Wednesday 18 December 2019

ए. बी. सी. डी. ची भाषा... विनीत वर्तक ©

ए. बी. सी. डी. ची भाषा...  विनीत वर्तक ©

संवादाची सगळ्यात प्रभावी भाषा ही आपली मातृभाषा असते. मातृभाषा ही राष्ट्रीय भाषा अथवा प्रांतीय भाषा असायला हवी ह्याची काही गरज नसते. अगदी आपल्या बोलीभाषेतील संवाद सगळ्यात जास्ती प्रभावीपणे मांडता येतो. पण जेव्हा आपण स्थानिय किंवा देशांच्या भिंती बाहेर काम करत असतो तेव्हा आपल्याला एका समान भाषेत संवाद साधण्याची गरज पडते. वैश्विक पटलावर गेल्या काही शतकात झालेल्या घडामोडींमुळे संवाद साधण्यासाठी इंग्रजी तर व्यवहार करण्यासाठी अमेरीकन डॉलर हे सर्वसाधारणपणे संपुर्ण जगात मापदंड झाले आहेत. अर्थात जगातील काही भागात अजुनही त्यांना मान्यता नाही तरीपण जगातील ८०% वर लोक संवादासाठी इंग्रजीच्या ए. बी. सी. डी. वर अवलंबुन असतात.

भारतावर ब्रिटिशांनी जवळपास १५० वर्ष राज्य केल्याने भारतीय लोकांनी सहजरीत्या इंग्रजी भाषेला आपलसं केलं किंबहुना त्यावर प्रभुत्व मिळवलं. आधी वैश्विक पटलावर गरज म्हणुन शिकली जाणारी इंग्रजी भाषा आता स्टेटस सिम्बॉल बनली. इंग्रजी सहजरीत्या बोलणारे आणि त्यावर प्रभुत्व असणारे लोकं हुशार पठडी मधे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बनत गेला. ह्याचा परीणाम असा झाला की संवादाचं सगळ्यात प्रभावी माध्यम असणारी मातृभाषा मागे पडत गेली. मातृभाषे मधे बोलणं, लिहिणं, विचार व्यक्त करणं म्हणजे मागासलेपणाचे किंवा इंग्रजी भाषा येत नसल्याने कमीपणाचे लक्षण ठरवण्याचा ठेका आपल्याच समाजाने आणि सो कॉल्ड बुद्धीजीवी लोकांनी घेतला. ह्या सगळ्यात सर्वाधिक नुकसान आणि हानी आपलीच झाली आहे. ह्याचा अंदाज यायला कदाचित अजुन काही कालावधी लागेल.

वेगळ्या देशात असताना जरी इंग्रजी ही सर्वसाधारण संवादाची भाषा असली तरी जेव्हा वेगळ्या देशात आपल्या प्रांतातील कोणी आपल्याला भेटते तेव्हा आपल्या राष्ट्रीय भाषेत, मातृभाषेत अथवा बोलीभाषेत खरे तर संवाद करण्याची  एक वेगळी मज्जा असते. घरापासून लांब अनोळखी देशात, वेगळ्या संस्कृतीत, इतर लोकांच्या गराड्यात जेव्हा कोणी आपल्या देशातील कोणी अचानक समोर येते तेव्हा त्या आपलेपणात भाषेच्या, प्रांतांच्या, राज्यांच्या भिंती खरे तर वितळून जायला हव्यात. पण तसं खुप क्वचित वेळा होते. अमेरीकेत असताना माझ्या सोबत एक अमेरीकन भारतीय मुलगा होता. त्याचा जन्म अमेरीकेचा आई - वडील भारतीय पण कामाच्या निमित्ताने अमेरीकेत स्थायिक झालेले. त्यामुळे घरी भारतीय वातावरण. त्याला हिंदी अस्खलित बोलता येतं होतं. आम्ही दोघं एकाच ट्रेनिंग मधे असल्याने नकळत मी अनेकदा हिंदी मधे त्याच्याशी बोलायचो. एकदा मला बाजुला बोलावून तो म्हणाला, 'आप सबके सामने मुझसे हिंदी मैं बात मत करो. मेरा स्टेटस कम हो जाता हैं, मैं अभी अमेरीकन अंग्रेजी एक्सेंट का क्लास कर रहा हूं. यु स्पिक इन इंग्लिश विथ मी.... मी मान डोलावून होकार दिला. नंतर त्याच्या सोबत काम करणाऱ्या अमेरीकन मित्राने त्याचा एक किस्सा सांगितला व तो म्हणाला,

We called them ABCD. (American Born Confused Desi). They are trying to be part of us but they are neither American nor Indian.

एकदा दुबई मधल्या सगळ्यात मोठ्या मॉल म्हणजेच 'द दुबई मॉल' मधे फेरफटका मारत होतो. दुबई फेस्टिवलमुळे मॉल मधे बरीच गर्दी होती. अचानक चालत असताना काही पुसटशे शब्द माझ्या कानावर पडले. ते शब्द वसई- विरार भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचे होते. ह्या भागात प्राबल्य असलेल्या वाडवळ, सामवेदी, ख्रिश्चन लोकांमध्ये बहुतांश संवाद आजही तिथल्या बोलीभाषेत केला जातो. माझं बालपण ह्या भागात गेल्यामुळे मला जरी ह्या बोलीभाषा बोलत्या येत नसल्या तरी मला त्यांच्यातील संवाद पुर्णपणे कळतात. वसई मधील दोन ख्रिश्चन माणसं अटे-तटे बोलत असल्याचं माझ्या कानांनी लगेच हेरलं. मी त्यांचा शोध घेऊन त्यांना जाऊन भेटलो. तुम्ही वसईचे का? ह्या एका प्रश्नावर माझी ओळख झाली होती. त्या अनेक देशांच्या नागरीकांच्या गर्दीने ओथंबुन वाहणाऱ्या दुबई मॉल मधे बोलीभाषेच्या गोडव्याने आपल्या माणसांना बरोबर हेरलं होतं.

दोन वेगवेगळे प्रसंग पण भाषेची  ए. बी. सी. डी. शिकवून जाणारे. एकात आपल्याच मातृभाषेत संवाद साधण्याची लाज वाटत होती आणि दुसऱ्या भाषेतील  लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधुन जोडण्याची केविलवाणी धडपड सुरु होती. ज्यांच्यासाठी त्याची ही धडपड होती तेच लोकं त्याला आपला मानत नव्हते. न घर का ना घाट का अश्या द्वंदात तो अडकला होता तर दुसऱ्या प्रसंगात आपल्या बोलीभाषेत संवाद करण्यासाठी देशांच्या भिंती आड येतं नव्हत्या. त्यात कोणता कमीपणा नव्हता. संवादाची भाषा जरी दुसरी असली तरी आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान नक्कीच बाळगायला हवा आणि जिकडे शक्य होईल तिकडे मातृभाषा, बोलीभाषा ह्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्या मधुन संवादाला, लिखाणाला प्राधान्य द्यायला हवं. ए. बी. सी. डी. ची भाषा जरी आज जगमान्य संवादाची भाषा असली तरी आपल्या मातृभाषेतील गोडवा त्यात येतं नाही हे तितकचं खरं.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Tuesday 17 December 2019

घुंघट की आड से... विनीत वर्तक ©

घुंघट की आड से... विनीत वर्तक ©

भारतात शहराचा भाग सोडला तर अनेक भागात स्री ने इतर लोकांच्या समोर (इतर म्हणजे कौटुंबिक व्यक्ती सोडुन ) डोक्यावरून पदर, दुपट्टा किंवा इतर गोष्टींच्या साह्याने डोकं आणि अनेकदा चेहरा झाकण्याची पद्धत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी आजही स्री पर पुरुषांसमोर येताना घुंघट घेऊन समोर येते. अर्थात ही पद्धत किती चुकीची / बरोबर अथवा स्री स्वातंत्र्याचा गळा घोटणारी की संस्कृती च रक्षण करणारी ह्या वादात मला जायचं नाही. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात व प्रत्येक जण आपल्या समोर जी बाजु येते त्याला योग्य मानत असतो. आपलं जडणघडण ज्या पद्धतीने झालं आहे आणि आपल्या विचारांवर ज्या गोष्टींचा पगडा आहे तिचं योग्य असं समजुन आपण पुढे जातं असतो. पण ते करताना आपण विरुद्ध अथवा दुसऱ्या बाजुच्या विचारांची पायमल्ली तर करत नाही नं ह्याचं भान ही आपण राखायला हवं. ज्या गोष्टी आपल्या धर्मात / समाजात / संस्कृतीत रुजलेल्या आहेत त्या कदाचित आपल्याला बरोबर वाटत असतील पण इतर संस्कृती / समाजाच्या मानाने ती व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली असु शकते. त्यामुळे तटस्थपणे आपण काही गोष्टींकडे बघायला हवं.

आज ह्या गोष्टींची प्रकर्षाने आठवण ह्याचसाठी की सध्या कामाच्या निमित्ताने मलेशिया ह्या मुस्लिम धर्माचं प्राबल्य असलेल्या देशात आहे. माझ्या सोबत असलेले इतर सहकारी मलेशिया चे नागरिक आहेत. मलेशिया मधे जवळपास ९०% मुस्लिम स्त्रिया ह्या हिजाब वापरतात. हिजाब म्हणजे डोकं आणि छातीचा भाग झाकण्यासाठी असलेलं वस्र. परपुरुषांच्या (परपुरुष म्हणजे कौटुंबिक व्यक्ती सोडुन ) समोर हिजाब वापरला जातो. अनेकदा बुरखा, हिजाब अथवा नकाब घालणाऱ्या स्त्रियांच व्यक्ती स्वातंत्र्य हे धर्माच्या नावाखाली नाकारल्याचं एक चित्र नेहमीच दाखवलं जाते. अनेक वेळेला ते योग्य असेल ही पण ह्याचा अर्थ असा होतं नाही की सरसकट ही गोष्ट लादली गेलेली आहे. अर्थात काही राष्ट्रात तसा कायदा ही आहे जसे सौदी अरेबिया आणि इराण. पण इतर अनेक मुस्लिम राष्ट्रात हिजाब, नकाब, बुरखा घालणं एक चॉईस आहे. माझ्या टीम मधे दोन मलेशियन मुस्लिम स्री अभियंता पेट्रोनास ह्या बलाढ्य ऑईल कंपनीसाठी काम करत आहेत. ह्यातल्या एकीने पेट्रोलियम इंजिनिअरिंग मधे ऑस्ट्रेलिया मधुन पदवित्तुर शिक्षण घेतलं आहे. तर दुसरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली पदवीधर आहे. दोन्ही टीम मेंबर सोबत काम करताना एकुणच मलेशियाच्या संस्कृती बद्दल खुप काही गोष्टी समजल्या.

हिजाब विषयी त्या दोघींशी बोलताना एक गोष्ट एकदम स्पष्ट होती ती म्हणजे ते त्या घालतात कारण हा त्यांचा चॉईस / निर्णय आहे. समाजात हिजाब न घालणं हे सहजगत्या स्विकारलं जात नसलं तरी त्यांच्यावर तो घालण्याचं कोणतच बंधन नव्हतं. आपल्याकडे ही लग्न झाल्यावर मंगळसुत्र न घालणं हे समाजात/ कुटुंबात सहजगत्या स्विकारलं जातं नाही. पण मंगळसुत्र न घालणं अथवा घालणं आज निदान शहरी भागात तरी चॉईस म्हणुन स्विकारल गेलेलं आहे. हिजाब घालणं हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आणि चॉईस असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं किंबहुना आज अनेक मुस्लिम स्त्रियांची ती एक चॉईस आहे. आपल्या कुटुंबात कोणी श्रेष्ठ व्यक्ती आल्यावर त्यांच्या पाया पडणं अथवा घुंघट डोक्यावरून घेणं जर संस्कृतीचा भाग असेल आणि त्यात आपली भावनिक आणि सांस्कृतिक गुंतवणूक असेल तर दुसऱ्या संस्कृतीत हीच गुंतवणुक वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली जाऊ शकते ह्याचं भान आपण नक्कीच ठेवायला हवं.

घुंघट असो वा हिजाब ह्या गोष्टी संस्कृती / प्रथा / पद्धती ह्या त्या धर्माच्या विचारसरणी चा भाग आहेत. त्या बरोबर किंवा चुक ह्यावर मतांतरे असु शकतात. ती मते बरोबर ही असतील. पण सरसकट कोणत्याही संस्कृतीला समजुन न घेता त्याला स्री स्वातंत्र्याचं लेबल चिकटवणं हे चुकीचं आहे. कोणत्या तरी मंदीरात प्रवेश केला म्हणुन जर भारतातील स्री स्वातंत्र्य होतं नसेल तर हिजाब न घालता केसं मोकळे सोडुन स्री स्वातंत्र्याची व्याख्या केली जाऊ शकत नाही.

घुंघट की आड से........ जर आपल्या संस्कृतीचा भाग आहे जर लग्न झालेल्या स्री ने टिकली लावणं, मंगळसुत्र घालणं संस्कृतीचं लक्षण आहे तर हिजाब ही कोणासाठी तरी त्यांच्या संस्कृतीचं लक्षण आहे हे समजुन घेण्याची आपली मानसिकता झाली तर स्री स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण एक पाऊलं पुढे टाकलं असं मी म्हणेन.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल 


Thursday 12 December 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेले नामदेव जाधव... विनीत वर्तक ©

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेले नामदेव जाधव... विनीत वर्तक ©

मराठा साम्राज्याची किर्ती त्या काळात अटकेपार पोहचली होती. मराठी साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा पराक्रम आजही लोकांना  स्फूर्ती देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध नितीत आमुलाग्र बदल करताना गनिमी काव्यात हुशार असणाऱ्या पराक्रमी अश्या मावळ्यांची फौज उभी केली. हे मावळे कोणी लढाई शिकलेले नव्हते तर सामान्य घरातील लोकांमध्ये पराक्रम, शौर्य, निष्ठा हे गुण निर्माण करून त्यांनी मराठा साम्राज्य उभे केले. काळाच्या ओघात युद्ध बदललं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवलेली पराक्रमाची ज्योत आजही तशीच आहे. ह्याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे भारतीय सेनेतील 'मराठा पायदळ' (Maratha Light Infantry). महाराष्ट्रातील ह्याच मावळ्यांनी बनलेलं १७६८ मध्ये भारतीय सेनेचा भाग झालेलं मराठा पायदळ हे भारतीय सेनेचं सर्वात जुनं पायदळ आहे. आपल्या शौर्याने, पराक्रमाने भारतीय सेनेत सगळ्यात जास्ती ६० पेक्षा जास्ती युद्ध पदकं मराठा पायदळाला मिळालेली आहेत.

 १९४५ चा तो काळ होता. जगात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजत होते. ब्रिटिश इंडियाचा भाग म्हणुन भारतीय सेनेतील ५ मराठा पायदळाला जर्मनी विरुद्ध लढण्याचा आदेश मिळाला. नामदेव जाधव हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज गावचे. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे शिक्षण ही त्यांना घेता आलं नव्हतं. पैसे कमावण्यासाठी इतर लोकांप्रमाणे त्यांनी सैन्य भरतीत भाग घेतला. शेतीत काम केल्यामुळे कसलेले शरीर आणि प्रवरेच्या पात्रात पट्टीचा पोहणारा हे गुण त्यांना ५ मराठा पायदळात शिपाई म्हणुन नियुक्त करून गेले. ५ मराठा पायदळाचा भाग म्हणुन त्यांना इटली ला जर्मनीच्या सेनेचा प्रतिकार करण्यासाठी पाठवलं गेलं. ९ एप्रिल १९४५ ला नामदेव जाधव ह्यांच्या तुकडीला सिनोई नदीकाठच्या जर्मन तळावर हल्ला करण्याचा हुकूम मिळाला. सिनोई नदीच्या दोन्ही बाजुला ४० फुट उंच काठ. पात्रात ४ ते ५ फुट खोलीच पाणी त्यात एका बाजुला जर्मन सेनेचे तिन बंकर होते तर दुसऱ्या बाजुला ५ मराठा पायदळ त्यात तिसऱ्या बाजुने जर्मन सेनेने सगळीकडे सुरुंग पेरून समोरा समोर लढाईचा एकच मार्ग खुला ठेवला होता.

समोरून हल्ला करण्या पलीकडे ब्रिटिश सेनेला दुसरा पर्याय नसताना त्यांनी नदी ओलांडण्याचा आदेश आपल्या सेनेला दिला. जर्मन सेनेच्या तिन्ही बंकर मधुन मशिनगन आग ओकायला लागल्या. शिपाई नामदेव जाधव ह्यांच्या तुकडीतील अनेकजण मृत्युमुखी पडले. जर्मन सेनेच्या मशिनगन यमाच्या रूपात त्यांच्यावर बरसत होत्या. आपला कंपनी कमांडर आणि इतर अनेक सहकारी जखमी होऊन युद्धभूमीवर पडले असताना ही शिपाई नामदेव जाधव विचलित झाले नाहीत. जखमी अवस्थेत पडलेल्या आपल्या कमांडर आणि सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी शिपाई नामदेव जाधव ह्यांनी गोळ्यांच्या वर्षावात पाण्यात  घेतली. आपल्या कंपनी कमांडर ला त्यांनी आपल्या पाठीवर घेऊन अलीकडच्या काठावर आणलं. त्या काठावर जर्मन सैनिकांनी सुरुंग पेरले होते. त्या सुरुंगातून रांगत त्यांनी आपल्या कमांडर ला सुरक्षित स्थळी पोहचवले. त्या नंतर पुन्हा एकदा पलीकडच्या तटावर त्यांनी कुच केले. तिथुन आपल्या एका जखमी सहकाऱ्याला पाठीवर घेऊन पाण्यात उडी घेतली. ह्या वेळेस जर्मन सेनेने त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. पाण्यात त्यांच्यावर अनेक मोर्टार टाकले पण सगळ्या माऱ्यापासून आपला आणि आपल्या जखमी सहकाऱ्याला वाचवत त्यांनी सुरक्षित स्थळी नेलं. आपल्या सहकाऱ्यांची अशी क्रुरपणे केलेल्या हत्येचा बदला म्हणुन नामदेव जाधव एकटे जर्मन सेनेच्या एका बंकरवर तुटून पडले.

नामदेव जाधव ह्यांच्याकडे एक साधी टॉमी गन होती तर समोरून मशिनगन आणि मोर्टार चा वर्षाव चालू होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा गनिमी काव्या प्रमाणे ह्या बंकर तुटून पडला. अतीतटीच्या लढाईत शिपाई नामदेव जाधव ह्यांनी बंकर वर कब्जा मिळवला. पण ह्यात त्यांच्या हाताला गोळ्या लागल्या. एका बंकर वर कब्जा मिळवला तरी अजुन दोन बंकर आग ओकत होते. हाताला लागलेल्या गोळ्यांमुळे त्यांना आपल्या बंदुकी मधुन गोळ्या चालवणं अशक्य झालं होतं. पण हा मावळा डगमगला नाही. जर्मन सेनेचे दोन्ही बंकर नष्ट करण्याचा चंग त्यांनी बांधला. आपल्या जवळ असलेल्या ग्रेनेड ने त्यांनी उरलेल्या बंकरवर हल्लाबोल केला. आपल्या कडचे ग्रेनेड संपत आहे हे बघुन पुन्हा रांगत जाऊन त्यांनी आपल्या पोस्ट वरून ग्रेनेड आणले. आपल्या पराक्रमाने त्यांनी दोन्ही बंकर नेस्तनाबुत केले. तिन्ही बंकरवर कब्जा केल्यावर शिपाई नामदेव जाधव ह्यांनी पोस्टच्या एका उंचीवर उभं राहुन "बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी आरोळी ठोकली. शिवगर्जनेचा तो आवाज इटली च्या सिनोई नदीच्या आसमंतात गरजला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याने पुर्ण जर्मन सेनेचा खात्मा केला होता. पलीकडच्या तिरावर मागे असलेल्या ब्रिटिश सेनेच्या कानात ती शिवगर्जना विजेसारखी कडाडली. ५ मराठा पायदळाचे ब्रिदवाक्य हे तेच असल्याने आपल्या सैनिकाने लक्ष्य पुर्ण केल्याची ती गर्जना होती. ह्या विजयाने पुर्ण युद्धाचा रोख पालटला. ब्रिटिश सेनेने जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावताना इथल्या पुर्ण परिसरावर आपला कब्जा केला.

शिपाई नामदेव जाधव ह्यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रम, शौर्यासाठी ब्रिटिश सेनेच्या सर्वोच्च सैनिकी पुरस्काराने गौरवण्यात आलं. शिपाई नामदेव जाधव ह्यांनी नुसत्या आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवला तर आपल्या एकट्याच्या पराक्रमाने पुर्ण युद्धाचं स्वरूप त्यांनी बदलवलं. ब्रिटीश राज्यकर्ते त्यांच्या पराक्रमाने अवाक झाले होते. १९५३ ला ब्रिटिश राणी एलिझाबेथ हिच्या राज्यरोहण सोहळ्यात त्यांना "शाही पाहुणे" म्हणुन अगत्याचं आमंत्रण होतं. ह्या शिवाय दर दोन वर्षांनी त्यांना राणीच्या स्वागत सोहळ्यासाठी इंग्लंड वरून खास आमंत्रण येत असे. महाराष्ट्रातल्या एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन इटली मध्ये आपल्या पराक्रमाने त्यांनी आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जगात अजरामर केलं. अश्या ह्या पराक्रमी सैनिकाचा, मावळ्याचा  २ ऑगस्ट १९८४ ला पुणे इथे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची आठवण म्हणुन ९ एप्रिल २०१७ ला इटली सरकारने त्याच सिनोई नदीच्या काठी जिकडे शिपाई नामदेव जाधव ह्यांनी आपला भिमपराक्रम केला तिकडेच त्यांच्या स्मारकाच उदघाटन केलेलं आहे. खंत एकच ज्या मातीत ते जन्माला आले त्याच मातीतील किती लोकांना त्यांचं नाव आणि त्यांच्या भिमपराक्रमाची माहिती आहे हा अभ्यासाचा विषय असेल. आपल्या पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव साता समुद्रापार पोहचवणाऱ्या ह्या मावळ्यास माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.. 

(खाली लंडन गॅझेट मधील काही अंश.  कंसात लिहलेलं ब्रिद वाक्य समजण्यासाठी लिहिलं आहे. लंडन गॅझेट चा ते भाग नाही. )

The KING has been graciously pleased to approve the award of the VICTORIA CROSS to:—

No. 18706 Sepoy Namdeo JADHAO, 5th Mahratta Light Infantry, Indian Army.

In Italy, on the evening of the 9th April, 1945, a Company of the 5th Mahratta Light Infantry assaulted the east floodbank of the Senio river, north of S. Polito.

Having silenced all machine gun fire from the east bank, he then climbed on to the top of it and, in spite of heavy mortar fire, stood in the open shouting the "Mahratta war cry" ( बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय) and waving the remainder of the Companies across the river.

This Sepoy not only saved the lives of his comrades, but his outstanding gallantry and personal bravery enabled the two Companies to hold the river banks firmly, and eventually the Battalion to secure a deeper bridgehead, which in turn ultimately led to the collapse of all German resistance in the area.

— London Gazette, 15 June 1945.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल, लोकमत

Friday 6 December 2019

लॅरी आणि सर्जी चं गुगल... विनीत वर्तक ©

लॅरी आणि सर्जी चं गुगल... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी गुगल चे निर्माते लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्यांनी आपल्या अल्फाबेट ह्या कंपनीची सुत्र भारतीय वंशाच्या आणि सध्या गुगल चे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या सुंदर पिचई कडे देऊन एक प्रकारे एका दंतकथेचा शेवटचा अध्याय लिहिला असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही. २०१५ ला जेव्हा गुगल ला अल्फाबेट च्या छत्रछायेखाली आणलं गेलं तेव्हाच ह्या अध्यायाची सुरवात झाली होती. गुगल च्या रोजच्या कामातुन ह्या दोघांनी हळूहळू अंग काढुन घ्यायला सुरवात केली होती. गुगल २१ वर्षाच झाल्यावर ज्या प्रमाणे एखाद्या मुलाला त्याचे पालक त्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतात त्याच प्रमाणे आपलं मुलं असल्या प्रमाणे ह्या दोघांनी गुगल मधुन आपलं अंग काढुन गुगल च्या पुढच्या वाटचालीत आता पालकाची तटस्थ भुमिका स्विकारली आहे.

२१ वर्षांपूर्वी मेनलो पार्क, कॅलिफोर्निया इथे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्या दोघांनी ४ सप्टेंबर १९९८ ला एका गॅरेज मध्ये गुगल ची स्थापना केली. हे दोघेही स्टॅनफर्ड विद्यापीठात पी.एच.डी. शिकत होते. जेव्हा गुगल च्या सर्च इंजिन ची स्थापना झाली तेव्हा इंटरनेट च्या बाजारात याहू सर्च इंजिन चं साम्राज्य होतं आणि त्या सोबत अल्टा विस्टा आणि आस्क जिवास सारखी छोटी मोठी सर्च इंजिन होती. पण ही सगळी सर्च इंजिन रिव्हेलन्स पद्धतीने काम करत असत. (जी गोष्ट तुम्ही शोधत आहात त्याच्याशी मिळती जुळती गोष्ट तुमच्या सर्च मध्ये दिसत असे.) पण गुगल सर्च इंजिन मात्र शोधकर्त्या समोर प्रसिद्ध असलेल्या वेब साईट आणत होतं. ह्या पद्धतीमुळे गुगल ने सर्च इंजिन च्या क्षेत्रात क्रांती आणली. 'गुगल' हा पुर्ण जगात इंटरनेट चा आरसा झालं. आजच्या क्षणाला सुद्धा गुगल जगातील सगळ्यात जास्ती भेट देण्यात येणारी वेब साईट आहे. गुगल सर्च इंजिन इंटरनेट वरील ७५% टक्के सर्च इंजिन चा हिस्सा आहे ह्याशिवाय मोबाईल सर्च इंजिन मध्ये हाच हिस्सा ९०% इतका प्रचंड आहे. आज गुगल ज्या अल्फाबेट कंपनीच्या छत्रछायेखाली आहे त्याच मार्केट कॅपिटल ९३० बिलियन अमेरीकन  डॉलर पेक्षा जास्ती आहे. आज अल्फाबेट मध्ये १ लाख पेक्षा लोक काम करतात. अवघ्या २१ वर्षात गुगल ने केलेला प्रवास थक्क करणारा आहे.

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्यांनी जरी जरी गुगल च्या रोजच्या कामातुन निवृत्ती घेतली असली तरी अल्फाबेट चे ५१% शेअर ह्या दोघांकडे आहेत ज्याची आजमितीला किंमत १०० बिलियन डॉलर पेक्षा जास्ती आहे. अल्फाबेट ही कंपनी वर्षाला २५% वेगाने वाढते आहे. लॅरी पेज कडे आज ६२ बिलियन  डॉलर ची संपत्ती तर सर्जी ब्रिन कडे ६१ बिलियन डॉलर ची संपत्ती आहे. गुगल च्या ह्या अफाट वाढीला ह्या दोघांची दुरदृष्टी कारणीभुत आहे. एका साध्या गॅरेज मधे सुरु झालेल्या गुगल ने सुरुवातीपासुन इंटरनेट ची ताकद ओळखुन पावलं टाकली. गुगल ने आपलं तंत्रज्ञान आपल्या वस्तु मधे आणण्यासाठी  छोट्या, मोठ्या स्टार्ट अप कंपनी विकत घेतल्या. २००५ मध्ये १.६५ बिलियन डॉलर ला यु ट्युब विकत घेतलं. २०१४ मध्ये सोंगझा नावाची कंपनी विकत घेऊन गुगल ने बाजारात गुगल प्ले आणलं. बाजारात चालेल्या हवेचा रोख ओळखुन गुगल ने २००८ मध्ये गुगल क्रोम ब्राऊझर बाजारात आणला. आपल्या सेवा सर्व स्तरावर आणण्यासाठी गुगल ने सगळ्या बाजुने आपल्या वस्तु बाजारात आणल्या जसं गुगल च्या मेल अकाउंट वरून तुम्ही सगळ्या सर्विसेस वापरू शकता. गुगल मॅप्स, गुगल प्ले, गुगल क्लाउड, गुगल डॉक्स, गुगल शिट ते एनरॉईड. एकाच जागेवरून सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार गुगल प्रत्येक गोष्टीच केंद्रस्थान झालं त्यामुळेच गुगल आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. तुम्ही कुठे न कुठे गुगल शी जोडलेले असता.

गुगल च्या केंद्रस्थानी झालेल्या ह्या प्रवासाने गुगल जरी मोठं झाली तरी ह्या केंद्रस्थानामुळे माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गुगल साठी अडचणीचा ठरला आहे. गुगल ला युरोपियन युनियन ने १.३ बिलियन पाउंड चा दंड केला आहे. २०१७ ला २.४ बिलियन पाउंड चा दंड तर २०१८ ला ५ बिलियन डॉलर चा दंड गुगल ला माहितीच्या सुरक्षितता आणि इतर इ- कॉमर्स मधील चुकीच्या गोष्टींसाठी केला गेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीनंतर गुगल थांबलेली नाही. गुगल ह्या पुढच्या काळात घडणाऱ्या बदलांवर काम करत आहे. ज्यातील एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे ड्राइव्हर नसणारी कार. गुगल सध्या ह्या तंत्रज्ञानावर काम करत असुन येत्या काळात स्वप्नवत वाटणारी गोष्ट जगाच्या रस्त्यांवर खरोखरचं वास्तव असणारं आहे. अश्या बदलांच्या काळात गुगल ची निर्मिती करणाऱ्या लॅरी आणि सर्जी ह्या दोघांनी एकप्रकारे निवृत्ती घेऊन गुगल च्या सुकाणु ची जबाबदारी भारतीय वंशाच्या सुंदर पिचईकडे देताना एक वेगळा पायंडा जागतिक बाजारात घातला आहे. एका स्वप्नाला प्रत्यक्षात आणुन पुर्ण जगाची दिशा बदलावताना अश्या सुंदर अनुभुती पासुन निवृत्ती घेणं हे लॅरी आणि सर्जी जाणोत.

भारतात आपल्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी कंपनीची मालकी आणि सत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी रस्सीखेच सुरु असताना जगातील नावाजलेल्या पहिल्या १० कंपन्यांन मधे असलेली आणि जवळपास १००० बिलियन अमेरीकन डॉलर चं मार्केट कॅप असलेली गुगल एका दुसऱ्याच नेतृत्वाकडे देऊन लॅरी आणि सर्जी ने स्विकारलेली पालकांची भुमिका नक्कीच गुगल ला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.