Tuesday 15 December 2020

१६ डिसेंबर... विनीत वर्तक ©

 १६  डिसेंबर... विनीत वर्तक ©

१६ डिसेंबर १९७१ म्हणजेच बरोबर ४९ वर्षापूर्वी पाकिस्तान ला दुसऱ्या महायुद्धा नंतरचा सगळ्यात लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. पाकिस्तान ला आपली कुवत भारताने ह्याच दिवशी दाखवून दिली होती. पाकिस्तान चे निर्माते मोहम्मद अली जीना ह्यांच्या दोन बाजूचा पाकिस्तान ह्या स्वप्नाला भारताने बेचिराख केलं होतं. पाकिस्तान ला आपल्या अर्ध्या भागावर पाणी सोडायला लागलं तर होतच पण त्याच्या ९३,००० सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे आत्मसमर्पण केलं होतं. जगाच्या आजवरच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धानंतर इतका लाजिरवाणा पराभव कोणत्याही देशाचा झालेला नाही. 

अवघ्या १३ दिवसात भारतीय सेनेने पाकिस्तान च्या सेनेला पाणी पाजलं होतं. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्यावेळेचे भारतीय सैन्य प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ ह्यांना पाकिस्तान ला त्यांची जागा दाखवण्याचा हुकूम दिला होता. पाकिस्तान सेनेने ने पूर्व पाकिस्तान मध्ये सामान्य लोकांवर अत्याचार सुरु केले होते. जवळपास ३ लाख ते ३० लाख लोकांचा ह्यात मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ज्यात बलात्कार, त्रास, छळ आणि खून अश्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टींचा समावेश होता. पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढे भारतात यायला लागले आणि भारताची परिस्थिती बिकट होत चालली होती. 

ह्या सगळ्यात पाकिस्तान ने भारताला डिवचण्यासाठी भारताच्या ११ हवाई अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. भारताच्या तिन्ही दलांनी पहिल्यांदा एकत्र कारवाई करताना अवघ्या १३ दिवसात पाकिस्तानी सेनेची दाणादाण उडवली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यावर आपल्या आणि आपल्या सैनिकांच रक्षण करण्यासाठी आत्मसमर्पण करण्याशिवाय पाकिस्तान चे लेफ्टनंट जनरल ए.ए.के. नियाझी ह्यांनी भारताचे सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा ह्यांच्यापुढे सपशेल शरणागती पत्करली. ह्या दोघांनी स्वाक्षरी केलेल्या मसुद्यातील काही भाग इकडे देतो आहे. 

The PAKISTAN Eastern Command agree to surrender all PAKISTAN Armed Forces in BANGLA DESH to Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA, General Officer Commanding in Chief of Indian and BANGLA DESH forces in the Eastern Theatre. This surrender includes all PAKISTAN land, air and naval forces as also all para-military forces and civil armed forces. These forces will lay down their arms and surrender at the places where they are currently located to the nearest regular troops under the command of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA.

The PAKISTAN Eastern Command shall come under the orders of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA as soon as the instrument has been signed. Disobedience of orders will be regarded as a breach of the surrender terms and will be dealt with in accordance with the accepted laws and usages of war. The decision of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA will be final, should any doubt arise as to the meaning of interpretation of the surrender terms. 

ह्या मसुद्याला आज बरोबर ४९ वर्ष झाली आणि ह्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द भारतीयांची मान गौरवाने, देशाभिमानाने उंचावणारा आहे. कोणत्याही सैन्यासाठी शरणागती हा सगळ्यात शेवटचा पर्याय अगदी मृत्यूनंतर समोर असतो. 'बचेंगे तो ओर भी लढेंगे' हे पानिपत च्या युद्धातील वाक्य कोणत्याही सैनिकांसाठी शरणागती ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट असते हे सांगणारा आहे. भारताने ह्या लढाईत पाकिस्तान ला नुसतं हरवलं नाही तर त्यांच्या स्वाभिमानाला ठेचलं आहे. त्यामुळेच प्रत्येक भारतीयाने हा 'विजय दिवस' त्या अनामिक हजारो सैनिकांसाठी, त्यांनी केलेल्या पराक्रमासाठी साजरा करायला हवा. 

आज 'विजय दिवस' आहे. ह्याच दिवशी बांग्लादेश ह्या स्वतंत्र राष्टाची निर्मिती पाकिस्तान च विभाजन होऊन झाली. ह्या सगळ्या निर्मिती मध्ये बलिदान आणि पराक्रम हा भारतीय सैनिकांचा आहे. आजच्या काळातील पिढीला कदाचित ह्या गोष्टी खूप सोप्या वाटतील पण त्याकाळी भारतीय सेनेने दाखवलेल्या पराक्रमाची गाथा आजही तितकीच स्फुरण देणारी आहे. आजच्या दिवशी ह्या लढाईत आपलं सर्वस्व पणाला लावून लढलेल्या त्या अनामिक सैनिकांना एका भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या स्मृतीस वंदन.. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




No comments:

Post a Comment