Wednesday 10 October 2012

'लास वेगास' ... स्वप्नांचं शहर

'लास वेगास' ... स्वप्नांचं शहर

'लास वेगास', जुगार खेळणाऱ्या जगातील प्रत्येकाला तोंडपाठ असणारं शहर. स्वप्नं दाखवणारं आणि स्वप्नं हिरावून घेणारं हीच त्याची खरी ओळख. अमेरिकेतील नेवाडा राज्यामध्ये हे शहर १९०५ साली वसवण्यात आलं. जवळपास ठणठणीत कोरडं असणारं तापमान वर्षाला ३८ ते ४० डिग्री पर्यंत जाणार. आजूबाजूला वाळवंट, आसपास कोरडा असा प्रदेश, पण आज जगातील कानाकोपऱ्यात या शहराचं नाव प्रसिद्ध आहे.

'लास वेगास'मध्ये शिरताना खूपच उत्सुक होतो. 'लास वेगास'च्या जवळच दोन महत्वाची ठिकाणं आहेत. एक म्हणजे 'एडवर्ड एअर बेस', अमेरिकेच्या लष्करी क्षेत्रात या बेसचं खूप महत्त्व आहे. दुसरी जागा जिचा खुद्द अमेरिकेने इन्कार केला आहे, पण ती आस्तित्वात आहे, ती म्हणजे 'एरिया ५१'. लष्करी सान्निध्यातील नवनवीन विमाने, अत्याधुनिक मिसाईल, जैव व केमिकल अस्त्रं शस्त्रं याच्यावर संशोधन केलं जातं, पण अतिशय गुप्तपणे, तो हा भाग. ही जागा 'लास वेगास'पासून १३३ किमी वर आहे, 'ग्रूम लेक'च्या बाजूला. लष्करी भाग असल्याने, किंवा वाळवंटात लपलेली ही जागा आहे त्यामुळे, आपण याचं दर्शन घेऊ शकत नाही. माझ्या गाईडने साधारण ही जागा कशी आहे, इकडे काय चालते, हे सांगून २ मिनिटे बस थांबवून या जागेचे खूपच दूरवरून दर्शन करवले. मी याबद्दल आधीच वाचल्याने, तो काय सांगत होता, हे ध्यानात नक्कीच येत होतं, पण ज्यांना काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी सगळंच डोक्यावरून जाणारं होतं. 'लास वेगास'ची हद्द सुरू होताच उंचचउंच बिल्डींगने माझे लक्ष वेधून घेतले. सोन्याचा मुलामा दिल्यासारखे भासणारी ही बिल्डींग म्हणजे एक कॅसिनो होता. आपण जुगाराच्या राज्यात प्रवेश केल्याची ती नांदी होती.
सगळीकडे वाळवंट, पण आजूबाजूला मधेच झाडी. शुष्क हवा, पण रस्ते एकदम अप्रतिम. माझ्या ६०० किमीच्या प्रवासात एकही खड्डा जाणवला नाही, कुठेही स्पीड ब्रेकर नाही नि कुठेही सिग्नल नाही. प्रत्येक गोष्ट कशी शिस्तीत. अमेरिकेत वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. तोडल्यावर होणारी शिक्षासुद्धा जबर असते, त्यामुळे कोणी ते तोडायच्या वाटेलाही जात नाही. 'लास वेगास' शहरातील मुख्य रस्त्यावर प्रवेश होताच, सगळीकडे उंचच उंच बिल्डींग, आणि प्रत्येक बिल्डींग वेगळी, प्रत्येकाची एक वेगळीच तऱ्हा. हे सगळे कॅसिनो आहेत, हे आमच्या गाईडनं सांगितलं. बेलगिओ, मिराज, ट्रम्प, एन्कोर, वयीन, सर्कस......किती तरी. सगळे एकापेक्षा एक सरस. त्यातील 'सर्कस'मध्ये मी राहणार होतो.

इकडे हॉटेल खूप स्वस्त असतात, म्हणजे माझ्या रूमची किंमत होती ४०$  म्हणजे अवघे २००० रूपये एका दिवसाचे. इतकी अप्रतिम रूम खरं तर २००$ या किंमतीची निदान असावयास हवी! मग इतकी स्वस्त कशी? तर यामागचं गुपित गाईडने मला सांगितलं. 'लास वेगास'मध्ये एक लक्षात ठेव, तू जिंक किवा हार, पण कॅसिनो नेहमीच जिंकतो, त्यांचा गल्ला नेहमीच भरतो. मला संदर्भ न लागल्याने मी अजून जास्ती खोलात त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला २००$ खर्च करायची तुमची तयारी होती, म्हणजे ४०$  मध्ये रूम मिळाली, तर तुम्ही ५ दिवस इकडे राहू शकता तितक्याच पैश्यात? मी म्हटलं, 'हो, ते आहेच!'. तो म्हणाला, 'मग तुम्ही १ दिवसाऐवजी ५ दिवस कॅसिनो खेळणार! तिकडे तुमच्याकडून कॅसिनो ५०००$ कमवणार!' मी हा सगळा विचार ऐकून सर्दच झालो. यावरही तो म्हणाला, 'इकडे आपण हॉटेल मधून पाठी मागच्या बाजूने आलो कारण  तिकडे रिसेप्शन आहे, आणि पुढच्या बाजूला कॅसिनो,  म्हणजे तुम्ही जेव्हाजेव्हा हॉटेलमध्ये शिराल, तेव्हा तेव्हा तुम्ही प्रथम कॅसिनोमधून जाल, आणि प्रत्येकवेळी तुम्हाला खेळण्याची इच्छा होईल, आणि प्रत्येकवेळी कॅसिनोचा गल्ला भरत जाईल'. मी या गोष्टीचा विचार केलाच नव्हता. अजूनही तो म्हणाला, 'तुम्ही जेव्हा रूममधून खाली यायला निघाल, किंवा तुम्हाला रूममध्ये जायचं असेल, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला कॅसिनोमधूनच जावं लागेल. प्रत्येक लिफ्टचं "0" बटन दाबलं, की लिफ्ट तुम्हाला कॅसिनो फ्लोअरवरच आणून सोडते, आणि वर जायचं असतं, तेव्हासुद्धा तुम्हाला इकडूनच लिफ्ट मिळते'. आता मी फक्त पडायचा बाकी होतो. माणसाच्या मानसिकतेचा इतका सूक्ष्म अभ्यास धंद्यासाठी केलेला मी तरी कुठे बघितला नाही. ही गोष्ट प्रत्येक कॅसिनोमध्ये लागू होते.

संध्याकाळी 'लास वेगास' फिरायला निघालो. तिकडे काही 'शो' असतात, लोकांना लुभावण्यासाठी. त्यातील माझ्या गाईडने ३ 'शो' बघाच, असं सुचवलं. त्यात एक होता, त्यामध्ये फक्त १८+ वर्ष अधिक अशी वयाची अट होती. त्याचं तिकीटही जवळपास १००$ इतकं होतं. मी त्याला विचारलं, 'इतकं काय आहे त्यात'? तो एकच म्हणाला, 'यांतील प्रत्येक पेन्नी ही वसूल होईल'. गेली ७५ वर्षं हा 'शो' इकडे चालू आहे, आणि नंबर-१ चा 'शो' आहे. फोन, कॅमेरा या शोमध्ये घेऊन येण्यास मज्जाव होता. १८+ असल्याने अर्ध नग्न वगैरे स्वरूपाचा असेल, अशी माझी संकल्पना खरी ठरली. पण खरंच या अर्धनग्न स्वरूपापेक्षाही जे काही सादरीकरण होतं, त्याला तोड नाही. जवळपास २०० मुली आणि त्याच ताकदीचे कलाकार, यांनी २ तासात जे काही सादर केलं, त्या कलेला, त्यांच्या नृत्याविष्काराला माझा सलाम! त्या मुली, बायका जरी पूर्ण अथवा अर्ध नग्न असल्या, तरी त्यात कुठेही बघताना त्यांना अश्लीलतेचं स्वरूप येत नव्हतं, एक सुंदर अनुभूती होती. तुम्ही कधी गेलात, तर हा 'शो' नक्की बघाच. दुसरा 'शो' जो होता, तो म्हणजे 'बलजिओ कॅसिनोचा'. यात १५ मिनिटांचा संगीताच्या तालावर कारंज्याचा जो काही आविष्कार बघयला मिळतो, त्याला तोड नाही. माझ्या कॅमेऱ्यात मी तो पूर्ण बंदिस्त केला आहे. लाईटची रचना, कारंज्यांचे फवारे, संगीताच्या तालावर बघताना आपण कोणत्यातरी दुसऱ्याच जगात आहोत असाच भास होतो. तिथून मी गेलो एका कॅसिनोमध्ये. तिकडे कॅसिनोमधील पूर्ण छत हे अश्या स्वरूपाचं रंगवलेलं आहे, की बाहेर अंधार असतानासुद्धा आपण दिवसा उभे आहोत असेच वाटत राहते. कॅसिनोच्यामध्ये बोटीमधून पॅरिसप्रमाणे फेरफटका मारता येतो. 'अप्रतिम' आणि अप्रतिम' असेच शब्द तोंडातून बाहेर पडत होते. जगातील सर्व पैसा इकडेच साठवला आहे, असंच मनोमन वाटत होतं.

रात्रभर एकूणएक कॅसिनो हिंडून झाले, खेळून झाले. जिंकलो पण! हरलो पण! गाईडचं वाक्य माझ्या मनात होतंच, की 'तुम्ही काहीही करा, शेवटी कॅसिनोच जिंकतो'. प्रत्येक कॅसिनोमधून फिरताना हेच बघितलं. लोक इतकी तन-मन लावून खेळत होते, की आजूबाजूला काय चालू आहे, याचं त्यांना काहीच पडलेलं नव्हतं. बरीचशी वृद्ध मंडळी इकडे आयुष्यभर कमावलेला पैसा फुंकायला येतात, असं कळलं. अमेरिकन लोकांकडे किती पैसा आहे, ह्याची झलक मला 'लास वेगास'मधून फिरताना पावलोपावली येत होती. तिसरा 'शो' होता, जिकडे पूर्ण-पूर्ण छत हे एक डिस्प्ले आहे, जवळपास अर्धा किमी लांब आहे. रात्रीच्या गडद अंधारात यावर गाणं लावतात. याचं चित्रीकरण हिंदी चित्रपटांतही आहे. मला नाव नाही आठवत, पण प्रियांका चोप्रा आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे इकडेच चित्रित झाले आहे.

दोन दिवस 'लास वेगास' पूर्ण पालथं घातलं. खरंच हे एक स्वप्नांचं शहर आहे. लाखो लोक रोज इकडे येतात, कधीतरी श्रीमंत होण्याचं मनात घेऊन आणि काही होतातही, हे सत्य आहे! पण ही संख्या खूपच कमी.  तिसऱ्या दिवशी मोर्चा वळवला तो इकडूनच जवळ असलेल्या इंजिनिअरिंग क्षेत्रात एक मानाचा मापदंड ठरणाऱ्या धरणाकडे,  'हूवर धरण'. चंद्रकोरीच्या आकारात असलेलं हे धरण नेवाडा आणि ऍरिझोना या राज्यांच्या वेशीवर वसलं आहे. १९३६ साली बांधलेलं धरण २०८० मेगावॅट उर्जेची निर्मिती करतं. कॉलोरॅडो नदीवर असलेल्या या धरणाने तयार केलेल्या पाणीसाठ्याची लांबी तब्बल १८० किमी इतकी प्रचंड आहे. यावरूनच याच्या आकाराचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आत्तापर्यंत या धरणावरून दोन राज्यात वाहतूक होत असे, पण धरणाला असलेला धोका लक्षात घेऊन एक बायपास यावर बांधला गेला, जो २०११ साली सुरू झाला. १ मिलियन लोक दरवर्षी या धरणाला भेट देतात. 'लास वेगास' पासून अवघ्या २४ किमीवर हे धरण आहे. या धरणाला इतकं जवळून बघणं, आणि त्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेणं, हा सगळ्यात संग्रही असा क्षण होता.

जगातील सगळ्यात खोल दरी, असं जिचं वर्णन आहे, ते म्हणजे 'ग्रँड कॅनियन'. तब्बल ४४६ किमी लांब, २९ किमी रुंद आणि ६००० फूट खोल अशी तिची रचना आहे. 'कोलोरॅडो' नदीचे पात्र यातून वाहते. लाखो वर्षं 'कोलोरॅडो' नदीने इकडून जमिनीच्या भूभागाची धूप करून ही दरी तयार केली आहे. 'वेस्ट रिम' आणि 'साउथ रिम' अश्या दोन ठिकाणी आपण जाऊ शकतो, त्यापेकी 'वेस्ट रिम'ला दोन महत्त्वाची आकर्षणे आहेत. एक म्हणजे चॉपरमधून आपल्याला कोलोरॅडो नदीच्या काठाशी उतरवले जाते, आणि मग एक तास बोटीतून कोलोरॅडो नदीची सफर आणि मग परत चॉपरने दरीतून वर आणून सोडले जाते. जवळपास २००$ इतकी याची किंमत आहे. मी याचा आनंद घेतला. 'अवर्णनीय' असंच याचं वर्णन करता येईल. ही जागा 'लास वेगास'पासून १९० किमी अंतरावर आहे. अजून एक महत्वाचं स्थळ म्हणजे 'स्काय वॉक'. 'वेस्ट रिम'ला अर्धवर्तुळाकार अशी हवेत रचना केली आहे. याचा खालचा भाग हा काचेचा आहे, त्यामुळे इकडे चालताना आपण हवेत चालत असल्याचा भास होतो. याच्याखाली तब्बल ८०० फूट खोल जमीन आहे, त्यामुळे काचेवर चालताना बोबडी वळल्याशिवाय राहत नाही. हा एक अप्रतिम अनुभव आहे. ४०$ अशी याची फी आहे, पण इथली प्रत्येक गोष्ट प्रत्येक पै न पै चा मोबदला देते!!

'लास वेगास' आणि त्याच्या आजूबाजूची सगळीच स्थळे पाहणे, हे एक अवर्णनीय असा आनंद देऊन जातं. इकडे आल्यावर आपण आपली सगळी दुःखं, चिंता, जबाबदाऱ्या बाजूला ठेवून कधी या शहराशी नाळ जोडतो, कळतही नाही. कळते तेव्हा, जेव्हा आपला खिसा रिकामा होतो कॅसिनोमध्ये. आयुष्यात संधी मिळाल्यास या शहराची सफर कधीच चुकवू नका, नाहीतर तुम्ही नक्कीच एका स्वप्नाला सत्यात उतरताना मुकाल!

विनीत वर्तक.

Tuesday 9 October 2012

बेंढया... एक अवलिया... विनीत वर्तक ©

बेंढया... एक अवलिया... विनीत वर्तक © 

आपल्या आयुष्यात आजूबाजूला आपण अनेक माणसे बघतो. काही चांगली, काही वाईट, काही हसणारी, काही रडणारी तर काही रडवणारी आणि काही रडून हसवणारी. प्रत्येक क्षण काहीतरी देतोच आपल्याला, तश्याच नवीन नवीन ओळखीही. पण काही माणसे असतात, जी आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात आणि त्यांचं जीवन आपल्यासाठी नेहमीच एक कोडं असतं न उमगलेलं! असाच हा एक अवलिया... बेंढया!! 
याचं नाव जितकं विचित्र तितकाच हा साधा सरळ. गेले ३०-३२ वर्षं बघतो आहे त्याला, किंबहुना जेव्हापासून कळायला लागलं आहे तेव्हापासून. 

माझा जन्म मुंबईचा, गावसुद्धा मुंबईच्या जवळच. सुट्टीतला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे मामाकडे जाणे. माझं आजोळ तसं मुंबईला खेटूनच, विरारला. पण तिकडची मजा काही वेगळीच. पानवेलीच्या आणि फुलांच्या झाडांनी भरलेली शेतं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील माझ्या सगळ्या भावंडांची मजा असा भरगच्च कार्यक्रम. बेंढया तिकडेच माझ्या मामाकडे मजुरी करायचा. त्याला आम्ही प्रेमाने बेंढयामामा म्हणत असू आणि त्याच्या बायकोला वेणूमामी. त्यांचा मुलगा कुमार हा आमच्याच जोडीचा, आमच्यात खेळायचा. अंगावर एक हाप पॅन्ट आणि तो मळका गंजी बिनबाह्यांचा, कधी कधी तर तो पण नसायचा.

उन्हामध्ये घामाने तळपणारं त्याचं शरीर आणि सतत शारीरिक कामं करून शिरा दिसणारी त्याची शरीरयष्टी, सगळंच कसं लक्षात राहण्याजोगं. सकाळ झाली की आम्ही वाडीत जायचो तगरीची, नेवाळीची फुलं खुडायला. सकाळी ८ला सायकलने वाडीत पोहोचायचो, त्याच्या आधीच बेंढयाचा दिनक्रम चालू झालेला असायचा. आपलं फावडं घेऊन हा महाराज चालला शिपण करायला. (शिपण म्हणजे वाडीत असलेल्या केळीच्या बागेला, फुलांच्या बागेला सगळीकडं पाटातून पाणी फिरवणं. ३-४ दिवसातून एकदा करायला लागायचं झाड जिवंत राहण्यासाठी) आम्ही मस्ती करत कळ्या खुडायचो. ह्याच कळ्या केळीच्या पानात बांधून फूलवाले दादरला दुसऱ्या दिवशी फूल मार्केटमध्ये विकायला नेत असत. कधी मूड आलाच, की मग चिखलात खेळणं आणि मस्ती करणं. बेंढयाचं काम बघून मला नेहमीच हुरूप यायचा आणि मी त्याच्याकडे फावडं मागून स्वतः करायचा प्रयत्न करायचो. माझी शरीरयष्टी बघून त्याला अंदाज यायचा की माझ्याच्याने एक ढेकूळ पण हलणार नाही. मग मला तो शिकवायचा, की कसं फावडं पकडायचं, कसा बांध वळवायचा आणि शिपण कसं करायचं. हा अवलिया कधीच चपला घालत नसे. आम्ही चप्पल घालूनसुद्धा आम्हाला लागत असे पण आम्ही याला कधीच पाय लंगडून चालताना बघितलं नाही, जसं काही याच्या तळपायाला लोखंड होतं. मग कधीतरी याला आणि मामीला चहा घेऊन वाडीत जा. चहा प्यायलेला असला तरी केळीच्या पानातून तो सुर्रर्रर्र करून चहा प्यायची मजा काही वेगळीच असायची. यांच्या वाटणीचा थोडा चहा न चुकता माझ्यासाठी ठेवायचेच.

दुपारी जेवणाची वेळ झाली की हा मामाच्या घरी येऊन ५ रुपये घेऊन जाणार, ताडी प्यायला. दुपारी १२ किवा १ वाजता फुल्ल तर्र् होणार. त्यावेळेस ५ रूपयातसुद्धा अगदी खूप ताडी येत असावी. कारण हा १-२ ग्लास मध्ये ऐकणारा भिडू नव्हताच. कधी टाईट होऊन वेणू मामीला शिवीगाळ, कधी भांडण तर कधी मुकाट्याने जेवून आडवा होणार. तेच ते उघडं काळं अंग घामात भिजलेलं आणि कसलीही पर्वा नाही. कोण बघते आणि कोण काय विचार करते, याचा कसलाच थांगपत्ता नसायचा. ४-५ वाजता परत साहेब वाडीत. शिपण करणे, फुले खुडणे, गवताचे तण काढणे, नारळ पाडणे कोणतीही कामं सांगा, गडी आपला तयार. दोन नवटाक टाकले की गाडी एकदम सुपर डुपर फास्ट असायची. ७ वाजून गेले की साहेब परत ५ रुपये घेऊन ताडीच्या गुत्त्यावर. मला वाटतं याचं तिकडे पर्मनंट अकाउंट असावं. संध्याकाळी परत गाडी गियरमध्ये टाकून जेवायला हजर व्हायचे. याचा रोजचा हाच शिरस्ता. मामाच्या घराच्या बाजूला याला झोपडी बांधून दिली होती. तिकडेच राहायचा. मी कधीही आलो की अगदी आवर्जून बंधुजी कसे आहेत आणि बेन कशी आहे हे विचारणारच ( मामाकडे माझ्या आई आणि बाबांना बेन आणि बंधुजी असं म्हणतात). बाबांकडे कधी दिसले, की १० रुपये मागणार आणि दिल्यावर अगदी हसत त्याची ताडीवाल्याकडे दिवाळी साजरी करणार. याच्या आयुष्यात किती उलथापालथी झाल्या, पण गडी आहे तसाच आहे.

पोटचा मुलगा जीवानिशी गेला २ नातवांना मागे ठवून. सून घरातून स्वतःच्या मुलांना ठेवून दुसऱ्याबरोबर पळून गेली. पण पडेल तर तो गडी कसला. बेंढयामामा आणि वेणूमामीने त्यांचा सांभाळ केला आणि आता तर त्यांच्या नातवाचं लग्न ठरलं आहे, असं मला कळलं. लग्न, पूजा असे काही कार्यक्रम असले, हा कामास तयार, तर कधी नाटक. दारू पिऊन तर्र झाला की त्यातून कधी बाहेर येईल त्याचे त्यालाच माहीत. २-३ दिवस मग कुठेतरी पडलेला असायचा परत २-३ दिवसांनी काम सुरू, हा शिरस्ता गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. लग्नात म्हणजे पर्वणी असायची. तेव्हा कुठे मी बेंढयामामाला शर्ट आणि फुल पॅन्टमध्ये बघितलं असेन. आधी काम आणि मग हक्काची दारू म्हणजे त्याला काही अंतच नाही. मग गडी आठवडाभर गायब असायचा. किती वेळा निघून गेला असेल मामाकडून, पण परत येतच राहिला. आज त्याला हक्काचं घर मिळालं, तो तिकडे राहतो पण मध्ये मध्ये मामाकडे येतो. ७० वर्षांचा हा तरुण आजही नारळाच्या झाडावर चढतो आणि काम करतो. नक्कीच वयोमानानुसार वृद्धत्वाकडे झुकला असला तरी त्याची रांगडी शैली आजही मला त्या ३० वर्षांपूर्वीच्या बेंढयाची आठवण करून देते.

आज हाच विचार करतो, सगळ्या आजारांना आणि मरणाला घाबरणारे आपण, उद्याच्या आठवणीने न झोपणारे आपण सुखी, की तो २ नवटाक मारून सुखाने निद्रेच्या आधीन झालेला बेंढया?? ४ मजले चढून वयाच्या तिशीतच मधेच धाप लागणारे आपण आणि ७०व्या वर्षामध्येसुद्धा नारळाच्या झाडावर चढणारा बेंढया, नक्की तरुण कोण?? गेले ३० वर्षं या अवलियाला बघतो आहे. याच्या आख्ख्या अंगात रक्त नसावे अशी शंका येईल, इतकी दारू, ताडी या अवलियाने प्यायली. पण ब्लड प्रेशर, मधुमेह, कॅन्सर, हार्ट डिसीज यांतला एकही जण याच्या आसपासही फिरकलेला नाही. कदाचित याचं रहस्य त्या अंगमेहनतीतच असेल. पण आयुष्याला पूर्ण मोकळेपणे जगलेला हा अवलिया मला नेहमीच कोड्यात टाकत आला आहे...... !!

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Saturday 21 July 2012

२६ आणि २७ जुलै २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... भाग २


२६ आणि २७ जुलै २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... भाग २ 

प्रियदर्शनीवरून सायनच्या दिशेने  चालायला सुरूवात केली. नेहमी ५ मिनिटांचा रस्ता आज ५ तासांचा वाटत होता. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसत होते. त्यात सगळी वाहने अडकून अस्ताव्यस्त पडली होती. माणसं रस्त्याच्या मधून चालत होती. आम्हीसुद्धा असंच पुढे जायचं ठरवलं. म्हटलं सायनला जाऊन पोटपूजा करू. जवळपास ३ तास झाले होते, आम्ही पाणी आणि काही खाल्ल्याशिवाय चालत होतो. पोटातसुद्धा कालचे दोन पावच होते, जे काल रात्री आम्ही खाल्ले होते. मी आणि मित्राने चालायला सुरूवात केली. प्रियादर्शनीच्यापुढे खोलगट भाग असल्याने पाणी आता कंबरेवरून छातीपर्यंत वाढलं होतं. सगळ्यांची चालताना वाट लागत होती. पायात गोळे आले होते. थंडी वाजत होती. गेले ३ तास अर्धे शरीर पाण्यामध्येच होते,  कपडे ओले, असं कुठंपर्यंत राहणार याची पुसटशी कल्पना सुद्धा मला नव्हती. चालताना बरीच काळजी घ्यावी लागत होती. सगळीकडे गटाराची झाकणं उघडल्याने त्यात पडायचा धोका होताच. सगळीकडे पाणी आणि मधून माणसांची रांग. ज्या रस्त्यावर फक्त वाहने आत्तापर्यंत मी बघितली होती, त्या रस्त्यावर हे दृश्य खूपच वेगळे वाटत होते. एक अनामिक भीती मनात होती, की आता पुढे काय??

सायनला येताच आधी काही खायला मिळते का, याचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोटात अन्नाचा कण नसल्याने खूप भूक लागली होती. अंग एकदम ओलंचिंब होऊन थरथरत होतं. एक कप चहा मिळाला तर बरं होईल, या अपेक्षेने आम्ही सायनचा परिसर धुंडाळला. पण हाती काहीच लागलं नाही. सायनच्या चौकात असलेल्या हॉटेल मालकाने सांगितलं, "साहेब काही नाही हो, काल रात्री लोकांची अवस्था बघून जे काही होतं ते दिलं. काही लोकांनी तर कोथिंबीरसुद्धा नुसती खाल्ली इतकी अवस्था वाईट होती. आता माझ्या कडे काहीच नाही". हे ऐकल्यावर काही मिळेल ही आशा आम्ही सोडून दिली व वांद्रेला जायचा निर्णय घेतला. तसंच चालत हळूहळू पाण्यातून मार्गक्रमण सुरूच ठेवलं. सायन पुलावरून रेल्वे रूळावर असलेलं पाणी बघून अजून २-३ दिवस तरी काही गाड्या चालू होत नाही याची पूर्ण कल्पना आम्हाला आली. धारावीमधून जाताना पाहिलं, सगळ्या दुकानांत पाणी घुसलं होतं. इकडे स्त्रियांच्या पर्स खूप छान मिळतात, असं ऐकून होतो, आज त्या जिकडेतिकडे पाण्यात तरंगताना बघत होतो. वांद्रेला पाण्यातून येईपर्यंत ११ वाजत आलेले होते. सकाळी ७ वाजल्यापासून जे आम्ही चालत होतो, ते चालतच होतो. ना पाणी कमी झालं होतं, ना आम्हाला काही खायला प्यायला मिळालं होतं. आता मात्र पायात प्रचंड गोळे आले होते. पाण्यातून चालण्यासाठी खूप जोर काढावा लागत होता, आणि गेल्या ४-५ तासांमध्ये पायाची खूपच हालत झाली होती.

वांद्र्यावरून काय करायचं सुचेना. स्टेशनवर जाऊन काहीच उपयोग नव्हता. गाड्या सुरू होण्याची कोणतीच चिन्हं दिसत नव्हती. आता मनाशी विचार केला, की असंच लोकांबरोबर पुढे जाऊ. जिथपर्यंत शरीर साथ देईल तिथपर्यंत. वांद्र्याच्या थोडे पुढे आलो असेन, आमच्या बरोबर एक गरोदर बाई पाण्यातून चालत होती. साधारण ७वा महिना असेल. उंची कमी आणि पाणी पोटाच्यावर असल्याने तिची अवस्था खूपच गंभीर होती. तिच्या मैत्रिणीलाही काही सुचत नव्हते. मी आणि माझ्या मित्राने त्यांना सांगितले, की तुम्ही दुभाजकावरून चाला म्हणजे त्रास कमी होईल. मग एका बाजूने मी आणि दुसऱ्या बाजूने माझा मित्र त्यांचे हात धरून त्यांनी कसंबसं त्यावरून चालायला सुरूवात केली. आता पाणी ढोपराच्या खाली आल्याने त्यांचा त्रास कमी झाला होता. काही अजून लोकही मदतीला आले. मग हळूहळू करत आम्ही कसेबसे त्यांना वाकोला ब्रीजवर नेले. त्यांना तिकडेच थांबण्यास सांगितले, कारण त्यांची अवस्था खूपच बिकट होती. त्यांच्या काही मैत्रिणी तिकडेच भेटल्याने आम्ही त्यांना सोडून आता पुढची वाट चालू लागलो.

वाकोला ब्रीजवर वाहने अस्ताव्यस्त पडली होती. गाड्या तश्याच सोडून लोक निघून गेले होते. ब्रीज उतरल्यावर परत पाण्यातून प्रवास सुरू झाला. आता खरंच चालवत नव्हते. आधी इतक्या जोरात चालणारे आम्ही दोघेही थकून अक्षरशः एक-एक पाऊल मोजून मोजून पुढे टाकत होतो. इतकं सगळं झाल्यावर अजून पुढे काय वाढून ठेवलं होतं, हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. आंतरदेशीय विमानतळापर्यंत आलो, तिकडे एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालत जाणाऱ्या लोकांना पाणी आणि एक पार्ले बिस्कीटचा पुडा मोफत देण्यात येत होता. त्या क्षणी माझ्यासाठी ते देवच होते. पाणी पिऊन ४ पार्लेची बिस्कीटं खाऊन त्यांचे मनापासून आभार मानले. निदान मुंबईत थोडीफार माणुसकी आहे, त्याचं दर्शन मला पहिल्यांदा झालं. माझ्या आयुष्यातील ती ४ बिस्कीटं सगळ्यात संस्मरणीय होती. अंधेरीपर्यंत चालत आल्यावर एक बेस्टची बस दिसली. ती स्टॉपवरून निघणार याचा अंदाज आम्हाला आला,  आणि दोघांनीही वीजेच्या वेगाने धावायला सुरूवात केली. अंगात होते नव्हते तितके बळ काढून कसंबसं त्या बसपर्यंत पोहोचलो व आत शिरलो. वाहन वाहकाने बस बोरीवलीपर्यंत जाईल असं सांगितलं. पण जिकडे पाणी चाकाच्या वर असेल, त्यापुढे जाणार नाही हेही सांगायला तो विसरला नाही. इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा आपली ड्युटी प्रामाणिकपणे करणाऱ्या त्या बेस्ट कर्मचाऱ्यांचे आभार मनोमन मानले.

बस सुरू झाली. गोरेगाव येईपर्यंत बसमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. पण जो हात दाखवेल त्याला घेऊनच ती पुढे जात होती. अखेर तो क्षण आला.  दुपारी ४ वाजता मी मागठाणे डेपोला बसमधून उतरलो. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या प्रवासाची ती सांगता होती. माझा मित्र आधीच गोरेगावला त्याच्या घरी पोहोचला होता. चालायला अंगात त्राणच नसल्याने एका रिक्षाला थांबवून मी घरी पोहोचलो. काय काय उपद्व्याप करून मी घरी आलो, त्याचा विचार मी करत बसलो. आईने मस्तच जेवण बनवलं आणि मी त्या जेवणावर अगदी तुटून पडलो, जणू काही कित्येक दिवस मी काही खाल्लंच नव्हतं! या दोन दिवसांनी मला खूप काही शिकवलं, खूप काही अनुभव दिले. निसर्गाच्यापुढे मानव किती खुजा आहे, हेच त्याने त्या दिवशी मानवाला दाखवून दिले होते.

Thursday 5 July 2012

२६ आणि २७ जुलै, २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... विनीत वर्तक ©


२६ आणि २७ जुलै, २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... विनीत वर्तक ©

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत पावसाने अगदी ठाण मांडलं,  म्हणजे मनापासून तो गरजला आणि बरसला सुद्धा. १२ तासांच्या काळात मुंबईत जवळपास ९०० मिमी इतका पाऊस झाला. अनेक वर्षांचे विक्रम त्याने मोडीत काढले. याच दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये कामात होतो. साधारण दुपारी १ च्या सुमारास सगळ्यांना घरी जाण्यास सांगितले गेले. बसची वाट पाहण्यात १ तास गेला. आणि तो कोसळत होता, अगदी मुक्तपणे. भाभा अणुसंशोधन केंद्राचा परिसर हा इतका मोठा आहे, की आतमध्ये येण्याजाण्यासाठी बस लागतेच. दोन टोकांमध्ये जवळपास ८ किमी इतकं अंतर आहे. म्हणजे चालत जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. बस ३च्या सुमारास आली. बोरिवलीला जाणारी पूर्ण ऑफिस सोडल्याने बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. कसंबसं स्वतःला त्यात कोंबून बस भाभाच्या बाहेर आली, पण मोठं दिव्य तिकडेच होतं. मुळात भाभा अणुसंशोधन केंद्राची घरं ही डोंगर उतारावर आहेत आणि त्यामुळे अगदी छोट्या पावसातसुद्धा बाहेर पडण्याच्या जागेवर कमरेइतके पाणी होते, त्यात उतारामुळे त्यास जोरही खूप असतो. आज तर त्याचा दिवस होता. त्यामुळे पाणी प्रचंड साठलं होतं आणि तो बरसत होता. बस जेमतेम गेटपर्यंत आली तासाभरात. बाहेर कोसळणारा पाऊस बघून राहवेना आणि त्यात बसमध्ये इतकी गर्दी, की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. काचा बंद असल्याने आतमध्ये भरपूर घुसमट होत होती. मी आणि माझा एक मित्र जो गोरेगावला राहत होता, आम्ही दोघे बसमधून बाहेर पडलो, बस तिकडेच उभी.  चालत जाऊन पुढे बघितलं तर एका बसची पूर्ण चाकं बुडून बसमध्ये पाणी शिरत होतं आणि इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती बंद पडली होती. मागे निदान २० बस उभ्या होत्या आणि त्यामागे आमची बस म्हणजे अजून तासभर तरी ती हालत नाही असं आम्ही सोप्पं गणित केलं, त्यात तो बरसत होताच अगदी कोसळत होता. आमचा एक मित्र कॉलनीमध्येच राहत होता, तो भेटला आणि म्हणाला, 'आज इकडेच राहा माझ्याकडे, आपण मस्त जेवण बनवू, पार्टी करू उद्या घरी जा'. पाऊस ज्याप्रमाणे कोसळत होता ते बघून उद्या काय ऑफीस उघडत नाही, हे आम्हाला कळून चुकलंच होतं. सगळ्यांत आधी एका दुकानातून घरी फोन केला. भाभामध्ये मोबाईलला परवानगी नसल्याने शेवटी पब्लिक फोनचा आसरा घ्यावा लागत होता. व्यवस्थित आहे असं घरी सांगून आजची रात्र इकडेच थांबणार आहे असे कळवले.

मित्राने तोपर्यंत रात्रीच्या जेवणासाठी सामुग्री आणायला सुरूवात केली, पण तोपर्यंत सगळंच बंद झालं होता. कशी बशी २४ अंडी मिळाली, म्हटलं आज यावर ताव मारू. २० पाव आणि २४ अंडी आणि आम्ही ३ जण म्हटलं, झकास होईल. त्याच्या घरी पोहोचलो आणि बघतो तर आमच्या ऑफिसमधले ९ जण आधीच त्याची वाट बघत थांबले होते. आता त्या २४ अंड्यांमध्ये १२ पोटं भरायची होती, कारण एकटा असल्याने त्याच्या घरात जास्ती खायला असं काहीच नव्हतं. जसजशी रात्र वाढू लागली, तसा पावसाचा जोर वाढला. आज तक, झी न्यूज, एनडीटीवी-वर बातम्या बघत पावसाने मुंबईची जी हालत करून टाकली होती, ते बघत होतो. तेव्हा कुठे माहीत होतं, ही तर सुरूवात आहे, खरा पाऊस तर अजून यायचा आहे. जेवायला बसणार तितक्यात अजून ४ मित्र त्याच्या घरी आले. आता मात्र पंचाईत होती. 16 जणांनी त्या २४ अंड्यांवर आणि १२ पावांवर कधीबशी भूक भागवली. रात्री कधी झोपी गेलो ते कळलंच नाही. तो अजूनही बरसत होता.

सकाळी लवकर उठून मी आणि माझा गोरेगावचा मित्र लगेच निघालो. पावसाचा जोर कमी झाला होता. रिमझिम सरी चालू होत्या. २७ जुलै २००५ ची ती सकाळ होती. त्याच्या घरून भाभाच्या गेटवर आलो.  सगळीकडे सामसूम पाणी कमी झालं होतं. पण जाण्यासाठी काही वाहन दिसेना. तुरळक लोक चालत होती. मित्राला म्हटलं, आता हाच उपाय इकडे थांबून काही होणार नाही आपण हायवे-ला जाऊ, तिकडे काही ना  काही मिळेल. आम्ही चालत चालत हायवे-ला आलो. बस थांब्याजवळ एखाद्या तरी बसची वाट बघत आमच्यासारखी २५ एक मंडळी होती. तिकडे १५ मिनिटे थांबलो, पण एकही बस थांबेना. शेवटी लांबून एस.टी. येताना दिसली. सर्वांनी ठरवलं, की कसंही करून थांबवायची. त्याप्रमाणे पूर्ण रस्त्यात मानवी साखळी करून उभे राहिलो, आणि आम्ही मध्ये म्हणजे त्याने थांबवली नाही तर आमची विकेट. पण हा असला प्रकार बघून त्याने बस थांबवली. सगळे कसेबसे      चढलो, अक्षरशः कोंबलो. मी आणि मित्र वरती बसलो, म्हणजे बसच्या टपावर. बस जेमतेम अर्धा किमी पुढे गेली, आणि वाहनांची कोंडी झालेली दिसली.  टपावर असल्याने आम्हाला लगेच अंदाज आला, की नजर जाईल तिकडे गाड्या दिसत होत्या.  म्हणजे त्या टपावर बसून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. आम्ही उतरून चालू लागलो. आर.के. पर्यंत व्यवस्थित चालत आलो. त्यानंतर खरी परीक्षा चालू झाली. पुढे पूर्ण रस्त्यावर कमरेइतके पाणी भरले होते. सगळी वाहने वेडीवाकडी  अडकून पडली होती. कोणाला काहीच कळत नव्हते. मी आणि मित्राने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्या पाण्यातून वाट काढत आम्ही पुढे जाऊ लागलो. आमच्याबरोबर काही इतर जणही  चालू लागले. आधी थोडं विचित्र वाटत होतं, कारण ते घाण पाणी आणि त्यातून आपण चालतो आहोत, वरून पाऊस. सगळं कसं विचित्र होतं, पण दुसरा पर्याय समोर दिसत नव्हता. ऑफिसची बॅग डोक्यावर आणि एका हाताने स्वतःला सावरत पाण्याचा अंदाज घेत रस्त्याच्या मधून चालत होतो. गटाराची  झाकणं उघडी केल्याने खूप सांभाळून चालावं लागत होतं. एक दोन ठिकाणी आम्हाला कळल्यावर तिकडे काठ्या उभ्या केल्या, जेणेकरून मागे चालत येणाऱ्या लोकांना अंदाज येईल. हळूहळू आमचा एक १५-२० जणांचा ग्रुप झाला चालता चालता, यात २-३ स्त्रिया ज्या आमच्यासारख्या अडकल्या होत्या. काही कॉलेजची मुलं आणि असेच घराकडे जाणारे लोक होते. चेंबूरपासून हळूहळू चालत येऊन प्रियदर्शनीपर्यंत आलो, सगळा हाय-वे ठप्प. सगळ्या गाड्या वेड्यावाकड्या. एका गाडीमध्ये एक माणूस अडकला होता. रात्री एसी लावून गाडीत झोपला, पण जसं पाणी गेलं इंजिनमध्ये, गाडी बंद आणि ऑटो लॉक असल्याने दरवाजे खिडक्या बंद. आतून त्याला काहीच करता येत नव्हते. शेवटी माझ्याबरोबर असलेल्या लोकांनी दगड शोधायला सुरूवात केली.  बाहेरून पाणी असल्याने काच फुटत नव्हती. आता दगड लागणारच होता, पण शोधावा कुठे? मग सगळे लोक रस्त्याच्या कडेला माणसाची साखळी करून गेले व एक मोठा दगड कसाबसा हातानी उचलून आणला आणि दरवाजाची काच फोडली. बिचारा आतमध्ये घुसमटला होता, बाहेर येताच कोणीतरी त्याला पाणी दिलं, त्याने आभार मानले आणि तो मार्गस्थ झाला. सकाळपासून पोटात पाण्याचा एक थेंबही नव्हता. पण आजूबाजूच्या लोकांची अवस्था बघून मला तहान लागली आहे, हे मी विसरून गेलो होतो.... क्रमश:

Tuesday 12 June 2012

ऑईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ... एक उत्कृष्ट करियर पर्याय....भाग २ .. विनीत वर्तक

ऑईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ... एक उत्कृष्ट करियर पर्याय....भाग २ .. विनीत वर्तक

मागील भागात बघितलं, की ऑईल कसं तयार होतं. ऑईल जमिनीखाली शोधणं आणि त्यानंतर ते वर काढून, त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या घटकांत ते बदलणं, ही बरीच मोठी प्रक्रिया आहे. कोणतीही एक कंपनी सगळ्याच टप्प्यांवर स्वतः सगळी उपकरणं तयार आणि प्रक्रिया करू शकत नाही आणि मग तिथेच येतात सर्व्हिस कंपन्या. सर्वप्रथम ज्याठिकाणी ऑईल शोधायचं, त्या ठिकाणचा भूगर्भीय अभ्यास  केला जातो, यामध्ये येतं भूस्तरीय रचना, तिथल्या भूगर्भाची हालचाल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्लेटस्. साधारणतः जिकडे अश्या प्लेटस् असतात, तिकडे ऑईल मिळण्याची शक्यता जास्त असते. एकदा हा अभ्यास झाला, की मग त्याचा सेस्मिक(seismic) अभ्यास केला जातो, यात ध्वनीलहरी जमिनीत पाठवून त्यांच्या प्रतिध्वनीचा अभ्यास करून एक अंदाज  बांधला जातो, की किती खोलीवर कोणत्या स्वरूपाचा भूस्तर आहे. एकदा हे सगळं झालं, की एक संशोधनाची विहीर खणली किवा ड्रील केली जाते. ड्रील करत असताना, भूगर्भातील रचनेच्या अभ्यासासाठी त्याचा लॉगिंग केलं जातं. या अभ्यासाच्या जोरावर मग पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. समजा ऑईल असण्याचं सिद्ध झालं, तर मग अजून अश्याच स्वरूपाच्या २-३ विहिरी केल्या जातात, ज्यात आतील रचनेचा अगदी बारकाईने अभ्यास केला जातो, नंतर या भूस्ताराचे क्षेत्र ठरवले जाते, आणि त्यातून किती ऑईल आपण काढू शकतो, याचा अंदाज बांधला जातो. त्यात असणारे सगळेच्या सगळे ऑईल आपण बाहेर काढू शकत नाही. मुळात ऑईल हे पाण्याप्रमाणे वाहतं नसतं, तर ते असतं पोरस(porous) दगडांच्या फटींमध्ये. उदाहरण द्यायचं झालं, तर चूनखडक किवा वाळूचा दगड. यांत असणाऱ्या पोकळ जागेत ऑईल दडलेलं असतं, म्हणजे स्पंजप्रमाणे. स्पंजमध्ये पाणी असेल, तर ते वाहत नाही पण जर तुम्ही स्पंजला पिळलं, तर त्यातून भरपूर पाणी बाहेर पडतं, तसंच काहीसं.

एकदा का अभ्यास पूर्ण  झाला, की मग या क्षेत्रात उत्खनन सुरू होतं. उत्खनन करणाऱ्या विहीरी आता सरळ ड्रील न करता त्यांना पूर्णतः आडवं करण्यात येतं, ज्यायोगे जास्तीत जास्त ऑईल भूस्तरामधून बाहेर काढता येईल. ओईलचं क्षेत्र मुख्यतः काही मीटर जाडीमध्ये असतं, पण ते २००-१००० किलोमीटरपर्यंत पसरलेलं असू शकतं. त्यामुळेच आज काल जास्तीत जास्त विहिरी आडव्या स्वरूपाच्या ड्रील केल्या जातात. वर वाचताना ही गोष्ट अतिशय सोप्पी वाटत असेल, पण जमिनीच्याखाली जवळ पास ३०००-५००० मीटर्स खोली आणि जवळ पास १२० डिग्री सेल्सिअस तापमानात अगदी ५ ते १० मीटरच्या छोट्या भूस्तरात विहिरीला आडवं करणं, आणि तसंच ज्याप्रमाणे भूस्तरात उतार चढाव होतील त्याप्रमाणे विहिरीत वर-खाली करणं, खूप कठीण काम आहे. एकतर जमिनीचा दाब, तापमान, माहीत नसलेल्या गोष्टी आणि त्यात ड्रील करताना होणारे आवाज आणि धक्के यांतून जमिनीचा अभ्यास करणं, हे खूप मोठं जिकीरीचं काम आहे. एक सोप्पं उदाहरण, तुम्ही कधी तुमचा कॉम्प्युटर जमिनीवर आदळून अगदी ५ फुटावरून परत चालू केला आहे?? किवा घरातील कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जर अशी आदळली, तर ती परत सुरू होणं अगदीच अशक्य. मग कल्पना करा, '२५ जी फोर्स'मध्ये काय होत असेल? (माणूस फक्त '९ जी फोर्स'पर्यंत स्वतःला सहन करू शकतो, ते सुद्धा अद्ययावत प्रशिक्षण घेतलेले आणि जेट विमान चालवणारे चालक). या सर्व कठीण परिस्थितीमध्येसुद्धा कॉम्प्युटरने काम करावं, यासाठी विशिष्ट बदल करावे लागतात, आणि ते करून मगच आपल्याला भूस्तराचा अभ्यास करता येऊ शकतो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, की हे सगळं करण्यासाठी पैसा आणि संशोधन आलंच, आणि त्याचबरोबर याचा वापर करण्यासाठी पैसे मोजणंही आलंच. अशी अद्ययावत उपकरणं चालवण्यासाठी त्याचा योग्य आणि नीट वापर करणारे लोकही आलेच, आणि त्याचबरोबर मिळणारं मानधनही.

जमिनीखालून मिळणारं ऑईल हे जमिनीच्या खाली दबलेलं असतं, आणि त्यावर प्रचंड दाबही असतो. कल्पना करा, एखाद्या हवा भरलेल्या फुग्यामध्ये तुम्ही टाचणी टोचली, तर काय होतं? तर बाहेर निघणाऱ्या हवेच्या जोरामुळे अतिप्रचंड दाब निर्माण होऊन फुगा फुटतो. तसंच ऑईल असलेलं भूस्तर प्रचंड दाबाखाली असतं, आणि आपण करणारं ड्रील हे त्या टाचणीचं काम करतं. जर बाहेर येणारं ऑईल दाबलं नाही, तर वाटेत येणारं सगळं उध्वस्त करतं. 'गल्फ ऑफ मेक्सिको'मध्ये झालेला हाहाकार वाचलाच असेल, याला ब्लो-आऊट असं म्हणतात. असं होण्यापासून  रोखण्यासाठी ड्रील करताना मड वापरतात . यात काही रासायनिक द्रव्यं मिसळलेली असतात. या मड-चा दाब हा त्या ऑईलच्या दाबापेक्षा जास्त असेल, तरच आपण व्यवस्थित ड्रील करू शकू,  म्हणूनच या क्षेत्रात धोके खूप आहेत. प्रत्येक गोष्ट ही दोनदा तपासून मग केली जाते, एखादी चूक आणि त्याचा फटका एखाद्या कंपनीच्या नाशामध्ये होऊ  शकतो. 'बी पी' या कंपनीला 'गल्फ ऑफ मेक्सिको' मध्ये बसलेला झटका १५ बिलियन अमेरिकन $ चा आहे. त्याशिवाय पर्यावरणाचा नाश, जीवितहानी असं भरून न येणारं नुकसानही आहे. त्याचबरोबर ड्रील करताना उपयोगात येणारे रासायनिक द्रव्यंही आजूबाजूचं पाणी, जागा हे सगळं खराब करत असतात.
ड्रील झाल्यानंतर त्यातून ऑईल काढायला सुरूवात होते. ऑईलवर असणाऱ्या दाबामुळे ते स्वतःच वरती येते, पण जर जास्ती वेळ काढल्यावर त्यावरील दाब कमी होतो व मग सक्शन-पंप किवा आर्टिफिशिअल लिफ्ट या तत्वाचा वापर करून ऑईल बाहेर काढले जाते. ते येताना त्या बरोबर पाणी, नैसर्गिक वायू, तसेच सगळ्यात घातक H2S वायूसुद्धा बाहेर येतो. H2S वायू प्राणघातक असून त्याच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने मृत्यू ओढवू शकतो. बाहेर येणारे सगळेच वायू उपयोगी नसतात, आणि त्यांना साठवणेसुद्धा घातक असते, म्हणून त्यांना जाळून टाकण्यात येते. आधी बाहेर निघणारा नैसर्गिक वायूसुद्धा जाळला जात होता, आता याचा उपयोग घरगुती वापरासाठी तसेच गाड्यांमध्ये केला जातो.

इकडे नोकरीच्या संधी खूप आहेत, कारण घरापासून लांब राहून काम करावे लागत असल्याने खूप कमी जण या क्षेत्राकडे वळतात. त्याच बरोबर धोकेही आहेतच, पण इकडे मिळणारे मानधन हे तुम्हाला साध्या ऑफिस नोकरीत मिळणाऱ्या मानधनाच्या कैकपट असते. कदाचित एखाद्या ठिकाणी ३० वर्षं नोकरी करून तुम्हाला जितकं मानधन मिळणार नाही, ते तुम्ही इकडे ५ वर्षांत कमवू शकता. त्याचबरोबर ६ आठवडे कामानंतर ३ आठवडे भरपगारी सुट्टी किवा २८ दिवस कामानंतर २८ दिवस भरपगारी सुट्टी. इतकं असूनसुद्धा घरचा विरह हा आहेच, त्याचबरोबर धोके सुद्धा. ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, ज्यांना घरून आई, बाबा, बायको , नवरा , मुलगा, मुलगी या सर्वांचा सपोर्ट आहे, त्यांनी या क्षेत्रात यावं. मुळातच स्वस्थ जीवन जगणाऱ्या माणसांचं हे कार्य क्षेत्र नक्कीच नाही, ज्यांना धडपड करायची आहे आणि खूप काही शिकायचं आहे, त्याचबरोबर चांगला पैसा कमवायचा आहे त्यांनी या क्षेत्राचा आवर्जून विचार करावा. इकडे विहिरीला आडवं करणाऱ्या आणि बरोबर त्या भूस्तरात नेणाऱ्या व्यक्ती दिवसाला जवळपास ३०,००० कमावतात  आणि त्याशिवाय तुमचा पगार वेगळा म्हणजे निदान ८-१० लाख रुपये एका महिन्याला तुम्ही आरामात कमवू शकाल, पण त्यासाठी हवी जिद्द, जवळपास १५-२० वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आणि घरच्यांचा सपोर्ट. या क्षेत्रात पैसा नुसता नाही तर बरंच काही शिकायलाही मिळतं आणि एक आपण केलेल्या कामाची अनुभुतीही आहेच. येणाऱ्या काळात या क्षेत्राचं महत्व वाढतच जाणार आहे, आणि हो त्यायोगे मिळणार मानधन आणि अमर्याद संधी. कारण अजून आपण पृथ्वीचा ६०% भाग शोधलाच नाही ओईल साठी, कारण तशी व्यवस्था आपल्याकडे नव्हती, उद्या कदाचित ती असेल आणि येणाऱ्या संधीसुद्धा.

Monday 11 June 2012

ऑईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र...एक उत्कृष्ट करियर पर्याय... विनीत वर्तक

ऑईल आणि नैसर्गिक  वायू क्षेत्र...एक उत्कृष्ट करियर पर्याय... विनीत वर्तक

ऑईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र म्हटलं, की आपल्याला समोर दिसतं ते पेट्रोल आणि डिझेल आणि आपल्या घरी नळावाटे  येणारा नैसर्गिक वायू. याचे उत्पादन कसे केले जाते, याची आपल्याला फारच जुजबी माहिती असते. थोडंसं या क्षेत्राविषयी. मुळात या दोन्ही गोष्टी पृथ्वीच्या भूगर्भात तयार होतात. त्यासाठी लागतात त्या ऑरगॅनिक गोष्टी ज्या भूस्तरामध्ये दाबल्या जाऊन, त्यांचं विघटन होतं, आणि योग्य ते तापमान आणि दाब मिळाला, की याचं रुपांतर होतं 'क्रूड ओईल'मध्ये. याला हायड्रोकार्बन असेही म्हटले जाते, कारण यात जास्ती करून हायड्रोजन आणि कार्बन याची संयुगं असतात. ही संयुगं तयार होण्यासाठी बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात. प्रथम ऑईल तयार होते आणि मग जसे खोलवर जाऊ तसा नैसर्गिक वायू. यातही बरेच प्रकार आहेत. तयार झालेलं ऑईल एखाद्या विशिष्ट भूस्तरात होते, आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा त्याला पूर्णत्वास गेलेला दगड किवा भूस्तर असं म्हणतात. 

ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि ही होण्यासाठी करोडो वर्षं जावी लागतात. म्हणजे आज आपण जे ऑईल काढतो आहोत, त्याची सुरूवात करोडो वर्षांपासून झाली आणि आजही ऑईल तयार होते आहे, फक्त आपण आज ज्या वेगाने काढतो आहे, तो वेग तयार होणाच्या वेगापेक्षा अतिप्रचंड आहे, आणि म्हणूनच हळूहळू याचे चटके आपल्याला बसत चालले आहेत. ऑईलच्या वाढणाऱ्या किंमती, हे त्याचंच द्योतक आहे. जगात ऑईलचा २०११च्या अखेर जवळपास १३२४ गुणिले १० चा ९ वा घात(१३२४ x (१०^९)) इतका साठा आहे. आजच्याप्रमाणे जर आपण ऑईल काढत राहिलो, तर जवळ पास अजून ६४ वर्षं हे ऑईल पुरू शकेल परंतु ही संख्या अतिशय ढोबळमानाने आहे. प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ बघून किती ऑइलचं उत्पादन करायचं ते ठरवत असतो आणि त्याचा सरळ सरळ परिणाम ऑईलच्या किंमतीवर होतो. जगातील सगळ्यात मोठा ऑईलचा साठा हा २०११ अखेर, सौदी अरेबियाकडे नसून व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशाकडे आहे, यातून दररोज २.१ गुणिले १० चा ६ घात (२.१ x (१०^६)) इतकं बॅरल ऑईल काढले जाते, (१ बॅरल म्हणजे जवळपास 150 लीटर) तरीसुद्धा पुढची ३९१ वर्षं ऑईल पुरेल, इतका हा अतिप्रचंड साठा आहे. तर त्या खालोखाल नंबर लागतो, सौदी अरेबियाचा. हा देश रोज ८.९ गुणिले १० चा ६ वा घात (८.९ x (१०^६)) इतका बॅरल ऑईल रोज काढतो, या हिशोबाने त्यांच्याकडील ऑईल जवळपास ८१ वर्षं पुरेल. आज आपण रोज ९०००० बॅरल  इतकं ऑईल फस्त करत आहोत आणि त्यात भर पडतच आहे.  म्हणूनच येणाऱ्या काही काळात हे क्षेत्र पूर्ण जगाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे.

मुळात ऑईल हे जगाच्या अश्या ठिकाणी मिळते, की हे सगळे भाग हे काम करण्यासाठी अतिशय दुर्गम मानले जातात. सांगायचं झालं, तर वाळवंटी प्रदेश, समुद्र आणि पृथ्वीचे दोन ध्रुव. त्यामुळेच या क्षेत्रात काम करण्यात खूप जोखीम असते, पण या जोखमीमुळेच तुम्हाला मिळणारा मोबदला सामान्य नोकरीच्या कित्येकपट असतो. मुळात ऑईल जमिनीखालून बाहेर काढणं आणि त्यापासून पेट्रोल आणि डिझेल बनवणं, ही खूप खर्चिक प्रक्रिया आहे. सांगायचं झालं, तर एका खोल समुद्रात उत्खनन करणाऱ्या रिगचा भाव असतो रुपये २०,००० प्रत्येक मिनिटाला. म्हणजे तुम्ही जर कामात ५ मिनिटे वाया घालवली, तर तुम्ही कंपनीचा १ लाख रुपयांचं नुकसान केलं. इतका प्रचंड पैसा या सर्व प्रक्रियेत लागतो, की मुळातच खर्चिक असणारी ही प्रक्रिया देशोदेशांच्या भांडणं आणि श्रीमंत होणाच्या वृतीने अधिक खर्चिक होते. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, की या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा नफा आणि एकूण कामाचा आवाका किती प्रचंड असेल. थोडक्यात सांगायचं झालं, तर 'अएक्सोन मोबिल' या कंपनीचा २०११चा रेव्हेन्यू आहे, ४८६ बिलियन अमेरिकन $. मी ज्या कंपनीत काम करतो, तिचा रेव्हेन्यू आहे ४० बिलियन अमेरिकन $. आता हे उत्पन्न जगातील सर्वांत श्रीमंत पद्मनाभन मंदिरात मिळालेल्या खजिन्याच्या दुप्पट आहे, आणि तेही एका वर्षातील. (पद्मनाभन मंदिरातील खजिन्याची आजमितीला किंमत आहे १ ट्रिलिअन रुपये किवा २४ बिलियन अमेरिकन $) आणि 'मोबिल'चं वार्षिक उत्पन्न या खजिन्याच्या २० पट आहे. मग इतका अतिप्रचंड प्रमाणात पैसा या कंपनी कमावत असतात,  आणि त्यायोगे या क्षेत्रात काम करणारे सगळेच जण... क्रमश: 

(पुढील भागात ऑईल कसं शोधतात, काढतात त्याविषयी आणि या क्षेत्रात असणाऱ्या नोकरीच्या संधी, धोके आणि उत्पन्न यांविषयी... )

Sunday 10 June 2012

'अमेरिका' एक स्वप्न..... पुढे चालू ( भाग २ )


'अमेरिका' एक स्वप्न..... पुढे चालू ( भाग २ ) 

व्हिसाचे सोपस्कार आटोपल्यानंतर मग खरी धावपळ सुरु झाली. ऑफिसमधून सुट्टी मिळाली, त्यामुळे ट्रेनिंग झाल्यावर एका आठवड्याची सुट्टी मिळाली होती. आता यक्ष्यप्रश्न समोर होता, की अमेरिका बघायचा आहे. पूर्व-पश्चिम असा खूप मोठा विस्तार असलेला देश इतक्या कमी वेळात बघणं तर अशक्य. मग ठरवलं, की या वेळेस कोणत्या तरी एका दिशेकडून सुरूवात करू, म्हणजे प्रवासातला वेळही वाचेल आणि जास्तीत जास्त बघता येईल. या कामी मग जयेशदादाची आणि माझा वर्गमित्र विवेकची मदत घेतली. जयेशदादा सॅनहोजेमध्ये राहत होता 'सिलिकॉन व्हॅली' म्हणतात तो हाच प्रदेश. तो म्हणाला, तू इकडे ये मी बघतो सगळं, फक्त तू कधी निघणार आणि कुठून सुरूवात करणार परतीच्या प्रवासाची ते ठरवून सांग, म्हणजे त्याप्रमाणे मी ठरवतो सगळं. येताना सॅनफ्रान्सिस्कोमधून सुरूवात करावी, असं ठरलं, त्याप्रमाणे ऑफिसमधून तिकीट बुक केलं. जयेशदादानी हुस्टन ते सॅनफ्रान्सिस्को आणि तिकडे फिरण्याच्या प्रवासाची सगळी तजवीज केली. सगळं एकदम एकमेकाला लागून होतं, कारण वेळ कमी आणि खूप काही बघायचं होतं. थोडी उलथापालथ आणि माझा कार्यक्रमच बोंबलेल अशी धाकधूक मनात होतीच. तरीसुद्धा जयेशदादा स्वतः असल्यामुळे काळजी नव्हती. हा तर झाला ६ आठवडयानंतरचा भाग, पण ह्यूस्टनमध्ये काय करायचं, हे काही सुचत नव्हतं.  कोणीच ओळखीचं नाही आणि तितक्यात वर्तककाका माझ्या घरी आले आणि त्यांच्या बोलण्यातून कळलं, की प्रज्ञा त्यांची मुलगी तिकडेच आहे. चला! मनात म्हटलं, की काहीतरी तोंडओळख आहे या शहरात. मग प्रज्ञाशी बोललो, तिने माझ्या हॉटेलचा पत्ता वगैरे विचारून घेतला व तिचेही घर फक्त ३० मिनिटाच्या अंतरावर होतं असं कळलं. चला, तर ही तयारी तर झाली, आता प्रश्न होता समान भरण्याचा...

या सगळ्या गडबडीत मनात अजून एक चिंता होती, ती म्हणजे सईची, माझी मुलगी अवघी ४ महिन्याची होती. तिला आणि मोनाला अश्यावेळी सोडून इतक्या लांब जायला मन तयार नव्हतं पण इलाजही नव्हता. कारण इतक्या लहान वयात सईला तिकडे नेणं म्हणजे थोडं कठीणच काम होतं, आणि घरातही सगळे याच्या विरोधातच होते. मोनाने अगदी मोठ्या मनाने मला पाठींबा दिला, आणि निश्चिंतपणे जायची तयारी करावयास सांगितली. मित्रांकडून आणि जयेशदादाकडून काय घ्यावं आणि काय घेऊ नये याची माहिती होतीच आणि आधीच्या ६-७ इतर देशातल्या टूरचा अनुभव होताच. त्याप्रमाणे सामानाची तयारी झाली. आता तो दिवस जसा जवळ येत होता, तशी धाकधूक वाढतच होती. गणपतीबाप्पाचं दर्शन या वेळी मुकणार याची मनात कुठेतरी खंत होती, पण पुढे काय वाढून ठेवलं होतं, त्या बाप्पालाच माहीत.. कतार एअरवेजने माझं प्रस्थान झालं, मुबईवरून दोहा ला. दोहाला ४ तासांच्या आरामानंतर विमानाने प्रस्थान केलं, ते ह्यूस्टनसाठी जवळ पास १८ तासांचा विमान प्रवास पहिल्यांदा करत होतो. विमानात खूप कंटाळा आला, पाय भरून आले, मग काय! विमानातच शतपावली सुरु केली. तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. माझ्याबरोबर अजून ४ जण होते, त्यामुळे गप्पात वेळही गेला. जसं ह्युस्टन जवळ येऊ लागलं, तसं खिडकीतून अमेरिकेचं दर्शन घेत होतो. जे इतकी वर्षं दूरदर्शन वर पाहिलं होतं आणि ऐकलं होतं ते रस्ते, घरं यांची आज डोळ्यांनी अनुभुती घेत होतो. विमान सरतेशेवटी ह्युस्टनमध्ये उतरलं. विमानाततून बाहेर येताच अजून एका कठीण परीस्थीला सामोरं जायचं होतं, ते म्हणजे अमेरिकन कस्टममधून बाहेर निघणं. बरीच मोठी रांग होती. पुढे काही पाकिस्तानी नागरिक होते, त्यांचा नुसता पासपोर्ट  बघून त्यांना चौकशीसाठी बाजूला नेण्यात आलं. ९/११चं सावट अजून अमेरिकेच्या मनावरून उतरलं नाही, याची चुणूक मला तिकडेच पाहायला मिळाली. शेवटी जवळपास १ तासाने माझा नंबर आला. पासपोर्ट समोरच्या अधिकाऱ्याकडे दिला, त्याने माझी बायोमेट्रिक टेस्ट केली, यात हाताचे ठसे आणि डोळ्याच्या बुबुळाचा स्कॅन होतं. त्यानंतर मला विचारलं, की 'पहिल्यांदा अमेरिकेत? आणि कशासाठी आला आहात?' त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिल्यावर अचानक त्याने माझ्या कामाबद्दल विचारायला सुरूवात केली. जवळ पास ५ मिनिटे हे संभाषण चालू होतं, मला वाटलं, की आता काही खरं नाही! बहुतेक पूर्ण चौकशीसाठी जावं लागणार. पूर्ण चौकशीमध्ये तुमची कसून चौकशी होते, तसाच तुमच्या बॅगेमधलं एकूण एक सामान काढून चेक केलं जातं आणि त्याशिवाय तुमच्या अंगावरचे कपडे आणि तुमचं सर्व स्कॅनिंग होतं, आणि वाटल्यास तुम्हाला परतही पाठवलं जाऊ शकतं. मनात शंकेची पाल चुकचुकत होती, बहुधा त्या अधिकाराच्याही लक्षात आलं असावं. त्याने हसून मला सांगितलं, की त्याचा भाऊसुद्धा माझ्याच कंपनीमध्ये कामाला आहे, म्हणून माझ्याद्दल तो जास्ती चौकशी करत होता. हे बोलून त्याने पासपोर्टवरती शिक्का मारून माझ्या अमेरिकेतील प्रवेशातील शेवटचा अडथळा दूर केला. सामानाचा शोध करून आणि शेवटी सर्व अडथळ्यांवर मात करत, सरतेशेवटी अमेरिकन भूमीवर पाऊल ठेवलं.

अमेरिका ही काही पुण्यभूमी नसली, तरी जेव्हापासून कळायला लागलं, तेव्हापासून इकडे कधी ना कधी यायचं स्वप्न बघितलंच होतं. आज त्याची पूर्तता होताना खरंच खूप छान वाटत होतं. सगळ्यांत समाधानाची गोष्ट ही होती, की कंपनीने मला पाठवलं होतं, मी स्वतःहून येण्यापेक्षा! माणूस किवा आपण सर्वच काही ना काही स्वप्न बघतो आणि ती जेव्हा प्रत्यक्षात खरी होतात, त्याचा आनंद आणि ते क्षण आयुष्यभर जपून ठेवायचे असतात. ध्यानीमनी नसताना आयुष्यात आलेल्या एका अनपेक्षित वळणाने माझं हे छोटुसं स्वप्न पूर्ण झालं. यात खूप जणांनी मला मदत केली प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे! नाव घ्यायची झालीच तर जयेशदादा, विवेक, प्रज्ञा, आणि अजून काही मित्र जे मला अमेरिकेत मिळाले. त्यांच्या विषयी पुढील लेखात, अमेरिकेतल्या अनुभवांमध्ये.. 
   
विनीत वर्तक..

अमेरिका एक स्वप्न ..

  अमेरिका एक स्वप्न....

लहानपणापासूनच अमेरिका या देशाबद्दल मनात बरंच कुतूहल होतं. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की कधी आपल्याला या देशात जायची संधी मिळेल. जेव्हा भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीला लागलो, त्यानंतर तर या शक्यता जवळपास मिटल्याच होत्या, पण तरीसुद्धा कुठेतरी सुप्त इच्छा ही होतीच. कोणी काहीही म्हणो, पण प्रत्येकाच्या मनात निदान हा देश बघायची एकदा तरी संधी मिळो हे असतंच. जवळपास ८ वर्षं सरकारी नोकरी केल्यानंतर हा विचारच मी सोडून दिला होता. अचानक उन्हाने काहिली झालेल्या दिवशी मेघ दाटावेत, आणि पूर्ण निसर्गाचा कायापलट व्हावा, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. नवीन नोकरीची संधी काय आली, मजेत म्हणून केलेल्या प्रयत्नाला अपेक्षेपेक्षा जास्त यश  मिळालं आणि समोर एक कठीण परिस्थिती उभी राहिली, की जिचा विचार मनाला कधी शिवलाही नव्हता. सरकारी नोकरी सोडायची म्हणजे, हे जरा अतिच झालं, हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागायचं, मनात खूप गोंधळ आणि काय करू काहीच सुचत नव्हतं. भाभामधील नोकरी एक स्वप्नवत सगळ्यांसाठी आणि त्याला लाथ मारून अश्या एका क्षेत्रात पाऊल ठेवायचं की ज्यातलं काहीच माहीत नाही, अशी एक कंपनी की जिचं नावसुद्धा कोणी ऐकलं नाही. इंटरनेटवर वाचलं 'स्लम्बर्जर'विषयी तेव्हाच कळलं की खूप मोठी कंपनी आहे ही!  जितका विचार केला त्या पेक्षाही मोठी. जवळ पास  ८०,००० लोक कामाला आणि १९० देशात  काम करणारी असा तिचा आवाका. तरीसुद्धा सरकारी नोकरी सोडण्यासाठी मन तयार होत नव्हतं. मनातून सरकारी नोकरीला कंटाळलो होतो, आणि ज्या संधीची मी वाट बघत होतो ती समोर उभी होती. मनात म्हटलं, 'आता नाही तर कधीच नाही', जोस आणि चंद्रा  म्हणून माझे वरिष्ठ होते, त्यांनी मला जाण्याचा सल्ला दिला, आणि मी अवघ्या १८ दिवसाच्या नोटीसमध्ये भाभामधून बाहेर आलो. हे एक रेकॉर्ड होतं.  सरकारी नोकरीत अट ६ महिन्याची असताना फक्त या दोन वरिष्ठांच्या प्रयत्नामुळे मला १८ दिवसात सगळं आटोपून 'स्लम्बर्जर'मध्ये येता आलं. हे इतकं रामायण सांगण्याचं कारण इतकंच, की जेव्हा तुमच्या नशिबात लिहीलेलं असतं आणि त्याला जेव्हा कर्तृत्वाची जोड मिळते, तेव्हा अशक्य गोष्टीसुद्धा साध्य होतात.    

'स्लम्बर्जर'मध्ये आलो, ते पण एका वेगळ्या देशात मलेशिया मध्ये आणि पुढे जाण्याच्या अमर्याद संधी होत्याच, तशीच एक संधी आली २०१० साली. अमेरिकेमध्ये असणाऱ्या एका ट्रेनिंगसाठी जायची संधी मिळाली. जवळ पास ६ आठवड्याचे ट्रेनिंग होते, ते हुस्टन या शहरात. टेक्सास या राज्यामधले हे शहर जवळ पास जगात सर्वांना माहीत आहे, ते याठिकाणी असलेल्या 'नासा' या संस्थेमुळे. संधी तर मिळाली पण खूप काही अडचणीसुद्धा होत्या, सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे अमेरिकन व्हिसा, ही सगळ्यात कठीण आणि बेभरवशाची पायरी होती. अगदी सगळ्या गोष्टी योग्य असतानासुद्धा किती जणांना व्हिसा मिळत नाही असं ऐकून होतो आणि त्याची मुलाखत हा अजून एक वेगळाच सोपस्कार होता. त्यात दुसरी अडचण होती ती म्हणजे माझ्या मागील अनुभवाची. 'भाभा'सारखी संस्था असल्याने व्हिसाची मोठी गोची होणार, हे मी जाणून होतो, तरीसुद्धा कुठेतरी छोटी आशा होती की सगळं काही विनासायास पार पडेल. या कमी सगळ्यात मोठी मदत झाली ती म्हणजे जयेशदादा आणि किरणदादाची. जयेश दादा आधीच अमेरिकेमध्ये होता, त्याच्याकडून बरीचशी कल्पना मिळाली की स्वतःला कसं तयार करायचं. सगळी कागदपत्रं आणि मनाची तयारी केल्यावर शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी ७ वाजता जाऊन अमेरिकन कॉन्सुलेटच्या बाहेर रांगेत उभा राहिलो. जाचक सुरक्षा व्यवस्था आणि कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून माझ्या नंबरची वाट बघत बसलो. आलेले सगळेच एका धर्मसंकटात की व्हिसा मिळेल की नाही. जवळपास १० वाजता माझा नंबर लागला. अमेरिकन बाईने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, 'क' च्या बाराखडीतील सगळे प्रश्न तिने मला विचारले. मी सुद्धा तितक्याच आत्मविश्वासाने उत्तरं दिली. अचानक मला माझ्या बायकोचं नाव विचारलं आणि म्हणाली, तुमचा व्हिसा ३ दिवसांत मिळेल. अचानक मिळालेल्या या उत्तराने मी सर्दच झालो, अवघ्या २ मिनिटामध्ये मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला होता. हातात असलेली ती जाडजूड कागदपत्रांची फाईल बघून मनात विचार करत होतो, किती कष्ट घेतले होते यासाठी! सगळ्यांचे उंबरठे झिजवून, बँकेची कागदपत्रे, ऑफिसची कागदपत्रे यांकडे साधं ढुंकून बघितलंसुद्धा नाही. पण मनात खूप खूष होतो, असा अनपेक्षित धक्का होता मला. नंतर कळलं की, माझ्या पुढे असणाऱ्या ५ जणांना तिने परत माघारी पाठवलं होतं, त्यात एक इन्फोसिसचा कर्मचारीही होता. पण सगळ्या शक्यतांना दुरावत मी एक अवघड टप्पा पार केला होता. 

आता पासपोर्टवर अमेरिकन व्हिसाचा शिक्का बघितल्याशिवाय  कोणाला काही सांगायचं नाही, असं ठरवलं होतं. शेवटी तिने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी पासपोर्ट मिळाला, अमेरिकन शिक्क्यासह तेव्हा मात्र आपलं स्वप्न खरं होणार याची चाहूल  लागली होती. 

क्रमश:  ...

ऑईल रिग्ज .... एक अनुभव...


ऑईल रिग्ज .... एक अनुभव... 

चोहीकडे पाणी आणि त्यामध्ये मी .. एक दिवस, दोन दिवस .. दिवस मोजत जातो आहे. लाटा उसळतात .. बोटी खाली वर होऊन दृष्टीतून बाजूला होतात.
मी मात्र असतो तिकडेच .. तेच बघत .. खाऱ्या हवेचा स्पर्श अंगावर घेत त्याच हेलीडेकवर फिरत .. सूर्य अस्ताला जाताना सोनेरी रंगांची उधळण करतो आहे, आणि त्याच्या साक्षीने माझा फेरफटका सुरू आहे. एकीकडे पेजिंगचे आवाज ऐकायला येत आहेत, मनात मात्र हाच विचार की आपलं नाव ऐकायला यायला नको .. जनरेटर आणि रिग फ्लोअरचा आवाज आसमंतात घोंगावतो आहे, आणि जमिनीतल्या वायूची धुरांडी आकाशात जाऊन माणसाच्या आस्तित्वाची जाणीव सभोवती पसरलेल्या समुद्रात दाखवून देत आहेत. ही आहे ऑईल रिग...

पेट्रोल, डिझेल आणि गॅस याच्या दरवाढीने त्रस्त होणारे आपण, हे येतं कुठून, याचा जरा विचारसुद्धा करत नाही, किंबहुना पाण्याच्या विहिरीसारख्या तेलाच्या विहीरी असतील व बादलीने त्यातून तेल वरती काढत असतील इथंपर्यंत आपण कल्पनानिर्मिती करून थांबलेलो असतो, किवा आपलं ऑफ-शोअरचं जीवन हे फक्त शिपिंग बोटीपर्यंत निगडीत असतं, इथंपर्यंत आपलं जनरल शिक्षण असतं.

ऑईल रिग किंवा ज्याला तेल-विहीर म्हणतो, ती कशी असते किंवा तिकडे कसे काम चालते, याचा थोडासा परिस्पर्शही आपल्याला कधी होत नाही.
24 तास, 365 दिवस चालणारं काम आणि एक-एक मिनिट जिकडे मोजला जातो, आणि कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकणारं अस्थिर असं कामाचं वातावरण, हे क्वचितच आपल्यासारखा कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. ऑईल रिग्जचं काम म्हटलं, की समोर दिसणारा पैसा हा फक्त आपण बघतो, पण त्या मागचं समर्पण कोणी बघत नाही किंवा त्यात असलेले धोके कोणी ओळखत नाही. 
आज हेलीडेकवर फिरताना गेल्या 4 वर्षांचा काळ आठवतो आहे, की ऑईल रिग आणि क्रूड ऑईल याचा तुटपुंजा जाणकार असलेला मी आणि हेलीकॉप्टर किंवा ज्याला चॉपर म्हणतात, त्यात बसण्याची ओढ असणारा मी, आज कुठंपर्यंत येऊन बसलो आहे! पहिल्या वेळी हा प्रवास संपू नये असं मनोमन
वाटणारा मी, आणि आज घड्याळ बघत कधी एकदा उतरतो याची प्रतीक्षा करणारा मी.  खरंच पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे असं वाटतं.
जिकडे कामाचा संबंध वेळेशी लावला जात नाही, जिकडे दिवस आणि रात्र सारखी असते, जिकडे घड्याळ हे कमीत कमी वेळात काम करण्यासाठी बघितलं जातं, कामातून लवकर सुटण्यासाठी नाही, जिकडे एक मिनिटाचा हिशोब US $ मध्ये लावला जातो, कदाचित रुपयाचा समावेश त्याच्या आसपासही होत नाही आणि जिकडे माणूस फक्त काम, काम आणि कामच करतो, अश्या ऑईल रिगवरचं जीवन खरंच किती वेगळं आहे!
इतकं सर्व असतानासुद्धा 12 तासांनंतर मिळणारं उत्कृष्ट जेवण, त्यानंतर पूल टेबल आणि जिम करणारे आम्ही किवा हेलीडेकवर पाऊलवाटेने गोल गोल फेऱ्या मारणारे आम्ही आणि त्यानंतर टाटा स्कायने दिलेली TV ची देणगी किवा रिग फोन आणि V SAT च्या जोडीवर इंटरनेट किवा फोनद्वारे आपल्या प्रियजनांशी सवांद साधणारे आम्ही आणि नंतर 20 डिग्री च्या AC रूममध्ये मऊ गादीवर दिवसाच्या श्रमाने दमलेले आम्ही गुडूप झोपी जातो, ते उद्या करायच्या कामाच्या आठवणीने.....

आयुष्याला किती कंगोरे आणि रंग आहेत याचा विचार मी करतो आहे. माझी माणसं माझी दरवेळी आतुरतेने वाट बघत असतात, एका ओढीने की आज विनीत येणार घरी आणि त्याच ओढीने मीही चॉपरमध्ये बसतो, की कधी एकदा जमीन दिसते. नवा दिवस नवीन आशा घेऊन येतो, असं म्हणतात आणि ते खरंच आहे. अश्या क्षेत्रात काम करणारे आम्ही खरोखरीच त्याचा नेहमीच अनुभव घेत असतो. 

तुमचाच,
विनीत वर्तक.