Thursday 30 July 2020

पाऊले चालती मंगळाची वाट... विनीत वर्तक ©

पाऊले चालती मंगळाची वाट... विनीत वर्तक ©

मंगळ ग्रह नेहमीच मानवासाठी आकर्षणाचा विषय राहिला आहे. पृथ्वीशी अनेक प्रकारे साधर्म्य असणाऱ्या मंगळावर कोणे एके काळी सजीव सृष्टी होती. इकडे पाणी, ऑक्सिजन असल्याचे पुरावे सापडले आहेत. मंगळाचे वातावरण विरळ असल्याने तसेच पाणी लुप्त झाल्याने मंगळावर सजीव सृष्टीसाठी गरजेच्या असणाऱ्या ऑक्सिजन च अस्तित्व नष्ट झालं आणि मंगळ एक दगड धोंड्यांचा ग्रह बनून राहिला. मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगती नंतर मंगळाच्या ह्या भूतकाळाची कहाणी शोधण्यासाठी आणि मंगळाकडे मानवाने आपलं भविष्यातील स्थान म्हणून बघायला सुरवात केली. १९९७ साली अमेरीकेच्या नासा ने पहिल्यांदा मंगळावर पाथफाईंडर हे मिशन पाठवून त्यातून सोजोरनेर रोव्हर मंगळाच्या भूभागावर उतरवलं. ह्या नंतर २००३ मध्ये स्पिरीट आणि ऑपरच्युनिटी  हे रोव्हर तर २०१२ मध्ये क्युरीसिटी हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वी उतरवलं. ह्या सगळ्यांकडून येणाऱ्या माहितीचा अभ्यास नासा मानवाच्या भविष्यातील वस्तीसाठी करत आहे.

काल नासाने पुन्हा एकदा मंगळाकडे आपल्या पर्सीवरंस ह्या मोहिमेद्वारे उड्डाण केलं आहे. तर हे पर्सीवरंस रोव्हर नक्की काय आहे? ह्यातून नासा काय साधणार आहे? नासा सोबत अजून दोन देशांच्या मोहिमा मंगळाकडे झेपावल्या आहेत. चीन ची टिणवेन १ तर यु.ए.इ. चं होप ऑरबिर्टर. चीन ची मोहीम ही मंगळाच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरवू शकतो ह्या तांत्रिक क्षमतेचा अभ्यास करणारी आहे. तर अरब देशांच पाहिलं मिशन म्हणून होप ऑरबिर्टरकडे बघितलं जात आहे. ह्या तिन्ही मोहिमा वेगवेगळ्या उद्देशाने जात असल्या तरी ह्या सगळ्यातून एक बाब निश्चित आहे ती म्हणजे पाऊले चालती मंगळाची वाट....

पर्सीवरंस ही नासा ची मोहीम सगळ्यात महत्वाची आणि मानवाच्या तांत्रिक क्षमतेला एक पाऊल पुढे नेणारी ठरणार आहे. नासाच्या इतिहासाप्रमाणे एखाद्या मिशन नंतर पुन्हा तिकडेच मिशन पाठवताना ते सगळ्या बाबतीत दोन पावलं पुढे असेल हे बघितलं जाते आणि पर्सीवरंस ही त्याला अपवाद नाही. पर्सीवरंस रोव्हर हे नासाच्या पुढल्या पिढीतील एक रोव्हर असून ह्यात एका नव्या तंत्रज्ञानाची चाचणी ही नासा घेणार आहे. पर्सीवरंस रोव्हर आपल्या पोटात इंज्युनिटी नावाचं एक ड्रोन घेऊन जाते आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्यावर हे ड्रोन मंगळाच्या पृष्ठभागावर ठेवून त्याच उड्डाण नासा मंगळाच्या वातावरणात करणार आहे. ह्यात जर नासा यशस्वी झाली तर मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा एका दुसऱ्या ग्रहावर असं उड्डाण केलं जाणार आहे. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की मंगळाचे वातावरण अतिशय विरळ आहे. त्यामुळे एखाद्या उड्डाणासाठी लागणारं बल आपण पृथ्वीवर सहज निर्माण करू शकतो पण मंगळाच्या वातावरणात ते निर्माण करणं हे अतिशय कठीण आहे. त्यामुळेच इंज्युनिटी च उड्डाण हे अनेक कारणांसाठी वैशिष्ठपुर्ण ठरणार आहे. इंज्युनिटी वर असलेल्या कॅमेरा आणि इतर संशोधन करणारी उपकरणं मंगळाच्या पृष्ठभागावर अश्या ठिकाणी जाऊ शकणार आहेत जिकडे रोव्हर ने जाणं शक्य नाही. 

पर्सीवरंस मंगळाच्या पृष्ठभागावर उतरून नक्की काय करणार तर मंगळवार अमाप असलेल्या कार्बन डायऑक्सइड ला ऑक्सिजन मध्ये रुपांतरीत करणार आहे. मंगळाच्या वातावरणात जवळपास ९५% कार्बन डायऑक्सइड आहे. ऑक्सिजन च प्रमाण अत्यल्प म्हणजे ०. १७४% इतकं नगण्य आहे. जर आपण कार्बन डायऑक्सइड चं विघटन करू शकलो तर मानवाच्या भविष्यातल्या सफारी चा मार्ग मोकळा होणार आहे. पृथ्वीवरून ऑक्सिजन, अन्न, पाणी, इंधन घेऊन मंगळवार २ वर्षाचा प्रवास करणं प्रचंड खर्चिक आणि जवळपास अशक्य आहे. पण समजा आपण तिकडे ऑक्सिजन ची निर्मिती करू शकलो तर सगळ्याच गोष्टी अतिशय स्वस्त आणि सुलभ होणार आहेत. नासा च्या पर्सीवरंस वर मॉक्सि नावाचं एक उपकरण आहे जे की मंगळवार ऑक्सिजन निर्मिती चा प्रयत्न करणार आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर भविष्यातल्या मोहिमांमध्ये ह्यातलं तंत्रज्ञान मोठ्या स्वरूपात वापरून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन ची निर्मिती शक्य होणार आहे. ऑक्सिजन उपलब्ध झाल्यामुळे सजीवांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न तर मार्गी तर लागतीलच पण त्याशिवाय परतीच्या प्रवासासाठी इंधन ही उपलब्ध होणार आहे. 

पर्सीवरंस आपल्या पोटात मंगळावरील दगडाचे आणि मातीचे नमुने जतन करून ठेवणार आहे. हे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी येत्या दशकात पुन्हा एकदा एक वेगळं मिशन मंगळावर स्वारी करेल. मंगळवार माणसांची वसाहत सुरु करण्याच्या दृष्टीने स्पेस एक्स ही एलोन मस्क ह्यांची कंपनी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. 'स्टारशिप' नावाची एका मोहिमे अंतर्गत सध्या स्पेस एक्स २०२४ पर्यंत मंगळवार स्वारी करणाच्या तयारीत आहे. ह्या स्टारशिप मोहिमेबद्दल एका वेगळ्या लेखात सविस्तर लिहेन. तुर्तास नासा ला पर्सीवरंस ह्या मोहिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पर्सीवरंस १८ फेब्रुवारी २०२१ ला मंगळाच्या पृष्ठभागावर उतरेल तेव्हा मानवाच एक नवीन पाऊल मंगळाच्या पृष्ठभागावर पडलेलं असेल. 

फोटो स्रोत :- नासा ( खालील फोटोत पर्सीवरंस रोव्हर आणि इंज्युनिटी ड्रोन) 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Wednesday 29 July 2020

अब तुम्हारे हवाले वतन साथियों... विनीत वर्तक ©

अब तुम्हारे हवाले वतन साथियों... विनीत वर्तक ©

आज लडाख भारताचा भाग आहे त्यामागे भारतीय सैनिकांच अतुलनीय शौर्य आहे. आज ए.सी. केबिन अणि कॅमेरा समोर हेअरस्टाइल करून सैनिक बंदुकीशिवाय पुढे गेले कसे? हे विचारणारं राजकीय नेतृत्व बघून कुठेतरी असं वाटते की ज्या सैनिकांमुळे आज आपण हे बोलू शकतो त्यांच बलिदान आणि पराक्रम ह्याची थोडीतरी जाणीव ठेवायला हवी. 

 “When the going get’s tough, the tough get’s going” 

भारतीय सैनिक ह्याच उक्तीला आजवर पुरून उरत आले आहेत. त्यांच्या युद्धातील शौर्या ची तुलना तर कशाचीच होऊ शकत नाही. त्याचं देशप्रेम व्यक्त करायला शब्द पण कमी पडतात. कारण त्याचं ते असामान्य देशप्रेम शब्दात मांडणार तरी कस? मातृभुमिच्या प्रेमाचा इतका वारसा भारतीय सैन्याने आपल्यासमोर ठेवला आहे कि वाचताना पूर्ण अंगात रोमांच उभे राहतात. भारताने असे सैनिक गमावले ह्यासाठी एका डोळ्यातून पाणी तर दुसऱ्या डोळ्यातून त्यांच्याविषयी प्रचंड अभिमान वाटतो. पण हे सगळ आज आपण विसरलो आहोत ह्याच वाईट हि वाटते. आज कोणता इतिहास शिकवला जातो? इतिहासात सुद्धा होऊन गेलेल्या गोष्टीत धर्म, जात, पात शोधून त्यावर राजकारण करून एकमेकांचा जीव घेणाऱ्या आपल्यात कुठून निर्माण होणार आहे देशभावना? कारण आम्ही आमच्या सैनिकालाच समजू शकलो नाही तिकडे देश तर दूरच राहिला.

रॉ करेज ज्याला म्हंटल जाते जे कोणत्याही पैश्याने निर्माण करता येत नाही. तर ते तुमच्या रक्तात असाव लागते. उफाळून याव लागते तेव्हाच समोर आलेल्या शत्रूला आपण असे सामोरे जातो ज्याचा विचार तर सोडाच ज्याच स्वप्न पण शत्रू बघू शकत नाही. हि देशभक्ती ते रॉ करेज आपल्या भारतीय सैनिकांनी दाखवल त्याला जगात तोड नाही. शेवटचा माणूस शेवटची गोळी संपेपर्यंत लढला. सगळ संपल्यावर उघड्या हातानी शत्रूवर चालून गेले. पण माघार घेतली नाही. एकाने हि तिथून पळ काढला नाही. ते लढले फक्त देशासाठी. रक्ताचा चिखल झाला. पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या बंदुकी शत्रूचा वेध घेत होत्या. श्वास थांबल्यावर पण प्राण गेलेल्या डोळ्यांच्या नजरेत फक्त शत्रू होता. प्राण गेलेली बोट बंदुकीच्या ट्रिगर वर स्थिरावलेली होती. अरे काय आहे हे? हि कुठली जाज्वल्य देशभक्ती? अस एक नाही तर प्रत्येकजण असाच लढला. ते १२३ होते पण त्याचं बळ १२३ कोटी भारतीयांच्या देशभक्तीच होत. ज्याच्यापुढे शत्रू निष्प्रभ झाला. ते गेले पण त्यांच्या पराक्रमामुळे आजही लडाख भारताचा भाग आहे. आज किती जण ओळखतात त्या १२३ लोकांना? किती लोकांना माहित आहे त्या १२३ लोकांचा पराक्रम? किती लोकांना माहित आहे त्या १२३ पेकी प्रत्येक जण आपल्यामागे किती मोठा देशभक्तीचा वारसा ठेवून गेला आहे. इकडे नको त्या पुतळ्यांच राजकारण करणाऱ्या लोकांना त्या १२३ लोकांच आज स्मरण पण नाही. भारताचा सैनिक आणि आपले हिरो आपणच ओळखत नाही हीच आपली शोकांतिका आहे.

ते १२३ होते १३ कुमाव बटालियन चे शूरवीर भारतीय सैनिक. त्याचं नेतृत्व करत होते ५६ इंचांची छाती असलेले बहादूर मेजर शैतान सिंग. आजही जिकडे हे १२३ लढले ती जागा जगातील सर्वात कठीण अशी युद्धभूमी मानली जाते. समुद्रीसपाटी पासून ५००० मीटर पेक्षा जास्त आणि साधारण १६००० फुटापेक्षा अधिक उंचीवर रेझांग ला वर हि लढाई १८ नोव्हेंबर १९६२ ला झाली. १३ कुमाव बटालियन च्या ह्या १२३ लोकांच्या चार्ली कंपनी कडे रेझांग ला च्या सुरक्षिततेची जबाबदारी होती. १६००० फुटावर जिकडे श्वास घ्यायला पण कठीण जाते तिकडे अपुरा साठा, थंडीपासून रक्षण करणारे कपडे अश्या अवस्थेत कोणत्याही मदतीशिवाय भारताच्या ह्या पोस्ट च रक्षण करण्याची जबाबदारी होती.

१८ नोव्हेंबर १९६२ ला चीन च्या सैनिकांनी त्यांच्या ट्रेडमार्क ह्युमन व्हेव बनवत अत्याधुनिक बंदुकी, रॉकेट सह भारताच्या ह्या पोस्ट वर सकाळच्या गोठवणाऱ्या थंडीत आक्रमण केल. ३५० चीनी सैनिकांच्या पहिल्या फळीने भारताच्या १२३ लोकांवर चोहोबाजूने हल्ला चढवला. पण जिगरबाज भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाने चीनी सैनिकांना पाणी पाजल. चीनी आक्रमणाची पहिली फळी कोलमडत असताना चीन च्या दुसऱ्या फळीने सगळीकडून आक्रमण केल. दुसऱ्या फळीत तब्बल ४०० सैनिक भारतीय सैनिकांवर तुटून पडले. रॉकेट, मशीनगन च्या आवाजांनी १६,००० फुटांच्या आसमंतात रक्ताची कारंज उडाली. अनेक देह बर्फावर निपचित पडले. पण भारतीय सैनिक मागे हटले नाहीत. न त्यांनी शरणागती पत्करली देशभक्तीच्या त्वेषाने ते चीनी सैन्यावर तुटून पडले. चीन च्या तिसऱ्या फळीतील अजून ७५० सैनिकांनी आक्रमण केल. मेजर शैतान सिंग ज्यांच्या नेतृत्वाखाली हे १२३ लढत होते ते स्वतः शत्रूच्या गोळ्यांचा विचार न करता सगळ्या पोस्ट वर जाऊन शत्रूला प्रत्युत्तर देत होते. त्या १२३ च मनोधैर्य वाढवत होते. अंगावर गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा जखमी अवस्थेत आपल्या जीवाची पर्वा न करता चीनी सैन्याला सगळ्या बाजूने रोखून धरत होते. चीन च्या त्या ह्युमन व्हेव पुढे शरणागती पत्करण्याची संधी असताना सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत “बचेंगे तो ओर भी लढेंगे” ह्या पानिपत च्या उक्ती प्रमाणे मेजर शैतान सिंग ह्यांनी प्रत्येक सैनिकाच्या मनात देशभक्ती निर्माण केली. त्यामुळेच हे १२३ चीन च्या जवळपास १५०० पेक्षा जास्ती असणाऱ्या सैन्याला भारी जात होते.

मेजर शैतान सिंग गंभीर जखमी झाले असताना सैनिक त्यांना आडोशाला घेऊन जात होते. पण चीनी चालून येत आहेत हे बघून त्यांनी सैनिकाला आपल्याला जिकडे आहे तिकडे सोडून पुन्हा एकदा चीनी सैनिकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज्ञा केली. आपल्या जीवाची पर्वा न करता मेजर शैतान सिंग ह्यांनी पुन्हा एकदा बंदूक हातात घेऊन शत्रूवर गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्याकडच्या गोळ्या संपल्या तेव्हा सैनिकांनी चीनी सैनिकांच्या दिशेने धाव घेत हातघाई ची लढाई सुरु केली. अंगावर गोळ्या तुटून पडत असताना त्यांनी पळ नाही काढला तर आनंदाने आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी मृत्यू पत्करला. भारताचा प्रत्येक सैनिक शेवटच्या गोळी पर्यंत लढला. युद्ध थांबल तेव्हा रेझांग ला वर माणसांच्या प्रेताचा खच पडला होता. भारताने ११४ वीर सैनिकांना गमावलं त्यात लीडर प्रमाणे पुढे राहून त्याचं नेतृत्व करणारे मेजर शैतान सिंग ह्यांना वीरमरण आल. भारताचे ९ सैनिक गंभीर जखमी झाले. तर चीन ने १३०० पेक्षा जास्त सैनिकांना गमावलं होत. ह्यात जखमींचा आकडा वेगळा आहे. भारताचे फक्त १२३ सैनिक त्या १५०० चीनी सैनिकांना पुरून उरले. हे युद्ध काही साध्या युद्धभूमीवर झाल नव्हत. तब्बल १६,००० फुटावर भारतीय सैनिकांनी ज्या शौर्य आणि देशभक्ती च दर्शन दाखवल ते शब्दांपलीकडच आहे. ह्या अतुलनीय पराक्रमासाठी मेजर शैतान सिंग ह्यांना मरणोत्तर परमवीर चक्रा ने सन्मानित करण्यात आल.

अश्या जाबांज भारतीय सैनिकांना आपण विसरून गेलो आहोत. ज्या मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल रक्त सांडल त्यांना आपण ओळखत पण नाही. त्यांच्या त्यागाची किंमत पण आज आपण ठेवत नाहीत. ते १२३ ब्राह्मण नव्हते न दलित होते, ना हिंदू होते ना मुसलमान होते, न उच्चवर्णीय होते न मागासलेले होते. ते फक्त आणि फक्त भारतीय होते. हेच मनात ठेवून त्यांनी सर्वोच्च बलिदान आपल्या देशासाठी दिल. पण आपण काय करतो आहोत? आपला करंटेपणा इतका आहे कि त्याची आठवण तर नाहीच पण आज जातीवरून भांडतो आहोत. माझे हक्क मागताना कर्तव्य विसरत आहोत. ज्या इतिहासात असे वीरपुरुष होऊन गेले. त्या इतिहासात जाऊन त्यांची जात शोधत आहोत. कारण आपण हेच करू शकतो. आपली लायकी,विचार आणि आपली देशभक्ती तितकीच पोकळ आणि कुपमंडूक आहे. तिकडे सांडलेल्या रक्ताच्या एकेका थेंबाच आपण देण लागतो हे आपण विसरून गेलेलो आहोत.

पण खेदाने हि जाणीव कोणत्याच भारतीयाला होत नाही. त्यामुळे जितक्या सहजतेने आपण शहीद म्हणतो त्या शब्दामागच बलिदान आपण लक्षात घेत नाही. आज भारत अखंड आहे तो अश्याच शूरवीर, पराक्रमी सैनिकांमुळे. जिकडे तुम्ही कोणत्या धर्माचे आणि जातीचे असण्यापेक्षा भारतीय असण महत्वाच असत. कदाचित आमची पिढी काय येणारी पिढी ह्या इतिहासाला समजून घेण्यात कमी पडली म्हणून कि काय त्या १२३ हिरोंना आम्ही आमच्या आयुष्यात जागा देऊ शकलो नाही. अजूनही वेळ नाही गेली. वेळ काढून एकदा समजून घ्या आयुष्यातल्या खऱ्या हिरोंना. ज्यांच्यामुळे मी, तुम्ही आपण सगळेच ह्या अखंड देशात सुरक्षित आहोत. त्या १२३ हिरोंना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.

रेझांग ला इकडे त्या सैनिकांच्या सैन्य स्मारकावर असलेली अक्षरे खूप काही सांगून जातात, 

“How can a man die better

Than facing fearful odds

For the ashes of his fathers

And the temples of his Gods.”

To the sacred memory of the Heroes of Rezang La, 114 Martyrs of 13 Kumaon who fought to the Last Man, Last Round, Against Hordes of Chinese on 18 November 1962.

– Built by All Ranks 13th Battalion, The Kumaon Regiment.

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday 28 July 2020

ब्युटी विथ बिस्ट... विनीत वर्तक ©

ब्युटी विथ बिस्ट... विनीत वर्तक ©

भारताची राफेल विमान आज काही वेळाने भारताच्या भूमीवर उतरतील. राफेल विमान येण्याचा इतका आनंद भारतात साजरा होतो आहे त्याचवेळी शत्रू देशात मातम सुरु झालेला आहे. जवळपास १८ वर्षानंतर भारतात एक नवीन लढाऊ विमान येते आहे ह्याचा आनंद आहेच पण त्याचसोबत येणार विमान हे शत्रूला कर्दनकाळ ठरणार आहे त्यामुळे आनंद द्विगुणित होतो आहे. अजून भारतात राफेल विमान आलेली नाही तोवर शत्रूच्या गोटात घाम आणि जाळ, धूर एकत्रच सुरु झालेला आहे. ह्याच कारण राफेल विमानं तर आहेतच पण त्याच्या जोडीला भारताच्या सीमेवर जे कॉम्बिनेशन होते आहे त्याचा धसका सर्वानी घेतला आहे. जगात असं कॉम्बिनेशन कोणत्याच देशात तूर्तास नाही. तर नक्की असं काय आहे? ज्यामुळे शत्रूची पाचावर धारण बसली आहे.

भारताकडे चौथ्या पिढीतील किंबहुना ४ थ्या पिढीपेक्षा थोडं जास्ती प्रगत असं सुखोई एम.के.आय. ३० हे लढाऊ विमान आहे. हे विमान माख २ किंवा तब्बल २१२० किमी/ तास वेगाने उडू शकते. ३००० किमी नॉर्मल तर जवळपास १०००० किमी अंतर हवेतल्या हवेत इंधन भरून गाठू शकते. ह्यावर प्रगत रडार आहे आणि जवळपास ८,००० किलोग्रॅम वजनाची शस्त्रास्त्र घेऊन ते उडू शकते आणि पुगाचेव्ह कोब्रा सारखी हवाई कसरत करण्यात जगात सर्वोत्तम समजले जाते.

In aerobatics, Pugachev's Cobra (or Pugachev Cobra) is a dramatic and demanding manoeuvre in which an airplane flying at a moderate speed suddenly raises the nose momentarily to the vertical position and slightly beyond, before dropping it back to normal flight. 
 
ह्याच्या जोडीला ब्राह्मोस हे स्वनातीत क्षेपणास्त्र सुखोईवर बसवण्यात आलं आहे. ब्राह्मोस हे जगातील सगळ्यात वेगवान रयामजेट सुपर सॉनिक क्रुझ मिसाईल आहे. ध्वनीच्या २.८ पट ते ३ पट जवळपास ३६०० किमी/तास वेगाने जाणारे म्हणजे बंदुकीच्या गोळी पेक्षा हि जास्त असणारा हा वेग ब्राह्मोस ला जगातील सगळ्यात घातक मिसाईल मध्ये घेऊन जातो. अति प्रचंड वेगामुळे हे मिसाईल प्रचंड अशी कायनेटिक उर्जा निर्माण करते. त्याचमुळे ह्याचा प्रहार म्हणजे शत्रूचा सुपडा साफ.

भारत लवकरच एस ४०० एअर डिफेन्स सिस्टीम सीमेवर तैनात करत आहे. एस ४०० ची एक बटालीयन म्हणजे शत्रूच्या चारी मुंड्या चीत. ह्यातील सर्व मिसाईल सुपर सॉनिक व हायपर सॉनिक वेगाने म्हणजे तब्बल १४ माख वेगाने ( ध्वनीपेक्षा १४ पट जास्ती वेगाने) १७,००० हजार किमी / तास वेगाने शत्रूकडे झेपावतात. एक उदाहरण द्यायचं झाल तर हलवारा एअर बेस मध्ये असलेल्या एस ४०० कडून निघालेलं क्षेपणास्त्र पाकिस्तान मधल्या लाहोर वर उडणाऱ्या एफ-१६ विमानाचा फक्त ३४ सेकंदात वेध घेऊ शकते. १२० ते ६०० किमी पर्यंतच्या टप्यात येणार कोणतही विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन ह्याच्या पासून वाचू शकत नाही. एकाच वेळी ६०० किमितील ३०० वेगवेगळी टार्गेट शोधून तब्बल ८० टार्गेट वर एकाच वेळी खातमा करू शकते. १६० वेगवेगळ्या मिसाईल न एकाच वेळी गाईड करू शकते. ह्यातील स्याम सिस्टीम एफ-३५ सारख्या पाचव्या पिढीतील स्टेल्थ ( रडार वर न दिसणाऱ्या ) फायटर प्लेन ला सुद्धा मारू शकते.

जगातील सध्याच्या घडीला ४.५ पिढीतील सर्वोत्तम समजलं जाणार राफेल लढाऊ विमान २२०० किमी/ तास वेगाने ३७०० किलोमीटर चा पल्ला गाठू शकते. जवळपास १५०० किलोमीटर चा परीसर ह्याच्या टप्यात येतो. ह्याशिवाय राफेल स्काल्प आणि मेटोर, हॅमर क्षेपणास्त्र नी सुसज्ज आहे. ह्याच्या निर्मितीत अतिशय प्रगत तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. अंबाला इथून उडालेले राफेल अवघ्या ८ मिनिटात पाकिस्तान चं लाहोर गाठू शकते तर हसीमारा इथून उडालेले राफेल अवघ्या ३ मिनिटात चीन मध्ये दाखल होऊ शकते. तब्बल ६०० किलोमीटर अंतरावरून राफेल लक्ष्यभेद करू शकते. भारताच्या हद्दीत राहून जवळपास पुर्ण पाकीस्तान त्याच्या टप्यात आहे.

आता विचार करा जेव्हा राफेल विथ स्काल्प आणि मेटोर, हॅमर, त्याच्या जोडीला सुखोई ३० विथ ब्राह्मोस हवेत उड्डाण करतील आणि ह्यांना जमनीवरून शत्रूच्या विमानापासून, क्षेपणास्त्रापासून, द्रोण पासून संरक्षण देणारी एस ४०० यंत्रणा काम करत असेल तेव्हा कोणता शत्रु भारतात येण्याची हिंमत करेल? ह्यामुळेच पाकीस्तान ची एफ १६ आणि जे एफ १७ आता अंडी उबवायला कामाला येणार आहेत. तर तिकडे चीन ची जे २० सह  जे ७, जे १० , आणि सगळेच जे फक्त हवेतल्या हवेत गिरक्या घेण्याइतपत उरणार आहेत. राफेल च्या येण्यानं भारताच्या हवाई दलाला नुसती ताकद मिळालेली नाही आहे तर भारताचं हवाई दल अभेद्य होणाच्या दिशेने पावलं टाकत आहे. ह्यामुळेच शत्रु देशात आग, जाळ, धूर निघायला लागला आहे. राफेल च्या ब्युटी मागे भारताच्या हवाई दलाचं अभेद्य बिस्ट त्यांच्या मानगुटीवर बसलं आहे. ह्याच राफेल वरून खालच्या दर्जाचं राजकारण करून काही घरभेदी शत्रूंनी भारताची इज्जत वेशीवर टांगली होती. भारताच्या संरक्षणासाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींना हाताशी धरून त्याच राजकारण करून आपली पोळी भाजणाऱ्या घरभेदी लोकांकडून भारताला जास्त भीती आहे. कारण सीमांच्या आत निदान हवेतून घुसण्याची हिंमत भारताच्या दोन्ही शत्रूंकडे नाही हे उघड झालेलं आहे. 

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 26 July 2020

राफेल च हॅमर... विनीत वर्तक ©

राफेल च हॅमर... विनीत वर्तक ©

येत्या २९ जुलै २०२० ला ५ राफेल विमान भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी भारतात दाखल होत आहेत. राफेल लढाऊ विमान भारताच्या ताफ्यात येण्यानं दक्षिण आशियातील एक ताकदवर देश म्हणून भारताची प्रतिमा उजळणार आहे. भारताच्या दोन्ही शत्रूंकडे राफेल विमानांना टक्कर देईल अशी लढाऊ विमान तूर्तास नाहीत. जरी चीन कडे पाचव्या पिढीतील स्टेल्थ असणार चेंगडू जे २० हे विमान असलं तरी त्याची क्षमता सिद्ध झालेली नाही. जे २० च्या वापरावर आणि एकूणच त्याच्या तांत्रिक क्षमतेवर खूप सारी प्रश्नचिन्ह उभी आहेत. जो चीन आपल्या देशातील घटना जगासमोर खऱ्याखुऱ्या सांगत नाही तिकडे तांत्रिक क्षमता कश्यावरुन खऱ्या सांगणार आहे? त्यामुळे राफेल च्या येण्याने भारताकडे ०.५ पिढी अत्याधुनिक लढाऊ विमाने पाकीस्तान आणि चीनपेक्षा उपलब्ध होणार आहेत. राफेल स्वतः एक सर्वोत्तम लढाऊ विमान तर आहेच पण त्याच्या मारक क्षमतेला अजून धार देणारी क्षेपणास्त्र राफेल ला अजून घातक बनवतात.

राफेल लढाऊ विमान स्कॅल्प आणि मेटॉर ह्या क्षेपणास्त्र सोबत सुसज्ज असणार आहेत. ही दोन्ही क्षेपणास्त्र जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रात गणली जातात. मेटॉर  तर जगातील क्रमांक १ चे Beyond Visual Range Air-to-Air Missile (BVRAAM) आहे. (BVRAAM म्हणजे असं क्षेपणास्त्र जे की ३७ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्याचा भेद करू शकते. मेटॉर ची क्षमता जवळपास १०० किलोमीटर ची आहे. ते ध्वनीपेक्षा ४ पट वेगाने हवेतून प्रवास करत लक्ष्याचा खात्मा करते.) राफेल च्या जोडीला भारत हॅमर ही क्षेपणास्त्र तंत्रज्ञान घेत आहे. हॅमर क्षेपणास्त्र चा अर्थ होतो HAMMER (Highly Agile and Manoeuvrable Munition Extended Range). तर हे हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान घेतल्यामुळे राफेल ह्या तिन्ही क्षेपणास्त्रांमुळे शत्रूचा कर्दनकाळ ठरणार आहे.

हॅमर क्षेपणास्त्रापेक्षा असं तंत्रज्ञान आहे जे बॉम्ब ला डोळे देतं त्याला अचूक लक्ष्यभेद करायला मदत करते. हॅमर घेण्याची भारताला गरज का भासली? त्याच्या येण्याने नक्की काय फरक पडणार हे समजून घ्यायला हवं. जसं आधी लिहिलं आहे की हॅमर एक तंत्रज्ञान आहे जे कोणत्याही बॉम्ब हल्याची अचूकता वाढवते. असं एक तंत्रज्ञान भारताने आधी वापरलेलं आहे. बालाकोट हल्ल्याच्या वेळी भारताने इस्राईल कडून आलेले स्पाईस २००० तंत्रज्ञान असलेले लेझर गायडेड बॉम्ब डागले होते. ह्या प्रणालीमुळे बॉम्ब ची अचूकता प्रचंड वाढली. स्पाईस प्रणाली लावलेले बॉम्ब ३ मीटर च्या परीघात लक्ष्यभेद करू शकतात. बालाकोट हल्ल्याच्या वेळी अचूकता महत्वाची होती. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या १००० - २००० किमी / तास वेगाने जाणाऱ्या लढाऊ विमानातून साधारण ३०,००० ते ४५,००० फुटावरून टाकलेला बॉम्ब अचूकतेने लक्ष्यावर पडेल अशी शक्यता खूप कमी असते. त्यामुळेच आधीच्या काळात भरमसाठ बॉम्ब टाकले जायचे ज्यातील अनेक दुसरीकडे फुटायचे आणि त्याचा काहीच फायदा होत नसायचा. पण जसजसे तंत्रज्ञान सुधरत गेलं तसतसं बॉम्ब ला गाईड करणाऱ्या सिस्टीम उपलब्ध झाल्या.

स्पाईस २००० ही अशीच एक सिस्टीम आहे जी की बॉम्ब ला वर सांगितलेल्या प्रतिकूल परिस्थितीत डागल्यावर सुद्धा अचूकतेने लक्ष्यभेद करण्यास मदत करते. अश्याच बॉम्ब ला लेझर गायडेड बॉम्ब असं म्हणतात. तर अश्या एका स्पाईस बॉम्ब ची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. भारताने जवळपास १०० स्पाईस बॉम्ब ३०० कोटीला इस्राईल कडून विकत घेतलेले आहेत. आधी राफेल वर ह्याच स्पाईस बॉम्ब ना लावायचा प्लॅन होता पण राफेल च तंत्रज्ञान आणि स्पाईस २००० च तंत्रज्ञान ह्यांना जुळवून आणायला वेळ लागणार होता. त्यात स्पाईस बॉम्ब ची किंमत हा ही एक मुद्दा होता. गेल्या २ महिन्यात भारताच्या सीमेवर युद्धाचे ढग जमा झाले आणि सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. भारताला राफेल ची गरज कधी नव्हे तितकी जाणवत आहे आणि लवकरात लवकर राफेल लडाख च्या सीमेवर भारताला हवं आहे. त्यामुळेच राफेल च्या तंत्रज्ञानाशी आधीच जुळवलेल्या हॅमर तंत्रज्ञानाला घेण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. हॅमर तंत्रज्ञानाची  अचूकता स्पाईस २००० च्या मानाने कमी आहे. हॅमर तंत्रज्ञानाची अचूकता जवळपास ३० मीटर इतकी आहे. ३० मीटर परिघात हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असलेले बॉम्ब अचूकतेने लक्ष्याचा खात्मा करू शकतात.

हॅमर तंत्रज्ञान असलेले बॉम्ब जवळपास ५० ते ७० किलोमीटर लांबून डागता येतात. ही क्षमता विमानाच्या उंचीवर ही अवलंबून आहे. जमिनी जवळून उड्डाण करताना ही क्षमता १५ किलोमीटर पर्यंत रहाते. अस असताना सुद्धा भारताने हॅमर घेण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे ह्याची किंमत. एका हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची किंमत जवळपास १ कोटी ४० लाख रुपयांच्या घरात आहे. स्पाईस पेक्षा अर्धे पैसे आपल्याला हॅमरसाठी मोजावे लागतील दुसरं म्हणजे हॅमर च तंत्रज्ञान हे राफेल च्या तंत्रज्ञानाशी आधीच जुळवलेलं असल्याने त्याचा लगेच वापर भारताला करता येणार आहे. राफेल भारतीय हवाई दलात समाविष्ट झाल्यावर लगेचच मेटॉर, स्कॅल्प, हॅमर सह शत्रूशी दोन हात करण्यात सक्षम असणार आहे. भारताच्या विनंतीवरून भारतातील युद्धजन्य परिस्थिती बघता फ्रांस भारताला दुसऱ्या देशासाठी राखून ठेवलेलं आणि दिलं जाणारं हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारताला देणार आहे. हॅमर च्या येण्यानं राफेल च्या माऱ्याला अजून धार येणार आहे ज्याला रोखण्याची ताकद निदान सध्यातरी पाकीस्तान आणि चीनकडे नाही.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   
 

Saturday 25 July 2020

ऑपरेशन विजय... विनीत वर्तक ©

ऑपरेशन विजय... विनीत वर्तक ©

२६ जुलै १९९९ कारगिल मधील युद्ध संपल्याची घोषणा भारतीय सैन्याने केली. आज ह्या घटनेला २१ वर्ष होत आहेत. पण आजही कारगिल चा विषय निघाला की समोर उभं राहते ते म्हणजे 'ऑपरेशन विजय'. उंच पर्वतराजी मधलं लढलं गेलेलं भारताच यशस्वी ऑपरेशन होतं. पण ह्या ऑपरेशन विजय ला समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जायला हवं.

१९९८ च्या अणु चाचण्यांनंतर पाकिस्तान चा आत्मविश्वास वाढला होता. आपण भारताला त्याच्याच हद्दीत घुसून काश्मीर वर कब्जा करू शकतो. भारताने विरोध केलाच तर आता त्याला अण्वस्त्रांची भीती दाखवू शकतो असा विचार पाकिस्तान सैन्यातील काही अधिकाऱ्यांना वाटत होतं. त्यातच भारताच डोकं ठेचायाच असेल तर गळा दाबायला हवा. अशी जागा पाकिस्तान ने आधीच हेरून ठेवली होती. कारगिल प्रांत पाकिस्तान ने का निवडला ह्याला काही कारणं होती. कारगिल हे श्रीनगर पासून २०५ किमी अंतरावर आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं कारगिल चा भूभाग अतिशय प्रतिकूल हवामानाचा आहे. इथल्या पर्वतराजी मध्ये भारतीय सैन्याच्या अनेक पोस्ट आहेत. ह्या सर्व पोस्ट ची उंची साधारण ५००० मीटर ( १६,००० फुट) ते ५५०० मीटर (१८,००० फुट) इतकी आहे. हिवाळ्यात तपमान साधारण उणे -४८ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरत असल्याने अश्या प्रतिकूल काळात भारतीय सैनिक अश्या पोस्ट रिकामी सोडून मागे सरकत असायचे. हे दोन्ही कडून होत होतं. पाकिस्तान ने ही गोष्ट हेरली होती. ह्या सगळ्या पोस्ट अतिशय उंचीवर असून तिथून भारताच्या एका महत्वाच्या रस्त्याला लक्ष्य करण सहज शक्य होतं.

एन एच १ डी हा भारताचा महत्वाचा महामार्ग लेह ला ह्या भागातून जातो. जर ह्या रस्त्यावर आपण कंट्रोल केला तर आपण सियाचीन ला जाणारी भारताची रसद तोडू. सियाचीन वर रसद तोडण म्हणजे सियाचीन वरून भारताची माघार आणि त्याच वेळेस ह्या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली कि आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रश्न अजून चिघळला जाईल. जोवर त्यातून मार्ग निघेल तोवर पाकिस्तान ने सियाचीन वर ताबा मिळवला असेल व त्याचसोबत काश्मीर प्रश्नावर जगाच लक्ष वळवलेल असेल. हा पूर्ण प्लान यशस्वी होण्यासाठी जी साथ निसर्ग आणि पर्वतराजी ची लागणार होती ती पाकिस्तान च्या बाजूने होती. पाकिस्तान चा लष्करी बेस स्कार्डू इकडे फक्त १७० किमी वर होता. तसेच भारताने बांधलेल्या पण मोकळ्या असलेल्या पोस्ट आपल्या सैनिकांना आरामात राहण्याची सोय करू शकतात हे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना ठाऊक होतं. एकदा का इकडे ताबा मिळवला कि भारताने सियाचीन आणि काश्मीर दोन्ही गमावलं कारण अतिउंचीवरच्या युद्धात जो उंचीवर त्याच्या बाजूने सगळ्या गोष्टी. समोरासमोर युद्ध झाल तर १:६ सैनिक अशी विषम परिस्थिती भारताला हाताळावी लागणार होती. १:६ अर्थ होतो पाकिस्तान चा १ सैनिक मारण्यासाठी भारताला ६ सैनिक गमवावे लागतील. हे तर कागदावरच प्रमाण खऱ्या युद्धात हि विषमता अजून जास्ती प्रमाणात पाकिस्तान च्या बाजूने झुकणार हे पाकिस्तान ला ठाऊक होतं.

पाकिस्तान ने हिवाळ्याच्या दिवसात ऑपरेशन बद्र सुरु केलं. हिवाळ्याच्या त्या दिवसात भारतीय सैन्याच्या रिकाम्या झालेल्या पोस्टवर पाकिस्तानी सैनिकांनी तिथल्या स्थानिक लोकांच्या वेशात जाऊन कब्जा करायला सुरवात केली. मशीन गन घेऊन जाणाऱ्या काही सैनिकांना गुराख्यांनी पाहिल्यावर त्याची कल्पना त्यांनी भारतीय सैन्याला दिली. भारतीय सैन्याने एक सर्च पार्टी कॅप्टन सौरभ कालिया च्या नेतृत्वाखाली पाठवली. कॅप्टन सौरभ कालिया ला पाकिस्तानने बंधक बनवलं आणि त्याच्यावर असे अत्याचार केले की ज्याची कल्पनापण आपण करू शकत नाही. गरम दांड्या ने त्याचे कान फोडले, दोन्ही डोळे फोडले, जेनेटिकल ऑर्गन कापून टाकले आणि शेवटी त्याची हत्या केली. माणुसकीची इतकी खालची पातळी पाकिस्तान ने गाठली होती. ह्यानंतर भारतीय सैन्याला पाकिस्तान च्या डावाचा अंदाज येईपर्यंत पाकिस्तान ने साधारण १३०-२०० स्क्वेअर किलोमीटर च्या परिसरावर अतिक्रमण केलं होतं.

भारतीय सेनेने तातडीने २ लाख सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्याचा आदेश दिला पण कारगिल ची परिस्थिती अशी होती कि तिकडे २०,००० पेक्षा जास्ती सैनिकच लढाईसाठी जाऊ शकले. भारतीय सैन्यापुढे सगळ्यात मोठी जबाबदारी होती ती पर्वतराजी चे जे पॉइंट भारताच्या महामार्गाला लागून होते त्यावर नियंत्रण मिळवण. कारण त्यावरून होणारा गोळ्यांचा मारा आतोनात नुकसान करत होताच त्या शिवाय भारतीय सैन्याचा लेह आणि सियाचीन शी असलेला संपर्क ही तोडत होता. त्यामुळेच पॉइंट ४५९० आणि पॉइंट ५३५३ ताब्यात घेण गरजेच होतं. पॉइंट ४५९० ताब्यात घेताना सगळ्यात जास्ती हानी भारतीय सैन्याला झाली. पण तोलोलिंग च्या शिखरावर तिरंगा फडकावण तितकच गरजेच होतं. ह्या विजयाने भारतीय सैन्याला आत्मविश्वास दिला. पॉइंट ५०६० टायगर हिल आणि पॉइंट ५१०० सोबत पॉइंट ५३४३ वर एकेक करत भारतीय सैन्याने तिरंगा फडकवला. इकडे लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आधीच युद्धभूमीची उंची ही १८००० फुटापेक्षा जास्त होती. त्यामुळे कोणतही लढाऊ विमान इकडे उडवण्यासाठी त्याला कमीत कमी २०,००० फुटापेक्षा जास्ती उंचीवरून उड्डाण गरजेच होतं. इतक्या उंचीवरून उड्डाण करताना हवेची घनता ३०% कमी असते आणि पायलट चा मृत्यू ओढवू शकतो. तरीही भारतीय वायू सेनेने भारतीय सैन्याला हवेतून मदत केली. पाकिस्तान च्या हवाई प्रमुखांना कारगिल हल्याची पूर्व कल्पना न दिल्याने त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याला हवाई मदत नाकारली.

आपली हार होते आहे हे लक्षात येताच पाकिस्तान ने जागतिक मंचावर भारत आपल्यावर हल्ला करून आपला प्रदेश काबीज करत आहे अशी आवई उठवली. यु.एस.ए. चे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांनी पाकिस्तान ला कारगिल मधून माघार घेण्याची सूचना केली. पण पाकिस्तान नमला नाही. भारताने काही गोष्टी जमेच्या केल्या त्यामुळे पूर्ण जगाचा पाठींबा भारताच्या बाजूने होता. पाहिलं म्हणजे भारताने आंतराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडली नाही. पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चीत केल्यावर पण भारताने आंतरराष्ट्रीय सीमा रेषेच पालन केलं. इकडे भारताच्या नौदलाने ऑपरेशन तलवार सुरु करताच पाकिस्तान ची पाचावर धारण बसली होती. भारताच्या युद्धनौका कराची बंदरावर नांगर टाकून फक्त आदेशाची वाट बघत होत्या. एका आदेशावर पाकिस्तान च कराची बंदर पूर्ण नामशेष आणि तिकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करायला भारतीय नौदलाला काही तास पुरेसे होते. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांनी नंतर दिलेल्या कबुलीत स्पष्ट सांगितल होतं की फक्त ६ दिवस पुरेल इतकाच साठा पाकिस्तान कडे होता. तरीही भारताने रसद तोडली नाही ह्याचा फायदा भारताला आंतरराष्ट्रीय मंचावर झाला. कारण भारत- पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्त्रधारी होते. भारत कदाचित ५-६ दिवसात युद्ध जिंकला असता पण अण्वस्त्रच्या वापराने भारताच ही मोठ नुकसान झाल असतं. भारताचा संयम जगातील सर्वच राष्ट्रांनी उचलून धरला. अमेरिका सोबत, जी ८, एसियन, युरोपियन युनियन सकट सगळ्याच राष्ट्रांनी भारताला पाठींबा दिला. चीन ह्या पाकिस्तान च्या मित्राने तटस्थ भूमिका घेतली. ह्यामुळे सगळीकडून गळचेपी झाल्यावर ११ जुलै १९९९ ला पाकिस्तान ने माघार घ्यायला सुरवात केली. १४ जुलै १९९९ ला ऑपरेशन विजय हे विजयी झाल्याची घोषणा तत्कालीन प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी केली. तर २६ जुलै १९९९ ला भारतीय सेनेने सगळ्या पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावल्याची घोषणा करत एक यशाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला.

ऑपरेशन विजय भारतासाठी खूप कठीण होतं. भारताला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली. गड आला पण भारताने अनेक सिंह गमावले ज्याची भरपाई कदापि शक्य नाही. काळाच्या ओघात आपण त्या बलिदानाला विसरून ही गेलो. पण आजही पाकिस्तान च्या त्या स्वप्नांचे पंख कोणी छाटले असतील तर ते आपल्या भारतीय सैनिकांनी. पाकिस्तान ने इतकी अचूक वेळ साधत भारताची नस घोटली होती की खरोखर अजून काही क्षण आणि सियाचीन आपल्या हातून गेलं असतं. पण हरतील ते भारतीय सैनिक कुठले “या तो तिरंगा फैलाके आऊंगा या तिरंगे मे लपटा हुआ आऊंगा लेकीन आऊंगा जरूर” अस जिगर असणाऱ्या भारतीय सैनिकांच्या आहुती आणि त्यागामुळे पाकिस्तान च नुसतं स्वप्न तुटलं नाही तर पाकिस्तान ने पराभव चाखला. आज किती भारतीय त्या बलिदानाची आठवण ठेवून आहेत किंवा किती भारतीयांना कोणी काय बलिदान दिलं ह्याची आठवण आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या ह्या सैनिकांना भारतीय सरकारने पदक देऊन गौरवलं पण त्या सैनिकांची आज आपल्याला काहीच माहिती नाही.

Grenadier Yogendra Singh Yadav, 18 Grenadiers, Param Vir Chakra
Lieutenant Manoj Kumar Pandey, 1/11 Gorkha Rifles, Param Vir Chakra, Posthumous
Captain Vikram Batra, 13 JAK Rifles, Param Vir Chakra, Posthumous
Rifleman Sanjay Kumar, 13 JAK Rifles, Param Vir Chakra

ह्यांना परमवीर चक्र तर,

- Major Vivek Gupta, 2 Rajputana Rifles, Posthumous
- Major Rajesh Singh Adhikari, 18 Grenadiers, Posthumous
- Major Padmapani Acharya, 2 Rajputana Rifles, Posthumous
- Captain N Kenguruse, 2 Rajputana Rifles, Posthumous
- Captain Anuj Nayyar, 17 Jat Regiment, Posthumous
- Lieutenant Keishing C Nongrum, 12 JAK Light Infantry
- Major Sonam Wangchuk, Ladakh Scounts
- Lieutenant Balwant Singh, 18 Grenadiers
- Naik Digendra Kumar, 2 Rajputana Rifles

ह्यांना महावीर चक्र तर,

Captain Haneef-uddin, 11 Rajputana Rifles, Vir Chakra, posthumous
Major Mariappan Saravanan, 1 Bihar, Vir Chakra, Posthumous
Squadron Leader Ajay Ahuja, Indian Air Force, Vir Chakra, Posthumous
Havildar Chuni Lal, 8 JAK LI, Vir Chakra.

ह्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. ह्यांच्या सोबत ५२७ पेक्षा जास्ती सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती आपल्या देशाच रक्षण करण्यासाठी दिली. आज १९ वर्ष झाल्यावर आपण त्यांची आठवण ठेवली नाही तर तो आपला करंटेपणा ठरेल. २६ जुलै २०१५ ला तोलेलंग च्या शिखराच्या जवळ उभं राहून तिरंगा फडकताना बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनाने गेलो आणि पुन्हा एकदा त्या सर्व सैनिकांना मनातून कडक सॅल्युट केला. ओठांवर कवी जगदंबा प्रसाद मिश्र हितैषी ह्यांची कविता आली.

उरूजे कामयाबी पर कभी हिन्दोस्ताँ होगा
रिहा सैयाद के हाथों से अपना आशियाँ होगा

चखाएँगे मज़ा बर्बादिए गुलशन का गुलचीं को
बहार आ जाएगी उस दम जब अपना बाग़बाँ होगा

ये आए दिन की छेड़ अच्छी नहीं ऐ ख़ंजरे क़ातिल
पता कब फ़ैसला उनके हमारे दरमियाँ होगा

जुदा मत हो मेरे पहलू से ऐ दर्दे वतन हरगिज़
न जाने बाद मुर्दन मैं कहाँ औ तू कहाँ होगा

वतन की आबरू का पास देखें कौन करता है
सुना है आज मक़तल में हमारा इम्तिहाँ होगा

शहीदों की चिताओं पर जुड़ेंगे हर बरस मेले
वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा

कभी वह दिन भी आयेगा जब अपना राज देखेंगे
जब अपनी ही जमीं होगी जब अपना आसमां होगा....

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Friday 24 July 2020

बदललेली पावलं... विनीत वर्तक ©

बदललेली पावलं... विनीत वर्तक ©

गेल्या काही महिन्यातील घडामोडी बघितल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आहे ती म्हणजे भारत आणि एकूणच जगाच्या नकाशावर आता दोन गट दिसायला सुरवात झाली आहे. कोरोना च्या प्राश्वभूमीवर जिकडे सगळीच समीकरणं सगळ्याच बाबतीत बदललेली आहेत त्याचा परीणाम म्हणजे जगाच्या नकाशावर एकमेकांच्या विरुद्ध हळूहळू उभे रहात असलेले दोन गट. ह्या सगळ्या गटांना ओळख देणारा एक देश म्हणजे भारत. जागतिक महासत्ता टिकवण्यासाठी आणि होण्यासाठी अमेरीका आणि चीन आपसात शड्डू ठोकून उभे आहेत हे लपलेलं नाही. गेले काही वर्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा डाव आता समोरासमोर खेळला जात आहे. ह्या पडद्यामागच्या लढाईला एक उघड स्वरूप देणारी घटना म्हणजे गाल्वान इकडे झालेला भारत- चीन दरम्यानचा संघर्ष.

भारत आणि पाकीस्तान ह्या मधील लुटुपुटुची लढाई ही गेली कित्येक वर्ष सातत्याने सुरु आहे. आजवर पाकीस्तान ला आपण भारताला भारी पडत आहोत अथवा मात देऊ शकू असा थोडा का होईना विश्वास वाटत होता. पण गेल्या काही वर्षातील भारताच्या बदललेल्या रणनितीने पाकीस्तान ची गणती दखल न घेण्याइतपत उरली आहे. हे पाकीस्तान ची जनता आणि तिथलं राजकीय नेतृत्व म्हणत आहे. एकतर भारताने ज्या पद्धतीने आपल्या संरक्षण सिद्धतेत वाढ केली आहे त्याला उत्तर देण्याचं तर सोडाच पण त्याच्याकडे बघण्याची ताकद आज पाकीस्तानकडे नाही आहे. राफेल लढाऊ विमान जी मेटॉर, हॅमर, स्काल्प सारख्या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. चिनुक, आपाचे आता येणारी एस ४०० सारख्या गोष्टींमुळे पाकीस्तान ची अवस्था आता दखल न घेण्याइतपत उरली आहे. हीच गोष्ट पाकीस्तानला अस्वस्थ करते आहे. कारण इतके वर्ष अणुबॉम्ब ची भिती दाखवणाऱ्या पाकीस्तानला आमचे अणुबॉम्ब काय दिवाळीत फटाके फोडण्यासाठी नाहीत हे कळून चुकलं आहे. मुळात आज भारतावर अणुबॉम्ब टाकल्यानंतर आपलं अस्तित्व नष्ट करण्याची ताकद आणि पाठींबा जगभरातून भारताला मिळेल हे त्याला कळून चुकलं आहे. 'डिफेन्सिव्ह' पेक्षा 'ऑफेन्सिव्ह डिफेन्स' ही परराष्ट्र निती भारताने गेल्या काही वर्षात पाकीस्तानच्या विरुद्ध वापरली आहे. ह्या नितीमुळे पाकीस्तान ची अवस्था 'किस झड की पत्ती' सारखी झाली आहे.

एकीकडे पाकीस्तान बाजूला झाला आणि तिकडे चीन ने कुरघोडी करण्याची संधी शोधली पण त्यांची वेळ चुकली. कोरोना च्या प्रसारामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि एकूणच जगातील सगळेच देश त्रासलेले आहेत. चीन ह्या सगळ्याला जबाबदार आहे अशी वैश्विक भावना आहे. चीन च्या दमदाटीला भारतीय सैनिकांनी दिलेल्या चोख उत्तरामुळे चीन पूर्णपणे मागच्या पावलावर गेला. हीच संधी होती ज्याचा उपयोग अमेरीका सारख्या धूर्त राष्ट्राने करून घेतला. चीन च्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात अमेरीकेने एकही संधी सोडली नाही. दक्षिण चीन सागरात आपलं शक्तिशाली आरमार उभं करताना एकाचवेळी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया ह्यांना सोबत घेऊन क्वाड ग्रुप तर तिथल्या छोट्या राष्ट्राचा पाठिंबा आपल्या बाजूने वळवण्यात अमेरीका यशस्वी ठरली आहे. चीन ला हे पक्के ठाऊक होते की भारतासोबतचा वाद जर चिघळला तर आपली चोहोबाजूने कोंडी होऊ शकते. ह्याच प्रमुख कारण म्हणजे जगातीकी पटलावर उघडपणे पडलेले दोन ग्रुप.

चीन च्या सोबत पाकीस्तान,तुर्की, नॉर्थ कोरीया, इराण सारखे देश उभे राहतील तर अमेरीका सोबत भारत, जपान, फ्रांस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा हे उघडपणे समर्थन देतील तर रशिया कोणाच्या बाजूने नसला तरी भारताच्या विरोधात कोणतही पाऊल उचलणार नाही. ह्यामुळेच चीन पूर्णपणे निदान भारताच्या बाबतीत मागच्या पावलावर गेला. गेल्या काही दिवसातील घडामोडी पहिल्या तर भारत ह्या सगळ्यातून बाजूला झाला आहे आणि आता संघर्षाचा वणवा चीन आणि अमेरीका ह्यांच्यात वाढत जातो आहे. अमेरीकेने चीनवर दबाव वाढवायला सुरवात केली. ह्युस्टन मधील चीन च वाणिज्य कार्यालय बंद करण्याची घोषणा केली. त्याला चीन ने अमेरिकेचे वाणिज्य कार्यालय बंद करणाच्या सुचना केल्या आहेत. कोणत्याही देशातील वाणिज्य कार्यालय बंद करायला सांगणे हा त्या दोन देशातील संबंधाचा तळ गाठणे असं समजलं जाते. सध्या अमेरीका आणि चीन ह्यांचे संबंध सगळ्यात तळाला पोहचले आहेत. हा भडका इकडे थांबणारा नाही. अमेरीका सारख्या स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या देशाला अपमान पचणारा नाही आणि चीन अमेरीकेच्या पुढे दबणारा नाही. हा भडका वाढत जाणार हे उघड आहे.

ह्या सगळ्याचा भारताला कितपत फायदा अथवा नुकसान हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट मात्र नक्की की भारत एकटा नाही. ज्या शत्रूशी भारत लढतो आहे किंवा जे भारताचे शत्रू आहेत त्यांच्या विरुद्ध आता जग एकटवलं आहे. पाकीस्तान असो वा चीन ह्या दोघांच्या विरुद्ध जनमत उभं राहते आहे. हा फायदा नक्कीच भारताला होणार आहे. अमेरीका आणि चीन ह्यांच्यामधील संघर्षाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ भारताला सगळ्याच पातळीवर होणार आहे. आर्थिक, सामरिक, जागतिक अश्या विविध पातळीवर भारताची भुमिका येत्या काळात निर्णायक राहणार आहे हे निश्चित आहे. कोणी म्हणेल की अमेरीका सोबत जाणे बरोबर नाही. अमेरीका फायदा घेऊन बाजुला होईल वगरे पण ना भारत तेवढा कमजोर राहिलेला नाही न अमेरीकेला भारताला फसवणारं परवडणारं आहे. भारताची सद्य स्थितीतील भुमिका अतिशय योग्य आहे. अमेरीका जवळ जरी आपण जात असलो तरी रशिया ची साथ आपण सोडलेली नाही. अमेरीका आणि रशिया ह्यांच्या संबंधाचा समन्वय साधत आपला तो फायदा करून घेणे हीच चाणक्यनिती आहे. इकडे आपल्या घरातील माणसं साथ सोडून जातात तिकडे कोणत्याच देशाचा भरवसा देता येतं नाही. त्यामुळे काळाची गरज ओळखून पावलं टाकली तर भारत ह्या सगळ्या बाबतीत सर्वात महत्वाचा आणि पारडं फिरवणारा घटक जागतिक पटलावर बनू शकतो.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Thursday 23 July 2020

क्वसार... विनीत वर्तक ©

क्वसार... विनीत वर्तक ©

क्वसार हा शब्द ऐकून आपण बुचकळ्यात पडू. विश्वाच्या ह्या पोकळीत आपली मती गुंग करून टाकणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजेच क्वसार. जिकडे वैज्ञानिकांना ह्यातील विज्ञान अजून पूर्णपणे कळलेलं नाही तिकडे सामान्य माणसांसाठी ही गोष्ट डोक्याच्या वरून जाणारी आहे. तरीसुद्धा क्वसार एक विश्वाच्या पोकळीत असलेली विलक्षण गोष्ट आहे म्हणून तिला समजून घेणं महत्वाचं आहे. क्वसार म्हणजे नक्की काय? तर अतिप्रचंड ऊर्जेचा एक स्रोत. ज्याच्यात पूर्ण विश्वाला आपल्या तेजाने झाकोळून टाकण्याची शक्ती असते. पुराणात देव दर्शन होताना ज्या प्रमाणे देवाच्या तेजाने बाकी सगळ्या गोष्टी त्यामागे झाकोळल्या जातात तसचं काहीसं तेजोवलय म्हणजेच क्वसार.

प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी कृष्णविवर (ब्लॅकहोल) असते. हे कृष्णविवर जेव्हा आजू बाजूच्या गोष्टी गिळंकृत करायला सुरवात करते. तेव्हा आजूबाजूच्या मॅटर  मध्ये असणाऱ्या धूळ, गॅस ह्यांच एकेमकांशी घर्षण होते आणि एक तबकडी सारखी डिस्क प्रकाशमान होते. ह्याचा प्रकाश आणि तेज इतकं प्रचंड असते की पूर्ण आकाशगंगेच्या तेजाच्या १०० पट जास्ती असते. आता उदाहरण द्यायचं झालं तर टी.ओ.एन. ६१८ नावाचं एक क्वसार आपल्यापासून जवळपास १०.४ बिलियन प्रकाशवर्ष लांब आहे. ( आत्ता त्यातून येत असलेला प्रकाश हा १०.४ बिलियन वर्षापूर्वी तिकडून निघालेला आहे. ) तर ह्या क्वसारच्या तेजाची तुलना जर सूर्याच्या तेजाशी केली तर क्वसार टी.ओ.एन. ६१८ चं  तेज जवळपास १४० ट्रिलियन सूर्यांइतक आहे. ( १४० ट्रिलियन सूर्य मिळून जितकं प्रखर प्रकाश, तेज निर्माण होईल तितकं तेज, प्रकाश ह्या एकट्या क्वसार चा आहे.) क्वसार च्या अतिप्रचंड तेजामुळे तब्बल काही बिलियन वर्षानंतर ही त्यांच अस्तित्व आपल्याला ठळकपणे जाणवतं.

इतकं प्रखर तेज, प्रकाशमान असेल तर नुसत्या डोळ्यांनी क्वसार दिसायला हवेत पण तसं होतं नाही कारण त्यांच आपल्यापासून असलेलं अंतर. आजवर माहित असलेली जवळपास सगळीच क्वसार ही आपल्या नशिबाने काही बिलियन प्रकाशवर्ष लांब आहेत. कारण ही क्वसार जर आपल्या जवळ असती तर आपल्याला त्यांच्या प्रखर तेजामुळे विश्वातील बाकी कोणत्याच गोष्टींचं अस्तित्व दिसलं नसतं. आधी सांगितलं तसं ही क्वसार इतकं मॅटर आपल्यात ओढत असतात की त्यांच स्वतःच वस्तुमान वाढत जाते आणि त्याच बरोबर प्रचंड ऊर्जा बाहेर फेकत असतात. क्वसार च्या मध्यातून ऊर्जेचा स्रोत दोन बाजूने जेट प्रमाणे बाहेर पडतो. ह्या  जेटचा फवारा मिलियन प्रकाशवर्ष लांब जातो. आपल्याला ज्ञात असलेल्या काही मोठ्या क्वसार पैकी एक म्हणजे SDSS J1106+1939. हे क्वसार आपल्यापासून ११ बिलियन प्रकाशवर्ष लांब आहे. हे प्रत्येकवर्षी ४०० सूर्यांना गिळंकृत करत आहे. आपल्याला अंदाज येईल की किती प्रचंड वस्तुमान हे आपल्यात सामावून घेत आहे. त्यामुळेच ह्यातून निघणारी ऊर्जा किती प्रचंड असू शकेल. ८००० किलोमीटर / सेकंद वेगाने ह्यातून ऊर्जा विश्वात फेकली जात आहे. ( जेट च्या स्वरूपात) ह्याची प्रखरता, तेज जवळपास २ ट्रिलियन सूर्यांच्या तेजाइतकं आहे. ( २ ट्रिलियन सूर्य एकाचवेळी प्रकाशमान झाले तर जितका प्रकाश, तेज निर्माण होईल तितकी प्रखरता ह्याच्या तेजाची आहे.)

“quasar” हा इंग्रजी शब्द “quasi-stellar radio source” ह्या पासून बनलेला आहे. १९५०-६० च्या दशकात वैज्ञानिकांना एखाद्या आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या प्रचंड ऊर्जेच्या स्रोताने भांडावून सोडलं होतं. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने आपण एखाद्या क्वसार ला बघू त्या पद्धतीने ते वेगळं दिसते. म्हणजे समजा आपण समोरून बघत आहोत तर आपल्याला रेडिओ गॅलॅक्सी म्हणजेच ऊर्जेचा स्रोत असणारी आकाशगंगा दिसेल. जर आपण एखाद्या कोनातून बघितलं तर आपल्याला क्वसार आणि त्याचे दोन जेट दिसतील आणि समजा त्या जेट चा रोख आपल्याकडे असेल तर एखाद्या लेझर च्या लाईट प्रमाणे एक प्रखर ऊर्जेचा स्रोत आपल्याकडे येत असेल. वैज्ञानिकांना पडलेल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उकल एकट्या क्वसार ने केली. कारण आपल्या पृथ्वीवर विश्वाच्या पोकळीत सगळ्या बाजूने ह्या क्वसार च्या ऊर्जेचा प्रकाश बिलियन वर्षाचा प्रवास करून पोहचत आहे. क्वसार नेहमीच इतकी ऊर्जा बाहेर फेकतो असं नाही. आपल्याच आकाशगंगेच्या मध्यभागी जे कृष्णविवर आहे. ते सध्या निद्रिस्त आहे. जेव्हा त्याला अनेक सूर्याचं खाद्य मिळायला सुरवात होईल कदाचित जेव्हा मिल्की वे आणि अँड्रोमेडा आकाशगंगेची टक्कर होईल त्यावेळेस आपल्या आकाशगंगेतील क्वसार पूर्ण विश्वाला प्रकाशमान करेल.

क्वसार सारख्या अनेक गोष्टी आजही विश्वातील आपलं स्वरूप किती शुद्र आहे ह्याची जाणीव आपल्याला करून देतं आहे. त्या समजायला कठीण वाटल्या तरी त्यांचं स्वरूप, त्यांचा विस्तार, त्याचे आकडे सर्वसामान्य माणसाला त्यांच्या रूपाची नक्कीच जाणीव करून देतील.

फोटो स्रोत :- गुगल, नासा

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Wednesday 22 July 2020

आवडता तास... विनीत वर्तक ©

आवडता तास... विनीत वर्तक ©

शाळेतील माझा आवडता तास असा प्रश्न जर मला कोणी केला तर आजही तो ऑफ पिरेड किंवा ज्या तासावर बाई किंवा सर येऊन किंवा नाही येऊन त्या तासामध्ये तुम्हाला आवडेल ते करण्याची मुभा दिलेला तो तास. सगळी बंधन जुगारून मोकळेपणी आपल्याला आवडेल ते करण्याचं स्वातंत्र्य देणारा प्रत्येक असा तास माझ्या चांगलाच लक्षात आहे. त्या तासात गप्पागोष्टी तर अखंड व्हायच्या पण त्याही पलीकडे मला वाटते तो क्रियेटीविटी चा तास होता. वाचनापासून ते खेळापर्यंत सगळ काही स्वमर्जीने. फुल्लीगोळ्या पासून ते करकटा ने बेंच वर रांगोळी काढण्यापर्यंत सगळ काही त्या तासात केल असेल.

शाळा म्हणजे ज्ञानाच घर पण ते डोक्यात भरलेलं किंवा जबरदस्ती चिकटवलेल जास्ती होत. शिक्षण पद्धती मध्ये स्वतःच्या बुद्धिमत्तेला वाव तसा कमीच होता. आपली आवड, आपल्या कल्पना, आपल काहीतरी हि भावनाच मुळी तिकडे अस्तित्वात नव्हती. पुस्तकांचे धडे, गणिताचे आकडे आणि विज्ञानाची सूत्र ह्यात दिवस काय वर्ष पण पटकन भरत होती. अनेकदा प्रयोग वही मध्ये निष्कर्ष आणि अनुमान हे दोन शब्द मला बुचकळ्यात टाकायचे. कारण त्याच्यात पण भोकमपट्टी असायची. प्रयोगाचा साचा सेम असल्यावर अजून दुसरे काय निष्कर्ष निघणार होते. पण ह्या सगळ्या एकसुरात सप्तसूर बाहेर काढणारा एक तास म्हणजे माझा आवडता तास.

मॉनीटर होण मला कधीच आवडायचं नाही. उगाच काय नुसतीच मुलांची नाव लिहायची आणि त्यापुढे फुल्या मारायच्या. आपल्या आवडत्या तासात वर्गाच्या समोर उभ राहून फुकट फुशारकी मारत रहाण मला कधीच आवडायच नाही. आवडत्या तासात गप्पा आणि माझ्यातल्या निरीक्षण क्षमता ह्यांना वाव देण मला खूप आवडायचं. अगदी काल झालेल्या क्रिकेट मॅच वरच्या गप्पा असतो वा बाजूच्या रांगेत बसलेल्या मुलीकडे बघण असो. सगळ कस आपण ठरवलेलं. पेनांची मारामारी आणि फुल्लीगोळा हे तर हक्काचे खेळ. त्या काळात किती तरी वह्या फुल्ली गोळ्यांनी भरल्या होत्या. निदान शेवटची १० पान तरी नक्कीच. काल मुलीसोबत फोन वर फुल्ली गोळा खेळलो पण तितकी मज्जा नाही आली. मग ती आणि मी पुन्हा एकदा पेन आणि कागद घेऊन खेळायला सुरवात केली. मला न राहवून त्या वेळेस शाळेची आठवण झाली. त्या काळी खेळाचा इतका अभ्यास केला होता कि समोरचा काय खेळणार हे आधीच माहित असायचं.

इथून पुढे काय? किंवा कोणत क्षेत्र निवडणार असले फालतू प्रश्न त्या काळी अश्या तासांना पडले नाहीत. कारण रविवारी मॅच कुठे खेळायची ह्याचे विचार डोक्यात सुरु. वर्गात पण क्रिकेट खेळण्याचे प्रताप करून झाले होते. पुठ्ठ्याची ब्याट आणि कागदाच्या गोळ्याचा चेंडू शेवटचा बेंच ब्याटींग वाला तर पहिला बोलिंग वाला. मधले सर्व क्याच करणारे ह्यात बर मुलीही सामील व्हायच्या. त्यामुळे हा आवडता तास कधी संपू नये असच वाटायचं. नवीन तास सुरु झाला तरी मागच्या तासात केलेल्या मज्जेचा पाढा मनात सुरु असायचा. म्हणून आवडत्या तासा नंतर जर एखादा नावडता तास असेल तर आम्ही वर्गाबाहेर हमखास जायचोच. कारण एकतर काही कळायचं नाही आणि कळल तरी डोक्यात काही शिरायचं नाही.

पण हे आवडते तास मित्र जोडणारे होते. त्याकाळी जोडलेले मित्र आजही टिकून आहेत. भले ते २०-२५ वर्ष भेटलेले नसो पण भेटले कि निदान खांद्यावर हात टाकून चल बसुया एकदा म्हणणारे तरी आहेत. कशासाठी बसुया हा वादाचा विषय असला तरी त्या बसण्यामागच्या प्रेमाला हे आवडते तासच कारणीभूत होते. आज माझ्या मनापासून मला हि वाटते कि मुलांना निदान आठवड्यातून एक तास असा असावा खरे तर रोज एक तास असा असावा. जिकडे त्यांना वाटेल ते करू देण्यात याव. अगदी गप्पांपासून ते खेळापर्यंत. ज्याला जे आवडेल ते. कारण इंग्रजी, गणिताचे तास लक्षात नाही रहात. लक्षात रहातात ते असेच ऑफ तास. ज्याला आपण मनातून जगतो. माझ्या मुलीने पण अशीच मज्जा करावी अस मला वाटते. परवाच सई मला म्हणाली, बाबा, मला क्लास च मॉनीटर केल. मी तिला म्हंटल चांगल झाल पण मी म्हंटल मग आता तुला बोलता येणार नाही ऑफ पिरेड मध्ये. तर खट्टू झाली थोडी कदाचित माझ्या बोलण्याचा अंदाज तिला यायला वेळ लागेल. पण काळ बदलला तरी आवडत्या तासांची मज्जा कमी झालेली नाही हेच खर.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Tuesday 21 July 2020

आम्ही येतोय... विनीत वर्तक ©

आम्ही येतोय... विनीत वर्तक ©

'आम्ही येतोय' हे कोणतही राजकीय वाक्य नाही तर आपल्या पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह खरे तर अनेक लघुग्रह चाल करून येत आहेत. सध्या एखाद्या गोष्टीला अतिरंजित करून दाखवण्याचा जमाना आहे. त्यामुळे आपली बातमी आणि बातमीची लिंक वाचावी, बघावी म्हणून मोठ्या मोठ्या शब्दात पृथ्वीचा विनाश, पृथ्वीचा महाकाल ते सगळं नष्ट होणार वगरे स्वरूपाच्या बातम्या अनेक मिडिया तसेच सोशल मिडिया मधून पसरवल्या जात आहेत. ह्यात नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, इसरो ह्यांची नावं जोडली की लोकांचा विश्वास बसेल असा एक पायंडा पडत चालला आहे. मुळात लघुग्रह,धूमकेतू जरी पृथ्वीच्या रस्त्यात येत असले किंवा येण्याची शक्यता असेल ह्याच मुल्यमापन ज्या पद्धतीने केलं जाते ते आधी आपण समजून घ्यायला हवं.

विश्वाच्या आजवरच्या इतिहासात पृथ्वी आणि इतर ग्रहांवर लघुग्रह, धूमकेतू ह्या गोष्टी आदळत आलेल्या आहेत. त्यातून कोणीच सुटलेलं नाही. पण आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपण अश्या गोष्टींचा अंदाज आधी लावू शकतो. कदाचित जर योग्य वेळी कळलं तर मानवजातीला वाचवण्यासाठी काही करू शकतो. आपल्या नशिबाने गुरु, शनी सारखे मोठे ग्रह सौरमालेत असल्याने फार कमी गोष्टी पृथ्वीच्या वाट्याला येतात. त्या जरी पृथ्वीच्या जवळपास आल्या तरी त्यांची टक्कर होईल असं नसते. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी सारख्या संस्था अश्या लघुग्रह, धूमकेतू चा सतत शोध घेत असतात आणि त्यांच्या कक्षेत मूल्यमापन करत असतात. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की विश्वाच्या पोकळीत स्वैरपणे विहार करणाऱ्या लघुग्रह आणि धूमकेतू च्या कक्षा ह्या प्रचंड अस्थिर असतात. एखाद्या ग्रहाच्या, ताऱ्याच्या जवळून जाण्याने किंवा इतर गोष्टींमुळे त्यांच्या कक्षेत खूप मोठा बदल होऊ शकतो. ह्यामुळेच जरी अशी एखादी गोष्ट पृथ्वीला धडकणार नसेल तरी कक्षेतील बदल पृथ्वीला रस्त्यात उभं करू शकतात.

आपल्या जवळ कोण आहे आणि कोण आपल्याला धडकू शकते ह्यासाठी काही नियम आहेत. निओ ( नियर अर्थ ऑब्जेक्ट) विश्वातील कोणतीही गोष्ट जर सूर्याच्या १.३ एस्ट्रॉनॉमिकल युनिट जवळ येत असेल तर त्याला निओ असं म्हणतात. १ एस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे पृथ्वी आणि सूर्य ह्यामधील सरासरी अंतर जे साधारण १५० मिलियन किलोमीटर असते. आता सगळेच निओ काय आपल्याला धोकादायक नसतात. तर जे धोकादायक ठरू शकतील अश्या गोष्टींना पी.एच.ओ. म्हणतात. ( पोटेंशिअली हझार्डस ऑब्जेक्ट ). आपण कसं ठरवतो की एखादी गोष्ट पृथ्वीला धोकादायक ठरू शकेल तर त्या गोष्टीची कक्षा आणि त्याचा आकार. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एखाद्या गोष्टीची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा ह्यातील कमीत कमी अंतर जेव्हा ०.०५ ए यु (७,५००,००० किलोमीटर) कमी असेल आणि त्याची प्रकाशमानता २२ असेल. (त्याचा आकार १४० मीटर (४६० फुट)) पेक्षा जास्त असेल तर अश्या गोष्टी पृथ्वी आणि पर्यायाने मानवासाठी धोक्याचा इशारा आहे. आजवर जवळपास २१०० गोष्टी आपण शोधलेल्या आहेत ज्या पी.एच.ओ. मध्ये बसतात. ह्या सर्वांच्या कक्षांचा विचार करून जर पुढल्या १०० वर्षाच गणित केलं तर फक्त ३८ गोष्टी सगळ्यात जास्ती गंभीर आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट की हे गणित आत्ता माहित असलेल्या आकलनावरून मॉडेल बनवून मांडलेलं आहे ज्यात काही हजार किलोमीटर चा फरक पडू शकतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

येत्या २४ जुलै २०२० ला असाच एक पी.एच.ओ. पृथ्वी जवळून जाणार आहे. त्याच नाव आहे लघुग्रह २०२० एन.डी. हा लघुग्रह १७० मीटर लांब असून ०.०३४ ए.यु. अंतरावर म्हणजेच (५,०८६,३२८ किलोमीटर) वरून ४८,००० किलोमीटर / तास ह्या वेगाने जाणार आहे. वर सांगितलं तसं हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक असलेल्या तत्वांमध्ये बसत असल्याने नासाने ह्याचा इशारा आंतरराष्ट्रीय पातळीवर दिला आहे. ह्याला मिडिया आणि सोशल मिडिया पृथ्वीशी टक्कर, महाभयंकर प्रलय वगरे अशी नाव देत आहे. आत्तापर्यंत माहीत असलेल्या पी.एच.ओ. पैकी १४० मीटर पेक्षा मोठा एकही आपल्या लघुग्रह, धूमकेतू पुढल्या १०० वर्षात पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता नाही. पण काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. १ मीटरपेक्षा जास्ती मोठे असलेले जवळपास १ बिलियन लघुग्रह विश्वात आहेत. १ मीटरपेक्षा जास्त  लांब असलेले हे लघुग्रह पृथ्वीवर काही भागाच नुकसान करू शकतात. तसेच असे अनेक लघुग्रह, धुकेतू आहेत ज्यांच्या कक्षा सतत बदलत असतात. असे अनेक गोष्टी आहेत ज्या अजून आपल्याला माहीत नाहीत. त्यामुळेच विश्वाच्या पसाऱ्यात त्यांचा शोध घेऊन त्यांची कक्षा ठरवून त्यात पृथ्वीला धोका आहे का? ह्याचा अभ्यास करण्याचं काम नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इतर खगोल वैज्ञानिक सतत करत असतात.

मिडिया मध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला घाबरून न जाता त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला की अनेक गोष्टी स्पष्ट होतात. २०२० काय किंवा अजून भविष्यात पृथ्वीला तूर्तास धोका नाही. पण आपण एक १% लक्षात ठेवायला हवं काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. त्यामुळे ते येत असले तर अश्या १% साठीच पृथ्वीवरील अनेक वैज्ञानिकांचे डोळे सतत ह्या विश्वाच्या पसाऱ्यात त्यांचा शोध घेत असतात. त्यांच्या ह्या कामासाठी त्यांना सलाम.


फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


गो करोना गो... विनीत वर्तक ©

गो करोना गो... विनीत वर्तक ©

सगळी काळजी घेऊन सुद्धा करोना ने मला गाठलेच. ज्या पद्धतीने त्याची घोडदौड सुरु आहे ते बघता जवळपास सर्वाना तो व्यापून टाकेल अशी मला शंका आहे. करोना बद्दल माहिती असल्याने त्याची लक्षण मला आधीच जाणवली होती. तोंडात अल्सर, वास घेण्याची क्षमता नाहीशी होणे, तोंडाची चव जाणे, डायरीया तसेच घशाला खवखव अश्या अनेक लक्षणांपैकी आपल्यात काही आढळत असतील तर करोना च संक्रमण आपल्या शरीरात झालं असण्याची शक्यता आहे पण त्याची तीव्रता कमी असल्याने ही प्राथमिक किंवा स्टेज १ ची लक्षण दिसून येतात. काही दिवसापूर्वी माझ्या घशाला थोडी खवखव जाणवली आणि वास ओळखण्याची क्षमता पूर्णपणे नाहीशी झाली तेव्हाच मला करोनाच संक्रमण झालं असावं अशी शंका आली. करोना ची चाचणी केल्यावर ती खरी निघाली.

एक गोष्ट माझ्यासाठी चांगली होती की माझी लक्षण अगदी प्राथमिक होती. मला जेव्हा लक्षात आलं तेव्हाच चाचणी ची वाट न बघता मी स्वतःला सगळ्यांपासून विलग केलं होतं. घरी असणारे माझे आई- वडील आणि लहान मुलगी ह्यांच्यापासून विलग राहणं सगळ्यात जास्ती महत्वाचं होतं. कारण जरी मला करोना प्राथमिक अवस्थेत असलेला असला तरी मी दुसऱ्यांसाठी ट्रान्समीटर नक्कीच बनू शकत होतो. अगदी जेवणाच्या ताटापासून ते झोपणाच्या गादीपर्यंत सगळ्या गोष्टी विलग केल्या होत्या. चाचणी निष्कर्ष समोर आल्यावर मी क्वारंटाईन सेंटर अथवा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावं असा सल्ला शासकीय डॉक्टर नी मला दिला.  क्वारंटाईन सेंटर ची अवस्था लपलेली नाही. मुळात बेड जरी वेगळे असले तरी टॉयलेट हे तिकडे कॉमन असल्याने कोरोना सोबत इतर आजारांचं संक्रमण होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे प्रायवेट हॉस्पिटल ला जायचा निर्णय मी घेतला. खरे तर कोरोनावर कोणतही औषध उपलब्ध नसताना हॉस्पिटल जवळपास १५ हजार ते २० हजार रुपये दर प्रत्येक दिवसासाठी आकारत आहेत. ज्यामध्ये रोग्याला जर आय.सी.यु. मध्ये ठेवण्याची गरज पडली तर हाच दर रुपये ३० हजार प्रति दिवस इतका प्रचंड आहे. सगळीकडे लुटालूट चालू आहे हे वास्तव मला स्विकारण्याशिवाय दुसरा पर्याय समोर नव्हता.

कोरोना मध्ये घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही त्याचवेळी निष्काळजी होण्याची गरज नाही. व्यवस्थित काळजी घेतली तर कोरोनाला आपण हरवू शकतो. कोरोना चे विषाणू शरीरात गेल्यावर आपलं शरीर युद्ध सुरु करते. विषाणूंचा किती प्रभाव आपल्या शरीरावर आहे ह्यावर आपल्याला जी लक्षण दिसतात त्यातून कळून येते. विषाणूंचा प्रभाव जर कमी असेल तर वर सांगितलेली लक्षणे दिसतात. थोडा जास्ती असेल तर ताप आणि थकवा जाणवतो. अति तीव्र असतील तर शरीरातील ऑक्सिजन कमी होतो (ऑक्सिमिटर वर जेव्हा ऑक्सिजन कमी झालेला दिसतो तेव्हा कोरोना च्या विषाणूंनी आधीच आपल्या फुफुसावर हल्ला केलेला असतो त्यामुळे ऑक्सिमिटर फक्त अतितिव्र संक्रमणात आपल्याला सुचित करते.) आणि प्रसंगी ऑक्सिजन ते व्हेंटिलेटर ची गरज पडू शकते. सध्या जे उपचार कोरोना वर केले जात आहेत ते १००% प्रभावी नाहीत. ह्या विषाणूंना निष्प्रभ करणारी यंत्रणा आपलं शरीर निर्माण करत असतं. ती यंत्रणा किती प्रभावी आणि भक्कम हे आपल्या रोग प्रतिकारकशक्ती वर अवलंबून असते. ह्यासाठी आपण आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी जे काही करता येतील ते उपाय (अगदी वाफ घेण्यापासून, गरम पाणी, हळदीचं दूध आणि इतर) आणि उपचार करायचे मग ते आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा ऍलोपॅथी वाले असोत. आपल्या शरीराची यंत्रणाच ह्या विषाणूंचा खात्मा करू शकते हे अंतिम सत्य आहे. कोरोना वर सध्या डॉक्टर एच.सी.क्यू. ,टॅमी फ्लू आणि इतर औषधांचा वापर करत आहेत. ज्याने कितपत फयदा होतो ह्या बद्दल कोणीच खात्री देऊ शकत नाही. तसेच ह्या औषधांचे इतर परीणाम ही शरीरावर होऊ शकतात. पण सध्याच्या घडीला ह्या पलीकडे डॉक्टरांकडे पर्याय उपलब्ध नाहीत.

शरीराने आपली सर्व शक्ती विषाणूंना नष्ट करण्यासाठी वापरावं असं वाटत असेल तर आपण जास्तीत जास्त आराम करायला हवा. जेव्हा शरीर आणि मन शांत असते तेव्हा शरीर पूर्ण ताकद पणाला लावून कोरोना च्या विरोधात आघाडी घेते. त्यामुळे आपण मनातून स्वस्थ राहणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. बिथरलेलं मन आणि शरीर लवकर रोगमुक्त होणार नाही हे सांगायला कोणत्या डॉक्टर ची गरज नाही. कोरोना च्या चाचणी सोबत आपल्या रक्ताच्या चाचणीतून सुद्धा कोरोनाने किती हातपाय पसरला आहे हे कळू शकते. सी.आर.पी. टेस्ट ( सी रिऍक्टिव्ह प्रोटीन ) तसेच डब्लू.बी.सी. वरून डॉक्टर ह्याचा अंदाज लावू शकतात. मी ह्यातला तज्ञ नाही त्यामुळे ह्यावर जास्ती भाष्य करणार नाही. पण ह्या अंकावरून आपण कोरोनाला ठरवण्यात किती बाजी मारत आहोत ह्याचा अंदाज येऊ शकतो. आपण कोरोना संक्रमित झाल्यावर घरी विलग झालो काय किंवा हॉस्पिटल आणि क्वारंटाईन सेंटर मध्ये राहिलो तरी आपण आपल्याकडून दुसऱ्याला तो रोग संक्रमित होणार नाही ह्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याकडून रिक्षावाल्या पासून ते नर्स, डॉक्टर पर्यंत तो पसरू नये ह्यासाठी आपण स्वतः ती काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती असो वा बाहेरची आपण कोणाच्या आयुष्यात अंधार आणत नाही आहोत ह्याची जाणीव आपल्याला झाली की आपण स्वतःहून काळजी घेऊच. आज कोरोनाला हरवल्या नंतर सुद्धा मी घरी विलग राहतो आहे. कारण अजून पूर्ण धोका टळलेला नाही त्यामुळेच काळजी घेणं गरजेचं आहे.

एकदा कोरोना झाल्यावर पुन्हा कोरोना होण्याची शक्यता धुसर आहे. पण ह्याचा अर्थ आपण चिंता करू नये असा नाही. कोरोना युद्धात शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीची हानी होते आणि ती भरून यायला काही आठवड्यांचा कालावधी लागतो. तसेच जरी शरीराला आता माहित असलं किंवा शरीरात अँटी बॉडी तयार झाल्या असल्या तरी त्या फक्त काही आठवडे शरीरात राहतात. शरीरात ह्या विषाणू विरुद्ध लढण्याची माहिती जरी माहित झाली असली तरी ह्याच पुन्हा होणार संक्रमण किती घातक असेल? त्याला शरीर कितपत प्रभावी उत्तर देऊ शकेल? ह्यावर अजून संशोधन सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही फेसबुक,व्हाट्स अप च्या फॉरवर्ड वर विश्वास न ठेवता आपण आपली आणि त्याच सोबत आपल्या कुटुंबाची आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची काळजी करणं आणि आपल्या स्वतःचा बचाव करणं हा सगळ्यात सोप्पा उपाय आहे.

कोरोना संक्रमित असलेल्या माणसाकडे समाज एक गुन्हेगार प्रमाणे बघतो. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकायला ही समाज मागेपुढे बघत नाही. पण खरच अशी गरज आहे का? हा विचार प्रगल्भ समाजतील प्रत्येकाने करायला हवा. आज तो असेल तर उद्या मी ह्यातून जाणार आहे हे समाजाने विसरू नये. कोरोना एक आजार असेल पण विकृती नाही. विकृतीला पण पाठीशी घालणाऱ्या प्रगल्भ समाजाने कोरोनाच्या सारख्या आजारात भक्कमपणे पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही हे सत्य आहे. कोरोना येईल आणि जाईल पण समाजातील विचारसरणी बदलणं अत्यंत गरजेचं आहे. गो कोरोना गो हे नुसतं बोलून तो जाणार नाही तर एक समाज म्हणून आपण जर अजुन जास्त सुरक्षित आणि प्रगल्भ झालो तर तेवढ्या लवकर ह्या संकटातून आपण एक समाज आणि राष्ट्र म्हणून लवकर बाहेर पडू.

तळटीप :- ह्या लेखात मला आलेले अनुभव आहेत. ह्याचा संबंध कोणत्याही प्रकारे राजकारण, पक्षीय राजकारणाशी लावू नये ही विनंती.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Thursday 9 July 2020

'दौलत बेग ओल्डी' भारताचा हुकमाचा एक्का... विनीत वर्तक ©

'दौलत बेग ओल्डी' भारताचा हुकमाचा एक्का... विनीत वर्तक ©

दौलत बेग ओल्डी हे नाव गेले कित्येक दिवस भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभुमीवर सगळीकडे चर्चेत आहे. नक्की 'दौलत बेग ओल्डी' इथे असं काय आहे की चीनचा आणि पाकीस्तान चा जीव तिकडे अडकला आहे? हे सामान्य माणसांनी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. भारत चीन संघर्षाची ठिणगी अथवा असंतोषाच मुख्य कारण ही जागा आहे. खरे तर भारतासाठी हुकमाची एक्का असणारी ही जागा राजकीय नाकर्तेपणामुळे विस्मृतीत गेली होती. संघर्ष नको असेल तर सिमेवर काहीच विकास न करणं हेच गेल्या सरकारचं संरक्षण धोरण होतं. हे मी सांगत नाही तर तसं विधान खुद्द त्या वेळच्या संरक्षणमंत्र्यांनी संसदेत केलं होतं. हे म्हणजे आपल्याकडे हुकमाचा एक्का नाहीच अश्या अविर्भावात जगणं. आपण शत्रुपेक्षा वरचढ आहोत हे शत्रुला कळू दिलं नाही की शत्रु आक्रमण अथवा विस्तार करणाच्या भानगडीत पडणार नाही असा एकूण कयास होता. आता तो किती बरोबर अथवा चूक आणि त्यातील राजकारण ह्यात मला जायचं नाही.

दौलत बेग ओल्डी ह्या जागेला महत्व आहे ते इथे असणाऱ्या भौगोलिक रचनेमुळे. ही जागा समुद्रसपाटीपासून साधारण १६,६१४ फूट उंचीवर आहे. सर्व बाजूने काराकोरम च्या उंच पर्वत रंगाच्या मधोमध एखाद्या बशी प्रमाणे ती वसलेली आहे. हिवाळ्यात उणे -५० डिग्री सेल्सिअस पर्यंत उतरणारे तपमान, बोचरे थंड वारे, ऑक्सिजन ची कमतरता ह्यामुळे हा सर्व भाग दगड धोंड्यांचा आहे. वनस्पती च अस्तित्व जिकडे मोठ्या मुश्किलीने बघायला मिळते तिकडे राहणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. पण तरी सुद्धा आज चीन ला चारी मुंड्या चीत करण्याची भाषा आणि डोळ्यात डोळे घालून जाब विचारण्याची हिंमत आज भारत आणि भारतीय सेना, हवाई दल करू शकतो ते ह्याच दौलत बेग ओल्डीमुळे. इकडे जगातील सर्वात उंचीवर असणारी धावपट्टी भारतीय वायू दल, भारतीय सेनेने बनवलेली आहे. ज्याला भारत लाईन ऑफ कंट्रोल (नियंत्रण रेषा) मानतो त्या रेषेपासून ही जागा फक्त ८ किलोमीटर दक्षिणेला तर ९ किलोमीटर पश्चिमेला आहे. इकडून काराकोरम च्या पर्वतराजींचं हवाई अंतर हे अवघे १० किलोमीटर आहे. ह्याच काराकोरम पर्वतराजींच्या मागे पाकीस्तान आहे तर दुसऱ्या बाजुला चीन आहे. अवघ्या काही किलोमीटर च्या परीघात भारताच्या दोन्ही शत्रूंवर लक्ष ठेवता येणारा भूभाग किती महत्वाचा आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल.

१९६५ नंतर इकडे असणारी धावपट्टी आणि एकूणच ह्या भूभागाकडे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दुर्लक्ष करण्यात आलं. ह्या धावपट्टी ला पुन्हा जिवंत करण्यासाठी भारताच्या वायू दलाकडून केलेल्या प्रयत्नांना राजकीय इच्छाशक्तीने केराची टोपली दाखवली. कुठेतरी राजकीय अनास्थेमुळे भारताचा हुकमाचा एक्का काळाच्या पडद्याआड लुप्त झाला होता. २००८ साली तत्कालीन एअर मार्शल प्रणब कुमार बरबोरा, एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर ह्यांच्या सोबत त्यांच्या टीम ने  ह्यांनी सरकारला अंधारात ठेवून इकडे असणाऱ्या जगातील सर्वात उंच धावपट्टी ला जिवंत करण्याचं काम  घेतलं. जिकडे श्वास घ्यायला त्रास होतो तिकडे एक धावपट्टी बांधणं किती कठीण असेल ह्याचा अंदाज आपण लावू शकत नाही. पण भारतीय वायू दलाच्या ह्या अधिकाऱ्यांनी सरकारला अंधारात ठेवून भारतीय सेनेच्या मदतीने तब्बल ४३ वर्षांनी जगातील सर्वात उंच धावपट्टी वर एन ३२हे विमान यशस्वीरीत्या उतरवलं. ह्याची कल्पना त्यांनी सरकारला ही कामगिरी फत्ते केल्यानंतर दिली. ज्यावर सरकारकडून त्यांनाच उलट प्रश्न विचारले गेले. देशासाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या ठिकाणाची डागडुजी केल्यामुळे त्याला देशाच्या संरक्षणासाठी पुन्हा सज्ज केल्यामुळे त्यांच अभिनंदन करण्याऐवजी त्यांना प्रश्नांना सामोरं जावं लागलं ह्यातच तत्कालीन राजकीय नेतृत्व भारताच्या संरक्षणाचा विचार किती गांभीर्याने करत होतं हे स्पष्ट झालं.

२००१ साली भारतीय सेनेच्या फॉरवर्ड पोस्ट ना रसद पोचवण्यासाठी Darbuk-Shyok-DBO Road चं काम तर सुरु झालं. २५५ किलोमीटर लांब आणि जवळपास १३,००० फूट ते १६,००० फूट उंचीवरून जाणाऱ्या रस्त्याचं काम कासवाच्या गतीने सुरु होतं. ह्याच रस्त्यावर शोल्क नदीवर चेवांग रिंचेन ब्रिज बांधण्यात आला आणि २०१९ साली ह्या रस्त्याचं काम पुर्णत्वाला गेलं. ह्या रस्त्यामुळे भारतीय सेनेला आपल्या सामानाची ने-आण करणं अतिशय सोप्प झालं. भारताने आधीच २०१३ साली इकडे सी १३० जे सुपर हर्क्युलस नावाचं शक्तिशाली लढाऊ विमान उतरवून आपली वायू सज्जता चीन ला दाखवली होतीच. पण २०१९ साली जेव्हा रस्त्याने दौलत बेग ओल्डी जोडलं गेलं तेव्हा चीन चा असंतोष खदखदू लागला. धावपट्टी आणि रस्ते ह्या दोन्ही गोष्टीमुळे भारत सीमेवर अतिशय कमी वेळात रसद पोहचवू शकतो हीच चीन आणि पाकीस्तान ची दुखरी नस आहे. भारत आणि चीन संघर्ष चालू झाल्यावर ज्या गतीने भारतीय सेना आणि भारतीय वायू दल ह्यांनी आपली माणसं, रसद, दारुगोळा सिमारेषेवर पोहचवला त्यामुळे चीन पूर्णपणे बॅकफूट वर गेला. आज जवळपास १०० पेक्षा अधिक रणगाडे, तोफा, सैनिक हे सी १३० जे सुपर हर्क्युलस, एन ३२, आपाचे, चिनुक सोबत संपूर्ण हवाई यंत्रणेच्या मदतीने सिमारेषेवर पोहचवणे दौलत बेग ओल्डी इथल्या धावपट्टी म्हणजेच हुकमाच्या एक्क्यामुळे साध्य झालं आहे.

शत्रू जरी कागदावर कितीही मोठा असला तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती काय आहे त्याने पूर्ण युद्धाचं पारडं पलटू शकते. हवाई हल्ल्याच्या बाबतीत भारताचं ह्या भागात वर्चस्व आहे. चीन चे खूप सारे सैनिक हे चीन च्या आतल्या भागातले आहेत. तिबेट आणि अक्साई चिन च्या भागाची, इथल्या वातावरणाची सवय अथवा जाणीव नाही. ह्याउलट भारताच्या सैन्यातील कित्येक सैनिक लडाख च्या भागातले आहेत. लडाख स्काऊट ही भारतीय सेनेच्या मदतीला आहे. गेल्या काही वर्षात भारताने इथल्या दळणवळण साधन, रस्ते, ब्रिज, धावपट्ट्या ह्या सर्वाकडे लक्ष द्यायला सुरवात केल्याने चीन चवताळला आहे. गेले अनेक वर्ष सुप्तअवस्थेत असलेल्या हुकमाचा एक्का भारताने पुन्हा एकदा बाहेर काढलेला चीन ला रुचलेलं नाही. पण भारतावर अरेरावी करण्याचा डाव त्याच्या अंगलट आला आहे. चीन ने जरी मागे जाण्याचा आव आणला तरी ह्या भागात चाललेलं काम चीन ला पचणारे नाही. काही ना काही खुरापत काढून चीन दौलत बेग ओल्डी वर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणारं हे निश्चित आहे. फरक इतकाच आहे की आता गोष्टी तितक्या सोप्या आणि सरळ राहिलेल्या नाहीत. दौलत बेग ओल्डी ह्या जागेची भारताच्या संरक्षणात महत्वाची भुमिका येणाऱ्या काळात असणार आहे.

ता.क. :- ह्या लेखात काही राजकीय संदर्भ आलेले असले तरी ते ह्या लेखाच्या निमित्ताने गरजेचे होते. ह्या पोस्ट चा उद्देश राजकीय नाही. त्यामुळे कोणीही कोणत्याही पद्धतीने ह्या लेखाचा संदर्भ राजकीय पक्षांशी अथवा राजकीय कुरघोडीसाठी लावू नयेत.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Tuesday 7 July 2020

एका पायावर... विनीत वर्तक ©

एका पायावर... विनीत वर्तक ©

'तुझ्या मदतीसाठी एका पायावर तयार आहे'.... असं आपण अनेकदा बोलून जातो. ह्या शब्दानं मागची भावना हिच असते की एका पायावर आपला तोल सांभाळणं अतिशय कठीण असते. त्या परीस्थितीत सुद्धा मी तुझ्या मदतीला तत्पर, तयार असेन. समजा कधी खरी वेळ आली की जिकडे आपल्याला आपलं आयुष्य एका पायावर तोलावं लागेल? नुसता विचार केला तरी मेंदूला मुंग्या येतील. पण काही माणसे आपल्यामध्ये असलेल्या व्यंगत्वाला किंवा निर्माण झालेल्या व्यंगत्वाला आपलं शक्तीस्थान बनवतात. जे आपल्याकडे कमी आहे किंवा नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यात सर्वोत्तम जगण्याचा ध्यास घेतात. एक निश्चित असं लक्ष्य ठेवतात. त्या लक्ष्याला मिळवण्यासाठी मेहनतीची पराकाष्ठा करतात. वाटेत अडचणी आल्या तरी त्यांना बाजूला काढून किंवा त्याच्यावर मात करून आपलं लक्ष्य मिळवतात. आपल्या सोबत आपल्या कुटुंबाची, समाजाची, देशाची उंची, मानसन्मान वाढवतात त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.

पेरीवाडगमपट्टी ह्या सेलम, तामिळनाडू जवळ असणाऱ्या एका छोट्या गावात शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पायावरून एक बस गेली. तसं बघायला गेलं तर दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे भारतात होणाऱ्या लाखो अपघातांपैकी हा एक अपघात होता. पण ह्या अपघाताने एका मुलाचं आयुष्य पूर्णपणे बदललं ज्याचा प्रभाव देशावर पडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकाने ५ वर्षाच्या शाळेत जाणाऱ्या त्या मुलाच्या पायावरून बस नेली. ह्या अपघातात त्या मुलाचा उजवा पाय निकामी झाला. गुढघ्यापासून पायाची वाढ खुंटली. सतरा विश्व दारिद्र आणि एकट्या आईच्या कमाईवर जगणाऱ्या त्या कुटुंबावर संकट कोसळलं. ४ भाऊ आणि एक बहीण अशी सहा भावंड वाढवणाऱ्या त्या माऊलीच दररोज उत्पन्न फक्त १०० रुपये होतं. आपल्या मुलाच्या उपचारासाठी तिने जवळपास ३ लाख रुपये खर्च केले पण त्या मुलाच्या वाटेला व्यंगत्व आलं ते कायमचं.

एक सामान्य आयुष्य जगणाऱ्या मुलाच्या आयुष्यात एका घटनेने पूर्णतः अंधार आला होता. एका पायावर उभं राहून त्याला आयुष्य जगायचं होतं. एकेकाळी व्हॉलीबॉल आणि खेळाची आवड असणारा तो मुलगा सामान्य मुलांसोबत आता खेळू शकत नव्हता. पण तो थांबला नाही. आपल्या व्यंगत्वाला त्याने आपलसं केलं. त्याला आपली ढाल बनवली आणि अभ्यासात, खेळात मेहनत घ्यायला सुरवात केली. शाळेतील खेळ शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्याला उंच उडीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. वय वर्ष १४ असताना ह्या मुलाने शाळेतील सामान्य मुलांसाठी असणाऱ्या स्पर्धेत भाग घेतला आणि चक्क दुसरा क्रमांक पटकावला. दोन पायावर धावून उंच उडी मारणाऱ्या सामान्य मुलांपेक्षा एका पायावर आपण जास्ती उंच उडी मारू शकतो हे त्याच्या लक्षात आलं. पुढे सुरु झाला तो एक प्रवास स्वतःला सिद्ध करण्याचा, व्यंगत्व आलं म्हणून आयुष्यात उंच उडी मारण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही हे त्याला उमगलं.

२०१३ साली त्याची गाठ व्यंगत्व असणाऱ्या मुलांना खेळाचं शिक्षण देणाऱ्या एका द्रोणाचार्य शी पडली. त्यांनी त्याचे गुण लगेच हेरले. २०१५ ला आंतराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी त्याला बंगळुरू इकडे घेऊन आले. एका वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर २०१६ साली त्या मुलाने ट्युनिशिया इकडे होणाऱ्या  IPC Grand Prix स्पर्धेत भाग घेऊन १.७८ मीटर ( ५ फूट १० इंच) इतकी उंच उडी मारली. त्याच्या ह्या उडीमुळे रीओ ऑलम्पिक मध्ये त्याचा प्रवेश नक्की झाला. एका छोट्या खेड्यातला एक गरीब मुलगा भारताचं प्रतिनिधित्व ऑलम्पिक मध्ये करत होता. संपूर्ण आयुष्यात त्याने जी स्वप्न बघितली होती, लक्ष्य ठेवली होती त्यांच्या पूर्ततेचा क्षण समोर होता. विचलित न होता रीओ ऑलम्पिक मधल्या T–42 ह्या स्पर्धेत त्याने चक्क १.८९ मीटर (६ फूट २ इंच) इतकी उडी घेतली. भारताला ऑलम्पिक स्पर्धेतल सुवर्ण पदक मिळवून दिलं. हा पराक्रम करणाऱ्या त्या मुलाचं नाव आहे 'मरीअप्पन थंगावेलु'. मरीअप्पन थंगावेलु हा पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा तिसरा भारतीय ठरला. त्याच्या ह्या पराक्रमाची दखल घेताना भारत सरकारने त्याला २०१७ साली पद्मश्री सन्मानाने तर त्याच वर्षी भारतातील खेळांमधील दुसऱ्या सर्वोच्च अश्या 'अर्जुन' पुरस्काराने सन्मानित केलं.

मरीअप्पन थंगावेलुच्या मते लुळा पडलेला त्याचा पाय तर त्याच नशीब आहे. हा तोच पाय आहे ज्यामुळे मी हे यश मिळवू शकलो. आपल्याच व्यंगत्वाला त्याने आपलं नशीब मानून त्याला अजोड मेहनत, चिकाटी आणि जिद्दी ची जोड दिली. पुढे काय झालं तो इतिहास आहे. आपल्यातील कमतरेवर तो रडत नसला नाही की आपल्या गरीबीचा त्याने कधी बाजार मांडला. जे समोर येते ते शिकत गेला आणि आपलं नाव भारतीय खेळाच्या इतिहासात अमर करून गेला. एका पायावर भारताचं नाव मोठं करणाऱ्या ह्या खेळाडू ला माझा कडक सॅल्युट. क्रिकेट सारख्या जुगारातून बाजूला होऊन भारतीय आता तरी तुझ्याकडून स्फूर्ती घेतील आणि तुझा आदर्श येणाऱ्या पिढीकडे देतील ह्या आशेवर तुझ्या पुढच्या प्रवासाला एका भारतीयाकडून शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


#हिरोज_भाग_१... विनीत वर्तक ©

#हिरोज_भाग_१... विनीत वर्तक 

कॅप्टन विक्रम बात्रा

“शेर शहा” (लायन किंग) असं  ज्याला पाकिस्तानी आर्मी म्हणते, ह्यातच त्या सैनिकाचा पराक्रम काय अत्युच्च असेल ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. भारतीय सेनेचा हा 'शेरशहा' म्हणजे 'कॅप्टन विक्रम बात्रा'. ९ सप्टेंबर १९७४ साली जन्मलेल्या विक्रम बात्राचं आयुष्य म्हणजे एक हिरोचं आयुष्य आहे. जुळ्या जन्मलेल्या भावंडांत विक्रम आपल्या भावापेक्षा १४ मिनिटं  मोठा होता. लहानपणापासून अतिशय प्रसिद्ध असलेला विक्रम अभ्यासात तर हुशार होताच पण त्याहीपलीकडे त्याला एन.सी.सी.चा उत्तर भारतातील सर्वोत्कृष्ट कॅडेटचा बहुमानही मिळाला होता. कराटेमध्ये ग्रीन बेल्ट होल्डर आणि टेबल टेनिसमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या विक्रमला लहानपणापासून भारतीय सैन्यात जायचं होतं. 

१९९५ साली पदवी घेतल्यावर त्याला हॉंगकॉंग येथील एका मर्चंट नेव्ही कंपनी मध्ये नोकरी मिळाली. पण विक्रमने आपल्या घरच्यांना सांगितल “पैसा हा सगळं काही नाही. मला माझ्या देशासाठी काहीतरी मोठं , काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे” त्याचा हा निर्णय काही काळाने इतका सत्यात उतरेल ह्याचा विचार कोणीच केला नव्हता. एका दशकानंतर भारतातील एका ऑईल कंपनीच्या जाहिरातीमधील शब्द बरंच काही सांगून जातात.

 “Sometimes an ordinary Indian can make a Rs 120,000 crore company feel humble. For every step we take, there’s an inspired Indian leading the way”. 

ह्यासोबत विक्रम बात्राचा फोटो दाखवलेला आहे. 

१९९९ साल उजाडलं आणि कारगिल युद्धाचे पडघम वाजले. विक्रमच्या युनिटला कारगिलला जाण्याचे आदेश मिळाले. १९ जून १९९९ ला विक्रमला "पॉईंट ५१४०" घेण्याची जबाबदारी देण्यात आली. विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अतिशय शिताफीने शत्रूवर हमला केला. विक्रमने ह्या युद्धात लीडरप्रमाणे सगळ्यांच्या पुढे राहत चार आतंकवाद्यांचा एकट्याने हातघाईच्या मारामारीत खात्मा केला. हा पॉईंट आतंकवाद्यांकडून जिंकता आल्याने पुढे 'टायगर हिल' जिंकणं भारतीय सेनेला शक्य झालं. परत आल्यावर विक्रमने आपल्या कमांडर ऑफीसरला म्हटलेलं वाक्य त्याच्या असीम देशभक्तीची साक्ष देते. विक्रम म्हणाला होता “ये दिल मांगे मोअर!”. पाकिस्तानी अतिरेक्यांकडून मिळवलेल्या एन्टी एअरक्राफ्ट गन सोबत काढलेला फोटो विक्रमच्या अतुल्य पराक्रमाची साक्ष देतो. हाच विक्रम आपल्या मित्राला एकदा म्हणाला होता, जेव्हा कारगिल युद्धासाठी बोलावणं आलं होतं,

 “Don’t worry. I’ll either come back after raising the Indian flag in victory or return wrapped in it, but I will come for sure.”

नसानसांत देशभक्ती भिनलेल्या ह्या भारतीय सेनेच्या शूरवीर ऑफिसरवर अजून एक जबाबदारी सोपवण्यात आली, ती म्हणजे अतिशय कठीण अश्या १७,००० फुटांवरील "पॉईंट ४८७५" वर नियंत्रण मिळवणं. १६००० फूटांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी ठाण मांडलं होतं. 

विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रात्रीच तिकडे कूच केलं. विक्रम म्हणजेच पाकिस्तानी सैन्याच्या कोड वर्ड भाषेत "शेरशहा" आपला बिमोड करायला येतो आहे ह्याची कल्पना मिळाली. पाकिस्तानी सैन्याने प्रचंड गोळीबार विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या दिशेने सुरू ठेवला. पण त्याला न जुमानता विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पुढे जाणं सुरूच ठेवलं. विक्रमचे शब्द आजही आठवले की रोमांच उभे राहतात. “या तो तिरंगा फहराके आऊंगा, या तो उसमे लिपट के आऊंगा लेकीन आऊंगा जरूर”. 

विक्रमने आपल्या जीवाची पर्वा न करता पाकिस्तानी अतिरेक्यांवर आक्रमण केलं. त्याने शत्रूच्या पोस्टवर ग्रेनेडने हमला केला. त्यात ५ पाकिस्तानी अतिरेक्यांना त्याने कंठस्थान घातलं. विक्रमच्या सुभेदाराने पुढे न जाण्याची विनंती त्याला केली. तुझ्याऐवजी मी पुढे जातो, असं म्हणाल्यावर विक्रमचे शब्द होते “तु बाल- बच्चे वाला हे हट पिछे” असं म्हणत विक्रमने पुन्हा एकदा शत्रूच्या दिशेने आक्रमण केलं. ह्यात त्याचा लेफ्टनंट जखमी झाला. आपल्या जीवाची पर्वा न करता विक्रमने त्याला सुरक्षित जागी आणण्यासाठी पूर्ण गोळीबारात उडी घेतली. ह्यात एक गोळी विक्रमच्या छातीत लागली. पण तोवर विक्रम बात्राने आपलं मिशन पूर्ण केलं होतं. सकाळ होता होता भारताचा तिरंगा "पॉईंट ४८७५" च्या शिखरावर मोठ्या दिमाखाने फडकत होता. पण भारताने त्याच्या सिंहाला गमावलं होतं. मला शिवाजी महाराजांचं एक वाक्य इकडं आठवतं, “गड आला पण सिंह गेला” पुन्हा एकदा भारताने आपल्या एका सच्चा सुपुत्राला गमावलं होतं. कमांडिंग ऑफिसर त्यावेळी कर्नल वाय. के. जोशी ह्यांच्या मते "पॉईंट ४८७५" वर पुन्हा कब्जा मिळवण्याचं सगळं श्रेय कॅप्टन विक्रम बात्राचं होतं. म्हणून ह्या शिखराला नंतर विक्रम बात्राचं नाव देण्यात आलं. 

आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळी झेलणारा विक्रम बात्रा वेगळ्याच मातीचा होता. आपल्या सुभेदाराला 'तू बाल बच्चे वाला है' असं म्हणत मागे ठेवणाऱ्या विक्रम बात्राच्या आयुष्यात कोणी नव्हतं का? खरे तर विक्रम बात्राचं मन आधीच कोणी चोरून नेलं होतं. कारगिलवरून परत आल्यावर तो डिम्पल चिमा सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. पण डिम्पलच्या शब्दात त्या ४ वर्षांच्या आठवणी एका आयुष्याच्या सोबतीपेक्षा जास्ती होत्या. विक्रम गेला पण तो आजही डिम्पलच्या सोबत आहे. डिम्पल पुढे सांगते, 'काही वेळेचा अवधी आहे. मी आणि तो पुन्हा एकदा भेटणार आहोत.' 

कॅप्टन विक्रम बात्राविषयी लिहायला घेतलं की अंगावर रोमांच उभे राहतात. एका क्षणात अभिमानाने छाती फुलून येते तर दुसऱ्या क्षणाला भारताने काय गमावलं ह्याचा अंदाज येतो. कॅप्टन विक्रम बात्रासारखे सैनिक आहेत, म्हणून आज आपण इकडे सुखाने झोपू शकतो. पण अश्या भीमपराक्रमासाठी आणि सर्वोच्च बलिदानासाठी भारताच्या सर्वोच्च अश्या सैनिकी पुरस्काराने अर्थात परमवीर चक्राने सन्मानित झालेल्या कॅप्टन विक्रम बात्राला किती लोक ओळखतात? इकडे फालतू तद्दन हिरो जेलमध्ये गेला की त्याच्या बातम्या होतात. कोणत्या तरी तद्दन टुकार हिरोचा मुलगा बोलला तर त्याची बातमी होते आणि त्यावर त्यांना कसं वाटलं असेल ह्यावर लोक विचार करतात. पण आपला एक २४ वर्षांचा मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला, त्या मातेला काय वाटत असेल ह्याचा विचार कोणीच करत नाही. विक्रमच्या आईच्या शब्दात “भगवान ने मुझे दो बेटे उसी के लिये दिये एक उसने देश के लिये रखा एक मेरे लिये” किती निःस्वार्थी भाव आहे हा!!

देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कॅप्टन विक्रम बात्रासारख्या "शेरशहा"चं काळीज आपलं नसेल कदाचित, पण निदान त्याच्या ह्या अत्युच्च पराक्रमाची आठवण तरी आपण आपल्या मनात सतत तेवत ठेवायला हवी. तेव्हाच त्याच्या ह्या पराक्रमाची महती आपल्याला देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास प्रवृत्त करेल. अश्या ह्या महान सुपुत्रास माझा साष्टांग दंडवत आणि कडक सॅल्युट. जाता जाता त्याला "परमवीर चक्र" देताना केलेले शब्द इकडे नमूद करतो.           

CITATION
CAPTAIN VIKRAM BATRA
13 JAMMU AND KASHMIR RIFLES (IC 57556)
“During ‘Operation Vijay’, on 20 June 1999, Captain Vikram Batra, Commander Delta Company was tasked to attack Point 5140. Captain Batra with his company skirted around the feature from the East and maintaining surprise reached within assaulting distance of the enemy. Captain Batra reorganized his column and motivated his men to physically assault the enemy positions. Leading from the front, he in a daredevil assault, pounced on the enemy and killed four of them in a hand-to hand fight. On 7 July 1999, in another operation in the area Pt 4875, his company was tasked to clear a narrow feature with sharp cuttings on either side and heavily fortified enemy defences that covered the only approach to it. For speedy operation, Captain Batra assaulted the enemy position along a narrow ridge and engaged the enemy in a fierce hand –to-hand fight and killed five enemy soldiers at point blank range. Despite sustaining grave injuries, he crawled towards the enemy and hurled grenades clearing the position with utter disregard to his personal safety, leading from the front, he rallied his men and pressed on the attack and achieved a near impossible military task in the face of heavy enemy fire. The officer, however, succumbed to his injuries. Inspired by his daredevil act, his troops fell upon the enemy with vengeance, annihilated them and captured Point 4875.
Captain Vikram Batra, thus, displayed the most conspicuous personal bravery and leadership of the highest order in the face of the enemy and made the supreme sacrifice in the highest traditions of the Indian Army” 

१) कॅप्टन विक्रम बात्रा
२) पॉईंट ४८७५ वर तिरंगा फडकवताना व खाली कमांडिंग ऑफिसर वाय.के.जोशी. यांसोबत '१३ जम्मू आणि काश्मीर रायफल'चे जवान 
३) कॅप्टन विक्रम बात्रा पाकिस्तान अतिरेक्यांकडून हस्तगत केलेल्या गनसोबत


फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Sunday 5 July 2020

पगडीला ढाल बनवणारा सरदार.... विनीत वर्तक ©

पगडीला ढाल बनवणारा सरदार.... विनीत वर्तक ©

वयाच्या २० व्या वर्षी आपली काय स्वप्न असतात ह्याचा विचार करायला आपण सर्वांनी स्वतःच्या आयुष्यात थोडं मागे वळून बघितलं तर असं लक्षात येईल की २० व्या वर्षी आपण प्रत्येकजण आपल्या शिक्षणात चाचपडत होतो. प्रेमाच्या भावनेला नवीन धुमारे फुटलेले होते. करीअर, नोकरी ह्यांचे विचार सतत मनात घोळत होते. हॉटेलिंग, पार्टी, ट्रेक ते स्वतःची गाडी, जागा अश्या सगळ्या गोष्टींची आतुरतेने वाट बघत होतो. उद्या सुरु होणारी क्रिकेट ची मॅच आणि ह्या आठवड्यात रिलीज होणारा चित्रपट कधी बघायला मिळणार ह्याची गणित करण्यात मग्न होतो. त्यावेळेस देशप्रेम, देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या गोष्टी तर दूरच्या. पण देश हा आपल्यासाठी फक्त पुस्तकातल्या प्रतिज्ञे पुरता आणि चित्रपटाच्या आधी सुरु होणाऱ्या राष्ट्रगाना पुरती कमी अधिक प्रमाणात मर्यादित होता. पण काही लोक वेगळ्या मातीचे बनलेले असतात. त्यांच्यासाठी मातृभूमी आणि देश हा सगळ्यात आधी येतो. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दयायला कधीच मागे पुढे बघत नाही.

पंजाब मधला असाच एक २० वर्षाचा तरुण आपल्या काकांकडे बघून देशाच्या सेवेत जाण्यासाठी आतुर झाला होता. त्याच्या काकांनी १९९९ च्या कारगिल युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या अनुभवातून त्याच्या अंगात स्फुरण चढलं होतं. भारतीय सैनिकांनी कसं आपल्या पराक्रमाने कारगिल ची शिखरं भारताच्या ताब्यात ठेवली होती.  हे ऐकून त्याला आपण सुद्धा अश्याच पद्धतीने आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवं हा निश्चय त्याने पक्का केला होता. आपले दोन्ही भाऊ नोकरी करत असताना आणि स्वतःला परदेशी जाण्याची संधी असताना पण २०१८ साली त्या २० वर्षाच्या मुलाने भारतीय सैन्यात प्रवेश घेतला. वयाच्या इतक्या कोवळ्या वयात हा मुलगा देशाच्या सिमेवर भारताच्या सरहद्दीचं रक्षण करत होता.

२०२० साल उजाडलं नेहमीच पाठीमागून आणि बेसावध क्षणी हल्ला करणाऱ्या चीन ने भारताच्या हद्दीत जाणून बुजून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशातून ह्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दोन्ही देशांची बोलणी सुरु झाली. पण ह्या बैठकांचा आणि भारतातील राजकारण्यांनी पूर्वी चुकीच्या पद्धतीने केलेल्या काही अटींचा आधार घेत चीन ने एक वेगळा प्लॅन आखला होता. १४-१५ जून २०२० च्या अश्याच एका बेसावध रात्री चिनी सैनिकांनी भारताच्या जमिनीवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैनिकांनी माघार घेणं अपेक्षित होतं पण नेहमीच मागून वार करणारे चिनी आज सुद्धा तसाच हल्ला करायला आले होते. त्यांनी बंदूक असूनसुद्धा बंदुकीचा वापर करायचा नाही असा आदेश मानणाऱ्या आणि तिकडे भारताच्या सरहद्दीचं रक्षण करणाऱ्या तुकडीच्या कमांडर वर उलटे खिळे आणि ताऱ्यांच्या वेटोळ्याने बनलेल्या शस्त्राने हल्ला केला. ह्या सगळ्या झटापटीत भारताचे कमांडर के. बाबू धारातीर्थी पडले. आपल्या सहकाऱ्यांची आणि आपल्या कमांडींग ऑफिसर ची अशी हत्या बघून त्या २३ वर्षीय तरुणाचा रक्त खवळलं. आपल्या कमांडर च्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो तरुण चिनी सैनिकांवर तुटून पडला.

'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल', 'वाहे गुरुजी का खालसा वाहे-गुरुजी की फतेह' आणि आपल्या रेजिमेंट च ब्रीदवाक्य 'जय बजरंगी बली' म्हणत त्याला घेरणाऱ्या ४ चिनी सैनिकांना त्याने आपल्या ताकदीने एकाच वेळी कड्यावरून खाली ढकललं. त्यांच्या सोबत दरीत पडताना त्याने स्वतःला दगडांच्या कपारीत सावरलं. पण ह्या सगळ्या झटापटीत त्याच्या डोक्याला, मानेला जखमा झाल्या होत्या. १४,००० फुटावर थंड कातळांनी शरीर सोललं गेल्यावरच्या वेदनांचा आपण विचार ही करू शकत नाही. पण तो थांबला नाही. त्या कातळावरून चढून पुन्हा तो माथ्यावर आला. ४ चिनी सैनिकांचा खात्मा त्याने केला होता. अंगातून रक्त वहात होतं पण 'बचेंगे तो और भी लढेंगे' ह्या प्रमाणे मातृभूमीचा एक इंच सुद्धा चीन ला घेऊ देणार नाही ह्या त्वेषात त्या तरुणाने असं काही केलं ज्याचा विचार कोणीच केला नव्हता. शीख संप्रदायातील सरदार लोकांसाठी पगडी म्हणजे आन, बान शान असते. त्या पगडी ला त्याने आपली ढाल बनवलं. चिनी सैनिकांकडे हत्यार होती तर ह्या सरदारकडे आपली पगडी. आपल्या पगडीला सोडवत त्या कपड्याला हाताभोवती गुंडाळत त्याने चिनी सैनिकांचे त्या टोकेरी हत्यारांचे वार परतवून लावत त्यांना भारतीय सरदारांचा इंगा दाखवायला सुरवात केली. एक निशस्त्र भारतीय सैनिक हातात काही नसताना आपल्या पगडीला ढाल बनवून त्यांच्यावर तुटून पडतो हा आवेग, ही देशभक्ती, हा पराक्रम कुठून येतो हे  चिनी सैनिकांना लक्षात येतं नव्हत. ह्या झटापटीत त्याने चिनी सैनिकांना पगडीने लोळवून त्यांच्याकडील हत्यार घेतलं. चिनी हत्याराने चिनी सैनिकांच कंबरड मोडायला सुरवात केली. एक दोन नाही तर तब्बल ७ चिनी सैनिकांचा त्या २३ वर्षाच्या तरुणाने खात्मा केला होता.

एकाकी खिंड लढवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे सारखा हा २३ वर्षाचा तरुण एकटा चिनी सैनिकांशी दोन हात करत होता. ११ चिनी सैनिकांचा खात्मा केल्यावर चीन चे सैनिक पूर्णतः घाबरून गेले की एक भारतीय सैनिक आपल्या ११ सैनिकांना पुरून उरतो. समोरून त्याला रोखण्याचा कोणताच मार्ग दिसत नसताना चिनी सैनिकांनी आपल्या परंपरेला जगताना त्याच्या पाठीमागून हल्ला केला. त्याच्या पाठीत चाकू खुपसला. त्या अवस्थेत ही त्या सैनिकाने पुन्हा आपल्या पगडीने त्या चिनी सैनिकाचा खात्मा केला. पण तो जमीनीवर कोसळला. त्या लढवय्या सरदार सैनिकांच नाव होतं 'शिपाई गुरतेज सिंग'. भारताने आपला गड राखला पण भारताने एका सिंहाला गमावलं.

आज मुंबई, दिल्ली सारख्या शहरात बसून सोशल मिडियावर सैनिकांच राजकारण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या सो कॉल्ड सुशिक्षित, प्रगल्भ लोकांना काय कळणार २३ व्या वर्षी देशासाठी प्राणाची आहुती देणं काय असते? शहीद म्हणजे काय हे आम्हाला कधीच कळलं नाही? आम्ही त्याच राजकारण करणार सिमेवर शहीद झालेल्या सैनिकाची जात, धर्म शोधणार. भारतीय सेनेने काय करायला हवं काय नको ह्याचे तारे तोडणार कारण १४,००० फुटावर थंड कातळावर सोललेल्या कातडीचा आम्ही अनुभव कधी घेतलाच नाही. सैनिक बंदुकीशिवाय गेले कसे? ह्याच घाणेरडं राजकारण करणारे आम्ही आमच्याच आधीच्या पिढीनी सैनिकांच्या बंदुकीत  गोळ्या असून पण चालवता येणार नाही ह्या केलेल्या कायद्याचं समर्थन करणार. भारतीय सैनिक एकवेळ मेला तरी चालेल पण आम्हाला फोटो हवेत, आम्हाला त्याच क्रेडिट हवं. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे, आम्हाला आमचं स्थान मोठं करायचं आहे. आम्हाला सगळ्याच मुद्याच राजकारण करायचं आहे. कारण आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं ह्यात त्या सैनिकाने काय केलं ह्याचा विचारच आम्हाला शिवत नाही इतके आम्ही खालच्या पातळीला गेलो आहोत.

२३ वर्षीय शिपाई गुरतेज सिंग चं लग्न जमलेलं होतं. किती स्वप्न त्याने बघितली असतील? त्या कोवळ्या मनात किती इच्छा, आकांशा असतील पण देशाची आन, बान, शान आपल्या जिवापेक्षा, आपल्या पगडीपेक्षा सर्वोच्च मानून त्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान करणाऱ्या त्या सैनिकाला माझा कडक सॅल्यूट आणि  कोटी कोटी प्रणाम.

ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो
जो लौट के घर न आये ........

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Thursday 2 July 2020

फसलेला डाव... विनीत वर्तक ©

फसलेला डाव... विनीत वर्तक ©

कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाच्या टिकेचा धनी चीन झालेला आहे. जगभर कोरोना चा हाहाकार चालू असताना चीन आणि चीनच्या लोकांविरुद्ध असंतोष वाढत चाललेला आहे. चीन कितीही सोंग आणत असला तरी जगभर वाढलेल्या असंतोषाचे चटके त्याला बसायला सुरवात झालेली आहे. खुद्द चीन मधील लोकांचा त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्वास आणि असंतोष वाढलेला आहे. ह्या सगळ्यावरून आपल्या जनतेचं आणि पर्यायाने संपूर्ण जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चीन एक डाव खेळला. त्याने भारताला डिवचण्यासाठी एक प्याद पुढे केलं. भारत १९६२ प्रमाणे गपचूप निषेध करून गप्प बसेल. आपल्या सैनिकी ताकदीपुढे तो झुकेल. आपण मैत्रीच्या नावाखाली जी चाल काही वर्षापूर्वी खेळलो ती पुन्हा यशस्वी होईल असा विश्वास चीन च्या राज्यकर्त्यांना आणि तिथल्या सैनिकी अधिकाऱ्यांना होता. पण आपलं प्याद पुढे करून त्याने आपल्या स्वतःच्या राजाला कोंडीत पकडण्याचा राजमार्ग भारताच्या हातात दिला आहे.

चीन च्या राज्यकर्त्यांचा आणि तिथल्या सैनिकी अधिकाऱ्यांच गलवान खोऱ्यातील वाद उकरून काढण्याचं गणित पूर्णपणे चुकलेलं आहे हे चीन ला लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला आहे. एका चुकीमुळे तो दुसरी चूक करत सुटला आहे आणि आता अशी परिस्थिती त्याने निर्माण केली आहे की तो स्वतःच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे. १४-१५ जून रोजी घडलेल्या घटनेचे पडसाद आता भारतापुरती मर्यादित राहिलेले नाहीत तर त्याचे लोण आता जगभर पसरत चालले आहेत. गेल्या काही दिवसातील घडामोडी बघितल्या तर खूप काही लक्षात येईल. १४-१५ जून ला भारतीय जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याने चीन आणि चीन चं सैन्य पुर्णतः बिथरलेलं आहे. खरं तर भारताच्या सैन्याला मारून आपल्या सैन्याला आत्मविश्वास द्यायचा आणि त्याच सोबत भारताच्या जमीनीवर कब्जा करायचा अशी चाल चीन खेळला होता. भारतात काही झालं तर तो आवाज चेपण्यासाठी त्याने आधीच आपल्या पिलावळीला सक्रिय केलं होतं. पण १९६२ ते २०२० ह्या मधला भारत ओळखायला चीन फसला.   

१९६२ चं भारतातील राजकीय नेतृत्व आणि २०२० मधील भारताचं राजकीय नेतृत्व ह्यात खूप मोठा फरक आहे. १९६२ सालची भारतीय सेना आणि २०२० ची भारतीय सेना त्यांचा आत्मविश्वास, युद्धकौशल्य आणि त्यांची आयुध ह्यात खूप मोठा बदल आहे. ह्या सगळ्यांच्या जोडीला गेल्या काही वर्षात भारताची संपूर्ण जगाच्या पटलावर बदललेली प्रतिमा ह्याच गणित करण्यात चीन पूर्णतः चुकला. आपली प्यादी पुढे करून राजाला कटशह देण्याचा निर्णय आता त्याच्या अंगलट आला आहे. एकतर भारतीय सैनिकांनी 'तुम एक मारोगे तो हम दो मारेंगे' ह्या युक्तीवर चीन च्या सैनिकात खळबळ माजवली आहे. युद्धात खूप मोठी सेना, खूप मोठी सैनिकी आयुध आणि तंत्रज्ञान ह्यावर कागदावर आपण शेर बनू शकतो पण एक मुंगी सुद्धा हत्तीला लोळवू शकते ह्याचा प्रत्यय प्रत्यक्ष युद्धभूमीवर येतो. त्यामुळे आकड्याच्या जोरावर उडणारा चीन भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमामुळे पूर्णपणे बॅक फुटवर गेला आहे. गेल्या काही दशकांच्या सतत अतिरेकी विरुद्ध मोहिमेमुळे भारतीय सेना नेहमीच युद्धासाठी तयार स्थितीत असते. भारतीय सैनिक हे अश्या प्रकारच्या प्रसंगातून सतत जात राहिलेले आहेत त्यामुळे सराव, कूटनीती, बिमोड ह्या सगळ्या बाबतीत जगातील सर्वात उंच युद्धभूमी आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यात भारतीय सैनिक तरबेज तर आहेतच पण जगात सर्वोत्तम आहेत. आपल्या देशाबद्दल असलेला जाज्वल्य देशाभिमान हा प्रत्येक भारतीय सैनिकाची शक्ती दहापट मजबूत करतो. त्यामुळेच देशासाठी बलिदान करायला भारतीय सैनिक कधीच मागेपुढे बघत नाहीत. ह्या उलट चीन चे सैनिक वेळ जावा म्हणून सिमेवर गेम खेळत बसतात आणि आपल्या आवाजाला दाबणाऱ्या सरकार आणि देशाबद्दल अभिमान आणि आपुलकी कुठेतरी कमी आहे. हाच मोठा फरक चीनला १४-१५ जूनला दिसलेला आहे.

गेल्या काही आठवड्यातील घटना बघितल्या तर ह्या संघर्षामुळे अनेक देशांना आपल्या असंतोषाला वाट करून देता आली आहे. साऊथ चायना समुद्रातील छोटे मोठे देश जसे व्हिएतनाम, तर तिकडे हॉंगकॉंग, तैवान, तिबेट ह्या सोबत ऑस्ट्रेलिया, जपान ह्यांनी चीन च्या विरोधात उघडपणे जागतिक पटलावर भारताची बाजू घेतली आहे. भारताला मदत म्हणून अमेरीकेने त्यांच्या शक्तिशाली ३ विमानवाहक युद्धनौका साऊथ चायना सी मध्ये हलवल्या आहेत. इकडे हिंद महासागरामध्ये भारतीय नौदलाने आपली ताकद पणाला लावली आहे. फ्रांस ने उघडपणे गरज पडली तर आपली स्वतःच सैन्य युद्ध मैदानात उतरवण्याची ग्वाही भारताला दिली आहे. राफेल ह्या लढाऊ विमाने वेळेआधी आणि फ्रांससाठी राखून ठेवलेल्या साठ्यातून मेटोर क्षेपणास्त्र ह्या विमानासाठी दिली आहेत. तिकडे रशियाने एस ४०० ही यंत्रणा वेळेआधी तर तब्बल ३३ लढाऊ विमाने विक्रमी वेळेत भारताला देण्याची ग्वाही दिली आहे. ह्याशिवाय लागेल तो दारुगोळा आणि यंत्रणा देण्याचंही मान्य केलं आहे. अमेरीकेने उघडपणे चीन च्या विरुद्ध शड्डू ठोकलं आहे. अमेरीका ज्या बाजूला त्या बाजूने मित्र देश छुपे किंवा समोरून उभे राहणार हे उघड आहे. ज्यात युरोपियन युनियन, साऊथ कोरियासह अनेक देशांचा समावेश आहे.ह्या सगळ्या वरून युद्ध होईल का नाही हे सांगता येणार नाही पण एका घटनेने चीन वर सगळ्या बाजूने दडपण आलं आहे. भारताने चिनी एप्लिकेशन वर टाकलेल्या बंदीचे पडसाद अमेरीकेत उमटले आहेत. अमेरीकेनेही भारताच्या पावलावर पाऊल टाकून सगळ्या चिनी कंपन्यांवर बंदी टाकावी ह्यासाठी तिथल्या सिनेट मध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत.

१४-१५ जून च्या घटनेच्या एका घटनेने चीन विरुद्ध धुमसत असलेल्या असंतोषाला एक वाट मिळाली आहे. गेल्या काही दिवसात त्याच वणव्यात रूपांतर होताना दिसत आहे. चीन कितीही नाकारत असला तरी आर्थिक, लष्करी, सामरिक आणि जागतिक पटलावर चीनवर प्रचंड दडपण आलं आहे. आपल्या एका चालीमुळे हातात आलेला डाव निसटतो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता चीन ला मागे फिरणं शक्य नाही कारण तसं केलं तर चीन स्वतःच्या नजरेत आणि तिथल्या लोकांच्या नजरेत पडेल आणि सैनिकांच्या आत्मविश्वासाला एक तडा जाईल ज्याची भरपाई तो करू शकणार नाही. पुढे गेला तर युद्ध चालू करणं त्याच्या हातात असेल पण त्याचा भडका किती मोठा होईल ह्याचा अंदाज लावणं आणि त्याचा प्रतिकार करणं चीनला शक्य होणार नाही. एकाचवेळी सगळ्या बाजूने कात्रीत सापडल्या प्रमाणे चीन ची अवस्था होईल आणि अमेरीका ह्या मोक्याचा पुरेपूर फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. भारताच्या बाजूने चीनवर बॉम्ब टाकायला अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष पुढेमागे बघणार नाहीत ह्याचा अंदाज चीन ला चांगला आहे. 

बुद्धिबळाच्या पटलावर चीन चा डाव चीनच्या अंगलट आला आहे हे आता स्पष्ट  लागलं आहे. भारतात राजकारण करून आपल्या पिलावळीला सक्रिय करून त्याने पाहिलं, भारताच्या शेजारील राष्ट्र म्हणजेच नेपाळ ला चिथवून दडपण देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक आघाड्यावर तूर्तास चीन सगळीकडे बॅक फूटवर गेला आहे. 'ये नया भारत है' जो चीनच्या पिळवळीला आणि पडद्याआडून पुरावे मागणाऱ्या नेत्यांना जनता आता भिक घालत नाही हे लक्षात आलं आहे. दुसरीकडे भारताने आपली सर्व ताकद गलवान मध्ये उभी केली आहे. भारतीय सेना, भारतीय वायू सेना पूर्ण शक्तीनिशी तयार आहेत. भारताने आपली स्पेशल फोर्स लडाख सीमेवर तैनात केली आहे. भारताचे घातक कमांडो, पॅरा फोर्सेस मधील सैनिक जगातील सर्वोत्तम सैनिकात गणले तर जातात पण लडाख सारख्या अतिशय प्रतिकूल असलेल्या भागात युद्ध अथवा कारवाई करण्यात त्यांचा हात जगात कोणीच धरू शकत नाही. सुखोई एम. के. आय. ३० सोबत ब्राह्मोस ही चीनकडे रोखून आहेत. सध्या तरी भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करणारी कोणतीच प्रणाली जगात अस्तित्वात नाही. चीन चं एस ४०० सुद्धा ब्राह्मोस ला पकडू शकत नाही. त्यामुळेच चीन समोरासमोर युद्ध करायला कचरतो आहे. छुप्या युद्धाच्या दृष्टीने खेळलेली त्याची चाल त्याच्याच अंगलट येताना सध्या तरी दिसत आहे. त्यामुळेच एक फसलेला डाव हरण्याची नामुष्की सध्या चीन समोर उभी आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.