Tuesday 29 December 2020

मराठवाड्याचे डब्बे... विनीत वर्तक ©

 मराठवाड्याचे डब्बे... विनीत वर्तक ©

मराठवाडा म्हणजेच मराठी लोकांचं घर. निजामाच्या काळात मराठी लोकांनी वस्ती केली, तो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जाऊ लागला. आज मराठवाडा महाराष्ट्र राज्याचा भाग आहे. मराठवाड्यात आज महाराष्ट्राचे ८ जिल्हे येतात. ६४,५९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा भाग भारतीय रेल्वेसाठी एक मैलाचा दगड सिद्ध झाला आहे. त्याला कारण आहे, इकडे बांधण्यात आलेली भारतीय रेल्वेची मराठवाडा कोच फॅक्टरी.

भारतीय रेल्वे जगातील चौथं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. एकट्या २०१९ या वर्षात भारतीय रेल्वेने तब्बल ८.४४ बिलियन लोकांची ने-आण केली आहे. हा आकडा संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजेच एका वर्षात भारतीय रेल्वेनं संपूर्ण जगाला ने-आण केलं आहे. याच काळात भारतीय रेल्वेने १.२३ बिलियन टन वजनाच्या सामानाचीसुद्धा ने-आण केली आहे. भारतीय रेल्वेच्या १३,५५३ ट्रेन, रोज ७३२१ स्टेशनवरून प्रवाशांचं दळणवळण करतात. याशिवाय ९१४६ सामान नेणाऱ्या गुड्स ट्रेन सामानाचं दळणवळण करतात. हे आकडेच आ वासवणारे आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात लोक आणि सामानांची दळणवळण व्यवस्था बघण्यासाठी भारतीय रेल्वेला तितक्याच प्रमाणात इंजिन, डब्बे आणि इतर साहित्य लागते. भारतीय रेल्वेकडे सध्या ७४,००० पेक्षा जास्ती पेसेंजर ट्रेनचे डब्बे, तर २,८९,१८५ पेक्षा जास्ती सामान वाहून नेणारे डब्बे आहेत. पण संपूर्ण जगाच्या लोकसंख्येइतकं दळणवळण प्रत्येक वर्षी करणाऱ्या रेल्वेला ही संख्या अपुरी पडते. त्याचसाठी भारतीय रेल्वेने ही गरज भागवण्यासाठी महाराष्ट्रातील लातूर इकडे डब्बे बनवण्याचा कारखाना काढण्याच्या योजनेला मूर्त स्वरूप दिलं.

भारतीय रेल्वे पहिल्यांदा असा कारखाना बांधत होती असं नाही पण महाराष्ट्राच्या दृष्टीने हा पहिला कारखाना असणार होता. फेब्रुवारी २०१८ ला या योजनेचा ठराव मंजूर झाला. एप्रिल २०१८ मध्ये या कामाचं भूमिपूजन झालं तर नोव्हेंबर २०१८ ला कामाला सुरूवात झाली. नोव्हेंबर २०१८ ते डिसेंबर २०२० मध्ये या कारखान्यात रेल्वेसाठी पहिला डब्बा तयार झाला आहे. या कारखान्याच्या उभारणीसाठी ५०० कोटी रुपये खर्च आला आहे, तर १२० कोटी रुपये जमीन अधिग्रहण करण्यासाठी खर्च झाले आहेत. सुरूवातीला वर्षाला २५० डब्बे बनवण्याची ह्या कारखान्याची क्षमता असणार आहे, तर पुढे जाऊन ती वाढवण्यात येणार आहे. ३५० एकर जागेवर हा कारखाना असून सर्व सोयी आणि सुविधांनी युक्त आहे.  ह्या कारखान्याची निर्मिती करताना पर्यावरणाचं भान ठेवण्यात आलेलं आहे. कारखानाच्या छतावर सौर पॅनल बसवण्यात आले असून, त्यातून ८०० किलोवॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे. तर १०,००० झाडांची लागवड करण्यात आली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सारखे प्रकल्प ही या कारखान्याचा भाग आहेत.

आजवर भूमिपूजन झालेले अनेक सरकारी प्रकल्प एकतर बासनात बांधले गेले. जे तयार झाले, त्यांच्या निर्मितीमध्ये इतका वेळ गेला, की त्या प्रकल्पाची किंमत दुप्पट, तिप्पट झाली. चालू झालेले सरकारी प्रकल्प पूर्ण झाल्यावरही लाल फितीत अडकले. अश्या काळात मराठवाड्यातील या रेल्वे कोच फॅक्टरीचा, कागदावरच्या आराखड्यापासून ते प्रत्यक्षात उतरण्यापर्यंतचा झालेला प्रवास अतिशय वेगात आणि लक्षणीय असा झालेला आहे. या फॅक्टरीमधून निघणारे डब्बे येत्या काळात भारतीय रेल्वे आणि भारतीयांचा भार वाहून नेणार आहेत. पुढल्या वेळेस भारतीय रेल्वेने प्रवास करताना कदाचित तुम्ही, आम्ही याच मराठवाड्यात तयार झालेल्या डब्या मधून प्रवास करत असू.

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 27 December 2020

'रतन टाटा' एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व… विनीत वर्तक ©

 'रतन टाटा' एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व… विनीत वर्तक ©

२१ जानेवारी २००७ ला दिल्ली च्या कार एक्स्पो मध्ये टाटा नॅनो च अनावरण करताना भावनिक होऊन रतन टाटा म्हणाले होते,

“A Promise is a Promise”

पावसाळ्यात स्कुटर वरून आपल्या कुटुंबाला नेताना एका माणसाला बघून रतन टाटा मनातून अस्वस्थ झाले. प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या भारतातील आज अशी अनेक कुटुंब आहेत जी सुरक्षितरित्या प्रवास करू शकत नाहीत. रतन टाटा ह्यांनी मनातून ठरवलं की आपण अश्या लोकांसाठी काय करू शकतो? त्यांनी ठरवलं की आपण अशी कार बनवायची की जी भारतातील मध्यमवर्ग खरेदी करू शकेल. १ लाखात कार देण्याचं आपलं वचन त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं ते फक्त आणि फक्त भारतीयांसाठी. टाटा नॅनो ने टाटा ला कधीच फायदा दिला नाही  ( २०१९ मध्ये टाटा नॅनो ची एकही कार ऑर्डर नसल्यामुळे तयार केली गेली नाही. ) उलट टाटा ग्रुप ला ह्या प्रकल्पामुळे खूप नुकसान उचलावं लागलं पण रतन टाटा ह्यांनी आपला दिलेला शब्द पाळला.

१९९८ मध्ये रतन टाटा नी भारतात 'इंडिका' कार आणली. पण ही कार लोकांच्या पसंतीस उतरली नाही. कार क्षेत्रातून टाटा नी मागे फिरावं हा सल्ला अनेकांनी रतन टाटांना दिला. हा सल्ला ऐकून रतन टाटा अमेरीकेतील डेट्रॉईट इकडे आपली कंपनी विकण्यासाठी अमेरीकेच्या फोर्ड कंपनीच्या मुख्यालयात गेले होते. ह्या मिटिंग मध्ये फोर्ड चे अध्यक्ष बिल फोर्ड ह्यांनी रतन टाटांचा अपमान केला. बिल फोर्ड म्हणाले होते,

"तुम्हाला ह्या कार बिझनेस मधलं कळत नसताना कशाला ह्यात उतरतात, ही कंपनी जर आम्ही विकत घेतली तर आम्ही तुमच्यावर उपकार करू". 

बिल फोर्ड ह्यांचे शब्द रतन टाटांना खुप लागले. भारतात परतल्यावर त्यांनी इंडिका विक्रीचा आपला विचार रद्द केला आणि इंडिका ला भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिलं. रतन टाटांनी आपली कंपनी न विकता लहान गाड्यांच्या उत्पादनात खुप मोठी मजल मारली. बरोबर दहा वर्षानंतर काळाचे फासे उलटे पडले. २००८ साली आता फोर्ड कंपनी आर्थिक गटांगळ्या खात होती. टाटा ग्रुप ने त्यांचे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड खरेदी करण्यात उत्सुकता दाखवली. फोर्ड कंपनीला पैश्याची प्रचंड गरज होती. आता तेच बिल फोर्ड अमेरीकेतून मुंबईत 'बॉम्बे हाऊस' ह्या टाटा ग्रुप च्या मुख्यालयात आपली कंपनी विकण्यासाठी दाखल झाले. टाटा ग्रुप ने जगात अतिशय नावाजलेले आणि प्रतिष्ठा असणारे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड तब्बल २.३ बिलियन अमेरीकन डॉलर ( ९३०० कोटी रुपये) देऊन खरेदी केले. बिल फोर्ड ह्यांनी जरी आपली पायरी सोडली असली तरी रतन टाटांनी आपली पायरी एक पाऊल उंचावर नेताना त्यांचा अपमान केला नाही. रतन टाटांनी न बोलता बिल फोर्ड ह्यांनी केलेल्या अपमानाचा बदला आपल्या कृतीतून घेतला. त्या वेळेस बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले होते,

"आज जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले." 

एकेकाळी ब्रिटिशांनी आपला चहा जगभर नेला. चहाची ओढ पूर्ण जगाला लावणाऱ्या ह्या चहाच्या निर्मितीची सूत्र ब्रिटिशांकडे होती. टेटली हा ब्रँड युरोप ,कॅनडा  प्रथम क्रमांकाचा तर अमेरीकेत दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड होता. भारताला एकेकाळी हिणवणाऱ्या ब्रिटिशांच्या हातातून टाटा ग्रुप ने तब्बल २७१ मिलियन पौंड मोजत २००० साली ह्या ग्रुप ची मालकी आपल्याकडे घेतली. आज टाटा ग्लोबल बेव्हरेजेस जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. २००७ मध्ये टाटा स्टील ही जगात स्टील चं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ५६ व्या स्थानावर होती. आपल्यापेक्षा ४ पट मोठ्या असणाऱ्या डच कंपनी 'कोरस' ला टाटा ग्रुप ने ८.१ मिलियन डॉलर ला खरेदी केलं. संपुर्ण भारताच्या जेवणाला चव आणणाऱ्या आयोडीन युक्त मिठाची सुरवात टाटांनी केली. भारतातील मिठाची उलाढाल २२ बिलियन रुपयांची आहे. त्यातील १७% हिस्सा टाटांचा आहे. ज्या वेळेस कॉम्प्यूटर ची पायमुळ भारतात रोवली नव्हती त्यावेळेस १९६८ साली टी. सी. एस. ची स्थापना टाटांनी केली. आज जगातील पहिल्या ४ आय. टी. कंपन्यांमध्ये तिची गणना होते. ३.५ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि ८० बिलियन डॉलर इतक मार्केट कॅपिटल असणारी टी. सी. एस. भारतातील अग्रणी आय.टी. कंपनी आहे.

वय वर्ष २१ ज्या काळात एका नवीन स्वप्नांची सुरवात होते त्या काळात रतन टाटा ह्यांच्या खांद्यावर टाटा ग्रुप ची जबाबदारी आली. पुढल्या अडीच दशकात रतन टाटा नी टाटा ग्रुप च नाव फक्त भारतापुरता मर्यादित ठेवलं नाही तर त्याला जागतिक बनवलं. रतन टाटा ह्यांनी जगातील नावाजलेले ब्रँड टाटा ग्रुप च्या पंखाखाली आणले आहेत. ज्यामध्ये टेटली, जॅग्वार, लँड रोव्हर, कोरस अश्या जगातील नावाजलेल्या ब्रँड चा समावेश आहे. त्यांच्या हाताखाली टाटा ग्रुप चा नफा तब्बल ५०% नी वाढला. आज टाटा ग्रुप कंपनीची उलाढाल १०६ बिलियन अमेरीकन डॉलर च्या घरात आहे. टाटा ग्रुप मध्ये सद्य घडीला ७ लाख ५० हजार पेक्षा जास्ती लोक जगभर काम करतात. मिठापासून ते कॉम्प्युटर आणि हॉटेल पासून ते कार पर्यंत प्रत्येक क्षेत्रात टाटांचा दबदबा आहे. धंदा करून नुसता नफा न मिळवता आपल्या कर्तृत्वाने रतन टाटांनी टाटा ह्या शब्दाला वजन प्राप्त करून दिलं आहे. आज अब्जावधी रुपयांच साम्राज्य असताना सुद्धा रतन टाटांनी जोडलेली माणसं आणि विश्वास टाटा ब्रँड ला एक वेगळं वलय प्राप्त करून देतो. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, 

“I have tried to treat all people equally. Whether it’s a poor person on the street or a kid selling magazines as against a millionaire or a billionaire, I talk to them and treat them all the same way. I'm aware that I do that, and I do that not for show, but because of the feeling that I think everyone deserves recognition as a human being.”

TIFR, Tata Memorial Hospital, TISS, IIS ह्या आणि अश्या अनेक संस्था टाटानी स्थापन केलेल्या आहेत. ज्यांचा आजचा भारत घडवण्यात खुप मोठं  योगदान आहे. ३०,००० पेक्षा जास्ती रुग्ण प्रत्येक वर्षी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये कॅन्सर वर उपचार घेतात. ह्यातील तब्बल ७०% रुग्णांवर फुकट उपचार केले जातात. टाटा कंपन्यांची जवळपास ६६% मालकीहक्क हा वेगवेगळ्या ट्रस्ट कडे आहे. टाटांना होणाऱ्या वार्षिक ७ बिलियन अमेरिकन डॉलर चा फायदा हा ह्याच ट्रस्ट मार्फत भारताच्या कल्याणासाठी वापरला जातो. आज भारत कोरोना शी लढा देताना चाचपडत असताना रतन टाटा आणि टाटा ग्रुप पुन्हा एकदा भारतीयांसाठी भक्कमपणे उभा राहिला आहे. टाटा ग्रुप ने सगळ्यात आधी १५०० कोटी रुपयांची मदत कोरोना शी लढण्यासाठी भारतीयांना दिलेली आहे.

रतन टाटा आज निवृत्त झाले असले तरी भारत आणि भारतीयांच्या बुद्धिमत्तेला उंच भरारी घेण्यासाठी मदत करण्यात सगळ्यात पुढे आहेत. जवळपास २४ स्टार्ट अप व्यवसायांना उभं राहण्यासाठी रतन टाटांनी मदत केली आहे. काहीतरी नवीन आणि जगावेगळं करण्यासाठी आसुसलेल्या अनेक कल्पनांना रतन टाटा आपल्या परीने उडण्यासाठी पंखांच बळ देत आहेत. माणूस श्रीमंत होतो तो पैसे कमावून पण मनाची श्रीमंती पैश्याने विकत घेता येतं नाही. ती आपल्या कर्तृत्वातून कमवावी लागते आणि माझ्या मते रतन टाटा सारखं भारतीयांच्या मनाची श्रीमंती कमावलेला दुसरा कोणता उद्योगपती नसेल.  २००० साली पदमभूषण तर २००८ साली पदमविभूषण देऊन भारत सरकारने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला आहे. माझ्या मते भारताचा सर्वोच्च सन्मान रतन टाटा ह्यांना दिला तर त्या सन्मानाचा गौरव होईल इतकं मोठं कर्तृत्व रतन टाटा ह्यांच आहे. 

“I dream of an India that would be an equal opportunity country – a country where we diminish the disparity between the rich and the poor and, most importantly, give an opportunity to anyone to succeed as long as they have the willingness and endurance to do so.”

Ratan Tata

आज त्यांचा ८३ वा वाढदिवस आहे. आजच्या दिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्या कर्तुत्वाला ह्या भारतीयाकडून एक कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल



Thursday 24 December 2020

आपण सुरक्षित आहोत का?... विनीत वर्तक ©

 आपण सुरक्षित आहोत का?... विनीत वर्तक ©

१५ फेब्रुवारी २०१३ चा दिवस होता. जगात सगळचं सुरळीत सुरु होतं. अचानक चेल्याबिन्स्क, रशिया मध्ये सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी आकाशात आगीचा एक गोळा वेगाने पृथ्वीकडे झेपावला. आयफेल टॉवर पेक्षा जास्ती वजनाचा आणि साधारण २० मीटर चा व्यास असलेला तो गोळा पृथ्वीच्या आकाशात ३० किलोमीटर वर फुटला आणि पृथ्वीकडे त्याचे तुकडे वेगाने झेपावले. त्या गोळ्याच तेज सूर्यापेक्षा प्रखर होत आणि त्या तेजात चेल्याबिन्स्क, रशिया मधील त्या भागाचा आसमंत उजळून निघाला. काय होते आहे आहे कळायच्या आत ते तेज पृथ्वीच्या वातावरणात नष्ट झालं. पुन्हा एकदा काही घडलं नाही ह्या आवेशात पृथ्वी वरील व्यवहार सुरु झाले. पण अगदी काही वेळाने एक जबरदस्त शॉक व्हेव चा तडाखा तिथल्या घरांना बसला. त्या तडाख्यात तिथल्या घरांच्या सगळ्या काचा उध्वस्थ झाल्या, जवळपास १००० पेक्षा जास्ती घरांच्या भिंती कोसळल्या आणि १५०० पेक्षा जास्त लोक ह्यात जखमी झाले. तो आगीचा तेजस्वी गोळा म्हणजेच चेल्याबिन्स्क उल्कापात.  

चेल्याबिन्स्क उल्कापात होई पर्यंत जगातील कोणत्याही उपग्रहाला अथवा नासा, स्पेस एक्स, इसरो, चीन, युरोपियन युनियन, जॅक्सा, खुद्द रशिया च्या अवकाश यंत्रणेला ह्याची  पुसटशी कल्पना पण आली नव्हती. ह्या घटने नंतर अवकाश क्षेत्रात पुन्हा एक प्रश्न ऐरणीवर आला तो म्हणजे आपण सुरक्षित आहोत का? कारण अवकाशात मुक्तपणे संचार करणाऱ्या ह्या लघुग्रहांबद्दल आपल्याला असलेली माहिती ही किती तोकडी आहे हे ह्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं. १९८८ पासून साधारण १२०० अशनी ज्यांचा आकार एक मीटर पेक्षा मोठा होता ते पृथ्वीवर आदळले आहेत. त्यातल्या फक्त ५ अशनी बद्दल जगातील यंत्रणा आधी सांगू शकलेल्या आहेत. ह्या ५ मधील एकही अशनी असा नव्हता ज्याला आपण २४ तासापेक्षा आधी ओळखू शकलो अथवा तो कुठे आदळणार ह्या बद्दल आखाडे बांधू शकलो होतो. वरील आकडे लक्षात घेतले  तर कोणालाही लक्षात येईल की पृथ्वीवर अवकाशातून कोणता लघुग्रह आदळणार आहे? त्याचा आकार कसा? त्याने किती हानी होईल? त्याची  ह्याविषयी माहित देणार २१ व्या शतकातील कोणतीच यंत्रणा सध्यातरी अस्तित्वात नाही. 

लघुग्रहांची निर्मिती आपली सौरमाला जन्माला येताना झाली. आपल्या सौरमालेतील ग्रह बनत असताना ग्रह बनले पण त्याच सोबत काही भाग एकत्र येऊन ग्रहांची निर्मिती करू शकला नाही. हाच तो भाग ज्यातून लघुग्रहांचा एक पट्टा तयार झाला. हा पट्टा आपल्या सौरमालेत मंगळ आणि गुरु ग्रहाच्या मध्ये सामावलेला आहे. ह्याच पट्यातून काही लघुग्रह गुरुत्वाकर्षणामुळे सौर मालेच्या आतल्या भागात खेचले जातात आणि मग त्यांची कक्षा जर का पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ आली तर पृथ्वीकडे खेचले जातात आणि त्यांची टक्कर पृथ्वीशी होते. कोणत्याही लघुग्रहांची कक्षा आपल्याला समजण्यासाठी त्यांच आकलन होणं गरजेचं असते.  ह्यासाठी आकाशाचा वेध वेगवेगळ्या काळात घेतला जातो. एकाच ठिकाणची अनेक छायाचित्र एकत्र केली की एखादी वस्तू जर आपली जागा बदलत असेल तर त्यात दिसते आणि मग त्या बदलण्याच्या परिघावरून त्याच्या कक्षेच गणित केलं जाते. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं शक्य होते जेव्हा हे लघुग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या पलीकडे असतील. कारण तेव्हाच सूर्याचा प्रकाश ह्या लघुग्रहांवर पडतो आणि तेव्हा आपण त्यांचा पृथ्वीवर वेध घेऊ शकतो. ह्यामुळे आपण फक्त १५% आकाश धुंडाळू शकतो. ह्याचा अर्थ ८५% अवकाशात कोण कुठे परिक्रमा करते आहे ह्याचा आपल्याला काहीच अंदाज नाही. 

समजा आपण एखाद्या लघुग्रहाची कक्षा त्याचा अभ्यास करून नक्की केली तरी ती तशीच राहील ह्याचा काहीच नेम नाही. हे लघुग्रह काही मीटर ते किलोमीटर व्यासाचे असतात आणि ह्यांच्यावर सूर्यासह, पृथ्वी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र अश्या सगळ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडत असतो. अगदी चंद्रासारखे उपग्रह सुद्धा एखादया लघुग्रहावर आपला प्रभाव पाडू शकतात. ह्याचा सरळ अर्थ म्हणजेच लघुग्रह कधी कसे आपली कक्षा बदलतील ह्याचा अंदाज बांधण जवळपास अशक्य आहे. जे लघुग्रह आकाराने मोठे आहेत त्यांचा अंदाज आपण बांधू शकतो पण जे लघुग्रह काही मीटर व्यासाचे आहेत म्हणजे साधारण १ किलोमीटर व्यासापेक्षा लहान असलेले त्यांचा काहीच अंदाज आपल्याला नाही कारण त्यांच अस्तित्व विश्वाच्या ह्या पसाऱ्यात इतकं सुक्ष्म आहे की आपण त्यांचा शोध घेऊ शकत नाही. अर्थात ह्या लहान लघुग्रहांच्या टकरीमुळे मानवजातीच अस्तित्व नष्ट होणार नाही. पण एखाद्या शहराचं किंवा देशाचं अस्तित्व संपवून टाकण्या इतपत ही टक्कर नक्कीच संहारक असेल. 

आपण अशी एखादी टक्कर टाळू शकतो का? तर सध्या तरी ह्याच उत्तर नाही असं आहे. पृथ्वी च्या दिशेने येणारा एखादा लघुग्रहाला आपण क्षेपणास्त्र अथवा आण्विक बॉम्ब टाकून त्याची कक्षा अथवा रोख बदलू शकतो असं अनेकजण म्हणत असले तरी ते अशक्य आहे. एकतर अश्या एखाद्या काही मीटर लघुग्रहाची कक्षा ठरवून त्याचा अवकाशात वेध घेणं कठीण आहे. समजा आपण त्याचा वेध घेतला तरी ह्या स्फोटामुळे त्याचे तुकडे होतील पण गुरुत्वाकर्षणामुळे पुन्हा एकदा हे तुकडे एकसंध होतील आणि समोरून येणार संकट टाळता येणं कठीण आहे. जरी त्याचे तुकडे होऊन ते पृथ्वीवर आदळले तरी त्याची तीव्रता काही अंशी कमी होईल पण आपण टक्कर मात्र अडवू शकत नाही. त्यांचा मार्ग बदलण्याचे जे काही पर्याय आज आपल्यासमोर आहेत ते त्याच्या अफाट वेग आणि कायनेटिक शक्तीपुढे फिके आहेत. 

आज मानव कितीही प्रगत झाला तरी अवकाशातून येणाऱ्या आस्मानी संकटाची चाहूल ना आपण आधी ओळखू शकत ना आपण त्याला रोखण्यासाठी काही करू शकत. काही मीटर चा चेल्याबिन्स्क उल्कापात आज, आत्ता कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कोणत्याही भागात होऊ शकतो आणि स्वतःला सर्वात प्रगत समजणारा मानव ह्याकडे हतबलतेने बघण्यापलीकडे काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण किती सुरक्षित हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असाच आहे. 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 20 December 2020

एका प्रवासाचा प्रवास... विनीत वर्तक ©

 एका प्रवासाचा प्रवास... विनीत वर्तक ©

काही आठवड्यापूर्वी संपूर्ण खगोल शास्त्रज्ञांचे आणि वैज्ञानिकांचे डोळे एका घटनेकडे एकटवले होते.  ह्या घटनेमध्ये आपल्याला आजवर ज्ञात असणाऱ्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची दृष्टी मिळणार होती त्याचसोबत अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात होण्याची क्षमता होती. त्यामुळेच ही घटना मानवाच्या तांत्रिक क्षमतेचं एक पुढलं पाऊल होत. जपान देशाचं हायाबुसा २ हे यान ६ डिसेंबर २०२० ला ऑस्ट्रेलिया च्या भागात एक कॅप्सूल घेऊन उतरलं. ह्या कॅप्सूल च्या कुपीमध्ये दडलेला होता 'एका प्रवासाचा प्रवास'.

हायाबुसा २ ला ३ डिसेंबर २०१४ ह्या दिवशी जपान च्या जॅक्सा ने एका रोमांचकारी प्रवासाला रवाना केलं. हायाबुसा २ अश्या एका प्रवासाला निघालं होत ज्यात ते अश्या एका लघुग्रहाला भेट देऊन त्याच्यावर असणारे दगड मातीचे नमुने घेऊन ६ वर्षांनी पुन्हा पृथ्वीवर परतणार होतं. २७ जून २०१८ ला हायाबुसा ने आपल्या  लक्ष्याच्या कक्षेत प्रवेश केला. रायगु नावाचा एक लघुग्रह हा त्याचा लक्ष्य होता. रायगु हा अपोलो ग्रुप मधला एक लघुग्रह सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा करत आहे. रायगु  ४७४ दिवसात सूर्याभोवती प्रदक्षिणा करतो. रायगु ची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या ९५,४०० किलोमीटर अंतरावरून जाते. त्यामुळे रायगु हा 'पोटेंशियल हझार्डस ऑब्जेक्ट' म्हणजेच पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता असलेल्या लघुग्रहांपैकी एक आहे. अर्थात ह्याची शक्यता नजीकच्या भविष्यात नाही. पण समजा काही गोष्टींमुळे त्याची कक्षा बदलली आणि त्याची पृथ्वीशी टक्कर झाली तरी टक्कर होणारं शहर बेचिराख होईल पण संपूर्ण मानवजातीला त्यामुळे धोका नसेल.

रायगु च वय साधारण ९ मिलियन वर्ष (+,- २. ५ मिलियन वर्ष ) असावं असा प्राथमिक अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. रायगु च्या पृष्ठभाग हा अनेक मोठ्या खडकांनी भरलेला आहे. त्यावर ४४०० पेक्षा जास्ती असे मोठे बोल्डर (खडक) आहेत. रायगु चा व्यास साधारण ०.८७ किलोमीटर आहे. ह्या रायगु च्या कक्षेत प्रवेश केल्यावर हायाबुसा २ ने त्याचा अभ्यास केला. अनेक फोटो आणि त्याच्या पृष्ठभागाचा अंदाज आल्यावर त्याने आपल्या रोबोटिक आर्म ने त्यावरील नमुने घेण्यास सुरवात केली. ११ जुलै २०१९ ला त्याने रायगु वरील मातीचे नमुने आपल्या कुपीत बंदिस्त केले. आपलं मिशन संपवून १३ नोव्हेंबर २०१९ ला पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरु केला.

एक वर्षभर प्रवास केल्यानंतर हायाबुसा २ पृथ्वी च्या कक्षेत पुन्हा एकदा परत आलं. पण कसोटीचा क्षण आता येणार होता. आपल्या आत अतिशय जपून आणलेल्या कुपीत हायाबुसा २ ने तब्बल ९ मिलियन वर्षाचा विश्वाचा प्रवास बंदिस्त केलेला होता. हा प्रवास पृथ्वीवर सुरक्षितरीत्या उतरवणं हे खूप मोठं शिवधनुष्य अजून बाकी होतं. ६ डिसेंबर २०२० ला ऑस्ट्रेलिया इकडे हायाबुसा २ ने सोडलेली कुपी सुरक्षरीत्या पृथ्वीवर उतरली. मानवाच्या तांत्रिक प्रगतीच्या इतिहासात हा दिवस सोनेरी अक्षराने नोंदला गेला. ही कुपी जॅक्सा च्या वैज्ञानिकांनी जपान ला नेऊन उघडल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण समोर दिसत होता तो 'एका प्रवासाचा प्रवास'.

रायगु वरून आणलेल्या मातीत कार्बन असणारी संयुग आहेत. ह्याच संयुगांच्या अभ्यासावरून पृथ्वीवर पाणी, जीवसृष्टी आणि इतर गोष्टी कश्या अस्तित्वात आल्या ह्या रहस्याचा गुंता सोडवण्याची वैज्ञानिकांना आशा आहे. जपानी लोकांच तंत्रज्ञान इतकं उच्च प्रतीचं आहे की हायाबुसा २ ने कुपी यशस्वीरीत्या पृथ्वीवर पाठवल्यानंतर जवळपास ६ वर्ष कित्येक हजारो किलोमीटर चा प्रवास केल्यावर ही त्यावर जवळपास ३० किलो इंधन बाकी आहे. हायाबुसा २ वरील सर्व यंत्रणा आजही व्यवस्थितरीत्या काम करत आहेत. जपान (जॅक्सा) ने पुन्हा एकदा अवकाशातून हायाबुसा २ ला दुसऱ्या एका मिशनची कामगिरी सोपवली आहे. हायाबुसा २ आता 1998 KY26 ह्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी प्रवास करणार आहे. हा लघुग्रह फक्त ३० मीटर आकाराचा आहे. हायाबुसा २ जुलै २०३१ मध्ये ह्या लघुग्रहाचा वेध घेईल. ह्या प्रवासात जाता जाता ते शुक्राचा आणि  2001 AV43 ह्या लघुग्रहाचा सुद्धा वेध घेणार आहे.

हायाबुसा २ ने आणलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्याची संधी जगभरातील संशोधकांना उपलब्ध होणार आहे. ह्या अभ्यासातून विश्वाच्या प्रवासाची अनेक रहस्य उलगडण्याचा शक्यता वैज्ञानिकांना वाटत आहे. ह्या संपूर्ण प्रवासाचा वेध घेणाऱ्या जपान च्या वैज्ञानिकांना, संशोधकांना आणि जॅक्सा च्या तांत्रिक प्रगतीला माझा साष्टांग नमस्कार.

माहिती स्रोत :- गुगल, जॅक्सा

फोटो स्रोत:- गुगल, जॅक्सा ( फोटोमध्ये हायाबुसा २ ने पृथ्वीवर पाठवलेली कुपी आणि दुसऱ्या फोटोत त्या कुपीतील मातीचे नमुने ज्यात कित्येक मिलियन वर्षाचा प्रवास बंदिस्त आहे. )

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Tuesday 15 December 2020

१६ डिसेंबर... विनीत वर्तक ©

 १६  डिसेंबर... विनीत वर्तक ©

१६ डिसेंबर १९७१ म्हणजेच बरोबर ४९ वर्षापूर्वी पाकिस्तान ला दुसऱ्या महायुद्धा नंतरचा सगळ्यात लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. पाकिस्तान ला आपली कुवत भारताने ह्याच दिवशी दाखवून दिली होती. पाकिस्तान चे निर्माते मोहम्मद अली जीना ह्यांच्या दोन बाजूचा पाकिस्तान ह्या स्वप्नाला भारताने बेचिराख केलं होतं. पाकिस्तान ला आपल्या अर्ध्या भागावर पाणी सोडायला लागलं तर होतच पण त्याच्या ९३,००० सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे आत्मसमर्पण केलं होतं. जगाच्या आजवरच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धानंतर इतका लाजिरवाणा पराभव कोणत्याही देशाचा झालेला नाही. 

अवघ्या १३ दिवसात भारतीय सेनेने पाकिस्तान च्या सेनेला पाणी पाजलं होतं. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्यावेळेचे भारतीय सैन्य प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ ह्यांना पाकिस्तान ला त्यांची जागा दाखवण्याचा हुकूम दिला होता. पाकिस्तान सेनेने ने पूर्व पाकिस्तान मध्ये सामान्य लोकांवर अत्याचार सुरु केले होते. जवळपास ३ लाख ते ३० लाख लोकांचा ह्यात मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ज्यात बलात्कार, त्रास, छळ आणि खून अश्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टींचा समावेश होता. पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढे भारतात यायला लागले आणि भारताची परिस्थिती बिकट होत चालली होती. 

ह्या सगळ्यात पाकिस्तान ने भारताला डिवचण्यासाठी भारताच्या ११ हवाई अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. भारताच्या तिन्ही दलांनी पहिल्यांदा एकत्र कारवाई करताना अवघ्या १३ दिवसात पाकिस्तानी सेनेची दाणादाण उडवली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यावर आपल्या आणि आपल्या सैनिकांच रक्षण करण्यासाठी आत्मसमर्पण करण्याशिवाय पाकिस्तान चे लेफ्टनंट जनरल ए.ए.के. नियाझी ह्यांनी भारताचे सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा ह्यांच्यापुढे सपशेल शरणागती पत्करली. ह्या दोघांनी स्वाक्षरी केलेल्या मसुद्यातील काही भाग इकडे देतो आहे. 

The PAKISTAN Eastern Command agree to surrender all PAKISTAN Armed Forces in BANGLA DESH to Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA, General Officer Commanding in Chief of Indian and BANGLA DESH forces in the Eastern Theatre. This surrender includes all PAKISTAN land, air and naval forces as also all para-military forces and civil armed forces. These forces will lay down their arms and surrender at the places where they are currently located to the nearest regular troops under the command of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA.

The PAKISTAN Eastern Command shall come under the orders of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA as soon as the instrument has been signed. Disobedience of orders will be regarded as a breach of the surrender terms and will be dealt with in accordance with the accepted laws and usages of war. The decision of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA will be final, should any doubt arise as to the meaning of interpretation of the surrender terms. 

ह्या मसुद्याला आज बरोबर ४९ वर्ष झाली आणि ह्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द भारतीयांची मान गौरवाने, देशाभिमानाने उंचावणारा आहे. कोणत्याही सैन्यासाठी शरणागती हा सगळ्यात शेवटचा पर्याय अगदी मृत्यूनंतर समोर असतो. 'बचेंगे तो ओर भी लढेंगे' हे पानिपत च्या युद्धातील वाक्य कोणत्याही सैनिकांसाठी शरणागती ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट असते हे सांगणारा आहे. भारताने ह्या लढाईत पाकिस्तान ला नुसतं हरवलं नाही तर त्यांच्या स्वाभिमानाला ठेचलं आहे. त्यामुळेच प्रत्येक भारतीयाने हा 'विजय दिवस' त्या अनामिक हजारो सैनिकांसाठी, त्यांनी केलेल्या पराक्रमासाठी साजरा करायला हवा. 

आज 'विजय दिवस' आहे. ह्याच दिवशी बांग्लादेश ह्या स्वतंत्र राष्टाची निर्मिती पाकिस्तान च विभाजन होऊन झाली. ह्या सगळ्या निर्मिती मध्ये बलिदान आणि पराक्रम हा भारतीय सैनिकांचा आहे. आजच्या काळातील पिढीला कदाचित ह्या गोष्टी खूप सोप्या वाटतील पण त्याकाळी भारतीय सेनेने दाखवलेल्या पराक्रमाची गाथा आजही तितकीच स्फुरण देणारी आहे. आजच्या दिवशी ह्या लढाईत आपलं सर्वस्व पणाला लावून लढलेल्या त्या अनामिक सैनिकांना एका भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या स्मृतीस वंदन.. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Sunday 13 December 2020

खारे वारे मतलई वारे (भाग ५)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग ५)... विनीत वर्तक ©

फेब्रुवारी २०१९ चा तो काळ होता त्याचवेळेस भारतात एका पाहुण्याचं आगमन होत होतं. खरे तर अनेक देशातील राजकीय नेतृत्व भारतात येत असतात पण ही  भेट खूप वेगळ्या अर्थाने महत्वाची होती. येणारी व्यक्ती आणि त्याचा देश भारतासाठी खूप महत्वाचा होता. त्याही पेक्षा जी वेळ निवडली होती ती 'बुल्स आय' म्हणता येईल अशी होती. ती व्यक्ती होती सौदी अरेबिया चे युवराज मोहम्मद बिन सलमान (एम.एस.बी.). अमेरीकन पत्रकार जमाल खशोग्गी ह्याच्या हत्येला जबाबदार म्हणून ह्याच एम.एस.बी. वर ठपका ठेवण्यात आला होता. अनेक देशांनी एम.एस.बी. ना त्याकाळी आपल्या देशात येण्यासाठी मज्जाव केला. ह्याच वेळेस भारताने मात्र दूरदृष्टीने एक पाऊल टाकलं आणि एम.एस.बी. च रेड कार्पेट स्वागत भारतात झालं. संपुर्ण जग जेव्हा एम.एस.बी.कडे संशयाने बघत होतं तेव्हा भारत एका मित्रासारखा एम.एस.बी.सोबत उभा राहिला. ह्या मैत्रीच्या पेरलेल्या बी ने आता वटवृक्षाचा आकार घ्यायला सुरवात केली आहे. आज भारताचे सैन्य प्रमुख जनरल एम.एम. नरवणे ६ दिवसांच्या युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) आणि सौदी अरेबिया च्या दौऱ्यावर आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे सैन्य प्रमुख हे गल्फ (अरेबिक) देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. ही गोष्ट ज्याला आमूलाग्र बदल म्हणता येईल अश्या पद्धतीने जागतिक पातळीवर बघितली जात आहे. 

गेल्या काही वर्षात गल्फ क्षेत्रातील (मुस्लिम) राष्ट्रातील राजकारण बदललेलं आहे. ह्याला अनेक कारणं आहेत. सौदी अरेबिया ज्याच्याकडे मुस्लिम राष्ट्राचं नेतृत्व आजवर होतं त्याच्या नेतृत्वाला धक्का देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुस्लिम राष्ट्रांमध्ये गट पडत चालले आहेत. एका गटात पाकीस्तान, तुर्की आणि मलेशिया सारखे देश एकत्र येत आहेत तर दुसरीकडे सौदी अरेबिया, यु.ए.ई. सारखी राष्ट्र आहेत. आपण फेकलेल्या तुकड्यांवर पोट भरणारा पाकीस्तान जेव्हा मालकावर भुंकायला लागला तेव्हा सौदी अरेबिया ने त्याला त्याची जागा दाखवण्याचा चंग बांधला आहे. ह्या सगळ्या गोंधळात सगळ्यात जास्ती फायदा करून घेण्याची संधी कोणाला उपलब्ध झाली असेल तर तो देश म्हणजे 'भारत'. भारतात मुस्लिम समाजावर अत्याचार होत असतात असं पाकीस्तान आजवर बोंबलत होता. काश्मीर प्रश्नावर अनेकदा त्याने ह्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांच समर्थन मिळवलेलं होतं. पण आता वारे उलटे वाहायला लागल्यावर भारताने गरम असलेल्या लोखंडावर बरोबर हातोडा मारला आहे. 

भारताने अरेबिक राष्ट्रांशी असलेले आपले संबंध अजून मजबूत करायला सुरवात केली. २०१६ ला सौदी अरेबिया ने आपल्या सर्वोच्च सन्मानाने भारताच्या पंतप्रधानांचा गौरव केला. २०१७ मध्ये युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) चे युवराज मोहम्मद बिन झायद अल निहान हे प्रजासत्ताक दिवसाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फेब्रुवारी २०१९ ला सौदी अरेबिया चे युवराज मोहम्मद बिन सलमान (एम.एस.बी.) ह्यांनी भारताला भेट दिली. ऑगस्ट २०१९ ला युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) ने त्यांचा सर्वोच्च सन्मान भारताच्या पंतप्रधानांना दिला. २०१५, २०१८ भारताच्या पंतप्रधानांनी यु.ए.ई. ला भेट दिली. २०१९ मध्ये त्यांनी सौदी अरेबिया ला भेट दिली. ह्या सगळ्या गोष्टी क्रमाने बघितल्या तर लक्षात येईल की भारताने आपले संबंध मुस्लिम राष्ट्रांशी घट्ट केले आहेत आणि त्याचीच फळ आता आपण चाखत आहोत. 

भारताच्या सैन्य प्रमुखांची अरेबिक राष्ट्रांना भेट ही साधीसुधी गोष्ट नाही. कारण ह्या भेटीत टेबल वर अनेक गोष्टी आहेत. ही भेट राजकीय नाही त्यामुळे भेटीत घडणाऱ्या गोष्टी ह्या राजकीय नाही तर सैन्याशी आणि सुरक्षिततेशी निगडित असणार आहेत. हाच तो आमूलाग्र बदल आहे. आपण जनरल एम.एम. नरवणे ह्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम बघितला तर खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील. भारताचे सैन्य प्रमुख यु.ए.ई.मध्ये त्यांचे सैन्य प्रमुख मेजर जनरल सालेह मोहम्मद सालेह अल अमेरी ह्यांना भेटले आहेत. तर सौदी अरेबिया मध्ये त्यांचे सैन्य प्रमुख जनरल फहाद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल मूतीर ह्यांना भेटले आहेत. ह्या दोघांसोबत सैन्य भागीदारी ची चर्चा झाली आहे. सैन्य भागीदारी, सैन्य प्रक्षिशण, सैन्य सराव ह्या शिवाय आयुधांची निर्मिती, त्या तंत्रज्ञानाचं आदान प्रदान ह्या सगळ्या गोष्टी चर्चिल्या गेल्या आहेत. भारताच्या 'ब्राह्मोस' मिसाईल साठी दोन्ही देश अतिशय उत्सुक आहेत. ह्या शिवाय हिंद महासागरात दोन्ही देशांच्या नौसेना सोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव ही टेबलावर आहे. ह्या दोन्ही देशांना लागणाऱ्या विविध तंत्रज्ञान आणि आयुधांची निर्मिती करण्यासाठी भारत मेक इन इंडिया मार्फत एक पर्याय म्हणून समोर आला आहे. ह्या सोबत अवकाश तंत्रज्ञाना मध्ये आणि अवकाश क्षेत्रामध्ये भारतासोबत एकत्र काम करण्यास हे दोन्ही देश उत्सुक आहेत. 

भारताच्या सैन्य प्रमुखांची भेट ही राजकीय संबंध नाही तर सैनिकी संबंधांना एका वेगळ्या पातळीवर नेणार आहे. ज्याचा फायदा भारताला येत्या काळात होणार आहे. गेल्या काही महिन्यातील भारतीय सैन्य प्रमुखांच्या भेटी बघितल्या तर भारत कश्या तर्हेने पाकीस्तान आणि चीन ला एकाच वेळेस अडकवतो आहे ते लक्षात येईल. काही आठवड्यांपूर्वी भारताने हिंद महासागरात अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान सोबत मलबार कवायत करून चीन ला आव्हान दिलं आहे. गेल्या काही महिन्यात सैन्य प्रमुखांनी म्यानमार, नेपाळ सारख्या आपल्या शेजारील राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित धोवाल हे श्रीलंकेचा दौरा करून आले आहेत. (अजित धोवाल कधीच रिकाम्या हाताने परत येत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे.) भारताचे प्ररराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या यु.ए.ई, बहरीन आणि सिचेलीस च्या दौऱ्यावर आहेत तर सैन्य प्रमुख यु.ए.ई.आणि सौदी अरेबिया च्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळात सुद्धा भारताच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणातील प्रमुख लोक सध्या विदेश दौऱ्यावर भारताच्या रणनीतील एका वेगळ्या उंचीवर नेण्यात व्यस्त आहेत. 

काळ बदलला आहे आणि वाऱ्यांची दिशा बदलली आहे. पाकीस्तान आणि चीन ज्या मस्तीत जगत होते त्यांना भारताच्या ह्या व्यूहरचनेने धक्का नक्कीच लागला असेल ह्यात शंका नाही. ह्या सगळ्या भेटींचे दूरगामी परीणाम काय दिसून येतात ते दिसायला काही काळ जावा लागेल पण एक नक्की आहे की भारताने आपली बाजू आणि तटबंदी भक्कम केली आहे ह्याबद्दल कोणाच्या मनात दुमत नसेल. 

क्रमशः 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Saturday 12 December 2020

एक शून्य शून्य... विनीत वर्तक ©

 एक शून्य शून्य... विनीत वर्तक ©

आजएक भारतीय सैनिक एक शून्य शून्य म्हणजेच वयाची १०० वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांच नाव भारतीयांना दूर दूर पर्यंत माहित असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण आमचे हिरो नेहमीप्रमाणे वेगळेच असतात. आज अनेक राजकारणी लोकांचा वाढदिवस आहे. त्यामुळे शुभेच्छांचे रकाने आज त्यांच्यासाठी तुडुंब भरून वाहत असतील. पण देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकाची साधी आठवण ही आमच्या सुशिक्षित आणि प्रगल्भ (आपण तसे आहोत असं अनेकांना वाटते) लोकांना नसेल. आज नको त्या हिरोंसोबत देशाचा खरा हिरो १०० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच नाव आहे कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल. 

कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे भारताचे एकमेव सैनिक आहेत ज्यांनी भारताच्या तिन्ही दलात देशाची सेवा केली आहे. वैमानिक, खलाशी आणि सैनिक अश्या तिन्ही दलातून वेगवेगळ्या माध्यमातून देशाची सेवा केली आहे. दुसऱ्या महायुद्धात आपलं योगदान दिलेले कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे रॉयल इंडियन एअर फोर्स, रॉयल इंडियन नेव्ही आणि भारतीय सेनेचा भाग होते. १९६५ च्या भारत- पाकीस्तान युद्धात ही त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल ह्यांनी आपलं शिक्षण शासकीय कॉलेज, लाहोर इकडून पूर्ण केलं. त्यांचे वडील हे त्याकाळी मेजर ह्या हुद्यावर सैन्यात कार्यरत होते. आपल्या सैनिकी प्रवासाची सुरवात त्यांनी वैमानिक म्हणून केली. पण त्याकाळी विमान चालवण्यात धोका असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना त्याच्यापासून परावृत्त केलं. मग त्यांनी नौसेनेत प्रवेश घेतला. दुसऱ्या महायुद्धात खलाशी म्हणून रसद पुरवणाऱ्या जहाजात खलाशी म्हणून काम केलं. त्यानंतर नेव्ही मधून त्यांनी निवृत्ती घेतली. भारत स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी भारतीय सेनेत प्रवेश केला. त्यांची नियुक्ती १ सिख ह्या रेजिमेंट मध्ये झाली. १९६५ च्या युद्धात सियालकोट इकडे आपल्या रेजिमेंट चे कमांडिंग ऑफिसर बनून त्यांनी पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं. पण हा सैनिक भारताच्या सैन्य इतिहासात दुर्लक्षित राहिला. १९७० मध्ये ते भारतीय सेनेतून निवृत्त झाले.

२४ डिसेंबर १९५० साली त्यांचा विवाह परमिंदर कौर ह्यांच्याशी झाला. परमंदिर कौर आज ९३ वर्षाच्या आहेत आणि त्यांच्या लग्नाला आता जवळपास ७० वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. आजही कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे शारीरिकदृष्ट्या एकदम तंदुरुस्त आहेत. आपल्या ह्या १०० वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यच गुपित सांगताना ते म्हणतात, 

“It is rare and it is a secret". 

पण त्यांच्या सुनेच्या मते त्यांच्या आयुष्याचं गुपित हे गेली ७० वर्ष ते घेत असलेल्या व्हिस्की मध्ये आहे. अर्थात ह्यातील गमतीचा भाग सोडला तर सैन्यात मिळालेलं शिस्तीचं पालन त्यांनी आजवर केल्यानेच आज एक शून्य शून्य चा दिवस ते बघू शकले आहेत. भारताच्या तिन्ही दलांचा भाग होताना त्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे. अश्या ह्या योध्यास माझा कडक सॅल्यूट.  कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल ह्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्व भारतीय तुमचे कायम ऋणी आहोत. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Tuesday 8 December 2020

एलियन आणि मोनोलिथ... विनीत वर्तक ©

 एलियन आणि मोनोलिथ... विनीत वर्तक ©

गेल्या काही दिवसापासुन विश्वाचा अभ्यास आणि कुतूहल असणाऱ्या सगळ्यांच्या मनात खळबळ माजली आहे. ह्याला कारण म्हणजे गेल्या एका महिन्यात जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात मोनोलिथ ( मोनालिथ म्हणजे सोप्या शब्दात लोखंडाचा खांब)  आढळून येत आहेत. रहसमयरित्या प्रकटलेले हे मोनोलिथ कुठून आले? आत्ताच पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात का आढळून येत आहेत? ह्यातील सगळ्यात आधी शोध लागलेला मोनलिथ कोणी चोरला? ते ह्यामागे विश्वातील परग्रहावरील जिवसृष्टी तर नाही न? अश्या अनेक तर्काना सध्या उधाण आलं आहे. मानवाला नेहमीच एलियन म्हणजे परग्रहावरील जीवसृष्टीच कुतूहल राहिलं आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकारामागे एलियन चा हात आहे अशी एक थेअरी जगमान्य होताना दिसत आहे. मग विश्वात खरच एलियन आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

 उतेह ह्या अमेरीकेच्या एका राज्यातील वाळवंटात नोव्हेंबर २०२० मध्ये काही संशोधकांना प्रिझम सारखा आकार असणारा एक मोनोलिथ हेलिकॉप्टर मधून दिसून आला. साधारण ३ मीटर उंची असलेला ह्या मोनालिथ चा शोध निर्मनुष्य असलेल्या भागात संशोधकांनी घेतल्यावर अनेक प्रश्न समोर उभे राहिले. ह्याची वार्ता जसजशी इंटरनेट वरून पसरत गेली तसतशी हा मोनोलिथ बघण्यासाठी गर्दी जमू लागली. अर्थात ह्यात सगळे बघे ते हौशी प्रकारचे लोक होते. अमेरीकन लोक ही नेहमीच स्वतःला श्रेष्ठ समजत असल्याने जर पृथ्वीवर एलियन कधी अवतरले तर त्यांचा पहिला मुक्काम अमेरीका असणार हे अमेरीकन चित्रपट आणि सिरीज ह्यांनी  जनमानसात बिंबवलं आहे. त्यामुळेच अमेरीकेला लक्ष्य करण्यासाठी किंवा अमेरीकेत उतरण्यासाठी एलियन म्हणजेच परग्रहवासी लोकांनी उतेह च्या वाळवंटात एखादा संदेश देण्यासाठी अथवा दिशादर्शक म्हणून हा मोनोलिथ इकडे प्रकट झाला अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

गेल्या एका महिन्यात ह्या नंतर मोनोलिथ आढळण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. उतेह नंतर कॅलिफोर्निया, नेवाडा, कॅनडा, यु.के., स्पेन, जर्मनी, नेदरलँड, रोमानिया ह्या देशात मोनोलिथ आढळून आले आहेत. ह्या सगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा एलियन बद्दल वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. वैज्ञानिकांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर एलियन किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता खुप जास्ती आहे. एलियन विश्वात असू शकतात का हे जाणून घेण्यासाठी आपण विश्व थोडं जाणून घेतलं पाहिजे. 

आपण जे विश्व बघू शकतो ते जवळपास १३.८ बिलियन प्रकाशवर्ष इतकं आहे. तर विश्वाचा व्यास हा ९३ बिलियन प्रकाशवर्ष इतका प्रचंड आहे. आता ह्या विश्वात अंदाजे २०० बिलियन आकाशगंगा सामावलेल्या आहेत. आपण ज्या आकाशगंगेचा म्हणजेच मिल्की वे चा भाग आहोत तिचा व्यास १,००,००० (एक लाख) प्रकाशवर्ष इतका आहे. ह्या एकाच आकाशगंगेत ४०० बिलियन तारे आणि २०० बिलियन ग्रह आहेत. ह्यात पृथ्वीच्या आकाराचे तब्बल ६ बिलियन ग्रह आहेत. म्हणजे ह्यातील प्रत्येक ग्रहावर जीवसृष्टी असण्याची किंवा उत्पत्ती होण्याची शक्यता खूप आहे. नासा ने आत्तापर्यंत जवळपास ४३०० एक्झॉप्लॅनेट शोधले आहेत. एक्झॉप्लॅनेट म्हणजे असे ग्रह जे आपल्या सोलार सिस्टीम च्या बाहेर आहेत. तर ह्या ४३०० मधील जवळपास ५५ ग्रह हे त्यांच्या ताऱ्याच्या हॅबिटायटल झोन मध्ये आहेत. हॅबिटायटल झोन म्हणजे एखाद्या ग्रहाचे त्याच्या ताऱ्यापासून इतकं अंतर ज्यामुळे ग्रहावरील तपमान हे एकदम उष्ण पण नसेल आणि एकदम थंड पण नसेल. पृथ्वीवर जीवसृष्टी चा उगम होण्याचं कारण म्हणजे पृथ्वीचं सूर्यापासून असलेलं अंतर आहे. त्यामुळेच असे ग्रह जे अश्या पद्धतीच्या हॅबिटायटल झोन मध्ये येतात त्यांच्यावरील वातावरण हे जीवसृष्टीची सुरवात करण्यासाठी सर्वोत्तम असते. 

इकडे लक्षात आलं असेल की आपण विश्वात असलेल्या ७०० क्वीनट्रिलियन ( १ क्वीनट्रिलियन म्हणजे एकावर १८ शून्य) ग्रहांपैकी काही हजार ग्रहांची आपल्याला माहिती आहे. त्यातही शेकडो ग्रह पृथ्वी सारखी रचना असणारे आहेत. म्हणजे ह्या क्वीनट्रिलियन ग्रहांमध्ये कितीतरी ट्रिलियन ग्रह असे आहेत जिकडे जीवसृष्टीचा उगम होऊ शकतो अथवा झालेला आहे. तिकडचे एलियन आपल्यापेक्षा प्रगत किंवा मागासलेले दोन्ही प्रकारचे असू शकतात. आपण विचार करतो त्यापेक्षा कित्येक वेगळ्या पद्धतीची जीवसृष्टी आणि संस्कृती ह्या ग्रहांवर अस्तित्वात असू शकते. पण ह्या सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तरी आजवर आपण अशी जीवसृष्टी शोधू शकलेलो नाहीत किंवा आपलं तंत्रज्ञान अजूनही विश्वाच्या आकारासाठी खूप तोकडं आहे. मोनोलिथ हा त्यापैकी एका जीवसृष्टीचा आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न असू शकतो असं अनेकांना वाटते पण ज्या पद्धतीने ह्या गोष्टी घडत आहेत त्यावरून तरी ह्यामागे सनसनाटी निर्माण करण हाच उद्देश निदान मला तरी दिसून येतो आहे. कारण मोनोलिथ च अचानक समोर येणं, त्याची चोरी होणं हे सगळं परग्रहावरून एलियन नाही तर पृथ्वीवरील माणसचं करत आहेत. पण असं असलं तरी भविष्यात एलियन शी गाठभेट होण्याची शक्यता विश्वाचा आकार लक्षात घेता तितकीच जास्त आहे. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



  

Sunday 6 December 2020

दोन टोकं अनुभवलेला देव... विनीत वर्तक ©

 दोन टोकं अनुभवलेला देव... विनीत वर्तक © (Repost)

फुटबॉल ह्या खेळाचा चा इतिहास लिहायचा झाला तर दोन टप्प्यात लिहावा लागेल. ३२ वर्षापूर्वी वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिना ह्यांच्या आधीचा इतिहास आणि दुसरा त्या नंतरचा इतिहास कारण ह्या सामन्याने फुटबॉल खेळाच्या इतिहासाची पान पूर्णपणे बदलली ती पाच मिनिटाच्या खेळात. जेव्हा पूर्ण जग हा सामना बघत होतं तेव्हा चांगल – वाईट, सुंदर – घाणेरडा, अप्रतिम – फसवणूक अश्या सगळ्याच अनुभूती जगाने त्या काही मिनटांच्या खेळात अनुभवल्या. ह्या अनुभूती जगाला करवून देणारा खेळाडू होता अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू डिएगो आर्मंडो मॅराडोना. 

अर्जेंटिना चा हा सुपरस्टार खेळाडू आजही जगातील सगळ्या पत्रकार, ह्या खेळातील विशेतज्ञ तसेच त्याच्या समवयस्क आणि आत्ताच्या पिढीतील खेळाडूंकडून पण एक सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. फिफा च्या २० व्या शतकातील सर्वकालिक महान खेळाडूंमध्ये ब्राझील च्या पेले सोबत अर्जेंटिना च्या डिएगो आर्मंडो मॅराडोना चं नाव लिहलेलं आहे. मॅराडोना च लक्ष्य, त्याच खेळातील पदलालित्य, खेळाची जाण तसेच खेळताना इतर खेळाडूंना दिलेल्या संधी तसेच फुटबॉल वरील त्याच नियंत्रण आणि त्याच्यावर असलेली त्याची पकड ह्या सगळ्या गोष्टी जेमतेम ५ फुट ५ इंच उंचीचा मॅराडोना ज्या चपळतेने करायचा ते बघणं म्हणजे साक्षात देवाचा वरदहस्त लागलेला खेळाडू बघणं. त्याच्या कमी उंचीमुळे त्याच सेंटर ऑफ ग्राव्हिटी कमी उंचीवर होतं ह्यामुळेच फुटबॉल च्या बॉल ला लिलया हाताळण्याच कसब त्याच इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा सर्वोत्तम होतं. 

डिएगो आर्मंडो मॅराडोना चा जन्म ३० ऑक्टोबर १९६० ला अर्जेंटिनाच्या ब्युनेस आयर्स इकडे झाला. अतिशय गरीब परीस्थितीत त्याच बालपण गेलं. त्याचे वडील हे साधे कामगार होते. तीन बहिणीनंतर झालेलं हे चौथ आपत्य आणि त्या नंतर ही दोन भावंड जन्माला आली. पाच भावडांच्या अतिशय गरीब घरात जन्माला आलेला मॅराडोना एक दिवस आयुष्यात इतके पैसे आणि प्रसिद्धी कमावेल हे तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं. पण नियतीच्या मनात वेगळं होतं. लहानपणीच वयाच्या तिसऱ्या वर्षी मॅराडोना ला त्याच्या भावाने फुटबॉल भेट दिला. हा फुटबॉल म्हणजे मॅराडोना चा जीव की प्राण झाला तो शेवटपर्यंत. उठता, बसता ते रात्री झोपेत पण मॅराडोना त्यात रमलेला असायचा. नीट व्यवस्थित धावण्या आगोदर मॅराडोना फुटबॉल सोबत अनेक क्लुपत्या करायला शिकला होता. वयाची ८ वर्ष होईपर्यंत मॅराडोना फुटबॉल खेळायला शिकला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं मॅराडोना च फुटबॉल वरील नियंत्रण अर्जेंटिना च्या ज्युनिअर टीम च्या कोचच्या लक्षात आलं त्यांनी लगेच मॅराडोना ला टीम मध्ये संधी दिली. त्या नंतर मॅराडोना च आयुष्य फुटबॉल ने बदललं ते कायमचं. 

ह्या टीम ने १९७२ मध्ये सलग १४० गेम जिंकले आणि त्याच वर्षीचा ज्युनिअर किताब ही ह्याच टीम ला मिळाला आणि ह्याच सर्व श्रेय जाते ते मॅराडोना च्या जादुई फुटबॉल खेळण्याला. ह्यासाठी मॅराडोना ला १० नंबरची जर्सी देण्यात आली जो नंबर फुटबॉल स्टार पेले च्या जर्सी चा होता. सगळ्यात कमी वयात मॅराडोना ने देशाच्या ज्युनिअर टीम मध्ये आपलं नाव जोडलं. १९८२ च्या वर्ल्ड कप मध्ये मॅराडोना फारशी चमक दाखवू शकला नाही. पण त्याचा चाहतावर्ग वाढत होता. मॅराडोना च्या जादुई खेळाने सगळ्यांना भारावून सोडलं होतं. बार्सिलोना ह्या क्लब ने मॅराडोना त्यांच्या क्लब सोबत खेळण्यासाठी प्रचंड असे ७.७ मिलियन अमेरिकन डॉलर मोजले. फुटबॉल इतिहासातील हा एखाद्या खेळाडूसाठी केला जाणार सगळ्यात मोठा सौदा ठरला. मॅराडोना च वय तेव्हा अवघं २१ वर्ष होतं. कमी वयात प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मॅराडोना ला मिळाली. अतिशय गरिबीतून अचानक हाती लागलेला पैसा त्याच्यासोबत अनेक वाईट गोष्टी ही घेऊन आला. ह्यातच मॅराडोना ने कोकेन ची चव चाखली आणि त्याच व्यसनात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही. 

१९८६ चा वर्ल्ड कप मॅराडोना ला दैवत्व देऊन गेला. वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिना चा सामना संस्मरणीय ठरला तो मॅराडोना च्या दोन गोलमुळे. ह्या स्पर्धेला इंग्लंड आणि अर्जेंटिना मध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे एकमकांचे उट्टे काढण्याचा चंग दोन्ही संघांनी बांधला होता. पहिल्या गोलच्या वेळी मॅराडोना च्या हाताला लागून फुटबॉल इंग्लंड च्या जाळ्यात शिरला. फुटबॉल ला हात लावणे हे खरे तर ह्या खेळात चूक मानली गेली आहे पण रेफ्री नी हा गोल अर्जेंटिना ला बहाल केला. त्यावेळी बोलताना मॅराडोना म्हणाला होता, 

“ ह्या गोल मध्ये मॅराडोना च थोडं डोकं आणि देवाचा थोडा हात आहे” 

म्हणून ह्या गोल ला “ह्यांड ऑफ गॉड” असं म्हंटल गेलं. २२ ऑगस्ट २००५ ला मॅराडोना ने आपण मुद्दामून हा बॉल हाताने जाळ्यात ढकलल्याचा खुलासा केला. हा गोल फिफा च्या इतिहासातील सगळ्यात लाज वाटावी असा आणि नियमांची पायमल्ली केलेला गोल म्हणून प्रसिद्ध झाला. ह्या नंतर मात्र ४ मिनिटांच्या अवधीत मॅराडोना ने जो गोल केला त्या गोल ला “गोल ऑफ द सेंच्युरी” हा किताब २००२ साली फिफा ने दिला. मॅराडोना ला आपल्या बाजूमध्ये फुटबॉल च नियंत्रण मिळालं. त्याने एकट्याने ११ वेळा बॉल ला स्पर्श करत इंग्लंड च्या पाच खेळाडूंना चकवत इंग्लंड च्या जाळीकडे धाव घेतली. शेवटी त्यांचा गोलकीपर पीटर शिल्टन ह्याला चकवत मॅराडोना ने डाव्या पायाने मारलेला फुटबॉल जाळ्यात अडकला तेव्हा पूर्ण जगाने खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोल बघितला होता. म्हणूनच त्या काही मिनिटांन च्या खेळामध्ये फुटबॉल खेळाचे अनेक नियम ते फुटबॉल खेळातील अजरामर गोल अस सगळच बदलून गेलं. म्हणून आज फुटबॉल चा इतिहास ह्या स्पर्धेच्या आधीचा आणि ह्या नंतरचा असा सांगितला जातो. 

१९८२ नंतर मॅराडोना चा खेळ बहरत असला तरी त्याच व्यसन त्याला निराशेच्या गर्तेत ढकलत होतं.त्याचा स्व त्याच्या खेळापेक्षा मोठा होऊ लागला. मॅराडोना  दिवसेंदिवस अतिशय उर्मट होऊ लागला. त्याच्या बार्सिलोना कल्ब ला ही त्याचे चटके बसायला लागले. पण मॅराडोना ने त्याच्या बळावर बार्सिलोना ला त्या वर्षीच जेतेपद मिळवून दिलं. बार्सिलोना ने मॅराडोना ला १२ मिलियन अमेरिकन डॉलर ला नापोली क्लब ला विकलं. १९८८ पर्यंत मॅराडोना ने नापोली क्लब मधून खेळताना आपल्या खेळाचा करिष्मा दाखवून दिला. ह्या कल्बसाठी सर्वाधिक ११५ गोल त्याने केले. पण मॅराडोना च व्यक्तिगत आयुष्य मात्र डळमळीत व्हायला लागलं होतं. कोकेन च व्यसन त्याला आतून पोखरत होतं. 

१९९० च्या वर्षी मॅराडोना ने पुन्हा अर्जेंटिना च नेतृत्व वर्ल्ड कप मध्ये केलं पण आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मॅराडोना करू शकला नाही. एकेकाळी अशक्य वाटणारे गोल केलेला देव आज पेनल्टी किक वर साधे गोल करायला ही कमी पडू लागला. अर्जेंटिना जर्मनी कडून ह्या वेळेस पराभूत झाली. मॅराडोना ला पराभवाला आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. त्यातच मॅराडोना व्यसनाधिनता वाढत जात होती. त्याचे परिणाम आता दिसायला लागले होते. त्याच वजन वाढत गेलं आणि चपळाई कमी होत गेली. खेळाकडे दुर्लक्ष झालं. १७ मार्च १९९१ ला मॅराडोना उत्तेजकद्रव्य चाचणीत दोषी आढळला. कोकेन चे अंश त्याच्या रक्तात मिळाले. १५ महिन्यांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली. एकेकाळी दैवत्व प्राप्त झालेला हा देव आता लोकांच्या नजरेत उतरला होता. कोकेन ला सोडण्यात मॅराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला. १९९४ च्या वर्ल्ड कप मधील उत्तेजक द्रव्य चाचणीत मॅराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला. अस्ताला जात असलेलं वैभव मॅराडोना ला दिसत होतं. चाहत्यांना ही एकेकाळी डोक्यावर घेतलेल्या खेळाडूची फुटबॉल खेळातून अशी पीछेहाट चटका लावून जात होती. पण नशेच्या आहारी गेलेला देव पाण्याखाली गेला तो कायमचा. तिसऱ्यांदा मॅराडोना उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. ह्या नंतर मात्र वयाच्या ३६ वर्षी त्याने पुन्हा एकदा ह्या सगळ्यातून बाहेर येऊन फुटबॉल साठी कसून सराव केला पण तोवर कोकेन ने त्याच्या शरीराची आतून वाट लावली होती. सगळ्याला कंटाळून मॅराडोना ना ने ऑक्टोबर १९९७ ला फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली. 

एकेकाळी गरिबीची झळ सोसलेला डिएगो आर्मंडो मॅराडोना फुटबॉल चा सम्राट झाला. ज्या गोष्टींची स्वप्न कधी बघितली नव्हती त्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळत होत्या पण अचानक मिळालेला पैसा आणि प्रसिद्धी ह्याचा ताळमेळ राखायला मात्र डिएगो आर्मंडो मॅराडोना हरला. एकेकाळी देव असलेला हा स्टार फुटबॉलपटू त्याच्याच तेजात उध्वस्थ झाला. डिएगो आर्मंडो मॅराडोना च आयुष्य आपल्या प्रत्येकासाठी एक धडा आहे. आयुष्याची दोन टोक अनुभवलेला हा देव प्रसिद्धी आणि यशाची हवा डोक्यात जाऊन वाईट संगतीला, व्यसनांना जवळ केल्यावर होणाऱ्या आपल्याच ऱ्हासाच मूर्तिमंत उदाहरण म्हणून नेहमीच लक्षात राहील.         

 माहिती स्त्रोत :- गुगल 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 30 November 2020

तो जीवघेणा क्षण... विनीत वर्तक ©

 तो जीवघेणा क्षण... विनीत वर्तक ©

प्रत्येक  व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी तो जीवघेणा क्षण येतोच. जेव्हा आजूबाजूचं सगळच निरर्थक वाटायला लागते. आजवर जे आयुष्य जगलो, आजवर जे कमावलं मग तो पैसा, पद, प्रतिष्ठा काहीही असो सगळ्याची किंमत ही शून्य वाटायला लागते. कुठून आलो, कुठे जाणार असे प्रश्न मनाचा ठाव घेतात आणि भविष्यकाळ अंधारमय किंबहुना येणारा क्षण सुद्धा नकोस होतो तो एक क्षण कधीतरी जीवघेणा ठरतो. प्रत्येकाच्या मनात कशाची टोचणी आहे ह्याचा ठाव कोणीच घेऊ शकत नाही. आपल्याला निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी द्यायची ताकद ठेवतात. मग ती कलाटणी आयुष्य घडवणारी असू शकते किंवा आयुष्य संपवणारी असू शकते. 

मन हलकं करा, कोणाशी तरी बोला, शेअर करा हे सांगणं जितकं सोप्प असते तितकच ते करणं कठीण. जर प्रेम ठरवून होत नाही तर संवाद तरी ठरवून कसा होणार? प्रेम कधी कोणत्या वयात होऊ शकते तसं तो संवाद ही कोणत्याही वयात होऊ शकतो आणि जोवर तो होत नाही तोवर त्या टोचणाऱ्या क्षणांचे घाव आपणच परतवून लावायचे असतात. आयुष्यात पुढे गेल्यावर हे जीवघेणे क्षण खूप छोटे वाटतात. त्याकाळी आपण वेडे होतो, मूर्ख होतो किंवा कधी कधी आपलच आपल्याला हसायला येते पण खरच तसं असते का? कारण त्या क्षणांना त्याकाळी जर आपण परतवलं नसतं तर आज आपण आजचा दिवस बघू शकलो नसतो हे तितकच खरं असते. 

सगळं असूनसुद्धा सगळं नसण्याची पोकळी जाणवू शकते. कधीतरी आयुष्यात अश्या घटना घडतात ज्या आपली गाडी रुळावरून खाली उतरवतात. पुढे घडत जाणाऱ्या अजून काही घटना ह्या घसरलेल्या गाडीला निराशेच्या खाईत न्यायला पुरेश्या असतात. अचानक आश्वासक वाटणारं आयुष्य एकदम भकास वाटू लागते. त्याचवेळी त्या तुटलेल्या झाडाला वाऱ्याची झुळूक सुद्धा पूर्णपणे उद्ववस्थ करू शकते. पण त्याचवेळी एखादी सर सुद्धा त्या भकास वाटणाऱ्या आयुष्यात नवचैतन्य आणू शकते. ती सर काहीही असू शकते अगदी एखादा अनपेक्षितपणे अनोळख्या व्यक्तीशी झालेला संवाद, भेट, स्पर्श, कॉल ते अगदी चित्रपट आणि संगीत सुद्धा. आयुष्यात कितीतरी वेळा असे जीवघेणे क्षण येतात. पण कडेलोट करणारा एखादाच असतो आणि त्याचवेळी गरज असते ती एका सरीची. त्यावेळी जर ती नाही जाणवली तर आयुष्य संपवणं हा पर्याय सोयीस्कर वाटतो किंबहुना तो एकच पर्याय समोर असतो. त्यावेळी जर ती सर नाही आली तर आयुष्य संपवण्याच्या त्या खोल गर्तेत आपण उडी घेतो पुन्हा कधी बाहेर न येण्यासाठी.   

 अशी उडी घेणारी माणसं खरच मनाने कमकुवत असतात का?  मन कमकुवत का कठीण हे परिस्थिती ठरवतं असते. कठीण आणि संकटाच्या काळी पण आयुष्यात सरी असतील तर आपण कोणत्याही प्रसंगाला सामोर जाण्याच बळ मिळते पण जेव्हा त्याच नसतात तेव्हा म्हंटल तसं एक झुळूक पण सगळं उद्ववस्थ करू शकते. स्टेडियम मध्ये बसून समोरून येणार बॉल कसा खेळावा हे कोणीही सांगू शकते पण मैदानात उतरून जेव्हा समोरून बॉल येत असतो तेव्हा काय करायचं हा निर्णय हे त्या क्षण अनुभवणाऱ्या फलंदाजाने ठरवायचं असते. कारण आउट झाला किंवा सिक्सर लागली तरी दोन्ही गोष्टींची जबाबदारी त्यालाच उचलावी लागते. प्रेक्षक म्हणून आपण फक्त आपलं मत सांगून दुसऱ्या क्षणाला ते विसरून पण जातो. 

तो जीवघेणा क्षण टाळता येऊ शकतो का? त्या सरी ला आपण निर्माण करू शकतो का? ह्याची उत्तर ज्याची त्याने शोधायची कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा तो जीवघेणा क्षण ही वेगळाच. आपल्या सरी आपण निर्माण करायच्या, ज्या त्या क्षणात आपल्याला साथ देतील, सोबत करतील. मग ती सर एखादी व्यक्ती असेल, गोष्ट असेल, चित्रपट अथवा संगीत असेल किंवा एखाद चित्र पण असेल. तो जीवघेणा क्षण येणाच्या अगोदर आपली वर्दी देतो ती ओळखता आली तर कदाचित त्याला सामोरं जाण्याची ताकद आपण स्वतःमध्ये निर्माण करू शकू. त्यासाठी कोणतं जागतिक उत्तर नाही तर ते प्रत्येकाने स्वतः शोधायचं असते.  

फोटो स्त्रोत:- गुगल 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Saturday 28 November 2020

खारे वारे मतलई वारे (भाग ४)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग ४)... विनीत वर्तक ©

काही आठवड्यापूर्वी भारताचे सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांनी नेपाळ ला भेट दिली होती. भारत- चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अनेक दृष्टीने महत्वाची होती. नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेने तसेच नेपाळ ने आपल्या नकाशात केलेल्या बदलांमुळे भारत- नेपाळ संघर्ष ताणले गेले होते. लिंपियाधुरा, कालापानी, लिपूलेख सारखा प्रदेश नेपाळ ने आपल्या भागाचा हिस्सा दाखवला होता ज्याला भारताने अधिकृतरीत्या आक्षेप घेतला होता. अजून ह्या गोष्टीवर तोडगा निघालेला नाही. पण अश्या परिस्थितीचा फायदा चीन ने घेतला नसेल तर नवलच. 'दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है' असं म्हणत चीन ने नेपाळच्या राजकारणावर आपली पकड घट्ट करण्याची तयारी केली. 

चीन चा नेपाळ मधील वाढता हस्तक्षेप भारतासाठी एक धोक्याची घंटा होती. नेपाळच्या राजकारण्यानी काय पावलं उचलावी ह्यावर भारत अंकुश ठेवू शकत नाही पण भारताने काय करावं ज्याने ह्या गोष्टी बदलल्या जातील ते करण्याची चाल भारत यशस्वीरीत्या खेळला. चीन ची नेपाळ सरहद्दीवर असलेली अरेरावी खुद्द नेपाळ मधील लोकांना नको आहे. त्यामुळेच नेपाळ मधील लोक आजही भारतासोबतच्या संबंधांना जास्ती महत्व देतात. १९४७ साली भारत, नेपाळ आणि ब्रिटिश सरकार ह्यांच्या मध्ये एक करार झाला होता. त्या करारा नुसार तत्कालीन ब्रिटिश सैन्यात असलेल्या ११ गोरखा रेजिमेंट पैकी ७ रेजिमेंट ह्या भारतीय सैन्याचा भाग झाल्या होत्या तर उरलेल्या ४ रेजिमेंट नी ब्रिटिश सैन्याचा भाग राहणं स्वीकारलं होतं. त्यामुळेच नेपाळ हा जगातील एकमेव असा देश आहे ज्यांचे सैनिक भारतीय सेनेचा भाग आहेत. भारतासाठी आजवर आपल्या जीवाचं बलिदान करत आलेले आहेत. 

आज ह्या ७ रेजिमेंट मध्ये ४०,००० गोरखा सैनिक भारताच्या रक्षणासाठी सदैव तयार आहेत. गोरखा रेजिमेंट भारतीय सेनेतील अतिशय नावाजलेली रेजिमेंट आहे. ह्या रेजिमेंट ला आत्तापर्यंत २ वेळा परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. ह्याशिवाय गोरखा रेजिमेंट च्या अनेक अधिकाऱ्यांकडे भारतीय सेनेचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, चीफ जनरल दलबीर सुहाग ह्यांच्यासह भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत हे ह्याच रेजिमेंट मधून आलेले आहेत. गोरखा आपल्या पराक्रमासाठी जगात नावाजलेले आहेत. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा ह्यांच अतिशय गाजलेलं वाक्य, 

"If anyone tells you he is never afraid, he is a liar or he is a Gurkha.”  

गोरखा च्या पराक्रमाची साक्ष आजही देते. 

१९५० पासून भारत आणि नेपाळ ह्यांच्यामध्ये मानद पद एकमेकांच्या सैन्य प्रमुखांना देण्याची प्रथा आहे. अर्थात हा मान कधी द्यायचा हे दोन देशांच्या त्यावेळच्या संबंधावरून ठरवलं जाते. सर्वात प्रथम हा मान भारताचे त्या काळचे सैन्य प्रमुख के.एम.करीअप्पा ह्यांना देण्यात आला होता. नेपाळ च्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी ह्यांनी हा मान भारताचे तत्कालीन सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांना देत असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी भारताचे सैन्य प्रमुख हे नेपाळ ला गेले होते. पण हा मान नावापुरता नाही तर ह्या सोबत नेपाळी सेनेचं नेतृत्व आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेचा ही जनरल नरवणे हे भाग असणार आहेत. चीन साठी ही बातमी चेक मेट सारखी समजली जात आहे. कारण हा सन्मान देण्याच्या आगोदर पंतप्रधान ओली ह्यांनी आपल्या देशाचे संरक्षण प्रमुख इश्वर पोखरलाल ह्यांची त्या पदावरून उचलबांगडी करत त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. जनरल नरवणे हे नेपाळ ला जाण्याच्या २४ तास अगोदर रॉ Research and Analysis Wing (R&AW) चे प्रमुख सामंत कुमार गोयल हे काठमांडू ला भेट देऊन आले होते. 

नेपाळ सरकारचा हा निर्णय अश्या वेळी आलेला होता ज्यावेळी भारत आणि नेपाळ ह्यांचे संबंध खूप ताणले गेलेले होते. अश्या वेळी भारतीय सेनाप्रमुखांना काठमांडू इकडे मानद पद देण्याचा कार्यक्रम होणं हे भारताने चीन च्या नाकावर टिच्चून आपण आपल्या गल्ली चा राजा आहोत हे दाखवणं होतं. भारतातल्या मिडियाने ह्या गोष्टीची दखल नेहमीप्रमाणे घेतली नाही. एखादा पुरस्कार सोहळा असावा अशी ही गोष्ट दाखवण्यात आली पण ही गोष्ट घडवण्यामागे ज्या चाली खेळल्या गेल्या आहेत त्याने चीन तोंडावर आपटला आहे. जनरल नरवणे ह्यांच्या नेपाळ दौऱ्याने दोन्ही देशातील थंड पडलेल्या संबंधांना पुन्हा एकदा संजीवनी दिली आहे. अर्थात ह्याचे परीणाम काय होतील ते येत्या काळात स्पष्ट दिसून येतीलच. तूर्तास भारताचे सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांच ह्या मानद पदासाठी अभिनंदन. 

फोटो स्त्रोत:- गुगल 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Thursday 26 November 2020

अक्षयपात्र... विनीत वर्तक ©

 अक्षयपात्र... विनीत वर्तक © 

अक्षयपात्र म्हणजे अशी थाळी जिच्या मधील अन्न कधीच संपत नाही. तुम्ही कितीही जणांना खायला घाला पण त्यात अन्न हे तयार होत रहाते. ऊर्जा ही मानवाच्या  मूलभूत गरजांपैकी आज एक आहे. ऊर्जेची मागणी ही वाढत जाणार आहे. ऊर्जा निर्मिती करणारी साधनसंपत्ती येत्या काही काळात संपणार आहे. मग नंतर काय? हा प्रश्न भारतासह संपूर्ण जगापुढे आज उभा आहे. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर भारत मागील दोन दशकापेक्षा जास्त काळ काम करत आहे. येत्या डिसेंबर २०२० किंवा पुढल्या वर्षात भारत आपलं अक्षयपात्राची थाळी सुरु करतो आहे. भारताचं अक्षयपात्र म्हणजेच 'प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिऍक्टर'. जवळपास ५०० मेगावॉट ऊर्जेची निर्मिती ह्यातून होणार आहे. पण ऊर्जेपेक्षा महत्वाचं हे आहे की जेवढं इंधन ही ऊर्जा निर्माण करायला खर्च होईल त्यापेक्षा जास्ती इंधन ऊर्जा मिळाल्यावर तयार होणार आहे. हे तंत्रज्ञान वाचायला सोप्प वाटलं तरी प्रत्यक्षात निर्माण करणं अतिशय किचकट आहे म्हणून जगाने ह्या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवल्यावर सुद्धा भारताने ह्याच्या निर्मितीचा ध्यास सुरूच ठेवला आहे. त्यामागे काही कारण आहेत. ह्याला अक्षय पात्र का म्हंटल जाते? जगाने नापसंत केलेल्या तंत्रज्ञानावर भारत का काम करतो आहे? तसेच भारताच्या दृष्ट्रीने ते का महत्वाच आहे? हे समजावून घेण गरजेचं आहे.

अणु विखंडन करून अणुउर्जेची निर्मिती होते हे सर्वश्रुत आहे. जगात असणाऱ्या सगळ्याच अणुभट्टी मध्ये युरेनियम २३५ हे इंधन म्हणून वापरल जाते. ह्याच्या अणुच विखंडन करून उर्जा मिळवली जाते. पण युरेनियम २३५ तसच त्याच्या एनरीच स्वरूपाचे साठे जगात अत्यंत कमी आहेत. भारतात तर अतिशय नगण्य स्वरूपात हे मिळते. त्यामुळेच भारताला हे वेगवेगळ्या देशांकडून अणुभट्टी सुरु ठेवण्यासाठी आयात करावे लागते. युरेनियम आयात करताना अनेक जाचक अटी लादलेल्या असतात. ह्याच्या प्रत्येक ग्रॅम इंधनाचा वापर कसा, कुठे झाला हे त्या देशाला सांगाव लागते वेळ प्रसंगी दाखवावं लागते. युरेनियम २३५ चा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जात नाही ह्यासाठी ही सगळी बंधन असतात. तसेच हे इंधन म्हणून द्यायला कोणताही देश कधीही नकार देऊ शकतो. ह्या सगळ्या अडचणीमुळे ऊर्जेच्या स्वायत्तेवर बंधन तर येतातच पण आपल्या स्व रक्षणासाठी आणि तंत्रज्ञानासाठी ह्याचा वापर केला जाऊ शकत नाही. ह्याच युरेनियम चे चुलत भाऊ म्हणजेच युरेनियम २३८ आणि थोरियम. युरेनियम चे चुलत भाऊ आपल्या भारतात मुबलक प्रमाणात सापडतात. युरेनियम २३८ वेस्ट प्रॉडक्ट म्हणून तयार होते तर जगातील सगळ्यात जास्ती थोरियम नैसर्गिकरीत्या भारतात आढळते. एका अंदाजानुसार भारतात जवळपास ६,५०,००० टन थोरियम सद्यस्थितीला उपलब्ध आहे. जर हे थोरियम आपण वापरू शकलो तर ६०,००० वर्ष संपूर्ण भारताची उर्जेची गरज भागवली जाईल. इतके हे प्रचंड मोठे साठे आहेत.

युरेनियम २३८ किंवा थोरियम २३२ चा जर इंधन म्हणून वापर केला तर ह्यातून उर्जा निर्माण झाल्यावर जे निर्माण होतो तो अखंड उर्जेचा स्त्रोत म्हणजेच अक्षयपात्र.  इंधनाचा वापर करून ऊर्जा निर्मिती झाली तरी पुन्हा आपण जेवढं इंधन खर्च केलं त्यापेक्षा जवळपास ३०% जास्ती इंधन ऊर्जा निर्मिती झाल्यावर मिळते. ऊर्जानिर्मिती नंतर तयार होते युरेनियम २३३ आणि प्लुटोनियम २३९. ह्याचा सरळ अर्थ आहे जर आपण युरेनियम २३८ आणि थोरियम २३२ इंधन वापरून अणुभट्टी सुरु केली तर आपल्या बाकीच्या अणुभट्टीनां लागणार इंधन आणि अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्बसाठी लागणार इंधन आपण भारतात तयार तर करूच ह्या शिवाय उर्जेची निर्मिती होईल ती वेगळीच. म्हणूनच ह्या तंत्रज्ञानावर आधारीत अणुभट्टी ला अक्षय पात्र म्हणजेच न थांबता सतत उर्जा आणि इंधन देणारी अणुभट्टी अस संबोधले जाते. भारताने अश्या अक्षयपात्राच्या निर्मितीसाठी एक त्रिसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. ज्याच्यावर आपण एक पाऊल हळू का होईना पुढे टाकत आहोत. 

थोरियम २३२ किंवा युरेनियम २३८ जरी अक्षय उर्जा देणारे असले तरी त्याचं पात्र निर्माण करणे अतिशय कठीण आणि खर्चिक काम आहे. ह्यांच्या अणुच सामान्य पद्धतीने विखंडन करण कठीण आहे. ह्या चुलत भावांच्या अणुचे बंध तोडण्यासाठी खुप जास्त ऊर्जेची गरज असते आणि हे काम करण्यासाठी ह्यांना गरजेचे असतात ते फास्ट न्युट्रॉन. फास्ट न्युट्रॉन म्हणजे काय तर ह्या न्युट्रॉन मधील उर्जा खूप जास्ती असते आणि त्यांचा वेग सामान्यतः वापरण्यात येणाऱ्या न्युट्रॉन पेक्षा खुप जास्त असतो. हे फास्ट न्युट्रॉन युरेनियम २३८ किंवा थोरियम २३२ वर आदळून अणु विखंडन करतात. भारत कश्या पद्धतीने ह्या त्रिसूत्री कार्यक्रमावर काम करतो आहे तर पहिल्या स्टेज मध्ये आपल्याकडे इतर अणुभट्टी मधून तयार झालेलं प्लुटोनियम २३९ आणि युरेनियम २३८ ह्या अणुभट्टीत वापरून त्यातून अजुन प्लुटोनियम २३९ ची निर्मिती केली जाईल. (प्लुटोनियम इंधन वापरून पुन्हा प्लुटोनियम ची निर्मिती हे फास्ट ब्रीडर रिऍक्टर मध्ये शक्य आहे. म्हणून ह्याला 'ब्रीडर' असं म्हंटल जाते. ) दुसऱ्या स्टेज ला हे प्लुटोनियम २३९ भारताच्या इतर अणुभट्टीत इंधन म्हणून वापरलं जाईल त्याचवेळी थोरियम २३८ आणि युरेनियम २३२ जे भारतात खनिजांत मिळते ते वापरून युरोनियम २३३ ची निर्मिती केली जाईल. तिसऱ्या स्टेज ला ह्याच युरेनियम २३३ आणि थोरियम चा वापर करून पुन्हा थोरियम २३२ ला युरेनियम २३३ मध्ये बदलण्याची प्रक्रिया निरंतर सुरु राहील.   

भारताने अस फास्ट ब्रीडर रिऍक्टर १९८५ सालीच प्रायोगिक तत्वावर सुरु केल होतं. जगातील हे तंत्रज्ञान अवगत असणारा भारत त्याकाळी ७ वा देश होता. इतके वर्ष वेगवेगळ संशोधन करून आणि अभ्यास करून एक कमर्शियल फास्ट ब्रीडर रिऍक्टर बनवण्याचा निर्णय भारताने घेतला. त्यावर काम २००४ साली सुरु झाल. प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिऍक्टर कल्पकम इकडे बांधून पूर्ण होत आल असून डिसेंबर २०२० किंवा पुढल्या वर्षात ते कार्यान्वित होईल. ५०० मेगावॉट इतकी उर्जेची निर्मिती करताना त्याच वेळी भारताच्या इतर अणुभट्टीसाठी इंधनाची निर्मिती हे अक्षयपात्र सुरु करेल. वाचताना हे सोप्प वाटल तरी फास्ट न्युट्रॉन सांभाळण सोप्प नाही. ह्या फास्ट न्यूट्रॉन ना स्लो करण्यासाठी १७५० टन इतक्या प्रचंड लिक्विड सोडियम ची गरज लागते. लिक्विड सोडियम साठवण सोप्प नाही. त्याचा पाण्याशी संबंध आला तर त्याचा स्फोट होतो आणि हवेशी संपर्क आला तर तो जळतो. अश्या स्थितीत हवा आणि पाण्यापासून त्याचा साठा वेगळं करण खूप मोठ कठीण काम आहे. भारताने आपल्या जोरावर हे शिवधनुष्य पेललं आहे. ह्या अणुभट्टी मध्ये सुरक्षेसाठी दोन वेगळ्या यंत्रणा असून अवघ्या एका सेकंदात अणुभट्टी ला बंद करू शकतात. तसेच निर्माण होणार तापमान राखण्यासाठी ४ वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. अनेक देशांनी ह्या तंत्रज्ञाना पासून पाठ फिरवली ती ह्याच्या निर्मितीत येणाऱ्या खर्चामुळे आणि जगात उपलब्ध असणाऱ्या युरेनियम २३५ मुळे. पण भारतासाठी युरेनियम २३५ चा पर्याय सोप्पा नाही त्यामुळेच भारत ह्या तंत्रज्ञानावर काम करतो आहे. संपूर्ण जगात एकट्या रशियाने ह्यावर आधारित कमर्शियल अणुभट्टी बनवली जी १९८० पासून सुरु आहे. पण नंतर रशिया आर्थिक संकटात सापडल्यावर त्यांनी अश्या अणुभट्टी उभारण्याचा नाद सोडून दिला. चीन सारखा देश पण ह्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापासून दशकभर मागे आहे.

भारताने मात्र आपल संशोधन सुरूच ठेवल आणि त्यामुळेच आज भारताने असं कठीण तंत्रज्ञान प्रत्यक्षात निर्माण करून दाखवलं आहे. अक्षयपात्रा सारखी ही  अणुभट्टी भारताच्या उर्जेची गरज येणाऱ्या अनेक वर्षात तर भागवेलच पण तितक्या वर्षात दुसऱ्या अणुभट्टीन साठी इंधनाचा स्रोत ही बनणार आहे. ह्यामुळेच जगातील अनेक देश भारताने ह्या तंत्रज्ञानात अग्रेसर होऊ नये ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. ह्या अणुभट्टीच्या सुरक्षितेतचा प्रश्न समोर आणत आहेत. इकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की अक्षयपात्र नुसती भारताची ऊर्जेची गरज भागवणार नाही तर भारताला विपुल प्रमाणात प्लुटोनियम २३९ उपलब्ध करून देणार आहे. जगातील हायड्रोजन बॉम्ब मध्ये प्लुटोनियम २३९ वापरण्यात येतं आणि हीच त्यांची खरी पोटदुखी आहे. तरीसुद्धा उशिरा का होईना भारत ह्या तंत्रज्ञानावर पुढे जातो आहे. ह्या त्रिसूत्री कार्यक्रमाचं स्वप्न बघितलेले डॉक्टर होमी जहांगीर भाभा तसेच बी.ए.आर.सी आणि आय.जी.का.र चे संशोधक, अभियंते, वैज्ञानिक ह्या सर्वाना माझा सॅल्यूट. मला खात्री आहे की येत्या काही शतकात अक्षयपात्र भारताची ऊर्जेची गरज पूर्ण करत राहील. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल 

 सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 23 November 2020

दि फॉरगॉटन हिरो.. आबिद हसन सॅफ्रॉनी... विनीत वर्तक ©

 दि फॉरगॉटन हिरो.. आबिद हसन सॅफ्रॉनी... विनीत वर्तक © 


भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासात केवळ एका कुटुंबाच्या नावासाठी असे अनेक हिरे लुप्त केले गेले, अथवा लपवले गेले ज्यांचं कर्तृत्व एव्हरेस्टपेक्षाही उंच होतं. आपलं संपूर्ण आयुष्य देशाला स्वतंत्र करण्यासाठी वेचताना त्यांनी पुढच्या पिढीला एक आदर्श घालून दिला, ज्याचं पालन आपण आजही करतो. आज इतक्या वर्षांनंतरही आपल्या देशाबद्दल वाटणारं प्रेम आणि अभिमान वाटणारे दोन शब्द कोणते असतील तर ते म्हणजे, 

"जय हिंद!!"

नुसते शब्द उच्चारले, तरी देशभावना जागृत होते. देशाबद्दल प्रेम, समर्पण, आदर, आनंद, अभिमान अश्या सगळ्याच भावना त्यातून व्यक्त होतात. आजही देशाचा प्रत्येक सैनिक आणि नागरिक जेव्हा एकमेकांना कुठे भेटतात, तेव्हा हे दोन शब्द देशाबद्दलच्या सगळ्याच भावना त्याच तीव्रतेने व्यक्त करतात. भारतातील ६ धर्मांना, २२ प्रमुख भाषांना, ५००० जाती-जमातींना एकत्र धरून ठेवणारा शब्द म्हणजेच "जय हिंद". याच शब्दाने भारतातील विविधतेतील एकतेला स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतर आजतागायत बांधून ठेवलं आहे. हा शब्द भारतीयांना देणारे ते महापुरुष म्हणजेच, 'आबिद हसन सॅफ्रॉनी'. 

१९४१ चा काळ होता. नेताजी सुभाषचंद्र बोस बर्लिन, जर्मनी इकडे हिटलरकडून मदत घेण्यासाठी पोहोचले. नेताजींचं एक स्वप्न होतं, ते म्हणजे आझाद हिंद सेनेची स्थापना. आझाद हिंद सेना, अशी एक सेना ज्यामध्ये जवळपास ५०,००० सैनिक असतील आणि यांतील प्रत्येक सैनिक ब्रिटिश सैनिकांना पुरून उरेल, असा त्यांना बनवायचा होता. याच सेनेच्या मदतीने भारताला स्वातंत्र्य देण्याचं स्वप्न नेताजी बघत होते. आझाद हिंद सेनेतील प्रत्येक सैनिकाला सर्वोत्तम बनवण्यासाठी हिटलरकडून मदत मागण्यासाठी नेताजी जर्मनी मध्ये आले होते. नेताजी इकडे भारतीय युद्धकैद्यांना भेटत असताना त्यांची भेट आबिद हसन यांच्याशी झाली. आबिद हसन गांधीवादी विचारांचा पगडा घेऊन, हैद्राबादहून जर्मनीमध्ये अभियांत्रिकी शिकण्यासाठी आले होते. पण जेव्हा त्यांची गाठ नेताजींशी झाली, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाने ते इतके प्रभावित झाले, की आपलं शिक्षण सोडून त्यांनी नेताजींसोबत आझाद हिंद सेनेच्या निर्माणात भाग घेण्याचं नक्की केलं.  

आबिद हसन नेताजींसोबत त्यांच्या जर्मनीमधील वास्तव्यात कायम सोबत राहिले. नेताजींसाठी त्यांनी दुभाषी म्हणून काम केलं. नेताजींनी त्यांना आपलं वैयक्तिक सचिव बनवलं. आझाद हिंद सेनेची स्थापना होत होती, पण एक पेच नेताजींसमोर होता तो म्हणजे आपल्या सेनेची घोषणा काय असावी. आझाद हिंद सेनेमध्ये सर्व धर्मांचे, जातींचे लोक होते, त्यामुळे सर्वांना आवडेल आणि कोणत्याही धर्माला दुजाभाव दिला जाणार नाही, अशी एक घोषणा असावी ज्यामुळे सैनिकांना स्फुरण चढेल, तसेच आपल्या धर्मातून एकमेकांचं स्वागत करण्यापेक्षा, ही घोषणा त्यांचं सर्वांचं ब्रीदवाक्य असेल, अशी घोषणा नेताजींना हवी होती. त्याचवेळी आबिद हसन सॅफ्रॉनीनी जे दोन शब्द सुचवले, ज्याला १९४१ मध्ये आझाद हिंद सेनेची घोषणा, आणि स्वातंत्र्यानंतर भारताचं घोषवाक्य म्हणून स्वीकारण्यात आलं, ते दोन शब्द म्हणजे, 

'जय हिंद!!!'

१९४२ साली आबिद हसन सॅफ्रॉनी यांनी नेताजींसोबत एक ऐतिहासिक यात्रा केली, ज्याचं महत्व इतिहासाच्या पानात लुप्त झालेलं आहे. ती यात्रा म्हणजे नेताजींनी जर्मनी ते टोकियो, जपान इकडे जर्मन पाणबुडीतून (Unterseeboot 180) मधून केलेला प्रवास. हा प्रवास इतिहासाला एक वेगळं वळण देणारा ठरला. जपान मध्ये पोहोचताच नेताजींनी आझाद हिंद सेनेची सूत्रे आपल्या हातात घेतली, आणि पुढे जे झालं तो इतिहास आहे. आझाद हिंद सेनेचा ध्वज काय असावा यात भारतीय लोकांमध्ये रंगावरून मतभेद होते. हिंदू सैनिकांना भगवा रंग हवा होता तर मुस्लिम सैनिकांना हिरवा. या पेचातून तोडगा काढताना हिंदू सैनिकांनी ध्वज भगव्या रंगाचा असावा ही आपली अट मागे घेतली. त्यांच्या या दानशूरपणाला कुर्निसात करताना आबिद हसन यांनी आपल्या नावापुढे 'सॅफ्रॉनी' जोडलं(इंग्रजी मध्ये भगव्या रंगाला सॅफ्रॉन म्हणतात). आबिद हसन सॅफ्रॉनी यांनी मुमताज हुसेन आणि जे.आर.भोसले यांच्यासोबत आझाद हिंद सेनेच्या राष्ट्रगीताला  बांगला भाषेतून हिंदीमध्ये अनुवादित केलं. 

"शुभ सुख चैन की बरखा बरसे, भारत भाग है जागा
पंजाब, सिन्ध, गुजरात, मराठा, द्राविड़ उत्कल बंगा
चंचल सागर, विन्ध्य, हिमालय, नीला जमुना गंगा
तेरे नित गुण गाएँ, तुझसे जीवन पाएँ
हर तन पाए आशा।
सूरज बन कर जग पर चमके, भारत नाम सुभागा,
जए हो! जए हो! जए हो! जए जए जए जए हो!॥"

 १९४५ च्या त्या दुर्दैवी प्रवासात नेताजींच्या सोबत आबिद हसन सॅफ्रॉनीही असणार होते, पण शेवटच्या क्षणी काही कामामुळे त्यांनी हा प्रवास केला नाही. नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांना लगेच देशविघातक कारवायांसाठी अटक केली गेली. त्यांच्यावर खटला भरला गेला. १९४७ साली त्यांची आरोपातून मुक्तता करण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यावर वाणिज्य राजदूत म्हणून त्यांनी अनेक देशांमध्ये काम पाहिलं. १९६९ साली आपल्या सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी एक शांत आयुष्य हैद्राबाद इकडे व्यतीत केलं. ५ एप्रिल १९८४ ला आबिद हसन सॅफ्रॉनी हे पंचतत्वात विलीन झाले. 

स्वतंत्र्य भारतात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद सेनेचं महत्व हे मुद्दामहून कमी लेखलं गेलं. पण आझाद हिंद सेनेमुळे, हिंदुस्थानला  आपण शक्ती आणि सैन्याच्या जोरावर जास्त काळ पारतंत्र्यात ठेवू शकत नाही, याची जाणीव ब्रिटिशांना झाली, हा इतिहास आहे. नेताजींच्या अनेक निर्णयांमध्ये आबिद हसन सॅफ्रॉनी यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग राहिलेला होता. नेताजींना इतकं जवळून ओळखणारे हे हिरो स्वतंत्र भारतात कायम दुर्लक्षित ठेवले गेले. आज त्यांनी दिलेल्या दोन शब्दांना बोलताना देशप्रेमाचे स्फुरण चढते, रक्त सळसळते पण खेदाने त्या शब्दांना जन्म देणारे हे हिरो मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झाले आहेत. आबिद हसन सॅफ्रॉनी यांच्या स्मृतीस माझं वंदन आणि त्यांना माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल, बेटर इंडिया 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday 21 November 2020

एका गावाची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका गावाची गोष्ट... विनीत वर्तक ©

भारतात सध्या ४ जी चा जमाना आहे पण ह्या ४ जी च्या काळात ही भारतात असं एक गाव आहे जिकडे आजही फक्त पी.सी.ओ. संवाद साधला जाऊ शकतो. आजही ३ रुपये/ मिनिट ह्या दराने फोन लावावा लागतो. जिकडे मोबाईल २ जी, ४ जी वगैरे सगळं कोसो लांब आहे. जिकडे एका मिठाच्या पॅकेट ची किंमत २५० रुपये आहे तर एक किलो साखरेसाठी २०० रुपये मोजावे लागतात तर एक सिमेंट ची गोण तब्बल ७००० रुपयांना मिळते. ह्या गावात एकच सरकारी शाळा आहे जिकडे शिक्षक येणं हेच मुलांसाठी मोठी गोष्ट असते आणि १० ची परीक्षा देण्यासाठी तब्बल ९ दिवस ट्रेक करून डोंगर पार करावे लागतात. तेव्हा कुठे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी पोहचू शकतो. ह्या गावातल्या लोकांना एखाद वाहन अथवा चित्रपटगृह किंवा ट्युबलाईट बघण्यासाठी १५० किलोमीटर च अंतर कापावं लागते. आज २०२० मध्ये सगळ्या सुविधा आपल्या पायाशी उभ्या आहेत तर तिकडे साधारण आयुष्य जगण्यासाठी भारतातल्या एका गावाला संघर्ष करावा लागतो आहे. ह्या गावात राहणाऱ्या लोकांनी त्याची निवड नाही केली तर ते स्विकारलं आहे भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी. वाचून आश्चर्य वाटेल पण ह्या गावात राहणाऱ्या २०० कुटुंबीयांनी इकडे स्थलांतर केलं ते भारत सरकारच्या आदेशावरून. २७ नोव्हेंबर १९६१ ला इकडे भारतीय सेनेने तिरंगा फडकावला होता आणि त्या दिवसापासून ते आजतागायत हे गाव भारताचा अविभाज्य अंग आहे ते त्या २०० कुटुंबियांमुळे ज्यांनी सगळ्या विपरीत परीस्थितीत ह्या भागात आपलं आयुष्य काढलं. 

१९६१ च्या काळात जेव्हा भारतीय सेनेच्या आसाम रायफल ने भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशावर आपली मोहीम फत्ते केली तेव्हा आसाम रायफल चे माजी अधिकारी मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांना एक असा प्रदेश दृष्टीक्षेपात आला ज्याचं महत्व भारताच्या सिमेच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. ह्या प्रदेशात फक्त जंगल होतं, इथे कोणतीही मनुष्यवस्ती नव्हती. ह्या भूभागाच्या तिन्ही बाजूने भारताला एका देशाने वेढलेलं होतं तो म्हणजे म्यानमार (पूर्वीचा ब्रह्मदेश किंवा बर्मा). भारताचा हा प्रदेश जर सुरक्षित ठेवायचा असेल आणि हा भारताचा भूभाग आहे हे जागतिक मंचावर सिद्ध करायचं असेल तर तिकडे भारतीय लोकांची वस्ती दाखवणं हे अतिशय गरजेचं होत. मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांनी भविष्यातला धोका ओळखताना अतिशय चातुर्याने एक पाऊल उचललं ज्याचा फायदा भारताला आजतागायत होतो आहे. भारताच्या आसाम रायफल च्या २०० सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांनी इकडे वस्ती करण्यासाठी आदेश दिला. ह्या नवीन वस्तीच नाव त्यांनी आपल्या मुलाच्या 'विजय' ह्या नावावरून ठेवताना भारताच्या नकाशावर एका नवीन गावाचा उदय झाला 'विजयनगर'.

भारताच्या अरुणाचल प्रदेश मध्ये विजयनगर वसलेलं आहे. निसर्गचा वरदहस्त लाभलेल्या हे गाव भारतासाठी खूप महत्वाचं आहे. ह्या गावात रस्ते नाहीत जवळच गाव हे म्यानमार मधील पुटाओ हे ४० किलोमीटरवर आहे तर भारतातील रस्ते असलेलं मिओ हे जिल्ह्याचं ठिकाण १५७ किलोमीटर लांब आहे. विजयनगर ला जायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे भारतीय हवाई दल. रस्ते नसलेल्या ह्या गावात भारतीय वायु दलाची धावपट्टी आहे. Advanced Landing Ground (ALG) ही इकडे येण्याचा एकमेव मार्ग आहे. इकडे येणारं प्रत्येक सामान हे भारतीय वायु दलाच्या हेलिकॉप्टर किंवा कुलीन मार्फत आणलं जाते. ९ दिवसांच ट्रेकिंग केल्याशिवाय इकडे येण्याचा मार्ग नाही म्हणून इकडे येणारी प्रत्येक वस्तूची किंमत ही जवळपास ३ ते ४ पट आहे. इकडे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ह्याच दिव्यातून पुढे जावं लागत आहे. 

समुद्रसपाटीपासून जवळपास ५००० फूट उंचीवर वसलेलं विजयनगर हे भारताचं अविभाज्य अंग आहे. पण आज त्या अंगाला भारताशी नाळेप्रमाणे जोडून ठेवणारी ती २०० कुटुंब आणि त्यांच्या पिढ्या आजही सर्वसामान्य सुविधांपासून वंचित आहेत. आज भारताच्या स्वातंत्र्याला जवळपास ७३ वर्ष झाली. ह्या ७३ वर्षात अनेक सरकार बदलली पण विजयनगर मात्र आजही त्याच सुविधांच्या अपेक्षेत आस धरून बसलं आहे. इथल्या लोकांकडे भारतीय पासपोर्ट आहे. भारतीय नागरीकत्व आहे. त्याच जोरावर आज तिन्ही बाजूने म्यानमार ने वेढलेला भाग भारताचं अस्तित्व राखून आहे पण अश्या अतिशय महत्वाच्या प्रदेशाकडे गेल्या ७० वर्षात ना कोणत्या राज्यकर्त्याचे लक्ष गेलं न इकडे काही विकास झाला. 

भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इकडे बदललेल्या वाऱ्यांच अस्तित्व जाणवायला लागलं आहे. भारताने गेल्या काही वर्षात आपल्या अतिपूर्वेकडील राज्यांकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. इकडे दळवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे  Arunachal Pradesh Frontier Highway जवळपास २००० किलोमीटर लांब आणि ४०,००० कोटी रुपये किंमत असलेला हा रस्ता अरुणाचल प्रदेश सोबत विजयनगर इथल्या लोकांच्या अंधारमय आयुष्यात एक सोनेरी पहाट बनेल अशी आशा इथली लोक बाळगून आहेत. विजयनगर वर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. नांदाफा नॅशनल पार्क ला खेटून विजयनगर वसलेलं आहे. ( Namdapha National Park is a 1,985 km2 (766 sq mi) large protected area in Arunachal Pradesh of Northeast India.) त्यामुळे जर रस्ता झाला तर पर्यटनाच्या दृष्टीने विजयनगर जागतिक पटलावर आपलं नाव उमटवू शकेल. रोजगाराच्या अनेक संधी सैनिकांच्या कुटूंबियांना उपलब्ध होतील. 

भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांना जंगलात नेऊन तब्बल ६० वर्षापेक्षा जास्त काळ वनवास जगणाऱ्या विजयनगरच्या त्या ४४३८ पेक्षा जास्ती भारतीय लोकांना माझा साष्टांग नमस्कार. आज त्यांच्यामुळे विजयनगर भारताचा भाग आहे. आज त्या जंगलाच्या मध्यभागात माझा तिरंगा मोठ्या दिमाखाने झळकतो आहे. त्या सर्वाना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Saturday 7 November 2020

पाकिस्तान ला हादरवणार फॉक्सबॅट... विनीत वर्तक ©

पाकिस्तान ला हादरवणार फॉक्सबॅट... विनीत वर्तक ©

भारतीय सैन्याच्या शौर्याच्या इतिहासात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य जनतेच्या समोर येत नाहीत. भारतीय हवाई दलाच्या फक्त एका लढाऊ विमानाने संपुर्ण पाकिस्तान ला हादरवलं होत आणि त्यांना अमेरीकेकडून मिळालेल्या नवीन एफ १६ नी सर्व शक्ती पणाला लावून पण भारताच्या एका लढाऊ विमानाला ते पकडू शकले नव्हते. भारताची हवेतील ताकद काय आहे हे त्या दिवशी पाकिस्तान कळून चुकलं होतं. २७ मे १९९७ च्या दिवशी इस्लामाबाद, पाकिस्तान च्या आकाशात एक बॉम्बस्फोटा सारखा आवाज झाला. संपुर्ण इस्लामाबाद त्या आवाजाने हादरून गेलं. इस्लामाबाद च्या रस्त्यावर लोक घाबरून उतरले. तो आवाज केला होता भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाने ज्याचं नाव होतं 'फॉक्सबॅट'. 

२७ मे १९९७ ह्या दिवशी फॉक्सबॅट म्हणजेच मिग २५ आर ह्या विमानाने दिवसाढवळ्या इस्लामाबाद, पाकिस्तान च्या आकाशात जाणूनबुजून सॉनिक बूम निर्माण केली. सॉनिक बूम ही एक शॉक व्हेव आहे. एखादी गोष्ट जेव्हा ध्वनी पेक्षा जास्त वेगाने हवेतून प्रवास करते तेव्हा निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी एकमेकांवर आपटून ध्वनी ची ऊर्जा आवाजाच्या रूपाने बाहेर पडते. हा आवाज कानठळ्या बसवणारा एखाद्या स्फोटासारखा असतो. पाकिस्तान च्या आकाशात भारताच्या 'फॉक्सबॅट' ने जाणून बुजून ध्वनी ची रेषा ओलांडली आणि पाकिस्तान ला त्याची जागा दाखवली. ह्या नंतर पाकिस्तानी रडार ने भारतीय विमानाला टिपल्यावर पण पाकिस्तान च्या एकाही लढाऊ विमानाला त्याला पकडणं तर सोडाच पण त्याला साधी भिती पण निर्माण करता आली नाही. भारताच फॉक्सबॅट इस्लामाबाद च्या आकाशात राजा सारखं आपल अस्तित्व दाखवून शांतपणे भारतात बरेली इकडे आपल्या बेस वर परत आलं. पाकिस्तान ची तेव्हा नवीन असलेली एफ १६ सुद्धा हात हलवत सीमेवरून परत गेली होती. 

फॉक्सबॅट (मिग २५ आर) असं एक ब्रह्मास्त्र भारतीय हवाई दलाकडे होत ज्याचं उत्तर देण्याची ताकद जिकडे अमेरीकेकडे नव्हती तिकडे पाकिस्तान काय करणार? फॉक्सबॅट (मिग २५ आर) मध्ये असं काय होतं की ज्याची कल्पना पाकिस्तान सोडाच पण भारतीय हवाई दलातील लोकांना नव्हती. खरे तर अशी कोणती लढाऊ विमान भारतीय वायु दलाचा भाग आहेत हेच एक मोठं गुपित होतं. बरेली इकडे भारतीय वायु दलाचा एखादा बेस आहे हेच त्याकाळी माहित नव्हतं. फॉक्सबॅट (मिग २५ आर) हे रशिया निर्मित लढाऊ विमान सोव्हियत युनियन च्या काळात बनवलं गेलं होतं. अमेरीकेच्या एस आर ७१ (ब्लॅकबर्ड) च उत्तर म्हणजेच फॉक्सबॅट (मिग २५ आर). 

४०,००० किलोग्रॅम (४० टन) उड्डाण करतानाच वजन घेऊन हवेत झेपावणार फॉक्सबॅट हवेत ५० किलोमीटर च अंतर अवघ्या एका मिनिटात कापायचं. बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगात उड्डाण भरताना ध्वनीपेक्षा ३ पट वेगाने (३७०० किलोमीटर/ तास) जाण्याची त्याची क्षमता होती. त्याहीपेक्षा महत्वाचं होत ते ज्या उंचीवरून ते उड्डाण भरू शकत होत. जवळपास ७५,००० ते ९०,००० फूट उंचीवरून त्याची उड्डाण भरण्याची क्षमता होती. (एफ १६ जिकडे ४०,००० ते ५०,००० फूट उंचीपर्यंत उड्डाण भरू शकते.). ३ मॅक चा वेग आणि एव्हरेस्ट पेक्षा तिप्पट उंचीवरून उडताना पण त्यावरील १२०० मी. मी. चा कॅमेरा पंजाब आणि काश्मीर मधून उडताना संपुर्ण पाकिस्तान आणि चीन चा तिबेट ह्याचा वेध घेऊ शकत होता. एका भारतीय लढाऊ पायलट ने फॉक्सबॅट बद्दल सांगितलं होत, 

"From the height at which we fly, you can see the entire Himalayan range at one go. No aircraft has ever been able to achieve for us what the Foxbat has".

 ७०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवरून उड्डाण करण म्हणजे जवळजवळ अवकाशातून वेध घेण्यासारखं होत ह्यासाठी ह्या विमानाच सारथ्य करणाऱ्या वैमानिकांना स्पेससूट प्रमाणे वेगळा युनिफॉर्म घालावा लागत होता. भारताने रशियाकडून १० फॉक्सबॅट विकत घेतली होती. जवळपास ४२ वैमानिकांनी ह्याच सारथ्य केलं ज्यांची नाव आजही गुप्त ठेवलेली आहेत. हे सगळे वैमानिक विंग कमांडर ह्या कमीतकमी श्रेणीतील होते तर उड्डाणाचा अतिशय अनुभव आणि त्यांच्या कारकिर्दीत एकही डाग नसणं हे बंधनकारक होतं. ह्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की फॉक्सबॅट च सारथ्य करणारे सर्वोत्तम मधले सर्वोत्तम होते. 

पाकिस्तान ने एफ १६ घेतल्यावर तो भारतावर कुरघोडी केल्याच्या आनंदात असताना भारतीय वायू दलाच्या फॉक्सबॅट ने ७५,००० फुटावरून पाकिस्तान गाठून मुद्दामून सॉनिक बूम तयार केली आणि नुसत्या सॉनिक बूम ने पाकिस्तान ला हादरवून सोडलं होतं. फॉक्सबॅट ने आपलं अस्तित्व दाखवेपर्यंत पाकिस्तान ला त्याची काहीच कल्पना नव्हती. फॉक्सबॅट चा वेग आणि त्याची उंची गाठणं पाकिस्तान च्या एफ १६ ला शक्य नसल्याने त्याला बघण्यापलीकडे पाकिस्तान काही करू शकला नव्हता. असं म्हंटल जाते की कित्येक वेळा फॉक्सबॅट ने अवघ्या काही उड्डाणात संपुर्ण पाकिस्तान चा काना-कोपरा पिंजून काढला होता आणि त्याची छोटीशी कल्पना सुद्धा पाकिस्तान ला कधी आली नव्हती. फॉक्सबॅट चा वेग हे त्याच अस्त्र असलं तरी त्यासाठी एका फेरीत तब्बल २३,००० लिटर इंधन त्याची इंजिन पिऊन टाकत होती. ७० च्या दशकात हेरगिरी करण्यासाठी बनवलं गेलेलं फॉक्सबॅट काळाच्या ओघात त्याचे जुने होणारे भाग आणि देखभालीचा खर्च ह्यामुळे महाग झालं होतं. त्यात ड्रोन तंत्रज्ञानामुळे त्याची गरज कमी झाली होती. २००६ साली भारताने आपल्या ब्रह्मास्त्राला भात्यातून निवृत्त केलं. 

फॉक्सबॅट चा धसका आजही पाकिस्तान विसरू शकलेला नाही. फॉक्सबॅट भारतीय वायू दलाचं एक असं अस्त्र होतं ज्या बद्दल कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती. आज निवृत्ती नंतर फॉक्सबॅट ला आपण दिल्ली इकडे भारतीय हवाई दलाच्या म्युझिअम मध्ये बघु शकतो. आपल्या नुसत्या रौद्र आवाजाने पाकिस्तान ला सळो की पळो करून सोडणाऱ्या फॉक्सबॅट ला माझा कुर्निसात. फॉक्सबॅट च सारथ्य करणाऱ्या त्या सर्व वैमानिकांना माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल, इंडियन एअर फोर्स. 

माहिती स्रोत:- गुगल, बेटर इंडिया, इंडियन एअर फोर्स

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Friday 6 November 2020

एका हॅलो चा प्रवास... विनीत वर्तक ©

 एका हॅलो चा प्रवास... विनीत वर्तक ©

कोणत्याही संभाषणाची सुरवात 'हॅलो' ह्या शब्दाने करण्याची पद्धत जगभर मान्यता पावलेली आहे. खरे तर ह्या 'हॅलो' ह्या शब्दाचा जनक प्रख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडीसन. त्याच्याच पुढाकाराने हा शब्द जगभर प्रसिद्ध झाला. गेल्या आठवड्यात म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२० ला एका संभाषणाची सुरवात पुन्हा एकदा ह्याच शब्दाने झाली आणि मानवाच्या तांत्रिक क्षमतेने संपुर्ण जग थक्क झालं कारण समोरून आलेला 'हॅलो' हा शब्द तब्बल १८.८ बिलियन किलोमीटर वरून ३४ तासांचा प्रवास करून पृथ्वीवर पोहचलेला होता. हा सगळा वेळ जगातील वैज्ञानिक, शास्त्रज्ञ ह्यांची कसोटी पाहणारा तर होताच पण त्याही पेक्षा ४३ वर्षाआधी मानवाच्या तत्रंज्ञानाच्या क्षमतेला एक कुर्निसात होता.

अमेरीकेच्या नासा ने २० ऑगस्ट १९७७ ला विश्वाच्या अनंत प्रवासाला जाणाऱ्या एका यानाच प्रक्षेपण केलं. ज्याचं नाव होतं 'व्हॉयजर २'. व्हॉयजर २ ने आपल्या प्रवासात सौर मालेतील गुरु, शनी, युरेनस, नेपच्युन ग्रहांना भेटी दिल्या. सौर मालेच्या पलीकडे आपला प्रवास त्याने सुरु ठेवलेला आहे. ५५,२३० किलोमीटर/ तास ह्या वेगाने ते पृथ्वीपासून लांब जात आहे. ह्या यानाने नेपच्युन ला भेट दिल्यानंतर आपल्या प्रवासाची दिशा बदलून आपल्या पृथ्वीपासून दक्षिणेकडे प्रवास सुरु केला. समजा आपल्या सूर्यमालेतील सगळे ग्रह एका पातळीवर आणले तर व्हॉयजर २ आता त्या पातळीच्या दक्षिणेकडे आपला प्रवास करत आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे नासा ज्या पद्धतीने ह्या यानाशी संवाद साधते ती यंत्रणा म्हणजेच नासाचे डीप स्पेस नेटवर्क. 

नासाच्या डीप स्पेस नेटवर्क मधील अँटेना ज्या संदेश ग्रहण करतात अथवा पाठवतात त्यातील डी.एस.एस. ४३ ही अँटेना कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया इकडे आहे. हीच अँटेना व्हॉयजर २ यानाशी संवाद साधू शकत आहे. ह्यामागे कारण आहे व्हॉयजर २ चा होणारा दक्षिणेकडील प्रवास. व्हॉयजर २ ज्या प्रमाणे वर सांगितलं तसं दक्षिणेकडे प्रवास करत असल्याने पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात असणाऱ्या अँटेनांशी त्याचा संवाद होऊ शकत नाही. व्हॉयजर २ हे यान पाठवण्याआधी नासाने आपलं डीप स्पेस नेटवर्क बनवलेलं होतं. गेली ४७ वर्ष ही यंत्रणा न थांबता आपली सेवा नासाला देत होती. पण ह्या यंत्रणेला दुरुस्त करण्यासाठी तसेच अद्यावत करण्यासाठी काही काळ बंद करण्याचा निर्णय नासाने मार्च २०२० ला घेतला. जवळपास वर्षभर हे काम सुरु राहणार होतं. ह्या काळात व्हॉयजर २ ला  कोणत्याही प्रकारचं संदेश देणं शक्य होणार नव्हतं. वेळेआधी काम थोडंफार झाल्यावर नासाने २० ऑक्टोबर २०२० ला यंत्रणा सुरळीत दुरुस्त झाली आहे का नाही बघण्यासाठी व्हॉयजर २ ला संदेश पाठवला. व्हॉयजर २ ने तो संदेश ग्रहण करून नासाच्या संदेशाला 'हॅलो' बोलत आपण सुस्थितीत असल्याचं कळवलं आहे. 

व्हॉयजर २ वरील सगळ्या यंत्रणा ह्या जवळपास ४३ ते ४५ वर्षापूर्वी फक्त ५ वर्ष विश्वाच्या पोकळीत काम करू शकतील अश्या बनवल्या होत्या. पण आज ४३ वर्षानंतर ही व्हॉयजर १ आणि २ मधील यंत्रणा सुस्थितीत असुन पृथ्वीशी संवाद साधत आहेत. व्हॉयजर २ ऊर्जा देण्यासाठी  Multihundred-Watt radioisotope thermoelectric generators (MHW RTG) प्लुटोनियम ह्या समस्थानिकाचा वापर केला गेला होता. ह्याच अर्ध आयुष्य ८७.७ वर्षाच आहे. ह्याचा अर्थ ८७.७ वर्ष ही बॅटरी १५७ वॅट ची ऊर्जा सतत न थांबता व्हॉयजर २ ला देऊ शकणार आहे. आज ही सगळी यंत्रणा विश्वाच्या पोकळीत अगदी शांतपणे आपला प्रवास अनंताकडे करताना पृथ्वीशी संवाद साधत आहे. 

गेले जवळपास ७ महीने व्हॉयजर २ कोणत्याही कमांड शिवाय आपला प्रवास करत होतं. गेल्या आठवड्यात आलेल्या 'हॅलो' ने नासाच्या जवळपास ५० वर्ष मागच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीला कुर्निसात केला आहे. गेल्या ५० वर्षात तंत्रज्ञान क्षमता कित्येक पट वेगाने पुढे गेली आहे. ह्याचा अर्थ नासाकडे असलेली तांत्रिक क्षमता आज किती उंचीवर असेल ह्याचा अंदाज आपण बांधु शकत नाही. १८.८ बिलियन किलोमीटर वरून निघालेल्या हॅलो चा प्रवास हा मानवाच्या तांत्रिक क्षमतेतील एक मैलाचा दगड आहे. व्हॉयजर २ च्या निर्मितीमागे असणाऱ्या नासाच्या सगळ्याच वैज्ञानिक, संशोधक आणि अभियंते ह्यांना माझा कुर्निसात. 

फोटो स्रोत :- नासा, अमेरीका (एका फोटोत नासाचे व्हॉयजर २ यान, दुसऱ्या फोटोत डी.एस.एस. ४३ ही अँटेना कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया ) 

माहिती स्रोत:- नासा, अमेरीका 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



    

   

Wednesday 4 November 2020

बिडेन की ट्रम्प... विनीत वर्तक ©

 बिडेन की ट्रम्प... विनीत वर्तक ©

अमेरीका मध्ये सध्या चालू असलेल्या निवडणुकी मध्ये कोण विजयी होतं ह्याची उत्सुकता भारतात खुप जास्ती प्रमाणात ताणली गेली आहे. आज सगळ्याच टी.व्ही. चॅनेल मध्ये ह्याच बातम्या सुरु आहेत. खरे तर अमेरीकेत कोण विजयी होत अथवा पराभूत होत ह्याचा काही परीणाम सामान्य भारतीय माणसाच्या आयुष्यात काहीच होणार नाही. खरे तर भारत आणि अमेरीका संबंधात ही त्याचा खूप मोठा प्रभाव पडेल असं चित्र सध्या तरी नाही. बिडेन जिंकोत अथवा तात्या ट्रम्प भारत आणि अमेरीका संबंध येत्या काळात दृढ होणार आहेत ही काळाची गरज आहे. 

बिडेन आणि ट्रम्प ह्या दोघांसाठी अमेरीकेचे हितसंबंध सगळ्यात जास्ती महत्वाचे आहेत. अमेरीकेचा कुठे फायदा तिकडे हे दोघेही आपलं वजन वापरणार हे सर्वश्रुत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अमेरीकन आणि एकूणच जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. चीन चा सर्वच क्षेत्रातील वाढता प्रभाव अमेरीकेसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे चीन ला मागे खेचण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे दोघेही करणार आहेत. कोरोना आणि लडाख च्या प्राश्वभूमीवर भारत ह्या लढाईत निर्णायक भुमिकेत असल्यामुळे अमेरीकेच्या दृष्टीने भारताशी सर्वच संबंध चांगले आणि घट्ट ठेवावे लागणार आहेत. भारत हा चीन वर अंकुश ठेवण्यात महत्वाचा साथी आहे हे अमेरीकेला चांगल माहीत आहे. फरक इतकाच की ट्रम्प ह्यांची भुमिका एकला चालो रे अशी होती तर बिडेन ह्यांची भुमिका थोडी मवाळ म्हणजेच सबका साथ अशी असेल. 

ट्रम्प आणि आपले पंतप्रधान ह्यांचे संबंध चांगले असले तरी देशाच्या राजकारणाचा विचार करताना ह्या गोष्टींचा इतका प्रभाव पडत नाही. ट्रम्प हे जितके चांगले वाटतात तितकेच बेभरवशाचे राहीले आहेत. अनेकदा त्यांच्या भुमिका ह्या गोंधळवून टाकणाऱ्या राहिल्या आहेत. अमेरीका फर्स्ट सांगताना त्यांनी भारताच्या उत्पादन आणि आयतीवर टीका केली आहे. पण त्याचवेळी काश्मीर प्रश्नी त्यांनी उघडपणे भारताची भूमिका घेतली आहे आणि भारताविरुद्ध काहीही टिका करण्यापासून लांब राहिले आहेत. पण त्यांची ही भुमिका आश्वासक वाटली तरी ती निर्णायक असेल ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. ह्याचवेळी बिडेन ह्यांची भुमिका भारताविरुद्ध अशी थोडी राहिली आहे. काश्मीर मधली गळचेपी आणि तिथल्या लोकांचे अधिकार ह्याबद्दल त्यांनी भारताला आवडणार नाहीत अशी वक्तव्य केली आहेत. पण जेव्हा अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बनून आपली भूमिका मांडतील तेव्हा मात्र त्यांना भारत दुखावला जाणार नाही ह्याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. 

आर्थिक बाजुवर कोणीही आलं तरी फारसं भारतासाठी काही बदलणार नाही. जागतिक मंचावर बिडेन जर राष्ट्रपती झाले तर पुन्हा एकदा क्लायमेट एग्रीमेंट मध्ये अमेरीका पुन्हा एकदा समाविष्ट होऊ शकते आणि भारताला त्या क्षेत्रात मदत मिळण्याच्या शक्यता आहेत. तात्या ट्रम्प हे लहरी खटल आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे. त्या विरुद्ध बिडेन ह्यांची भुमिका सर्वसमावेशक आणि निर्णायक असेल. ट्रम्प नि ज्या पद्धतीने कोरोना परीस्थिती अमेरीकेत हाताळली त्या विरुद्ध अमेरीकेन जनतेत असंतोष आहे. त्याच प्रमाणे अमेरीकेन कृष्णवर्णीय लोकांमध्ये त्यांच्या विरुद्ध असंतोष आहे. त्यामुळे बिडेन ह्यांना पसंती मिळत असली तरी चीन विरुद्ध आणि अमेरीका फर्स्ट ही ट्रम्प ह्यांची भुमिका अमेरीकन जनतेच्या पसंतीला उतरली आहे. 

तात्या ट्रम्प हरले आणि बिडेन जिंकले तर भारताच्या मोदींना काही प्रमाणात शह मिळेल अशी भोळी आशा काही जणांना वाटत आहे. पण इकडे एक आपण विसरत आहोत की भारताची किंबहुना मोदींची डिप्लोमसी ओबामांच्या वेळी ही स्पेशल होती आणि तात्या ट्रम्प सोबत ही स्पेशल आहे आणि उद्या जर बिडेन आले तर त्यांच्या सोबत पण अशी बघायला मिळाली तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण ही स्पेशल डिप्लोमसी त्या पदासाठी असते हे आपण समजून घेतले पाहिजे. कोणी भारतात जर ट्रम्प हरावेत म्हणून देव बुडवून बसले असतील तर त्यांना जागतिक राजकारण समजून घ्यायची खूप गरज आहे. 

तात्या ट्रम्प येवोत अथवा बिडेन येवोत भारतासाठी अमेरीका आणि अमेरीकेसाठी भारत हे महत्वाचे आहेत आणि येत्या काळात महत्वाचे राहणार आहेत. त्यामुळे कोणीही आलं तरी भारताचा विचार आपण भारतीय म्हणून करायला हवा. आजवर स्वतःची भारतीय ओळख लपवून ठेवणाऱ्या कमला हॅरिस जेव्हा निवडणुकीत भारतीय वंशाचे असल्याचा डंका वाजवतात त्याचप्रमाणे भारताने ही आपला फायदा कुठे आहे हे बघून आपली मैत्री तितकीच वाढवावी ही काळाची गरज आहे. एकूणच काय बिडेन अथवा ट्रम्प भारताला आणि भारतीयांना त्याने जास्ती काही फरक पडणार नाही. 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 2 November 2020

एव्हरेस्ट शोधणारे भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर... विनीत वर्तक ©

एव्हरेस्ट शोधणारे भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर... विनीत वर्तक ©

पृथ्वीवरील सगळ्यांत उंच ठिकाण कोणतं, असं विचारलं तर प्रत्येकाच्या तोंडी नाव येतं, ते म्हणजे "माऊंट एव्हरेस्ट". नेपाळ आणि तिबेटच्या भागावर वसलेलं, जवळपास ८८४८ मीटर (२९,०२८ फूट) इतकं समुद्र सपाटीपासून उंच असलेलं, हिमालय पर्वतरांगांमधलं सर्वांत उंच टोक. आजवर ५२९४ लोकांनी ९१५९ वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. जगातील सगळ्याच गिर्यारोहकांचे स्वप्न राहिलेल्या माऊंट एव्हरेस्टचं नाव हे रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीने सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या स्मरणार्थ दिलेलं आहे. पण किती जणांना हे माहीत आहे, की जगातील सगळ्यात उंच शिखराचा शोध एका भारतीय गणिततज्ञाने लावलेला आहे? त्यांचं नाव होतं 'राधानाथ सिकदर'. पारतंत्र्यात असणाऱ्या भारतातल्या कोणाला हा मान देणं ब्रिटीशांची पद्धत नव्हती, ना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचीच री ओढणाऱ्या भारतीयांना याची कधी दखल घ्यावीशी वाटली. काळाच्या ओघात पृथ्वीवरचं सगळ्यात उंच टोक शोधणारा भारतीय गणितज्ञ इतिहासाच्या पानात लुप्त झाला.

१८५२ चा काळ होता. एके दिवशी सर अँड्रयू वॉ यांच्या भारताच्या उत्तर-पूर्व भागाचं सर्वेक्षण करणाऱ्या कार्यालयातून एक कर्मचारी धावत आला. त्याने अतिशय आनंदाने त्यांना बातमी दिली, की त्याने जगातील सगळ्यात उंच टोकाचा शोध लावला आहे. आपलं सर्वेक्षणाचं काम करताना नेपाळ-भूतानच्या सीमेवर एका उत्तुंग शिखराची उंची, त्याने त्या शिखरावर न जाता गणिताच्या साहाय्याने शोधली होती. त्याकाळी ज्ञात असणाऱ्या उंच शिखरांमध्ये सर्वात उंच टोकाचा मान हिमालयातील कांचनगंगा या शिखराला होता. कांचनगंगाची उंची साधारण ८५८६ मीटर (२८,१६९ फूट) होती. पण त्या कर्मचाऱ्याने गणिताच्या साहाय्याने हिमालयातील माहिती नसलेल्या शिखराची उंची जवळपास २९,००० फूट भरत असल्याचा शोध लावला होता. त्या शिखराला तेव्हा "एक्स व्ही" असं नाव होतं. हा कर्मचारी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर होते. सर अँड्रयू वॉ यांना वाटलं, २९,००० फूट हा आकडा जर आपण जर्नल मध्ये प्रसिद्ध केला तर तो अनेकांना ढोबळमानाने लिहिल्यासारखा वाटेल, म्हणून त्यांनी त्यावर २ फूट वाढवून या शिखराची उंची २९,००२ फूट असल्याचं १८५६ च्या एशियाटिक सोसायटी, कोलकाता इकडे जाहीर केलं.

राधानाथ सिकदर यांचा जन्म १८१३ मध्ये कोलकाता इकडे झाला. लहानपणापासून त्यांना गणिताची आवड होती. आपलं गणितावरचं प्रभुत्व त्यांनी लहानपणी सिद्ध केलं होतं. आपल्या कॉलेजच्या दिवसात त्यांनी दोन वर्तुळांना समान असणारी स्पर्शिका शोधण्याचं सूत्र गणिताने शोधलेलं होतं. त्याकाळी कॉम्प्युटर नसल्याने गणितात अव्वल असणाऱ्या लोकांना ब्रिटीश सरकारच्या नोकरीचे दरवाजे खुले केले जायचे. त्यांच्या या बुद्धीमत्तेची क्षमता त्याकाळी त्यांना ब्रिटीश सरकारच्या जी.टी.एस. म्हणजेच (Great Trigonometrical Survey) मध्ये नोकरी देऊन गेली. सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नेतृत्वाखाली राधानाथ सिकदर यांनी भूसर्वेक्षणाचं आणि डोंगर रांगांची उंची मोजण्याचं काम सुरु केलं. १८४३ मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट निवृत्त झाल्यावर सर अँड्रयू वॉ यांनी ते काम पुढे न्यायला सुरूवात केली. १८४७ पर्यंत त्यांनी दार्जिलिंग आणि कांचनगंगाची उंची मोजलेली होती.

उंची मोजण्यासाठी त्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या शिखराचा वेध घेऊन त्रिकोणमितीच्या साहाय्याने त्याची उंची ठरवली जात होती. पण सगळ्यात मोठी अडचण होती ती पृथ्वीच्या वातावरणामुळे होणाऱ्या प्रकाशाच्या अपवर्तनाची (terrestrial refraction). पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना प्रकाशाचं अपवर्तन लक्षात घेणं अचूक उंचीसाठी गरजेचं होतं. त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणाहून गणित करून उंची मोजली जात होती. 'माऊंट एव्हरेस्टची' म्हणजेच शिखर 'एक्स व्ही' ची उंची मोजण्यासाठी जरोळ, मिर्झापूर, जनीपती, लाडानीया, हरपूर आणि मिनाई ह्या सहा ठिकाणांहून (ही सर्व ठिकाण उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील आहेत) राधानाथ सिकदर यांनी त्याची उंची मोजली. जी प्रत्येकवेळी २९,००० फूट भरली. जेव्हा सगळ्या ठिकाणाहून उत्तर सारखं आलं, तेव्हा आपण जगातील सगळ्यात उंच टोक शोधल्याचं राधानाथ सिकदर यांना कळलं. याची माहिती जेव्हा त्यांनी आपले वरिष्ठ सर अँड्रयू वॉ यांना दिली, तेव्हा त्यांनी अचूकतेसाठी त्यापुढे २ फूट लावले आणि जगातील सगळ्यात उंच टोकाची समुद्रसपाटीपासून उंची २९,००२ फूट असल्याचं जाहीर केलं.

या शोधाचे खरे जनक भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर हे होते, पण त्यांचं कर्तृत्व ब्रिटीशांनी जाणूनबुजून दडपताना १८६५ मध्ये शिखर 'एक्स व्ही'चं नाव सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या प्रयत्नांसाठी "माऊंट एव्हरेस्ट" असं ठेवलं. आजपर्यंत संपूर्ण जग हिमालयातील त्या उत्तुंग अश्या शिखराला माऊंट एव्हरेस्ट असं संबोधते, पण त्याची ओळख जगाला दाखवून देणाऱ्या भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर यांना खुद्द भारतीय ओळखत नाहीत तिकडे जगाकडून काय अपेक्षा! खरे तर माउंट एव्हरेस्टचं नाव आज "माऊंट सिकदर" अथवा "माऊंट राधानाथ" असं असायला हवं होतं, पण ब्रिटीशांनी जाणूनबुजून इतिहासाच्या पानातून पण राधानाथ सिकदर यांचं कर्तृत्व त्यांच्या मृत्यूनंतर लुप्त केलं ते कायमचं. तंत्रज्ञानातील प्रगतीनंतर १९५४ साली माऊंट एव्हरेस्टची अधिकृत उंची २९,०२८ फूट ( ८८४८ मीटर) असल्याचं जगाने मान्य केलं, पण जवळपास १०० वर्षं आधी एव्हरेस्टवर चढाई न करता काही फुटांच्या अचूकतेने (इकडे एक लक्षात घ्यायला हवं की दरवर्षी एव्हरेस्ट ची उंची ४ मिलीमीटरने वाढते आहे) एव्हरेस्टची उंची मोजणारे भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झाले. त्यांच्या कर्तृत्वाला माझा साष्टांग नमस्कार. एक भारतीय म्हणून मला नेहमीच तुमचा अभिमान वाटेल आणि प्रत्येकवेळी माऊंट एव्हरेस्ट जेव्हा समोर येईल, तेव्हा तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाची तो साक्ष माझ्यासकट प्रत्येक भारतीयाला देईल.

माहिती स्रोत :- गुगल, भारतीय इतिहास

फोटो स्रोत :- गुगल  

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.