका हॅलो चा प्रवास... विनीत वर्तक ©

 एका हॅलो चा प्रवास... विनीत वर्तक ©

कोणत्याही संभाषणाची सुरवात 'हॅलो' ह्या शब्दाने करण्याची पद्धत जगभर मान्यता पावलेली आहे. खरे तर ह्या 'हॅलो' ह्या शब्दाचा जनक प्रख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडीसन. त्याच्याच पुढाकाराने हा शब्द जगभर प्रसिद्ध झाला. गेल्या आठवड्यात म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२० ला एका संभाषणाची सुरवात पुन्हा एकदा ह्याच शब्दाने झाली आणि मानवाच्या तांत्रिक क्षमतेने संपुर्ण जग थक्क झालं कारण समोरून आलेला 'हॅलो' हा शब्द तब्बल १८.८ बिलियन किलोमीटर वरून ३४ तासांचा प्रवास करून पृथ्वीवर पोहचलेला होता. हा सगळा वेळ जगातील वैज्ञानिक, शास्त्रज्ञ ह्यांची कसोटी पाहणारा तर होताच पण त्याही पेक्षा ४३ वर्षाआधी मानवाच्या तत्रंज्ञानाच्या क्षमतेला एक कुर्निसात होता.

अमेरीकेच्या नासा ने २० ऑगस्ट १९७७ ला विश्वाच्या अनंत प्रवासाला जाणाऱ्या एका यानाच प्रक्षेपण केलं. ज्याचं नाव होतं 'व्हॉयजर २'. व्हॉयजर २ ने आपल्या प्रवासात सौर मालेतील गुरु, शनी, युरेनस, नेपच्युन ग्रहांना भेटी दिल्या. सौर मालेच्या पलीकडे आपला प्रवास त्याने सुरु ठेवलेला आहे. ५५,२३० किलोमीटर/ तास ह्या वेगाने ते पृथ्वीपासून लांब जात आहे. ह्या यानाने नेपच्युन ला भेट दिल्यानंतर आपल्या प्रवासाची दिशा बदलून आपल्या पृथ्वीपासून दक्षिणेकडे प्रवास सुरु केला. समजा आपल्या सूर्यमालेतील सगळे ग्रह एका पातळीवर आणले तर व्हॉयजर २ आता त्या पातळीच्या दक्षिणेकडे आपला प्रवास करत आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे नासा ज्या पद्धतीने ह्या यानाशी संवाद साधते ती यंत्रणा म्हणजेच नासाचे डीप स्पेस नेटवर्क. 

नासाच्या डीप स्पेस नेटवर्क मधील अँटेना ज्या संदेश ग्रहण करतात अथवा पाठवतात त्यातील डी.एस.एस. ४३ ही अँटेना कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया इकडे आहे. हीच अँटेना व्हॉयजर २ यानाशी संवाद साधू शकत आहे. ह्यामागे कारण आहे व्हॉयजर २ चा होणारा दक्षिणेकडील प्रवास. व्हॉयजर २ ज्या प्रमाणे वर सांगितलं तसं दक्षिणेकडे प्रवास करत असल्याने पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात असणाऱ्या अँटेनांशी त्याचा संवाद होऊ शकत नाही. व्हॉयजर २ हे यान पाठवण्याआधी नासाने आपलं डीप स्पेस नेटवर्क बनवलेलं होतं. गेली ४७ वर्ष ही यंत्रणा न थांबता आपली सेवा नासाला देत होती. पण ह्या यंत्रणेला दुरुस्त करण्यासाठी तसेच अद्यावत करण्यासाठी काही काळ बंद करण्याचा निर्णय नासाने मार्च २०२० ला घेतला. जवळपास वर्षभर हे काम सुरु राहणार होतं. ह्या काळात व्हॉयजर २ ला  कोणत्याही प्रकारचं संदेश देणं शक्य होणार नव्हतं. वेळेआधी काम थोडंफार झाल्यावर नासाने २० ऑक्टोबर २०२० ला यंत्रणा सुरळीत दुरुस्त झाली आहे का नाही बघण्यासाठी व्हॉयजर २ ला संदेश पाठवला. व्हॉयजर २ ने तो संदेश ग्रहण करून नासाच्या संदेशाला 'हॅलो' बोलत आपण सुस्थितीत असल्याचं कळवलं आहे. 

व्हॉयजर २ वरील सगळ्या यंत्रणा ह्या जवळपास ४३ ते ४५ वर्षापूर्वी फक्त ५ वर्ष विश्वाच्या पोकळीत काम करू शकतील अश्या बनवल्या होत्या. पण आज ४३ वर्षानंतर ही व्हॉयजर १ आणि २ मधील यंत्रणा सुस्थितीत असुन पृथ्वीशी संवाद साधत आहेत. व्हॉयजर २ ऊर्जा देण्यासाठी  Multihundred-Watt radioisotope thermoelectric generators (MHW RTG) प्लुटोनियम ह्या समस्थानिकाचा वापर केला गेला होता. ह्याच अर्ध आयुष्य ८७.७ वर्षाच आहे. ह्याचा अर्थ ८७.७ वर्ष ही बॅटरी १५७ वॅट ची ऊर्जा सतत न थांबता व्हॉयजर २ ला देऊ शकणार आहे. आज ही सगळी यंत्रणा विश्वाच्या पोकळीत अगदी शांतपणे आपला प्रवास अनंताकडे करताना पृथ्वीशी संवाद साधत आहे. 

गेले जवळपास ७ महीने व्हॉयजर २ कोणत्याही कमांड शिवाय आपला प्रवास करत होतं. गेल्या आठवड्यात आलेल्या 'हॅलो' ने नासाच्या जवळपास ५० वर्ष मागच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीला कुर्निसात केला आहे. गेल्या ५० वर्षात तंत्रज्ञान क्षमता कित्येक पट वेगाने पुढे गेली आहे. ह्याचा अर्थ नासाकडे असलेली तांत्रिक क्षमता आज किती उंचीवर असेल ह्याचा अंदाज आपण बांधु शकत नाही. १८.८ बिलियन किलोमीटर वरून निघालेल्या हॅलो चा प्रवास हा मानवाच्या तांत्रिक क्षमतेतील एक मैलाचा दगड आहे. व्हॉयजर २ च्या निर्मितीमागे असणाऱ्या नासाच्या सगळ्याच वैज्ञानिक, संशोधक आणि अभियंते ह्यांना माझा कुर्निसात. 

फोटो स्रोत :- नासा, अमेरीका (एका फोटोत नासाचे व्हॉयजर २ यान, दुसऱ्या फोटोत डी.एस.एस. ४३ ही अँटेना कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया ) 

माहिती स्रोत:- नासा, अमेरीका 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



    

   

Wednesday 4 November 2020

बिडेन की ट्रम्प... विनीत वर्तक ©

 बिडेन की ट्रम्प... विनीत वर्तक ©

अमेरीका मध्ये सध्या चालू असलेल्या निवडणुकी मध्ये कोण विजयी होतं ह्याची उत्सुकता भारतात खुप जास्ती प्रमाणात ताणली गेली आहे. आज सगळ्याच टी.व्ही. चॅनेल मध्ये ह्याच बातम्या सुरु आहेत. खरे तर अमेरीकेत कोण विजयी होत अथवा पराभूत होत ह्याचा काही परीणाम सामान्य भारतीय माणसाच्या आयुष्यात काहीच होणार नाही. खरे तर भारत आणि अमेरीका संबंधात ही त्याचा खूप मोठा प्रभाव पडेल असं चित्र सध्या तरी नाही. बिडेन जिंकोत अथवा तात्या ट्रम्प भारत आणि अमेरीका संबंध येत्या काळात दृढ होणार आहेत ही काळाची गरज आहे. 

बिडेन आणि ट्रम्प ह्या दोघांसाठी अमेरीकेचे हितसंबंध सगळ्यात जास्ती महत्वाचे आहेत. अमेरीकेचा कुठे फायदा तिकडे हे दोघेही आपलं वजन वापरणार हे सर्वश्रुत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अमेरीकन आणि एकूणच जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. चीन चा सर्वच क्षेत्रातील वाढता प्रभाव अमेरीकेसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे चीन ला मागे खेचण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे दोघेही करणार आहेत. कोरोना आणि लडाख च्या प्राश्वभूमीवर भारत ह्या लढाईत निर्णायक भुमिकेत असल्यामुळे अमेरीकेच्या दृष्टीने भारताशी सर्वच संबंध चांगले आणि घट्ट ठेवावे लागणार आहेत. भारत हा चीन वर अंकुश ठेवण्यात महत्वाचा साथी आहे हे अमेरीकेला चांगल माहीत आहे. फरक इतकाच की ट्रम्प ह्यांची भुमिका एकला चालो रे अशी होती तर बिडेन ह्यांची भुमिका थोडी मवाळ म्हणजेच सबका साथ अशी असेल. 

ट्रम्प आणि आपले पंतप्रधान ह्यांचे संबंध चांगले असले तरी देशाच्या राजकारणाचा विचार करताना ह्या गोष्टींचा इतका प्रभाव पडत नाही. ट्रम्प हे जितके चांगले वाटतात तितकेच बेभरवशाचे राहीले आहेत. अनेकदा त्यांच्या भुमिका ह्या गोंधळवून टाकणाऱ्या राहिल्या आहेत. अमेरीका फर्स्ट सांगताना त्यांनी भारताच्या उत्पादन आणि आयतीवर टीका केली आहे. पण त्याचवेळी काश्मीर प्रश्नी त्यांनी उघडपणे भारताची भूमिका घेतली आहे आणि भारताविरुद्ध काहीही टिका करण्यापासून लांब राहिले आहेत. पण त्यांची ही भुमिका आश्वासक वाटली तरी ती निर्णायक असेल ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. ह्याचवेळी बिडेन ह्यांची भुमिका भारताविरुद्ध अशी थोडी राहिली आहे. काश्मीर मधली गळचेपी आणि तिथल्या लोकांचे अधिकार ह्याबद्दल त्यांनी भारताला आवडणार नाहीत अशी वक्तव्य केली आहेत. पण जेव्हा अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बनून आपली भूमिका मांडतील तेव्हा मात्र त्यांना भारत दुखावला जाणार नाही ह्याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. 

आर्थिक बाजुवर कोणीही आलं तरी फारसं भारतासाठी काही बदलणार नाही. जागतिक मंचावर बिडेन जर राष्ट्रपती झाले तर पुन्हा एकदा क्लायमेट एग्रीमेंट मध्ये अमेरीका पुन्हा एकदा समाविष्ट होऊ शकते आणि भारताला त्या क्षेत्रात मदत मिळण्याच्या शक्यता आहेत. तात्या ट्रम्प हे लहरी खटल आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे. त्या विरुद्ध बिडेन ह्यांची भुमिका सर्वसमावेशक आणि निर्णायक असेल. ट्रम्प नि ज्या पद्धतीने कोरोना परीस्थिती अमेरीकेत हाताळली त्या विरुद्ध अमेरीकेन जनतेत असंतोष आहे. त्याच प्रमाणे अमेरीकेन कृष्णवर्णीय लोकांमध्ये त्यांच्या विरुद्ध असंतोष आहे. त्यामुळे बिडेन ह्यांना पसंती मिळत असली तरी चीन विरुद्ध आणि अमेरीका फर्स्ट ही ट्रम्प ह्यांची भुमिका अमेरीकन जनतेच्या पसंतीला उतरली आहे. 

तात्या ट्रम्प हरले आणि बिडेन जिंकले तर भारताच्या मोदींना काही प्रमाणात शह मिळेल अशी भोळी आशा काही जणांना वाटत आहे. पण इकडे एक आपण विसरत आहोत की भारताची किंबहुना मोदींची डिप्लोमसी ओबामांच्या वेळी ही स्पेशल होती आणि तात्या ट्रम्प सोबत ही स्पेशल आहे आणि उद्या जर बिडेन आले तर त्यांच्या सोबत पण अशी बघायला मिळाली तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण ही स्पेशल डिप्लोमसी त्या पदासाठी असते हे आपण समजून घेतले पाहिजे. कोणी भारतात जर ट्रम्प हरावेत म्हणून देव बुडवून बसले असतील तर त्यांना जागतिक राजकारण समजून घ्यायची खूप गरज आहे. 

तात्या ट्रम्प येवोत अथवा बिडेन येवोत भारतासाठी अमेरीका आणि अमेरीकेसाठी भारत हे महत्वाचे आहेत आणि येत्या काळात महत्वाचे राहणार आहेत. त्यामुळे कोणीही आलं तरी भारताचा विचार आपण भारतीय म्हणून करायला हवा. आजवर स्वतःची भारतीय ओळख लपवून ठेवणाऱ्या कमला हॅरिस जेव्हा निवडणुकीत भारतीय वंशाचे असल्याचा डंका वाजवतात त्याचप्रमाणे भारताने ही आपला फायदा कुठे आहे हे बघून आपली मैत्री तितकीच वाढवावी ही काळाची गरज आहे. एकूणच काय बिडेन अथवा ट्रम्प भारताला आणि भारतीयांना त्याने जास्ती काही फरक पडणार नाही. 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 2 November 2020

एव्हरेस्ट शोधणारे भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर... विनीत वर्तक ©

एव्हरेस्ट शोधणारे भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर... विनीत वर्तक ©

पृथ्वीवरील सगळ्यांत उंच ठिकाण कोणतं, असं विचारलं तर प्रत्येकाच्या तोंडी नाव येतं, ते म्हणजे "माऊंट एव्हरेस्ट". नेपाळ आणि तिबेटच्या भागावर वसलेलं, जवळपास ८८४८ मीटर (२९,०२८ फूट) इतकं समुद्र सपाटीपासून उंच असलेलं, हिमालय पर्वतरांगांमधलं सर्वांत उंच टोक. आजवर ५२९४ लोकांनी ९१५९ वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. जगातील सगळ्याच गिर्यारोहकांचे स्वप्न राहिलेल्या माऊंट एव्हरेस्टचं नाव हे रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीने सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या स्मरणार्थ दिलेलं आहे. पण किती जणांना हे माहीत आहे, की जगातील सगळ्यात उंच शिखराचा शोध एका भारतीय गणिततज्ञाने लावलेला आहे? त्यांचं नाव होतं 'राधानाथ सिकदर'. पारतंत्र्यात असणाऱ्या भारतातल्या कोणाला हा मान देणं ब्रिटीशांची पद्धत नव्हती, ना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचीच री ओढणाऱ्या भारतीयांना याची कधी दखल घ्यावीशी वाटली. काळाच्या ओघात पृथ्वीवरचं सगळ्यात उंच टोक शोधणारा भारतीय गणितज्ञ इतिहासाच्या पानात लुप्त झाला.

१८५२ चा काळ होता. एके दिवशी सर अँड्रयू वॉ यांच्या भारताच्या उत्तर-पूर्व भागाचं सर्वेक्षण करणाऱ्या कार्यालयातून एक कर्मचारी धावत आला. त्याने अतिशय आनंदाने त्यांना बातमी दिली, की त्याने जगातील सगळ्यात उंच टोकाचा शोध लावला आहे. आपलं सर्वेक्षणाचं काम करताना नेपाळ-भूतानच्या सीमेवर एका उत्तुंग शिखराची उंची, त्याने त्या शिखरावर न जाता गणिताच्या साहाय्याने शोधली होती. त्याकाळी ज्ञात असणाऱ्या उंच शिखरांमध्ये सर्वात उंच टोकाचा मान हिमालयातील कांचनगंगा या शिखराला होता. कांचनगंगाची उंची साधारण ८५८६ मीटर (२८,१६९ फूट) होती. पण त्या कर्मचाऱ्याने गणिताच्या साहाय्याने हिमालयातील माहिती नसलेल्या शिखराची उंची जवळपास २९,००० फूट भरत असल्याचा शोध लावला होता. त्या शिखराला तेव्हा "एक्स व्ही" असं नाव होतं. हा कर्मचारी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर होते. सर अँड्रयू वॉ यांना वाटलं, २९,००० फूट हा आकडा जर आपण जर्नल मध्ये प्रसिद्ध केला तर तो अनेकांना ढोबळमानाने लिहिल्यासारखा वाटेल, म्हणून त्यांनी त्यावर २ फूट वाढवून या शिखराची उंची २९,००२ फूट असल्याचं १८५६ च्या एशियाटिक सोसायटी, कोलकाता इकडे जाहीर केलं.

राधानाथ सिकदर यांचा जन्म १८१३ मध्ये कोलकाता इकडे झाला. लहानपणापासून त्यांना गणिताची आवड होती. आपलं गणितावरचं प्रभुत्व त्यांनी लहानपणी सिद्ध केलं होतं. आपल्या कॉलेजच्या दिवसात त्यांनी दोन वर्तुळांना समान असणारी स्पर्शिका शोधण्याचं सूत्र गणिताने शोधलेलं होतं. त्याकाळी कॉम्प्युटर नसल्याने गणितात अव्वल असणाऱ्या लोकांना ब्रिटीश सरकारच्या नोकरीचे दरवाजे खुले केले जायचे. त्यांच्या या बुद्धीमत्तेची क्षमता त्याकाळी त्यांना ब्रिटीश सरकारच्या जी.टी.एस. म्हणजेच (Great Trigonometrical Survey) मध्ये नोकरी देऊन गेली. सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नेतृत्वाखाली राधानाथ सिकदर यांनी भूसर्वेक्षणाचं आणि डोंगर रांगांची उंची मोजण्याचं काम सुरु केलं. १८४३ मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट निवृत्त झाल्यावर सर अँड्रयू वॉ यांनी ते काम पुढे न्यायला सुरूवात केली. १८४७ पर्यंत त्यांनी दार्जिलिंग आणि कांचनगंगाची उंची मोजलेली होती.

उंची मोजण्यासाठी त्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या शिखराचा वेध घेऊन त्रिकोणमितीच्या साहाय्याने त्याची उंची ठरवली जात होती. पण सगळ्यात मोठी अडचण होती ती पृथ्वीच्या वातावरणामुळे होणाऱ्या प्रकाशाच्या अपवर्तनाची (terrestrial refraction). पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना प्रकाशाचं अपवर्तन लक्षात घेणं अचूक उंचीसाठी गरजेचं होतं. त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणाहून गणित करून उंची मोजली जात होती. 'माऊंट एव्हरेस्टची' म्हणजेच शिखर 'एक्स व्ही' ची उंची मोजण्यासाठी जरोळ, मिर्झापूर, जनीपती, लाडानीया, हरपूर आणि मिनाई ह्या सहा ठिकाणांहून (ही सर्व ठिकाण उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील आहेत) राधानाथ सिकदर यांनी त्याची उंची मोजली. जी प्रत्येकवेळी २९,००० फूट भरली. जेव्हा सगळ्या ठिकाणाहून उत्तर सारखं आलं, तेव्हा आपण जगातील सगळ्यात उंच टोक शोधल्याचं राधानाथ सिकदर यांना कळलं. याची माहिती जेव्हा त्यांनी आपले वरिष्ठ सर अँड्रयू वॉ यांना दिली, तेव्हा त्यांनी अचूकतेसाठी त्यापुढे २ फूट लावले आणि जगातील सगळ्यात उंच टोकाची समुद्रसपाटीपासून उंची २९,००२ फूट असल्याचं जाहीर केलं.

या शोधाचे खरे जनक भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर हे होते, पण त्यांचं कर्तृत्व ब्रिटीशांनी जाणूनबुजून दडपताना १८६५ मध्ये शिखर 'एक्स व्ही'चं नाव सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या प्रयत्नांसाठी "माऊंट एव्हरेस्ट" असं ठेवलं. आजपर्यंत संपूर्ण जग हिमालयातील त्या उत्तुंग अश्या शिखराला माऊंट एव्हरेस्ट असं संबोधते, पण त्याची ओळख जगाला दाखवून देणाऱ्या भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर यांना खुद्द भारतीय ओळखत नाहीत तिकडे जगाकडून काय अपेक्षा! खरे तर माउंट एव्हरेस्टचं नाव आज "माऊंट सिकदर" अथवा "माऊंट राधानाथ" असं असायला हवं होतं, पण ब्रिटीशांनी जाणूनबुजून इतिहासाच्या पानातून पण राधानाथ सिकदर यांचं कर्तृत्व त्यांच्या मृत्यूनंतर लुप्त केलं ते कायमचं. तंत्रज्ञानातील प्रगतीनंतर १९५४ साली माऊंट एव्हरेस्टची अधिकृत उंची २९,०२८ फूट ( ८८४८ मीटर) असल्याचं जगाने मान्य केलं, पण जवळपास १०० वर्षं आधी एव्हरेस्टवर चढाई न करता काही फुटांच्या अचूकतेने (इकडे एक लक्षात घ्यायला हवं की दरवर्षी एव्हरेस्ट ची उंची ४ मिलीमीटरने वाढते आहे) एव्हरेस्टची उंची मोजणारे भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झाले. त्यांच्या कर्तृत्वाला माझा साष्टांग नमस्कार. एक भारतीय म्हणून मला नेहमीच तुमचा अभिमान वाटेल आणि प्रत्येकवेळी माऊंट एव्हरेस्ट जेव्हा समोर येईल, तेव्हा तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाची तो साक्ष माझ्यासकट प्रत्येक भारतीयाला देईल.

माहिती स्रोत :- गुगल, भारतीय इतिहास

फोटो स्रोत :- गुगल  

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.