Thursday 18 June 2020

ड्रॅगनच्या वळवळणाऱ्या शेपटाला सिंहाचा तडाखा... विनीत वर्तक ©

ड्रॅगनच्या वळवळणाऱ्या शेपटाला सिंहाचा तडाखा... विनीत वर्तक ©

चिनी ड्रॅगनची शेपूट पुन्हा वळवळ करायला लागली आहे.  इतके वर्ष निद्रिस्त असलेलं हे शेपूट पुन्हा वळवळण्यामागे काही कारणं आहेत. १९६२ च्या युद्धात आपल्या  जवळपास ४३,००० चौरस किलोमीटर चा भूभाग ड्रॅगनने आपल्या चुकांमुळे गिळंकृत केला होता, ज्याची किंमत आपण आजही मोजतो आहोत. १९६२ च्या युद्धात आपले ३२५० पराक्रमी सैनिक हुतात्मा झाले आणि स्वित्झर्लंड ह्या देशाइतका भूभाग आपण चीनला दिला. अतिशय चुकीचं राजकीय धोरण आणि नेतृत्व, युद्धात आकलन न करता घेतलेले निर्णय आणि आपल्या सीमांच्या रक्षणासाठी त्या भागात पोहचण्यासाठी रस्ते, सैनिकी आयुधे आणि दळणवळण यंत्रणा अद्ययावत करण्यात दाखवलेली निष्क्रियता ह्यामुळे भारताचा पराभव झाला होता.

परंतु आज जवळपास ५८ वर्षानंतर गोष्टी खूप वेगळ्या आहेत. चीनचा ड्रॅगन अजूनही आपल्यापेक्षा सैनिकी भाषेत मजबूत असला तरी युद्धात आकड्यांचा खेळ महत्वाचा नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या काही शे मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना हजारो सैन्यबल असणाऱ्या मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडलं होतं ते परिस्थितीचं आकलन करून! आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत भारतीय सैन्याने आपली तयारी केली आहे. त्यामुळेच ड्रॅगनचं शेपूट वळवळ करत आहे. आजच्या घडीला अतिउंचावरील म्हणजे जवळपास १४,००० फूट उंच आणि उणे तपमानात युद्ध करण्यात जगातील सर्वोत्तम सैन्य म्हणून भारतीय सैन्य आहे हे खुद्द चिनी ड्रॅगनने मान्य केलं आहे. त्यामुळे आकड्यांच्या आणि आयुधांच्या बाबतीत चीन आपल्यापेक्षा सरस असला तरी ज्या भूभागावर आपली सीमारेषा ड्रॅगन शी जोडलेली आहे तिकडे भारतीय सैन्य मजबूत तर आहेच पण तिकडे भारताने काही वर्षात केलेल्या रस्ते आणि दळणवळण यंत्रणेमुळे भारताची बाजू मजबूत आहे. १९६२ चा भारत आणि २०२० चा भारत सगळ्या बाबतीत वेगळा आहे हे चिनी ड्रॅगन ला चांगलं माहिती आहे. त्यामुळेच आज स्वतःचे ४३ सैनिक मारले गेल्यावर ड्रॅगन शांततेने हा वाद सोडवण्याची भाषा करतो आहे.

लडाखच्या गाल्वान खोऱ्यात जो वाद झाला त्यामागे खूप काही गोष्टी आहेत. एक भारतीय म्हणून आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे.  गाल्वान खोर हे जवळपास १७,००० फूट उंचीवर आहे. ह्या खोऱ्यात भारत आणि चीनची नियंत्रण रेषा आहे. गेल्या काही वर्षात भारताने झपाट्याने ह्या भागात रस्ते आणि दळणवळ यंत्रणा उभी केली आहे. मी काही दिवसांपूर्वी ज्यावर लेख लिहलेला होता तो चेवांग रिंचेन सेतू चीन चं खरं दुखणं आहे. भारताने ह्या भागात श्योक आणि दौलत बेग ओल्डी भागात जाणारा २२४ किलोमीटर लांबीचा फिडर रस्ता तयार केला आहे. नियंत्रण रेषेपासून अवघ्या १० किलोमीटर वर असणाऱ्या ह्या रस्त्याने भारत प्रचंड वेगाने आपलं सैन्यबळ हलवू शकतो. अगदी छोट्या मोठ्या ट्रक पासून रणगाड्या पर्यंत सगळ्या गोष्टी १७,००० फुटावर अतिशय वेगाने नियंत्रण रेषेवर घेऊन जाऊ शकतो. हे कमी तर भारताने ह्या भागात जगातील सर्वात उंचीवर असणारी धावपट्टी बांधली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी भारताने इकडे C17 Globemaster हे अतिशय शक्तिशाली सैनिकी विमान उतरवून चीनी ड्रॅगनच्या शेपटीवर अंकुश ठेवला आहे. चीनने ह्या भागात आपलं सैन्य आणून भारताला थांबवण्याचा प्रयत्न केला पण भारताने ह्याला न जुमानता आपलं काम सुरूच ठेवलं आणि चीन च्या ड्रॅगन ने फुत्कारायला सुरवात केली.

चीनच्या ड्रॅगन ची पिलावळ आपल्या देशात ही कमी नाही. आपल्या देशाच्या सैनिकांचे बळी घेणाऱ्या ड्रॅगन विरुद्ध आंदोलन करायचं सोडून ड्रॅगन ला मान द्यावा ह्यासाठी लाल बावटा घेऊन रस्त्यावर येणारे पूर्ण जगात भारतात दिसतात. कारण ह्यातलं कोणीही १७००० फुटावर उणे २०-३० डिग्री सेल्सिअस तपमानात बंदूक घेऊन देशाचं संरक्षण करत नाही. बालाकोट इथल्या हल्ल्याचे पुरावे मागणारे असोत वा आता निशस्त्र सैनिक सीमेवर का गेले ही ओरड करणारे राजकारणी सैनिकांच्या बलिदाना मध्ये पण राजकारण शोधतात. पण तो तिथे सीमेवर उभा असणारा सैनिक मात्र आपल्या साथीदारांचं असं बलिदान आपलं दुःख, राग, आवेग आतल्या आत गिळून पुन्हा एकदा ड्रॅगनला, आपल्या सिंहाच्या डरकाळीने तिथल्या तिथे उत्तर देऊन उभा आहे. ह्याच  सिंहपराक्रम आणि बलिदानामुळे आज ड्रॅगन कचरतो आहे. जगावर अधिराज्य करण्यासाठी आसुसलेला चीन आपले ४३ सैनिक मारले गेल्यावर ही संयमाची भाषा करतो ह्यात सर्व आलं.

आपल्या काही खराब निर्णयामुळे आजही ह्या भागात दोन्ही सैनिक बंदूक घेऊन गोळीने शत्रूचा वेध घेऊ शकत नाहीत म्हणून चिनी सैन्याने रॉडला उलटे खिळे लावून त्याने आपल्या पोस्ट ची काळजी घेणाऱ्या भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला केला. हे सगळं करण्यामागे चीन चं मोठं राजकारण आहे. गोळी मारली तर कराराचं उल्लंघन केलं म्हणून आपल्या पिलावळीतर्फे भारतात अशांतता माजवायची कारण भारताला चीनसोबत युद्ध सुरु करण्याच खापर फोडायचं. ते नाही झालं तर आपण चाल करून गेलेला भूभाग मिळवायचा असं आजवर चिनी ड्रॅगन करत आला आहे. पण ह्यावेळी भारतीय सैनिकांनी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देताना त्यांच्या सैनिकांना जशास तसं उत्तर तर दिलं पण भारत आता एक इंच पण भूमी गमावणार नाही हा संदेश ही दिला. चीनचा हा डाव त्यांच्यावर उलटला म्हणून चीन च्या ड्रॅगन ची पिलावळ आता काही दिवस भारतात सक्रिय होईल. कारण कसं तरी लडाख भागातलं काम थांबवणं हे चीनचं अंतिम लक्ष्य आहे. पण युद्ध त्यालाही नको आहे कारण युद्ध झालं तर जवळपास सगळेच देश भारताच्या बाजूने उभे राहतील. अमेरिका तर टपलेली आहे. त्याच्या जोडीला ऑस्ट्रेलिया, जपान, इस्राईल भारताला उघडपणे पाठिंबा देतील. रशिया ह्या सगळ्यात तटस्थ राहील. त्यामुळे चीन ला लडाख नाहीतर जगाच्या सर्व भागात ह्या युद्धाचे चटके बसतील हे उघड आहे. त्यामुळेच ड्रॅगन शांततेची भाषा करतो आहे.

एक भारतीय म्हणून, आपल्या सिंहाच्या सोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. भारतीय सेना आणि सेनेतील प्रत्येक सैनिक ड्रॅगनला जशास तसं उत्तर द्यायला समर्थ आहे. त्यांना त्यांचं काम करू द्या. आपण एक सामान्य नागरिक म्हणून ड्रॅगन च्या पिलावळीला जागीच रोखायला हवं. आज सैनिकांवर प्रश्न विचारणाऱ्याना माझा एक प्रश्न आहे. तुम्ही आधी १७,००० फुटावर नुसतं जाऊन दाखवा मग आपण युद्ध कसं आणि भारतीय सैन्याने काय करावं आणि करू नये ह्यावर विचार करू. ड्रॅगनच्या वळवळणाऱ्या शेपटीला तडाखा देताना आपण २० पराक्रमी सिंहांना गमावलं आहे. त्याचा बदला योग्य त्या वेळी भारतीय सेना घेईल असा विश्वास मला आहे. भारतीय सैन्याच्या त्या पराक्रमी सैनिकांच्या बलिदानाला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Tuesday 16 June 2020

जयजयकार... विनीत वर्तक ©

जयजयकार... विनीत वर्तक ©

मराठी चित्रपट सृष्टी आणि हिंदी चित्रपट सृष्टी ह्यातील सगळ्यात मोठी तफावत म्हणजे त्यात असणारा पैसा. एखादा टुकार हिंदी चित्रपटासाठी ५०० रुपये मोजणारे प्रगल्भ प्रेक्षक मराठी चित्रपटासाठी २५० रुपये पण मोजत नाही. हिंदी चित्रपट हे संपूर्ण भारतात कुठेही चालू शकतात पण मराठी चित्रपटांच तसं नसते. एखाद्या विशिष्ठ भाषिक चित्रपटाची ओळख त्या भागापुरती मर्यादित रहाते आणि त्यातही त्या भागातील लोकांनी त्या चित्रपटाला नाकारलं तर चित्रपटाचं गणित कोलमडून पडते. एका विशिष्ठ धाटणीचे चित्रपट मराठीत येतात अशी एक ओरड प्रेक्षकांची आहे. पण जितके वेगळे विषय मराठी चित्रपटात हाताळले जातात तसे क्वचितच हिंदी चित्रपटात बघायला मिळतात. पण आपलं दुर्दैव असं की एकतर मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही आणि मिळाली तरी प्राईम टाइम चे शो मिळत नाही.  अवघ्या एखाद्या आठवड्यात चित्रपट निकालात निघतो. ह्या सगळ्या खेळात एखादा चांगला चित्रपट कधी येतो कधी जातो कळत सुद्धा नाही.

काल अचानक असाच एक नितांत सुंदर चित्रपट बघायला मिळाला. टी. व्ही. आणि माझा ३६ चा आकडा आहे. त्याला मी बघवत नाही आणि मला तो. पण कधी तरी ओझरती भेट होते आणि अश्या वेळी एखादी सुंदर कलाकृती बघायला मिळाली तर एक वेगळच समाधान मिळते. काल 'जयजयकार' नावाचा २०१४ साली येऊन गेलेला एक मराठी चित्रपट बघायला मिळाला. दिलीप प्रभावळकर सारखे कसलेले अभिनेता म्हणजे काहीतरी वेगळं असणार अशी आशा बाळगून चित्रपट बघायला सुरवात केली. माझा अंदाज बरोबर निघाला. सुंदर कथानक आणि त्याला तितक्याच ताकदीच्या अभिनयाची जोड चित्रपटातील कलाकारांकडून मिळाल्यावर कलाकृती सुंदर होणारचं.

तृतीय पंथी लोकांच्या आयुष्यावर भाष्य करणारा इतका चांगला चित्रपट मराठीत किंवा हिंदीत माझ्या बघण्यात नाही. मुळातच समाजाने वाळीत टाकलेले लोकं कश्या पद्धतीने जीवन जगतात आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जर समाजाने प्रयत्न केला तर ते ही समाजात आपल्या कर्तृत्वावर आपलं स्थान निर्माण करू शकतात ह्यावर भाष्य करणारा हा चित्रपट मला खूप आवडला. २०१४ साली जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा ह्याबद्दल कधीच ऐकल्याचे आठवत नाही. इतका चांगला सुंदर चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघण्याची मज्जा खूप वेगळीच असती. असे सुंदर चित्रपट कधी येतात आणि जातात हे कळत नाही. मराठी चित्रपटाने कात टाकावी असं जर सुजाण प्रेक्षकांना वाटत असेल तर अश्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघायला हवेत. असे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था ही निर्माण व्हायला हवी.

जयजयकार सारखे चित्रपट समाजाच्या अश्या काही गोष्टींवर प्रकाश टाकतात ज्याचा विचार करणं पण पांढरपेशा आणि प्रगल्भ, सुशिक्षित समाजात निषिद्ध मानलं जाते. अश्या वेगळ्या विषयांवर अंतर्मुख करणारा चित्रपट आपल्या हातातून निसटला ह्याची खंत मात्र चित्रपट संपता संपता मनाला लागून राहिली. ह्या चित्रपटाच्या संपूर्ण टीम ला माझा सलाम. एक अविस्मरणीय अनुभव माझी आणि टी. व्ही. ची ६३ प्रमाणे काही वेळ का होईना गट्टी करून गेला.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 


Monday 15 June 2020

चीन चा बहिष्कार खरचं शक्य आहे का?... विनीत वर्तक ©

चीन चा बहिष्कार खरचं शक्य आहे का?... विनीत वर्तक ©

कोरोना बद्दल संशयास्पद भुमिका, लडाख मध्ये केलेली घुसखोरी आणि एकूणच चीन ची वाढती दादागिरी ह्यामुळे भारतातील जनमानसात चीन बद्दल असंतोष वाढलेला आहे. कोरोना च्या प्रसाराचं खापर चीन च्या माथी लागलेलं आहे. त्यात चीन घेत असलेल्या भूमिकेमुळे पूर्ण जगात चीन बद्दल असंतोष आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आत्मनिर्भर बनण्याचं आवाहन आणि त्याला लडाख च्या सोनम वांगचुक ह्यांनी आपल्या व्हिडीओ द्वारे चीन चा बहिष्कार करण्याचं आवाहन ह्यामुळे सगळीकडे चीन च्या मालावर बहिष्कार घालण्याच्या पोस्ट सुरु झाल्या. आत्मनिर्भर भारत बनवून चीन च्या मालाचा बहिष्कार केला की आपण त्याला चांगला इंगा दाखवू वगरे अश्या पद्धतीने भावनिक आवाहन करणाऱ्या पोस्ट आणि फॉर्वर्डस ची चालती झाली. पण कोणी थांबून विचार केला तर खरच चीन चा बहिष्कार शक्य आहे का?.....

चीन चा बहिष्कार आपल्याला शक्य आहे का? परवडणारा आहे का? भारताच्या बहिष्काराने भारत आणि चीन ह्या दोघांच्या हितसंबंधांवर होणारे संभाव्य परीणाम ? त्या पलीकडे आपलं देशहित राखून आपल्याला कोणत्या पद्धतीने चीन च्या अरेरावी ला उत्तर देता येईल ह्याचा डोळसपणे विचार व्हायला हवा. भावनांच्या आहारी जाऊन चीन चा बहिष्कार शक्य नाही ही वस्तुस्थिती आपण स्विकारायला हवी. आपण जर आकड्यांचा विचार केला तर बरचसं चित्र सुस्पष्ट होईल. भारत आणि चीन दरम्यान व्यापाराचा विचार केला तर आपण चीन कडून साधारण वर्षाला ७० बिलियन अमेरीकन डॉलर किमतीचं सामान आणतो आणि फक्त १६.५ बिलियन अमेरीकन डॉलर चं सामान चीन ला निर्यात करतो. भारत- चीन आयात-निर्यात व्यापारातली तूट जवळपास ५३ बिलियन अमेरीकन डॉलर ची आहे. आता कोणी म्हणेल हे तर चांगलच म्हणजे आपण चीन कडून सामान नाही घेतलं तर त्यांची वाट लागेल. पण चीनसाठी ७० बिलियन अमेरीकन डॉलर हे त्यांच्या जगभरातील संपूर्ण निर्यातीचा फक्त २% आहे. म्हणजे उद्या भारताने काहीही विकत घेतलं नाही तरी चीनसाठी हे नुकसान २% किंवा फारफार तर ५% जास्तीत जास्त असेल. त्याने चीन ला ओरखडा उठल्या इतपत ही फरक पडणार नाही. 

आता आपण भारताची बाजू बघू. भारत त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी चीन कडून घेतो त्यातील खूप साऱ्या अतिशय महत्वाच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. इलेक्ट्रिक सारख्या क्षेत्रात जवळपास ६०% गोष्टी आपण चीन कडून आणतो. भारतातील सगळ्यात मोठ्या ५ मोबाईल ब्रँड्स पैकी ४ कंपन्या ह्या चीन च्या आहेत. भारतातील २ बिलियन अमेरीकन डॉलर इतक्या खेळणाच्या बाजारातला ९०% हिस्सा चीन चा आहे. तुम्ही, आम्ही वापरत असलेल्या प्रत्येक लॅपटॉप, मोबाईल, टी.व्ही. आणि कार मधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मेड इन चायना भाग आहे. भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात चिनी कंपन्या किंवा चीन मधून येणारा कच्चा माल वापरला जातो. औषधापासून ते सायकल पर्यंत भारताची सगळीच औद्योगिक दारोमदार चीनवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे. हे कटू वास्तव आपल्याला स्विकारायला हवं. त्यामुळेच चीन वर व्यापारी निर्बंध टाकून आपण आपलचं नुकसान जास्ती प्रमाणात करू निदान सद्य परिस्थितीयामध्ये. भावनिक न होता आपला रोष दाखवण्याचा काहीच मार्ग नाही का? तर मार्ग आहे पण तो झटपट परीणाम दाखवेल असा नाही. सोनम वांगचुक ह्यांचा व्हिडीओ जर निट बघितला तर त्यांनी संपूर्ण आराखडा त्यामध्ये सांगितला आहे.

भारताला जर भारत- चीन व्यापारातली आयात- निर्यात तूट जर कमी करायची असेल तर आपल्याला आपल्या औद्योगिक क्षेत्रात अंगभूत बदल करावे लागणार आहेत. आज चीन ज्या गोष्टी निर्माण करतो त्या आपल्याला भारतात त्याच किमतीत आणि त्याच गुणवत्तेच्या बनवाव्या लागतील. ती गुणवत्ता आणि ते कमी किमतीत बनवण्याचं कौशल्य आपल्याला शिकावं लागेल. त्यासाठी भारताला रीसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात खूप काम करावं लागेल. जर चीन कडून माल कोणी घेऊ नये अशी इच्छा आपली असेल तर तसा माल भारतात तयार करणारी साखळी उभारावी लागेल. भारत एक लोकशाही राष्ट्र आहे त्यामुळे कामगार प्रश्न, कामाचे तास आणि मनुष्यबळ ह्या सर्व बाबतीत आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. भारतात येणारी परदेशी गुंतवणूक ही चीन मध्ये होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीच्या फक्त २५% तर अमेरीकेत होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीच्या १०% आहे. म्हणजे अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

भारतात चीन ने २०१९ मध्ये  जवळपास ६०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक तर स्टार्ट अप कंपन्यांन मध्ये जवळपास २९,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतातील ३० मोठ्या स्टार्ट अप पैकी १८ स्टार्ट अप मध्ये चीनच्या लोकांची आणि कंपन्यांची गुंतवणूक आहे. ह्या १८ कंपन्या भारतातील बलाढ्य अश्या आहेत. जर उद्या आपण बहिष्कार केला आणि चीन ने आणि चीन च्या लोकांनी ही गुंतवणूक काढली तर जवळपास काही लाख भारतीय लोकांचे रोजगार जातील. आपलं सरकार आणि आपण भारतीय म्हणून अश्या गोष्टींना तयार आहोत का? फेसबुक आणि व्हाट्स अप वर गणित करून चीन वर बहिष्कार टाकता येणार नाही. चीन च्या बहिष्कारानंतर निर्माण होणाऱ्या सर्व अडचणींना सामोरी जाणारी पर्यायी व्यवस्था बनवल्या शिवाय हे शक्य नाही. मी कोणी चीन चा चाहता नाही. पण चीन च अस्तित्व आज आपल्यासाठी नकळत का होईना आपल्या आयुष्याचा अंगभूत भाग झालं आहे. ते दूर करायचं असेल तर स्वप्नरंजन न करता डोळसपणे पावलं टाकावी लागतील.

भारत आत्मनिर्भर व्हावा अशी सगळीच भारतीयांची इच्छा आहे. चीन ची मक्तेदारी संपुष्टात यावी आणि चीन च्या अरेरावी ला लगाम बसावा असंही सगळ्यांना वाटते पण फेसबुक आणि व्हाट्सवर चीन चा बहिष्कार करून आपण ह्यापैकी काहीच करू शकणार नाही आहोत. मोबाईल फोन मधली चीन ची एप्लिकेशन डिलीट केली म्हणजे चीन च्या अर्थव्यवस्थेला खिंडार पाडलं असं होतं नाही. ह्यापेक्षा आपल्या मध्ये असणाऱ्या कमतरतांवर मात कशी करता येईल? आपल्या मालाचा दर्जा कमी किंमतीत कसा उंचावता येईल ह्यावर संशोधन आणि काम व्हायला हवं, आपलं उत्पादन जागतिक स्पर्धेत तोडीस तोड बनवता यायला हवं. आपण आत्मनिर्धार तेव्हाच बनू  जेव्हा आपण चीन च्या मालाला एक सशक्त पर्याय निर्माण करू. जोवर ते होतं नाही तोवर चीन वर बहिष्कार वगरे टाकून काहीच साध्य होणार नाही. भावनिक न बनता जर योग्य पावलं टाकली तर आपण चीन वर बहिष्कार तर नाही तर चीनला एक सशक्त पर्याय म्हणून नक्कीच पुढे येऊ.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Saturday 13 June 2020

ब्रिटिशांना त्यांच्या मातीत हरवणारे बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर)... विनीत वर्तक ©

ब्रिटिशांना त्यांच्या मातीत हरवणारे बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर)... विनीत वर्तक ©

१२ ऑगस्ट १९४८ चा दिवस होता. ब्रिटिशांच्या १५० वर्षाच्या गुलामगिरीतुन मुक्त झालेल्या भारताला आपला पहिला स्वातंत्र्य दिवस अजुन साजरा करायचा होता. एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताला दारिद्र्याच्या खाईत लोटून आणि विभाजन करून ब्रिटिश निघून गेले होते. भारत अजून त्यातून सावरत होता. अनेक  स्वातंत्र्य विरांच्या बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. ब्रिटिश साम्रज्या विरुद्ध असलेला असंतोष अजुन सर्व भारतीयांच्या मनात खदखदत होता.  ब्रिटिशांच्या अपमानाचा आणि त्यांच्या अन्यायाचा बदला घेण्याची नामी संधी भारताला ह्या दिवशी चालून आली होती. भारतापासून सातासमुद्रापार ब्रिटिशांच्या घरात, वेम्बली मैदानावर, ब्रिटिशांची राणी एलिझाबेथ च्या समोर ऑलम्पिक च्या महापर्वात ११ वीर उतरले होते. ह्यात २५ वर्षाचा एक तरुण आपली पहिली ऑलम्पिक स्पर्धा खेळत होता. त्याच्या समोर एकच ध्येय होतं ते म्हणजे भारताचा तिरंगा ब्रिटिशांच्या घरात सन्मानाने फडकवायचा.

ऑलम्पिक स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला. पुर्ण स्टेडियम मध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच भारतीय होते. संपुर्ण स्टेडियम ब्रिटिश लोकांनी भरलेलं होतं. ब्रिटिशांची राणी (त्याकाळी राजकन्या असणाऱ्या) एलिझाबेथ आवर्जून उपस्थित होत्या. सगळीकडे ब्रिटिश संघाला प्रोत्साहन असताना त्या आवाजाच्या गर्दीत ते ११ मावळे आपल्या हॉकी स्टिक घेऊन मैदानात लढत होते. त्या २५ वर्षाच्या तरुणाने ब्रिटिशांच्या संघावर आक्रमण केले. आपल्या सुरेख खेळाने त्याने एकट्याने अर्ध्या वेळेपर्यंत ब्रिटिशांच्या विरुद्ध दोन गोल नोंदवले आणि सामन्याचा नुरच पालटला. एका वेळी ब्रिटिश संघाचा जयजयकार वेम्बली मध्ये होतं होता आता त्यातून 'भारत माता की जय' चे नारे दुमदुमयला लागले. सामना संपेपर्यंत भारतीयांनी ब्रिटिशांची त्यांच्या घरात नाचक्की करताना ४-० अश्या फरकाने दणदणीत पराभव केला. ऑलम्पिक च्या इतिहासात भारताने पुन्हा एकदा हॉकीच्या लागोपाठ चौथ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातलं हे पहिलं सुवर्ण पदक होते. भारताच्या विजयात शिल्पकार ठरलेला तो २५ वर्षाचा तरुण होता बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर).

हॉकी च्या स्पर्धेत भारताने ह्या आधीही ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवलेलं होतं पण हा विजय वेगळा होता. ब्रिटिश राणीच्या समोर ब्रिटिशांच्या घरात वेम्बली च्या मधोमध उभं राहून सगळ्या राष्ट्रध्वजाच्या वरती सन्मानाने तिरंगा फडकवताना बघतानाचा क्षण संपूर्ण भारतीयांनसाठी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासारखा होता. त्यामुळेच ह्या विजयाने बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) हे नाव भारताच्या हॉकीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं ते कायमचं. १९५२ च्या हेलसिंकी इथल्या ऑलम्पिक मध्ये ब्रिटिश संघाविरुद्ध असलेल्या उपांत्य सामन्यात बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) ह्यांनी एकट्यांनी ३ गोल करताना भारताला एक हाती हा सामना जिंकून दिला. तर नेदरलँड विरुद्ध च्या अंतिम सामन्यात एकट्यांनी तब्बल ५ गोल करताना भारताने नेदरलँड्स चा ६-१ असा दणदणीत पराभव करून पुन्हा एकदा हॉकी च्या सुवर्ण पदकावर आपलं नावं कोरलं. बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) ह्यांचा झंझावात इतका होता की ऑलम्पिक च्या स्पर्धेत भारताने त्या वर्षी नोंदवलेल्या १३ गोल पैकी ९ गोल (जवळपास ७०% गोल) त्यांनी केले होते. ऑलम्पिक हॉकी च्या अंतिम सामन्यात एकट्याने ५ गोल करण्याचा विश्वविक्रम त्यांनी नोंदवला जो आजतागायत कोणालाही मोडता आलेला नाही.

१९५६ च्या मेलबॉर्न ऑलम्पिक मध्ये आपला झंझावात कायम ठेवताना पहिल्या मॅच मध्ये त्यांनी अफगाणिस्थान विरुद्ध ५ गोल गेले. त्या सामन्यात जखमी झाल्याने त्यांना पुढच्या काही सामन्यांसाठी जायबंदी व्हावे लागले. पण पुन्हा एकदा उपांत्य आणि अंतिम सामन्यात त्यांनी उतरताना पाकिस्तान ला अंतिम सामन्यात धूळ चारून पुन्हा एकदा हॉकी च्या सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरण्यात मोलाचा वाटा उचलला. आपल्या हॉकी च्या संपूर्ण करिअर मध्ये त्यांनी ८ ऑलम्पिक मध्ये भाग घेऊन २२ गोल भारतासाठी नोंदवले. त्यांच्या हॉकी च्या योगदानाची दखल भारत सरकारने घेताना त्यांना १९५७ साली पद्मश्री सन्मान दिला. खेळासाठी हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय खेळाडू आणि हॉकीपटू ठरले. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर ही त्यांनी भारतीय हॉकी संघाची प्रशिक्षकाची धुरा सांभाळली. १९७५ ला पाकिस्तान ला धूळ चारत भारताने हॉकीचा वर्ल्ड कप चषक जिंकला त्यात सुद्धा बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) ह्यांचा प्रशिक्षक म्हणून सिंहाचा वाटा होता.

भारताच नाव आपल्या अप्रतिम खेळाने जगभर नेणारे बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) हे २५ मे २०२० ला वयाच्या ९६ व्या वर्षी अनंतात विलीन झाले आणि हॉकी च्या एका तपाचा अस्त झाला. क्रिकेट च्या नादात भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी मागे पडत गेला आणि भारताला सुवर्ण क्षण देणारे बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) सारखे खेळाडू भारतीयांच्या विस्मरणात गेले. हॉकी ह्या खेळात भारताने जगावर जे अधिराज्य गाजवलं तितकं अधिराज्य भारताला क्रिकेट ह्या सर्वमान्य खेळात ही जमलेलं नाही. क्रिकेट मध्ये पैसा आल्याने त्याच आता जुगारात रूपांतर झालं. खेळणारा झटपट पैसे कमवू लागला आणि देशभक्ती फक्त नावासाठी उरली. पण हॉकी मात्र आजही भारताचा राष्ट्रीय खेळ आहे कारण त्यातून फक्त आणि फक्त देशभक्ती दिसते. एखाद्या रणजी खेळणाऱ्या क्रिकेटरचे विक्रम लक्षात ठेवणाऱ्या भारतीयांना भारताच्या राष्ट्रीय हॉकी टीम मधल्या ११ पैकी २ जणांची जरी नाव सांगता आली तरी ते खूप मोठं असेल. आज हॉकीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि त्याच सोबत खेळाचा दर्जा ही चांगल्या खेळाडू नसल्याने घसरत गेला. पण अजून वेळ गेलेली नाही. क्रिकेट इतकचं महत्व आपण हॉकीला आज दिलं तर कदाचित हॉकी चा सुवर्ण काळ पुन्हा अवतरेल. माझ्या मते बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) ह्यांना ती भारतीयांकडून सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल. हॉकी ह्या खेळातील सेंटर फॉरवर्ड ह्या जागेवरील सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या खेळाडूला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली.

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Wednesday 10 June 2020

स्वरांना निरागस चेहरा देणारी मंजेश्वर भावंड... विनीत वर्तक ©

स्वरांना निरागस चेहरा देणारी मंजेश्वर भावंड... विनीत वर्तक ©

कोरोनामुळे गेले कित्येक महीने पूर्ण जगभर सगळेच आपापल्या घरात अडकून पडले आहेत. अश्या लॉकडाऊन ची सवय पूर्ण जगात कोणालाच नव्हती. घड्याळाच्या काटयावर धावणाऱ्या जगाला अचानक लागला. आधी ह्या लॉकडाऊन मुळे सगळेच आनंदी झाले पण हा आनंद क्षणभर ठरला. लॉकडाऊन ची ही वेळ प्रत्येकाने आपल्या परीने सुखद करण्याचा प्रयत्न केला. असाच एक प्रयत्न मेलबॉर्न,ऑस्ट्रेलिया इकडे राहणाऱ्या मंजेश्वर कुटुंबाने केला. अमेय आणि सपना मंजेश्वर ह्यांच्या दोन मुलांनी मराठी, हिंदी गाण्यांची सुरेली बरसात केली. अवघ्या काही दिवसात ह्या भावंडांच्या जादूने इंटरनेटवर एक वादळ आलं. त्यांच्या आवाजाने लॉकडाऊन चा काळ अनेकांसाठी सुसह्य झाला.

अर्जुन मंजेश्वर वय वर्ष ८ आणि अर्णव मंजेश्वर वय वर्ष ४ अश्या ह्या दोन भावंडांची नावं असून फारसं मराठी, हिंदी येत नसताना सुद्धा आपल्या लाडिक आवाजाने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. अर्जुन नुकतेच संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतो आहे. तर अर्णव आपल्या भावासोबत शब्द गुणगुणतो. पण ह्या भावंडांचं वेगळेपण म्हणजे त्या दोघांची निरागसता. जेव्हा पहिल्यांदा मी ह्या दोघांचं गाणं ऐकलं तेव्हा त्या गाण्यापेक्षा ह्या दोघांचे हावभाव मी जास्ती अनुभवले. सुरांच्या तालावर अर्जुन आणि अर्णव ह्या दोघांचं डोलणं आणि अर्णव च्या मुखातून वयाच्या चौथ्या वर्षी निघणारे ते लाडिक शब्द त्या सुरांपेक्षा आपल्या आत खोलवर जातात. आजवर गाणी गाणारे आणि सुरांचा वरदहस्त लाभलेले अनेक गायक आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवले असतील. पण अर्जुन आणि अर्णव ची गोडी त्यांच्या निरागसतेत आहे.

मराठी असो वा हिंदी दोन्ही भाषेच्या शब्दांवर वयाच्या मानाने शब्दांवर असलेली पकड ह्या दोघांचीही खूप सुंदर आहे. गाताना डोलणाऱ्या माना आणि निरागस हास्याची चेहऱ्यावर उमटणारी लकेर आपल्या मनाचा लगेच ठाव घेते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात विरंगुळा म्हणून आपल्या मुलांच संगीत अमेय मंजेश्वर ह्यांनी रेकॉर्ड केलं. सोशल मिडियावर हे व्हिडीओ आल्यावर अल्पावधित ह्या दोन्ही भावंडांच्या आवाजाने सगळ्यांवर गरुड केलं आणि मंजेश्वर भावंड इंटरनेट च्या दुनियेत प्रसिद्ध झाली. ह्या लोकप्रियतेचा जोर इतका होता की यु ट्यूब वर ह्या दोन भावंडांचे चॅनेल सुरु करावं लागलं. अवघ्या एका महिन्याच्या काळात  ह्या चॅनेल ला ४९,५०० लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. अनेकांसाठी कठीण वाटणारी गाणी ही ह्या भावंडांनी ज्या पद्धतीने पेलली आहेत त्याला तोड नाही. अनेक मान्यवरांची सुद्धा त्यांच्या गाण्याला दाद मिळाली आहे.

मला तरी संगीत सुरांपेक्षा त्यांच्या निरागस चेहऱ्याने आणि त्यांच्या हावभावाने वेड लावलं आहे. गाणं सादर करताना ज्या रसिकतेने ते गाण्यांचा आस्वाद घेतात हे बघणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. 'ससा हो ससा कापूस जसा' 'हाल कैसा हैं जनाब का?' म्हणणारे ते जेव्हा 'आकाशी झेप घे रे पाखरा' हे गाणं गातात तेव्हा संगीत कोळून प्यायलेल्या एखाद्या कलावंताला आपण ऐकतो आहोत का असा भास ही होतो आणि त्याचवेळी त्यांची सहजता आपल्याला निशब्द करून जाते. एवढ्या कोवळ्या वयात दोन्ही भावंडांची सहजता आणि निरागसता मनाला स्पर्शून जाते. त्यामुळेच मंजेश्वर भावंड आज सर्वांच्या मनावर राज्य करत आहेत. ह्या दोन्ही चिमुकल्यांच्या पुढल्या वाटचाली ला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजून छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळतील अशी आशा आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Monday 8 June 2020

गुरु शिष्याचं नात... विनीत वर्तक ©

गुरु शिष्याचं नात... विनीत वर्तक ©

दोन दिवसापूर्वी माझ्या मेल बॉक्स मध्ये एक अपरीचित मेल धडकला. मेल उघडून आत वाचलं तर तिथल्या तिथे थबकलो. मेल आला होता आजच्या विनीत वर्तक ला ज्यांनी पहिल्यांदा ओळखलं आणि घडवण्यात मोलाची भुमिका बजावली त्या माझ्या आशा ताईचा. प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणतातरी क्षण असतो अथवा अशी कोणतीतरी व्यक्ती जी प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देते. एकेकाळी आयुष्याच्या स्पर्धेत चाचपडणाऱ्या मला आकार देण्यात आशाताई चा वाटा सिंहाचा होता. काठावर जेमतेम पास होणारा विनीत ते मुंगीच अक्षर काढणारा विनीत ह्या मधून मला स्वतःची ओळख आशाताई मधल्या शिक्षिकेने करून दिली. आज ह्या घटनेला २६ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. जगाच्या स्पर्धेत शहर बदलली आणि आमचा संपर्क ही तुटला. दोन दिवसापूर्वी आलेल्या मेलमुळे पुन्हा एकदा तो सगळा काळ डोळ्यासमोरून सरकला. लगेच आशाताई च्या मेल ला मी उत्तर दिलं आणि बोलण्यासाठी माझा नंबर ही दिला.

त्यानंतर आशाताई आणि मी तब्बल तासभर गप्पा केल्या. माझा मेल आय डी कसा शोधला ते तिच्या बकेट लिस्ट मधलं माझं स्थान अश्या सगळ्या गोष्टी ऐकून डोळ्यांच्या कड्या कधी ओल्या झाल्या कळल्या नाहीत. गोष्ट सुरु झाली ती आजच्या विनीत वर्तक ला शोधण्यापासून. तिच्या व्हाट्स अप वर माझ्या नावाने झळकणारे लेख वाचून तिला कुतूहल होतं की नक्की तोच विनीत का?. आजही अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्यात व्यस्त असलेली आशा ताई फेसबुक वर नाही. काळाच्या ओघात बदललेल्या नंबरांमुळे संपर्क करण्याचा कोणताच रस्ता दिसत नव्हता. गुगल मदतीला धावून आलं आणि माझा मेल आय डी शोधून एक मेल माझ्या इनबॉक्स मध्ये आल्यावर आमचा संपर्क पुन्हा शक्य झाला. माझ्याशी बोलण्यासाठी पूर्ण गुगल तिने धुडाळलं होतं. माझा आलेला रीप्लाय बघून तिची 'बकेट लिस्ट' मधील एक इच्छा पुर्ण झाल्याचं समाधान तिला मिळालं असल्याचं तिने मला दिलेल्या उत्तरात म्हंटल. आपण कोणाच्या तरी 'बकेट लिस्ट' चा भाग असू शकतो हा विचारच मला निशब्द करून गेला. त्यातही ज्या शिक्षिकेने मला घडवलं त्यांना माझ्याशी संवाद साधण्याचा क्षण परमोच्च आनंदाचा असावा हा अनुभव अविस्मरणीय असा होता.

'तु आजही तितकाच जमिनीवर आहेस आणि तसाच आहेस'. हे तिचे शब्द माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस होतं. मला जे लोकं खूप आधीपासून ओळखतात आणि ज्यांनी माझा प्रवास बघितला आहे. अश्या लोकांपैकी एक म्हणजे आशा ताई. माझ्या लिखाणाची चाहती असल्याचं तिने आवर्जून सांगितलं. बि.ए.आर.सी. मध्ये नोकरीला लागल्यावर तिला खास पुण्याला जाऊन भेटून आलो होतो. त्या भेटीची आठवण तिने आवर्जून आज जवळपास १४-१५ वर्षानंतर लक्षात असल्याचं सांगितलं. ह्या शिवाय माझ्यासाठी एक मोठं सरप्राईज होतं की त्या भेटीची आठवण म्हणून आपल्या स्व कमाईतलं घड्याळ मी तिला दिलं होतं. कोणाकडून कधीच कोणती भेट न स्विकारणाऱ्या आशा ताई ने फक्त माझ्या हट्टापाई ते स्विकारलं होतं त्यातही ते माझ्या स्व कमाई चं होतं म्हणून. आज जवळपास १५ वर्षानंतर ही ७-८ घड्याळ असताना शिकवताना, नव्या पिढीचे विद्यार्थी घडवताना प्रत्येकवेळी तेच घड्याळ आजही माझ्या मनगटावरून वेळ दाखवत असल्याचं तिने मला सांगितलं आणि माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. मी ते घड्याळ विसरून पण गेलो होतो. त्या घड्याळाचा पट्टा तुटला, बॅटरी गेली पण ते सगळं बदलून आजही शिकवताना ते घड्याळ तुझी आठवण करून देतं हे सांगितल्यावर मी निशब्द झालो. पुण्याला आल्यावर घरी येण्याचं आग्रहाचं निमंत्रण तर दिलच पण माझ्या लेखनासाठी माझं खूप कौतुक केलं आणि आशीर्वाद ही दिले. ह्या शिवाय ह्या पुढले प्रत्येक लेख मला आवर्जून पाठव हे सांगण्यास ही ती विसरली नाही.   
     
आयुष्यात येणारे असे अनुभव हेच तर समाधान. लिखाण प्रत्येकाला काय देतं हे ज्याचं त्याने शोधायचं. फेसबुक चे आभासी लाईक, समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा का पैसे. माझ्यासाठी मात्र वाचकांच प्रेम आणि मला येणारे असे अनुभव हे माझं समाधान. आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांकडून मिळणाऱ्या अश्या शब्दातून जे आत्मिक समाधान मिळते त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. गुरु शिष्याचं नातं हे जगातील एक सुंदर नातं असते. जेव्हा आपल्याला घडवणारा शिक्षक समाधानाने आपली प्रगती बघतो आणि आपल्या प्रगतीच मूल्यमापन करतो तेव्हा त्यातून मिळणारं समाधान, प्रेम हे शब्दांपलीकडचं असते. मला घडवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या आणि आजही मला आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या आशा ताईला माझा साष्टांग नमस्कार. आपलं गुरु शिष्याचं हे नातं नेहमीच मला आयुष्यात पुढे देण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन देत राहील. 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

Sunday 7 June 2020

बुद्धिबळाच्या पटलावर... विनीत वर्तक ©

बुद्धिबळाच्या पटलावर... विनीत वर्तक ©

२०२० हे साल उजाडायच्या आगोदर बुद्धिबळाच्या जागतिक पटलावर सर्वकाही सुरळीत सुरु होतं. राजा, वजीर, घोडे, उंट आणि प्यादी आपल्या परीने पुढे जात होती. पण कोरोना नावाचं एक वादळ जागतिक पटलावर आलं आणि बुद्धिबळाच्या पटलावरच्या सगळ्यांच्या चाली बदलल्या. कोरोना च्या उद्रेकात भली भली राष्ट्र बळी पडायला सुरवात झाली. ज्यांना आपल्या वैद्यकीय सेवा आणि संस्कृतीचा गर्व होता ते ज्यांच्याकडे नावाला वैद्यकीय सेवा होत्या असे सगळेच ह्या त्सुनामी मध्ये वाहून गेले. ह्या सगळ्याचं रोष जिकडून ह्याची सुरवात झाली आणि ज्या देशाने ह्याच आकलन जगाशी शेअर केलं नाही त्या चीन वर् ओढवला. अमेरीका च्या नेतृत्वाखाली आता बुद्धिबळाच्या पटला वरच्या चाली आता पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. कोरोना आधीच जग आणि त्यातील मित्र राष्ट्र, आपापसातील हेवेदावे तसेच  व्यापार रचना, सैनिकी मदत आणि कोरोना नंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये कमालीचा बदल होताना दिसत आहे. ह्या सगळ्याचा परीणाम भारतावर आणि किंबहुना प्रत्येक भारतीयांवर होणार आहे. भारताला आपली प्रत्येक चाल ही खूप विचार करून चालावी लागणार आहे.

कोरोना च्या त्सुनामी मध्ये सध्यातरी सगळ्यात जास्ती नुकसान झालेला देश अमेरीका आहे. आपल्या देशासाठी आणि देशवासियांसाठी नेहमीच सजग आणि युद्ध लढणाऱ्या अमेरीकेला आपल्या अपयशाच खापर कोणावर फोडायचं ह्याची चिंता लागली आहे. कारण अवघ्या काही महिन्यांच्या काळात अमेरीका आणि प्रत्येक अमेरीकन नागरीक ह्या झंझावातात ह्या न त्या कारणाने उध्वस्थ झाला आहे. जगातील अमेरीका नंतर युरोपिअन युनियन, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, दक्षिण अमेरीका, आफ्रिका, भारत, रशिया ह्या जवळपास सगळ्याच भलाढ्य राष्ट्रांचे कंबरडे कोरोनाने मोडले आहे. ह्या सगळ्या मागे चीन ची भुमिका ही संशयास्पद राहिली आहे. एकतर कोरोना चा उगम आणि त्याची लागण झालेल्यांची संख्या त्यानंतर जगभर कोरोना संक्रमणाचे आकडे वाढत असताना चीन चा रुग्णांचा स्थिरावलेला आकडा. ह्या दोन्ही गोष्टींमुळे कोरोना बाबत चीन च्या भूमिकेवर अनेक मत प्रवाह समोर येत आहेत. चीन च्या वाढत्या महत्वकांक्षेला थोपवण्यासाठी, जागतिक बाजारात, व्यापारात चीन च्या वर्चस्वाला शह देण्यासाठी हिच योग्य वेळ असल्याचं अमेरीका आणि इतर राष्ट्रांना वाटत आहे.

चीन च्या विरुद्ध निर्माण झालेलं जनमत, चीन च्या संदिग्ध भुमिकेवर नाराज असणारी राष्ट्र आणि आपल्या अपयशाला झाकण्यासाठी, आपलं वर्चस्वाला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अनेक नवीन आकडेमोड बुद्धिबळाच्या पटलावर होताना दिसत आहे. पारंपारीक आपले मित्र सोडून भारतासारख्या नेहमीच तटस्थ राहिलेल्या देशाला आणि चीन च्या वर्चस्वाला जशास तसं उत्तर देण्याची ताकद असणाऱ्या देशाला आपल्या बाजूला ठेवणं ही काळाची गरज आहे. चीन स्वतः आपल्या लोकांच्या उद्रेकाला थोपवत आहे. कोरोनामुळे चीन मध्ये उद्योगधंदे आणि कारखान्यांची अवस्था वाईट आहे. चीनमध्ये सरकारविरोधी जनमत निर्माण होते आहे. अश्यावेळी लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चीन सरहद्दीवर मुद्दामून वाद निर्माण करत आहे. पण ह्या वेळेला गोष्टी वेगळ्या आहेत. भारताच्या सरहद्दीवर आपली लष्करी ताकद दाखवून भारताला गप्प करणं तितकंसं सोप्प राहिलेलं नाही. भारताची वाढलेली लष्करी ताकद, कणखर राजकीय नेतृत्व ह्याशिवाय भारताच्या बाजूने सध्या उभे असलेले देश ही चीन ची डोकेदुखी आहे. भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरीका चीन ला लक्ष्य करायला टपली आहे. लडाख सिमारेषेवर अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षाचं वक्तव्य हे असच आलेलं नाही. दक्षिण चीन सागरात चीन चं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अमेरीकेने आपलं नौदल तयार ठेवलं आहे. जर लडाख मध्ये वातावरण तापलं तर भारताची बाजू घेत दक्षिण चीन सागरात सैनिकी कारवाई करण्यासाठी अमेरीका टपली आहे.

चीन ची अडचण अजून मोठी होते आहे की अमेरीका सोबत इस्राईल, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन ह्यांच्यासह साऊथ चायना सी मधील अनेक छोटी मोठी राष्ट्र ही चीन च्या विरुद्ध उभी आहेत. चीन एकट्या भारताला अथवा एकट्या अमेरीकेला पुरा पडू शकतो. पण एकाच वेळी पूर्ण जगाच्या विरुद्ध आघाडी उघडणं चीन ला शक्य नाही. खरतर भारत आणि अमेरीका ह्या दोन राष्ट्रांन विरुद्ध एकाचवेळी आघाडी उघडणं चीन ला परवडणार नाही हे तो पक्का जाणून आहे. इकडे भारताची अवस्था खरे तर धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी आहे. आज आपल्यासोबत असणारी अमेरीका आपला फायदा झाल्यावर कधी बदलेलं हे सांगता येतं नाही. त्याचवेळी चीन विरोधी भुमिका भारताला प्रत्यक्षात परवडणारी नाही. भारतातल्या लोकांना कितीही वाटलं तरी चीन सोबत आपला व्यवहार थांबवणं हे फेसबुक वर चीन ला शिव्या देणं इतकं सोप्प नाही. भारताला आपली भुमिका आणि आपली पावलं जपुन टाकावी लागणार आहेत. चीन ला मात द्यायला चीन विरोधी राष्ट्रांची मदत तर घ्यायची पण उघडपणे त्या ग्रुप चा सदस्य न होणं ही सगळ्यात शहाणपणाची भुमिका असेल.

Inter-Parliamentary Alliance on China नावाचा एक ग्रुप नुकताच जागतिक पटलावर तयार झाला आहे. सगळ्या आघाड्यांवर चीन ला शह देण्यासाठी जगातील ८ आर्थिक महासत्ता असणारे देश ह्या निमित्ताने एकत्र आले असून चीन विरुद्ध आघाडी उघडली आहे. पाच बाजूने चीन ला कोडींत पकडण्यासाठी जग एकत्र पावलं टाकते आहे. १) कोरोना चा उगम आणि चीन ची भुमिका. २) चीन च्या प्रश्नात जगाची उडी जसे तैवान चा प्रश्न ३) आर्थिक नाकेबंदी अमेरीका आणि जपान ने आपल्या उद्योगधंद्यांना चीन मधून हलवण्यास सुरवात केली आहे ४) मानवी हक्कावर चीन च्या विरुद्ध उडी ५) चिनी तंत्रज्ञानावर बहिष्कार.  अश्या पाचही बाजूने चीन ला कात्रीत पकडण्याचे प्रयत्न जागतिक बुद्धिबळाच्या पटलावर सुरु झाले आहेत. ह्या सगळ्याच भूमिकेत भारताची भुमिका ही वजिराची राहणार आहे. वजीर ज्याच्या बाजूने त्याच्या बाजूने खेळाचं पारडं झुकणार हे सर्वश्रुत आहे. पण ह्या सगळ्या खेळात वजिराचा बळी जाण्याची ही शक्यता आहे.  वजीर गेला तरी चालेल पण राजा जिंकायला हवा ही भुमिका अमेरीकेची राहणार आहे. पण हाच वजीर जर व्यवस्थित हाताळला तर राजा हा बुद्धिबळाच्या पटलावर नावासाठी असतो हे कोणीही सांगेल.

भारताची भुमिका ही त्या वजिरासारखी निर्णायक असणार आहे. आता हे बघणं रंजक असणार आहे की भारत ह्या सगळ्यात कशी पावलं टाकतो. कारण भारताने योग्य वेळी शह कटशह दिला तर ह्या वजिराकडे जागतिक सत्तेच्या चाव्या आपसूक येतील अशी परीस्थिती आहे. फक्त समोरच्याच्या दोन पावलांपुढे विचार करून आपली चाल भारताला खेळावी लागणार आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Friday 5 June 2020

एका मैथिली ची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका मैथिली ची गोष्ट... विनीत वर्तक ©

आकाशवाणीने एका शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिकेला पुढल्या ९९ वर्षासाठी करारबद्ध केलं आहे. पुढल्या ९९ वर्षात जे काही गायन ती गायिका करेल ते आकाशवाणी वरून पुढल्या ९९ वर्ष प्रसारीत करण्याचे हक्क आकाशवाणीने घेतले आहेत. इतक्या वर्षाचा करार करणाऱ्या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिकेची प्रतिभा किती मोठी असायला हवी ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी हा सन्मान कोणत्याच शास्त्रीय गायकाला अथवा गायिकेला मिळालेला नव्हता. दिल्ली च्या मैथिली ठाकूर ने मात्र आपल्या प्रतिभेने हा सन्मान मिळवला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी एक, दोन नाही तर तब्बल ५०० पेक्षा जास्त लाईव्ह शो करण्याचा अनुभव ही तिच्या गाठीशी आहे. २५ जुलै २००० साली बिहार च्या मधुबनी  इकडे जन्म झालेल्या मैथिली चा प्रवास थक्क करणारा तर आहेच पण आपल्या स्वतःवर विश्वास, मेहनत घेण्याची तयारी, तंत्रज्ञानाची ताकद ओळखून टाकलेली पावलं ह्यामुळे आयुष्य कसं बदलू शकते हे दाखवणारा आहे.

एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या मैथिलीचा प्रवास स्वप्नांतून सुरु झाला. आयुष्याचे चटके खात असताना वयाच्या ४ थ्या वर्षी आपल्या आजोबांकडून तिने संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. वडील एक संगीत शिक्षक. हाताशी येणारे तुटपुंजे पैसे आणि त्यावर पोट भरणारी ५ माणसे. आपल्या तीन भावंडांसोबत एका सर्वसाधारण शाळेतून पुढे शिक्षण घेताना समाजाच्या नजरांना जश्यास तसं उत्तर देण्याचा चंग तिने लहानपणीच बांधला होता. मोठं होऊन आय.आर.एस. बनण्याचं स्वप्न घेऊन तिने अभ्यासात लक्ष दिलं. प्रत्येक वर्षी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत तिने आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला. पण तिच्या आतला आवाज मात्र तिला स्वस्थ बसून देतं नव्हता.

सुरांचा वरदहस्त लाभलेल्या मैथिलीने आपल्या सुरांसोबत नशिबाला कलाटणी देण्याचं ठरवलं. इंडियन आयडॉल, सा रे ग म सारख्या रिऍलिटी शो मध्ये आपलं नशीब आजमावल्यावर कुठेतरी निराशाच हाताशी लागत होती. पहिल्या २० स्पर्धकात जाऊन पुन्हा माघारी फिरावं लागत होतं. तरीही हार न मानता तिने रायझिंग स्टार ह्या रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला. ह्यात तिचा पहिला नंबर अवघ्या दोन मतांनी गेला. ह्यात पक्षपात झाल्याचा आरोप करत सुजित सरकार ने मुलांचे रिऍलिटी शो बंद करण्यात यावेत अशी मागणीही केली होती. ह्या शो मध्ये जरी ती हरली असली तरी लोकांच्या नजरेत तिचं नाव आलं होतं. पुन्हा एकदा अपयशाला बाजूला ठेवतं स्वतःच काहीतरी सुरु करण्याचा सल्ला तिच्या वडीलांनी तिला दिला. त्यानंतर सुरु झाला मैथिलीचा सोशल मिडिया चा प्रवास.

फेसबुक वर आपल्या गाण्याचे व्हिडीओ तिने आपल्या भावंडांसोबत शेअर करायला सुरवात केली. आपल्या मोबाईल च्या सेल्फी कॅमेराने आपल्याच घरात तिने आपल्या आवाजाला इंटरनेट आणि सोशल मिडिया च्या आभासी जगाशी जोडलं. अवघ्या काही दिवसात तिच्या आवाजाने सोशल मिडियावर एक वादळ आलं. त्यानंतर तिने आपला मोर्चा यु ट्यूब वर वळवला. एका पाठोपाठ एक हिंदी, इंग्रजी गाण्यांचे तिचे व्हिडीओ कमालीचे लोकप्रिय झाले. पुन्हा एकदा तिच्या वडिलांनी तिच्या आजोबांनी शिकवलेल्या शास्त्रीय संगीताकडे लक्ष देण्याचं तिला सांगितलं. ह्याच शास्त्रीय संगीताने तिला रातोरात यु ट्यूब आणि जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध केलं. आजच्या घडीला यु ट्यूब वरील तिच्या चॅनेल ला  १.७८ मिलियन (१७.८ लाख ) लोक सबस्क्राईब आहेत.

मैथिली ठाकूर आणि तिच्या भावंडांचा प्रवास कोणालाही प्रेरणा देईल असाच आहे. असं म्हणतात,

'"कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती हैं... 

आज मैथिली ठाकूर चा प्रवास बघून ह्या ओळीची मनोमन आठवण होते. कारण सगळ्या प्रतिकूल परिस्थिती मध्ये तिने आपला संघर्ष सुरु ठेवला आणि आज परिस्थिती अशी आहे की तिच्या आवाजाला पुढल्या ९९ वर्षासाठी करारबद्ध केलं गेलं आहे. तिच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Monday 1 June 2020

सहानभूती चे अश्रू... विनीत वर्तक ©

सहानभूती चे अश्रू... विनीत वर्तक ©

काल कोणत्यातरी संगीतकाराचे कोरोनामुळे निधन झालं. कोरोना च्या ह्या लढाईत अजून एक निष्पाप जीव गेला. एक दुःखद घटना नक्कीच पण ज्या पद्धतीने कालपासून सहानुभूतीचे अश्रू सगळीकडे बघायला मिळाले ते बघून नक्कीच मनात काही प्रश्न उभे राहिले. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू ही नक्कीच एक दुःखद घटना असते. जेव्हा ती व्यक्ती जनमानसात प्रसिद्ध असते तेव्हा त्या दुःखाचा आवाका मोठा असतो. पण ह्या दुःखाच अवडंबर करण्याचा एक ट्रेंड सोशल मिडीया च्या माध्यमातून सुरु झालेला आहे. गेल्या काही घटनांमधून तो अधिकच ठळकपणे पुढे आला आहे. कालच्या घटनेने पुन्हा त्याचीच पुनुरावृत्ती होते आहे असच मनोमन वाटून गेलं.

मध्यंतरी चित्रपट सृष्टीतील दोन ताऱ्यांचे एका पाठोपाठ एक असं निधन झालं. चित्रपटसृष्टी सोबत सामान्य नागरिक सुद्धा ह्या घटनेने हळहळले. दोन्ही कलाकारांची एक कलाकार आणि एक माणूस म्हणून उंची नक्कीच खूप मोठी होती. त्यामुळेच त्यांची एक्झिट सगळ्यांना चटका लावून गेली. दुःख शब्दातून आणि कृतीतून व्यक्त करणं हे नक्कीच समर्थनीय पण आज काल त्याची जाहिरात केली जाते. फेसबुक किंवा इतर सोशल मिडिया मधील अश्या अनेक पोस्ट आणि ट्विट होते जे वाचून नक्की दुःख झालं आहे की दुःख दाखवण्याचा एक खटाटोप चालू आहे असा प्रश्न मनात आला. कलाकारांची एक्झिट नक्कीच त्यांच्या आठवणी जाग्या करणारी पण त्यांच्या आठवणीने आता जेवणच गोड लागत नाही ते मन कशातच रमत नाही ते सकाळ आणि रात्र त्यांच्याच विचारात गुंतलेले आहोत. त्यांच्या जाण्याने आयुष्य कसं निरस झालं ते आयुष्याचे रंगच संपले वगैरे आशयाच्या अनेक पोस्ट आणि लोकांच्या प्रतिक्रिया वाचून काय व्यक्त व्हावं हे कळत नव्हतं.

त्यांच्या जाण्या आगोदर त्या कलाकारांची तब्येत कशी आहे? त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे? किंवा एकूणच त्यांच्याविषयी एक काडीचीही कल्पना नसणारे आणि त्यांच्या जाण्यामुळे स्वतःच्या आयुष्यात एक काडीचाही फरक न पडणारे असे सहानुभूतीचे अश्रू ढाळत होते की त्यांच्या घरातला आणि कुटुंबातला कोणत्यातरी आपल्या माणसाची एक्झिट झाली आहे. वाईट वाटणं, दुःख वाटणं अगदी योग्य पण त्या दुःखाचं अवडंबर करण? हे कितपत योग्य ह्याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. सहानुभूतीचे अश्रू जगासमोर मांडून त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा मोठी करण्याची रेस सध्या सुरु आहे. कोणीही जनमानसातील प्रसिद्ध व्यक्तीची एक्झिट झाली की हेच लोकं मोठ्या मोठ्या शब्दांनी असं काही लिहतात की वाटावं आता ह्यांच कसं होणार? पण खरच त्याची गरज आहे का? हे अश्रू जर खरेच असतील तर मग ते इतरांसाठी का येत नाही?

सिमेवर आज प्रत्येक दिवशी एक सैनिक आपल्या मातृभूमीच रक्षण करताना आपल्या जिवाचं बलिदान तुमच्या, आमच्या प्रत्येकासाठी देतो आहे. आज प्रत्येक डॉक्टर, नर्स, मेडीकल स्टाफ आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमचं, आमचं रक्षण करण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र एक करत आहे. आज पोलीस, निमलष्करी दल, एन.डी.आर.एफ, सी. आर. पी. एफ., सी. आय. एस. एफ.  ह्यांचे योद्धे आपलं जीवन सुखकर व्हावं म्हणून झटत आहेत. हे सगळं आपल्यासाठी करताना स्वतःच्या जीवाचं बलिदान करत आहेत. त्या बलिदानासाठी मात्र आपल्या अश्रूंना वेळ मिळत नाही. त्या बलिदानासाठी मात्र सहानुभूतीचे शब्द आपल्या कडून ना कोणत्या सोशल मिडियावर निघतात किंवा ना त्याची जाणीव आपल्याला होते. पण कोण कुठचा एखाद्या गाण्याच्या संगीतकाराची एक्झिट मात्र आपल्या मनाला चटका लावून जाते की त्याने आपल्या आयुष्याचे रंग फिके पडावे?

कोणाच्या जाण्याने वाईट वाटणं किंवा दुःख होणं हे साहजिक पण ते सिलेक्टिव्ह का? जसं दुःख आपल्याला एखाद्या कलाकारा बद्दल होतं तसं एखाद्या सैनिकाबद्दल, पोलिसांबद्दल, डॉक्टर बद्दल का होतं नाही? एखाद्या कलाकाराच्या जाण्याने आयुष्यात पोकळी नक्कीच निर्माण होतं असेल तर आयुष्य वाचवणारे आपले शिलेदार धारातीर्थी पडल्यावर आपल्या आयुष्यात खड्डा पडायला हवा पण तसं होतं नाही. सिमेवर शहीद झालेल्या एका सैनिकासाठी कधी आयुष्यातले रंग उडाले अशी पोस्ट वाचली आहे का? एखाद्या कोरोना अथवा सामान्य आयुष्यात आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या पोलीस, डॉक्टरसाठी आता आयुष्यातला आनंद संपला काहीच गोड लागत नाही. अशी पोस्ट अथवा ट्विट कधीच ना समोर येते ना ते व्हायरल होते.

आपले अश्रू सुद्धा आता सिलेक्टिव्ह झाले आहेत. ते येतात, वाईट वाटते पण फक्त काही लोकांसाठी. कारण आमच्या कल्पना आणि विचारांची पातळी एवढी खाली गेली आहे की आमच्या दुःखातून सुद्धा आम्हाला प्रसिद्धी हवी आहे. ती सुद्धा आभासी. जो जेवढं जास्ती दुःखाचं अवडंबर माजवेल तेवढे जास्ती लाईक आणि तेवढं जास्त शेअर झालं की आमचे सहानुभूतीचे अश्रू अजून मोठे होतात. कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोणाच्या जाण्याने दुःख होणं आणि वाईट वाटणं हे सुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न पण त्या सहानुभूतीच्या दुःखातून आभासी प्रसिद्धी मिळवणं हा प्रकार मात्र मला पडलेला एक मोठा प्रश्न आहे. ज्याची उत्तर माझ्याकडे नाहीत. आपली वैचारिक बैठक इतक्या खालच्या पातळीला गेली आहे की कोणी काही म्हंटल तरी त्याला ट्रोल करणं, त्यावर अतिशय हलक्या भाषेत कमेंट करणं, त्याच गॉसिपिंग करणं हे संविधानाने दिलेले हक्क आपण मानायला लागलो आहोत. त्यामुळे सहानुभूतीच्या अश्रूंची खरतर आता चीड यायला लागली आहे.

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.