Thursday 24 August 2023

तोच चंद्रमा नभांत (भाग 2)... विनीत वर्तक ©

 तोच चंद्रमा नभांत (भाग 2)... विनीत वर्तक ©

चंद्राचा दक्षिण ध्रुव गेल्या काही वर्षात समोर आलेल्या निष्कर्षामुळे वैज्ञानिकांच्या रडारवर आहे. या भागात अनेक विवर आहेत. उंच सखल आणि खडकाळ असलेला हा भाग सूर्यापासून तसा लपलेला आहे. चंद्रावर वातावरण नसल्याने काही अब्जावधी वर्षापूर्वी त्यावर असलेलं पाणी हे सूर्याच्या उष्णतेने वाफेत रूपांतरित होऊन अवकाशाच्या पोकळीत नष्ट झालेलं आहे. पण चंद्राचा दक्षिण ध्रुवावरील काही भाग मात्र गेल्या अब्जोवधी वर्षांपासून सूर्यापासून लपलेला आहे. इथलं तपमान जवळपास शून्याच्या खाली उणे -230 डिग्री सेल्सिअस इतकं कमी आहे. यामुळेच अब्जोवधी वर्षापूर्वी तिकडं असलेलं पाण्याचं अस्तित्व चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाच्या स्वरूपात आजही असल्याचं सिद्ध झालेलं आहे. पण हे सगळं आजवर ऑर्बिटर च्या माध्यमातून सामोरं आलेलं होतं. प्रत्यक्षात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे हे आजवर कोणालाही बघता आलेलं नव्हतं. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर दुर्लक्षित आणि सुरक्षित असणारी बर्फाची गोष्ट ज्यावेळेस वैज्ञानिकांना वेध घ्यायला प्रवृत्त करायला लागली तेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करणार हे उघड होतं. पण चंद्राच्या इतर भागावर उतरणं आणि दक्षिण भागावर आपलं यान उतरवणं तितकं सोप्प नाही. कारण उणे -230 डिग्री सेल्सिअस मधे काम करताना यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स मधे गडबडी होण्याची शक्यता जास्त असते. चंद्रावर दिवसा तपमान 250 डिग्री सेल्सिअस इतकं उकळतं असते तर रात्रीच्या वेळी ते उणे -130 डिग्री सेल्सिअस इतकं कमी होते. दक्षिण ध्रुवावर तर हा फरक अजून जास्ती होतो. तापमानातील इतका मोठा फरक सहन न करता आल्यामुळे अनेकदा यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सिस्टीम मधे गडबडी होते आणि त्याच पर्यवसान मोहीम अपयशी ठरण्यात होते. त्यात भरीस भर म्हणून चंद्राचा दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभाग हा विवरांनी भरलेला असल्याने सपाट जागा कमी आहेत जिकडे यान सुरक्षितरीत्या उतरू शकेल. या कारणामुळेच आजवर दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्याची हिंमत आजवर जगातील प्रगत देश दाखवू शकलेले नव्हते. भारताने हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलं आणि आपली चंद्रयान 2 मोहीम ही दक्षिण ध्रुवाकडे रवाना केली. 

चंद्रयान 2 मोहिमेत अगदी शेवटच्या क्षणी अपयश आलं पण हे अपयश इसरो च्या वैज्ञानिकांना खूप काही शिकवून गेलं. यातूनच चंद्रयान 3 मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली गेली. नेमकं काय चुकलं आणि काय चुकू शकते याचा अभ्यास केला गेला. अभ्यासातून जे निष्कर्ष पुढे आले त्यावर काम केलं गेलं. झालेलं काम एकदा नाही दोनदा नाही तर अनेकवेळा तपासून बघितलं गेलं. एखादी गोष्ट काम करणार नाही असं गृहीत धरून पर्यायी मार्ग शोधले गेले तसं तंत्रज्ञान विकसित केलं गेलं. खरे तर चंद्रयान 2 च्या वेळेस जी चूक झाली होती त्यात बदल करायला इसरोला एक सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा होता. पण इसरो ने तब्बल 4 वर्ष घेतली ती आपला अभ्यास परिपूर्ण करण्यासाठी. सगळ्या शक्यतांचा विचार करून मगच पुढे जायचं हे इसरो ने ठरवलं होतं. त्यामुळेच चंद्रयान 3 मोहिमेला उड्डाणासाठी 4 वर्षाचा कालावधी लागला. 

भारताने चंद्रयान 3 मोहीम अवकाशात पाठवल्या नंतर रशियाने आपलं ल्यूना 25 यान आपण चंद्राच्या कक्षेत पाठवत असल्याचं जगासमोर आणलं. तोवर ही गोष्ट रशियाने जगापासून आणि आपल्या मित्रापासून म्हणजेच भारतापासून लपवून ठेवली होती. तसं तर रशिया ल्यूना 25 या मोहिमेवर गेली 10 वर्ष काम करत होता. पण त्यांच लॅण्डर रेडी आहे अथवा मोहीम आखण्यासाठी तयारीत आहे असं कोणालाही माहित नव्हतं. खरं तर रशियाने घाईगडबडीत ही मोहीम पुढे रेटली. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया मधील जनता त्रस्त झाली आहे. एकेकाळी अवकाश क्षेत्रातील दादा आणि थोरला असणारा रशिया गेल्या काही वर्षात अवकाश क्षेत्रात विशेष असं काही करू शकलेला नाही. त्यांचे सोयूझ रॉकेट आजही मानवी उड्डाण करण्यासाठी सुरक्षित असले तरी काळाच्या कसोटीवर ते पिछाडीवर पडले आहेत हे सत्य रशियाला सुद्धा माहित होतं. त्यामुळेच भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्याचा घाट रशियाने घातला. 

13 सप्टेंबर 1959 चा दिवस होता जेव्हा मानवी इतिहासात रशियाने (आधीचा सोव्हियत युनियन) सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं यान ल्यूना 2 उतरवलं होतं. जे काम आपण जवळपास 60 वर्षापूर्वी केलं ते आता का नाही करू शकणार असा विचार रशियाने केला. त्यामुळे वेळ न दवडता त्यांनी ल्यूना 25 ला चंद्राच्या कक्षेत पाठवून दिलं. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत रशियाचे सोयूझ 2.1 बी रॉकेट हे सगळं कार्य करत होतं. ल्यूना 25 यानावरील इंजिन तोवर ना तपासली गेली होती ना त्यांच कार्य बघितलं गेलं होतं. कारण रशियाच रॉकेट इतकं प्रबळ होतं की  त्याने ल्यूना 25 ला चंद्राच्या दारात आणून सोडलं. त्यामुळे रशियन वैज्ञानिकांच्या गणिताचा खरा कस लागलाच नाही. भारताच्या बाबतीत मात्र गणित एकदम विरुद्ध होतं. भारताकडे प्रबळ रॉकेट नसल्याने अगदी पृथ्वीच्या कक्षेपासून भारतीय वैज्ञानिकांना सिंगल शॉट पद्धतीने चंद्रयान 3 ची कक्षा वाढवत नेत त्याला चंद्राकडे ढकलावे लागलं होतं. त्याचवेळी चंद्राच्या घराजवळ आल्यावर त्याचा वेग कमी करण्यासाठी पुन्हा उलट्या पद्धतीने इंजिन्स प्रज्वलित करायला लागली होती. 

भारतीय वैज्ञानिकांना चंद्रयान 1 आणि 2 तसेच मंगळयान मोहिमेमुळे सिंगल शॉट पद्धतीवर खूप चांगलं नियंत्रण मिळवता आलेलं आहे. या पद्धतीत सगळ्यात महत्वाचं असते ती अचूक वेळ आणि तुमची बदललेली डेल्टा व्हेलॉसिटी. वेग आणि वेळ यांच अचूक नियंत्रण जर नसेल तर तुमचं यान गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे आपली कक्षा सोडून भलतीकडे जाऊ शकते ज्याचं पर्यावसन एकतर कपाळमोक्ष किंवा अवकाशात भरकटंण हे असते. इसरो ने वेग आणि वेळेचं गणित अतिशय अचूक जमवून आणलं होतं. यासाठी तुमच्या इंजिन्स फायरिंग वर तुमच्या सिस्टीम च योग्य नियंत्रण, इंजिन्स नी निर्माण केलेला थ्रस्ट आणि तुम्ही साधलेली योग्य वेळ अतिशय महत्वाची असते. चंद्रयान 2 आणि 3 च्या बाबतीत इसरो च्या  प्रॉपल्शन मॉड्यूल च्या इंजिन्स नी आपलं काम चोख बजावलं. जेव्हा तुम्ही कोणत्याही ग्रह अथवा आपण म्हणून अवकाशात कोणत्याही बॉडी भोवती अंडाकार म्हणजेच एलिप्टिकल ऑर्बिट मधे फिरत असतात त्यावेळी दोन टोकांवरील वेगात फरक असतो. जेव्हा तुम्ही त्या बॉडीच्या सगळ्यात जवळ असतात तेव्हा तुमचा वेग सगळ्यात जास्ती असतो. जेव्हा तुम्ही सगळ्यात लांब असतात तेव्हा तुमचा वेग सगळ्यात कमी असतो. 

भौतिकशास्त्र हे सांगते की जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त वेगात असतात तेव्हा तुम्ही केलेला बदल म्हणजेच डेल्टा व्हेलॉसिटी ही तुमचा वेग सगळ्यात जास्त वाढवते. याचा अर्थ तुम्ही जर तुमची इंजिन्स सगळ्यात जवळ असताना प्रज्वलित केली तर तुमचा वेग कित्येक पटीने वाढतो आणि तुमची कक्षा रुंदावली जाते. कारण जास्त वेगामुळे तुम्ही जास्त दूरवर फेकले जातात. आता हाच नियम उलट पण लागू आहे. जेव्हा तुम्ही उलट दिशेने इंजिन्स प्रज्वलित करता तेव्हा तुमचा वेग जास्त कमी होतो म्हणजेच कक्षा कमी होते. यामुळे प्रत्येक सेकंद हा अतिशय महत्वाचा असतो. 1 सेकंद कमी जास्त आणि कक्षेत कित्येक किलोमीटर चा फरक पडू शकतो. हे सगळं लिहण्याच कारण इतकच ल्यूना 25 मधे जी गडबड झाली ती इकडेच झाली. सोयूझ रॉकेट ने चंद्राच्या दारात नेऊन सोडलेल्या ल्यूना 25 ला आपला वेग कमी करत चंद्रावर उतरण्याच्या आधी 18 किलोमीटर ची कक्षा गाठायची होती. याचा अर्थ 18 किलोमीटर उंचीवरून ते चंद्रावर उतरणार होतं. (विक्रम लॅण्डर च्या बाबतीत ही उंची 30 किलोमीटर होती.). ल्यूना 25 च्या इंजिन्स ला जेव्हा रशियाच्या रॉसकॉसमॉस ने चालू करण्याचा कमांड दिला तेव्हा त्याची इंजिन्स चालू तर झाली पण बंद व्हायचं नाव त्यांनी घेतलं नाही. जोवर सिस्टीम हँग होऊन बंद झाली तोवर मी वर लिहिलं तसं इंजिन्स जास्त काळ प्रज्वलित झाल्याने 18 किलोमीटर ची उंची गाठायच्या ऐवजी ल्यूना 25 चा वेग इतका कमी झाला की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने त्याचा कपाळमोक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर झाला. 

भारताच्या विक्रम लॅण्डर आणि  प्रॉपल्शन मॉड्यूल वरील यंत्रणांनी मात्र आपलं काम चोख केलं होतं. जर तुमची ही यंत्रणा अगदी सेकंदाच्या वेळेप्रमाणे अचूक चालली तर तुम्हाला कमीत कमी इंधन लागते कारण तुम्ही गाठलेली कक्षा ही तितकी अचूक असते. भारताच्या चंद्रयान 3 च्या प्रॉपल्शन मॉड्यूल वरील इंजिन्स आणि यंत्रणेने इतकं अचूक काम केलं आहे की अजून जवळपास 150 लिटर इंधन त्यावर शिल्लक आहे. ज्यामुळे प्रॉपल्शन मॉड्यूल हे कदाचित कित्येक वर्ष चंद्राच्या भोवती परिवलन करत राहू शकेल. इसरो ने त्याचा कार्यकाळ जास्तीत जास्त 6 महिने ठेवला होता. पण अतिशय अचूक कक्षा गाठल्यामुळे इंजिन्स कमीवेळा प्रज्वलित करावी लागली. त्यामुळे इंधन जास्त प्रमाणात खर्च झालं नाही. आपल्या कक्षेत फिरत राहण्यासाठी प्रॉपल्शन मॉड्यूल अगदी थोडं इंधन गरजेचं आहे. जोवर इंधन त्यावर आहे तोवर त्याची इंजिन्स प्रज्वलित होत राहतील आणि प्रॉपल्शन मॉड्यूल आपल्या ठरलेल्या कक्षेत (100 किलोमीटर उंचीवर) कदाचित काही वर्ष आरामात राहू शकेल. 

याच प्रॉपल्शन मॉड्यूल वर Spectro-polarimetry of HAbitable Planet Earth (SHAPE) नावाचं उपकरण आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे उपकरण पृथ्वी सारख्या मानवाला राहण्यास योग्य असणाऱ्या ग्रह अथवा लघुग्रहांच्या वातावरणाचा शोध घेईल. आता आपण विचार करू की नक्की याचा काय उपयोग तर याच्या माध्यमातून आपल्याला ग्रहाच्या वातावरणाचा एक ढोबळ अंदाज येईल त्यावरून आपण आपल्या शोधांची पुढची रूपरेषा आखू शकू. एखादी मोहीम तिकडे न्यायची का? नक्की राहण्यायोग्य असेल का? हा अभ्यास असल्याशिवाय अंधारात कोणीच उडी घेणार नाही. हे जे उपकरण आहे त्याच आयुष्य आधी 6 महिने होतं पण आता कित्येक वर्ष झालं आहे. 

एकीकडे रशिया सारखा प्रबळ देश आपल्याला 60 वर्षापूर्वी अवगत असलेलं तंत्रज्ञान वापरण्यात चुकला तिकडे आजवर कधी चंद्रावर पाऊल न ठेवलेल्या भारताने अतिशय सुरळीत चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा झेंडा रोवला. 1600 कोटी रुपये खर्चून चंद्रावर पाठवलेलं ल्यूना 25 अयशस्वी झालं तर 615 कोटी खर्च करून पाठवलेलं चंद्रयान 3 आज इतिहासाची पान आपल्या सुवर्ण अक्षरांनी लिहिते आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही पहिले उतरता की दुसरे. प्रश्न हा आहे की तुमची तयारी योग्य झाली आहे न? कारण तयारी नसताना जेव्हा आपण शर्यतीत पळायला जातो तेव्हा आपण अश्याच पद्धतीने तोंडावर आपटतो. रशियाने घाई करून 1600 कोटी रुपये तर उडवले पण आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्या नावाला एक असा डाग लावला आहे जो कधीच पुसला जाणार नाही. रशियाने भारताला वेळोवेळी अवकाश क्षेत्रात मदत केली आहे. त्यामुळेच रशियाचं अपयश जास्ती जिव्हारी लागणारं आहे. जेव्हा आपला मित्र हरतो किंवा मागे पडतो तेव्हा विजयाचा आनंद पूर्णपणे उपभोगता येत नाही हेच खरं. तूर्तास रशिया यातून शिकेल आणि पुन्हा एकदा चंद्रावर यशस्वी स्वारी करेल हीच अपेक्षा आहे.

 जय हिंद!!!

ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Wednesday 23 August 2023

तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©

 तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©

आजवर आपण रात्रीचं चांदणं बघत आलो. रात्रीच्या त्या गडद अंधारात आपल्या शीतल प्रकाशाने भुरळ घालणाऱ्या त्या चंद्राच्या प्रेमात कोणी पडलं नसेल अशी व्यक्ती क्वचित सापडेल. आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र त्यासाठीच वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आकर्षण राहिला आहे. ज्या वेळेस नभांपलीकडे जाण्याचं तंत्रज्ञान मानवाने शिकलं. त्यानंतर त्याच पहिलं लक्ष्य चंद्रच होता. 21 जुलै 1969 चा तो दिवस होता जेव्हा मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावर उमटलं. त्यानंतर अनेकांनी आपली पावलं चंद्राच्या मातीत उमटवली  देशांनी आपले उपग्रह त्यावर उतरवले. एकेकाळी अतिशय औत्सुक्याचा विषय असणारा चंद्र फक्त माती आणि दगड धोंड्यानी भरलेला आहे मानवाला 1970 च्या दशकात समजून चुकलं. त्यामुळेच चंद्रावर स्वारी केल्यावर मानवाचा खरे तर वैज्ञानिकांची चंद्राबद्दल असलेली उत्सुकता संपलेली होती.14 नोव्हेंबर 2008 चा दिवस होता ज्यावेळेस भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेत सोबत असलेल्या मुन इम्पॅक्टर प्रोब ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हार्ड लँडिंग (कोसळताना) चंद्राच्या पृष्ठभागावर उडालेल्या धुराळयात पाण्याचं अस्तित्व दाखवून दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा तो नभात असलेला चंद्रमा पुन्हा एकदा वैज्ञानिकांना खुणावू लागला. 

आपल्या पहिल्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली ती 2019 साली. आजवर पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्या परग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव भारताच्या आणि इसरो च्या पाठीशी नव्हता. जे काही तंत्रज्ञान अवगत होतं त्यात इसरोने अगदी चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर पर्यंत यशस्वी मजल मारली. पैश्याचा अभाव, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, रॉकेट आणि इतर गोष्टींच्या मर्यादा आणि सगळ्यात मोठं म्हणजे अश्या मोहिमेत अपयश आल्यावर झेलाव्या लागणाऱ्या टीकेचा त्रास सहन करत भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर 2019 साली केलेला प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणी फसला. सर्व भारतीयांना तो क्षण आजही आठवत असेल. अगदी ओंजळीत पिण्यासाठी घेतलेलं पाणी निसटून जावं आणि आपल्याला तहानलेलं राहावं लागावं अशीच ती अवस्था होती. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अश्या प्रयत्नात अगदी सामान्य असल्या तरी जिकडे रॉकेट अवकाशात पाठवायला खर्च का करायचा असे प्रश्न विचारले जातात तिकडे हे नुकसान खूप मोठं होतं. त्यामुळेच तत्कालीन इसरो चीफ के. सिवान यांच्या डोळ्यात आलेले अश्रू खूप काही सांगून गेले. 

असं म्हणतात, 

"अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है"... 

आज 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेद्वारे विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून त्या अश्रूंना आज आनंदाच्या अश्रूत परावर्तित केलं आहे. 1969 साली अमेरिकेत जे घडलं ते आज भारतात घडताना मला व्यक्तिशः जाणवते आहे. त्यावेळी अमेरिकेने कोल्ड वॉर च्या लढाईत निर्णायक आघाडी चंद्रावर मानव उतरवून घेतली हा इतिहास असला तरी त्यापेक्षा अमेरिकेची आणि तिथल्या लोकांची मानसिकता या घटनेने बदलवून टाकली. येणाऱ्या दशकात अमेरिका तांत्रिक बाबतीत आघाडीवर राहिली आणि जगातील सगळ्यात प्रगत राष्ट्र असलेली अमेरिकन माणसाची मानसिकता आजही कायम आहे. आज भारताच्या विक्रम लॅण्डर ने केलेला पराक्रम हा त्याच तोडीचा आहे. तांत्रिक बाबतीत भारताने मिळवलेलं यश जितकं महत्वाचं आहे त्याहीपेक्षा कैक पटीने भारताच्या आणि भारतीयांच्या मानसिकतेत झालेला बदल जास्ती महत्वाचा आहे. आपण स्वबळावर आणि स्वस्तात तंत्रज्ञान विकसित करू शकतो. त्या पलीकडे आलेल्या अपयशाने खचून न जात अजून जोमाने आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. 

ज्यावेळेस जागतिक पटलावर रशिया  रॉसकॉसमॉस आणि भारताच्या इसरो च्या अध्यक्षांना सारखा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या दोघांनी दिलेलं उत्तर बदललेली मानसिकता अधोरेखित करते. रॉसकॉसमॉस च्या अध्यक्षांना ज्यावेळी विचारण्यात आलं की जवळपास पाच दशकानंतर रशिया ल्यूना 25 मोहिमेद्वारे चंद्रावर पुन्हा जातो आहे. त्यावेळेस या मोहिमेच्या यशाची खात्री म्हणजेच ल्यूना 25 सॉफ्ट लँडिंग करण्याची किती खात्री आपल्याला आहे? यावर त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 70% आम्ही यशस्वी होऊ. हाच प्रश्न जेव्हा इसरोच्या अध्यक्षांना विचारला गेला तेव्हा उत्तर होतं, आमच्या चंद्रयान 3 चे सगळे सेन्सर निकामी झाले, आमचा संपर्क काही काळासाठी तुटला अगदी त्याची दोन इंजिन जरी बंद पडली तरी आमचा विक्रम लॅण्डर हा चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करेल. या दोन्ही उत्तरात मानसिकतेत असलेला बदल तुम्ही, आम्ही सगळेच जाणवू शकतो. 

एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेआधी विचारावं की तुझा अभ्यास किती झाला आहे? त्यावर त्याने उत्तर द्यावं की काहीही येऊन दे मी यशस्वी होणार, ते पुस्तकातलं असू दे, दुसऱ्या कोणत्या पुस्तकातलं असू दे, सिलॅबस मधलं असू दे नाहीतर अजून कुठलं असू दे. मला त्याने काही फरक पडत नाही. माझा बेस पक्का आहे. प्रश्न कितीही कठीण आला तरी त्याला सोडवण्याची माझी तयारी आहे. मला खात्री आहे की मी तो बरोबरचं सोडवेन. हा आत्मविश्वास येण्यासाठी त्या विद्यार्थ्याने रात्रीचा दिवस केलेला असतो हे कोणीही सांगेल कारण असा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही तुमची तयारी इतकी पक्की केलेली असते की समोर काय येते याची भिती नसते तर येणारा प्रश्न आपण किती सहजरीत्या सोडवू याचा विचार असतो. अगदी अशीच स्थिती आज इसरो मधील प्रत्येकाची होती आणि त्यांच्या मनातील तो आत्मीश्वास इसरो च्या अध्यक्षांनी दिलेल्या उत्तरातून जाणवत होता. 

आज जेव्हा विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास सुरु केला तेव्हा पडद्यावर दिसणारे आकडे त्याची साक्ष देत होते. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट ज्याला कॉपी बुक म्हणता येईल अशी घडत होती. मग ती ब्रेक डाऊन फेज असो वा एका ठिकाणी विक्रम लॅण्डर ने हॉवरिंग करणं असो. जे मापदंड आखले गेले होते त्यातल्या प्रत्येक मापदंडात आज विक्रम लॅण्डर चा प्रवास झाला. विक्रम लॅण्डर ने सॉफ्ट लँडिंग केलं यापेक्षा ते ज्या पद्धतीने केलं त्याचा अभ्यास जागतिक स्तरावर केला जाणार आहे. कारण जवळपास 3 लाख 84 हजार किलोमीटर लांबून वातावरण नसताना एखाद्या परग्रहावर अशी अचूकता निर्माण करण्याचं तंत्रज्ञान हे शिकणं आहे. युरोपियन स्पेस एजन्सी चे अध्यक्ष जोसेफ अॅशबॅकर यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणाले की, 

Landing of Chandrayaan-3 as an “incredible” event. “What a way to demonstrate new technologies and achieve India's first soft landing on another celestial body, “Well done. I am thoroughly impressed.”

ते असं का म्हणाले याच एक उदाहरण सांगतो, विक्रम लॅण्डर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 मीटर उंचीवर असणारं होतं तेव्हा खाली उतरण्याआधी आपल्या खाली काही धोका आहे का हे बघण्यासाठी 20 सेकंद एका ठिकाणी तंरंगणार होतं. तुम्ही पुन्हा जाऊन जर यु ट्यूब वर ते लाईव्ह बघितलं तर अगदी 149.98 मीटर वर येऊन विक्रम लॅण्डर तरंगायला लागलं. आपण 0.02 मीटर खाली आहोत हे त्याच्या कॉम्प्युटर च्या लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर च्या कॉम्प्युटर ने त्याची उंची पुन्हा 150.20 मीटर इतकी केली. हे सगळं अवघ्या 5 सेकंदात घडलं. त्या नंतर खाली कोणताही धोका नाही हे लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर ने आपला पुढला प्रवास सुरु केला. 

हे सगळं सांगण्याचं कारण इतकचं ही अचूकता आज इसरो आणि भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर मिळवली आहे. त्यामुळेच विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग हे त्या पलीकडे आहे. हे कदाचित जोसेफ अॅशबॅकर यांना जाणवलं असेल असा माझा कयास आहे. कारण यातलं आर्टिफिशियल इंटीलिजन्स च तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाने इंजिन आणि इतर सेन्सरवर मिळवलेलं प्रभुत्व आणि या सर्वांना एकत्रित आणून विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग करणारी इसरो एक लंबी रेस का घोडा तर आहेच पण हा घोडा आता शर्यतीत उतरला आहे हे त्यांना नक्की पटलं असेल. 

21 जुलै 1969 चा दिवस जसा अमेरिका, नासा आणि पर्यायाने प्रत्येक अमेरिकन माणसाच्या मानसिकतेला कलाटणी देणारा होता तसाच 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारत, इसरो आणि प्रत्येक भारतीयांच्या मानसिकतेला कलाटणी देणारा असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यावेळी पण तोच चंद्रमा नभांत होता आणि आजही तोच चंद्रमा नभांत आहे. फरक इतकाच आहे की आज त्यावर आपला झेंडा रोवणारा देश वेगळा आहे. 

जय हिंद!!!

ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Sunday 30 July 2023

'मौका सबको मिलता हैं'.... विनीत वर्तक ©

'मौका सबको मिलता हैं'.... विनीत वर्तक ©

२०१४ च वर्ष होतं जेव्हा भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत आपलं यान यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. आजवरच्या इतिहासात जे कोणत्या देशाला जमलं नाही अशी कामगिरी भारताने जगाला करून दाखवली होती. एकतर भारताने अशी कामगिरी स्वबळावर पहिल्याच प्रयत्नात करणं आणि त्यातही सगळ्यात कमी खर्चात करणं यामुळे सो कॉल्ड वेस्टर्न मिडिया ला प्रचंड मिरच्या झोंबल्या होत्या. त्याचीच भडास एका व्यंगचित्राच्या रूपाने न्यूयॉर्क टाइम्स ने प्रसिद्ध केली. भारताचा अपमान करणारं हे व्यंगचित्र जगात भारताच्या प्रगतीबद्दल किती खदखद आहे ते दाखवून तर गेलंच पण यासाठी न्यूयॉर्क टाइम्स ला उघडपणे माफी मागण्याची नामुष्की आली. अँड्र्यू रोसेन्थल, न्यूयॉर्क टाइम्सचे संपादकीय पृष्ठ संपादक यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. पण म्हणतात न, 

जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती... 

हे व्यंगचित्र काढणारे चित्रकार होते 'हेंग किम सॉंग'. जरी हे चित्रकार सिंगापूर मध्ये रहात असले तरी चीन चे नागरिक आहेत. भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाने चिनी चित्रकाराला मळमळ झाली. त्याचा द्वेष त्याच्या कुंचल्यांमधून प्रकट झाला. हे व्यंगचित्र आजही बघितल्यावर प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या व्यंगचित्रात एका बाजूला एका आलिशान रूम मधे एलाईट स्पेस क्लब मधले सदस्य बसले आहेत. ते वृत्तपत्रातील बातम्या वाचत आहेत. त्यात भारताचे यान मंगळावर पोहचल्याची बातमी आहे. त्याच रूम च्या बाहेर एका गाईला घेऊन धोतर नेसलेला एक भारतीय आत मधे येण्यासाठी दरवाजावर ठोठावत आहे. एक प्रकारे गरीबांचा आणि गाई, बैलांना घेऊन शेती करणारे भारतीय आता स्पेस क्लब चा भाग होऊ पहात आहेत अशी भारतीयांची थट्टा आणि टिंगल त्यातून दाखवली गेली होती. 

हेंग किम सॉंग तर भारताचा अपमान करणाऱ्या लोकांमधील हिमनगाचे एक टोक होतं. त्यांच्या लाईनीत बी.बी.सी.,अल-जझीरा, न्यूयॉर्क टाइम्स, फायनान्शियल टाइम्स अश्या अनेक वृत्तसंस्था आणि त्यांचे प्रतिनिधी होते. पण त्यावेळी भारताने अथवा भारताच्या वैज्ञानिकांनी त्याला कोणतंही शाब्दिक उत्तर दिलं नाही. गौतम बुद्ध म्हणतात तसं, 

"हजार लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. मग विजय तुमचाच आहे. तो तुमच्याकडून हिरावून घेता येणार नाही."

त्यामुळेच इसरो ने आपल्या कृतीतून आपण काय आहोत हे आजवर दाखवून दिलेलं आहे. याच वेस्टर्न मिडिया ची मळमळ अजून कमी झालेली नाही याची अनेक उदाहरणे देता येतील. ज्यावेळेस भारताने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून जागतिक विक्रम केला तेव्हा या वेस्टर्न मिडिया ने या उपग्रहांचं वजन फक्त १३०० किलोपेक्षा जास्त असल्याचं म्हणत असे छोटे उपग्रह कोणीही प्रक्षेपित करेल असे लेख लिहले. काही वर्षांनी जेव्हा स्पेस एक्स ने १४३ उपग्रह एकत्र सोडून इसरो चा रेकॉर्ड मोडला तेव्हा एकाही मिडिया हाऊस ने त्यांच एकत्रित वजन छापण्याची तसदी घेतली नव्हती. कारण स्पेस एक्स ने सोडलेल्या १४३ उपग्रहांचे एकत्रित वजन १००० किलोपेक्षा कमी होतं. ज्यावेळेस भारत अशी कामगिरी करेल तेव्हा वजनाचा मुद्दा पुढे रेटायचा आणि आपलं कोणी केलं कि त्याची संख्या दाखवायची. अर्थात यातून भारताबद्दल यांची असणारी मळमळ अजून जास्ती दिसून येते. 

मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थापन केल्यावर बी.बी.सी. च्या एका पत्रकाराने लाईव्ह मुलाखतीत भारतात इतके मिलियन लोकं गरीब असताना हे असले स्पेस चे खेळ का करायचे असं स्वतःच मत थोपवलं होतं. ज्यांच्यावर आम्ही १५० वर्ष राज्य केलं त्यांनी आपला देश सांभाळावा असं त्यातून दाखवून दिलं. ही मळमळ यासाठी की एकेकेळी ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य अस्ताला जात नसे त्यांचा आज स्वतःचा असा काहीच स्पेस प्रोग्रॅम नाही न त्यांनी अवकाशात जाऊन जगाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही भलं केलं आहे. आज युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यावर युनायटेड किंग्डम स्वतःच जी.पी.एस. उभारणार होता. पण त्यांची ही योजना अजून कागदावर राहिली आहे आणि त्यांचे वैज्ञानिक पळून गेले आहेत. तर दुसरीकडे भारताची आज स्वतःची नाविक प्रणाली आहे. जी नासा च्या जी.पी.एस. पेक्षा कैक पटीने सरस असल्याचं जागतिक पातळीवर मानलं गेलं आहे. 

चंद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आलेल्या अपयशानंतर याच वेस्टर्न मिडिया ने रकाने भरून भारताचं काय चुकलं आणि कसे पैसे वाया गेले यावर लेख लिहले पण या सगळ्यात भारताने काय मिळवलं आणि अश्या मोहिमांमध्ये अपयश अगदी नासा ला ही आलेलं आहे हे पद्धतशीरपणे लपवण्यात आलं. अर्थात त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा नव्हतीच. आजही जेव्हा भारताने अवघ्या ४ वर्षात पुन्हा चंद्रावर स्वारी केली आहे तेव्हा यांची मळमळ पुन्हा बाहेर यायला सुरवात झाली आहे. भारताच्या चंद्रयान ३ च्या प्रक्षेपणाबद्दल लिहताना सुरवात मात्र अमेरीका, रशिया, चीन ४ दिवसात पोहचले आणि भारताचं चंद्रयान ३ हे ४२ दिवसात पोहचण्यासाठी रवाना झालं अशी केली आहे. अर्थात त्यांची री ओढणारे भारतात ही काही कमी नाहीत. पण हे सगळे विसरता आहेत की नियती म्हणून एक गोष्ट असते आणि ती "मौका सबको देती हैं"... 

थोडे दिवस थांबा अजून आम्ही भारतीय ते व्यंगचित्र विसरलेलो नाहीत आणि कधी विसरणार पण नाही. तुम्ही व्यंगचित्रातून तुमची मळमळ बाहेर काढत रहा. आम्ही आमच्या कर्तृत्त्वाने दाखवून देऊ की, मौका सबको मिलता हैं...

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.    




Tuesday 25 July 2023

चार ते चाळीस दिवसांचा प्रवास... विनीत वर्तक ©

 चार ते चाळीस दिवसांचा प्रवास... विनीत वर्तक ©

गेल्या काही दिवसांपासून इसरो आणि पर्यायाने भारताची खिल्ली उडवणारा एक मेसेज फेसबुक आणि व्हाट्स अप च्या माध्यमातून फिरतो आहे. एकीकडे जिकडे अमेरिका, रशिया आणि चीन ची चंद्रयान ४ दिवसात चंद्रावर गेलेली आहेत. तिकडे भारताला मात्र ४० दिवस लागत आहेत. चंद्रयान आणि त्या मोहिमेतील तांत्रिक अडचणी याचा अभ्यास न करता फक्त राजकारणाच्या उद्देशाने जी चिखलफेक सुरु आहे ती नक्कीच कुठेतरी उद्दिग्न करणारी आहे. यासाठीच ही पोस्ट लिहावीशी वाटली. चार ते चाळीस दिवसांचा हा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. 

चंद्र जरी पृथ्वीवरून जवळ वाटत असला तरी पृथ्वी ते चंद्र हे अंतर सरासरी ३,८४,४०० किलोमीटर इतकं आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वी भोवती परिवलन करतो. जेव्हा आपण हे चित्र स्वरूपात बघतो तेव्हा फक्त दोन पटलांवर बघत असतो. जर तिसऱ्या पटलाचा  विचार केला तर असं लक्षात येईल की ही दोन्ही परिवलन एका सरळ रेषेत होत नसतात. आता हा झाला एक भाग पृथ्वीवरून चंद्राकडे जाण्यासाठी आपल्याला दोन गुरुरुत्वाकर्षण शक्तींनवर मात करत प्रवास करायचा असतो. पृथ्वी च गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड आहे की तुमच्या यानाचा वेग ४०,००० किलोमीटर/ तास वेग गाठावा लागतो तेव्हाच तुम्ही पृथ्वी पासून अवकाशात प्रवास करू शकता. त्याचवेळी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात अडकण्यासाठी तुम्हाला यानाचा वेग ७५८० किलोमीटर / तास इतका कमी करण्याची गरज असते. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा १/६ असल्याने वेगाचं हे गणित महत्वाचं आहे. 

कोणत्याही चंद्र मोहिमेत सगळ्यात कठीण काम आहे ते वेगाचं नियंत्रण. पृथ्वी वरून सुटण्यासाठी एकीकडे तुम्हाला ४०,००० किलोमीटर / तास वेग गाठावा लागतो. पण हा वेग गाठला तरी पृथ्वी आणि चंद्र यातलं अंतर या वेगाने आपण ९ तास आणि काही मिनिटात कापू शकू. त्याचवेळी आपल्याला ब्रेक लावून यानाचा वेग ७८५० किलोमीटर/ तास इतका कमी करायचा आहे. नाहीतर आपलं यान चंद्रा पलीकडे निघून जाईल किंवा चंद्रावर जाऊन आदळेल. आता आपण चंद्र आणि पृथ्वी यांच्या परिवलनाचा वेग लक्षात घेऊ. पृथ्वी स्वतःभोवती १६७० किलोमीटर / तास या वेगाने फिरते तर चंद्र पृथ्वीभोवती ३६८३ किलोमीटर / तास या वेगाने परिवलन करतो आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण इतकं की पृथ्वी वरून निघताना कोणत्याही यानाचा वेग आणि वेळ अतिशय अचूक असणं गरजेचं आहे. जर का यातली एकही गोष्ट थोडी जरी चुकली तर पुन्हा त्यात बदल करण्यासाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे. 

अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी विकसित केलेली रॉकेट ही जास्त शक्तिशाली आहेत. त्यामुळे हे देश पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव मोडून आपली यान थेट चंद्राकडे पाठवू शकलेले आहेत. रॉकेट जास्त शक्तिशाली करण्यासाठी आणि जास्त अंतर पार करण्यासाठी साहजिक रॉकेट बनवण्याचा खर्च जास्ती येतो. रॉकेटला जास्त इंधन वाहून न्यावं लागते. त्याची यंत्रणा तितकी सक्षम करावी लागते. या सगळ्याचा आपण पैश्याच्या स्वरूपात विचार केला तर ही रक्कम कित्येक कोटी अमेरिकन डॉलर च्या घरात जाते. या तिन्ही देशांनी हे तंत्रज्ञान आणि रॉकेट बनवण्यासाठी कित्येक कोटी डॉलर खर्च केले आणि पृथ्वीपासून चंद्राकडे अवघ्या ४ दिवसात हे देश आपलं यान पाठवू शकलेले आहेत. मग असं असताना भारताने हा मार्ग का निवडला नाही? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. तर त्यासाठी आपण भारताने वेगळा मार्ग का निवडला हे समजून घेऊ. 

भारतात आजही अवकाश क्षेत्राकडे पांढरा हत्ती असं बघणारे अनेक लोक आहेत. चंद्रावर जाण्यापेक्षा तेवढ्या पैश्यातून गरिबांचे कल्याण करता आलं असतं असा सूर आजही प्रत्येक मोहिमेनंतर आवळला जातो. कारण गरिबांना सगळं फुकट देण्याची वाईट सवय आपण लावलेली आहे. असो तर मुद्दा असा आहे की एखाद्या अवकाश मोहिमेसाठी देण्यात येणाऱ्या पैश्यावर आजही बंधन आहेत. मग कमी खर्चात चंद्रावर जायचं असेल तर थोडा लांबचा पण स्वस्त असा मार्ग निवडणं हाच पर्याय इसरो कडे होता. वर लिहिलं तसं गुरुत्वाकर्षण ही एक खूप मोठी शक्ती आहे. तिचा वापर करून आपण यान पाठवू शकतो हे इसरो  ओळखलेलं होतं. स्वस्त आणि सुरक्षित पद्धतीने यान चंद्रावर नेण्यासाठी इसरो ने स्लिंग शॉट किंवा ज्याला गोफण पद्धती म्हणतात त्याचा वापर केलेला आहे. या पद्धतीत तुमच्या यानाला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदण्याची शक्ती खुद्द पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण देते. त्यामुळे जास्त इंधन नेण्याची गरज भासत नाही. कमी शक्तिशाली रॉकेट च्या साह्याने सुद्धा आपण अपेक्षित वेग गाठून अंतराळात जाऊ शकतो. 

शेतातील पिकांवर आलेली पाखरं उडवण्यासाठी गोफणीचा वापर केला जातो. यात गोफण अतिशय वेगात गोल फिरवली जाते. गोफणीच्या वेगामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या सेंट्रिफ्युगल फोर्स (केंद्रापसारक शक्ती) मुळे त्यातील दगड अतिशय वेगात दूरवर भिरकावला जातो. अश्याच पद्धतीने इसरो ने आपलं चंद्रयान ३ हे पृथ्वीच्या लंब गोलाकार कक्षेत आपल्या रॉकेट च्या साह्याने प्रक्षेपित केलं. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरते त्या वेगाचा फायदा उचलत जेव्हा यान पृथ्वीच्या अगदी जवळ येते तेव्हा त्याची इंजिन काही वेळासाठी प्रज्वलित केली जातात. या प्रज्वलनामुळे यानाचा वेग थोडा वाढतो पण पृथ्वी भोवती कक्षेत फिरताना तिच्या १६,००० किलोमीटर / तास वेगाचा फायदा घेत यानाचा वेग कित्येक पटीने वाढला जातो. यान अजून दूरवर फेकलं जाते. आपण असं म्हणू की त्याची लंब गोलाकार कक्षा वाढत जाते. जितके वेळा यान पृथ्वी भोवती घिरट्या घालेल तितके वेळा त्याचा वेग वाढत जातो. एक क्षण असा येतो की जेव्हा यान पृथ्वी च गुरुत्वाकर्षण भेदण्याचा वेग म्हणजेच ४०,००० किलोमीटर / तास प्राप्त करते. आता गरज असते ती गोफण सोडण्याची. इतका वेळ गोलाकार फिरवून यानाला एक शेवटचा धक्का लागतो. तो दिला की यान पृथ्वी पासून कायमसाठी अंतराळात भिरकावलं जाते. यालाच तांत्रिक भाषेत ट्रान्स-लूनर इंजेक्शन (TLI) म्हणतात. 

चंद्रयान ३ ला आत्तापर्यंत ५ वेळा अश्या पद्धतीने योग्य वेळी इंजिन प्रज्वलित करून अतिशय लंब गोलाकार कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. शेवटच्या मॅन्युव्हर मधून आता त्याची कक्षा १,२७,६०९ किलोमीटर X २३६ किलोमीटर अशी झालेली आहे. याचा अर्थ चंद्रयान ३ आता पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ २३६ किलोमीटर वर असते तर सगळ्यात लांब १,२७,६०९ किलोमीटर अंतरावर जाते. हे अंतर कापताना त्याचा वेग ४०,००० किलोमीटर / तास च्या जवळपास पोहचलेला आहे. आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला पृथ्वीपासून लांब जाण्यासाठी लागणारा वेग देते आहे. साधारण १ ऑगस्ट २०२३ ला इसरो ट्रान्स-लूनर इंजेक्शन (TLI) म्हणजेच गोफणीतून दगड दूर भिरकावून देईल. याचा अर्थ चंद्रयान ३ एक तारखेला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून चंद्राकडे फेकलं जाईल. चंद्राकडे जाता जाता ते आपली दिशा उलट करेल. 

वर लिहिलं तसं चंद्राच्या गुरुरुत्वाकर्षणच्या ताकदीत बंदिस्त होण्यासाठी चंद्रयान ३ चा वेग ७८५० किलोमीटर / तास इतका कमी होणं अपेक्षित आहे. त्यासाठीच उलट झालेलं चंद्रयान ३ आता उलट दिशेने आपली इंजिन्स प्रज्वलित करेल. एका अर्थी ही इंजिन्स ब्रेक लावण्याचं काम करतील. इंजिन किती वेळ प्रज्वलित करायची याच गणित चंद्रयान ३ ला आधीच फीड केलं गेलं आहे. एकदा का वेग अपेक्षित इतका कमी झाला की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते त्याच्या भोवती परिवलन करायला सुरवात करेल. पृथ्वी वर जसा वेग आणि कक्षा वाढवण्यासाठी मॅन्युव्हर केले गेले त्याच्या अगदी विरुद्ध वेग आणि कक्षा कमी करण्यासाठी चंद्राच्या कक्षेत मॅन्युव्हर केले जातील. चंद्रयान ३ मग १०० किलोमीटर X १०० किलोमीटर च्या गोलाकार कक्षेत आलं की विक्रम लॅण्डर चा पुढला प्रवास सुरु होईल. 

आता यामुळे जरी भारताला आणि पर्यायाने इसरो ला अंतराळात कसरती कराव्या लागल्या आणि चाराचे चाळीस दिवस झाले तरी मोहिमेच्या उद्दिष्ठानवर अथवा वैज्ञानिकांच्या तांत्रिक उपलब्धी वर काहीच फरक पडणार नाही. पण खूप फरक पडेल तो मोहिमेच्या खर्चावर. आज भारताची चंद्रयान मोहीम जगातील सगळ्यात स्वस्त चंद्र मोहीम आहे. ती इसरो ने केलेल्या जुगाडांमुळेच. भले आपल्याला ४० दिवस लागतील पण चंद्रावर जाऊन भारताला  स्पर्धा करायची नाही अथवा कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. उलट भारत अश्या ठिकाणी चंद्रयान ३ उतरवतो आहे ज्याठिकाणी आजवर कोणीच गेलेलं नाही न कोणी आपले झेंडे गाडलेले आहेत. इसरो ने निवडलेली जागा अनेक कारणांसाठी विशेष आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव आजवर उपेक्षित आहे. तिकडे नक्की काय आहे याच अमेरिका सह जगातील सर्व वैज्ञानिकांना कुतूहल आहे. कारण चंद्राच्या कित्येक बिलियन वर्षाच्या इतिहासात आजवर तिकडे काय आहे हे गुलदस्त्यात आहे. 

अमेरिका, रशिया आणि चीन जरी ४ दिवसात तिकडे पोहचले. अमेरिकेने आपले १२ अंतराळवीर चंद्रावर उतरवले असले तरी जे त्यांना जमलं नाही ते भारताच्या चंद्रयान १ मोहिमेने करून दाखवलेलं आहे. चंद्रावर पाणी शोधण्याचा मान इसरो च्या या मोहिमेला मिळालेला आहे. तेव्हा चंद्रयान ३ येत्या काही दिवसात चंद्राच्या कोणत्या रहस्यांची उकल करते ते बघणं जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे ४० दिवसाचा प्रवास हा कित्येक बिलियन वर्षांची रहस्य उलगडणारा असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तेव्हा ते ४ दिवसात गेले आणि आपण ४० दिवसात याचा उपापोह करण्यापेक्षा ४० दिवसांनी काय उलगडणार आहे याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा. इसरो ची ही मोहीम यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तूर्तास व्हाट्स अप युनिव्हर्सिटी वर येणाऱ्या अश्या फॉरवर्ड न या त्यांची जागा दाखवा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Sunday 16 July 2023

अपयशातून यशाकडे (भाग २)... विनीत वर्तक ©

 अपयशातून यशाकडे (भाग २)... विनीत वर्तक ©

मागच्या भागात आपण बघितलं की चंद्रयान २ च्या मोहिमेत काय नक्की चुकीचं घडलं. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की काय चूक झाली हे शोधण्यासाठी खूप अभ्यास करावा लागला. त्याच प्रमाणे अनेक शक्यतांचा विचार करून मग नक्की काय चुकलं असेल यावर शिक्कामोर्तब केलं गेलं. इसरो ला चुका तर लक्षात आला आता त्या पुढचं पाऊल होतं ते म्हणजे आपण या चुकांतून शिकत पुढल्या मोहिमेत काय बदल करायचे?

चंद्रयान ३ मध्ये नक्की काय बदल आहेत?

चंद्रयान २ मधे आधीच्या भागात लिहिलं तसं सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे सॉफ्टवेअर प्रणाली ची. कुठेतरी सॉफ्टवेअर प्रणाली अजून सक्षम करण्याची गरज इसरो ला भासली. यात पण दोन भाग होते एकतर सॉफ्टवेअर प्रणाली च्या टॉलरन्स झोनची व्याप्ती वाढवणं आणि त्या पलीकडे जरी घटना घडल्या तरी त्या घटनांना सांभाळून पूर्ण प्रणाली हँग होणार नाही याची काळजी घेणं. त्या प्रमाणे इसरो ने चंद्रयान ३ मधील सॉफ्टवेअर प्रणाली अजून मजबूत केली आहे या प्रणाली ला देण्यात आलेला टॉलरन्स झोन ही मोठा ठेवण्यात आला आहे. पण असं करताना यानाला सॉफ्ट लँडिंग करण्यात अडचण होणार नाही याची काळजी ही घेतली गेली आहे. 

यानंतर सगळ्यात मोठा बदल केला गेला तो चंद्रयानाच्या इंजिनात. मागच्या वेळी जेव्हा चंद्रयान २ डिझाईन केलं गेलं तेव्हा त्यात ४ इंजिन होती. चंद्रावर उतरताना ती पुरेशी असतील असं आकडे सांगत होते. यासाठी इसरो चे वैज्ञानिक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने परिस्थिती निर्माण करून चंद्रयान २ कसं  काम करेल हे बघत होते. चंद्रावर अजून एक महत्वाची अडचण म्हणजे चंद्रावर असलेली धूळ. गेली अब्जोवधी वर्ष चंद्रावर ही धूळ आहे त्याच ठिकाणी वसलेली आहे. ज्यावेळेस चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यासाठी जवळ येईल तेव्हा उडालेल्या या प्रचंड धुळीमुळे चंद्राच्या इंजिनाला धोका निर्माण होईल आणि सॉफ्ट लँडिंग करण्यात अडचणी येतील असं दिसून आलं. एका सिम्युलेशन मधे ही स्थिती समोर आली तेव्हा चंद्रयान २ च्या उड्डाणाची वेळ जवळ आली होती. त्यामुळे चंद्रयान २ ची क्षमता वाढवण्यासाठी अगदी शेवटच्या मिनिटाला त्यात अजून एक इंजिन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

इसरो ने हा निर्णय घेताना अनेक जर आणि तर शक्यतांचा विचार केला. असा एखादा निर्णय घेण्यासाठी अनेकदा आपल्याला रिस्क घ्यावी लागते. कारण या निर्णया बद्दल अनेक मतांतरे खुद्द इसरो मधे होती. पण शेवटी इसरो ने ५ व इंजिन बसवण्याचा निर्णय घेतला. यामुळे हे इंजिन बसवताना इसरोला अनेक इतर बाबींवर पाणी सोडावं लागलं. कोणत्याही याना मधे सगळ्यात महत्वाचं असते ते वजन. यानावर बसवणाऱ्या प्रत्येक भाग हा काळजीपूर्वक निवडावा लागतो. कारण तो यानाच वजन वाढवत असतो. वजन जितकं जास्ती तितकं इंजिन मोठं, इंधन जास्त आणि इंधन साठवणाऱ्या टाक्या जास्त त्यामुळे इतर गोष्टींवर आपल्याला कुठेतरी एक पाऊल मागे यावं लागते. चंद्रयान २ मध्ये ५ इंजिन बसवल्यामुळे साहजिक अधिक जागा इंजिन बसवण्यासाठी लागली. तेवढंच इंधन जास्ती भरावं लागलं. पण त्यामुळे काय झालं की ५ इंजिनांमुळे प्रत्येक इंजिन्स च्या वाट्याला येणारं इंधन मर्यादित झालं. याचा परीणाम असा की उतरताना यानावर असलेल्या इंधनाच्या मर्यादेत इंजिनाचा वापर करणं गरजेचं बनलं. समजा चंद्रयान २ रस्त्यापासून भटकल किंवा थोडा वेळ त्याला हॉवर करण्यासारखी स्थिती निर्माण करायची गरज पडली तर त्यावर मर्यादा होत्या. 

चंद्रयान २ च्या ब्रेकिंग च्या वेळी असं लक्षात आलं की आधीच्या सिम्युलेशन मधे दाखवल्या प्रमाणे आणि चंद्रयान २ चा वेग कमी करून सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ४ इंजिनांची शक्ती पुरेशी आहे. त्यामुळे ५ व इंजिन बसवल्यावर होणाऱ्या फायद्यापेक्षा इतर होणारे तोटे हे जास्त आहेत. त्यामुळेच चंद्रयान ३ च्या वेळेस हे पाचवं इंजिन काढून टाकण्यात आलेलं आहे. इसरो च्या मते धुळीची किंवा इतर येणारी कोणतीही अडचण दूर करायला ४ इंजिन पुरेशी आहेत. आता ५ व इंजिन गेल्यामुळे झालं काय की चंद्रयान ३ च्या डिझाईन मधे इंजिन गेल्यामुळे रिकामी झालेल्या जागेत इतर उपकरणं बसवता आली. याशिवाय सगळ्यात मोठा फायदा झाला वजनाचा. एका इंजिनाच वजन काही शे किलोग्रॅम मध्ये असल्याने आता काही शे किलोग्रॅम वजन इतर ठिकाणी वाढवता येणार होतं. त्यामुळेच चंद्रयान २ चे पाय जे की २ मीटर / सेकंद वेगाने सॉफ्ट लँडिंग करण्यात सक्षम होते. ते आता चंद्रयान ३ मधे ३ मीटर / सेकंद वेगाने सॉफ्ट लँडिंग करण्यास सक्षम झालेले आहेत. आपल्यासाठी हा फरक १ मीटर / सेकंद असा छोटा वाटला तरी एखाद्या यानाच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे. 

या मजबूत झालेल्या पायांमुळे अजून अधिक उंचीवरून जरी चंद्रयान ३ खाली आदळलं तरी त्याचे पाय हा धक्का सहन करण्यास सक्षम आहेत. तश्या चाचण्या गेली २ वर्ष इसरो ने घेतलेल्या आहेत. दगड धोंढ्यांवर चंद्रयान ३ आदळवून इसरो ने चंद्रयान ३ च्या पायाच्या भक्कमतेच्या चाचण्या घेतल्या आहेत. वजन कमी होण्यामुळे अजून एक झालेला फायदा म्हणजे जास्त इंधन घेऊन जाण्यासाठी जागा मिळाली. याचा अर्थ चंद्रयान ३ वर जास्त इंधन भरलेलं आहे. चंद्रयान ३ मध्ये  जर का गरज लागली तर जास्त इंधन असल्यामुळे वैज्ञानिकांना योग्य तो निर्णय घेता येईल. वजन कमी झाल्याचा अजून एक फायदा म्हणजे चंद्रयान ३ मध्ये अजून कॅमेरे आणि सेन्सर बसवता आले. याशिवाय चंद्रयान ३ चे सौर पॅनेल मोठे करण्यात आले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्य प्रकाश अतिशय कमी पोहचतो. सूर्य अगदी क्षतिजावर उगवतो. त्यामुळे अगदी कमी प्रकाशात सुद्धा हे सौर पॅनल चंद्रयान ३ ला लागणारी ऊर्जा निर्माण करू शकणार आहेत. 

चंद्रयान ३ ला चंद्रावर उतरण्यासाठी सॉफ्टवेवर प्रणाली ला ४ किलोमीटर X २.५ किलोमीटर चा भाग देण्यात आलेला आहे. याचा अर्थ एवढ्या मोठ्या क्षेत्रफळात कुठेही चंद्रयान ३ सॉफ्ट लँडिंग करायची मुभा कॉम्प्युटर ला देण्यात आलेली आहे. चंद्रयान २ च्या वेळेस हा टॉलरन्स झोन फक्त ५०० मीटर X ५०० मीटर इतकाच होता . इतक्या मोठ्या टॉलरन्स झोन मुळे सॉफ्टवेअर प्रणाली हँग होण्याची कमीत कमी शक्यता आहे. चंद्रयान ३ हे इसरो अध्यक्षांच्या मते आपण कुठे अपयशी होऊ शकतो हे लक्षात घेऊन बनवलं गेलं आहे आणि त्यात बदल केले गेले आहेत. ज्याला फ्लॉ लेस म्हणतात ते करण्याचा इसरो ने प्रयत्न केलेला आहे. जिकडे जिकडे अपयश येण्याची शक्यता होती किंवा जिकडे जिकडे इसरो कडून काही चुका झाल्या होत्या त्या प्रत्येक बाबीचा अभ्यास करून त्यानुसार चंद्रयान ३ ला बनवलं गेलं आहे. 

सगळा विचार केला तरी शेवटी हे रॉकेट सायन्स आहे. आपण एका वेगळ्या ग्रहावर आपलं यान उतरवत आहोत. त्यामुळे अश्या अनेक गोष्टी घडू शकतील ज्यावर आपलं नियंत्रण असणार नाही. इसरो ने जरी सगळ्या शक्यतांचा विचार केला तरी शेवटी काही गोष्टी त्यांच्या हाताबाहेर आहेत. त्यासाठीच आपल्या विश्वात जी एक शाश्वत ऊर्जा आहे तिच्यावर आपण सर्व सोपवून देतो. इसरो चे वैज्ञानिक तिरुपती बालाजी च्या देवळात गेले यावर दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांनी आधी स्वतः रॉकेट सायन्स काय असते हे समजून घेण्याची गरज आहे. ते देवळात गेले म्हणून मिशन यशस्वी होत नाही आणि ते देवळात नाही गेले तर मिशन अयशस्वी होईल असं ही काही नाही. पण जिकडे मानवाची क्षमता संपते तिकडे त्या शाश्वत ऊर्जेचा प्रवास सुरु होतो. तो प्रवास ईश्वराच्या रूपाने सगळीकडेच असतो मग तो नासा च्या मिशन ला आशीर्वाद देणारा पादरी असो वा तिरुपती बालाजी असो. तुम्ही आपलं कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करून त्या उर्जेवर सर्व सोपवून देता. 

येत्या २३ किंवा २४ ऑगस्ट २०२३ ला जेव्हा चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँड करेल तेव्हा एका प्रवासाने आपला प्रवास पूर्ण केलेला असेल. इसरो ला चंद्रयान ३ च्या पुढल्या सर्व टप्यांसाठी खूप खूप शुभेच्छा!!. चंद्रयान ३ मोहीम नक्कीच यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!!

समाप्त. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Saturday 15 July 2023

अपयशातून यशाकडे... विनीत वर्तक ©

 अपयशातून यशाकडे... विनीत वर्तक ©

१४ जुलै २०२३ रोजी इसरो च्या चंद्रयान ३ ने यशस्वी उड्डाण केलं. या यशस्वी उड्डाणानंतर वेध लागले आहेत ते चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग करण्याचे. चंद्रयान २ मधे सॉफ्ट लँडिंग करताना आलेल्या अपयशामागे नक्की काय कारण होतं? चंद्रयान ३ मध्ये नक्की काय बदल केले गेले आहेत? चंद्रयान २ सॉफ्ट लँडिंग करताना सॉफ्टवेअर मधे नक्की काय गडबडी झाली? चंद्रयान २ आणि चंद्रयान ३ यामध्ये बाहेरून जास्ती बदल दिसत नसताना वैज्ञानिक मात्र यावेळेस आपण १००% सॉफ्ट लँडिंग करू असं कोणत्या भरवश्यावर सांगत आहेत? इसरो ने मागच्या ४ वर्षात काय केलं? हे सगळं समजावून घेतलं तरच इसरो चा अपयशातून यशाकडे होणारा प्रवास आपल्याला समजणार आहे. यातल्या काही प्रश्नांची उत्तर सोप्या भाषेत या पोस्ट च्या सिरीज मधून देणार आहे. 

चंद्रयान २ मध्ये नक्की काय चुकलं?

चंद्रयान २ च्या आधी इसरो आणि इसरो च्या वैज्ञानिकांना एखाद्या दुसऱ्या ग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव नव्हता. आजवर आपण एखाद्या ग्रहाच्या कक्षेत यान यशस्वी प्रक्षेपित केलेली होती. मग ती पृथ्वी असो वा चंद्र किंवा मंगळ. पण प्रत्यक्षात एखाद्या ग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव इसरो ला नव्हता. आता ६ सप्टेंबर २०१९ च्या रात्री नक्की काय घडलं ते आपण सोप्या भाषेत समजावून घेऊ. 

एखादं यान किंवा वस्तू कोणत्याही ग्रहावर दोन पद्धतीने उतरवता येते. एक म्हणजे हार्ड लँडिंग ज्यात त्या वस्तूचा पृष्ठभागावर स्पर्श होताना वेग नियंत्रित केलेला नसतो. दुसरं म्हणजे सॉफ्ट लँडिंग ज्यात यान किंवा त्या वस्तूचा वेग मर्यादित करून त्याला एखाद्या पृष्ठभागावर उतरवणं. ( सोप्या भाषेत पॅराशूट ने जमिनीवर उतरण आणि पॅराशूट शिवाय जमिनीवर आदळण. आता तुम्हाला लगेच समजेल की या दोन्ही गोष्टीने आपल्याला कोणत्या पद्धतीने इजा होईल.) चंद्रयान २ हे सॉफ्ट लँडिंग पद्धतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होतं. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर त्याची हळू हळू करत कक्षा कमी केली गेली. ६ सप्टेंबर २०१९ च्या रात्री त्याने आपल्या कक्षेतून चंद्राकडे जाण्यासाठी आपल्या इंजिनाच्या साह्याने झेप घेतली. चंद्रयान २ त्यावेळेस तब्बल ६००० किलोमीटर / तास वेगाने चंद्राची प्रदक्षिणा करत होतं. चंद्रयाना वर असलेल्या ५ इंजिनांना त्याचा वेग ७.२ किलोमीटर / तास इतका कमी करायचा होता. एक प्रकारे इंजिन विरुद्ध दिशेला चालवून ब्रेक मारायचा होता. आता हे ब्रेकिंग करताना ही एका विशिष्ठ वेगाने करायचं होतं. याचे मापदंड चंद्रयान २ च्या मेंदूत म्हणजे त्यावर असलेल्या कॉम्प्युटर वर लोड केले गेले होते. 

चंद्रयान २ च्या कॉम्प्युटर ला नुसता वेग कमी करायचा नव्हता तर त्या सोबत इतर अनेक गोष्टी करायच्या होत्या. अमुक एका उंचीवर अमुक एक वेग हे समीकरण जुळवून आणायचं होतं. त्याला जी जागा सांगितली होती त्याच जागेवर ते यान उतरेल हे बघायचं होतं. हे करत असताना त्यावर असलेल्या सेन्सर आणि कॅमेरा मधून मिळणाऱ्या माहितीचं विश्लेषण करून त्याप्रमाणे निर्णय घ्यायचे होते. या सगळ्या प्रक्रिया अतिशय वेगात करायच्या होत्या. कारण एक सेकंदाची चूक आणि सगळच चुकलं असतं. चंद्र आपल्यापासून सरासरी सुमारे ३.८४ लाख किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पृथ्वीवरून आपण दिलेला संदेश जायला ३ सेकंदाचा कालावधी लागतो. त्या ३ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं असतं. यासाठीच सर्व जबाबदारी आणि स्वायत्तता ही चंद्रयान २ च्या कॉम्प्युटर ला इसरो ने दिलेली होती. याचा अर्थ काय की काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर तो कॉप्युटर त्याच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेण्यास समर्थ असेल त्यावर इसरो च्या वैज्ञानिकांचे बंधन असणार नाही. 

चंद्रयान २ जेव्हा ६ सप्टेंबर २०१९ ला चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावले तेव्हा त्यावर असणारी ५ इंजिने प्रज्वलित होऊन त्याचा वेग कमी करायला लागली. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही इंजिन व्हेरिएबल थ्रस्ट निर्माण करणारी होती. याचा अर्थ काय तर इंजिनाच्या क्षमतेच्या ४०%, ६०%, ८०% आणि १००% प्रमाणे इंजिन्स थ्रस्ट निर्माण करत होती. ( आपल्या कार मधे ज्याप्रमाणे एक्सलेटर असते. ते जास्त दिलं की कार जोरात पळते. कमी दिलं की कार हळू होते. आता एक्सलेटर मधे कमीत कमी आणि जास्तीत जास्त असे टप्पे नसतात. ड्रायव्हर आपल्या मर्जीप्रमाणे ते बदलू शकतो. पण आपल्या घरात असणाऱ्या पंख्याचा स्पीड मात्र अनेकदा आपण ० ते ५ अश्या स्थितीत बदलू शकतो. किंवा आपल्या मिक्सर चा स्पीड पण आपण ० ते ३ किंवा ० ते ५ अश्या टप्यात बदलू शकतो.) हे सर्व सांगण्याचं कारण इतकच की कॉम्प्युटर ला समजा ५०% क्षमतेने इंजिन चालवायचं असेल तर त्याच्याकडे पर्याय उपलब्ध नव्हता. एकतर त्याने ४०% चालवायचं किंवा ६०% टक्के. त्याप्रमाणे मग इतर इंजिनांचा वेग मर्यादित करायचा. चंद्रयान २ चा वेग कमी करत असताना त्याची उंची पण कमी होत होती. चंद्रयान २ मधील कॉम्प्युटर हा सतत उंची आणि वेग यांच गुणोत्तर समान ठेवण्याचा प्रयत्न करत होता. इंजिन चा थ्रस्ट सतत कमी जास्त करून त्याला प्रोग्रॅम केलेल्या गणितात बसवत होता. 

चंद्रावर वातावरण नाही. पण चंद्राच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर उंचीवर एक प्रकारचं आवरण असल्याचा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. हे सांगायचं कारण की पृथ्वीवर आपण कितीही वेळा इंजिन टेस्ट केली असली तरी प्रत्यक्षात ती काय परफॉर्मन्स देतात यात कमी- जास्त होऊच शकते. याला आपण इंजिनांचा टॉलरन्स झोन म्हणू. इंजिन ४०% क्षमतेने असेल म्हणजे ते प्रत्यक्षात ३५% ते ४५% अश्या कोणत्याही टॉलरन्स झोन मध्ये परफॉर्मन्स देत असेल. हा परफॉर्मन्स प्रत्येक क्षणाला बदलण्याची शक्यता गृहीत धरलेली असते. तर या ४ इंजिनांनी अतिशय योग्य तर्हेने काम करत चंद्रयान २ चा वेग आणि उंची टॉलरन्स झोन मधे ठेवत जवळपास ४ किलोमीटर ची उंची गाठली असावी. याच वेळी चंद्रयान २ चा हार्ड ब्रेकिंग फेज संपून स्मूथ ब्रेकिंग चा फेज सुरु झाला. यात कमी झालेला स्पीड अजून कमी हळुवार करून हळूहळू उंची कमी करायची होती. याचवेळेस चंद्रयान २ वरील कॅमेरा चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो आणि आपलं स्थान लक्षात घेऊन योग्य तो बदल करणार होता. ज्यामुळे आपण ठरवलेल्या योग्य ठिकाणी ते चंद्रावर उतरेल. 

हे सगळं होत असताना चंद्रयान २ च्या कॉम्प्युटर ला असं लक्षात आलं की इंजिनांनी जास्त थ्रस्ट दिल्यामुळे इंजिनाचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त कमी झाला होता. हा वेग कॉम्प्युटर ला आखून दिलेल्या टॉलरन्स झोनच्या बाहेर होता. तसा होताच कॉम्प्युटर चा गोंधळ म्हणजेच सॉफ्टवेअर प्रणाली मध्ये गोंधळ निर्माण झाला. वेग वाढवण्यासाठी कॉम्प्युटर ने इंजिनाची क्षमता तात्काळ कमी केली. इंजिनाने निर्माण केलेला थ्रस्ट कमी होताच चंद्रयान २ वेगाने चंद्राच्या पृष्ठभागाकडे जाऊ लागलं. तिकडे चंद्राच्या कॅमेरा आणि सेन्सर ने आपण आपल्या निश्चित जागेपासून भटकत चाललो असल्याचं कॉम्प्युटर ला कळवलं. यामुळे कॉम्प्युटर च्या मेंदूवर म्हणजेच प्रणालीमध्ये अजून गोंधळ झाला. आता हे निस्तरू का ते निस्तरू हे न समजल्यामुळे कॉम्प्युटर ची प्रणाली हँग झाली. ज्या प्रमाणे आपला लॅपटॉप हँग होतो किंवा फोन हँग होतो. एकदा का या गोष्टी हँग झाल्या की रिस्टार्ट करणं हा एकच उपाय आपण करतो. पण चंद्रयान २ मध्ये रिस्टार्ट होण्यासाठी वेळ ही नव्हता आणि तशी व्यवस्था ही नव्हती. साधारण २.१ किलोमीटर चंद्राच्या पृष्ठभागापासून लांब असताना सॉफ्टवेअर प्रणालीत झालेल्या गोंधळामुळे चंद्रयान २ च नियंत्रण पूर्णपणे कॉम्प्युटर ने गमावलं आणि त्याचा इसरो शी असलेला संपर्क ही तुटला आणि चंद्रयान २ ने चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग किंवा ते कोसळलं.  

हे सगळं अवघ्या काही सेकंदात झालं. काही कळायच्या आत १४० कोटी भारतीयांच स्वप्न चक्काचूर झालं. चंद्रयान २ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण केल्यावर इसरो ला नक्की काय चुकलं याचा अंदाज आला. त्यातील दोन, तीन महत्वाच्या चुका आपण जाणून घेऊ. 

१) 'टॉलरन्स झोन' जो चंद्रयान २ च्या कॉम्प्युटर ला दिला गेला होता तो अतिशय कमी होता. आपलं लँडिंग परफेक्ट आणि एकदम अचूक करण्यासाठी हा झोन कमी ठेवला गेला. टॉलरन्स झोन कमी असल्यामुळे जेव्हा गोष्टी याच्या बाहेर गेल्या मग तो वेग असो व उंची किंवा इतर पॅरामीटर. चंद्रयान २ वरील कॉम्प्युटर प्रणाली गोंधळून गेली आणि अश्या स्थितीत योग्य तो निर्णय घेण्यास कमी पडली. 

२) चंद्रयान २ मध्ये शेवटच्या क्षणाला ५ व इंजिन बसवलं गेलं होतं. पण प्रत्यक्षात विक्रम लॅण्डर वरील ४ इंजिन त्याला योग्य पद्धतीने उतरवण्यास सक्षम होती. ५ व्या इंजिनामुळे जास्त थ्रस्ट निर्माण झाला. त्यामुळे कॉम्प्युटर प्रणालीत गडबडी झाली तसेच इंजिनाचा थ्रस्ट योग्य राखण्यासाठी स्मूथ पद्धतीने करण्याची मुभा कॉम्प्युटर कडे हवी होती. ( याचा अर्थ ४०% ते १००% यामधील कोणत्याही ठिकाणी इंजिन क्षमता वापरण्याची मुभा) त्याने अधिक चांगल्या पद्धतीने चंद्रयान २ चा ताळमेळ राखला गेला असता. 

३) तिसरी गोष्ट म्हणजे की चंद्रयान जिकडे चंद्रावर उतरणार त्या जागेचा टॉलरन्स झोन वाढवण्याची गरज होती. याचा अर्थ कॉम्प्युटर ला मोठ्या जागेत चंद्रयान उतरवण्याची मुभा द्यायला हवी होती. ज्यामुळे अगदी शेवटच्या क्षणात पिन पॉईंट करण्याच्या नादात कॉम्प्युटर प्रणालीत गोंधळ झाला नसता . 

याशिवाय अनेक अश्या चुका आणि गोष्टी होत्या ज्या इसरो शिकली. या मोहिमेला एक अनुभव मानत इसरो ने झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी काय काय पावलं चंद्रयान ३ मध्ये टाकली ते आपण बघू या सिरीज च्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

 सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Friday 14 July 2023

प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न... विनीत वर्तक ©

 प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न... विनीत वर्तक ©

आज १४ जुलै २०२३ रोजी भारताच्या चंद्रयान ३ ला घेऊन एल.व्ही.एम. ३ / एम ४ रॉकेट ने यशस्वी उड्डाण भरलं आणि पुन्हा एकदा भारताने चंद्रावर स्वारी केली आहे. भारतासाठी आणि भारतीयांसाठी ही मोहीम खूप महत्वाची आहे. साधारण ४ वर्षापूर्वी म्हणजेच २२ जुलै २०१९ ला भारताच्या चंद्रयान २ यानाला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँड करण्यात अपयश आलं. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २.१ किलोमीटर उंचीवर असताना इसरो चा यानाशी संपर्क तुटला आणि चंद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळलं. त्याचे तुकडे होऊन ते विखुरले गेले. हा क्षण इसरो आणि समस्त भारतीयांसाठी खूप क्लेशदायक होता. इसरो चे तत्कालीन अध्यक्ष के. सिवान यांच्यासह तिकडे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आलेल्या अपयशाचं दुःख दिसत होतं. भारताचे पंतप्रधान या ऐतिहासिक क्षणासाठी तिकडे उपस्थित होते. पण त्यांच्यावर या सर्वाना धीर देण्याची आणि अपयशाने खचून न जाता पुन्हा एक नवीन सुरवात करण्याची जबाबदारी आली. 

इसरो चे तत्कालीन अध्यक्ष के. सिवान यांना अश्रू आवरले नाहीत आणि पंतप्रधानांच्या समोरच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी भारताच्या पंतप्रधानांनी केलेल्या सांत्वनाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. समाजात अतिशय उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीसुद्धा शेवटी माणूस असतात. त्यांना ही भावना असतात आणि त्या प्रत्येकवेळी लपवता येतात असं नाही. भारताच्या चंद्रयान २ मोहिमेचं अपयश जिव्हारी लागणारं होतं. त्यामुळेच अश्या उच्च पदावर असणाऱ्या लोकांच्या मधला एक सर्वसामान्य भारतीय माणूस अनेकांनी त्यावेळी बघितला. ते क्षण प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेले. कुठेतरी हे अपयश भावनिक पातळीवर प्रत्येक भारतीयाला टोचलं होतं. या घटनेच्या वेळी वैज्ञानिकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले होते, 

"माझ्या प्रिय मित्रांनो, अंतिम निकाल जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा प्रवास आणि प्रयत्न आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की मेहनत सार्थकी लागली आणि प्रवासही तसाच होता. "आमच्या टीमने खूप मेहनत केली, खूप दूरचा प्रवास केला आणि त्या शिकवणी कायमच राहतील. जेव्हा आपण मागे वळून बघू तेव्हा आपण घेतलेल्या मेहनतीचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल."

"विज्ञान कधी थांबत नाही. परीणाम काहीही येवो विज्ञान नेहमीच आपल्याला प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करत राहते." 

आज पुन्हा एकदा त्याच प्रयत्नांच्या जोरावर भारताने चंद्राकडे भरारी घेतली आहे. मागे झालेल्या चुकांतून शिकत, त्या चुका पुन्हा न करण्याच्या इराद्याने इसरो ने आज चंद्राकडे पाऊल टाकलं आहे. हे रॉकेट सायन्स आहे. इकडे अगदी लहानताली लहान चूक पण भारी पडू शकते. ज्या सगळ्या परीक्षा चंद्रयान २ ला द्याव्या  लागल्या होत्या त्याच सगळ्या चंद्रयान ३ ला द्यावा लागणार आहेत. प्रत्येक क्षणाची उजळणी एकदा नाही तर कित्येकदा केली गेली आहे. मागच्या मोहिमेत आलेल्या प्रत्येक गोष्टीला इसरो ने अनुभवात बदललेलं आहे. 

त्यामुळेच आजचं यशस्वी उड्डाण ही एक सुरवात आहे. १४० कोटी लोकांच स्वप्न घेऊन चंद्रयान ३ चंद्राकडे आज झेपावले आहे. मला विश्वास आहे की यावेळेस आपण चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करू. भारत जगातील चंद्रावर यान उतरवणारा चौथा देश ठरेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा जगातील पहिला देश ठरेल. या शिवाय चंद्रावर जाण्यासाठी भारताने आणि पर्यायाने इसरो ने केलेला खर्च हा सगळ्यात कमी आहे. मंगळयाना प्रमाणे चंद्रयान ३ स्पेस क्षेत्रात भारताला कलाटणी देणारी मोहीम आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

इसरो च्या सर्व वैज्ञानिक, अभियंते, कामगार, प्रायव्हेट संस्था आणि इतर सर्व लोकांचं मनापासून अभिनंदन आणि चंद्रयान ३ च्या पुढल्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.