Tuesday 28 March 2023

चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग २)... विनीत वर्तक ©

 चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग २)... विनीत वर्तक ©

प्रत्येक मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही एक लाईफलाईन आहे. असा एकही मुंबईकर नसेल ज्याने कधी मुंबईत राहून ट्रेन ने प्रवास केला नसेल. माझी तर ट्रेनशी नाळ अगदी जन्मापासून जुळली आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. रेल्वे लाईन ला जवळपास खेटून असलेल्या घरामुळे ट्रेन चा आवाज जन्मापासून भरून राहिला तो आजपर्यंत. त्यामुळेच लोकल ट्रेन किंवा एकूणच भारतीय रेल्वे च्या बदलांचा मी एक मुक साक्षीदार आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय होता त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी थोडासा जास्तीच. किती नवीन गाड्या या वर्षी सुरु होणार? मुंबई करांच्या पदरी दरवर्षी प्रमाणे निराशा की आशेच्या काही गोष्टी घडल्या यावर कित्येक महिने चाललेल्या चर्चांमध्ये मी माझा सहभाग दिलेला होता. पण गेल्या काही वर्षात कात टाकल्याप्रमाणे भारतीय रेल्वे मधे खूप मोठ्या प्रमाणावर बदलांचे वारे वाहू लागले. आता तर त्या वाऱ्यांनी इतका जोर धरला आहे की येत्या काही वर्षात ही नक्की भारतीय रेल्वेच आहे न की आपण परदेशात आहोत असा प्रश्न आपल्याला पडू शकेल. त्यामुळेच मला पुन्हा एकदा असं वाटते आहे की 'चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट'. 

जगातील तिसरं सगळ्यात मोठ रेल्वे नेटवर्क भारतात आहे. भारतात रोज जवळपास २.५ कोटी लोक रेल्वे ने प्रवास करतात आणि त्यात एकट्या मुंबईचा वाटा ७५ लाख प्रवाशांचा आहे. १ लाख २८ हजार किलोमीटर च्या रुळांच्या लांबीवर १३,००० पेक्षा जास्ती ट्रेन धावत असतात. हे आकडेच सांगतात की एकट्या मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे च व्यवस्थापन हे तितकचं कठीण आहे. त्यात भरीस भर म्हणून होणारा भ्रष्टाचार, सरकारी मानसिकता, राजकीय हस्तक्षेप, तसेच भारतीयांची मानसिकता या सगळ्या गोष्टी भारतीय रेल्वे च्या वाढीसाठी किंवा एकूणच त्याचा दर्जा उंचावण्यासाठी सगळ्यात मोठ्या अडचणीच्या होत्या. परदेशातून बुलेट ट्रेन, तिथल्या मेट्रो ट्रेन किंवा रेल्वेतून फिरताना मिळणाऱ्या सुविधा, प्रवासाचा दर्जा आणि स्वच्छता या सर्व गोष्टी आपल्या भारतात कधी येतील असा विचार अनेकदा मनात यायचा. यासाठी अनेक दशके वाट बघावी लागेल हेच उत्तर मिळायचं. 

राजकीय इच्छाशक्ती, सरकारी यंत्रणा, वापर करणारी जनता यांची बदल करून दाखवण्याची इच्छा असेल तर 'स्काय इज द लिमिट' हे आज भारतीय रेल्वे ने सिद्ध करून दाखवलं आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वे ची स्टेशन, ट्रेन आणि एकूणच यंत्रणा यामध्ये खूप त्रुटी होत्या. खराब कोंदट असणारी स्टेशन, प्लॅटफॉर्म  वर येण्या जाण्यासाठी अपुरी असलेली व्यवस्था, स्टेशन च्या ब्रिज वर होणारी गर्दी, वयस्क आणि महिलांना होणारा त्रास, जागोजागी असणारा कचरा हे नॉर्मल होतं. त्याच वेळी रडत खडत जाणाऱ्या ट्रेन, त्यातील टॉयलेट आणि जेवणाची व्यवस्था, ट्रेन मधील एकूणच निराशाजनक वातावरण या सगळ्या गोष्टी भारतीय रेल्वे च्या एकप्रकारे इमेज बनल्या होत्या. जेव्हा इतर प्रवासाचे मार्ग कात टाकत होते तेव्हा प्रत्येक भारतीयाची नाळ जुळलेली रेल्वे मात्र चाचपडत होती. पण गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेच्या या इमेज ला बदलावण्याचे प्रयत्न अगदी सगळ्याच पातळीवर केले गेले ज्यामुळे आज झपाट्याने भारतीय रेल्वे एका नव्या भारताचं आणि भारतीय मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते आहे. 

गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वे मधील स्वच्छता कमालीची वाढलेली आहे. रेल्वे स्टेशन वर बसवलेले सरकते जिने, लिफ्ट आणि इतर व्यवस्था यात खूप बदल झाला आहे. रेल्वे स्टेशन वर जाणं आता एक सुखद अनुभव वाटू लागला आहे. ट्रेन चा वाढलेला स्पीड आणि वक्तशीरपणा अनेकदा सुखद आश्चर्याचा धक्का देतो आहे. भारतीय रेल्वे आता एका नव्या रूपात समोर येऊ लागली आहे. मुंबईकरांसाठी बोलायचं झालं तर घामाच्या धारांची जागा आता एसी च्या थंड हवेच्या  झुळूकेने घेतली आहे. अर्थात एसी लोकल कधी हव्यात, त्यांच्या वेळा आणि फ्रिक्वेन्सी हे मुद्दे वादाचे असू शकतील. पण त्यांनी मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. 

वंदे भारत एक्सप्रेस ने खऱ्या अर्थाने भारतीय रेल्वे आणि भारतीय रेल्वे प्रवासाचं चित्र संपूर्णपणे बदलायला सुरवात केली आहे. कोणत्याही नवीन गोष्टींचं स्वागत भारतीय थोडं नाक मुरडून करतात आणि वंदे भारत एक्सप्रेस ही त्याला अपवाद नव्हती. आत्मनिर्भर भारताचं प्रतिनिधित्व करणारी ही भारतीय रेल्वे आज जागतिक स्तरावर एक अभ्यासाचा विषय झाली आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचा रेल्वे प्रवास आज वंदे भारत देशाच्या विविध भागात दररोज करते आहे. ही ट्रेन इतकी यशस्वी ठरली आहे की झालेल्या ट्रेन मधील १-२ अपवाद वगळले तर बाकी सर्व ट्रेन १००% जास्त कॅपॅसिटी ने धावत आहेत. एका वर्षात या ट्रेन ने भारतीय रेल्वे ला १०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं आहे. भारतीय रेल्वे ने वंदे भारत एक्सप्रेस ची लोकप्रियता लक्षात घेऊन तब्बल १०२ वंदे भारत २ तर २०० वंदे भारत ३ चे टेंडर हा लेख लिहण्याआधीच भारतीय रेल्वे ने मेक इंडिया अंतर्गत भारतीय कंपन्यांना दिले आहे. ज्यांची एकत्रित किंमत ४.५ बिलियन (४५० कोटी ) अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ३५,००० कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. 

येत्या २-३ वर्षात वंदे भारत एक्सप्रेस जवळपास भारतातील प्रत्येक पॅसेंजर ट्रेन ला रिप्लेस करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ०-१०० किलोमीटर चा वेग अवघ्या ५४ सेकंदात गाठण्यास सक्षम असून १८० किलोमीटर / तास वेगाने सुरक्षित पद्धतीने धावण्याची तिची क्षमता आहे. भारतीय रेल्वे मधील रुळांच्या क्षमतेमुळे आज जरी तिचा वेग मर्यादित ठेवण्यात आला असला तरी येत्या काळात तब्बल २०० किलोमीटर / तास वेगाने ती धावणार आहे. या सोबत भारत आणि जपान यांच्या संयुक्त मदतीने तयार होत असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन च काम वेगाने सुरु आहे. २०२६ पर्यंत भारतात पहिल्यांदा बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. काही राजकीय नेत्यांच्या आडमुढे धोरणांमुळे या प्रकल्पाला उशीर झाला असला तरी येत्या काही वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे. 

चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट हे स्विकारण्याची मानसिकता भारतीयांनी आत्मसात केली पाहिजे. वंदे भारत ट्रेन असो वा बुलेट ट्रेन किंवा अगदी एसी ट्रेन त्याने आम्हाला काय फायदा? गरिबाला काय फायदा? या राजकीय मानसिकतेमधून बाहेर पडण्याची गरज आहे. होऊ घातलेल्या बदलांचे परीणाम दिसायला काही वेळ जावा लागतो. काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वे ने केलेल्या बदलांची फळे आज आपण चाखत आहोत. आज जे बदल होऊ घातले आहेत त्याचे परीणाम दिसायला काही काळ जाणार हे निश्चित आहे. पण बदल होत आहेत ते महत्वाचं आहे कारण तेच शाश्वत आहे. ते होत आहेत म्हणून आपली प्रगती होत आहे. एक देश म्हणून आपण सर्व १४० कोटी भारतीय एक पाऊल पुढे टाकत आहोत. तेव्हा बदलांना राजकीय आणि कूपमंडूक वृत्तीतून विरोध करण्यापेक्षा त्या बदलांच एका आत्मनिर्भर भारताचा भाग होणं यात आपलं हित सामावलेलं आहे. 

भारतात वेगवेगळ्या आघाड्यांवर होऊ घातलेल्या बदलांविषयी पुढल्या भागात "चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट". 

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

  



Sunday 19 March 2023

चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग १)... विनीत वर्तक

 चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग १)... विनीत वर्तक 

काही वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे जेव्हा भारताच्या भूतपूर्व वित्तमंत्र्यांनी लोकसभेत एक जोरदार भाषण केलं होतं. त्यात त्यांनी सामान्य माणसाच्या भूमिकेतून विद्यमान सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांची एक प्रकारे खिल्ली उडवली होती. त्यात त्यांनी डिजिटल इंडिया किंवा येऊ घातलेल्या डिजिटल व्यवहाराला ते सामान्य माणसाच्या कक्षेपासून खूप दूर असल्याची एक भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्यांच्या भाषणात त्यांनी उपरोधिकपणे रस्त्यावर फळे, भाजी किंवा तत्सम विक्री करणारा विक्रेता आणि ती खरेदी करणारा ग्राहक हे कुठून डिजिटल व्यवहार करणार? त्यांनी केलेले व्यवहार आर्थिक कक्षेत कसे बसणार? असं म्हणून त्यांनी डिजिटल इकोसिस्टिम सामान्य भारतीयापासून कोसो लांब असल्याचं एक चित्र उभं केलं होतं. अर्थात ते उभं करताना त्यांचे स्वतःचे काही अनुभव असतील किंवा त्यांनी ते चित्र पक्षीय राजकारणातून उभं केलं असेल. पण म्हणतात न कधी कधी आपण जे बोलतो त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती काळ आपल्या समोर उभी करतो. भारताचे ते अर्थतज्ञ त्यावेळी काळाची ती पावलं ओळखू शकले नाहीत किंवा त्यांनी ती मांडली नाही पण ती परिस्थिती येण्यापासून ते काळाला रोखू शकले नाहीत. 

आज भारत डिजिटल व्यवहारात जगात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ही आगेकूच इतकी प्रचंड आहे की अमेरिका, चीन आणि संपूर्ण युरोप जितके  डिजिटल व्यवहार करतात त्यांच्या एकत्रीत व्यवहारापेक्षा भारतात त्यापेक्षा जास्त आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरूपात होत आहेत. यात प्रत्येक वर्षी कित्येक पट वाढ होते आहे. याचा वेग इतका प्रचंड आहे की संपूर्ण जगात आणि आर्थिक तत्तवेत्ते असणाऱ्या सर्व लोकांना याची नोंद आज घ्यावी लागत आहे. याचा थोडा अंदाज आपल्याला आकड्यातुन येऊ शकतो. NPCI (National Payments Corporation of India) च्या छत्रछायेखाली २०१६ साली भारतात The Unified Payments Interface (UPI) चा श्रीगणेशा करण्यात आला. त्याच दरम्यान माजी अर्थमंत्र्यांनी वरील भाकीत केलं होतं. कदाचित ते खरं ठरेल अशी अपेक्षा ही सुरवातीला वाटली. कारण भारतीय मानसिकता हे त्याच मोठं कारण होतं. कागदांच्या रूपात अगदी एक आणि एक रुपयांचा हिशोब ठेवणारी आणि क्रेडिट अथवा कर्जाच्या मृगजळाला न भुललेली भारतीय आर्थिक मानसिकता डिजिटल व्यवहाराला कशी स्वीकारेल याबद्दल अनेक शंका होत्या. त्यात भारताची खूप मोठी लोकसंख्या खेड्यात रहाते. तिकडे ही व्यवस्था कितपत तग धरू शकेल याबद्दल अनेक आर्थिक सल्लागारांना शंका होती. 

पण त्याचवेळी भारतात वेगळेच वारे वहात होते. ते सांगत होते 'चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट' बदल हाच शाश्वत आहे. झपाट्याने अगदी खेडोपाड्यात पोहचलेले स्मार्ट मोबाईल फोन, स्वस्तात उपलब्ध होणारं इंटरनेट, जन-धन योजनेतून बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राशी जोडला गेलेला एक मोठा वर्ग आणि त्यात भरीस भर म्हणून २०१९ साली आलेला कोरोना. या सर्व बाबी भारतात बदलांचे वारे एकाच वेळी घेऊन आल्या. त्यामुळेच अडचणीच्या काळात Unified Payments Interface (UPI) हे आर्थिक व्यवहारांसाठी एक जीवनदान ठरलं. असं म्हणतात एकदा का रक्ताची चटक लागली की मग त्याचाच मागोवा शिकारी घेत जातो. भारतीय या बाबतीत वेगळे नव्हतेच डिजिटल व्यवहारांची चटक भारतीयांना लागली. यु.पी.आय. ने सगळ्यात मुळाशी वार केला. अगदी १ आणि २ रुपयांचे व्यवहार पण जेव्हा सुरक्षिततेने डिजिटल प्रणालीने केले जाऊ लागले तेव्हा साहजिक भारतीयांना जवळ कागदी रक्कम बाळगण्याची गरज वाटू लागली नाही. हा  वेग किंवा हा ट्रेंड इतक्या झपाट्याने पसरत गेला ज्याची कल्पना त्याच्या निर्मात्यांनी ही केली नव्हती. 

२०२२-२३ या एका आर्थिक वर्षातील काही आकडे आपल्याला काय वेगात बदल होत आहेत याची जाणीव करून देऊ शकतात. फेब्रुवारी २०२३ मधे भारतात रोज यु.पी.आय. च्या माध्यमातून तब्बल ३६ कोटी व्यवहार होत आहेत. ज्यांची एकत्रित किंमत ६.२७ लाख कोटी रुपयांची आहे. फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत ही वाढ ५०% टक्के इतकी प्रचंड आहे. २०२२-२३ आर्थिक वर्षात आत्तापर्यंत ८८४० कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत. ज्यांची एकत्रित किंमत १२६ लाख कोटी रुपये आहे. ज्यात एकट्या यु.पी.आय. चा ५२% वाटा आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते ही केवळ सुरवात आहे. येत्या २-३ वर्षात भारतात होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारातील ७५% वाटा हा डिजिटल व्यवहारांचा असणार आहे. आज यु.पी.आय. रोज १०० कोटी व्यवहार हाताळण्यात सक्षम आहे. पण ही क्षमता ही येत्या काळात कमी पडेल इतक्या वेगाने भारतात डिजिटल व्यवहारांचे वारे वहात आहेत. 

यु.पी.आय. जरी आज फुकट असलं आणि त्याने बँकिंग क्षेत्राला फायदा होत नसला तरी येत्या काळात तो होण्यासाठी काही पावले टाकली जातील. डिजिटल व्यवहाराचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कॅशलेस आर्थिक व्यवस्था. आपल्याला चलन निर्माण करण्यासाठी पण पैसे मोजावे लागतात. माझ्या, तुमच्या हातात असलेल्या प्रत्येक नोटेसाठी जवळपास ३ रुपये ते ५ रुपयांपर्यंत खर्च येतो. प्रत्येक वर्षी हा खर्च कित्येक करोडो रुपयांच्या घरात जातो. ज्या वेगाने आपण डिजिटल व्यवहारांकडे जातो आहोत त्याच वेळेस चलनी नोटांची मागणी झपाट्याने कमी होते आहे. येत्या २-३ वर्षात जर आपले ७५% व्यवहार डिजिटल झाले तर आपल्याला ७५% कमी चलनी नोटा लागतील. त्याचवेळी हा वाचलेला पैसा बँकिंग क्षेत्राला यु.पी.आय. सेवा देण्यासाठी वळवण्यात येईल. या शिवाय काही व्यवहारांसाठी शुल्लक अधिभार लावण्याचा ही विचार आहेच. 

यु.पी.आय.तर आलं पण आता तिकडे न थांबता येत्या काळात यु.पी.आय. ला अजून एका नवीन पर्वावर नेलं गेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला स्तब्ध करणाऱ्या आहेत. इंटरनेट नसताना पण आता यु.पी.आय.च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. तुमच्याकडे स्मार्ट फोन असो वा नसो एका कॉल वर तुम्ही डिजिटल व्यवहार आता करू शकणार आहात. आज जरी डेबिट द्वारे यु.पी.आय. चे व्यवहार होत असले तरी येत्या काळात क्रेडिट ने तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकणार आहात. तुमच्या सगळ्या बिलांची काळजी यु.पी.आय. घेणार आहे. येत्या काळात यु.पी.आय.आणि इतर डिजिटल प्रणाली इतक्या सक्षम होणार आहेत की संपूर्ण भारतात तुम्हाला कॅश ची गरज पडणार नाही. तुम्ही, आम्ही विचार करतो त्या पेक्षा जास्त वेगाने हे बदल येऊ घातलेले आहेत. तेव्हा त्या बदलांना मागच्या अर्थमंत्र्या प्रमाणे नाकं मुरडण्यापेक्षा त्या बदलांचा सुरक्षितपणे भाग होणं ही काळाची गरज आहे. 

भारतात वेगवेगळ्या आघाड्यांवर होऊ घातलेल्या बदलांविषयी पुढल्या भागात "चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट". 

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Sunday 12 March 2023

चारित्र्याचे कैवारी... विनीत वर्तक ©

 चारित्र्याचे कैवारी... विनीत वर्तक ©

सोशल मिडिया आपल्या खऱ्या आयुष्याचा गेल्या काही वर्षात भाग झाला आणि आता तो जवळपास आपलं आयुष्य बनलेला आहे. आधी अनोळखी लोकांना ओळखण्यापासून सुरु झालेला प्रवास आता अनोळखी लोकांच्या चारित्र्याचा दाखला ते त्याच हनन करण्या पर्यंत येऊन पोहचलेला आहे. अनोळखी लोकांच्या आभासी ओळखीतून आजवर अनेक लोक पडद्यामागून ते पडद्यासमोर बांधले गेले आहेत. कधी हे संबंध मैत्रीचे, नात्यांचे किंवा अगदी प्रेमाचे असले तरी त्यातून मिळणारी सोबत प्रत्येकाने आजवर अनुभवलेली आहे. एकीकडे जिकडे चांगली नाती किंवा परस्परांमधील संबंध दृढ होत गेले तिकडेच वेगवेगळ्या लोकांचा अप्रत्यक्ष प्रवेश आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सुरु झाला. मग त्याच अनोळखी लोकांसमोर सिद्ध करण्याची एक स्पर्धा सुरु झाली. फेसबुक ही सोशल मिडिया मधलं असं अंगवळणी पडलेलं माध्यम. तिकडे रोज याची प्रचिती आपल्यापैकी प्रत्येकाला येतेच. 

सोशल मिडिया च आभासी जग आपल्या इतक्या जवळ आलं की ते म्हणजेच आपलं खरं आयुष्य असं अनेक जण जगायला लागले आहेत. त्यामुळेच इकडे आपल्या बद्दल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडला जाऊ लागला. हे सगळं लिहण्याचं कारण इतकच की आज स्वतःला या आभासी आयुष्यात सिद्ध करण्यासाठी अनेक जण जीवाचा आटापिटा करताना दिसतात. अनेकदा हे सगळं आपल्याला नैराश्याकडे घेऊन जाते आहे याचा अंदाज ही अनेकांना कडेलोट होई पर्यंत लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा खूप काही उशीर झालेला असतो अथवा तुम्ही खूप काही गमावलेलं असते. या सगळ्यातून खूप कमी लोक बाहेर पडू शकतात. पडद्यामागच्या निरर्थक गुजगोष्टी एखाद्याला आपलं आयुष्य संपवून टाकण्या पर्यंत घेऊन जाऊ शकतात हे आपल्याला अजून उमगलेलं नाही हे खेदाने सांगावस वाटते. 

एखाद्याचं चारित्र्य काय असावं? ते चांगलं का वाईट याची सर्टिफिकेट घेऊन आज अनेक जण या आभासी विश्वात वावरत असतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या व्यक्तीची किंवा त्याच्या आयुष्याबद्दल अथवा व्यक्तिगत गोष्टींबद्दल काहीही माहिती नसताना त्या व्यक्तीच चारित्र्य हनन करण्याचा एक प्रकारे परवाना आपल्याला मिळालेला आहे अश्या आवेशात आपल्याच आजूबाजूला या व्यक्ती वावरत असतात. कारण आभासी जगात आपलं अंग काढण्याची सगळीच सोय उपलब्ध असते. एकतर तकलादू कायदे व्यवस्था त्यात सोशल मिडीयाच्या Garbage in, garbage out या उक्तीचा फायदा घेऊन मी नाही त्यातला अथवा त्यातली असं म्हणून नामनिराळं होण्याची वृत्ती आज सगळीकडे फोफावली आहे. आपण जे पुढे ढकलत आहोत त्याला कोणताही सबळ पुरावा अथवा कोणताही आधार नसताना फक्त असं ऐकलं या उक्तीवर एखाद्याच्या चारित्र्याच हनन करण्याची एक स्पर्धाच सुरु झाली आहे. 

स्क्रीन शॉट हा अजून एक प्रकार आजकाल सगळ्याच सोशल मिडिया मधून फोफावला आहे. कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत बोलणं हे त्या बोलण्याचा मागचा, पुढचा संदर्भ काढून त्याच चारित्र्य हनन करण्यासाठी सगळीकडे वापरलं जात आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीशी काय बोलावं अथवा काय संबंध ठेवावेत हा त्या दोन व्यक्तींचा संबंध असताना त्यातील मथळ्याचा चुकीचा अर्थ काढून अथवा त्याला आपल्याला हवं तसं एडिट करून त्यात मज्जा घेणाऱ्या लोकांचा आजकाल सुळसुळाट आहे. अर्थात यात खेदाने पांढरपेशा समाजातले स्वतःला प्रगल्भ समजणारे अनेक लोक समाविष्ट आहेत. या सगळ्याचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय फरक पडू शकतो याच सोयरसुतक ना ते शेअर करणाऱ्या लोकांना असतं ना त्यावर आपला मत ठोकून देणाऱ्या इतर लोकांना. 

सोशल मिडिया वर ज्या व्यक्ती अथवा ज्यांच चारित्र्य आपल्याला योग्य वाटत नाही अश्या लोकांना ब्लॉक करण्याचा ऑप्शन असताना त्यांच्या भिंतीवर किंवा त्यांच्या तोंडावर कौतुकाचे पाट वाहून दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीच्या चारित्र्याचा उद्धार करणारे चारित्र्याचे कैवारी आजकाल सगळीकडे आहेत. अनेकदा या चिखलात आपण का उतरायचं याचा विचार करून अनेक व्यक्ती याकडे दुर्लक्ष करतात. पण याचाच अर्थ जे काही बोललं जात आहे त्याला मूक संमती आहे असा काढला जातो. संपूर्ण सोशल मिडियावर एखाद्याच्या चारित्र्याचा बाजार करून याच व्यक्ती पुन्हा येऊन मी नाही त्यातली / त्यातला असं समोरच्याला भासवत असतात. 

हे सगळं लिहण्याच कारण इतकच की सोशल मिडिया म्हणजे चारित्र्य ठरवण्याचं माध्यम नाही. कोणालाच कोणाचं चारित्र्य हनन करण्याचा कोणीच अधिकार दिलेला नाही. पण नकळत आपण त्याचा भाग बनत असू तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांची पण एकदा आपण कल्पना करायला हवी. कारण आज ज्या गोष्टी आपण दुसऱ्यांबाबत बोलत आहोत किंवा पसरवत आहोत त्या आपल्या बद्दल पण होऊ शकतात. ज्या कोणी व्यक्ती याची सुरवात करतात त्यांच स्वतःच चारित्र्य बरबटलेलं असते आणि आपल्यापेक्षा कोणी पुढे जाऊ नये याचा आटापिटा ते करत असतात. त्यामुळे पुढल भक्ष्य तुम्ही स्वतः बनू शकता. 

सोशल मिडिया हे आयुष्य नाही. त्यामुळे इकडे कोणी कोणाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. त्यामुळे इथल्या चारित्र्य सर्टिफिकेट वर तुम्ही स्वतःला जज करत असाल तर तुम्ही नैराश्याकडे खेदाने प्रवास करत आहात. लाईक, कमेंट आणि प्रसिद्ध ते स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आपण आपल्या आनंदाची, सुख समाधानाची चावी सोशल मिडियाच्या हाती सुपूर्द करत आहात. ज्या वेळेस ही चावी अश्याच चारित्र्याचा कैवार घेतलेल्या लोकांच्या हाताला लागते तेव्हा तुमचा कधी बाजार उठून जातो तुम्हाला कळत सुद्धा नाही. त्यासाठीच अश्या चारित्र्याच्या कैवार घेऊन गॉसिप करणाऱ्या लोकांपासून स्वतःला अलिप्त ठेवणं महत्वाचं आहे. कारण आज दुसरं कोणीतरी तुमच्या गॉसिप चा विषय असेल पण तुमच्या नकळत तुमचाच कधी नंबर लागेल याचा अंदाज तुम्हाला स्वतःला पण येणार नाही. 

सोशल मिडिया हे आयुष्य नाही. तेव्हा या चारित्र्य हनन साखळीचा भाग होऊ नका. कोणाचंही व्यक्तिगत आयुष्य हे त्या व्यक्तीचा व्यक्तिगत भाग आहे. जोवर तुम्ही त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष जोडलेले नसाल तोवर त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर कोणतंही भाष्य करण्याचा ना कायद्याने अथवा ना सामाजिक दृष्टीने अधिकार आहे. आज आपण घेतलेली २ मिनिटांची मज्जा त्या व्यक्तीला आत्महत्या करेपर्यंत प्रवृत्त करू शकते याच भान सोशल मिडिया वापरणाऱ्या सर्वच व्यक्तींनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा या चारित्र्यांच्या कैवाऱ्यांपासून सावध रहा. स्वतः ते बनू नका. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.