Saturday 21 July 2012

२६ आणि २७ जुलै २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... भाग २


२६ आणि २७ जुलै २००५... दोन अविस्मरणीय दिवस..... भाग २ 

प्रियदर्शनीवरून सायनच्या दिशेने  चालायला सुरूवात केली. नेहमी ५ मिनिटांचा रस्ता आज ५ तासांचा वाटत होता. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसत होते. त्यात सगळी वाहने अडकून अस्ताव्यस्त पडली होती. माणसं रस्त्याच्या मधून चालत होती. आम्हीसुद्धा असंच पुढे जायचं ठरवलं. म्हटलं सायनला जाऊन पोटपूजा करू. जवळपास ३ तास झाले होते, आम्ही पाणी आणि काही खाल्ल्याशिवाय चालत होतो. पोटातसुद्धा कालचे दोन पावच होते, जे काल रात्री आम्ही खाल्ले होते. मी आणि मित्राने चालायला सुरूवात केली. प्रियादर्शनीच्यापुढे खोलगट भाग असल्याने पाणी आता कंबरेवरून छातीपर्यंत वाढलं होतं. सगळ्यांची चालताना वाट लागत होती. पायात गोळे आले होते. थंडी वाजत होती. गेले ३ तास अर्धे शरीर पाण्यामध्येच होते,  कपडे ओले, असं कुठंपर्यंत राहणार याची पुसटशी कल्पना सुद्धा मला नव्हती. चालताना बरीच काळजी घ्यावी लागत होती. सगळीकडे गटाराची झाकणं उघडल्याने त्यात पडायचा धोका होताच. सगळीकडे पाणी आणि मधून माणसांची रांग. ज्या रस्त्यावर फक्त वाहने आत्तापर्यंत मी बघितली होती, त्या रस्त्यावर हे दृश्य खूपच वेगळे वाटत होते. एक अनामिक भीती मनात होती, की आता पुढे काय??

सायनला येताच आधी काही खायला मिळते का, याचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोटात अन्नाचा कण नसल्याने खूप भूक लागली होती. अंग एकदम ओलंचिंब होऊन थरथरत होतं. एक कप चहा मिळाला तर बरं होईल, या अपेक्षेने आम्ही सायनचा परिसर धुंडाळला. पण हाती काहीच लागलं नाही. सायनच्या चौकात असलेल्या हॉटेल मालकाने सांगितलं, "साहेब काही नाही हो, काल रात्री लोकांची अवस्था बघून जे काही होतं ते दिलं. काही लोकांनी तर कोथिंबीरसुद्धा नुसती खाल्ली इतकी अवस्था वाईट होती. आता माझ्या कडे काहीच नाही". हे ऐकल्यावर काही मिळेल ही आशा आम्ही सोडून दिली व वांद्रेला जायचा निर्णय घेतला. तसंच चालत हळूहळू पाण्यातून मार्गक्रमण सुरूच ठेवलं. सायन पुलावरून रेल्वे रूळावर असलेलं पाणी बघून अजून २-३ दिवस तरी काही गाड्या चालू होत नाही याची पूर्ण कल्पना आम्हाला आली. धारावीमधून जाताना पाहिलं, सगळ्या दुकानांत पाणी घुसलं होतं. इकडे स्त्रियांच्या पर्स खूप छान मिळतात, असं ऐकून होतो, आज त्या जिकडेतिकडे पाण्यात तरंगताना बघत होतो. वांद्रेला पाण्यातून येईपर्यंत ११ वाजत आलेले होते. सकाळी ७ वाजल्यापासून जे आम्ही चालत होतो, ते चालतच होतो. ना पाणी कमी झालं होतं, ना आम्हाला काही खायला प्यायला मिळालं होतं. आता मात्र पायात प्रचंड गोळे आले होते. पाण्यातून चालण्यासाठी खूप जोर काढावा लागत होता, आणि गेल्या ४-५ तासांमध्ये पायाची खूपच हालत झाली होती.

वांद्र्यावरून काय करायचं सुचेना. स्टेशनवर जाऊन काहीच उपयोग नव्हता. गाड्या सुरू होण्याची कोणतीच चिन्हं दिसत नव्हती. आता मनाशी विचार केला, की असंच लोकांबरोबर पुढे जाऊ. जिथपर्यंत शरीर साथ देईल तिथपर्यंत. वांद्र्याच्या थोडे पुढे आलो असेन, आमच्या बरोबर एक गरोदर बाई पाण्यातून चालत होती. साधारण ७वा महिना असेल. उंची कमी आणि पाणी पोटाच्यावर असल्याने तिची अवस्था खूपच गंभीर होती. तिच्या मैत्रिणीलाही काही सुचत नव्हते. मी आणि माझ्या मित्राने त्यांना सांगितले, की तुम्ही दुभाजकावरून चाला म्हणजे त्रास कमी होईल. मग एका बाजूने मी आणि दुसऱ्या बाजूने माझा मित्र त्यांचे हात धरून त्यांनी कसंबसं त्यावरून चालायला सुरूवात केली. आता पाणी ढोपराच्या खाली आल्याने त्यांचा त्रास कमी झाला होता. काही अजून लोकही मदतीला आले. मग हळूहळू करत आम्ही कसेबसे त्यांना वाकोला ब्रीजवर नेले. त्यांना तिकडेच थांबण्यास सांगितले, कारण त्यांची अवस्था खूपच बिकट होती. त्यांच्या काही मैत्रिणी तिकडेच भेटल्याने आम्ही त्यांना सोडून आता पुढची वाट चालू लागलो.

वाकोला ब्रीजवर वाहने अस्ताव्यस्त पडली होती. गाड्या तश्याच सोडून लोक निघून गेले होते. ब्रीज उतरल्यावर परत पाण्यातून प्रवास सुरू झाला. आता खरंच चालवत नव्हते. आधी इतक्या जोरात चालणारे आम्ही दोघेही थकून अक्षरशः एक-एक पाऊल मोजून मोजून पुढे टाकत होतो. इतकं सगळं झाल्यावर अजून पुढे काय वाढून ठेवलं होतं, हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. आंतरदेशीय विमानतळापर्यंत आलो, तिकडे एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालत जाणाऱ्या लोकांना पाणी आणि एक पार्ले बिस्कीटचा पुडा मोफत देण्यात येत होता. त्या क्षणी माझ्यासाठी ते देवच होते. पाणी पिऊन ४ पार्लेची बिस्कीटं खाऊन त्यांचे मनापासून आभार मानले. निदान मुंबईत थोडीफार माणुसकी आहे, त्याचं दर्शन मला पहिल्यांदा झालं. माझ्या आयुष्यातील ती ४ बिस्कीटं सगळ्यात संस्मरणीय होती. अंधेरीपर्यंत चालत आल्यावर एक बेस्टची बस दिसली. ती स्टॉपवरून निघणार याचा अंदाज आम्हाला आला,  आणि दोघांनीही वीजेच्या वेगाने धावायला सुरूवात केली. अंगात होते नव्हते तितके बळ काढून कसंबसं त्या बसपर्यंत पोहोचलो व आत शिरलो. वाहन वाहकाने बस बोरीवलीपर्यंत जाईल असं सांगितलं. पण जिकडे पाणी चाकाच्या वर असेल, त्यापुढे जाणार नाही हेही सांगायला तो विसरला नाही. इतक्या कठीण प्रसंगात सुद्धा आपली ड्युटी प्रामाणिकपणे करणाऱ्या त्या बेस्ट कर्मचाऱ्यांचे आभार मनोमन मानले.

बस सुरू झाली. गोरेगाव येईपर्यंत बसमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. पण जो हात दाखवेल त्याला घेऊनच ती पुढे जात होती. अखेर तो क्षण आला.  दुपारी ४ वाजता मी मागठाणे डेपोला बसमधून उतरलो. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या प्रवासाची ती सांगता होती. माझा मित्र आधीच गोरेगावला त्याच्या घरी पोहोचला होता. चालायला अंगात त्राणच नसल्याने एका रिक्षाला थांबवून मी घरी पोहोचलो. काय काय उपद्व्याप करून मी घरी आलो, त्याचा विचार मी करत बसलो. आईने मस्तच जेवण बनवलं आणि मी त्या जेवणावर अगदी तुटून पडलो, जणू काही कित्येक दिवस मी काही खाल्लंच नव्हतं! या दोन दिवसांनी मला खूप काही शिकवलं, खूप काही अनुभव दिले. निसर्गाच्यापुढे मानव किती खुजा आहे, हेच त्याने त्या दिवशी मानवाला दाखवून दिले होते.

No comments:

Post a Comment