Thursday 24 August 2023

तोच चंद्रमा नभांत (भाग 2)... विनीत वर्तक ©

 तोच चंद्रमा नभांत (भाग 2)... विनीत वर्तक ©

चंद्राचा दक्षिण ध्रुव गेल्या काही वर्षात समोर आलेल्या निष्कर्षामुळे वैज्ञानिकांच्या रडारवर आहे. या भागात अनेक विवर आहेत. उंच सखल आणि खडकाळ असलेला हा भाग सूर्यापासून तसा लपलेला आहे. चंद्रावर वातावरण नसल्याने काही अब्जावधी वर्षापूर्वी त्यावर असलेलं पाणी हे सूर्याच्या उष्णतेने वाफेत रूपांतरित होऊन अवकाशाच्या पोकळीत नष्ट झालेलं आहे. पण चंद्राचा दक्षिण ध्रुवावरील काही भाग मात्र गेल्या अब्जोवधी वर्षांपासून सूर्यापासून लपलेला आहे. इथलं तपमान जवळपास शून्याच्या खाली उणे -230 डिग्री सेल्सिअस इतकं कमी आहे. यामुळेच अब्जोवधी वर्षापूर्वी तिकडं असलेलं पाण्याचं अस्तित्व चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाच्या स्वरूपात आजही असल्याचं सिद्ध झालेलं आहे. पण हे सगळं आजवर ऑर्बिटर च्या माध्यमातून सामोरं आलेलं होतं. प्रत्यक्षात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे हे आजवर कोणालाही बघता आलेलं नव्हतं. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर दुर्लक्षित आणि सुरक्षित असणारी बर्फाची गोष्ट ज्यावेळेस वैज्ञानिकांना वेध घ्यायला प्रवृत्त करायला लागली तेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करणार हे उघड होतं. पण चंद्राच्या इतर भागावर उतरणं आणि दक्षिण भागावर आपलं यान उतरवणं तितकं सोप्प नाही. कारण उणे -230 डिग्री सेल्सिअस मधे काम करताना यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स मधे गडबडी होण्याची शक्यता जास्त असते. चंद्रावर दिवसा तपमान 250 डिग्री सेल्सिअस इतकं उकळतं असते तर रात्रीच्या वेळी ते उणे -130 डिग्री सेल्सिअस इतकं कमी होते. दक्षिण ध्रुवावर तर हा फरक अजून जास्ती होतो. तापमानातील इतका मोठा फरक सहन न करता आल्यामुळे अनेकदा यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सिस्टीम मधे गडबडी होते आणि त्याच पर्यवसान मोहीम अपयशी ठरण्यात होते. त्यात भरीस भर म्हणून चंद्राचा दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभाग हा विवरांनी भरलेला असल्याने सपाट जागा कमी आहेत जिकडे यान सुरक्षितरीत्या उतरू शकेल. या कारणामुळेच आजवर दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्याची हिंमत आजवर जगातील प्रगत देश दाखवू शकलेले नव्हते. भारताने हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलं आणि आपली चंद्रयान 2 मोहीम ही दक्षिण ध्रुवाकडे रवाना केली. 

चंद्रयान 2 मोहिमेत अगदी शेवटच्या क्षणी अपयश आलं पण हे अपयश इसरो च्या वैज्ञानिकांना खूप काही शिकवून गेलं. यातूनच चंद्रयान 3 मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली गेली. नेमकं काय चुकलं आणि काय चुकू शकते याचा अभ्यास केला गेला. अभ्यासातून जे निष्कर्ष पुढे आले त्यावर काम केलं गेलं. झालेलं काम एकदा नाही दोनदा नाही तर अनेकवेळा तपासून बघितलं गेलं. एखादी गोष्ट काम करणार नाही असं गृहीत धरून पर्यायी मार्ग शोधले गेले तसं तंत्रज्ञान विकसित केलं गेलं. खरे तर चंद्रयान 2 च्या वेळेस जी चूक झाली होती त्यात बदल करायला इसरोला एक सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा होता. पण इसरो ने तब्बल 4 वर्ष घेतली ती आपला अभ्यास परिपूर्ण करण्यासाठी. सगळ्या शक्यतांचा विचार करून मगच पुढे जायचं हे इसरो ने ठरवलं होतं. त्यामुळेच चंद्रयान 3 मोहिमेला उड्डाणासाठी 4 वर्षाचा कालावधी लागला. 

भारताने चंद्रयान 3 मोहीम अवकाशात पाठवल्या नंतर रशियाने आपलं ल्यूना 25 यान आपण चंद्राच्या कक्षेत पाठवत असल्याचं जगासमोर आणलं. तोवर ही गोष्ट रशियाने जगापासून आणि आपल्या मित्रापासून म्हणजेच भारतापासून लपवून ठेवली होती. तसं तर रशिया ल्यूना 25 या मोहिमेवर गेली 10 वर्ष काम करत होता. पण त्यांच लॅण्डर रेडी आहे अथवा मोहीम आखण्यासाठी तयारीत आहे असं कोणालाही माहित नव्हतं. खरं तर रशियाने घाईगडबडीत ही मोहीम पुढे रेटली. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया मधील जनता त्रस्त झाली आहे. एकेकाळी अवकाश क्षेत्रातील दादा आणि थोरला असणारा रशिया गेल्या काही वर्षात अवकाश क्षेत्रात विशेष असं काही करू शकलेला नाही. त्यांचे सोयूझ रॉकेट आजही मानवी उड्डाण करण्यासाठी सुरक्षित असले तरी काळाच्या कसोटीवर ते पिछाडीवर पडले आहेत हे सत्य रशियाला सुद्धा माहित होतं. त्यामुळेच भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्याचा घाट रशियाने घातला. 

13 सप्टेंबर 1959 चा दिवस होता जेव्हा मानवी इतिहासात रशियाने (आधीचा सोव्हियत युनियन) सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं यान ल्यूना 2 उतरवलं होतं. जे काम आपण जवळपास 60 वर्षापूर्वी केलं ते आता का नाही करू शकणार असा विचार रशियाने केला. त्यामुळे वेळ न दवडता त्यांनी ल्यूना 25 ला चंद्राच्या कक्षेत पाठवून दिलं. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत रशियाचे सोयूझ 2.1 बी रॉकेट हे सगळं कार्य करत होतं. ल्यूना 25 यानावरील इंजिन तोवर ना तपासली गेली होती ना त्यांच कार्य बघितलं गेलं होतं. कारण रशियाच रॉकेट इतकं प्रबळ होतं की  त्याने ल्यूना 25 ला चंद्राच्या दारात आणून सोडलं. त्यामुळे रशियन वैज्ञानिकांच्या गणिताचा खरा कस लागलाच नाही. भारताच्या बाबतीत मात्र गणित एकदम विरुद्ध होतं. भारताकडे प्रबळ रॉकेट नसल्याने अगदी पृथ्वीच्या कक्षेपासून भारतीय वैज्ञानिकांना सिंगल शॉट पद्धतीने चंद्रयान 3 ची कक्षा वाढवत नेत त्याला चंद्राकडे ढकलावे लागलं होतं. त्याचवेळी चंद्राच्या घराजवळ आल्यावर त्याचा वेग कमी करण्यासाठी पुन्हा उलट्या पद्धतीने इंजिन्स प्रज्वलित करायला लागली होती. 

भारतीय वैज्ञानिकांना चंद्रयान 1 आणि 2 तसेच मंगळयान मोहिमेमुळे सिंगल शॉट पद्धतीवर खूप चांगलं नियंत्रण मिळवता आलेलं आहे. या पद्धतीत सगळ्यात महत्वाचं असते ती अचूक वेळ आणि तुमची बदललेली डेल्टा व्हेलॉसिटी. वेग आणि वेळ यांच अचूक नियंत्रण जर नसेल तर तुमचं यान गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे आपली कक्षा सोडून भलतीकडे जाऊ शकते ज्याचं पर्यावसन एकतर कपाळमोक्ष किंवा अवकाशात भरकटंण हे असते. इसरो ने वेग आणि वेळेचं गणित अतिशय अचूक जमवून आणलं होतं. यासाठी तुमच्या इंजिन्स फायरिंग वर तुमच्या सिस्टीम च योग्य नियंत्रण, इंजिन्स नी निर्माण केलेला थ्रस्ट आणि तुम्ही साधलेली योग्य वेळ अतिशय महत्वाची असते. चंद्रयान 2 आणि 3 च्या बाबतीत इसरो च्या  प्रॉपल्शन मॉड्यूल च्या इंजिन्स नी आपलं काम चोख बजावलं. जेव्हा तुम्ही कोणत्याही ग्रह अथवा आपण म्हणून अवकाशात कोणत्याही बॉडी भोवती अंडाकार म्हणजेच एलिप्टिकल ऑर्बिट मधे फिरत असतात त्यावेळी दोन टोकांवरील वेगात फरक असतो. जेव्हा तुम्ही त्या बॉडीच्या सगळ्यात जवळ असतात तेव्हा तुमचा वेग सगळ्यात जास्ती असतो. जेव्हा तुम्ही सगळ्यात लांब असतात तेव्हा तुमचा वेग सगळ्यात कमी असतो. 

भौतिकशास्त्र हे सांगते की जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त वेगात असतात तेव्हा तुम्ही केलेला बदल म्हणजेच डेल्टा व्हेलॉसिटी ही तुमचा वेग सगळ्यात जास्त वाढवते. याचा अर्थ तुम्ही जर तुमची इंजिन्स सगळ्यात जवळ असताना प्रज्वलित केली तर तुमचा वेग कित्येक पटीने वाढतो आणि तुमची कक्षा रुंदावली जाते. कारण जास्त वेगामुळे तुम्ही जास्त दूरवर फेकले जातात. आता हाच नियम उलट पण लागू आहे. जेव्हा तुम्ही उलट दिशेने इंजिन्स प्रज्वलित करता तेव्हा तुमचा वेग जास्त कमी होतो म्हणजेच कक्षा कमी होते. यामुळे प्रत्येक सेकंद हा अतिशय महत्वाचा असतो. 1 सेकंद कमी जास्त आणि कक्षेत कित्येक किलोमीटर चा फरक पडू शकतो. हे सगळं लिहण्याच कारण इतकच ल्यूना 25 मधे जी गडबड झाली ती इकडेच झाली. सोयूझ रॉकेट ने चंद्राच्या दारात नेऊन सोडलेल्या ल्यूना 25 ला आपला वेग कमी करत चंद्रावर उतरण्याच्या आधी 18 किलोमीटर ची कक्षा गाठायची होती. याचा अर्थ 18 किलोमीटर उंचीवरून ते चंद्रावर उतरणार होतं. (विक्रम लॅण्डर च्या बाबतीत ही उंची 30 किलोमीटर होती.). ल्यूना 25 च्या इंजिन्स ला जेव्हा रशियाच्या रॉसकॉसमॉस ने चालू करण्याचा कमांड दिला तेव्हा त्याची इंजिन्स चालू तर झाली पण बंद व्हायचं नाव त्यांनी घेतलं नाही. जोवर सिस्टीम हँग होऊन बंद झाली तोवर मी वर लिहिलं तसं इंजिन्स जास्त काळ प्रज्वलित झाल्याने 18 किलोमीटर ची उंची गाठायच्या ऐवजी ल्यूना 25 चा वेग इतका कमी झाला की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने त्याचा कपाळमोक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर झाला. 

भारताच्या विक्रम लॅण्डर आणि  प्रॉपल्शन मॉड्यूल वरील यंत्रणांनी मात्र आपलं काम चोख केलं होतं. जर तुमची ही यंत्रणा अगदी सेकंदाच्या वेळेप्रमाणे अचूक चालली तर तुम्हाला कमीत कमी इंधन लागते कारण तुम्ही गाठलेली कक्षा ही तितकी अचूक असते. भारताच्या चंद्रयान 3 च्या प्रॉपल्शन मॉड्यूल वरील इंजिन्स आणि यंत्रणेने इतकं अचूक काम केलं आहे की अजून जवळपास 150 लिटर इंधन त्यावर शिल्लक आहे. ज्यामुळे प्रॉपल्शन मॉड्यूल हे कदाचित कित्येक वर्ष चंद्राच्या भोवती परिवलन करत राहू शकेल. इसरो ने त्याचा कार्यकाळ जास्तीत जास्त 6 महिने ठेवला होता. पण अतिशय अचूक कक्षा गाठल्यामुळे इंजिन्स कमीवेळा प्रज्वलित करावी लागली. त्यामुळे इंधन जास्त प्रमाणात खर्च झालं नाही. आपल्या कक्षेत फिरत राहण्यासाठी प्रॉपल्शन मॉड्यूल अगदी थोडं इंधन गरजेचं आहे. जोवर इंधन त्यावर आहे तोवर त्याची इंजिन्स प्रज्वलित होत राहतील आणि प्रॉपल्शन मॉड्यूल आपल्या ठरलेल्या कक्षेत (100 किलोमीटर उंचीवर) कदाचित काही वर्ष आरामात राहू शकेल. 

याच प्रॉपल्शन मॉड्यूल वर Spectro-polarimetry of HAbitable Planet Earth (SHAPE) नावाचं उपकरण आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे उपकरण पृथ्वी सारख्या मानवाला राहण्यास योग्य असणाऱ्या ग्रह अथवा लघुग्रहांच्या वातावरणाचा शोध घेईल. आता आपण विचार करू की नक्की याचा काय उपयोग तर याच्या माध्यमातून आपल्याला ग्रहाच्या वातावरणाचा एक ढोबळ अंदाज येईल त्यावरून आपण आपल्या शोधांची पुढची रूपरेषा आखू शकू. एखादी मोहीम तिकडे न्यायची का? नक्की राहण्यायोग्य असेल का? हा अभ्यास असल्याशिवाय अंधारात कोणीच उडी घेणार नाही. हे जे उपकरण आहे त्याच आयुष्य आधी 6 महिने होतं पण आता कित्येक वर्ष झालं आहे. 

एकीकडे रशिया सारखा प्रबळ देश आपल्याला 60 वर्षापूर्वी अवगत असलेलं तंत्रज्ञान वापरण्यात चुकला तिकडे आजवर कधी चंद्रावर पाऊल न ठेवलेल्या भारताने अतिशय सुरळीत चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा झेंडा रोवला. 1600 कोटी रुपये खर्चून चंद्रावर पाठवलेलं ल्यूना 25 अयशस्वी झालं तर 615 कोटी खर्च करून पाठवलेलं चंद्रयान 3 आज इतिहासाची पान आपल्या सुवर्ण अक्षरांनी लिहिते आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही पहिले उतरता की दुसरे. प्रश्न हा आहे की तुमची तयारी योग्य झाली आहे न? कारण तयारी नसताना जेव्हा आपण शर्यतीत पळायला जातो तेव्हा आपण अश्याच पद्धतीने तोंडावर आपटतो. रशियाने घाई करून 1600 कोटी रुपये तर उडवले पण आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्या नावाला एक असा डाग लावला आहे जो कधीच पुसला जाणार नाही. रशियाने भारताला वेळोवेळी अवकाश क्षेत्रात मदत केली आहे. त्यामुळेच रशियाचं अपयश जास्ती जिव्हारी लागणारं आहे. जेव्हा आपला मित्र हरतो किंवा मागे पडतो तेव्हा विजयाचा आनंद पूर्णपणे उपभोगता येत नाही हेच खरं. तूर्तास रशिया यातून शिकेल आणि पुन्हा एकदा चंद्रावर यशस्वी स्वारी करेल हीच अपेक्षा आहे.

 जय हिंद!!!

ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Wednesday 23 August 2023

तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©

 तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©

आजवर आपण रात्रीचं चांदणं बघत आलो. रात्रीच्या त्या गडद अंधारात आपल्या शीतल प्रकाशाने भुरळ घालणाऱ्या त्या चंद्राच्या प्रेमात कोणी पडलं नसेल अशी व्यक्ती क्वचित सापडेल. आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र त्यासाठीच वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आकर्षण राहिला आहे. ज्या वेळेस नभांपलीकडे जाण्याचं तंत्रज्ञान मानवाने शिकलं. त्यानंतर त्याच पहिलं लक्ष्य चंद्रच होता. 21 जुलै 1969 चा तो दिवस होता जेव्हा मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावर उमटलं. त्यानंतर अनेकांनी आपली पावलं चंद्राच्या मातीत उमटवली  देशांनी आपले उपग्रह त्यावर उतरवले. एकेकाळी अतिशय औत्सुक्याचा विषय असणारा चंद्र फक्त माती आणि दगड धोंड्यानी भरलेला आहे मानवाला 1970 च्या दशकात समजून चुकलं. त्यामुळेच चंद्रावर स्वारी केल्यावर मानवाचा खरे तर वैज्ञानिकांची चंद्राबद्दल असलेली उत्सुकता संपलेली होती.14 नोव्हेंबर 2008 चा दिवस होता ज्यावेळेस भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेत सोबत असलेल्या मुन इम्पॅक्टर प्रोब ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हार्ड लँडिंग (कोसळताना) चंद्राच्या पृष्ठभागावर उडालेल्या धुराळयात पाण्याचं अस्तित्व दाखवून दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा तो नभात असलेला चंद्रमा पुन्हा एकदा वैज्ञानिकांना खुणावू लागला. 

आपल्या पहिल्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली ती 2019 साली. आजवर पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्या परग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव भारताच्या आणि इसरो च्या पाठीशी नव्हता. जे काही तंत्रज्ञान अवगत होतं त्यात इसरोने अगदी चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर पर्यंत यशस्वी मजल मारली. पैश्याचा अभाव, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, रॉकेट आणि इतर गोष्टींच्या मर्यादा आणि सगळ्यात मोठं म्हणजे अश्या मोहिमेत अपयश आल्यावर झेलाव्या लागणाऱ्या टीकेचा त्रास सहन करत भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर 2019 साली केलेला प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणी फसला. सर्व भारतीयांना तो क्षण आजही आठवत असेल. अगदी ओंजळीत पिण्यासाठी घेतलेलं पाणी निसटून जावं आणि आपल्याला तहानलेलं राहावं लागावं अशीच ती अवस्था होती. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अश्या प्रयत्नात अगदी सामान्य असल्या तरी जिकडे रॉकेट अवकाशात पाठवायला खर्च का करायचा असे प्रश्न विचारले जातात तिकडे हे नुकसान खूप मोठं होतं. त्यामुळेच तत्कालीन इसरो चीफ के. सिवान यांच्या डोळ्यात आलेले अश्रू खूप काही सांगून गेले. 

असं म्हणतात, 

"अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है"... 

आज 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेद्वारे विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून त्या अश्रूंना आज आनंदाच्या अश्रूत परावर्तित केलं आहे. 1969 साली अमेरिकेत जे घडलं ते आज भारतात घडताना मला व्यक्तिशः जाणवते आहे. त्यावेळी अमेरिकेने कोल्ड वॉर च्या लढाईत निर्णायक आघाडी चंद्रावर मानव उतरवून घेतली हा इतिहास असला तरी त्यापेक्षा अमेरिकेची आणि तिथल्या लोकांची मानसिकता या घटनेने बदलवून टाकली. येणाऱ्या दशकात अमेरिका तांत्रिक बाबतीत आघाडीवर राहिली आणि जगातील सगळ्यात प्रगत राष्ट्र असलेली अमेरिकन माणसाची मानसिकता आजही कायम आहे. आज भारताच्या विक्रम लॅण्डर ने केलेला पराक्रम हा त्याच तोडीचा आहे. तांत्रिक बाबतीत भारताने मिळवलेलं यश जितकं महत्वाचं आहे त्याहीपेक्षा कैक पटीने भारताच्या आणि भारतीयांच्या मानसिकतेत झालेला बदल जास्ती महत्वाचा आहे. आपण स्वबळावर आणि स्वस्तात तंत्रज्ञान विकसित करू शकतो. त्या पलीकडे आलेल्या अपयशाने खचून न जात अजून जोमाने आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. 

ज्यावेळेस जागतिक पटलावर रशिया  रॉसकॉसमॉस आणि भारताच्या इसरो च्या अध्यक्षांना सारखा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या दोघांनी दिलेलं उत्तर बदललेली मानसिकता अधोरेखित करते. रॉसकॉसमॉस च्या अध्यक्षांना ज्यावेळी विचारण्यात आलं की जवळपास पाच दशकानंतर रशिया ल्यूना 25 मोहिमेद्वारे चंद्रावर पुन्हा जातो आहे. त्यावेळेस या मोहिमेच्या यशाची खात्री म्हणजेच ल्यूना 25 सॉफ्ट लँडिंग करण्याची किती खात्री आपल्याला आहे? यावर त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 70% आम्ही यशस्वी होऊ. हाच प्रश्न जेव्हा इसरोच्या अध्यक्षांना विचारला गेला तेव्हा उत्तर होतं, आमच्या चंद्रयान 3 चे सगळे सेन्सर निकामी झाले, आमचा संपर्क काही काळासाठी तुटला अगदी त्याची दोन इंजिन जरी बंद पडली तरी आमचा विक्रम लॅण्डर हा चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करेल. या दोन्ही उत्तरात मानसिकतेत असलेला बदल तुम्ही, आम्ही सगळेच जाणवू शकतो. 

एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेआधी विचारावं की तुझा अभ्यास किती झाला आहे? त्यावर त्याने उत्तर द्यावं की काहीही येऊन दे मी यशस्वी होणार, ते पुस्तकातलं असू दे, दुसऱ्या कोणत्या पुस्तकातलं असू दे, सिलॅबस मधलं असू दे नाहीतर अजून कुठलं असू दे. मला त्याने काही फरक पडत नाही. माझा बेस पक्का आहे. प्रश्न कितीही कठीण आला तरी त्याला सोडवण्याची माझी तयारी आहे. मला खात्री आहे की मी तो बरोबरचं सोडवेन. हा आत्मविश्वास येण्यासाठी त्या विद्यार्थ्याने रात्रीचा दिवस केलेला असतो हे कोणीही सांगेल कारण असा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही तुमची तयारी इतकी पक्की केलेली असते की समोर काय येते याची भिती नसते तर येणारा प्रश्न आपण किती सहजरीत्या सोडवू याचा विचार असतो. अगदी अशीच स्थिती आज इसरो मधील प्रत्येकाची होती आणि त्यांच्या मनातील तो आत्मीश्वास इसरो च्या अध्यक्षांनी दिलेल्या उत्तरातून जाणवत होता. 

आज जेव्हा विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास सुरु केला तेव्हा पडद्यावर दिसणारे आकडे त्याची साक्ष देत होते. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट ज्याला कॉपी बुक म्हणता येईल अशी घडत होती. मग ती ब्रेक डाऊन फेज असो वा एका ठिकाणी विक्रम लॅण्डर ने हॉवरिंग करणं असो. जे मापदंड आखले गेले होते त्यातल्या प्रत्येक मापदंडात आज विक्रम लॅण्डर चा प्रवास झाला. विक्रम लॅण्डर ने सॉफ्ट लँडिंग केलं यापेक्षा ते ज्या पद्धतीने केलं त्याचा अभ्यास जागतिक स्तरावर केला जाणार आहे. कारण जवळपास 3 लाख 84 हजार किलोमीटर लांबून वातावरण नसताना एखाद्या परग्रहावर अशी अचूकता निर्माण करण्याचं तंत्रज्ञान हे शिकणं आहे. युरोपियन स्पेस एजन्सी चे अध्यक्ष जोसेफ अॅशबॅकर यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणाले की, 

Landing of Chandrayaan-3 as an “incredible” event. “What a way to demonstrate new technologies and achieve India's first soft landing on another celestial body, “Well done. I am thoroughly impressed.”

ते असं का म्हणाले याच एक उदाहरण सांगतो, विक्रम लॅण्डर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 मीटर उंचीवर असणारं होतं तेव्हा खाली उतरण्याआधी आपल्या खाली काही धोका आहे का हे बघण्यासाठी 20 सेकंद एका ठिकाणी तंरंगणार होतं. तुम्ही पुन्हा जाऊन जर यु ट्यूब वर ते लाईव्ह बघितलं तर अगदी 149.98 मीटर वर येऊन विक्रम लॅण्डर तरंगायला लागलं. आपण 0.02 मीटर खाली आहोत हे त्याच्या कॉम्प्युटर च्या लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर च्या कॉम्प्युटर ने त्याची उंची पुन्हा 150.20 मीटर इतकी केली. हे सगळं अवघ्या 5 सेकंदात घडलं. त्या नंतर खाली कोणताही धोका नाही हे लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर ने आपला पुढला प्रवास सुरु केला. 

हे सगळं सांगण्याचं कारण इतकचं ही अचूकता आज इसरो आणि भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर मिळवली आहे. त्यामुळेच विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग हे त्या पलीकडे आहे. हे कदाचित जोसेफ अॅशबॅकर यांना जाणवलं असेल असा माझा कयास आहे. कारण यातलं आर्टिफिशियल इंटीलिजन्स च तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाने इंजिन आणि इतर सेन्सरवर मिळवलेलं प्रभुत्व आणि या सर्वांना एकत्रित आणून विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग करणारी इसरो एक लंबी रेस का घोडा तर आहेच पण हा घोडा आता शर्यतीत उतरला आहे हे त्यांना नक्की पटलं असेल. 

21 जुलै 1969 चा दिवस जसा अमेरिका, नासा आणि पर्यायाने प्रत्येक अमेरिकन माणसाच्या मानसिकतेला कलाटणी देणारा होता तसाच 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारत, इसरो आणि प्रत्येक भारतीयांच्या मानसिकतेला कलाटणी देणारा असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यावेळी पण तोच चंद्रमा नभांत होता आणि आजही तोच चंद्रमा नभांत आहे. फरक इतकाच आहे की आज त्यावर आपला झेंडा रोवणारा देश वेगळा आहे. 

जय हिंद!!!

ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.