Sunday 26 December 2021

हबल ते जेम्स वेब..विश्वाची रहस्य उलगडणारे डोळे (भाग २)... विनीत वर्तक ©

 हबल ते जेम्स वेब..विश्वाची रहस्य उलगडणारे डोळे (भाग २)... विनीत वर्तक ©

 

मागच्या भागात आपण बघितलं की कश्या पद्धतीने लांब अंतरावर असणाऱ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला इन्फ्रारेड व्हेव लेंथ मधे लागणारी दुर्बीण हवी होती. रेडशिफ्ट या विश्वाच्या प्रसारणामुळे होणाऱ्या बदलांसोबत अजून एका कारणासाठी इन्फ्रारेड व्हेव लेंथ दुर्बीण महत्वाची होती. आपण जो प्रकाश आत्ता बघत आहोत तो त्याच्या मूळ स्थानापासून मिलियन, बिलियन वर्षापूर्वी निघालेला आहे. आज आपण जी स्थिती बघणार ती मिलियन, बिलियन वर्षापूर्वीची असेल. याचा सरळ अर्थ आपण भुतकाळात डोकावून बघत आहोत. जिथून प्रकाश निघाला तिथून ते तो आपल्या पर्यंत पोहचला तिथपर्यंत त्याच्या मार्गात धूळ, गॅस हे घटक आडवे आले असतील. त्यामुळे तो प्रकाश त्यात शोषला जातो किंवा अडवला जातो. त्यामुळे व्हिजिबल स्पेक्ट्रम मधील प्रकाश हा आपल्या पर्यंत पोहचत नाही. प्रकाश पोहचला नाही तर आपल्याला अंधार दिसणार. पण याला अपवाद आहे इन्फ्रारेड. इन्फ्रारेड तरंगामधील प्रकाश अवकाशातील गॅस आणि धुळीचं साम्राज्य अडवू शकत नाही. तो त्यांना चिरून आरपार निघून जातो. याचा सरळ अर्थ आहे की इन्फ्रारेड तरंग लांबी मधून दिसणारं विश्व हे अधिक सखोल आणि सुस्पष्ट असणार आहे. या दोन महत्वाच्या कारणांसाठी जेम्स वेब दुर्बीण ही इन्फ्रारेड प्रकाश बघण्यासाठी बनवली गेली. जश्या हबल च्या स्पेक्ट्रम मर्यादा आहेत तश्याच जेम्स वेब च्या ही आहेत. जेम्स वेब आपला फोकस इन्फ्रारेड वर करणार असल्याने हबल जे अल्ट्राव्हॉयलेट मधे विश्व बघू शकते ते मात्र जेम्स वेब ला बघता येणार नाही. पण हबल आणि जेम्स वेब या एकमेकांसाठी पडत्या बाजू आहेत तिकडेच मजबूत आहेत. त्यामुळेच हबल आणि जेम्स वेब मिळून विश्वाची अनेक रहस्य आणि गुंतागुंत येत्या काळात सोडवणार आहेत. एकाचवेळी आपण विश्वाचा अल्ट्राव्हॉयलेट ते इन्फ्रारेड अश्या तरंग लांबीत सगळा प्रवास बघू शकणार आहोत. 


इन्फ्रारेड तरंग लांबीतील प्रकाश बघणं तितकं सोप्प नाही. त्यासाठीच जेम्स वेब दुर्बीण बनवताना खूप काळजी घेतली गेली आहे. यातील उपकरणं तपमानावर खूप अवलंबून आहेत. तपमानातील थोडा फरक सुद्धा अश्या दुर्बिणीला आंधळ बनवू शकतो. जर या दुर्बीणीचं तपमान वाढलं तर त्यावरून परावर्तित होणाऱ्या उष्णतेमुळे दुर्बीण लांबून येणारा इन्फ्रारेड प्रकाश बघू शकत नाही. याचा अर्थ दुर्बीण अवकाशात अश्या ठिकाणी पाठवावी लागणार होती की जिकडे पृथ्वीवरून उत्सर्जित होणारं रेडिएशन कमी असेल. त्याच सोबत सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेला कमीत कमी दुर्बिणी पर्यंत जात येईल. हबल दुर्बीण पृथ्वीजवळ ५७० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केलेली आहे. पण जेम्स वेब ला याच्या कित्येक पट लांब अंतरावर प्रक्षेपित करावं लागणार होतं. पण लांब अंतरावर पाठवायचं म्हणजे तितकं शक्तिशाली रॉकेट हवं. त्याचसोबत दुर्बिणीत इतकं इंधन हवं की जे दुर्बिणीची कक्षा येणारी कित्येक वर्ष सांभाळू शकेल. मग अशी एखादी जागा हवी की जी पृथ्वीपासून पण लांब असेल आणि त्याचवेळी दुर्बिणीला आपल्या कक्षेत राहण्यासाठी कमीत कमी इंधन लागेल. 


जोसीफे लाग्रांज याने १७७२ 'जनरल थ्री बॉडी प्रॉब्लेम' या नावाने एक प्रमेय शोधलं. त्याने दाखवून दिलं की दोन मोठी वस्तुमान असलेल्या ज्यांच्या गुरुत्वाकर्षणाचच्या बलाचा परीणाम शून्य करणारा सेंट्रीफ्युकल फोर्स एखाद्या लहान वस्तूला त्या दोघांन भोवती त्यांच्या सामान वेगाने फिरवत ठेऊ शकेल. आता  हे सोप्या शब्दात समजून घ्यायचं झालं तर सूर्य आणि पृथ्वी यांच एकत्रित गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव शून्य करण्यासाठी जो सेंट्रीफ्युकल फोर्स लागेल त्यासाठी लागणारा वेग आणि त्याच्या परिवलनाचा वेग समान असेल. सूर्याभोवती एकाच ठराविक कक्षेत सगळे ग्रह परिवलन करतात. त्याला कारण त्यांचा सेंट्रीफ्युकल फोर्स आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण हे एकमेकांचा प्रभाव शून्य करते. कारण ही दोन्ही बल विरुद्ध दिशेने कार्य करतात. आता एखाद्या तिसऱ्या वस्तूला म्हणजेच यानाला, उपग्रहाला पृथ्वीच्या वेगाने ( ज्या वेगात पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे ) पृथ्वीसोबत फिरायचं पण आहे आणि त्याचवेळी सूर्य आणि पृथ्वी यांच्या एकत्रित गुरुत्वाकर्षणाचा परिणाम पण शून्य ठेवायचा आहे. त्यामुळे ते यान, उपग्रह कमीत कमी इंधनात पृथ्वीवर न आदळता किंवा अवकाशात न भरकटता पृथ्वीसोबत  सूर्याची प्रदक्षिणा करत राहील. तर अशी फक्त ५ स्थानं अवकाशात आहेत. ज्यांना जोसीफे लाग्रांज याने शोधलेल्या प्रमेयावरून लाग्रांज पॉईंट असं म्हंटल जाते. 


जेम्स वेब दुर्बीण ही अश्याच एका पॉईंट वर म्हणजेच एल २ या स्थानावर प्रक्षेपित करण्यात आलेली आहे. हा जो पॉईंट आहे तो पृथ्वीपासून तब्बल १.५ मिलियन (१५ लाख) किलोमीटर लांब आहे. चंद्र आणि पृथ्वी यातलं अंतर फक्त ३.८ लाख किलोमीटर आहे. आता लक्षात आलं असेल की जिकडे हबल फक्त ५७० किलोमीटर अंतरावर आहे तिकडे जेम्स वेब १५ लाख किलोमीटर पृथ्वीपासून लांब असणार आहे. या अंतराचे खूप फायदे आहेत. जसं वर लिहिलं तसं  पृथ्वीपासून इतक्या लांब असल्यामुळे पृथ्वीच्या रेडिएशन पासून संरक्षण होणार आहे. पण अजून एक अडचण जेम्स वेब दुर्बिणीपुढे होती. ती म्हणजे सूर्याकडून येणारं रेडिएशन आणि ऊर्जा. यामुळे दुर्बिणीच तपमान कमी ठेवणं हे कठीण होतं. यावर तोडगा म्हणून जेम्स वेब च्या निर्मितीत त्याला प्रचंड मोठी अशी सन शिल्ड लावण्यात आली आहे. ही एका लॉंग टेनिसच्या कोर्टाइतकी मोठी आहे. ही सन शिल्ड सूर्याकडून येणारी ऊर्जा आणि रेडिएशन शोषून जेम्स वेब दुर्बीणीचं  तपमान नियंत्रित ठेवणार आहे. इतकी मोठी सन शिल्ड जेम्स वेब प्रक्षेपणासाठी एका छोट्या जागेत घडी केली गेली आहे. जेव्हा जेम्स वेब आपल्या इच्छित स्थळी पोहचेल तेव्हा ही सन शिल्ड एखाद्या उमलणाऱ्या फुलाप्रमाणे या दुर्बिणीभोवती संरक्षण कवच तयार करेल. 


दुर्बीण किती बघू शकते हे तिच्या डोळ्यांवर ही अवलंबून आहे. हे डोळे म्हणजे तिचा आरसा. या आरश्यावर पडणाऱ्या प्रकाशावरून आपण इतक्या लांबच्या गोष्टी बघू शकतो. हबल चा आरसा हा २.४ मीटर व्यासाचा आहे. तर जेम्स वेब चा आरसा हा ६.५ मीटर व्यासाचा आहे. हबल पेक्षा जेम्स वेबच्या आरशाचे क्षेत्रफळ हे ६.२५ पट जास्ती आहे. यामुळे जेम्स वेब ची क्षमता हबल पेक्षा खूप जास्ती आहे. सुस्पष्ट प्रतिमा, जास्ती अंतरापर्यंतचा प्रकाश शोधण्याची शक्ती आणि एकूणच हबल पेक्षा तंत्रज्ञानात अतिशय अद्यावत अशी जेम्स वेब दुर्बीण आहे. पण हे सगळं पृथ्वीपासून १.५ मिलियन किलोमीटर अंतरावर घडवून आणण्यासाठी अतिशय क्लिष्ठ अश्या तंत्रज्ञानाचा वापर जेम्स वेब दुर्बीण बनवताना केला गेला आहे. यातली एक जरी यंत्रणा बिघडली तर दुरुस्त करण्याचा कोणताच मार्ग निदान आत्तातरी नासाकडे नाही. दुर्बिणीला आपली कक्षा आहे तशी ठेवण्यासाठी आणि काम करण्यासाठी त्यावर सध्या १० वर्ष पुरेल इतकं इंधन भरण्यात आलं आहे. त्याचसोबत पुढल्या १० वर्षात आपण १.५ मिलियन किलोमीटर अंतरावर यान अथवा माणूस पाठवू शकलो तर त्याची टाकी पुन्हा इंधन भरण्यासाठी बनवली गेली आहे. नासा ला आशा आहे की आपण नक्कीच तोवर तंत्रज्ञानात इतकी मजल मारू. 


आधी हबल आणि आता जेम्स वेब दुर्बीण मानवाच्या तांत्रिक क्षमतेतील एक मैलाचा दगड आहेत. ज्या पद्धतीने हबल ने गेल्या दोन दशकात विश्वाची रहस्य उलगडली त्यापेक्षा जास्ती रहस्य जेम्स वेब दुर्बीण तिच्या क्षमतेमुळे उलगडेल असा नासा आणि एकूणच संशोधकांना विश्वास आहे. एरियन रॉकेट ने काल जेम्स वेब ला तिच्या प्रवासावर मार्गस्थ केलं आहे. कालचं प्रक्षेपण दृष्ट लागेल इतकं जबरदस्त आणि अचूक होतं. आता पुढला एक महिना जेम्स वेब एल २ या आपल्या ठरलेल्या जागेकडे ३५,४०० किलोमीटर / तास वेगाने प्रवास करत आहे. मला आशा आहे की जेम्स वेब दुर्बिणी वरच्या सगळ्या यंत्रणा सुनियोजित पद्धतीने कार्य करतील आणि काही महिन्यात जेव्हा जेम्स वेब आपल्या डोळ्यांनी विश्वाकडे बघेल तेव्हा विश्वातील अनेक रहस्य आपल्यापुढे उलगडेल. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनडा स्पेस एजन्सी आणि २९ देश आणि १०,००० संशोधक, वैज्ञानिक, अभियंते, कामगार ज्यांनी मानवाच्या या उत्तुंग प्रकल्पाची निर्मिती केली त्या सर्वाना माझा सलाम. जेम्स वेब दुर्बिणीच्या पुढल्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. 


समाप्त.  


फोटो शोध सौजन्य :-  गुगल , नासा ( फोटो १:- इन्फ्रारेड आणि व्हिझिबल स्पेक्ट्रम मधील फरक दर्शिवणारा फोटो. इन्फ्रारेड फोटोत आपण खूप साऱ्या गोष्टी सुस्पष्ट बघू शकतो., फोटो २ :- लाग्रांज पॉईंट एल १ ते एल ५. एल २ इकडे जेम्स वेब दुर्बीण दिसत आहे., फोटो ३:- हबल आणि जेम्स वेब दुर्बिणीच्या आरशाचे एकमेकांसोबत तुलना )


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 





Saturday 25 December 2021

हबल ते जेम्स वेब..विश्वाची रहस्य उलगडणारे डोळे (भाग १)... विनीत वर्तक ©

 हबल ते जेम्स वेब..विश्वाची रहस्य उलगडणारे डोळे (भाग १)... विनीत वर्तक ©

मानवाने तंत्रज्ञान क्षमतेत उंची गाठल्यावर विश्वाच्या अनेक रहस्यांचा वेध घेण्यासाठी दुर्बिणीने या अनंत विश्वाच्या पसाऱ्याकडे बघण्यास सुरवात केली. आजच्या नोंदीनुसार ख्यातनाम शास्त्रज्ञ ग्यालीलियो ने आकाशाकडे दुर्बिणीतून पहिल्यांदा १६१० साली बघितलं. त्यातून त्याला विश्वाची काही रहस्य उलगडली. त्यातून अजून चांगल्या पद्धतीने विश्वाची रचना समजून घेण्यासाठी दुर्बिणीच्या रचनेत मानव प्रगती करत गेला. अनेक संशोधनानंतर असं लक्षात आलं की पृथ्वीचं वातावरण आणि एकूणच आपल्या पृथ्वीच्या रचनेमुळे आपण विश्वात काय बघू शकतो किंवा आपल्याला काय दिसते यावर खूप मर्यादा येतात. त्यामुळेच अवकाशात एखादी दुर्बीण पाठवली तर पृथ्वी वरच्या वातावरणाचा अडथळा आपण दूर करू. त्यातून आपल्याला विश्वाची रहस्य अजून जास्ती चांगल्या पद्धतीने उलगडता येतील असा विचार १९७० च्या दशकात मानवाने केला. 

प्रत्यक्षात ही संकल्पना साकार व्हायला मात्र १९९० साल उजडावं लागलं. १९९० मध्ये स्पेस शटल डिस्कव्हरी मधून पृथ्वीच्या लो ओर्बीट म्हणजे पृथ्वीपासून ५७० किलोमीटर उंचीवर एक दुर्बीण स्थापन करण्यात आली. नासा, युरेपियन स्पेस एजन्सी आणि स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट ह्यांनी एकत्र येऊन ह्या प्रोजेक्ट वर काम केलं. ख्यातनाम अवकाश वैज्ञानिक एडविन हबल ह्यांच्या स्मरणार्थ ह्या दुर्बिणी ला त्याचं नाव दिल गेल. १.५ बिलियन अमेरिकन डॉलर ( जवळपास ९७ अब्ज रुपये)  एवढा अवाढव्य खर्च त्यासाठी केला गेला. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, ढगांच्या पलीकडे प्रक्षेपित केलेली पहिली दुर्बीण असा मान मिळवणारी हबल प्रक्षेपित होताच संकटात सापडली. हबल चा मुख्य आरसा बसवण्यात तांत्रिक त्रुटी अवकाशात गेल्यावर वैज्ञानिकांना आढळून आल्या. ह्या त्रुटींमुळे हबल च्या क्षमतेवर प्रचंड परिणाम होणार होता. म्हणून हबल ला अवकाशात दुरुस्त करण्यासाठी तब्बल ५ मोहिमा आखल्या गेल्या. ह्या सगळ्या मोहिमेंमध्ये हबलमध्ये तांत्रिक बदल केले गेले. २००९ मध्ये हे सर्व बदल यशस्वीरीत्या करून हबल विश्वाच दर्शन मानवाला करून देत आली. विश्वाच जे रूप तिने मानवासमोर आणल. त्याने आपल्या अवकाशाच्या आकलनात पडलेली भर शब्दात सांगता येणार नाही. 

१९९० पासून हबल ने आत्तापर्यंत १.३ मिलियन ( १३ लाख ) अवकाश निरीक्षण नोंदवली आहेत. 

हबल च्या निरीक्षणातून तब्बल १५,००० वैज्ञानिक निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. 

हबल ची अचूकता कोनाच्या ०.००७ सेकंद इतकी आहे. हि अचूकता म्हणजे दोन रुपयांच्या नाण्यावर लेझर बीम साधारण ३२० किमी वरून केंद्रित करण्याइतकी आहे.

हबल कोनाच्या ०.०५ सेकंद इतक्या छोट्या प्रकाशाचा वेध घेऊ शकते. हे म्हणजे मुंबईत बसून अमेरिकेतील क्यालीफोर्निया मधील एका झाडावर असलेल्या काजव्या च्या प्रकाशाचा वेध घेण्याएवढी प्रचंड आहे.

हबल ने आत्तापर्यंत तब्बल १३.५ बिलियन वर्षापूर्वीच्या प्रकाशाचा वेध घेतला आहे. (हबल ने १३.५ बिलियन (१ बिलियन १०० कोटी) अंतरावर असलेल्या आकाशगंगेचा वेध घेतला आहे. दुसऱ्या अर्थी १३.५ बिलियन प्रकाशवर्ष इतक्या प्रचंड अंतरावर हबल ने आपल्या डोळ्यातून बघितलं आहे.)  

हबल ने आजवर मानवाच्या विश्वाबद्दलच्या आकलन आणि बौद्धिक क्षमतेत टाकलेली भर सांगायची झाली तर एक ग्रंथ तयार होईल. पण असं असलं तरी हबल च्या काही मर्यादा आहेत. जसं मानवाचं विश्वाबद्दलचं आकलन वाढत गेलं तसं या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या. यामुळेच १९९६ साली हबल च्या मर्यादांवर मात करणारी एक दुर्बीण तयार केली जावी असा विचार पुढे आला. त्याच उत्तर म्हणजेच 'जेम्स वेब' दुर्बीण. अनेकांना असं वाटत आहे की जेम्स वेब दुर्बीण हबल ची जागा घेणार. पण प्रत्यक्षात तसं काहीच नाही. हबल आपला शोध चालूच ठेवणार आणि जेम्स वेब जे हबल ला जमलं नाही ते आपल्याला उलगडून दाखवणार. जेम्स वेब मधे नक्की असं काय केलं गेलं आहे ज्यामुळे ती हबल च्या पेक्षा दूरवर आणि अधिक स्पष्टपणे बघू शकणार आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. 

जेम्स वेब ही दुर्बीण बनवण्यासाठी १००० कोटी अमेरिकन डॉलर पेक्षा जास्ती खर्च आला आहे. तब्बल २० वर्षाचा कालावधी बनवण्यासाठी तर १०,००० पेक्षा जास्त वैज्ञानिक, अभियंते यांच्या अथक परिश्रमातून ती जन्माला आली आहे. पण हे सगळं कश्यासाठी हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रकाश आणि विश्वाची रचना थोडी समजून घ्यावी लागेल. 

आपल्याला दिसतो तेवढाच प्रकाश असतो असं नाही. प्रकाशाचे त्याच्या तरंग लांबी वरून अनेक भाग पडतात ज्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतात. ज्याची तरंग लांबी सगळ्यात कमी ते म्हणजे गॅमा रेज, त्यानंतर येतात ते एक्स रे, मग अल्ट्राव्हॉयलेट त्यानंतर येतो जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो तो प्रकाश त्यानंतर येतो तो इन्फ्रारेड, मग मायक्रोव्हेव, सगळ्यात जास्ती तरंग लांबी ज्यांची असते त्या रेडिओ वेव्ह. हबल दुर्बीण ज्या स्पेक्ट्रम मधून विश्वाचे अंतरंग शोधते तो भाग मुखत्वे करून अल्ट्राव्हॉयलेट आणि व्हिझिबल स्पेक्ट्रम या भागात येतो. अगदी काही प्रमाणात हबल इन्फ्रारेड चा वेध घेऊ शकते. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं असेल की हबल ची मर्यादा ही स्पेक्ट्रम च्या मर्यादेत आहे. याचा अर्थ हबल इन्फ्रारेड या भागात असणाऱ्या प्रकाशाचा वेध घेऊ शकत नाही. समोर गोष्ट असताना हबल ला ती एकप्रकारे दिसत नाही. इन्फ्रारेड हा प्रकाशाचा भाग अतिशय महत्वाचा असल्याचं संशोधकांना समजल्यानंतर त्यांना कळून चुकलं की हबल ने भरभरून दिलं तरी त्यांच्या हातातून खूप काही निसटत आहे. 

 इन्फ्रारेड प्रकाश हा का महत्वाचा हे समजण्यासाठी आपण थोडं मागे जाऊ. १९१५ मधे जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ने जनरल रिलेटिव्हिटी च्या थेअरी मधे एक विलक्षण गोष्ट सिद्ध केली होती. ती म्हणजे विश्वाचं प्रसरण. अल्बर्ट आईनस्टाईन ने सप्रमाणात सिद्ध केलं की विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून ते प्रसरण पावत आहे. विश्वाचं प्रसरण म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायला आपण रबराच उदाहरण घेऊ. रबराच्या दोन्ही टोकाला समजा दोन वस्तू आहेत. समजा आपण रबर ताणला तर काय होईल? दोन्ही वस्तू एकमेकांपासून जरी दूर गेल्या नसल्या तरी रबर ताणल्यामुळे त्यामधील अंतर आपोआप वाढलेलं असेल. अगदी हेच विश्वात होते आहे. यात वस्तू म्हणजे विश्वातील आकाशगंगा आणि रबर म्हणजे त्यातील मोकळी असलेली जागा. आता ही जागा जर प्रसारण पावत असेल तर त्याच्या दोन्ही टोकाला असणाऱ्या आकाशगंगा या एकमेकांपासून आपोआप लांब होतील. याचवेळी त्यामधे प्रवास करणारा प्रकाश सुद्धा ताणला जाईल. प्रकाश ताणला जाईल म्हणजे काय? तर त्याची तरंग लांबी वाढेल. आपण वर बघितलं की तरंग लांबी वाढली तर एखादा अल्ट्राव्हॉयलेट भागात असणारा प्रकाश दृश्य रूपात तर दिसणारा प्रकाश इन्फ्रारेड कडे वाटचाल करेल. 

आता लक्षात आलं असेल की जर विश्व प्रसरण पावते आहे. तर १३.५ प्रकाशवर्ष अंतरावरून येणारा प्रकाश हा प्रचंड प्रमाणात ताणला गेला असेल. यालाच 'रेडशिफ्ट' असं म्हणतात. जर आपल्याला अधिक दूरवरचा प्रकाश आणि तो ज्यांच्याकडून येतो त्या गोष्टी बघायच्या असतील तर आपल्या दुर्बिणी पण रेडशिफ्ट करायला हव्यात. इथेच हबल च्या मर्यादा येतात कारण हबल इन्फ्रारेड मधील प्रकाशाचा वेध घेऊ शकत नाही. म्हणजे आजवर जे हबल ने १३.५ प्रकाशवर्ष अंतरावरचं दाखवलं ते हिमनगाचे टोक होतं. प्रत्यक्षात आपलं टायटेनिक झालं म्हणजे एक प्रकारे आपण खूप मोठा भाग बघूच शकलो नाही. वैज्ञानिकांना तीच सल टोचायला लागली. त्यावरचं उत्तर होतं अर्थातच विश्वाची रहस्य उलगडणारे नवीन डोळे म्हणजेच 'जेम्स वेब दुर्बीण'. 

क्रमशः

फोटो शोध सौजन्य :-  गुगल , नासा ( फोटोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम )

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Wednesday 22 December 2021

पिनोचिओ... विनीत वर्तक ©

 पिनोचिओ... विनीत वर्तक ©

सध्या 'पिनोचिओ' नावाची एक कोरियन सिरीज बघत आहे. या सिरीज चा मुख्य आशय हा पिनोचिओ नावाच्या अश्या एका प्रकाराशी निगडित आहे. ज्यात या प्रकारची अवस्था असणाऱ्या माणसाने खोटं बोलल्यावर त्याला अथवा तिला उचकी लागते. या सिरीज च्या कथानकात मला जायचं नाही. पण ही सिरीज अतिशय सुंदर रीतीने अतिशय महत्वाच्या विषयाला स्पर्श करते. हा विषय म्हणजे 'समाजमाध्यमांची जबाबदारी'. खरे तर हा विषय इतका महत्वाचा आहे पण त्याबद्दल आपण अजिबात जागरूक नाहीत. आज जेव्हा सोशल मिडिया च्या माध्यमातून समाजातील सर्व घटक अगदी एका टिचकीवर एकमेकांशी जोडले गेले आहोत. तेव्हा या विषया बद्दलची जागरूकता असणं खूप महत्वाचं आहे. आज सोशल मिडिया आणि मेन स्ट्रीम मिडिया म्हणता येईल अश्या माध्यमातून ज्या पद्धतीने अतिशय खालच्या दर्जाने, उपहासात्मक टीका आणि एकद्याचं चारित्र्यहनन केलं जाते ते एखाद्या व्यक्तीच आणि त्याच्या कुटुंबाच आयुष्य देशोधडीला लावू शकते याचा अंदाज आपण लावत नाही आणि त्याची जबाबदारी आपण टाळून लावतो. 

एखादा पत्रकार किंवा आजच्या फेसबुक आणि व्हाट्स अप च्या जमान्यात एखाद्या विषयी बोलताना किंवा त्याच्या कुटुंबाविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी, वृत्तीविषयी टिपण्णी करताना आपण आपल्या शब्दांची शहानिशा संपूर्णपणे केलेली असते का? एखादी व्यक्ती चोर आहे, तिचं / त्याच व्यक्तिमत्व योग्य नाही. ती व्यक्ती व्यभिचार करणारी आहे. असं आपण एखाद्याबद्दल बोलून अथवा लिहून जातो तेव्हा त्या निष्कर्षाची चाचणी आपण घेतलेली असते का? कारण तुमच्या - आमच्यासाठी ती एखादी पोस्ट, गॉसिप किंवा बातमी असेल पण त्या व्यक्तीसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी विध्वंस करणारी घटना असू शकते. फेसबुक वर व्यक्तिमत्वावर शिंतोडे उडवल्यामुळे किती जणांचे संसार तुटले गेले आहेत. किती जणांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून गेले आहे. कितीतरी जणांसाठी अशी एखादी घटना, पोस्ट, गॉसिप हे मानसिक संतुलन घालवून बसायला आणि अगदी आत्महत्येसाठी प्रवृत्त करायला ठरलं आहे. या सगळ्याची जबाबदारी घेण्याची किंवा अश्या गोष्टी प्रत्यक्षात जर खऱ्या नसतील तर त्या चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडण्यासाठी आपण गुन्हेगार ठरतो आहोत हे स्वीकारण्याची आणि ती जबाबदारी घेण्याची आपली कुवत आहे का? 

पिनोचिओ ही सिरीज हीच गोष्ट अगदी सरळपणे आपल्या समोर मांडते. एक पत्रकार फक्त पिनोचिओ अवस्थेच्या व्यक्तीने केलेल्या वक्तव्याला आधार मानून एका व्यक्तीला अपराधी ठरवते. वस्तुस्थितीची शहनिशा न करता आपल्या शब्दांनी जनमानसात त्याच्या कुटुंबियांना अक्षरशः वाळीत टाकते. न्याय करण्याचं काम हे कोर्टाचं असताना बातमीच्या आधारे न्याय करून त्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत करते. तेव्हा त्या कुटुंबाला ज्या भयंकर परिणामातून जावे लागते ते बघितल्यावर आपल्याला आपल्या शब्दांच्या जबाबदारीची जाणीव होते. पिनोचिओ ही अवस्था किंवा सिरीज महत्वाची नाही. महत्वाची हे आहे की आपण त्यातून काय बोध घेतो. कोणताही पुरावा नसताना अथवा आपल्याला प्रत्यक्ष माहिती नसताना फक्त कोणीतरी सांगितलं किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या मतावरून आपलं मत बनवत ते बिनदिक्कतपणे रेटतो तेव्हा त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव आपल्याला होते का? 

एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्या बद्दल आपल्याला काहीही माहिती नसताना त्याच किंवा तीचे अमुक एका सोबत असे संबंध, अमुक एका सोबत लफडं या जोड्या  जुळवताना जर या गोष्टी त्यांच्या जोडीदारापर्यंत पोहचल्या तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करतो का? हीच गोष्ट इतर सर्व बातम्या, गोष्टी, गॉसिप, राजकारण, समाजकारण याला लागू आहे. आपले शब्द जेव्हा एका टिचकीवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्याची जाऊ शकतात तेव्हा ते समाजात मांडताना आपण खरं तर अजून जास्ती काळजी घ्यायला हवी. पण असा विचार किती लोकं करतात हा मोठा प्रश्न आहे. 

पिनोचिओ मधील कथानक ही खरं तर एक प्रवृत्ती आहे. ब्रेकिंग न्यूज, सबसे तेज, सगळ्यात आधी च्या काळात कोणाच्या मृत्यूची, घटनेची कोणतीही शहानिशा न करता आपण बिनदिक्कतपणे त्यावर मत मांडत असतो. आत्ताची एक ताजी घटना म्हणजे भारताचे नवीन सि.डी.एस. कोण असतील याची कोणतीही घोषणा झाली नसताना लोकांनी अक्षरशः भारतीय सैन्य प्रमुखांची त्या जागी निवड झाल्याची बातमी शेअर करून त्यांच्या शाळेची आणि अगदी जातीचीही कुंडली मांडण्यात उशीर केला नाही. यातील अनेक जण हे प्रगल्भ विचारांचे आहेत. पण सबसे तेज च्या काळात मी कसा अथवा कशी मागे राहू या भूमिकेतून ही बातमी चुकीची का बरोबर याची तपासणी करण्याची गरज ही लोकांना वाटली नाही. पिनोचिओ सिरीज नेमकी हीच वस्तुस्थिती आपल्या समोर मांडते. 

मला व्यक्तिशः कोणावर दोषारोप करायचे नाहीत. पण आपण जे लिहितो ते योग्य की अयोग्य, खरं आहे की  खोटं याची तपासणी आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवी. अर्थात अपवादात्मक चूक होऊच शकते. पण निदान ते तपासणी करण्याची तसदी आपण घेत गेलो की अश्या चुकांची संख्या ही कमी होत जाते. समाजमाध्यम वापरताना आपली ही जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. जेव्हा आपण ही सुरवात करू तेव्हा अश्या बेजबाबदारपणे बातम्या करणाऱ्या समाजमाध्यमांना आपण आरसा दाखवू शकू. पिनोचिओ च्या निमित्ताने एक चांगला मुद्दा आणि महत्वाचा विषय मांडता आला. कोणाला ही सिरीज बघायची असेल तर नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Saturday 18 December 2021

कोरोना वेशीवर आहे... विनीत वर्तक ©

 कोरोना वेशीवर आहे... विनीत वर्तक ©


लहानपणी मी साईबाबा च्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट बघितला होता. त्यातील एक प्रसंग असा होता की गावाच्या वेशीवर साईबाबांनी दिलेल्या गव्हाच्या पीठाने सीमा आखलेली असते. त्याच्या आत असणारी लोकं साथीच्या रोगाने सुरक्षित राहतात आणि जे लोकं ओलांडत त्यांना त्याची लागण होते. हा प्रसंग आठवायचं कारण म्हणजे तशीच परिस्थिती सध्या जागतिक पातळीवर बघायला मिळते आहे. पण या गोष्टी जागतिक मिडिया आणि भारतीय मिडिया जाणीवपूर्वक बाजूला ठेवतं आहेत. कारण हाच मिडिया होता जो भारतातील कोरोना च्या दुसऱ्या लाटेतील रोजची आकडेवारी ओरडून, कोकलून सांगत होता. मग आज जेव्हा परिस्थिती उलट आहे तेव्हा हाच मिडिया गप्प बसलेला आहे. 


गेल्या काही आठवड्यात ओमिक्रोन या कोरोना विषाणू च्या नव्या अवताराने संपूर्ण जगात खळबळ माजवलेली आहे. अजूनही या नव्या अवताराबाबत वैज्ञानिक आणि डॉक्टर यांना योग्य अंदाज आलेला नाही. नक्कीच याचा संक्रमण वेग अतिशय जलद असला तरी याने मृत्युमुखी पडण्याची शक्यता अतिशय कमी आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की अजून यावर अभ्यास सुरु आहे. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढणं योग्य राहणार नाही. पण तरीसुद्धा जे आकडे दर्शवत आहेत त्यानुसार हे ढोबळ अनुमान आहे. ओमिक्रोन चा शिरकाव भारतात जरी झाला असला तरी त्याचा संक्रमण वेग सध्यातरी कमी प्रमाणात भारतात दिसून येतो आहे. सध्या जागतिक आकडे बघितले तर भारत अतिशय चांगल्या स्थितीत आहे. अर्थात या गोष्टी काही दिवसात उलट- सुलट होऊ शकतात हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 


जेव्हा भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला साधारण ४ लाख रुग्ण दाखल होत होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय मिडिया ने अक्षरशः ओरडून ओरडून भारताच्या एकूणच वैद्यकीय, राजकीय, लोकांबद्दल आणि भारतीयांबद्दल जागतिक मंचावर अप्रचार केला होता. एकवेळ तर अशी होती की भारतच कोरोनाच केंद्र असेल आणि सगळ्या जगाला कोरोना विषाणू चा प्रसार हा भारतीयांकडून केला जाईल इथवर ही अनेक चर्चा केल्या गेल्या. पण भारताने ज्या पदतीने परिस्थिती सांभाळली त्याच कौतुक तर सोडाच पण त्याबद्दल काही शब्द बोलण्यास ही हीच लोक तोंड काळ करून बाजूला झाली आहेत. 


आज परिस्थिती अशी आहे की भारतातील कोरोना बाधित रुग्णसंख्या ही अवघी ८३,९१३ आहे. याच वेळी अमेरिका १ कोटी ३ लाख, युनायटेड किंग्डम १३ लाख ९० हजार, रशिया ९ लाख ३८ हजार, फ्रांस- जर्मनी - ९ लाख ५० हजार आणि युरोपातील इतर अनेक देश तसेच भारताच्या शेजारी असणारे अनेक देश हे लाखांच्या वर रुग्णसंख्या नोंदवत आहेत. भारताची आणि इतर देशांची लोकसंख्या लक्षात घेतली तर हा फरक अजून लक्षणीय आहे. त्यामुळेच वर लिहलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. आजची परिस्थिती सांगण्याचं धारीष्ट ना भारतीय मिडियाकडे आहे ना भारताचा द्वेष करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिडियाकडे. भारतात या नव्या आवृत्ती चा प्रसार इतका हळू का आहे? याच उत्तर तज्ञ आणि डॉक्टर सांगू शकतील. पण यामागे भारतात झालेल्या लसीकरणाचा ही  भाग मोठा आहे हे निश्चित. 


हे सगळं मांडण्याचं कारण मोठेपणा हा नाही तर आपल्या आजूबाजूला काय चालू आहे त्यातून सावध होण्याचा आहे. आज आपण खूप चांगल्या स्थितीत आहोत पण ही स्थिती बदलायला वेळ लागणार नाही हे पण तितकं खरं आहे. लसीकरण करून घेणं हे जितकं महत्वाचं आहे तितकच कोरोना संबंधी ज्या सूचना आपण पाळत होतो त्याची पुन्हा एकदा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. याची सुरवात आपल्यापासून करावी लागणार आहे. रात्र वैऱ्याची आहे. आपल्या आजूबाजूला थैमान सुरु आहे. आज बाहेर असलेली साथ कधीही आपल्या घरात येऊ शकते. तेव्हा त्यासाठी आपण तयार राहण्याची गरज आहे. मागच्या वेळेपेक्षा आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने याचा मुकाबला करत आहोत आणि करू शकणार आहोत पण त्यासाठी आपण सज्ज होण्याची गरज आहे. 


आपल्या वैद्यकीय कुटुंबाने मग ते डॉक्टर, नर्सेस, इतर वैद्यकीय स्टाफ, केंद्र आणि राज्य सरकार, पोलीस, इतर सामाजिक संस्था यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा आधीही उचलला होता आणि आताही उचलतील पण त्यांना कमीतकमी ताण देण्याची जबाबदारी आपली आहे. आंतरराष्ट्रीय मिडिया किंवा भारतीय मिडिया यांना आपल्या देशाचा अपमान करण्याची संधी न देण्याचीही जबाबदारी आपली आहे. तेव्हा आपली जबाबदारी ओळखून एक चांगले जबाबदार नागरिक आपण बनूया कारण कोरोना वेशीवर आहे......... 


जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :-  गुगल


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Friday 17 December 2021

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १५ )... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १५ )... विनीत वर्तक ©

आज फ्रांस च्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले भारतात दाखल होत आहेत. अनेक देशांचे प्रतिनिधी आपल्या देशात येत असतात त्यामुळे त्यात असामान्य असं काही नाही. पण ज्या पद्धतीने सध्या आंतरराष्ट्रीय मंचावर वाऱ्यांची दिशा बदललेली आहे ते बघता फ्रांस च्या संरक्षण मंत्र्यांची भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे. जागतिक पातळीवर सध्या छुपे आणि उघड अश्या दोन्ही पद्धतीने गटबाजी होताना दिसते आहे. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घडामोडींवर जर आपण नजर टाकली तर ज्या पद्धतीने शह- कटशह दिले जात आहेत त्यामुळे अनेक जागतिक समीकरणं बदललेली आहेत. त्यामुळेच फ्रांस च्या संरक्षण मंत्र्यांचा भारत भेटीला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. ही भेट इतकी महत्वाची का झाली? या भेटीने भारताला काय मिळणार आहे? जागतिक मंचावर यामुळे काय संदेश जाणार आहे? एकूणच या भेटीने आंतरराष्ट्रीय पटलावर कोणत्या नवीन चाली खेळल्या जाणार आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. 

अचानक फ्रांस आणि भारताच्या संरक्षण मंत्र्याची भेट महत्वाची का झाली हे समजून घ्यायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल. १६ सप्टेंबर २०२१ चा दिवस होता जेव्हा अचानक अमेरिका, युनायटेड किंगडम (इंग्लंड) आणि ऑस्ट्रेलिया यांनी AUKUS (Australia-UK-US) या तीन देशांचा मिळून संरक्षण करार केला. या करारा प्रमाणे अमेरिका ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान हस्तांतरण करून अमेरिका आणि युनायटेड किंगडम मिळून ऑस्ट्रेलियासाठी ८ आण्विक पाणबुड्यांची निर्मिती करणार आहे. या सर्व कराराची किंमत तब्बल ७० बिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात आहे. ( १ बिलियन = १०० कोटी). कोणाच्या ध्यानीमनी नसताना या तीन राष्ट्रांनी चीन च्या इंडो-पॅसिफिक मधील वर्चस्वाला शह देण्यासाठी ऑस्ट्रेलिया सोबत हा करार करत असल्याचं जाहीर केलं. पण या करारामुळे खूप मोठं नुकसान फ्रांस च झालेलं आहे. 

आण्विक पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान पी-५ म्हणजेच सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य देश यांच्याकडे आहे. अमेरिका, फ्रांस, रशिया, चीन आणि युनायटेड किंगडम. अमेरिकेने हे तंत्रज्ञान फक्त युनायटेड किंगडम सोबत १९५८ साली झालेल्या करारानुसार दिलेलं आहे. आता झालेल्या करारामुळे हे तंत्रज्ञान अमेरिकेकडून मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा देश ठरला आहे. रशिया ने सुद्धा भारताला आण्विक पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान दिलेलं नाही. पण रशियाने आपल्या आण्विक पाणबुड्या भाडेतत्वावर दिल्या आहेत. पी ५ नंतर आण्विक पाणबुड्या चालवणारा भारत हा ६ वा देश होता. (भारताने २००९ साली बनवलेली आय. एन. एस. अरिहंत ही SSBN (nuclear-powered ballistic missile submarine) आहे न की SSN (SSN is a nuclear-powered general-purpose attack submarine) भारताकडे आजमितीला फक्त एकच एस.एस.एन. आहे तर चीन कडे ६ एस.एस.एन. आहेत. भारताची आण्विक पाणबुडी रशियाकडून भाड्यावर घेतलेली आहे. भारत आज ४ आण्विक पाणबुड्यांची निर्मिती करतो आहे पण त्या सर्व SSBN आहेत. त्यामुळेच भारताला चीन च्या वर्चस्वाला शह देण्यासाठी आणि हिंद महासागरावर वचक ठेवण्यासाठी SSN ची अत्यंत गरज आहे. 

ऑस्ट्रेलियाने अमेरिका आणि इंग्लंड सोबत जाण्याने फ्रांस ला खूप आर्थिक आणि राकीय असं दुहेरी नुकसान झालेलं आहे. २०१७ पासून फ्रांस ९० बिलियन अमेरिकन डॉलर किमतीच्या १२ डिझेल- इलेक्ट्रिक पाणबुड्या बनवण्यासाठी प्रयत्न करत होता. ऑस्ट्रेलिया आणि इतर दोन्ही देशांनी फ्रांस ला अंधारात ठेवत एकप्रकारे फ्रांस च्या पाठीमागून वार करत ऑस्ट्रेलिया सोबतचा कराराला केराची टोपली दाखवली आहे. ४ वर्ष फ्रांस मधील अनेक कंपन्या आणि राजकीय नेतृत्वाने हा करार होण्यासाठी अनेक गोष्टी केल्या होत्या आणि पैसा खर्च केला होता पण ते सगळं बुडीत खात्यात जमा झालेलं आहे. फ्रांस या करारामुळे प्रचंड संतापला होता आणि आपला राग त्याने उघडपणे व्यक्त करून दाखवला होता. याचवेळी भारत (SSN :- A nuclear-powered general-purpose attack submarine) तंत्रज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. अमेरिकेने आणि रशियाने भारताचे जवळचे सहकारी असूनसुद्धा हे तंत्रज्ञान भारताला देण्याचं नाकारलेलं होतं. हीच संधी फ्रांस ने आता ओळखली आहे. 

एकाचवेळेस अमेरिकेला कटशह आणि आपलं आर्थिक स्तरावरील नुकसान कमीत कमी करण्यासाठी फ्रांस ने भारताला एस.एस.एन. या आण्विक पाणबुडी तंत्रज्ञान देण्याचं गाजर पुढे करण्यासाठी फ्रांस च्या संरक्षण मंत्री तातडीने भारतात दाखल होत आहेत. फ्रांस या भेटीत भारताला प्रोजेक्ट ७५ अल्फा अंतर्गत त्याच्या बाराकुडा या एस.एस.एन. आण्विक पाणबुड्यांच तंत्रज्ञान हस्तांतरण आणि मेक इन इंडिया मार्फत त्या भारतात बनवण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. जर का फ्रांस च्या संरक्षण मंत्र्यांनी भारतापुढे हा प्रस्ताव ठेवला तर भारत आणि फ्रांस संबंधांना राफेल करारानंतर अधिक मजबुती तर मिळणार आहेच पण त्या पलीकडे दोन्ही देशांसाठी हा करार विन-विन असणार आहे. 

एकीकडे फ्रांस आपल्या चालीने अमेरिकेला कटशह देणार आहे. अमेरिका या करारामध्ये हस्तक्षेप तात्विक दृष्ट्या करू शकणार नाही. अमेरिकेच्या जवळच्या मित्राला म्हणजेच भारताला आण्विक मुद्यावर आपल्या सोबत करून फ्रांस आपल्या आर्थिक आणि राजकीय नुकसानीची भरपाई करू शकणार आहे. भारत हा चीन विरोधी असल्याने एकूणच चीन विरुद्ध क्वाड सोबत भारत-फ्रांस, अमेरिका- ऑस्ट्रेलिया- इंग्लंड हे गट उदयाला येत आहेत. भारताला जर हे तंत्रज्ञान उपलब्ध केलं गेलं तर भारत हिंद महासागरात एक सशक्त नौदल म्हणून अजून सक्षम होणार आहे. तर तिकडे चीन ची डोकेदुखी वाढणार आहे. कारण एकीकडे ऑस्ट्रेलिया तर दुसरीकडे भारताचं नौदल हे सक्षम होणं चीन च्या वर्चस्वाला धक्का देणारं आहे. फ्रांस च्या संरक्षण मंत्र्यांनी याच सोबत भारताला अजून राफेल लढाऊ विमान देण्याचं ही उघडपणे प्रस्ताव दिला आहे. 

“We are open and ready to provide any other Rafales if this is India’s decision" 

France, more than any other country, understands the necessity of the Indian content and we are fully committed to the Make in India initiative as well as to the further integration of Indian manufacturers into our global supply chains,

we are an Indian-Indo-Pacific country and we want to develop a very close multilateral relationship with the neighboring countries. Of course, India is at the centre of this strategy.

 फ्रांस च्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांची ही काल भारतात निघण्यापूर्वी केलेली वक्तव्य पुरेशी बोलकी आहेत. सगळ्याच गोष्टी या उघडपणे बोलल्या जात नाही. बदललेल्या वाऱ्यांचा अंदाज आपण त्या शब्दातून बांधायचा असतो. फ्रांस जरी आपलं तंत्रज्ञान विकण्यासाठी असं बोलत असेल असं मानलं तरी ज्या प्रमाणे ५९,००० कोटी रुपये खर्चून भारतात राफेल च्या येण्याने प्रचंड ताकद भारतीय वायू दलाला मिळाली आहे ते जगातील कोणताही संरक्षण तज्ञ नाकारत नाही. त्याच प्रमाणे बाराकुडा आण्विक पाणबुडी चा करार हा भारतीय नौदलाची ताकद प्रचंड वाढवणारा असणार आहे. त्यामुळेच खारे वारे आता मतलई होऊन वहायला सुरवात झालेली आहे. त्याचे परिणाम काय होतात ते येत्या काळात आपल्याला स्पष्ट होईलच. तूर्तास आजच्या भेटीतून आंतरराष्ट्रीय मंचावर भारत-फ्रांस चालीची बीजे रोवली जातील अशी आशा आहे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Thursday 9 December 2021

अमर जवान... विनीत वर्तक ©

 अमर जवान... विनीत वर्तक ©


'लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे...' - बाजी प्रभू देशपांडे.


आजपासून तब्बल ४०० वर्षापूर्वी मराठा साम्रज्याचे सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी हे विधान केलं होतं. आज कित्येक वर्षानंतर ते विधान तितकेच लागू आहे. कालच्या दुर्दैवी घटनेत भारताने आपला लाखाचा पोशिंदा गमावला. त्यामुळेच भारताची या घटनेने न भरून येणारी हानी झाली आहे. कालची घटना सर्व भारतीयांसाठी एक धक्का होती. त्यामुळेच यातून सावरायला बराच कालावधी जाणार आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत , त्यांची पत्नी,  ब्रिगेडिअर एल एस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग आणि स्पेशल फोर्स चे जवान आणि एअर फोर्स चे पायलट या सर्वांना भारताने कालच्या दुर्घटनेत गमावलं. 


कारगील युद्धानंतर आलेल्या अनुभवावरून कारगील रिविव्ह कमिटीने भारताने 2 गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली. एक म्हणजे चिफ ऑफ डिफेंस स्टाफ या पदाची निर्मिती करणे, दुसरे म्हणजे स्वदेशी जीपीएस तयार करणे. त्यानुसार डिसेंबर 2019 देशाचे पहिले सीडीएस म्हणून बिपीन रावत यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कार्याच स्वरूप बघितलं तर त्यांना दोन आघाड्यांवर काम करायचे असते. एक म्हणजे शासकीय पातळीवर आणि दुसरे म्हणजे सरंक्षण दलाच्या पातळीवर समन्वय साधणे. याशिवाय सैन्याशी संबधित सर्व महत्वाचे अधिकार, लष्करी तळाशी संबधित विषय, रणनिती, तिन्ही दलांचा समन्वय, शस्त्रांच्या संदर्भात निर्णय घेणे.हे अधिकार सीडीएस यांना असतात. हे भारतीय सेनेतील  4 स्टार रॅंकिंगचं पद आहे. अतिशय महत्वाच्या पदावरून जनरल बिपीन रावत यांनी भारताच्या तिन्ही दलात आमूलाग्र बदल करण्याची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय सेनेला येत्या काळातील अडचणींसाठी तयार करण्याचं शिवधनुष्य त्यांनी उचललेलं होतं. त्यामुळेच त्यांच्या अचानक जाण्याने झालेली पोकळी भरणारी नाही. 


सीडीएस जनरल बिपीन रावत हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना हा कुन्नूर इकडे हा अपघात घडला. हा अपघात आहे की घातपात यावर अनेक लोकांनी आपली मते मांडायला सुरवात केली आहे. याला कारणे अनेक आहेत. जनरल बिपीन रावत हे ज्या एम आय १७ व्ही हेलिकॉप्टर मधून जात होते ते तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम हेलिकॉप्टर आहे. १३ हजार किलोचा भार उचलून उड्डाण भरण्याची याची क्षमता आहे. ३६ सशस्त्र सैनिक यातून एकाचवेळी प्रवास करू शकतात. याचं कॉकपीट आणि महत्वाच्या भागांवर चिलखती आवरण असते. २५० किलोमीटर / तास वेगाने उड्डाण भरण्यास सक्षम आहे. कोणत्याही प्रकारच्या हवामानात उड्डाण भरू शकते. याची टर्बो इंजिन तब्बल २७०० हॉर्स पॉवर निर्माण करू शकतात आणि हे ६००० मीटर उंचीवरून उड्डाण भरू शकते. अशी ८० हेलिकॉप्टर भारताने १.३ बिलियन अमेरिकन डॉलर ला रशिया कडून खरेदी केली आहेत. जर तांत्रिक दृष्ट्या आपण या हेलिकॉप्टर चा विचार केला तर अतिशय महत्वाच्या व्यक्तींची ने-आण करण्यासाठी हे हेलिकॉप्टर सर्वोत्तम आहे. मग कालचा अपघात कसा झाला? 


सीडीएस या अतिशय महत्वाच्या पदावरील व्यक्ती जेव्हा अश्या प्रकारचा प्रवास करते तेव्हा सगळ्या गोष्टी अनेक वेळा तपासल्या जातात. वैमानिक जायच्या रस्त्यावरून दोन वेळा तरी जाऊन कोणतीही अडचण येत नसल्याची शहानिशा करतात. अनेक छोट्या,मोठ्या जर-तर च्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. अनेक प्रोटोकॉल त्यासाठी ठरलेले असतात. तसेच आणीबाणी च्या काळात एस.ओ.पी. म्हणजेच (स्टॅंडर्ड वर्क इंस्ट्रक्शन) या ठरलेल्या असतात. कोणी काय करायचं हे अगदी प्रत्येकाच्या डोक्यात फिट असते. असं असताना इतकी मोठी दुर्घटना कशी काय घडते? हा प्रश्न सैन्यासोबत भारतातील निर्णय घेणाऱ्या अनेक 

व्यक्तींच्या समोर आज आ वासून उभा आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात चुकचुकणारी शंकेची पाल ही योग्यच आहे. पण याचा अर्थ कोणीतरी घातपात घडवूनच आणला असा होत नाही. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 


हेलिकॉप्टर शेवटी एक मशीन आहे. अभियांत्रिकीशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांना चांगलं माहित असेल की सगळं चांगलं असलं, सगळं तपासलेलं असलं तरी कोणतीही मशीन कधीही दगा देऊ शकते. कुन्नूर मधे काल दाट धुक्याचं साम्राज्य होतं. हेलिकॉप्टर चा प्रवास हा नेहमीच असुरक्षित मानला जातो. मी माझ्या आयुष्यात कामाच्या निमित्ताने निदान २००-३०० वेळा हेलिकॉप्टर चा प्रवास गेल्या १५ वर्षात केला आहे. पण प्रत्येकवेळी हेलिकॉप्टर मधे बसताना आपण सुरक्षित उतरू याची खात्री कोणीही १००% देऊ शकत नाही. जी विमान प्रवासात देता येते. कारण हेलिकॉप्टर चा प्रवास वातावरणातील बदलांवर खूप अवलंबून असतो. बदललेली हवा, धुकं, पाऊस, हवेतील पोकळ्या या सगळ्या एखाद्या प्रवासाची वाट चुकवू शकतात. अगदी रोज सियाचीन वर उड्डाण भरणारे वायुदलातील पायलट सुद्धा हे मान्य करतील. पण असं असूनसुद्धा सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर चा अपघात ही नक्कीच खूप मोठी आत्मपरीक्षण करायला लावणारी घटना आहे. 


कालच्या अपघाताची वेळ ही सुद्धा अनेक अर्थाने महत्वाची आहे. परवाच भारतात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन येऊन गेले. त्यानंतर एका दिवसांनी रशियामध्ये निर्मित हेलिकॉप्टर चा हा अपघात अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारताने चीन ला अनेक आघाड्यांवर शह दिलेला आहे. त्यामुळेच त्यांच काम हे चीनसाठी डोकेदुखी ठरलेलं होतं. या अपघातामागे चीन चा हात असल्याचा एक मोठा प्रवाह आणि वर्ग मानतो. ते काही अंशी घडलेल्या घटनाक्रमावरून जुळतेही. पण अजून बरेच डॉट्स जोडायचे बाकी आहेत. कोणत्याही परकीय शक्तीने जर हा कट केला असेल तर त्यांच्यापेक्षा आपल्याच मातीतील इमान विकणाऱ्या लोकांचा आपल्याला धोका आहे. ती सगळ्यात मोठी चिंता असेल. कारण एक नक्कीच की घरभेदी असल्याशिवाय असा घातपात घडवून आणण शक्यच नाही. जर का असं असेल तर त्यांचा बिमोड करणं, त्यांना सर्वांसमोर आणण हे खूप मोठं आव्हान असेल. 


आज हा लेख लिहीपर्यंत देशातील गुप्तचर संघटना, भारतीय सेनेची तज्ञ कमिटी रात्रंदिवस या अपघाता मागची कारणं शोधून काढण्यासाठी कार्यरत झालेल्या आहेत. त्या या अपघाताच्या मुळापर्यंत नक्कीच पोहचतील अशी आशा आहे. कारण भारताचं सक्षम नेतृत्व अश्या घटना हलक्यात घेणारं नाही. नक्की सगळ्या जर- तर च्या शक्यतांवर उत्तर शोधली जाणार आहेत. ती शोधे पर्यंत आपण आपलं डोकं न लावता संयम बाळगण्याची गरज आहे असं माझं मत आहे. अपघात असो वा घातपात पण भारताने आपल्या लोखांच्या पोशिंदा ला गमावलं हे खूप मोठं नुकसान भारताचं झालेलं आहे. 


कालच्या दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या भारत मातेच्या सर्व सैनिकांना माझा कडक सॅल्यूट. तुम्ही नेहमीच आमच्या मनात अमर रहाल. 


अमर जवान. 


जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :-  गुगल


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

  


Tuesday 7 December 2021

सुरक्षित भारत... विनीत वर्तक ©

 सुरक्षित भारत... विनीत वर्तक ©


काल रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी भारताला धावती भेट दिली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा दौरा किती महत्वपूर्ण होता याच विश्लेषण मी वेगळ्या लेखात करेन पण त्यांच्या भेटीत भारताने ऑफिशियली रशियाकडून एस ४०० या एअर डिफेन्स प्रणाली चे भाग मिळण्यास सुरवात झाली असल्याचं मान्य केलं. एस ४०० भारताने घेऊ नये म्हणून अमेरिकेने भारतावर खूप दबाव टाकला. भारताच्या सुरक्षितेतसाठी त्यांची 'थाड' ही सुरक्षा प्रणाली देण्याचं ही मान्य केलं पण त्यांच्या दबावाला आणि त्यांच्या गाजराला केराची टोपली दाखवून भारताने एस ४०० प्रणाली तब्बल ५.२ बिलियन अमेरिकन डॉलर (३५,००० कोटी रुपये) मोजून खरेदी केली आहे. असं काय आहे या एस ४०० मधे ज्याने पाकिस्तान सारखा शत्रू आता संपल्यात जमा आहे तर चीन संपूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. 


जगातील जवळपास सगळ्या रक्षा प्रणाली च विश्लेषण करणाऱ्या तज्ञांचे एकमत आहे कि एस ४०० आजच्या घडीला जगातील सगळ्यात सर्वोत्तम एअर डिफेन्स प्रणाली आहे. भारताने तीच रशियाकडून खरेदी केली आहे. एस ४०० च्या एका बॅटरी मधे एक लॉँग रेंज रडार, एक टार्गेट ला शोधणारे रडार आणि इतर रडार जी वेगवेगळ्या अंतरावरील लक्ष्याचा शोध घेतात ती असतात त्याचसोबत ती क्षेपणास्त्राचा रस्ता ठरवतात. एस ४०० च्या एका बटालियन मधे ८ लॉन्चर असतात. एका लॉन्चर मधे ४ ट्यूब असतात. (खालील फोटोत आपण ट्यूब बघू शकतो.). एका बॅटरी मधे दोन बटालियन असतात. आता शाळेतील गणित केलं तर आपल्याला समजेल की एका बॅटरी मधे २५६ ट्यूब भारताला मिळालेल्या आहेत. म्हणजे एक बॅटरी जर भारताने पाकिस्तान सिमारेषेवर तैनात केली तर पाकिस्तान च्या हवाई क्षेत्रातील कोणत्याही उडत्या वस्तूचा वेध घेण्यासाठी वेगवेगळ्या अंतरावरील २५६ क्षेपणास्त्र तयार असतील. ही क्षेपणास्त्र कमीत कमी ८०००  किलोमीटर/ तास म्हणजेच ६.३ मॅक वेगाने आपल्या लक्ष्याचा वेध घेतात. तर जास्तीत जास्त हा वेग १७,००० किलोमीटर / तास म्हणजेच १४ मॅक इतका प्रचंड आहे. भारताने अश्या ५ बॅटरी रशिया कडून घेतल्या आहेत. भारत यातील २ पश्चिम सरहद्दीवर तर ३ पूर्व सरहद्दीवर तैनात करणार आहे असं म्हंटल जाते. याचा अर्थ ५१२ वेगवेगळी मिसाईल पाकिस्तान साठी तर ७६८ वेगवेगळी मिसाईल चीन कडे नजर ठेवून असणार आहेत. भारताने रशियाकडून कोणत्या प्रकारची किती क्षेपणास्त्र आणि याशिवाय वेगळी किती क्षेपणास्त्र घेतली आहेत हे क्लासिफाईड आहे. 


एस ४०० ची प्रत्येक बॅटरी एका वेळेस ३६ लक्ष्यांवर एकाचवेळी हल्ला करण्यास सक्षम आहे. पाकिस्तान ने अगदी ७२ 'एफ १६' एकत्र भारताच्या दिशेने पाठवली तरी त्या सगळ्यांना एकाचवेळेस ढगात पाठवायला एस ४०० च्या या दोन बॅटरी सक्षम असतील. एस ४०० मधील ४०० चा अर्थ आहे की यातील क्षेपणास्त्र ४०० किलोमीटर अंतरावर कोणत्याही लक्ष्याचा वेध घेऊ शकतात. पण याचं रडार ६०० किलोमीटर अंतरावरील हवेत उडणारी कोणतीही वस्तू टिपण्यास सक्षम आहे. म्हणजेच पाकिस्तान च्या संपूर्ण हवाई क्षेत्रावर उडाण भरणारं ड्रोन, लढाऊ विमान, मिसाईल हे धावपट्टी सोडताच भारताच्या एस ४०० ने टिपलेलं असणार आहे. हे रडार इतकं सक्षम आहे की उडणारी वस्तू कोणत्या मार्गाने जाणार आहे याचा संपूर्ण लेखाजोखा भारताकडे तयार असणार आहे. उडाण केललं लक्ष्य  ४०० किलोमीटर वर येताच एस ४०० चे मिसाईल हे सूचना मिळताच गुप्त ठिकाणाहून पाकिस्तान च्या कोणत्याही हवाई लक्ष्याला पाकिस्तान च्या डोक्यावर पाडण्यास सक्षम आहे. एस ४०० चे मिसाईल इतक्या वेगाने प्रवास करतात की लक्ष्याला भेदण्यासाठी ते कायनेटिक एनर्जी चा वापर करतात. या प्रचंड वेगामुळे त्यांच्या हल्याची ताकद इतकी जबरदस्त असते की एका क्षणात लक्ष्य बेचिराख होते. भारताचं ब्राह्मोस क्षेपणास्त्र ही याच तत्वावर आधारित आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि त्याचे अणुबॉम्ब आता अंडी उबवण्यासाठी कामाला येणार आहेत. 


चीन ने भारताविरुद्ध एस ४०० प्रणाली तिबेट मधे तैनात केलेली आहे. आता भारत त्यांच्या विरुद्ध ३ एस ४०० च्या बॅटरी तैनात करणार आहे. चीन हा एम.टी.सी. आर. चा सदस्य नसल्याने त्याच्या एस ४०० ची क्षमता ही २९० किलोमीटर पर्यंत मर्यादित आहे. तर भारत त्याचा सदस्य असल्याने भारताचं एस ४०० हे ४०० किलोमीटर पर्यंत जाऊ शकणार आहे. त्यामुळे भारताचं एस ४०० हे जास्ती सक्षम आहे. चीन राफेल च्या येण्याने आधीच चाचपडत होता. आता राफेल विथ एस ४०० हे कॉम्बिनेशन चीनसाठी प्रचंड डोईजड ठरणार आहे. चीन चे तिबेट मधील हवाई तळ हे खूप उंचीवर आहेत. त्यामानाने भारताचे हवाई तळ हे मैदानी आहेत. खूप उंचीवर असल्याने चीन चे जे.एफ. १७, जे २० सारखं लढाऊ विमान जास्ती वजन घेऊन उड्डाण भरू शकत नाहीत. त्यामुळेच राफेल इकडे चीन च्या 'जे २०' पेक्षा वरचढ ठरतात हे चीन जाणून आहे. त्यात एस ४०० च्या येण्याने चीन चे तिबेट मधील सर्व हवाई तळ भारताच्या टप्यात येणार आहेत. एस ४०० ही प्रणाली अवघ्या ५ मिनिटात तैनात करता येते. याची ट्यूब कुठेही ट्रकवरून नेले जाऊ शकतात. तसेच ही सर्व प्रणाली मोबाईल आहे. याचा अर्थ शत्रूला याचा मोगावा घेणे अतिशय कठीण आहे. याच रडार एकीकडे तर ट्यूब दुसरीकडे तैनात करून शत्रूला न कळता त्याचा खात्मा केला जाऊ शकतो. यामुळेच चीन बॅकफूटवर तर पाकिस्तान संपूर्णपणे आडवा झालेला आहे. 


एस ४०० , राफेल, आपाचे-चिनुक त्याच्या जोडीला इस्राईल कडून घेतलेले लेझर गायडेड बॉम्ब, ड्रोन आणि ब्राह्मोस मिसाईल हे सगळं भारताच्या दोन्ही शत्रूंसाठी डोकेदुखी तर भारताला अधिक सुरक्षित करणार ठरलेलं आहे. पाकिस्तान तर संपूर्णपणे शेपूट गुंडाळून भुंकण्याशिवाय काही करू शकणार नाही तर चीन च्या गळ्यात भारताने साखळी बांधली आहे. त्यामुळे भारत दोन्ही बाजूने सुरक्षित बनला असं म्हंटल तर ते चुकीचं ठरणार नाही. रशिया चे राष्ट्रपती अवघ्या ६ तासांसाठी लगबगीने भारतात का आले? या का च उत्तर एस ४०० आहे. त्या पलीकडे एस ५०० असणार आहे. भारत एस ५०० प्रणाली घेणारा पहिल राष्ट्र असणार आहे अशी जोरदार चर्चा आहे. पण भारताने यावर तूर्तास काहीही अधिकृत भाष्य केलेलं नसलं तरी एस ४०० च्या येण्याने भारताने हवाई सुरक्षिततेच्या बाबतीत एक मोठा टप्पा गाठला आहे हे जगाला समजलेलं आहे.  

 

जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :-  गुगल


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday 4 December 2021

४ डिसेंबर १९७१... विनीत वर्तक ©

 ४ डिसेंबर १९७१... विनीत वर्तक ©

संपूर्ण जगाच्या सैन्य इतिहासात पाकीस्तान इतकी अब्रू कोणाची लुटली गेली नसेल. १६ डिसेंबर १९७१ हा तो दिवस होता ज्या दिवशी तब्बल ९३,००० पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे सपशेल शरणागती पत्कारली. कोणत्याही युद्धात इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिकांनी शरणागती पत्करण्याचं दुसरं उदाहरण सापडत नाही. आजही पाकीस्तानला हा दिवस काट्याप्रमाणे टोचतो. पण त्या ९३,००० सैनिकांनी शरणागती पत्करण्यामागे कारण होत भारतीय सैनिकांचा पराक्रम, त्यांनी आपल्या देशासाठी दिलेलं बलिदान. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी आपल्या रक्ताचे पाट त्यांनी वाहिले. त्यामुळेच भारताला अभूतपूर्व विजय १९७१ च्या युद्धात मिळाला. येत्या काही दिवसात या पराक्रमाला जवळपास ५० वर्ष पूर्ण होत आहेत. ज्या सैनिकांनी आपलं बलिदान या विजयासाठी दिलं त्यांचा पराक्रम मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झाला. असेच एक शूरवीर, पराक्रमी भारतीय सेनेचे ऑफिसर जे मराठी होते त्यांनी आजपासून बरोबर ५० वर्षापूर्वी या युद्धात आपलं बलिदान दिलं. त्यांच नाव होतं 'मेजर श्यामाकांत गजानन केळकर'. 

मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांची नियुक्ती भारतीय सेनेचं ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ५ गोरखा रायफल ज्याला फ्रंटिअर फोर्स असेही म्हंटल जाते. या रेजिमेंटची ख्याती संपूर्ण जगात पसरलेली आहे. गोरखा सैनिकांबद्दल बोलताना फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ एकदा म्हणाले होते, 

"If a man says he is not afraid of dying, he is either lying or is a Gorkha",  

साक्षात मृत्यूला न घाबरणार कोणी असेल तर तो गोरखा रेजिमेंट चा असला पाहिजे. १८५८ मधे स्थापना झालेल्या या रेजिमेंटला खूप मोठा इतिहास आहे. यातील प्रत्येक सैनिकाने भारताच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं आहे. १९७१ च युद्ध सुरु झाल्यावर सिल्हेट (ज्याला आता राजगुरू नगर असं म्हणतात.) हा भाग सध्याच्या बांग्लादेशच्या उत्तर-पूर्वी भागात येतो. युद्धात पाकिस्तानी सैनिकांनी इकडे ठाण मांडलं होतं. कारण इकडे एकदा कब्जा केला की खूप मोठ्या भूभागावर भारताला नियंत्रण मिळणार होतं. हे पाकिस्तानी सैन्याला माहित असल्याने त्यांनी इकडे खूप मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, बंदुकी, सैनिक यांचा बंदोबस्त करून एखाद्या किल्ल्याप्रमाणे अभेद्य तटबंदी उभी केली होती. ज्याला खिंडार पडण्याचा प्रयत्न भारतीय सेनेच्या ६ राजपूत बटालियन ने केला पण त्यांना त्यात अपयश आलं होतं. या अभेद्य तटबंदीला खिंडार पाडण्याची जबादारी मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांना देण्यात आली. 

मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांना चांगलं माहित होतं की शत्रू सावध आहे. त्याला आपण हल्ला करणार याची जाणीव आहे. त्याच्याकडे दारुगोळा मोठ्या प्रमाणात आहे. पण घाबरतील ते गोरखा कसले. मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांच्या नेतृत्वाखाली ५ गोरखा रेजिमेंट चे पराक्रमी सैनिक ४ डिसेंबर १९७१ ला या पाकिस्तान च्या तटबंदी वर चाल करून गेले. भारताच्या सैनिकांनी पाकिस्तान च्या २२ बलुच रेजिमेंट ला पाणी पाजलं. भारताच्या पराक्रमी सैनिकांपुढे पाकिस्तानी सैनिकांची त्रेधातिरपीट उडाली. आपला पराभव होतो आहे दिसताच पाकिस्तानी सैन्य नेहमीप्रमाणे शेपूट घालून पळून गेलं आणि भारतीय तिरंगा सिल्हेट च्या गाझीपूर वर फडकला. गड आला पण भारताने आपला सिंह गमावला. या युद्धात मेजर श्यामाकांत गजानन केळकर आणि त्यांचे १० पराक्रमी सैनिक हुतात्मा झाले. तर अजून ४ ऑफिसर, २ जे.सी.ओ., ५७ इतर सैनिक जखमी झाले. 

मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज या घटनेला ५० वर्ष उलटत आहेत. त्यांच्या या पराक्रमाला माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार. 

मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांच्या कन्या मधुजा गोरे माझ्या वाचक आहेत. त्यांनी मला त्यांच्या वडिलांविषयी, त्यांच्या पराक्रमविषयी लिहण्याची संधी दिली त्यांचा मी व्यक्तिशः आभारी आहे. तसेच आज ४ डिसेंबर च्या निमित्ताने माझ्या सोबत समस्त भारतीय आपल्या वडिलांनी भारतासाठी दिलेल्या बलिदानासाठी आपले ऋणी आहोत. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday 3 December 2021

दृष्ट काढणारी मंजम्मा जोगाठी... विनीत वर्तक ©

दृष्ट काढणारी मंजम्मा जोगाठी... विनीत वर्तक ©


या वर्षीचा पद्म सोहळा अनेक अर्थाने वैशिष्ठपूर्ण आणि नेत्रदीपक असा झाला. भारताने पद्म सन्मानाची सुरवात केल्यापासून माझ्या मते हा सर्वोत्तम सोहळा असेल हे अनेकजण मान्य करतील. या सोहळ्यात ज्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला ते सगळेच भारतातील सामान्य माणसांमधील असामान्य लोकं होते. त्यामुळेच भारतातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुद्धा पद्म सन्मानाच्या कक्षेत येऊ शकते हा विश्वास भारतीयांमध्ये बळकट झाला. नक्कीच यामुळे पद्म सन्मानाची उंची वाढली आहे. या नेत्रदीपक सोहळ्यात सर्वांच्या नजरेत भरलेली एक कृती म्हणजे भारताचे प्रथम नागरिक म्हणजेच भारताचे राष्ट्रपती यांची पद्मश्री सन्मानाने पुरस्कृत भारतातील पहिल्या तृतीयपंथी व्यक्ती 'मंजम्मा जोगाठी' यांनी काढलेली दृष्ट. 


भारतामध्ये खूप काळापासून ज्या प्रथा प्रचलित आहेत त्यातील एक म्हणजेच दृष्ट काढणे. वाईट नजर, वाईट प्रवृत्ती आणि वाईट विचार यापासून एखाद्या व्यक्तीच संरक्षण करण्यासाठी आणि त्या व्यक्तीला भविष्यात सगळं मंगलमय आणि शुभ होईल यासाठी ती काढली जाते. भारतात तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या चौकटीत स्थान नाही. त्यामुळेच त्यांना समाजच्या वेशीबाहेर अत्यंत कठीण परिस्थितीत, अनेक यातना सहन करून आयुष्य जगावं लागते. असं म्हंटल जाते की त्यांच्या निधनानंतर शोक नाही तर आनंद व्यक्त केला जातो. तो यासाठीच की पुन्हा असा जन्म नको. समाजाकडून आयुष्यभर मिळालेली वाईट वागणूक, पांढरपेशा समाजाकडून सतत रोखलेल्या घाणेरड्या नजरा, त्रास हे सगळं सहन करून ज्या वेळेस एखादी तृतीयपंथी व्यक्ती समाजाच्या चौकटीत बसणाऱ्या व्यक्तीला मनापासून आशीर्वाद देते आणि एक प्रकारे तिची दृष्ट काढते तेव्हा ते खूप पवित्र तर जेव्हा शाप देते तेव्हा तो खूप वाईट समजला जातो. म्हणूनच राष्ट्रपती भवनात अगदी आनंदाने मंजम्मा जोगाठी ने सहजतेने राष्ट्रपतींची दृष्ट काढली आणि आशिर्वात दिला तेव्हा माझ्या मते समाजाला मग तो भारतातील असो वा विदेशातील तृतीयपंथी लोकांच्या आयुष्याचा एक आरसा दाखवला. 


मंजम्मा जोगाठी यांचा एक तृतीयपंथी असल्याच्या जाणिवेपासून राष्टपती भवनाच्या रेड कार्पेट पर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. माझ्या मते पद्म सन्मानाच्या इतिहासातील सगळ्यात कठीण प्रवास जर कोणत्या व्यक्तीने केला असेल तर तो मंजम्मा जोगाठी यांचा आहे. मंजम्मा जोगाठी यांच मूळ नाव 'मंजूनाथा शेट्टी' असं होतं. १० इयत्तेत असताना तारुण्याच्या उंबरठ्यावर वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना आपण तृतीयपंथी असल्याची जाणीव झाली. स्री वेष, कपडे तसेच एकूणच ते व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्याचा भाग बनायला लागलं. सहाजिक समाजाच्या चौकटीत हे प्रकार निषिद्ध होते. त्यांना आपल्या भावांकडून मार खावा लागला. त्यांच्या वडिलांसाठी तर त्यांच हे मुलं मेलेलं होतं. कुटुंबाकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रास त्यांना सहन होतं नव्हता. त्याच वर्षी त्यांच्या घरच्यांनी त्यांच लग्न रेणुका यल्लमा देवीशी करून त्यांना देवदासी बनवलं. देवदासी बनल्यावर घरी परतण्याचा खरे तर समाजाच्या चौकटीत परतण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी रस्त्यावर भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यात त्यांना पांढरपेशा समाजातील लोकांकडून केल्या गेलेल्या लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलं. या सगळ्याचा धक्का इतका होता की त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. 


आयुष्याचा कडेलोट करून संपवण्याच्या टोकावर असलेल्या मंजम्मा जोगाठी यांची भेट जोगट्टी हे लोकनृत्य करणाऱ्या 'मत्तिकाल बसाप्पा' यांच्याशी झाली. हाच क्षण त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यांनी बसाप्पा यांच्याकडून नृत्याचे धडे शिकले. बसाप्पाच्या निधनानंतर जोगट्टी ही लोकनृत्य कला त्यांनी निर्धाराने पुढे नेली. बघता बघता जोगट्टी लोकनृत्य कला ज्या समाजाने त्यांना नाकारलं होतं त्याच पांढरपेशा समाजात नावारूपाला आली. या लोकनृत्याची मोहिनी जनमानसात आणि संपूर्ण भारतात इतकी पसरली की कर्नाटक सरकारला यासाठी (Karnataka Jaanapada Academy) कर्नाटक जनपाडा एकेडमी ची स्थापना करावी लागली. या संस्थेचे पहिला अध्यक्ष म्हणून तृतीयपंथी मंजम्मा जोगाठी यांची एकमताने निवड केली गेली. कर्नाटक मधील ही संस्था नृत्यासाठी सगळ्यात सर्वोच्च मानली जाते. त्या संस्थेचे अध्यक्षपद मंजम्मा जोगाठी ना मिळणे हे नियतीने समाजच्या तोंडावर दिलेली एक थोबाडीत होती. 


मंजम्मा जोगाठी यांनी समाजाच्या वाईट, कुत्सित, बोचऱ्या, अपमानास्पद, दुष्ट अश्या सगळ्या प्रवृत्तींना बाजूला टाकत जोगट्टी नृत्य कलेच्या अविष्काराचा जगभर प्रसार केला. त्यामुळेच त्यांच हे कार्य पद्म सन्मानासाठी ग्राह्य धरलं गेलं. पद्म सन्मान कोणाला मिळायला हवी याची निवड जर लोकांमधून केली गेली नसती तर कदाचित आज मंजम्मा जोगाठी भारताच्या एका कोपऱ्यात अश्याच दुर्लक्षित राहिल्या असत्या. पण पद्म सन्मान निवडण्याची प्रक्रिया बदलली गेली आणि आज मंजम्मा जोगाठी जगात प्रसिद्ध झाल्या. राष्ट्रपती भवनात त्यांनी राष्ट्रपतींची काढलेली दृष्ट ही आपल्या समाजाच्या तोंडावर मारलेली एक चपराक आहे. ज्या समाजाने अनेक अत्याचार त्यांच्यावर केले. आज त्याच समाजाच्या सर्वोच्च दालनात, सर्वोच्च व्यक्तीकडून सन्मान घेताना त्यांनी दृष्ट काढून त्यांना चांगल्या आयुष्याचा आशीर्वाद दिला. खरे तर एक प्रकारे समाजाला त्यांनी सांगितलं की निसर्गाने आम्हाला बाकीच्यांसारखं बनवलं नाही म्हणून आम्ही वाईट नाही. आम्ही तुमच्याकडून मिळालेल्या  वाईट वागणुकीनंतर सुद्धा तुमचं चांगलं होवो असाच आशीर्वाद देतो. 


आज ६० वर्षाच्या असणाऱ्या मंजम्मा जोगाठी यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाला माझा कडक सॅल्यूट. आज कुठेतरी असं मनापासून वाटते की धन्य ते भारताचे राष्ट्रपती ज्यांची दृष्ट मंजम्मा जोगाठी यांनी काढली. धन्य ते भारतीय संविधान,लोकशाही आणि भारत सरकार ज्यांनी समाजातील उपेक्षित वर्गाला आज जगापुढे मानाने जगण्याची उर्मी दिली. धन्य तो भारत जो कोणताही जात, धर्म, पंथ आणि लिंग न बघता समाजात बदल घडवणाऱ्या मंजम्मा जोगाठी सारख्या लोकांचा सन्मान करतो. 


जय हिंद!!!

  

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday 1 December 2021

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन..घोड्याविना रथ... विनीत वर्तक ©

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन..घोड्याविना रथ... विनीत वर्तक ©


सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक इकडे संपन्न होते आहे. मराठी भाषा इतकी समृद्ध असताना अश्या संमेलनातुन नक्की काय हाताशी लागते या प्रश्नाचं उत्तर मला आजही मिळालेलं नाही. लहानपणापासून अनेक संमेलना बद्दल ऐकत आणि वाचत आलो. प्रत्येकवर्षी संमेलनाचा अध्यक्ष कोण यावर ज्या पद्धतीचं राजकारण खेळलं जाते आणि एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होतात ते संमेलनात काय घडलं यापेक्षा जास्त प्रसिद्ध होतात. मला तरी व्यक्तिशः याच गोष्टींमुळे मराठी साहित्य संमेलन लवकरच होणार आहे याची आजवर बातमी मिळत आलेली आहे. ज्या कारणांसाठी हे संमेलन सुरु केलं गेलं तो उद्देश काळाच्या ओघात कधीच मागे पडला आहे. गेल्या काही वर्षात तर मराठी साहित्य संमेलन हे साहित्याची मंदियाळी न रहात राजकीय आखाडा झालं आहे. पक्ष आणि नेता कोणताही असो. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठीच याचा वापर केला जात आहे. या वर्षीच मराठी साहित्य संमेलन ही याला अपवाद नाही. 


मराठी साहित्य संमलनाचा मूळ उद्देश काय? या प्रश्नाचं उत्तर आज खेदाने आयोजक ही देऊ शकतील का? असा प्रश्न मला अनेकदा पडतो. कारण या आयोजकांचे मराठी साहित्यातलं योगदान काय याचा शोध घेतला तर हाताशी काही लागणार नाही. आज साहित्य संमेलनाची व्याप्ती ही सरकारी अनुदानातून एक समारंभ आयोजित करून भाषण ठोकून चर्चा करणं इतपत राहिली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. संमेलनातून मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी किंवा एकूणच मराठी साहित्याची व्याप्ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले गेले? त्यातून काय निष्पन्न झालं? मराठी साहित्याकडे नवीन पिढीला वळवण्यासाठी काय केलं गेलं? नवीन लेखक, लेखिका, कवी, कवियत्री, प्रकाशक, पुस्तक विक्रेते अश्या साहित्य समृद्ध करणाऱ्या घटकांबद्दल एकूणच काय विचार केला गेला याबद्दल माझ्या तरी वाचनात गेल्या २०-३० वर्षात काहीही आलेलं नाही. व्यासपीठावरून ठोकलेले शब्द हवेत विरून गेल्यावर त्याच पुढे काहीच होत नाही हाच प्रत्यय दरवर्षी अनुभवलेला आहे. 


गेल्या २-३ वर्षात तर साहित्य संमलेन हे सोशल मीडियासाठी एक सेल्फी पॉइंट आणि व्यासपीठावर आपली कविता सादर करायला मिळाली हे सांगण्याचं साधन झालं आहे. साहित्य संमेलनात आपल्या लेख, कवितेला ,गझल ला स्थान मिळावं म्हणून साम, दाम, दंड, भेद आणि राजकीय ओळख, वजन वापरून त्याची पोस्ट टाकण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणारे अनेकजण बघितले आहेत. साहित्य क्षेत्रातील मान्यवर लोकांसोबत फोटो घेण्यासाठी साहित्य संमेलनासारखा योग्य सेल्फी पॉईंट आज अस्तित्वात नाही. ज्या प्रमाणे एखाद्या शूटिंगच्या वेळी कलाकारांसोबत फोटो काढण्याची काही वर्ष आधी स्टाईल होती आज तीच स्टाईल संमेलनात वापरली जात आहे. यातून नक्की निष्पन्न काय हे फोटो काढणाऱ्याला आणि ज्या मान्यवरांसोबत फोटो काढला त्या दोघांनाही माहित नसते. प्रश्न हा नाही की सेल्फी काढणं योग्य की अयोग्य. प्रश्न हा आहे की नक्की संमेलनाच्या मुख्य उद्देशापासून आपण कसे भरकटलो आहोत याच हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. 


मराठी साहित्य संमेलनाची आजची स्थिती ही घोड्याविना असलेल्या रथा सारखी आहे. ज्यावर सगळे आसनस्थ होतात पण प्रत्यक्ष तो रथ पुढे कुठे सरकत नाही. एक काळ होता जेव्हा पु.ल., व. पु., भा. रा. भागवत, द.मा. मिरासदार, ग्रेस, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर अश्या एक ना अनेक मराठी साहित्यकरांनी आपल्या शब्दातून मराठी साहित्याची गोडी कित्येक पिढयांना लावली. पण त्यानंतर नाव तोंडात येतील असे किती लेखक, कवी अथवा कवियत्री झाले? मराठी साहित्याला ही जातीचे पंख फुटले. किंबहुना अश्या पद्धतीचं लिखाण करून जनमानसात आपलं नाव मोठं करण्याचा एक ट्रेंड ही आला. तो चुकीचा किंवा बरोबर यावर भाष्य करण्याइतपत माझं कर्तृत्व नाही. पण या सगळ्यात येणाऱ्या पिढीला मराठी साहित्याकडे आकर्षित करण्यात आपली पिढी कमी पडली हे महत्वाचं आहे. मराठी साहित्य संमेलन खरे तर अश्या गोष्टींकडे बघता येईल आणि त्यावर मान्यवर लोकांनी एकत्र येऊन पावलं टाकली जावीत यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म होता पण त्यात आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत हे सत्य आहे. 


आज सोशल मिडिया च्या जमान्यात खरे तर कोरोना काळात जेव्हा तंत्रज्ञानाने आपण जगातल्या कोपऱ्यात वसलेल्या मराठी माणसाशी एका क्षणात जोडू शकतो तेव्हा त्याचा उपयोग न करता प्रत्यक्ष भेटून, करोडो रुपये खर्चून काय साध्य होणार आहे? कारण संमेलनाला येणारी संख्या ३००० हजार इतकी मर्यादित केली गेली आहे. त्यात राजकारणी, त्यांचे सेवक, त्यांचे कार्यकर्ते, मान्यवर व्यक्ती, आयोजक आणि त्यांचे जवळचे लोक हेच मिळून इतकी संख्या होते तर नक्की त्या संमेलनात कोणता साहित्याचा विचार होणार आहे? असा प्रश्न माझ्या मनात आहे. त्यातही भरीस भर म्हणून कोणत्या कमानी ला कोणाचे नाव? निमंत्रण पत्रिकेत कोणाला स्थान आणि व्यासपीठावर बोलावण्यात आलेल्या सन्माननीय व्यक्तींबाबत चाललेलं राजकारण बघितलं की मराठी साहित्य संमेलन करून त्यातून काय निष्पन्न होणार आहे हे मला कळलेलं नाही. 


काही कोटी रुपये अनुदान सरकार कडून यासाठी घेतलं गेलं आहे. त्याशिवाय इतर दानशूर व्यक्ती आणि चाहते यांच्याकडून वर्गणी मिळालेली असेल तसेच संमेलनासाठी शुल्कातून काही रक्कम मिळेल. पण एवढा सारा खटाटोप करून नक्की हाताशी काय? हे कोणालाच स्पष्ट नाही. का नाही हे सगळे पैसे संमेलन वर्चुअल भरवून शाळांसाठी लायब्ररी उभारण्यासाठी वापरले जात? आज महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये चांगल्या लायब्ररी नाहीत असल्या तरी त्यात पुस्तक नाहीत. आज का नाही हे पैसे तिकडे वापरले जाऊ शकत? या पैश्यातून का नाही मराठी साहित्यातील उदयोन्मुख लेखक, लेखिका, कवी, कवियत्री आणि प्रकाशक यांना मराठी साहित्य निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात? आज लेखक आणि प्रकाशक यामधील दरी वाढते आहे. प्रकाशाला पुस्तक खपवण कठीण होते आहे तर लेखकाला पुस्तक छापण्याचा खर्च परवडत नाही किंवा त्यांच लिखाण छापण्यासाठी प्रकाशक पुढे येत नाही. मग जर चांगलं साहित्य असं पुढे येणार नसेल तर मराठी साहित्याचा रथ हा जेथे आहे तिथेच राहिला तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. 


मराठी साहित्य समृद्ध व्हायचं असेल तर त्याचे घोडे म्हणजे लेखक, प्रकाशक आणि वाचक हे जोपर्यंत साहित्याच्या रथाशी जोडले जात नाही तोवर दरवर्षी करोडो रुपये खर्चून अशी कितीही संमेलन आयोजित केली तरी त्याचा परिणाम शून्य असणार आहे. आता सुरु असलेलं संमेलन ही त्याच रथ नसलेल्या घोड्यांवर शब्दांचे बुडबुडे सोडण्यापलीकडे काही असणार नाही अशी मला खात्री आहे. 


तळटीप :- वर लेखात लिहलेली मते माझी स्वतःची आहेत. ज्यांना पटतात त्यांनी ती घ्यावीत आणि ज्यांना नाही पटत त्यांनी सोडून द्यावीत. या लेखातून कोणत्याही लेखक, आयोजक, अथवा राजकीय व्यक्तींचा अनादर करण्याचा उद्देश नाही तर मनातली खंत इकडे लिहलेली आहे. 

 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.