Friday 1 February 2013


पाण्यावरची टपरी ............ 

टपरी म्हंटली कि सगळ्यान समोर येते ती चहाची टपरी. टपरी ह्या शब्दाशी चहाच नात जुळल गेल आहे अगदी आई आणि जन्माला येणाऱ्या एका नव्या जीवाच असते अम्बिलीकॅल कोर्रड सारख. जमिनीवरची टपरी तर सगळ्यांनी बघितली असेल पण पाण्यावर हि टपरी असते ह्याची कोणाला पुसटशी कल्पना नसेल. पाण्यावरच जीवनच अस प्रत्येक येणाऱ्या क्षणात काय वाढून ठेवल आहे माहित नसलेल.

शाळा , कोलेज, बगीचा , मैदान , ऑफिस आणि इतर वर्दळ असलेल्या ठिकाणच्या टपर्या तर साऱ्यांनाच ठाऊक असतात. प्रत्येक दिवशी नवीन लोक नवीन वर्दळ पण पाण्यातल्या टपरीची काही गोस्तच वेगळी. इकडे देणारा आणि घेणारा हा एकाच असतो. चहा बनवायचा आपल्याला हवा तसा प्रत्येकाच्या सोइने आणि प्यायचा हि मस्त पेकी झुरका मारके.. हि टपरी कधीच बंद होत नाही २४ तास ३६५ दिवस आणि कितेक वर्ष ती न थांबता चालूच राहते न त्याला कोणी वाली असतो न तिची जागा कोणी हिसकावून घेऊ शकत. येणारा प्रत्येक माणूस हा थकलेला असतो तो ह्या टपरीच्या वाटेला आला कि काही क्षण विसावायचं आणि मग परत आपल काम सुरु. न जाणो किती थकलेल्या आणि घामाने डबडबलेल्या लोकांची तृष्णा ह्या टपरी ने भागवली असेल?

जिकडे प्रत्येक सेकंद पैशात मोजला जातो तिकडे सुधा ह्या टपरी साठी जागा असावी हीच ह्या टपरीची जमेची बाजू आहे. जरी हि टपरी इतर टपरी पेक्षा वेगळी असली तरी आपल्याला तिकडे येणारे अनुभव सारखेच चेष्टा , मस्करी , भांडण , हेवेदावे , खबरी , कुटनीती , घरची आठवण सगळ काही सारखच फरक एकच इकडे असतात फक्त आठवणी घरच्यांच्या , मित्रांच्या आणि कामाच्या. घरापासून कित्येक किलोमीटर लांब कित्येक मीटर खोल समुद्रात आणि जिकडे फक्त पाणीच दिसते तिकडे माणसाला बोलत करणारी एकच जागा म्हणजे रिग ची टपरी.

कामा व्यतिरिक्त जिकडे माणूस स्वताबदल बोलतो सगळ्यान शी शेअर करतो. घरची भांडणं , सल्ले , आठवणी अशी जागा म्हणजे हि टपरी. ह्या टपरीची अजून एक वेगळीच गोष्ट आहे कारण इकडे येणारे लोक २८ दिवस सारखेच असतात त्यामुळे त्यांच्यत असणारी ओढ हि जास्त असते आणि तितकीच भांडण सुद्धा. मी आज ज्या टपरीवर बसून हे लिहोतो आहे तिकडे मी २००८ साली आलो होतो. ते सगळे दिवस आज डोळ्यापुढे सरून गेले. हाच तो बाक हीच ती किटली आणि हीच ती जागा जी मला खूप आवडायची अजूनही सगळ तसच आहे अगदी २००८ साली इकडून गेलो तेव्हा होत तसच.

आयुष्यात अनेक क्षण आणि जागा असतात ज्या नेहमीच आपल्या बरोबर आठवणींमध्ये असतात आणि माझ्या आठवणींमध्ये तर अश्या अनेक टपर्या आहेत प्रत्येक रिग आणि प्रत्येक देशातल्या प्रत्येक टपरीची शान वेगळी तिचा रुबाब वेगळा पण काम एकच. गेली ६ वर्षे अश्या २५ टपरीच्या आठवणी आहेत प्रत्येक वेळी इकडून जाताना हाच विचार असतो परत आलो तर नक्की भेट देईनच....

विनीत वर्तक