Tuesday 9 October 2012

बेंढया... एक अवलिया... विनीत वर्तक ©

बेंढया... एक अवलिया... विनीत वर्तक © 

आपल्या आयुष्यात आजूबाजूला आपण अनेक माणसे बघतो. काही चांगली, काही वाईट, काही हसणारी, काही रडणारी तर काही रडवणारी आणि काही रडून हसवणारी. प्रत्येक क्षण काहीतरी देतोच आपल्याला, तश्याच नवीन नवीन ओळखीही. पण काही माणसे असतात, जी आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात आणि त्यांचं जीवन आपल्यासाठी नेहमीच एक कोडं असतं न उमगलेलं! असाच हा एक अवलिया... बेंढया!! 
याचं नाव जितकं विचित्र तितकाच हा साधा सरळ. गेले ३०-३२ वर्षं बघतो आहे त्याला, किंबहुना जेव्हापासून कळायला लागलं आहे तेव्हापासून. 

माझा जन्म मुंबईचा, गावसुद्धा मुंबईच्या जवळच. सुट्टीतला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे मामाकडे जाणे. माझं आजोळ तसं मुंबईला खेटूनच, विरारला. पण तिकडची मजा काही वेगळीच. पानवेलीच्या आणि फुलांच्या झाडांनी भरलेली शेतं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील माझ्या सगळ्या भावंडांची मजा असा भरगच्च कार्यक्रम. बेंढया तिकडेच माझ्या मामाकडे मजुरी करायचा. त्याला आम्ही प्रेमाने बेंढयामामा म्हणत असू आणि त्याच्या बायकोला वेणूमामी. त्यांचा मुलगा कुमार हा आमच्याच जोडीचा, आमच्यात खेळायचा. अंगावर एक हाप पॅन्ट आणि तो मळका गंजी बिनबाह्यांचा, कधी कधी तर तो पण नसायचा.

उन्हामध्ये घामाने तळपणारं त्याचं शरीर आणि सतत शारीरिक कामं करून शिरा दिसणारी त्याची शरीरयष्टी, सगळंच कसं लक्षात राहण्याजोगं. सकाळ झाली की आम्ही वाडीत जायचो तगरीची, नेवाळीची फुलं खुडायला. सकाळी ८ला सायकलने वाडीत पोहोचायचो, त्याच्या आधीच बेंढयाचा दिनक्रम चालू झालेला असायचा. आपलं फावडं घेऊन हा महाराज चालला शिपण करायला. (शिपण म्हणजे वाडीत असलेल्या केळीच्या बागेला, फुलांच्या बागेला सगळीकडं पाटातून पाणी फिरवणं. ३-४ दिवसातून एकदा करायला लागायचं झाड जिवंत राहण्यासाठी) आम्ही मस्ती करत कळ्या खुडायचो. ह्याच कळ्या केळीच्या पानात बांधून फूलवाले दादरला दुसऱ्या दिवशी फूल मार्केटमध्ये विकायला नेत असत. कधी मूड आलाच, की मग चिखलात खेळणं आणि मस्ती करणं. बेंढयाचं काम बघून मला नेहमीच हुरूप यायचा आणि मी त्याच्याकडे फावडं मागून स्वतः करायचा प्रयत्न करायचो. माझी शरीरयष्टी बघून त्याला अंदाज यायचा की माझ्याच्याने एक ढेकूळ पण हलणार नाही. मग मला तो शिकवायचा, की कसं फावडं पकडायचं, कसा बांध वळवायचा आणि शिपण कसं करायचं. हा अवलिया कधीच चपला घालत नसे. आम्ही चप्पल घालूनसुद्धा आम्हाला लागत असे पण आम्ही याला कधीच पाय लंगडून चालताना बघितलं नाही, जसं काही याच्या तळपायाला लोखंड होतं. मग कधीतरी याला आणि मामीला चहा घेऊन वाडीत जा. चहा प्यायलेला असला तरी केळीच्या पानातून तो सुर्रर्रर्र करून चहा प्यायची मजा काही वेगळीच असायची. यांच्या वाटणीचा थोडा चहा न चुकता माझ्यासाठी ठेवायचेच.

दुपारी जेवणाची वेळ झाली की हा मामाच्या घरी येऊन ५ रुपये घेऊन जाणार, ताडी प्यायला. दुपारी १२ किवा १ वाजता फुल्ल तर्र् होणार. त्यावेळेस ५ रूपयातसुद्धा अगदी खूप ताडी येत असावी. कारण हा १-२ ग्लास मध्ये ऐकणारा भिडू नव्हताच. कधी टाईट होऊन वेणू मामीला शिवीगाळ, कधी भांडण तर कधी मुकाट्याने जेवून आडवा होणार. तेच ते उघडं काळं अंग घामात भिजलेलं आणि कसलीही पर्वा नाही. कोण बघते आणि कोण काय विचार करते, याचा कसलाच थांगपत्ता नसायचा. ४-५ वाजता परत साहेब वाडीत. शिपण करणे, फुले खुडणे, गवताचे तण काढणे, नारळ पाडणे कोणतीही कामं सांगा, गडी आपला तयार. दोन नवटाक टाकले की गाडी एकदम सुपर डुपर फास्ट असायची. ७ वाजून गेले की साहेब परत ५ रुपये घेऊन ताडीच्या गुत्त्यावर. मला वाटतं याचं तिकडे पर्मनंट अकाउंट असावं. संध्याकाळी परत गाडी गियरमध्ये टाकून जेवायला हजर व्हायचे. याचा रोजचा हाच शिरस्ता. मामाच्या घराच्या बाजूला याला झोपडी बांधून दिली होती. तिकडेच राहायचा. मी कधीही आलो की अगदी आवर्जून बंधुजी कसे आहेत आणि बेन कशी आहे हे विचारणारच ( मामाकडे माझ्या आई आणि बाबांना बेन आणि बंधुजी असं म्हणतात). बाबांकडे कधी दिसले, की १० रुपये मागणार आणि दिल्यावर अगदी हसत त्याची ताडीवाल्याकडे दिवाळी साजरी करणार. याच्या आयुष्यात किती उलथापालथी झाल्या, पण गडी आहे तसाच आहे.

पोटचा मुलगा जीवानिशी गेला २ नातवांना मागे ठवून. सून घरातून स्वतःच्या मुलांना ठेवून दुसऱ्याबरोबर पळून गेली. पण पडेल तर तो गडी कसला. बेंढयामामा आणि वेणूमामीने त्यांचा सांभाळ केला आणि आता तर त्यांच्या नातवाचं लग्न ठरलं आहे, असं मला कळलं. लग्न, पूजा असे काही कार्यक्रम असले, हा कामास तयार, तर कधी नाटक. दारू पिऊन तर्र झाला की त्यातून कधी बाहेर येईल त्याचे त्यालाच माहीत. २-३ दिवस मग कुठेतरी पडलेला असायचा परत २-३ दिवसांनी काम सुरू, हा शिरस्ता गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. लग्नात म्हणजे पर्वणी असायची. तेव्हा कुठे मी बेंढयामामाला शर्ट आणि फुल पॅन्टमध्ये बघितलं असेन. आधी काम आणि मग हक्काची दारू म्हणजे त्याला काही अंतच नाही. मग गडी आठवडाभर गायब असायचा. किती वेळा निघून गेला असेल मामाकडून, पण परत येतच राहिला. आज त्याला हक्काचं घर मिळालं, तो तिकडे राहतो पण मध्ये मध्ये मामाकडे येतो. ७० वर्षांचा हा तरुण आजही नारळाच्या झाडावर चढतो आणि काम करतो. नक्कीच वयोमानानुसार वृद्धत्वाकडे झुकला असला तरी त्याची रांगडी शैली आजही मला त्या ३० वर्षांपूर्वीच्या बेंढयाची आठवण करून देते.

आज हाच विचार करतो, सगळ्या आजारांना आणि मरणाला घाबरणारे आपण, उद्याच्या आठवणीने न झोपणारे आपण सुखी, की तो २ नवटाक मारून सुखाने निद्रेच्या आधीन झालेला बेंढया?? ४ मजले चढून वयाच्या तिशीतच मधेच धाप लागणारे आपण आणि ७०व्या वर्षामध्येसुद्धा नारळाच्या झाडावर चढणारा बेंढया, नक्की तरुण कोण?? गेले ३० वर्षं या अवलियाला बघतो आहे. याच्या आख्ख्या अंगात रक्त नसावे अशी शंका येईल, इतकी दारू, ताडी या अवलियाने प्यायली. पण ब्लड प्रेशर, मधुमेह, कॅन्सर, हार्ट डिसीज यांतला एकही जण याच्या आसपासही फिरकलेला नाही. कदाचित याचं रहस्य त्या अंगमेहनतीतच असेल. पण आयुष्याला पूर्ण मोकळेपणे जगलेला हा अवलिया मला नेहमीच कोड्यात टाकत आला आहे...... !!

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment