Tuesday 28 September 2021

#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ६) 'सेहमत खान'... विनीत वर्तक ©

 #पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ६) 'सेहमत खान'... विनीत वर्तक © 

आय.एन. एस. विक्रांत युद्धनौका भारतासाठी अतिशय महत्वाची होती. १६,००० टन पाण्याचं विस्थापन करणारी २१० मीटर लांब आणि २२,००० किलोमीटर च अंतर कापण्यास सक्षम असलेली युद्धनौका शत्रूच्या रडारवर सगळ्यात अग्रणी होती. १९७१ च्या युद्धात आय.एन.एस. विक्रांत ने गाजवलेला पराक्रम पाकिस्तान च्या जिव्हारी लागलेला होता. त्यामुळेच आय.एन.एस. विक्रांत पाकिस्तान च्या डोळ्यात खुपत होती. भारताच्या युद्धनौकेला जर नुकसान केलं तर आपल्या जखमांवर कुठेतरी थोडी फुंकर घातली जाईल अशी आशा पाकिस्तान ला वाटत होती. त्याचसाठी आय.एन.एस. विक्रांत ला पाण्यात डुबवण्याची योजना करून भारताला जखमी करण्याची व्युव्हरचना पाकिस्तान आखत होता. पण त्याच्या गावी ही नव्हते की भारताची पडद्यामागची एक सूत्रधार त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार आहे.

१९७१ च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तान च्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी भारताच्या रॉ ने अनेक गुप्तचर पाकिस्तान मधे पेरले होते. त्यात होती एक 'सेहमत खान'( हे नाव तिच्यावर पुस्तक लिहणाऱ्या हरिंदर सिक्का यांनी ठेवलं आहे. तिचं खरं नाव अजूनही भारतीयांपासून अलिप्त ठेवलं गेलं आहे.) सेहमत खान एक काश्मिरी मुसलमान मुलगी होती. तिच्या वडिलांचा काश्मीर मधे खूप मोठा धंदा होता. तिच्या वडिलांनी तिला १९७१ च्या वेळी भारतासाठी अशी कामगिरी करण्यासाठी उद्युक्त केलं. काश्मिरी मुसलमान असूनपण तिच्या वडिलांना भारताचा प्रचंड आदर होता आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या मुलीला देशासाठी जीवाची बाजी लावताना मागेपुढे बघितलं नाही. सेहमत खान च्या अंगात देशभक्ती च बाळकडू आपल्या वडिलांप्रमाणे होतं. वडिलांच्या आदेशानंतर तिने एका पाकिस्तानी मुसलमान व्यक्तीशी लग्न करून पाकिस्तान मधे प्रवेश केला. तिथून ती भारताच्या रॉ (Research and Analysis Wing) ला अतिशय महत्वाचे धागेदोरे १९७१ च्या युद्धात कळवत राहिली. पाकिस्तानातील परिस्थिती बद्दल जुजबी माहिती देणं इतकच काम तिचं होतं. पण सेहमत जरी आता पाकिस्तानात असली तरी भारताचा तिरंगा तिच्या मनात नेहमीच फडकत होता. 

१९७१ च्या त्या काळात सेहमत खान ला पाकिस्तान चे तत्कालीन राष्ट्रपती याहा खान यांच्या मुलांची शिकवणी घेण्यासाठी नेमलं गेलं. भारताच्या रॉ ची गुप्तहेर असणारी सेहमत खान पाकिस्तान च्या राष्ट्रपती च्या घरात जाऊन पोहचली तरीसुद्धा पाकिस्तान च्या सुरक्षा यंत्रणांना याचा काहीच सुगावा लागला नव्हता. सेहमत खान एक साधी एजंट असल्याने ती कदाचित रडार वर नव्हती. तिला पाकिस्तान भारताचा बदला घेण्यासाठी शिजवत असलेल्या प्लॅन चा सुगावा लागला. हा प्लॅन होता भारताची युद्धनौका आय.एन.एस.विक्रांत नष्ट करण्याचा. आपल्या जीवाची पर्वा न करता तिने ही माहिती भारताच्या रॉ ला कळवली. पुढे जे घडलं तो इतिहास आहे. भारताने तातडीने हालचाली करून आय.एन.एस.विक्रांत ला सुरक्षित करून पाकिस्तान च्या सगळ्या मनसुब्यावर पाणी फिरवलं. ह्याच आय.एन.एस. विक्रांत भारताने १९९७ साली निवृत्त केलं. 

भारताच्या आय.एन.एस. विक्रांत ला कोणी वाचवलं असेल तर ती होती सेहमत खान. जिच्या अचूक माहितीमुळे भारताने युद्धाचं पारडं फिरवलं होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. १९७१ च्या युद्धानंतर सेहमत खान वर दिलेली जबाबदारी संपली होती. तिला पुन्हा भारतात यायचं होतं पण या काळात ती गरोदर राहिली होती. रॉ ने तिला पुन्हा भारतात आणलं. भारतात आल्यावर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही सगळी घटना रॉ च्या फाईलींमध्ये आणि इतिहासाच्या पानात कित्येक वर्ष लुप्त झाली. पण तिचा तो गोंडस मुलगा पुढे आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवून भारतीय सैन्यात ऑफिसर झाला. आपल्या आईने गाजवलेलं कर्तृत्व त्याने ही कुठे समोर येऊ दिलं नाही. १९९९ पर्यंत पडद्यामागील या सूत्रधाराचा सुगावा कोणालाच नव्हता. कारगिल युद्धाच्या वेळी हरविंदर सिक्का हे कारगिल मधे जाऊन तिथल्या घडामोडींवर लिहत होते. त्यात त्यांनी भारताच्या गुप्तचर संघटनेवर ताशेरे ओढले. कारगिल मधे इतकी घुसखोरी होणं हे भारताच्या गुप्तचर संघटनांचे अपयश होतं. त्यांनी संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या देशभक्तीवर ही प्रश्नचिन्ह उभं केलं. अश्याच एका वेळी एक तरुण अधिकारी पुढे आला आणि त्यांनी देशभक्ती किंवा रॉ च्या एका यशाची ओळख हरविंदर सिक्का यांना करून दिली. 

याच भारतीय सेनेच्या ऑफिसर ने आपल्या आईच्या म्हणजेच सेहमत खान च्या पराक्रमाची गोष्ट त्यांना सांगितली. त्यांच नाव जगापुढे येणं हे त्यांच्या जिवाला धोका होता. त्यामुळेच कमालीची गुप्तता या गोष्टी समोर आणताना बाळगली गेली. तब्बल ८ वर्ष सिक्का ही गोष्ट जगापुढे योग्य पद्धतीने आणण्यासाठी काम करत होते. याच घटनेवर त्यांनी 'कॉलिंग सेहमत' हे पुस्तक छापलं. त्यानंतर याच पुस्तकावर आधारित 'राझी' नावाचा हिंदी चित्रपट आला. सेहमत खान हे नाव जरी अनेकांना कळालं तरी ती खरी कोण होती हे पडद्यामागे राहीलं. 

आपल्या प्राणाची बाजी देशासाठी लावणारी सेहमत खान खरी देशभक्त होती. आपल्या इतक्या मोठ्या त्यागानंतर तिची फक्त एकच इच्छा होती, 

'भारताच्या तिरंग्याचं अनावरण मला माझ्या घरात रोज करायचं आहे. त्याच पूजन करायचं आहे'...

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तत्वाप्रमाणे त्याच अनावरण घरात करता येत नाही. पण सेहमत खान रोज न चुकता आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनधिकृतरित्या का होइना पण आपल्या घरात तिरंग्याच पूजन रोज करत होती. आजही सेहमत खान हे नाव अनेकांना माहित असलं तरी ती खरी कोण होती हे पडद्यामागे गुप्त राहिलेलं आहे. 

पडद्यामागे राहून देशाच्या सुरक्षितेत महत्वाची भूमिका बजावणारी पडद्यामागची सूत्रधार सेहमत खान च्या कार्याला माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या देशभक्ती ला माझा साष्टांग नमस्कार. तुम्ही पडद्यामागे राहून देशासाठी जे काही केलं त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असेल आणि त्यासाठी प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे. 

सेहमत खान यांच्या आयुष्याचा प्रवास वाचून मला काही ओळी आठवल्या, 

मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिन्दी हैं हम, वतन है हिन्दोस्तां हमारा... 

सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा हम बुलबुलें हैं इसकी ये गुलिस्तां हमारा... 

जय हिंद!!!...

क्रमशः 

फोटो शोध सौजन्यः- गुगल




सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  

Saturday 25 September 2021

#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ५) 'आझाद हिंद सेना' ... विनीत वर्तक ©

 #पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ५) 'आझाद हिंद सेना' ... विनीत वर्तक © 

ही गोष्ट आहे जवळपास ८४ वर्षा पूर्वीची जेव्हा भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याकाळी प्रसिद्ध आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान असणाऱ्या एका भारतीय कुटुंबियांच्या घरी ते पाहुणे म्हणून गेले होते. स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधीच नाव आणि व्यक्तिमत्व सगळ्यांना आकर्षित करेल असं होतं. त्यांच्या भेटीसाठी त्या घरात लगबग चालू होती. सगळे त्यांना भेटीसाठी आतुर असताना एक १० वर्षाची चिमुरडी मात्र घरातुन गायब होती. महात्मा गांधी आले असताना तिचा थांगपत्ता लागत नसताना तिचा शोध सगळीकडे सुरु झाला. खुद्द महात्मा गांधी ह्या शोधकार्यात जुंपले. थोड्या वेळाने ती मुलगी घराच्या मागच्या बाजूला बंदुकीने आपलं लक्ष्य वेधण्याचा सराव करत असताना आढळली. महात्मा गांधी नी तिला जाऊन सांगितलं की,

'तू इतकी लहान असताना हिंसेच्या रस्त्यावर का जात आहेस? आपण अहिंसेने ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देतं आहोत. तेव्हा बंदुकीची गरज नाही. तू सुद्धा अहिंसेच्या मार्गाने त्यांच्या विरुद्ध लढा दे. '

त्यांच बोलून संपत नाही तोच खुद्द महात्मा गांधी ना त्या १० वर्षाच्या मुली नी उत्तर दिलं,

'आपण चोरांना आणि लूट करणाऱ्या लोकांना मारतो. नाही का? मग ब्रिटिश चोर आहेत लुटेरे आहेत. त्यांनी भारताला लुटलं आहे. भारतात चोरी केली आहे.  मी मोठी झाल्यावर एका तरी  ब्रिटिशाचा माझ्या बंदुकीने नक्की वेध घेईन'.

न घाबरता भारताच्या आणि पूर्ण जगाच्या अहिंसेच्या सगळ्यात मोठ्या व्यक्तिमत्वाला अवघ्या १० व्या वर्षी आपल्या शब्दांनी उत्तर देणारी ती मुलगी म्हणजेच भारताची आजपर्यंतची सगळ्यात तरुण गुप्तहेर ज्यांच नाव आहे 'सरस्वती राजामणी'

१९२७ साली सरस्वती राजामणी ह्यांचा जन्म रंगून, ब्रह्मदेश (यंगून, म्यानमार) इकडे झाला. त्यांच कुटुंब मुळचं भारतातल्या त्रिची इथलं. अतिशय श्रीमंत आणि स्वातंत्र्य लढ्याशी निगडित असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून भारताला ब्रिटिशांपासून स्वतंत्र करण्याचं वेड त्यांना होतं. 'लोहा लोहे को काटता हैं' हा बाणा त्यांच्या अंगात लहानपणापासून होता. मोठं झाल्यावर त्यांचा कल ह्याच बाण्याचं नेतृत्व करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्याकडे वळला. दुसऱ्या महायुद्धाची सुरवात झाल्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस हे रंगून, ब्रह्मदेश (यंगून, म्यानमार) इकडे आपल्या सेनेत लोकांना समाविष्ट करण्यासाठी आणि लागणाऱ्या पैश्याची तजवीज करण्यासाठी आले होते. त्यांच्या रंगून मधल्या भाषणांनी प्रेरीत होऊन सरस्वती राजामणी ह्यांनी आपले सगळे दागिने आणि पैसे आझाद हिंद सेनेला दान केले.

एक १६ वर्षाची तरुणी इतके दागिने आणि पैसे दान करते हे नेताजींच्या नजरेतून निसटलं नाही. त्यांना ते योग्य न वाटल्याने ते सरस्वती राजामणी ह्यांच्या घरी आले. त्यांच्या वडिलांना नेताजी दागिने परत करत असताना खुद्द नेताजींना सरस्वती राजामणी ह्यांनी उत्तर दिल,

' ते दागिने, पैसे माझे आहेत. त्यांच काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मी ते तुम्हाला दिले आहेत. ते मी परत घेणार नाही'

एका १६ वर्षाच्या मुलीच्या शब्दांची धार खुद्द नेताजींना निशब्द करून गेली. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी त्यावर तिला सांगितलं होतं,

'लक्ष्मी येईल आणि जाईल. पण सरस्वती तशीच रहाते. तिचा वरदहस्त तुझ्यावर आहे. म्हणून तुझं नाव आजपासून 'सरस्वती'.

सरस्वती राजामणी ह्यांनी नेताजींना त्यांच्या आझाद हिंद सेनेत घेण्याची विनंती केली. अश्या तऱ्हेने त्यांची नियुक्ती आझाद हिंद सेनेच्या गुप्तहेर खात्यात झाली. ह्या खात्याकडे मुख्य जबाबदारी ही ब्रिटिश सेनेतील गुप्त संदेशांना आझाद हिंद सेनेकडे देणं ही होती. सरस्वती राजामणी सोबत अजून ४ सहकारी गुप्तहेर म्हणून रुजू झाल्या. त्या सगळ्यांना आपला पेहराव बदलताना पुरुषी रूप धारण करावं लागलं. सरस्वती राजामणी आता १६ वर्षाचा मिसरूड फुटलेला 'मणी' झाल्या होत्या. मुलगा बनून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात त्यांनी काम करायला सुरवात केली. काम करता करता त्यांच्याकडे  संदेश, सैन्याच्या हालचालींची माहिती गुप्तपणे आझाद हिंद सेनेकडे देण्याचं काम होतं. हे काम करताना त्यांच्या एका मैत्रिणीचं बिंग फुटलं आणि ब्रिटिशांनी तिला कैदेत टाकलं. आपल्या साथीदाराला ब्रिटिशांच्या कैदेतून सोडवण्यासाठी त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं. पकडले गेल्यावर आपली काय हालत होईल हे माहित असताना त्यांनी एका नर्तकी चा वेष करून त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला दारू पाजून आपल्या साथीदारांसह तिकडून पोबारा केला.

ब्रिटिश सैनिकांना ह्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघींचा ब्रिटिश सेनेने पाठलाग केला. ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात एक गोळी सरस्वती राजामणी ह्यांच्या उजव्या पायाला लागली. गोळी लागलेल्या पायाने धावता येत नसताना ब्रिटिश सैनिकांना चकवा देण्यासाठी ह्या दोघी चक्क झाडावर चढल्या. तब्बल तीन दिवस जोवर ब्रिटिश सैनिकांची शोध मोहीम संपत नाही तोवर झाडावरच बसून होत्या. गोळी लागलेला पाय घेऊन अन्न, पाण्याशिवाय तीन दिवस झाडावर बसून राहणं काय असेल ह्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. त्या गोळीमुळे आजही त्यांच्या उजव्या पायात बळ नाही. पण सरस्वती राजामणी ह्यांना त्याचा अभिमान आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं कुटुंब मद्रास (चेन्नई) ला स्थलांतरीत झालं. एकेकाळी गडगंज श्रीमंत असणाऱ्या सरस्वती राजामणी जवळपास ७० वर्ष एका छोट्या खोलीत रहात होत्या. शासनाची दखल त्यांच्याकडे जायला स्वातंत्र्य भारताची ७ दशक जावी लागली. तामिळनाडू सरकारने त्यांना घराची व्यवस्था केली. फाटके कपडे जमवून ते शिवून पुन्हा गरीब लोकांना दान करण्याचं काम त्या आयुष्याच्या शेवटा पर्यंत करत होत्या. २००६ सालच्या त्सुनामीच्या प्रकोपात नाममात्र मिळणारं सरकारी पेंशन सुद्धा त्यांनी मदत कार्याला दान केलं होतं. अश्या ह्या सरस्वतीने १३ जानेवारी २०१८ ला शेवटचा श्वास घेतला.

आम्ही भारतीय करंटे आहोत. आम्हाला खऱ्या इतिहासाची जाणीव ना कोणी करून दिली न आम्ही ती करून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय मिळालेले संविधानाचे हक्क, लोकशाही, सार्वभौमत्व हे फक्त आणि फक्त राजकारण आणि स्वतःच्या फायद्यासाठी मग ते शिक्षण, नोकरी अथवा पैसा किंवा आता सोशल मिडिया सगळ्यांसाठी वापरण्याचा करंटेपणा आजतागायत करत आलेले आहोत. त्याचा आम्हाला माज आहे कारण देशभक्ती काय असते हेच आम्हाला कळलेले नाही. १५ चित्रपट करणाऱ्याला आम्ही देशाचा हिरो मानतो, १० सामने खेळलेला भारताचा स्टार होतो पण अंगावर गोळी झेलून त्याच्या होणाऱ्या यातनांना आपला अभिमान मानणाऱ्या सरस्वती राजामणी ह्यांच्या कर्तृत्वाचं न आम्हाला काही पडलेल असते न ते कोणत्या पद्म सन्मानाच्या कक्षेत येते. कारण आमच्या हिरो बनवण्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आम्ही इतिहासावर फक्त आणि फक्त नाव ठेवायला तयार असतो इतिहास घडवायला नाही. इतिहास घडवणारी सरस्वती देवींसारखी माणसे वेगळ्याच रक्ताची होती. जरी देशाने त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली नाही तरी देशासाठी रक्त सांडल्याचा आणि त्या इतिहासात सहभाग देण्याचा तसेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी योगदान देण्याचा त्यांना अभिमान होता.

सरस्वती राजामणी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते तश्या तुम्ही खरच 'सरस्वती' आहात. आज यंगून, म्यानमार इकडे बसून हा लेख लिहताना एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात त्या भूमीवर असल्याचा मला अभिमान आहे. भारताच्या सगळ्यात तरुण गुप्तहेर आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी पडद्यामागून योगदान देणाऱ्या सरस्वती राजामणी तुमच्या जाज्वल्य देशप्रेमाला एका भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि तुमच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार....           

जय हिंद!!!...

क्रमशः 

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

तळटीप :- वरील लेखाचा वापर कोणत्याही राजकीय चढाओढीसाठी  राजकारणासाठी करू नये. तो लेखाचा उद्देश नाही.  



Friday 24 September 2021

अग्नी ५ चाचणी बुद्धिबळाच्या पटलावरची एक चाल... विनीत वर्तक ©

 अग्नी ५ चाचणी बुद्धिबळाच्या पटलावरची एक चाल... विनीत वर्तक © 

२३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर साठी ३००० किलोमीटर पेक्षा जास्ती अंतरासाठी नोटॅम प्रसिद्ध केल्यानंतर भारत या दिवशी अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करणार हे उघड गुपित होतं. पण काल संध्याकाळ पर्यंत अशी कोणतीही चाचणी न झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं. भारत अशी कोणती चाचणी करणार नव्हता पासून भारत अमेरिका आणि चीन ला घाबरला, ५६ इंचाची छाती कुठे गेली आणि फुकटची हवा केली वगरे. पण प्रत्यक्षात भारताने एक चाल खेळली होती. ज्याचा अपेक्षित परिणाम भारताने साधला असं सध्यातरी दिसून येते आहे. आपण विचार करतो आणि बघतो त्या पलीकडे खेळलेल्या चालीत अनेक रहस्य दडलेली असतात. ती आपल्याला बघता यायला हवीत. जेव्हा आपण त्याचा विचार करू तेव्हा यामागचं गणित लक्षात येईल. 

साधारण १२-१३ सप्टेंबर रोजी भारताने नोटॅम प्रसिद्ध केला. त्यात २३ आणि २४ सप्टेंबर ही तारीख मुद्दामून प्रसिद्ध केली. याच दिवशी भारताचे पंतप्रधान हे अमेरिकेत असणार हे माहित असताना भारताने हीच तारीख का निवडली? याचा आपण विचार करायला हवा. आजवर ज्या वेळेस भारत क्षेपणास्त्र चाचणी करतो तेव्हा चाचणी झाल्यावर त्याची बातमी होते. पण यावेळेस चाचणी च्या आगोदर बातमी झाली असं का? याचा विचार केला तर अनेक न उलगडलेल्या चाली आपल्या समोर येतील. भारताच्या पंतप्रधानांचा विदेश दौरा अनेक महिने आधी ठरतो. त्यामुळे २३ आणि २४ सप्टेंबर ला ते अमेरिकेत असणार हे स्पष्ट होतं. तसेच या दौऱ्यात क्वार्ड सोबत युनायटेड नेशन च्या जनरल असेम्ब्ली मधे संबोधन करणार हे स्पष्ट होतं. मग असं असताना भारताने हेच दिवस का निवडले होते? 

भारत चाचणी करणार नव्हता तर जेव्हा १२-१३ सप्टेंबर ला ही बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळी भारत सरकार, डी.आर.डी.ओ. किंवा संरक्षण मंत्रालयाने याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं असतं. बातमी खोटी असती तर चीन तिकडे बोंबलत युनायटेड नेशन मधे जाऊन पोहचला नसता. युनायटेड नेशन च्या नियमांचा दाखला देत भारत अश्या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी करू शकत नाही म्हणत चीन ने थयथयाट केला. अर्थात चीन बद्दल सहानभूती असणाऱ्या काही भारतीयांनी याचा दाखला देत भारत चीन पुढे झुकला किंवा घाबरला असे आपल्या अकलेचे दिवे लावण्यास उशीर केला नाही. मुळात युनायटेड नेशन च आजच्या काळात महत्व इतकं आहे की सगळेच देश त्याचा सोयीस्कररीत्या वापर करतात. त्यामुळे आपला थयथयाट हा जगाचं लक्ष वेधून घेऊ शकतो पण भारताला चाचणी करण्यापासून रोखू शकत नाही हे चीन ला चांगलच माहित आहे. भारत या आधी मग ते अणुस्फोट असो वा अग्नी ५ ते इतर आण्विक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेताना कोणाच्या परवानगी आणि कोण काय म्हणते याचा विचार न करता पुढे जाऊ शकतो तर मग आता चाचणी घेण्यासाठी भारत  कशाला चीन काय म्हणतो किंवा युनायटेड नेशन काय म्हणते याचा विचार कशासाठी करणार आहे? 

काल संध्याकाळी डी.आर.डी.ओ. ने आपण घेणार असलेली अग्नी ५ ची चाचणी २० दिवस पुढे ढकलल्याचं स्पष्ट केलं. अर्थात असं करण्यामागे कारण त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. ते तांत्रिक असण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण अग्नी ५ ची या आधी अनेकवेळा चाचणी १००% यशस्वी झालेली आहे. भारत ज्या  एम.आय.आर.व्ही. तंत्रज्ञानाची चाचणी घेणार होता ते खरं तर आधीच तपासलेले आहे. फक्त जगाच्या नकाशावर त्याच शिक्कामोर्तब करायचं बाकी होतं. अर्थात ते भारत कधीपण करू शकतो. पंतप्रधान अमेरिकेत असताना मुद्दामून भारताने या चाचणीचं पिल्लू सोडलं असावं असा एक मतप्रवाह आहे. अमेरिका एकीकडे मैत्रीचा धागा जोडून गुणगान करत असताना हे बंध किती मजबूत आहेत याची चाचणी ही या निमित्ताने केली असावी. भारत त्याच्या सगळ्यात दूरवर मारा करणाऱ्या आणि आण्विक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी भारताचे पंतप्रधान अमेरिकेत असताना करण्याची योजना करतो हा योगायोग नक्कीच नव्हता तर बुद्धिबळाच्या पटावरची एक चाल होती. अमेरिका,ऑस्ट्रेलिया, जपान या सोबत युनायटेड नेशन ची याबाबत काय भुमीका असेल हे या निमित्ताने स्पष्ट झालं असेल. या सगळ्या भूमिका समोर येतील असं नाही. अनेक गोष्टी पडद्यामागे घडल्या असतील ज्याची कल्पना आपल्याला कधीच येणार नाही. 

आपला मिडिया ज्याप्रमाणे माकडाच्या हातात कोलीत दिल्याप्रमाणे अनेक गोष्टी अतिग्लोरीफाय करून सांगत असते. चीनकडे भारतापेक्षा लांब जाणारी क्षेपणास्त्र आहेत. त्यामुळे तो घाबरला वगरे सांगणं हे फुसके बाण आहेत. चीन विरोध यासाठीच करतो की भारता सारखं राष्ट्र समर्थ होणं त्यांच्या जगावर अधिराज्य करणाच्या स्वप्नांच्या आड येते. त्यांनी केली म्हणून आपण पण १०,००० ते १२,००० किलोमीटर लांब जाणारी क्षेपणास्त्र बनवू शकतो. पण भारताचे सगळे शत्रू ५००० किलोमीटर च्या टप्यात असताना भारताला आपली ताकद नको तिकडे खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे या गोष्टींकडे डोळसपणे बघता यायला हवं. काही असलं तरी अग्नी ५ ची चाचणी येत्या काळात होणार हे स्पष्ट आहे. ती होईल तेव्हा भारताने जागतिक पटलावर एम.आय.आर.व्ही. तंत्रज्ञान असणारा देश म्हणून स्थान पक्के केलं असेल. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Wednesday 22 September 2021

#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ४) 'जेम्स बॉण्ड' ... विनीत वर्तक ©

 #पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ४) 'जेम्स बॉण्ड' ... विनीत वर्तक ©    

'जेम्स बॉण्ड' या नावाचं एक काल्पनिक पात्र इयान फ्लेमिंग यांनी १९५३ साली जगापुढे आणलं. ब्रिटिश गुप्तचर संघटना एम.आय. सिक्स मधील ००७ हा कोड नंबर असलेला हा गुप्तहेर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला. जेम्स बॉण्ड या पात्राने गुप्तहेरानां एक वेगळीच उंची दिली. जेम्स बॉण्डकडे एखाद्या गुप्तहेरासाठी लागणारे सर्व गुण होते. अद्यावत आयुध आणि लढण्याची मानसिक आणि शारिरीक क्षमता, कोणालाही भुरळ घालेल असं व्यक्तिमत्व यासोबत  माणसांच आणि परिस्थितीचं योग्य आकलन, निर्णय क्षमता, योग्य संधीची वाट बघणं अश्या अनेक गुणांनी संपन्न असा गुप्तहेर जगाच्या सगळ्याच कोपऱ्यात सर्वश्रेष्ठ मानला गेला. म्हणूनच प्रत्येक देशातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराचं जेम्स बॉण्ड असं नामकरण करण्यात येतं.

पाकिस्तान सारखा शत्रू देश भारताच्या एका गुप्तहेराला 'जेम्स बॉण्ड' असं म्हणतो. ज्याच्या नुसत्या नावाने शत्रूच्या मग तो पाकिस्तान असो वा चीनच्या गोटात खळबळ माजते. असं म्हणतात की सगळीच युद्ध सैन्याने जिंकता येतं नाही. काही युद्ध पडद्यामागून जिंकली जातात. पडद्यामागची मुत्सुद्देगिरी, शत्रूची बलस्थान, त्याची कमजोरी, त्याच लक्ष्य, त्याची हालचाल आणि त्याच्या मनात काय आहे? हे सर्व जर आपण जाणून घेऊ शकलो तर योग्य वेळी खेळलेले डावपेच बंदूक न उचलता पण जिंकले जाऊ शकतात. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर भारत-चीन दरम्यान झालेला डोकलाम वाद. जिकडे पडद्यामागून चाली खेळल्या गेल्या आणि प्रत्यक्ष युद्ध न होता चीन ला माघार घ्यावी लागली. डोकलाम वाद असो वा सर्जिकल स्ट्राईक, तहाची बोलणी असो वा गुप्तचर अश्या सगळ्याच पातळीवर भारताच्या एका गुप्तहेराने शत्रूला नेहमीच पाणी पाजलेलं आहे. ती व्यक्ती म्हणजेच भारताचे सुरक्षा सल्लागार 'अजित डोवाल'.

भारताचे सिक्रेट एजंट म्हणून गुप्तपणे त्यांनी पाकिस्तानात ७ वर्ष वास्तव्य केलेलं होतं. पाकिस्तानात राहून दाऊद इब्राहिम च्या हालचालींची माहिती एकत्र करून भारतीय सुरक्षा यंत्रणांना त्यांनी पुरवलेली आहे. पाकिस्तानात लाहोर मधे त्यांनी गुप्तपणे वास्तव्य केलं होतं. त्यांच्या टोचलेल्या कानाची गोष्ट अनेकांना माहित असेलच. पण याही पलीकडे त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग सुवर्ण मंदिरामधील ऑपरेशन ब्लॅक थंडर मधे होता. सुवर्ण मंदिरात खलिस्तानी प्रमुख आणि ३०० अतिरेकी जवळपास ३ महिने लपले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याआधी त्यांच्याकडील शस्त्रसज्जता जाणून घेणं अतिशय महत्वाचं होतं. याच वेळी अजित डोवाल यांनी रिक्षाचालक बनून सुवर्ण मंदिराच्या आसपास टेहाळणी करायला सुरवात केली. आपण आत लपलेल्या अतिरेक्यांच्या नजरेत आलो पाहिजे असा त्यांचा प्लॅन होता. 

त्यांना जे अपेक्षित होतं तसेच झालं. आत लपलेल्या अतिरेक्यांच्या नजरेत हा रिक्षावाला आला. त्याला पकडून आत नेलं. पकडल्यावर त्यांनी आपण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय.एस.आय. चे एजंट असल्याच सांगितल. आपल्याला पाकिस्तानी संघटनेच्या बॉस ने खलिस्तान ची मदत करण्यासाठी सुवर्ण मंदिरात पाठवलं असल्याच त्यांने सांगितलं आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी झाले. विश्वास संपादन करून त्यांनी आत चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती टिपली. शस्त्र कुठे ठेवली आहेत? किती अतिरेकी आहेत? कुठे त्यांची सज्जता आहे तर कुठे ते कमकुवत आहेत अश्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर बाहेर येऊन ती भारतीय गुप्तचर यंत्रणांना दिली. त्यांच्या माहितीच्या आधारानेच ऑपरेशन ब्लॅक थंडर हे आखलं गेलं आणि यशस्वी झालं. 

अजित डोवाल यांची पडद्यामागच्या सूत्रधाराची भूमिका ही फक्त हेरगिरी पुरती मर्यादित नाही तर त्यांच्यात असलेले अनेक अंगभूत गुण त्यांना जेम्स बॉण्ड ची उपाधी योग्य असल्याचं सांगतात. देशाच्या सुरक्षितेत गेल्या ३०-४० वर्षात त्यांनी दिलेलं योगदान हे अमूल्य राहिलेलं आहे. कुठे काय बोलायचं? कुठे तोंडाची भाषा वापरायची तर कुठे हत्यारांची ह्या सर्व गोष्टीची पुरेपूर जाण असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. 

'ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी'... 

भारताची पाकिस्तान च्या बाबतीत या बदललेल्या भूमिकेमागे अजित डोवाल असल्याचं म्हंटल जाते. ज्या सर्जिकल स्ट्राईक ने पाकिस्तान हादरला त्याची कल्पना आणि संपूर्ण आखणी अजित डोवाल यांची होती. जून २०१४ मध्ये इराक मध्ये अडकलेल्या ४६ भारतीय नर्स ची सुटका करण्यामागे अजित डोवाल ह्यांची मुत्सुद्देगिरी महत्वाची होती. अजित डोवाल ह्यांच्याकडे या अतिशय गुप्त मिशन (Top Secret Mission) ची जबाबदारी देण्यात आली होती. अजित डोवाल ह्यांनी इराक मध्ये गुप्तपणे जाऊन इराक सरकारच्या अतिशय वरच्या स्थानावर असणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून ह्या नर्स च्या सुटकेसाठी पडद्यामागून सूत्र हलवली होती. 

अजित डोवाल ह्यांना भारताच्या आजवरच्या सगळ्या १५ विमान अपहरणाच्या घटना सोडवण्याचा अनुभव आहे. ह्या सगळ्या विमान अपहरण घटनांना योग्य रित्या सांभाळून भारतीय नागरिकांची सुटका करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. भारताच्या पूर्वेकडील प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यात फिल्ड एजंट म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. इथल्या लालडेंगा ह्या अतिरेकी संघटनेच्या ७ पेकी ६ कमांडर ना मारण्यात तेच पडद्यामागचे सूत्रधार होते. ह्या नंतर ह्या अतिरेकी संघटनेच्या प्रमुखाने भारत सरकारसोबत शांती करार केला होता. डोकलाम विवादात चीन च्या सैन्याला संयमी पण त्याच वेळी ताकदीने उत्तर देऊन हा प्रश्न चर्चेने सोडवण्यात त्यांची पडद्यामागची भूमिका महत्वाची होती. म्यानमार इकडे आर्मी चीफ सोबत सैनिकी ऑपरेशन करताना त्यांनी ५० पेक्षा जास्ती अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात पडद्यामागचे सूत्रधार तेच होते. 

भारताच्या या जेम्स बॉण्ड ची ताकद किंबहुना त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कार्यामुळे प्राप्त झालेल्या वलयाची दखल जगाने ही घेतलेली आहे. अफगाणिस्तान मधे सद्य स्थितीला चालू असलेल्या तालिबान संघर्षात तोडगा काढण्यासाठी अमेरिका, रशिया, इस्राईल, इंग्लंड च्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेल्या काही आठवड्यात त्यांच्या भारतात येऊन घेतलेल्या गाठीभेटी भारताच्या जेम्स बॉण्ड च महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करते. 

अजित डोवाल पहिले पोलीस अधिकारी आहेत ज्यांना अतुलनीय शौर्यासाठी भारताच्या शांतीकाळात देण्यात येणाऱ्या दुसऱ्या सर्वोत्तम शौर्य पुरस्कार किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे (१९८८). आय. बी. चे डायरेक्टर पदावरून २००५ साली निवृत्त झाल्यावर सुद्धा २०१४ साली त्यांनी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जबाबदारी स्विकारली. गेल्या ७ वर्षात भारताला सुरक्षित ठेवण्यात त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. जम्मू- काश्मीर मधील ३७० कलम हटवल्या नंतर तिथली परिस्थिती अतिशय संयमाने हाताळण्यात पडद्यामागचे सूत्रधार हे अजित डोवाल राहिलेले आहेत. 

पडद्यामागून देशाच्या सुरक्षितेत योगदान देणाऱ्या भारताच्या जेम्स बॉण्ड म्हणजेच अजित डोवाल यांना कडक सॅल्यूट. येणाऱ्या काळात त्यांचा अनुभव आणि त्यांची सेवा भारताला सुरक्षित ठेवण्यात महत्वाची असणार आहे.  

जय हिंद!!!

क्रमशः

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.    



Tuesday 21 September 2021

#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ३) '३५ वर्षांचा अंधार' ... विनीत वर्तक ©

 #पडद्यामागचे_सूत्रधार (भाग ३) '३५ वर्षांचा अंधार' ... विनीत वर्तक © 


गुप्तहेर बनणं आपल्याला वाटतं तितकं सोप्पं नसतं. आपलं अस्तित्व पुसून एका नव्या ओळखीसह शत्रूच्या गोटात शिरून तिथली माहिती गोळा करून पुन्हा ती आपल्या देशात पोहोचवणं हे खूप कठीण काम आहे. पकडलं गेल्यावर अस्तित्व आणि ओळख पुसली गेल्यावर कोणाकडे मदतीची काय याचना करणार? जिकडे आपलेच ओळख दाखवणार नाहीत हे स्पष्ट असते, तिकडे एकाकी लढा देण्याशिवाय पर्याय नसतो. त्यानंतर घडणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वतःच घ्यायची असते. जे आयुष्य त्यानंतर वाट्याला येते त्याचा आपण विचारही करू शकत नाही.

एक, दोन नाही तर तब्बल ३५ वर्षं जर तुम्ही आकाश पाहिलं नसेल आणि सूर्याला बघितलं नसेल तर तुमची काय अवस्था होईल? ३५ वर्षांचा काळकोठडीतील अंधार फक्त जगायचा नव्हता तर एखाद्या गुन्हेगाराला ज्याप्रमाणे थर्ड डिग्री गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वापरली जाते तो अनन्वित छळ ३५ वर्षं सहन करायचा? का? कशासाठी? कोणासाठी? मृत्यूसुद्धा जिकडे थांबेल आणि म्हणेल की बस झालं, आता नको अजून.... अश्या अमानवीय अत्याचाराचा सामना करून जेव्हा तुम्ही त्या नरकातून पुन्हा आपल्या देशात परत याल, तेव्हा तुमची काय इच्छा असेल? कदाचित तुम्ही सरकारला, आपल्या देशाला दोष द्याल. आपल्या लोकांचा तुम्हाला राग असेल की ज्यांच्यासाठी मी ३५ वर्षं नरकात घालवली आज ते याचा स्वीकार करायला पण कचरत आहेत! पण काही लोक वेगळ्या मातीची बनलेली असतात. इतकं होऊनसुद्धा जेव्हा त्या गुप्तहेराला वयाच्या ७७ वर्षी (ज्यातील ३५ वर्षं पाकिस्तानमध्ये नरकात गेली आहेत) विचारलं की पुन्हा संधी दिली तर, 

“I am still ready to serve my motherland. Even if they [the Government of India] do not accept the fact that I worked for them, it doesn't matter. I don’t regret serving my country.”

तब्बल ३५ वर्षं अंधारात जगून आणि पाकिस्तानच्या अनन्वित अत्याचाराला सहन केल्यावर व आपल्या देशाने तो गुप्तहेर असल्याचं मान्य केलं नसल्यानंतरही आपल्या मातृभूमीसाठी पुन्हा आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार असलेला भारताचा हा गुप्तहेर म्हणजेच 'कश्मीर सिंग' !

कश्मीर सिंग यांचा जन्म १९४१ साली झाला. १९६२ ते १९६६ सालापर्यंत त्यांनी भारतीय सेनेत देशरक्षण केलं. त्यानंतर पंजाब पोलीसमध्ये काही काळ व्यतीत केल्यावर त्यांनी गुप्तहेराचं काम सुरू केलं. ४८० रुपये महिना पगारावर त्यांनी गुप्तहेर बनून त्यांनी दोन वर्षं भारतासाठी गुप्तहेराचं काम केलं. अर्थात या सगळ्या गोष्टींची कागदोपत्री कुठेच नोंद ठेवली गेली नाही. दोन वर्षात तब्बल ५० वेळा कश्मीर सिंग यांनी पाकिस्तानात जाऊन संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रं काढून ती भारतीय गुप्तचर संघटनांना दिली. त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा भारतातील सैन्याला आणि गुप्तचर संस्थांना झाला. तब्बल दोन वर्षं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना तुरी दिल्यावर त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी कश्मीर सिंग यांचं रहस्य पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर फोडलं. पकडलं गेल्यावर त्यांनी कधीच आपण भारताचा गुप्तहेर असल्याचं मान्य केलं नाही. पण त्यांच्या सहकाऱ्यानी कोर्टात दिलेल्या साक्षीमुळे त्यांना तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा झाली. तब्बल ३५ वर्षं काळकोठडीत त्यांना डांबण्यात आलं. थर्ड डिग्रीचे अत्याचार प्रत्येक दिवशी त्यांच्यावर करण्यात आले. ३५ वर्षं दिवस न बघितलेला हा माणूस मानसिकरीत्या पूर्णपणे कोलमडला पण आपल्या देशाचं रहस्य त्यांनी आपल्या आत लपवून ठेवलं. 

पाकिस्तानमधील मानवाधिकार मंत्री अन्सर बर्नी यांची नजर पाकिस्तानमधील तुरूंगात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या ३०-३५ भारतीय कैद्यांवर पडली. त्यातील एक होते कश्मीर सिंग. त्यांची अवस्था बघून बर्नी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्याकडे कश्मीर सिंग यांची गोष्ट पोहोचवली व दयेचा अर्ज भारतीय वकील जे. सी. भारद्वाज यांच्या साह्याने दाखल केला. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी तो मंजूर केल्यावर कश्मीर सिंग यांची त्या नरकातून मुक्तता करण्यात आली. पण तोवर ना भारत सरकारने ना कश्मीर सिंग यांनी कधीच आपण गुप्तहेर असल्याचं मान्य केलं होतं. भारतात परतल्यानंतर कश्मीर सिंग यांनी आपल्या घरात आणि देशात पाय ठेवल्यावर जे रहस्य आपल्या आत गेली ३५ वर्षं लपवलं होतं त्याचा उलगडा केला. कश्मीर सिंग यांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारने २००९ साली १०,००० रुपये/महिना पेन्शन सुरू केलं तसेच त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी देऊन त्यांच्या बलिदानाचा एक प्रकारे सन्मान केला. 

कश्मीर सिंग हे नाव अगदी दूर दूर पर्यंत भारतीयांनी ऐकलेलं नसेल. कारण अश्या लोकांना आणि त्यांच्या बलिदानाला भारतीयांच्या लेखी किंमत नसते. देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलेल्या अश्या अनेक वीरांचे साहस, त्यांचा पराक्रम, त्यांची देशभक्ती ही इतिहासाच्या पानात लुप्त होत जाते. सरकार मग ते कोणत्याही देशाचं असो वा पक्षाचं ते कधीच गुप्तहेरांचं आयुष्य मान्य करत नाही. पण अश्या पडद्यामागच्या सूत्रधारांचं आयुष्य आपण आपल्या देशापुढे आदर्श म्हणून नक्कीच ठेवू शकतो. वयाच्या ७७ वर्षीसुद्धा जर कश्मीर सिंग सरकारने दखल घेतली अथवा घेईल याची पर्वा न करता देशासाठी आजही बलिदान देण्यासाठी तयार आहेत, तर त्यांच्या त्यागाचा, देशप्रेमाचा वारसा आपण भारतीयांपुढे तरी नक्कीच ठेवू शकतो. 

देशाच्या प्रेमासाठी, सुरक्षिततेसाठी तब्बल ३५ वर्षं नरकाचं आयुष्य जगलेल्या कश्मीर सिंग यांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.... 

सर कदाचित तुमच्या देशप्रेमापुढे सगळे पुरस्कार पण खुजे आहेत. तुमच्या बलिदानाची आणि देशप्रेमाची तुलना कधीच पैश्याने आणि सन्मानाने होऊ शकत नाही. तुमचं आयुष्य जरी प्रत्येक भारतीयाने एक क्षण जगलं तरी तो तुमचा खूप मोठा सन्मान असेल. पडद्यामागच्या सूत्रधाराला पुन्हा एकदा माझा सॅल्यूट.

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 20 September 2021

#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग २) ब्लॅक टायगर ... विनीत वर्तक ©

 #पडद्यामागचे_सूत्रधार (भाग २) ब्लॅक टायगर ... विनीत वर्तक ©

भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात अनेक लोकांचं रक्त सांडलं आहे. आजही त्यांच्या बलिदानाची दखल घेतली जात नाही. काही मूठभर लोकांच्या बलिदानाचे मात्र सगळीकडेच गोडवे गायले जातात. पडद्यावरचे कलाकार तर सगळ्यांना दिसतात पण त्या पडद्यामागे असलेल्या लोकांचं आयुष्य मात्र नेहमीच अंधारात राहते. हेच खरे सूत्रधार असतात जे पडद्यामागून आपल्या समोर घडणाऱ्या घटनांना मूर्त स्वरूप देत असतात. ते अश्या पद्धतीने काम करतात की त्यांना त्यांच काम एकट्याने पूर्ण करायचं असते. वेळप्रसंगी आपलं कुटुंब, आपली मातृभूमी या सर्वांपासून लांब जाऊन बलिदान द्यावं लागते पण त्या बलिदानाची कदर सुद्धा अनेकदा त्याच्या आपल्या लोकांकडून केली जात नाही. पण तरीही त्यांनी मातृभूमीसाठी दिलेलं बलिदान हे सर्वोच्च असते.   

ह्या देशाच्या सीमांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या आणि शेजारच्या शत्रूच्या प्रत्येक हालचालींची माहिती भारताच्या सैन्य दलाला देणाऱ्या भारताच्या सर्वोत्तम गुप्तहेराला आज आपण सगळेच विसरलो आहोत. आज जर भारताचा सर्वोत्तम गुप्तहेर कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच येते.ते म्हणजे 'ब्लॅक टायगर'.  ब्लॅक टायगर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला भारताच्या ( Indian Research and Analysis Wing) (RAW) रॉ चा गुप्तहेर म्हणजेच 'रविंद्र कौशिक' (नाबी अहमद शकिर पाकिस्तानी नाव ).  

भारताच्या 'ब्लॅक टायगर' म्हणजेच रविंद्र कौशिक चा जन्म ११ एप्रिल १९५२ ला राजस्थान झाला. लहानपणापासून रविंद्रला अभिनयाची प्रचंड आवड होती. त्याच्या ह्याच आवडीमुळे तो रॉ च्या अधिकारांच्या नजरेत आला. रॉ चा एजंट बनल्यावर त्याला अनेक खडतर प्रशिक्षणातून जावं लागलं. रॉ ने त्याला पाकिस्तानात जाऊन तिथली माहिती भारताला पुरवण्याची जबाबदारी दिली. ह्यासाठी रविंद्र ला उर्दू शिकावी लागली. पाकिस्तानातील अनेक भागांचा अभ्यास करावा लागला. ह्याशिवाय कुराण आणि धार्मिक गोष्टी ही शिकाव्या लागल्या. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रॉ चा एजंट बनुन रविंद्र कौशिक आता नाबी अहमद शकीर बनला. भारतात त्याच्या नावाचे सर्व रेकॉर्ड रॉ ने पुसून टाकले. आता नाबी अहमद शकीर ने पाकिस्तान च्या कराची विद्यापीठात प्रवेश घेऊन वकीलाची पदवी मिळवली. 

ह्यानंतर नाबी अहमद शकीर पाकिस्तान सैन्यात भरती झाला. पाकिस्तान सैन्यात यशस्वीपणे मिसळून जाताना नाबी अहमद शकीर ने पाकिस्तान सैन्यात मेजर बनण्या पर्यंत मजल मारली. पाकिस्तानात असताना त्याने अमानत नावाच्या मुलीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी पण झाली. १९७९ ते १९८३ पर्यंत पाकिस्तानी सैन्याच्या सगळ्या हालचालींची माहिती रविंद्र कौशिक उर्फ नाबी अहमद शकीर भारताच्या रॉ ला पुरवत राहिला. त्याच्या अमुल्य माहितीमुळे भारताने पाकिस्तानचे अनेक मनसुबे मोडीत काढले. त्याच्या ह्या पराक्रमासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांनी त्याला 'ब्लॅक टायगर' ही उपाधी दिली. 

१९८३ साली 'इनायत मसीहा' नावाचा अजून एक रॉ एजंट पाकिस्तानात गेला असताना पाकिस्तानी सैनिकांनी त्याला पकडलं व चौकशी च्या वेळी त्याने रविंद्र कौशिकचं नाव उघड केलं. पाकिस्तानी सैनिकांनी नाबी अहमद शकीर म्हणजेच रविंद्र कौशिक ला ताब्यात घेऊन त्याचा अतोनात छळ केला. १९८५ साली त्याला फाशीची शिक्षा झाली पण नंतर त्याला आजन्म कारावासात टाकण्यात आलं. जेलमधून रविंद्र कौशिक ह्याने आपल्या पत्नीला पत्रे पाठवली होती. एका पत्रात त्याने हताश होऊन लिहिलं होतं, 

"क्या भारत जैसे बडे देश मैं कुर्बानी देने वालो को यही मिलता हैं?".......  

भारताचा ब्लॅक टायगर २००१ साली क्षय रोग आणि हृदयाच्या रोगाने पाकिस्तान मधल्या मुलतान जेलमध्ये हुतात्मा झाला. आजपर्यंत रविंद्र कौशिक ह्यांच कुटुंब भारत सरकारकडे त्यांच्या ह्या कामगिरीची पोचपावती मागत आहे. पण आजही पडद्या मागचा हा 'ब्लॅक टायगर' उपेक्षित आहे. आपण विचार करू शकतो का? वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आपलं संपूर्ण अस्तित्व देशाच्या पटलावर पुसून टाकत भारताचा हा ब्लॅक टायगर एकटाच पाकिस्तान च्या अंधारात भारतासाठी लढला. पण आपण आज त्याची साधी दखल घेऊ शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे.

आम्ही फक्त पुतळे उभारतो आणि फोटोंना फुले वाहतो. आमच्यासाठी संघर्ष फक्त आणि फक्त दिसणारे लोकं करतात. अर्थात ते ही आमचे हिरो नसतात. चित्रपटात शर्ट काढून नाचणारे आमचे आदर्श तर कोट्यावधी रुपयांचे घोटाळे करून पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या लोकांच्या आम्ही पाया पडतो. 

चित्रपटगृहात चित्रपटाच्या आधी सुरु होणाऱ्या राष्ट्रगानाला उभे राहायला आमचे पाय लटपटतात आणि साध्या सैनिकाला आम्ही सलाम करत नाही तर पडद्यामागच्या ब्लॅक टायगरचं कोणाला काय पडलं आहे!........  

आम्ही कुठे रविंद्र कौशिकच्या पराक्रमाची नोंद ठेवणार....... 

कोणाला काही वाटत असलं तरी भारताच्या सर्वोत्तम गुप्तहेराचं पडद्यामागचे बलिदान हे भारताच्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिका आणि प्रत्येक सैनिकाइतकंच महत्वाचं आहे. पडद्यामागच्या या भारताच्या ब्लॅक टायगर सूत्रधाराला माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार!

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Sunday 19 September 2021

#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग १)... विनीत वर्तक ©

 #पडद्यामागचे_सूत्रधार (भाग १)... विनीत वर्तक ©

आजकाल एखाद्या छोट्या कामाचं श्रेय घेण्यासाठी गल्लोगल्ली लागणारे फ्लेक्स आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. रस्त्यावर टाकलेल्या डांबरापासून ते कोपऱ्या वरच्या संडासापर्यंत श्रेय घेण्याची चढाओढ आपण अनुभवलेली असतेच. पण आजच्या भारताला सुरक्षित ठेवणारे अनेक चेहरे मात्र प्रसिद्धीपासून खूप लांब तर राहिले पण काळाच्या ओघात त्यांच कार्य इतिहासाच्या पानात लुप्त पण झालं. अश्याच काही चेहऱ्यांचा वेध आणि त्यांच कार्य ह्या सिरीज च्या माध्यमातून घेणार आहे. 

सी.आय.ए. आणि एफ.बी.आय. या अमेरिकेच्या दोन गुप्तचर संस्थांची नाव आपल्या भारतीयांना अतिशय ओळखीची आहेत. पण भारतात ही अश्या दोन गुप्तचर संस्था कार्यरत आहेत ज्या भारताच्या सुरक्षिततेशी संबंधित माहिती गुप्तपणे गोळा करत असतात. भारताच्या शत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवत असतात. त्यातील एक  आहे आय.बी. (IB Intelligence Bureau) ही संस्था भारतातील अंतर्गत घटनांबाबत माहिती गोळा करत असते. तर दुसरी आहे  रॉ (RAW, Research and Analysis Wing of India.) आय.बी. ही भारतातील जुनी गुप्तचर संघटना आहे. १९६२ च्या भारत- चीन युद्धात आणि १९६५ च्या भारत- पाकिस्तान युद्धात काही आघाड्यांवर आलेल्या अपयशानंतर गुप्तचर संघटनेची गरज प्रकर्षाने जाणवली. भारताला युद्धात आलेलं अपयश हे मुख्यतः युद्धातील अनेक गोष्टींचा आधीच अंदाज न आल्यामुळे होतं. १८८७ साली स्थापन झालेल्या आय.बी. ची क्षमता कुठेतरी कमी पडत होती. १९६८ साली भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आय.बी. मधून अमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या आणि भारताच्या बाहेरची माहिती गोळा करणाऱ्या संघटनांना वेगळं स्वरूप दिलं आणि त्यातून जन्माला आली ती म्हणजे रॉ (RAW, Research and Analysis Wing of India.). 

रॉ चा मुख्य उद्देश परदेशातून भारतासाठी महत्वाची माहिती गोळा करणं हा होता. माहिती मग ती शत्रूच्या हालचालींची असो, आतंकवादी कारवायांची असो, राजकीय किंवा परराष्ट्र संबंधांविषयक असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची जिचा प्रभाव भारताशी संबंधित असेल हा ठेवला गेला. या संघटनेची उभारणी करण्याची जबाबदारी अश्या एका व्यक्तींना दिली गेली जे कोणत्याही प्रसिद्धी पासून दूर होते, जे अजातशत्रू होते. त्यांचा लोकसंग्रह इतका प्रचंड होता की नुसत्या एका फोनवर अनेक गोष्टींसाठी चक्र फिरवली जात. अश्या अतिशय गुप्तपणे जगणाऱ्या पण त्याचवेळी अतिशय मुत्सद्दी, हुशार आणि प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीवर पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही जबाबदारी टाकली होती. ती व्यक्ती म्हणजे 'रामेश्वर नाथ काव". 

रामेश्वर नाथ काव हे काश्मिरी पंडित होते. १९१८ साली वाराणसी इकडे त्यांचा जन्म झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. इंग्लिश ची पदवी घेतली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १९४७ साली आय.बी. मधे प्रवेश केला. आय.बी. ही त्याकाळी ब्रिटिश इंटीलिजन्स युनिट एम.आय. ५ च्या धर्तीवर काम करत होती. काव यांचा संबंध त्याकाळी अनेक ब्रिटिश गुप्तचरांशी आणि अधिकाऱ्यांशी आला. त्यामुळेच १९५० साली ब्रिटिश राणीने जेव्हा भारताला भेट दिली तेव्हा तिची सुरक्षा करण्याची जबाबदारी रामेश्वर नाथ काव यांच्यावर होती. १९६२ आणि १९६५ युद्धानंतर भारताला आपल्या आत आणि आपल्या बाहेर चालणाऱ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी वेगळ्या संस्थांची गरज भासली आणि त्यातून रॉ १९६८ मधे जन्माला आली. रामेश्वर नाथ काव त्याचे पहिले अध्यक्ष ठरले. रामेश्वर नाथ काव यांनी जवळपास २५० लोकांची गुप्तहेर आणि रॉ चे एजंट म्हणून निवड स्वतः केली. ही सर्व माणसे वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून निवडली गेली. या लोकांना काव यांनी निवडलं असल्याने त्यांना 'कावबॉईज' असं नाव पडलं. काव यांना या बद्दल कळताच त्यांनी फायबर ची एक प्रतिमा बनवून ती रॉ च्या मुख्यालयात बसवून घेतली.  

रॉ ची भूमिका १९७१ च्या युद्धात स्पष्ट झाली. बांगलादेश ची निर्मिती करण्यात सगळ्यात मोठा हात हा भारताच्या रॉ चा होता अर्थात या सगळ्यामागे होते भारताचे सुपर स्पाय मास्टर रामेश्वर नाथ काव. काव यांच्या निर्देशाप्रमाणे रॉ ने बांगलादेश स्वातंत्र्य संघटना 'मुक्ती बाहिनी' हिला पडद्यामागून बळ दिलं. भारत युद्धात उतरायच्या आधी भारताच्या पुर्वेकडील पाकिस्तान चा असलेला धोका आणि एकाचवेळी पश्चिम आणि पूर्व सिमेवर पाकिस्तानला तोंड देणं कठीण जाणार हे ओळखून रॉ ने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात अप्रत्यक्ष मदत केली. त्याचा परिणाम म्हणजे १९७१ साली भारताने पाकिस्तान ला हरवून बांगलादेश ची निर्मिती जगाच्या नकाशावर केली. बांगलादेश च्या लढ्यात अग्रणी राहिलेल्या अनेक नेत्यांना सुद्धा रॉ आणि रामेश्वर नाथ काव यांची भूमिका माहित होती. पण रामेश्वर नाथ काव यांनी कधीच आपल्या कामाच्या श्रेय कोणत्याही फ्लेक्स किंवा कोणत्याच प्रकारे घेतलं नाही. 

भारताच्या अति पूर्वेकडील भागावर चीन ची नजर होतीच. १९६२ च्या युद्धात भारताच्या चुकलेल्या राजकीय निर्णयांमुळे भारताला खूप मोठा प्रदेश चीन सोबत गमवावा लागला होता. हीच चूक भारत करणार असं चीन ला वाटत होतं. याचा अंदाज रॉ ला आला रामेश्वर नाथ काव यांनी लागलीच या गोष्टीची जाणीव पंतप्रधान इंदीरा गांधींना करून दिली. चीन ने काही कारवाई करायच्या आधी भारताने सिक्कीम सोबत वाटाघाटी करत जवळपास ७००० चौरस किलोमीटर चा भूभाग भारताशी १९७५ साली जोडून टाकला. चीन ला ही गोष्ट कळेपर्यंत खूप उशीर झाला. गुप्तपणे भारताने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. अर्थातच या सगळ्यामागे होती भारताची गुप्तचर संघटना रॉ आणि भारताचे सुपर स्पाय मास्टर रामेश्वर नाथ काव. 

भारताच्या या सुपर स्पाय मास्टर ला फ्रांस च्या गुप्तचर संघटना SDECE (Service For External Documentation And Counter-Intelligence) ने जगातील सर्वोच्च अश्या पहिल्या पाच गुप्तचरांमध्ये रामेश्वर नाथ काव यांचा समावेश केला होता आणि म्हंटल होतं, 

“What a fascinating mix of physical and mental elegance! What accomplishments! What friendships! And, yet so shy of talking about himself, his accomplishments and his friends.” 

भारतातील अतिशय महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करणाऱ्या special protection group (SPG), national security guard (NSG) सारख्या संस्थेच्या उभारणीत रामेश्वर नाथ काव यांचा सिंहाचा वाटा होता. भारताची उभारणी करण्यात किंबहुना भारताच्या जडणघडणीत खूप मोलाचा वाटा असणाऱ्या रामेश्वर नाथ काव यांनी कधीच कोणत्या गोष्टीच श्रेय घेतलं नाही. ते नेहमीच प्रसिद्धी पासून दूर राहिले. त्यामुळे आजही अनेक भारतीयांना रामेश्वर नाथ काव यांच कार्य आणि नाव माहित नाही. २००२ साली रामेश्वर नाथ काव इतिहासाच्या पानात लुप्त झाले. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांनी केलेल्या कामाचा उपापोह अनेक पुस्तकातून आणि येणाऱ्या वेब सिरीज मधून पुढे येतो आहे. आजच्या भारताच्या जडणघडणीत महत्वाचे शिल्पकार राहिलेल्या भारताच्या स्पाय मास्टर रामेश्वर नाथ काव यांना माझा कडक सॅल्यूट. 

क्रमशः 

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Wednesday 15 September 2021

खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १४ )... विनीत वर्तक ©

 खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १४ )... विनीत वर्तक ©

“what the United States of America grievously experienced on September 11th is something that we, in India, have been going through for the last 20 years or thereabouts. In the region, we know clearly who is perpetuating these acts, what lies at the heart of it, and how it is to be dealt with.”

जसवंत सिंग, परराष्ट्रमंत्री, भारत सरकार ऑक्टोबर २००१. 

अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या दशहतवादी हल्यानंतर भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री यांनी वरील विधान भारताची अमेरिकेवरील दशहतवादी हल्याची प्रतिक्रिया म्हणून केलं होतं. ९/११ होई पर्यंत संपूर्ण जगासाठी दशतवाद किंवा जेहाद आणि एकूणच आतंकवाद हा भारताची समस्या वाटत होती. आतंकवादाला धर्म नसतो हे जागतिक पातळीवर सिद्ध करणारे अनेक लोक भारतात आणि जगात ते चित्र योग्य तर्हेने रंगवण्यात यशस्वी ठरले होते. पण ९/११ च्या हल्याने बऱ्याच गोष्टी अमेरिकेला जश्या स्पष्ट केल्या तसा आतंकवादाचा धर्म निरपेक्षतेचा बुरखा ही फाडला. माणूस अनुभवातून शहाणा होतो असं म्हणतात पण गेल्या २० वर्षातल्या या घटनेनंतरच्या गोष्टी बघितल्या तर अमेरिका यातून तितकी शिकली नाही असच म्हणावं लागेल. 

तालिबान ने पुन्हा एकदा ज्या सफाईने अफगाणिस्तानात आपलं वर्चस्व स्थापन केलं ते बघितल्यावर अमेरिका पुन्हा एकदा तोंडघाशी तर पडलीच पण भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जे सूचक विधान केलं होतं त्याची जाणीव पुन्हा एकदा अमेरिकेला झाली असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने जागतिक पटलावर गेल्या काही दिवसात बदलाचे वारे वहात आहेत त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जगाला एका कडेलोटासाठी डोंगराच्या कड्यावर आणून उभं केलं आहे. पुढे काय होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. फरक इतकाच आहे की आपण कश्या पद्धतीने यातून स्वतःला वाचवू किंवा कश्या पद्धतीने त्याचे चटके कमी करता येतील या सगळ्यासाठी आटापिटा सुरु झालेला आहे. 

अफगाणिस्तान मधे प्रस्थापित झालेल्या तालिबान चे चटके सगळ्यात जास्ती अमेरिका आणि त्यांची मित्र राष्ट्रे यांना बसणार हे उघड आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेतील अनेक अधिकाऱ्यांनी अगदी उघडपणे स्पष्ट केलं आहे की येत्या १-२ वर्षात अमेरिकेत पुन्हा ९/११ किंवा त्यापेक्षा भयंकर दशहतवादी हल्ला होऊ शकतो तसेच अनेक हल्ले त्यांच्या मित्र राष्ट्रात होण्याच्या शक्यतेत खूप वाढ झाल्याचं म्हंटलेलं आहे. या सगळ्यात जास्ती महत्व कोणाला प्राप्त झालं असेल तर अश्या दशहतवादाशी खंबीरपणे लढा देणाऱ्या भारताला. 

काही दिवसांपूर्वी रिचर्ड मूर ब्रिटिश स्पाय एजन्सीचे अध्यक्ष ज्याला एम.आय.६ म्हणतात ते त्यानंतर अमेरिकेच्या सी.आय.ए. चे डायरेक्टर विलियम बर्न्स, रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलव पात्रुशेव या सर्वानी भारतात पाऊल ठेवलं आहे. या पलीकडे जगातील सगळ्यात प्रतिथयश गुप्तचर संघटना इस्राईल च्या मोसाद मधील अधिकाऱ्यांनी याच वेळी भारतात गुप्तपणे भेट दिल्याच्या बातम्या आहेत. हे सर्व अधिकारी आणि त्यांच्या सोबत येणार शिष्टमंडळ हे काय हवाबदलासाठी भारतात दाखल झालेलं नव्हतं हे शेंबड मुलं पण सांगेल. महत्वाचं हे आहे की बदललेल्या वाऱ्यांचे केंद्र आता येत्या काळात भारत असणार हे स्पष्ट होते आहे. वाऱ्यांच रूपांतर कोणत्या प्रकारच्या वादळात होणार हे जसं ठामपणे सांगता येत नाही तसं या भेटीतून जागतिक पातळीवर काय घडणार आहे याचा अंदाज आपण लावू शकत नाही. फक्त वादळ येणार आहे असं सांगू शकतो. 

२० वर्षापूर्वी जेव्हा तालिबान सत्तेत आली होती त्यावेळचं जग आणि त्यावेळचा भारत या दोघात आता जमीन आस्मानाचा फरक आहे. त्यावेळी जगाला दशतवाद नवीन होता आणि त्यावेळचा भारत 'हम इस बात की कड़ी निंदा करते हैं' म्हणून गप्प बसायचा. आज जग दशहतवादाने पोळलेलं आहे तर आजचा नवीन भारत 'घर मैं घुसके मार सकता हैं' या नवीन भारताच्या रुपाला अनेक आयाम आहेत. आर्थिक क्षेत्रात भारताची स्थिती प्रचंड मजबूत झालेली आहे. आज भारताची आर्थिक ताकद पाकिस्तान च्या दहा पट आहे. आर्थिक महासत्तेच एक टोक जर चीन असेल तर दुसऱ्या बाजूला भारत वेगाने पुढे येतो आहे. अफगाणिस्तानातील  बदलेल्या समीकरणांमुळे भारताचं महत्व अनेक बाजूने वाढलेलं आहे. भारत एकीकडे ब्रिक सारख्या समूहाचा भाग आहे त्याचवेळी इंडो पॅसिफिक भागात चीन ला शह देण्यासाठी एकत्र झालेल्या क्वाड समूहाचा ही महत्वाचा घटक आहे. अफगाणिस्तानात सत्ताबदल झाल्यावर तालिबान, पाकिस्तान आणि चीन  युती झाली आहे आणि ती येत्या काळात घट्ट होणार आहे. रशिया या बाबतीत सावध आहे तर तिकडे इराण ला या युतीची चिंता भासवते आहे. 

अमेरिका आणि रशिया यांचे संबंध ताणलेले आहेत. इराण आणि अमेरिका एकमेकांना पाण्यात बघतात. अमेरिका आणि चीन संपूर्णतः एकमेकांचे शत्रू होण्याकडे वाटचाल करत आहेत. अमेरिका आणि युरोपातील सर्व देश या सोबत इस्राईल ला दशहतवादाचा धोका आहे. अमेरिकेला, फ्रांस, इस्राईल सारख्या देशांना मुस्लिम राष्ट्र आपला धर्मविरोधी मानतात. तर अफगाणिस्तानातील जनमत संपूर्णतः पश्चिमी राष्ट्रांच्या विरोधात आहे. या सगळ्या गोंधळात एकच समान दुवा जो की तालिबान, चीन, पाकिस्तान च्या धोरणांना शह देण्याची ताकद ठेवतो तो म्हणजे भारत. भारत आणि रशिया बेस्ट फ्रेंड आहेत. भारत आणि अमेरिका यांचे संबंध कधी नव्हे इतके अतिशय मजबूत झालेले आहेत. भारत इस्राईल ची मैत्री जगमान्य आहे. भारत आणि इराणचे संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. भारत आणि मुस्लिम राष्ट्र ( सौदी अरेबिया, यु. ए. ई. , ओमान, तजाकिस्तान, इराक) यांच्याशी संबंध अतिशय सौजन्याचे आणि जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत आणि त्यात गेल्या काही वर्षात मजबुती आलेली आहे. भारताचे युरोपियन देशांशी संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. युनायटेड किंगडम, फ्रांस, जर्मनी अश्या सगळ्या राष्ट्रांचा भारत जवळचा मित्र आहे. त्या पलीकडे भारताला अफगाणिस्तान मधील जनमत आपला मित्र आणि तालिबान च्या जुलमी राजवटीतून मुक्तता करू शकेल असा तारणहार म्हणून बघते. या सगळ्याचा विचार जर आपण केला तर जागतिक मंचावर भारताची काय भूमिका असणार आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. 

अफगाणिस्तानात पाकिस्तान पुरस्कृत दशहतवाद्यांना मोकळं रान मिळणार हे उघड आहे. चीन अफगाणिस्तानातील आपल्या 'वन बेल्ट वन रोड' आणि तिथल्या नैसर्गिक संपत्तीवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. अश्या परिस्थितीमधे आज जग किंवा प्रगत राष्ट्र घाबरत आहेत ती अफगाणीस्तानात पोसल्या जाणाऱ्या दशहतवादामुळे. त्याची झळ आता नुसती भारताला बसणार नसून संपूर्ण जगाला त्याचा फटका बसणार आहे. गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ भारत जी खिंड लढवत होता आता त्याला त्या लढाईत जागतिक बळ मिळालं असल्याचे सध्या तरी बदललेले वारे दाखवत आहेत. पण यातून नक्की काय निष्पन्न होणार आहे आणि या खाऱ्या आणि मतलई वाऱ्यांनी कोणतं वादळ येणार आहे हे येणारा काळच स्पष्ट करेल. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



Monday 13 September 2021

गेट रेडी फॉर अनादर फायर... विनीत वर्तक ©

 गेट रेडी फॉर अनादर फायर... विनीत वर्तक ©

येत्या २३ सप्टेंबर पासून पुढल्या २४ तासापेक्षा अधिक काळ भारताने नोटॅम म्हणजेच 'नोटीस टू एअरमॅन' प्रसिद्ध केल्यावर सर्व जगाचं लक्ष आता या तारखांकडे लागलं आहे. कारण भारताने प्रसिद्ध केलेला नोटॅम हा ३००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर जाणारा आहे. साहजिक बंगालचा उपसागर ते हिंद महासागर हा संपूर्ण पट्टा एकप्रकारे या काळासाठी नो फ्लाय झोन राहणार आहे. भारत नक्की काय करणार? कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेणार? असे अनेक प्रश्न विचारण्यात येत असताना या दिवशी भारत काय करणार हे भारतानेच स्पष्ट केलं आहे.

येत्या २३ सप्टेंबर २०२१ नंतर भारत कधीही आपल्या भात्यातील अग्नी ५ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची वापर करण्यासाठी चाचणी करणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. अग्नी ५ या क्षेपणास्त्राच्या आत्तापर्यंत ७ वेळा उत्पादन करण्या आधीच्या चाचण्या झाल्या आहेत. २०१८ मधे शेवटची चाचणी झाल्यानंतर हे क्षेपणास्त्र २०२० पर्यंत भारताच्या सैन्य दलात कार्यरत होणे अपेक्षित होते. पण कोरोनामुळे त्याला उशीर झाला. आता होणाऱ्या चाचणी नंतर अग्नी ५ हे उत्पादन करण्याचा मार्ग मोकळा होईल. या वेळेस भारत आपल्याकडे असलेल्या एका तंत्रज्ञानाची ओळख जगाला करून देणार आहे. या तंत्रज्ञानाचं नावं आहे multiple independently targetable reentry vehicle (MIRV) एम.आय.आर.व्ही. या तंत्रज्ञानाची भारताने आधीच गुप्तपणे २०१३ साली इसरो च्या साह्याने चाचणी घेतली असल्याचं बोललं जाते. पण आता भारत हे तत्रंज्ञान आपल्या क्षेपणास्त्रात उघडपणे जगाला दाखवणार असल्याचं बोललं जात आहे. 

अग्नी ५ हे भारताचं आत्तापर्यंतचे सगळ्यात शक्तिशाली आणि सगळ्यात दूरवर जाणारे क्षेपणास्त्र आहे. अग्नी ५ चा पल्ला हा ५००० किलोमीटर असल्याचं भारताने जागतिक पातळीवर स्पष्ट केलेलं आहे. पण हा पल्ला ८००० किलोमीटर पर्यंत असल्याचा अनेक संरक्षण क्षेत्रांशी संबंधित संस्थांचा आणि लोकांचा दावा आहे. भारत जाणून बुजून हा पल्ला कमी भासवत असल्याचं अनेकांच म्हणणं आहे. अग्नी ५ हे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. बॅलेस्टिक म्हणजे काय तर   हे क्षेपणास्त्र गुरुत्वाकर्षणाचा वापर आपल्या प्रवासात करते. बॅलेस्टिक हा ग्रीक शब्द आहे जो एखाद्या वस्तूच्या प्रोजेक्टाईल शी संबंधित आहे. हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर हवेत खूप उंचावर जाते आणि पुन्हा खालच्या दिशेने प्रवास करते. खाली येताना गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा वेग प्रचंड वाढतो. अग्नी ५ जेव्हा लक्ष्याच्या जवळ पोहचते तेव्हा त्याने मॅक २४ म्हणजेच २९,४०० किलोमीटर/ तास इतका प्रचंड वेग गाठलेला असतो. त्यामुळे याच्या पासून टर्मिनल फेज मधे याच्यापासून स्वतःला वाचवणं अशक्य आहे. 

अग्नी ५ जवळपास १५०० किलोग्रॅम वजनाची न्यूक्लिअर वॉरहेड नेऊ शकते. ५००० किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्याला ८० मीटरपेक्षा कमी क्षेत्रात अचूकतेने वेध घेऊ शकते. भारताने यात  (MIRV) एम.आय.आर.व्ही. हे तंत्रज्ञान बसवलेलं आहे. एम.आय.आर.व्ही. म्हणजे नक्की काय? तर याच नाव सांगते त्या प्रमाणे हे एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा भेद करणे. एकाच अग्नी ५ मधून आपण जवळपास २ ते १० वेगवेगळ्या लक्ष्यांवर आण्विक हल्ला करू शकू. अग्नी ५ प्रक्षेपित केल्यावर त्याने अपेक्षित उंची गाठली की त्यातून २-१० वेगवेगळ्या लक्ष्यांवर जाणारी रॉकेट वेगळी होतील. ती रॉकेट्स त्यांना दिलेल्या लक्ष्याचा भेद करतील. ही सगळी रॉकेट आपापल्या लक्ष्यावर जाण्यास स्वतः सक्षम असतील. याचा अर्थ अग्नी ५ एकाचवेळेस १० वेगवेगळ्या ठिकाणी आण्विक हल्ला करण्यास सक्षम असेल. असं तंत्रज्ञान असणारा भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे. 

भारताने २८ जून ला अग्नी प्राईम या नवीन पद्धतीच्या क्षेपणास्त्र चाचणीत भारताने एम.आय.आर.व्ही. हे तंत्रज्ञान वापरून एकाचवेळी दोन लक्ष्यांचा यशस्वीरीत्या लक्ष्यभेद केला होता. अग्नी ५ मधे अश्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे भारताच्या आंतरखंडीय आण्विक क्षमतेत खूप वाढ होणार आहे. अग्नी ५ हे १७ मीटर लांब २ मीटर व्यास आणि ५० टन वजन असलेलं ३ स्टेज असलेलं क्षेपणास्त्र असून त्याच्या कॅनिस्टर डिझाईनमुळे ट्रक वरून भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातून डागता येऊ शकते. 

येत्या २३ आणि २४ सप्टेंबर ला 'गेट रेडी फॉर अनादर फायर' जे भारताला संरक्षण सिद्धतेत पुन्हा एकदा आत्मनिर्भर करणार आहे. डी.आर. डी.ओ. च्या वैज्ञानिकांना खूप साऱ्या शुभेच्छा... 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Wednesday 8 September 2021

पगडीने जीव वाचवणारा सरदार... विनीत वर्तक ©

पगडीने जीव वाचवणारा सरदार... विनीत वर्तक ©
शीख लोकांसाठी पगडी ही एखाद्या राजमुकुटासारखी असते. एकवेळ जीव गेला तरी बेहत्तर पण त्यांच्या पगडीवर ते कोणतीही आच येऊ देत नाहीत. शीख धर्मात पगडीची परंपरा जवळपास ४००० वर्षं जुनी असली तरी १६६९ मध्ये शीखांचे १० वे गुरू गोविंद सिंग यांनी पाच श्रद्धेच्या वस्तूंची दैनंदिन आयुष्यात जपणूक करायला सांगितली, त्यांतील एक म्हणजे 'केस'. त्यांचं संरक्षण करण्यासाठी शीख लोक पगडी बांधू लागले. आज त्यांची ती ओळख बनली आहे, पगडीचं महत्व सरदार (शीख) लोकांमध्ये म्हणूनच अनन्य साधारण आहे. 'पगडी' हा पण संदेश देते की शीख लोकांसाठी सगळे मानव हे समान, स्वतंत्र आहेत.
३ एप्रिल २०२१ चा दिवस होता, जेव्हा छत्तीसगडमधल्या सुकमा-बीजापूर बॉर्डरवर नक्षल लोकांनी सी.आर.पी.एफ. च्या Commando Battalion for resolute Action (CoBRA) युनिटवर अचानक हमला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने अफरातफरी झाली. २२ सैनिक वीरगतीस प्राप्त झाले तर ३१ सैनिक जखमी झाले होते. पण अश्या परिस्थितीसाठी सज्ज असणाऱ्या कोब्रा युनिट मधील सैनिकांनी नक्षल लोकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी त्यांच्यावर उलट हल्ला केला. दोन्ही बाजूने गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. यात होते कोब्रा युनिटमधील कॉन्स्टेबल बलराज सिंग. त्यांनी नेटाने या हल्ल्याचा प्रतिकार सुरू केला. या धुमश्चक्रीत त्यांच्या जवळच UBGLs (under-barrel grenade launchers)मधील एक ग्रेनेड येऊन फुटला. या स्फोटात त्यांच्या उजव्या बाजूला असणारे सब इन्स्पेक्टर अभिषेक पांडे गंभीररीत्या जखमी झाले. या स्फोटात ग्रेनेड मधून उडालेल्या तुकड्यांनी त्यांच्या पायाला रक्तबंबाळ केलं होतं.
कॉन्स्टेबल बलराज सिंग यांनी त्यांना प्राथमिक वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे असलेली मदत इतर घायाळ झालेल्या सैनिकांना वापरली जात होती. सब इन्स्पेक्टर अभिषेक पांडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पायातून सतत रक्तस्त्राव सुरू होता. जर का रक्त थांबवलं नाही तर त्यांचा जीव जाणार हे स्पष्ट होतं. वेळ बिकट होती आणि प्रसंग बाका होता. समोरून गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. आपल्या ऑफिसरचा जीव आपल्या समोर जातो आहे, हे त्या सरदार सैनिकाला कुठेतरी अस्वस्थ करत होतं. त्याने क्षणाचाही वेळ न दवडता असा निर्णय घेतला की ज्याने तिथे असणाऱ्या प्रत्येकाला स्तब्ध केलं. मागचा पुढचा विचार न करता सरदार बलराज सिंगने आपली पगडी उघडली. आपल्या पगडीने त्याने अभिषेक पांडे यांच्या जखमेला पट्टी बांधून रक्तस्त्राव बंद केला.
आपली आन, बान, शान असलेली पगडी सरदारने पायाला बांधली. रक्तस्त्राव थांबल्यामुळे सब इन्स्पेक्टर अभिषेक पांडे पुन्हा एकदा लढाईसाठी तयार झाले. ते आणि त्यांचा जीव वाचवणारा कॉन्स्टेबल बलराज सिंग नक्षलांवर तुटून पडले. कित्येक नक्षलांचा त्यांनी खात्मा केला. कॉन्स्टेबल बलराज सिंग त्यानंतर गोळ्यांच्या वर्षावात नक्षलांवर चाल करून गेले. लढता लढता त्यांनी नक्षलांना पीटाळून लावलं पण त्याचवेळी त्यांची एक गोळी त्यांच्या पोटात घुसली. हा हल्ला परतवल्यानंतर जखमी झालेल्या कोब्रा सैनिकांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सब इन्स्पेक्टर अभिषेक पांडे यांचा जीव त्या पगडीमुळे वाचला होता. ही गोष्ट स्पेशल डायरेक्टर ऑफ पोलीस राजेंद्र कुमार वीज यांच्या कानावर जखमी झालेल्या सैनिकांनी कॉन्स्टेबल बलराज सिंगने आपल्या पगडीने वाचलेल्या जीवाची गोष्ट सांगितली.
स्पेशल डायरेक्टर ऑफ पोलीस राजेंद्र कुमार वीज यांनी तात्काळ कॉन्स्टेबल बलराज सिंग यांची इस्पितळात भेट घेऊन त्यांना आपल्या फोर्सतर्फे स्पेशल पगडी भेट दिली. आपल्या जीवापेक्षा जास्ती मोल असणाऱ्या पगडीला आपल्या सहकाऱ्याच्या पायाला बांधून त्याचा जीव वाचविणाऱ्या या सरदाराने शीख लोकांच्या पगडीचा सन्मान अजून वाढवला आहे यात शंका नाही. अश्या पराक्रमी सरदार कॉन्स्टेबल बलराज सिंग यांना माझा कडक सॅल्यूट आणि लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा देशसेवेसाठी दाखल होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल (स्पेशल डायरेक्टर ऑफ पोलीस राजेंद्र कुमार वीज हे कॉन्स्टेबल बलराज सिंग यांना हॉस्पिटलमधे पगडी भेट देताना)
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday 5 September 2021

पोलिओ ला हरवणाऱ्या सुवर्ण पदकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

 पोलिओ ला हरवणाऱ्या सुवर्ण पदकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

२७ मार्च २०१४ चा दिवस होता जेव्हा वर्ल्ड हेल्थ फाउंडेशन ने भारताला पोलिओ मुक्त झाल्याचा दर्जा दिला. तब्बल दोन दशकांच्या प्रयासानंतर भारताने पोलिओ रोगाला भारतातून हद्दपार केलं होतं. पण या काळात पोलिओ व्हायरस ने भारतातील अनेक मुलांना आपल्या विळख्याने व्यंगत्व आणलं होतं. याच पोलिओ च्या विळख्यात ओरिसा मधला एक पाच वर्षाचा मुलगा सापडला. डॉक्टरांनी त्याला पोलिओ झाल्याचं निदान केलं आणि त्याच्या आई-वडिलांना एक निर्णय घेण्याची कठीण जबाबदारी दिली. आयुष्यात आपल्या शरीराशी निगडित खूप कमी गोष्टी असतात ज्यांच्या बद्दल आपल्याला निर्णय घेण्याची वेळ येते. जेव्हा ती येते तेव्हा तो क्षण आयुष्यातील सगळ्यात कठीण क्षणांपैकी एक असतो. त्या मुलाच्या आई- वडिलांना त्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं, त्या मुलाचे हात किंवा पाय यापैकी काय वाचवू? असं डॉक्टरांनी विचारलं, त्याच्या वडिलांनी मुलाचे हात वाचवा असं डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी त्या मुलाचे हात तर वाचवले पण पोलिओ त्याच्या डाव्या पायाला अधू करून गेला. 

एका ५ वर्षाच्या मुलाच्या भविष्यावर एक न सुटणार ग्रहण लागलं. त्या मुलाला लहान वयात कळालं की, आपल्याला आलेलं व्यंगत्व आपल्याला स्वीकारून आयुष्य जगायचं आहे. त्याने त्या व्यंगत्वाला आपलं शक्तीस्थान बनवलं. व्यंगत्वावर त्याने मात तर केलीच पण त्याच्या वडिलांनी वाचवलेल्या त्याच डाव्या हाताचा उपयोग करून त्याने इतकी उंची गाठली की साक्षात पोलिओला त्याने दाखवून दिलं की, माझ्या पायात जरी तू व्यंगत्व आणलं तरी त्या वाचलेल्या हाताने मी ४ सप्टेंबर २०२१ ला इतिहास रचला. हा प्रवास आहे पोलिओ ला हरवत जगात नंबर १ चा पॅराबॅडमिंटनपटू असलेल्या आणि भारताला २०२० च्या टोकियो पॅराऑलम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या 'प्रमोद भगत' याचा.

लहानपणापासून प्रमोद ला बॅडमिंटन खेळ आवडत होता. आपल्या घराच्या बाहेर खेळणाऱ्या मुलांना तो बघत बसायचा. पोलिओ ने त्याचा डावा पाय अधू केला असला तरी त्याच्या मनातून बॅडमिंटन खेळ गेला नव्हता. आपल्या व्यंगत्वाला आपलं हत्यार बनवतं प्रमोद बॅडमिंटन खेळू लागला. आवडीचं रूपांतर व्यावसायिक झालं. प्रमोद रोज तासंतास बॅडमिंटन खेळाचे धडे गिरवू लागला. त्याने शरीराने धडधाकट असणाऱ्या मुलांसोबत बॅडमिंटन च्या स्पर्धेत भाग घ्यायला सुरवात केली. राज्य पातळीवर प्रमोद भगत ने आपल्या खेळाची चुणूक दाखवली. तिकडून प्रमोद ने आपलं लक्ष्य पॅरा खेळांकडे वळवलं आणि त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तिकडून सुरु झालेला त्याच्या यशाचा आलेख चढताच राहिला. प्रमोद पॅराबॅडमिंटन स्पर्धेत जागतिक पातळीवर ३ वेळा वर्ल्ड  चॅम्पियन ठरला. बॅडमिंटन खेळातील त्याच सातत्य आणि जिद्द इतकी होती की पुरस्कारांचा पाऊस एकामागोमाग पडत राहिला. २०२० साली टोकियो पॅराऑलम्पिक स्पर्धेत याच वर्षी एस. एल. ३ या प्रकाराच्या बॅडमिंटन या खेळाचा प्रवेश केला जाणार होता. भारत सरकारच्या  Sports Authority of India ने देशातील विविध खेळाडूंना निवडून ज्यांच्यात ऑलम्पिक मेडल जिंकण्याची क्षमता आहे त्यांच्यावर Target Olympic Podium Scheme (TOPS) या कार्यक्रमा अंतर्गत अजून लक्ष द्यायला सुरवात केली होती. ज्यात प्रमोद भगत चा समावेश होता. आपल्यावर देशाने ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करत प्रमोद ने पॅराऑलम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. 

प्रमोद भगत चा हा प्रवास सोप्पा नव्हता. अनेक अडचणीतुन त्याने मार्ग काढला. ज्या वडिलांनी आयुष्यातला एक कठोर निर्णय घेऊन प्रमोद चे हात वाचवले होते तेच वडील त्याच्यासाठी रोल मॉडेल ठरले. प्रमोद च्या प्रत्येक इच्छेला त्यांनी आत्मविश्वासाचे पंख दिले. त्यामुळेच प्रमोद आज इतिहास रचू शकलेला आहे. कोणताही खेळ म्हंटला की हार जीत ही येतेच आणि त्याही पेक्षा महत्वाचा असतो तो खेळाडूचा शारिरीक आणि मानसिक फिटनेस. कोणत्याही खेळाडूचे कोच आणि त्याच कुटुंब या बाबतीत महत्वाची भूमिका बजावते. प्रमोद ला झालेल्या शारिरीक दुखापतीमुळे त्याच्या करीयरवर काळे ढग जमा झाले होते. प्रमोद स्वतः यामुळे निराशेच्या गर्तेत लोटला गेला होता. पुन्हा आपण कधी बॅडमिंटन ची रॅकेट हातात धरू की नाही अशी शंका वाटत असतात त्याचे कोच गौरव खन्ना यांनी त्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं. त्याची अपयशातून यशाकडे घेतलेली ही उडी इतकी निर्णायक होती की २०२१ या वर्षात प्रमोद अजिंक्य राहिलेला आहे. जगातील क्रमांक १ चा खेळाडू म्हणून त्याने स्पर्धेत भाग घेतला आणि पॅराऑलम्पिक स्पर्धेच सुवर्ण पदक जिंकूनच तो तिकडून बाहेर पडला आहे. प्रमोद स्पर्धेआधी म्हणाला होता, 

Olympics is the dream of every athlete and mine as well. I want to make my country proud by crediting medals through my historical performances at the biggest sports stage-Olympics.

आपले शब्द त्याने तंतोतत खरं करून दाखवले आहेत. या यशात त्याची मेहनत, जिद्द, चिकाटी तर आहेच पण त्या सोबत कोच गौरव खन्ना आणि भारताच्या Paralympic Committee of India (PCI) चा खूप मोठा सहभाग आहे. ज्यांनी प्रमोद सारख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार केलं. प्रमोद भगत ने स्वतः म्हंटल होतं, 

To participate in international stages such as the Olympics is not a cup of tea nowadays as the competition is on the verge but one should go with the aim to win and not just to participate.  

आज प्रमोद भगत ने पोलिओ ला हरवत पॅराऑलम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करत एक इतिहास रचला आहे. त्याचे वडील जिथे कुठे असतील तिथे त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाचा आज अभिमान असेल. त्यांच्या मुलाने आज पोलिओ ला हरवून संपूर्ण देशापुढे असं एक उदाहरण ठेवलं आहे जे अनेक खेळाडूंना आपलं सर्वोत्तम देण्यासाठी प्रोत्साहित तर करेलच पण त्या पलीकडे प्रत्येक आयुष्यातील अश्या कठीण निर्णयांचा सामना करण्यासाठी हिंमत देईल.

प्रमोद भगत च त्याच्या यशासाठी खूप खूप अभिनंदन. त्याच्या जिद्दीला माझा कडक सॅल्यूट आणि पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Thursday 2 September 2021

'लैंगिक शिक्षण', एक चुकलेलं गणित... विनीत वर्तक ©

 'लैंगिक शिक्षण', एक चुकलेलं गणित... विनीत वर्तक ©


'लैंगिक शिक्षण' हा विषय जितका सोप्पा आहे तितकाच गुंतागुंतीचा आहे. खरं तर अन्न, वस्र, निवारा या नंतर मानवाची चौथी मूलभूत गरज ही लैंगिकतेशी निगडीत असताना या विषयावर काही बोलणं अथवा लिहीणं हे समाजाच्या चौकटीत आजही भुवया उंचावणारं ठरतं. वयाच्या १२-१३ वर्षांपासून अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत असणाऱ्या या विषयावर आज अनेक प्रकारचं ज्ञान उपलब्ध असलं तरी ते योग्य रीतीनं पोहोचवण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आपण समाज म्हणून आजही खूप अपयशी ठरलेलो आहोत. समाजरचनेच्या अनेक टप्प्यांवर हे ज्ञान खरं तर जवळ असणाऱ्या लोकांकडून दिलं जायला हवं, पण असं होतं का? आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं? पैसे कसे कमवायचे? करिअर कोणतं निवडायचं? अगदी कपडे कोणते आणि कसे घालायचे, ते लग्न कोणाशी आणि कसं करायचं याबद्दल सजग असणारे आपल्या जवळचे लोक 'लैंगिक शिक्षण' या विषयाची माहिती आपल्याला बाहेरून मिळाली असेल, अथवा आपण ती करून घ्यावी, असा समज करून घेतात. 

मुळातच अगदी मासिक पाळीपासून समागमापर्यंत आणि लैंगिक अवयवांच्या ओळखीपासून समलैंगिकतेपर्यंतचे अनेक पदर या एका विषयाखाली येतात. हे सगळे गुंते सोडवण्याचं शिवधनुष्य ज्याचं त्याला पेलावं लागतं. किंवा ते प्रत्येक व्यक्तीनं पेललेलं असेल किंवा पेललं जाईल अशी अपेक्षा समाज आणि आपल्या जवळच्या व्यक्ती करत असतात. अर्थात त्या चुकीच्या नाहीतच. कारण आपली जी समाजव्यवस्था आहे त्यात अश्या गोष्टींचं शिक्षण कश्यापद्धतीनं द्यावं किंवा त्याची खोली काय असावी याबद्दलचे कोणतेच मापदंड अस्तित्वात नाहीत. दोन अपूर्णांक पूर्ण होण्यासाठी मानसिक आणि शारीरिक मिलन या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. शारीरिक मिलन ही नवीन सजीव निर्माण करण्याची प्रक्रिया लग्न नावाचा सोहळा झाल्यानंतर करण्याची अनुमती आपला समाज देतो आणि या सोहळ्याच्या आधी असा अनुभव किंवा नंतर दुसऱ्या व्यक्तीसोबत घेतलेला अनुभव हा समाजात निषिद्ध मानला गेला आहे. हा एकमेव मापदंड समाजाच्या रचनेत अंतर्भूत केला गेला आहे. 

प्रत्येक व्यक्ती हा निसर्गात वेगळा म्हणून जन्माला येतो, हे आपल्याला माहीत आहे. त्याचं दिसणं, स्वभाव, व्यक्तिमत्व आणि मन हे सुद्धा एकमेव असंच असतं. मग त्याच्या शारीरिक गरजा या सगळ्यांच्या एकसारख्या कश्या असतील? त्या गरजांचा अभ्यास कधी केला जातो का? तो अभ्यास करण्याची यंत्रणा एक समाज म्हणून आपण निर्माण केली आहे का? त्या व्यक्तीला मिळालेलं ज्ञान योग्य की अयोग्य ? त्याचे स्त्रोत कोणते? असे प्रश्न आपल्याच लोकांना पडतात का? किती आई वडील अथवा कुटुंबांत आपल्या मुलाला/मुलीला जोडीदाराच्या आणि स्वतःच्या शारीरिक अपेक्षांबद्दल ज्ञान, अनुभव किंवा पद्धती याबद्दल वैचारिक देवाणघेवाण केली जाते. 'लैंगिक शिक्षण' हे मासिक पाळी आणि गुड टच-बॅड टच यापुरतं मर्यादित नाही. किती वडीलधाऱ्या माणसांकडून आपल्या पाल्याच्या सेक्स किंवा एकूणच लैंगिक कल्पनांच्या स्तराचा आढावा घेतला जातो किंवा त्याबद्दलचे अनुभव हे शेअर केले जातात? आपल्या मुलीला अथवा मुलाला मिळालेलं लैंगिक ज्ञान हे योग्यच आहे हे किती पालक ठामपणे सांगू शकतात. 

लैंगिक ज्ञान मिळवण्याचे आजचे स्त्रोत जर बघितले तर ते अनेकदा मित्र-मैत्रीण, इंटरनेट, पॉर्न साईट, ब्लु फिल्म्स, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम किंवा अगदी क्राईम पेट्रोलसारख्या मालिका तसेच काही बाबतीत पुस्तकं अथवा मासिक यांपुरते मर्यादीत आहेत. मग या सगळ्या लैंगिक ज्ञान देणाऱ्या स्त्रोतांवर समाजाचं काय बंधन आहे? अथवा काही मापदंड आहेत का? चार भिंतीतल्या गोष्टी चार भिंतीत ठेवण्याचं ज्ञान आपल्याला दिलं जातं, पण त्या चार भिंतीत काय गोष्टी करायच्या या मात्र आपण बाहेरून कुठून तरी शिकायचं असतं, तसंच त्या कितपत योग्य अथवा अयोग्य याबद्दल कोणालाही विचारण्याची सोय आपण केलेली नसते. मग चुकीचं शिकून त्या चार भिंतीत घडणाऱ्या गोष्टींचे चटके मनाला किंवा शरीराला लागले तर मुकाट्याने सहन करत पुढे नेण्याच्या प्रक्रियेला 'संसार' असं गोंडस नाव देतो. जिकडे पाळणे हलतात पण कड्यावरून कोसळणं काय असतं ते कधी अनुभवलं जात नाही, समजून घेतलं जात नाही.  

आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या लैंगिक अनुभवांतून जातो. तारुण्याच्या सुरूवातीला मासिक पाळी आणि वीर्यस्लखन या बदलांपासून सुरू झालेला प्रवास मेनोपॉझ आणि इरेक्टाइल डिसफंक्शनपर्यंत होतो. प्रत्येकवेळी या टप्प्यांवर होणारे बदल स्वीकारण्यासाठी समाजाने कोणत्या शिक्षणपद्धतीची सोय केली आहे? यांतील प्रत्येक टप्प्यांवर अनेक प्रश्न असतात, पण ते विचारण्याची आणि त्याचं समाधानकारक उत्तर शोधण्याची व्यवस्था आज आपला समाज करू शकलेला नाही. आजही या गोष्टी बोलण्याची अथवा त्यावर चर्चा करण्याची मोकळीक समाज आपल्याला देत नाही. लैंगिक शिक्षणाचे समलैंगिकता, सेफ सेक्स, बर्थ कंट्रोल, sexual abstinence (लैंगिक संयम) हे सगळे पदर तर बाजूलाच राहिले. त्यावर अजून ब्र काढण्याची हिंमत किती जण करतात? खरे तर हे विषय आहेत हे पण आपण अजून उमजून घेतलेले नाही. त्यामुळे एकमेकांच्या आयुष्याच्या त्या चार भिंतीत काय सुरू आहे हे जाणून घेण्याच्या इच्छेने आसुसलेले आपण सर्वच मुळात त्या चार भिंतीत काय करायचं असतं, हे योग्य रीतीने जाणून घेण्यासाठी किती मेहनत घेतो याचा विचार आपण करायला हवा.  

लैंगिकता एक अभ्यास आहे एखाद्या गणितासारखा. गणितात जशी सुरूवात आकड्यांपासून होते. मग त्या आकड्यांशी जवळीक केली की आपण अनेक प्रमेयं सोडवू शकतो, पण जर ती ओळख करून न घेता प्रमेयं सोडवायला सुरूवात केली तर गणितं हमखास चुकणार. तीच अवस्था लैंगिकतेच्या बाबतीत आहे. तो अभ्यास आहे जो आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करावा लागतो. त्यातून आपली कोडी आपण सोडवायची असतात. काही सूत्रं जरी समान असली तरी समोर येणारं प्रत्येक गणित हे ज्याप्रमाणे वेगळं असतं त्याचप्रमाणे लैंगिकतेचे अनुभव, अडचणी, अगदी मिळालेली आणि काढलेली उत्तरंसुद्धा वेगळी असतात. गरज आहे ती हा गुंता सोडवण्याची आणि तो सोडवण्यासाठी लागणारी सशक्त व्यवस्था निर्माण करण्याची. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.