Thursday 2 July 2020

फसलेला डाव... विनीत वर्तक ©

फसलेला डाव... विनीत वर्तक ©

कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाच्या टिकेचा धनी चीन झालेला आहे. जगभर कोरोना चा हाहाकार चालू असताना चीन आणि चीनच्या लोकांविरुद्ध असंतोष वाढत चाललेला आहे. चीन कितीही सोंग आणत असला तरी जगभर वाढलेल्या असंतोषाचे चटके त्याला बसायला सुरवात झालेली आहे. खुद्द चीन मधील लोकांचा त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्वास आणि असंतोष वाढलेला आहे. ह्या सगळ्यावरून आपल्या जनतेचं आणि पर्यायाने संपूर्ण जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चीन एक डाव खेळला. त्याने भारताला डिवचण्यासाठी एक प्याद पुढे केलं. भारत १९६२ प्रमाणे गपचूप निषेध करून गप्प बसेल. आपल्या सैनिकी ताकदीपुढे तो झुकेल. आपण मैत्रीच्या नावाखाली जी चाल काही वर्षापूर्वी खेळलो ती पुन्हा यशस्वी होईल असा विश्वास चीन च्या राज्यकर्त्यांना आणि तिथल्या सैनिकी अधिकाऱ्यांना होता. पण आपलं प्याद पुढे करून त्याने आपल्या स्वतःच्या राजाला कोंडीत पकडण्याचा राजमार्ग भारताच्या हातात दिला आहे.

चीन च्या राज्यकर्त्यांचा आणि तिथल्या सैनिकी अधिकाऱ्यांच गलवान खोऱ्यातील वाद उकरून काढण्याचं गणित पूर्णपणे चुकलेलं आहे हे चीन ला लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला आहे. एका चुकीमुळे तो दुसरी चूक करत सुटला आहे आणि आता अशी परिस्थिती त्याने निर्माण केली आहे की तो स्वतःच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे. १४-१५ जून रोजी घडलेल्या घटनेचे पडसाद आता भारतापुरती मर्यादित राहिलेले नाहीत तर त्याचे लोण आता जगभर पसरत चालले आहेत. गेल्या काही दिवसातील घडामोडी बघितल्या तर खूप काही लक्षात येईल. १४-१५ जून ला भारतीय जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याने चीन आणि चीन चं सैन्य पुर्णतः बिथरलेलं आहे. खरं तर भारताच्या सैन्याला मारून आपल्या सैन्याला आत्मविश्वास द्यायचा आणि त्याच सोबत भारताच्या जमीनीवर कब्जा करायचा अशी चाल चीन खेळला होता. भारतात काही झालं तर तो आवाज चेपण्यासाठी त्याने आधीच आपल्या पिलावळीला सक्रिय केलं होतं. पण १९६२ ते २०२० ह्या मधला भारत ओळखायला चीन फसला.   

१९६२ चं भारतातील राजकीय नेतृत्व आणि २०२० मधील भारताचं राजकीय नेतृत्व ह्यात खूप मोठा फरक आहे. १९६२ सालची भारतीय सेना आणि २०२० ची भारतीय सेना त्यांचा आत्मविश्वास, युद्धकौशल्य आणि त्यांची आयुध ह्यात खूप मोठा बदल आहे. ह्या सगळ्यांच्या जोडीला गेल्या काही वर्षात भारताची संपूर्ण जगाच्या पटलावर बदललेली प्रतिमा ह्याच गणित करण्यात चीन पूर्णतः चुकला. आपली प्यादी पुढे करून राजाला कटशह देण्याचा निर्णय आता त्याच्या अंगलट आला आहे. एकतर भारतीय सैनिकांनी 'तुम एक मारोगे तो हम दो मारेंगे' ह्या युक्तीवर चीन च्या सैनिकात खळबळ माजवली आहे. युद्धात खूप मोठी सेना, खूप मोठी सैनिकी आयुध आणि तंत्रज्ञान ह्यावर कागदावर आपण शेर बनू शकतो पण एक मुंगी सुद्धा हत्तीला लोळवू शकते ह्याचा प्रत्यय प्रत्यक्ष युद्धभूमीवर येतो. त्यामुळे आकड्याच्या जोरावर उडणारा चीन भारतीय सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमामुळे पूर्णपणे बॅक फुटवर गेला आहे. गेल्या काही दशकांच्या सतत अतिरेकी विरुद्ध मोहिमेमुळे भारतीय सेना नेहमीच युद्धासाठी तयार स्थितीत असते. भारतीय सैनिक हे अश्या प्रकारच्या प्रसंगातून सतत जात राहिलेले आहेत त्यामुळे सराव, कूटनीती, बिमोड ह्या सगळ्या बाबतीत जगातील सर्वात उंच युद्धभूमी आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यात भारतीय सैनिक तरबेज तर आहेतच पण जगात सर्वोत्तम आहेत. आपल्या देशाबद्दल असलेला जाज्वल्य देशाभिमान हा प्रत्येक भारतीय सैनिकाची शक्ती दहापट मजबूत करतो. त्यामुळेच देशासाठी बलिदान करायला भारतीय सैनिक कधीच मागेपुढे बघत नाहीत. ह्या उलट चीन चे सैनिक वेळ जावा म्हणून सिमेवर गेम खेळत बसतात आणि आपल्या आवाजाला दाबणाऱ्या सरकार आणि देशाबद्दल अभिमान आणि आपुलकी कुठेतरी कमी आहे. हाच मोठा फरक चीनला १४-१५ जूनला दिसलेला आहे.

गेल्या काही आठवड्यातील घटना बघितल्या तर ह्या संघर्षामुळे अनेक देशांना आपल्या असंतोषाला वाट करून देता आली आहे. साऊथ चायना समुद्रातील छोटे मोठे देश जसे व्हिएतनाम, तर तिकडे हॉंगकॉंग, तैवान, तिबेट ह्या सोबत ऑस्ट्रेलिया, जपान ह्यांनी चीन च्या विरोधात उघडपणे जागतिक पटलावर भारताची बाजू घेतली आहे. भारताला मदत म्हणून अमेरीकेने त्यांच्या शक्तिशाली ३ विमानवाहक युद्धनौका साऊथ चायना सी मध्ये हलवल्या आहेत. इकडे हिंद महासागरामध्ये भारतीय नौदलाने आपली ताकद पणाला लावली आहे. फ्रांस ने उघडपणे गरज पडली तर आपली स्वतःच सैन्य युद्ध मैदानात उतरवण्याची ग्वाही भारताला दिली आहे. राफेल ह्या लढाऊ विमाने वेळेआधी आणि फ्रांससाठी राखून ठेवलेल्या साठ्यातून मेटोर क्षेपणास्त्र ह्या विमानासाठी दिली आहेत. तिकडे रशियाने एस ४०० ही यंत्रणा वेळेआधी तर तब्बल ३३ लढाऊ विमाने विक्रमी वेळेत भारताला देण्याची ग्वाही दिली आहे. ह्याशिवाय लागेल तो दारुगोळा आणि यंत्रणा देण्याचंही मान्य केलं आहे. अमेरीकेने उघडपणे चीन च्या विरुद्ध शड्डू ठोकलं आहे. अमेरीका ज्या बाजूला त्या बाजूने मित्र देश छुपे किंवा समोरून उभे राहणार हे उघड आहे. ज्यात युरोपियन युनियन, साऊथ कोरियासह अनेक देशांचा समावेश आहे.ह्या सगळ्या वरून युद्ध होईल का नाही हे सांगता येणार नाही पण एका घटनेने चीन वर सगळ्या बाजूने दडपण आलं आहे. भारताने चिनी एप्लिकेशन वर टाकलेल्या बंदीचे पडसाद अमेरीकेत उमटले आहेत. अमेरीकेनेही भारताच्या पावलावर पाऊल टाकून सगळ्या चिनी कंपन्यांवर बंदी टाकावी ह्यासाठी तिथल्या सिनेट मध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत.

१४-१५ जून च्या घटनेच्या एका घटनेने चीन विरुद्ध धुमसत असलेल्या असंतोषाला एक वाट मिळाली आहे. गेल्या काही दिवसात त्याच वणव्यात रूपांतर होताना दिसत आहे. चीन कितीही नाकारत असला तरी आर्थिक, लष्करी, सामरिक आणि जागतिक पटलावर चीनवर प्रचंड दडपण आलं आहे. आपल्या एका चालीमुळे हातात आलेला डाव निसटतो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता चीन ला मागे फिरणं शक्य नाही कारण तसं केलं तर चीन स्वतःच्या नजरेत आणि तिथल्या लोकांच्या नजरेत पडेल आणि सैनिकांच्या आत्मविश्वासाला एक तडा जाईल ज्याची भरपाई तो करू शकणार नाही. पुढे गेला तर युद्ध चालू करणं त्याच्या हातात असेल पण त्याचा भडका किती मोठा होईल ह्याचा अंदाज लावणं आणि त्याचा प्रतिकार करणं चीनला शक्य होणार नाही. एकाचवेळी सगळ्या बाजूने कात्रीत सापडल्या प्रमाणे चीन ची अवस्था होईल आणि अमेरीका ह्या मोक्याचा पुरेपूर फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. भारताच्या बाजूने चीनवर बॉम्ब टाकायला अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष पुढेमागे बघणार नाहीत ह्याचा अंदाज चीन ला चांगला आहे. 

बुद्धिबळाच्या पटलावर चीन चा डाव चीनच्या अंगलट आला आहे हे आता स्पष्ट  लागलं आहे. भारतात राजकारण करून आपल्या पिलावळीला सक्रिय करून त्याने पाहिलं, भारताच्या शेजारील राष्ट्र म्हणजेच नेपाळ ला चिथवून दडपण देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक आघाड्यावर तूर्तास चीन सगळीकडे बॅक फूटवर गेला आहे. 'ये नया भारत है' जो चीनच्या पिळवळीला आणि पडद्याआडून पुरावे मागणाऱ्या नेत्यांना जनता आता भिक घालत नाही हे लक्षात आलं आहे. दुसरीकडे भारताने आपली सर्व ताकद गलवान मध्ये उभी केली आहे. भारतीय सेना, भारतीय वायू सेना पूर्ण शक्तीनिशी तयार आहेत. भारताने आपली स्पेशल फोर्स लडाख सीमेवर तैनात केली आहे. भारताचे घातक कमांडो, पॅरा फोर्सेस मधील सैनिक जगातील सर्वोत्तम सैनिकात गणले तर जातात पण लडाख सारख्या अतिशय प्रतिकूल असलेल्या भागात युद्ध अथवा कारवाई करण्यात त्यांचा हात जगात कोणीच धरू शकत नाही. सुखोई एम. के. आय. ३० सोबत ब्राह्मोस ही चीनकडे रोखून आहेत. सध्या तरी भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करणारी कोणतीच प्रणाली जगात अस्तित्वात नाही. चीन चं एस ४०० सुद्धा ब्राह्मोस ला पकडू शकत नाही. त्यामुळेच चीन समोरासमोर युद्ध करायला कचरतो आहे. छुप्या युद्धाच्या दृष्टीने खेळलेली त्याची चाल त्याच्याच अंगलट येताना सध्या तरी दिसत आहे. त्यामुळेच एक फसलेला डाव हरण्याची नामुष्की सध्या चीन समोर उभी आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


3 comments:

  1. छान लेख विनीत जी... मला वाटते या संधीचा वापर करून त्यांना पुरते मागे रेटले पाहिजे... आणि पाकिस्तानला ठेचले पाहिजे..

    ReplyDelete
  2. खूप छान लेख 👍

    ReplyDelete