Friday 24 July 2020

बदललेली पावलं... विनीत वर्तक ©

बदललेली पावलं... विनीत वर्तक ©

गेल्या काही महिन्यातील घडामोडी बघितल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आहे ती म्हणजे भारत आणि एकूणच जगाच्या नकाशावर आता दोन गट दिसायला सुरवात झाली आहे. कोरोना च्या प्राश्वभूमीवर जिकडे सगळीच समीकरणं सगळ्याच बाबतीत बदललेली आहेत त्याचा परीणाम म्हणजे जगाच्या नकाशावर एकमेकांच्या विरुद्ध हळूहळू उभे रहात असलेले दोन गट. ह्या सगळ्या गटांना ओळख देणारा एक देश म्हणजे भारत. जागतिक महासत्ता टिकवण्यासाठी आणि होण्यासाठी अमेरीका आणि चीन आपसात शड्डू ठोकून उभे आहेत हे लपलेलं नाही. गेले काही वर्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा डाव आता समोरासमोर खेळला जात आहे. ह्या पडद्यामागच्या लढाईला एक उघड स्वरूप देणारी घटना म्हणजे गाल्वान इकडे झालेला भारत- चीन दरम्यानचा संघर्ष.

भारत आणि पाकीस्तान ह्या मधील लुटुपुटुची लढाई ही गेली कित्येक वर्ष सातत्याने सुरु आहे. आजवर पाकीस्तान ला आपण भारताला भारी पडत आहोत अथवा मात देऊ शकू असा थोडा का होईना विश्वास वाटत होता. पण गेल्या काही वर्षातील भारताच्या बदललेल्या रणनितीने पाकीस्तान ची गणती दखल न घेण्याइतपत उरली आहे. हे पाकीस्तान ची जनता आणि तिथलं राजकीय नेतृत्व म्हणत आहे. एकतर भारताने ज्या पद्धतीने आपल्या संरक्षण सिद्धतेत वाढ केली आहे त्याला उत्तर देण्याचं तर सोडाच पण त्याच्याकडे बघण्याची ताकद आज पाकीस्तानकडे नाही आहे. राफेल लढाऊ विमान जी मेटॉर, हॅमर, स्काल्प सारख्या क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. चिनुक, आपाचे आता येणारी एस ४०० सारख्या गोष्टींमुळे पाकीस्तान ची अवस्था आता दखल न घेण्याइतपत उरली आहे. हीच गोष्ट पाकीस्तानला अस्वस्थ करते आहे. कारण इतके वर्ष अणुबॉम्ब ची भिती दाखवणाऱ्या पाकीस्तानला आमचे अणुबॉम्ब काय दिवाळीत फटाके फोडण्यासाठी नाहीत हे कळून चुकलं आहे. मुळात आज भारतावर अणुबॉम्ब टाकल्यानंतर आपलं अस्तित्व नष्ट करण्याची ताकद आणि पाठींबा जगभरातून भारताला मिळेल हे त्याला कळून चुकलं आहे. 'डिफेन्सिव्ह' पेक्षा 'ऑफेन्सिव्ह डिफेन्स' ही परराष्ट्र निती भारताने गेल्या काही वर्षात पाकीस्तानच्या विरुद्ध वापरली आहे. ह्या नितीमुळे पाकीस्तान ची अवस्था 'किस झड की पत्ती' सारखी झाली आहे.

एकीकडे पाकीस्तान बाजूला झाला आणि तिकडे चीन ने कुरघोडी करण्याची संधी शोधली पण त्यांची वेळ चुकली. कोरोना च्या प्रसारामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि एकूणच जगातील सगळेच देश त्रासलेले आहेत. चीन ह्या सगळ्याला जबाबदार आहे अशी वैश्विक भावना आहे. चीन च्या दमदाटीला भारतीय सैनिकांनी दिलेल्या चोख उत्तरामुळे चीन पूर्णपणे मागच्या पावलावर गेला. हीच संधी होती ज्याचा उपयोग अमेरीका सारख्या धूर्त राष्ट्राने करून घेतला. चीन च्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात अमेरीकेने एकही संधी सोडली नाही. दक्षिण चीन सागरात आपलं शक्तिशाली आरमार उभं करताना एकाचवेळी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया ह्यांना सोबत घेऊन क्वाड ग्रुप तर तिथल्या छोट्या राष्ट्राचा पाठिंबा आपल्या बाजूने वळवण्यात अमेरीका यशस्वी ठरली आहे. चीन ला हे पक्के ठाऊक होते की भारतासोबतचा वाद जर चिघळला तर आपली चोहोबाजूने कोंडी होऊ शकते. ह्याच प्रमुख कारण म्हणजे जगातीकी पटलावर उघडपणे पडलेले दोन ग्रुप.

चीन च्या सोबत पाकीस्तान,तुर्की, नॉर्थ कोरीया, इराण सारखे देश उभे राहतील तर अमेरीका सोबत भारत, जपान, फ्रांस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा हे उघडपणे समर्थन देतील तर रशिया कोणाच्या बाजूने नसला तरी भारताच्या विरोधात कोणतही पाऊल उचलणार नाही. ह्यामुळेच चीन पूर्णपणे निदान भारताच्या बाबतीत मागच्या पावलावर गेला. गेल्या काही दिवसातील घडामोडी पहिल्या तर भारत ह्या सगळ्यातून बाजूला झाला आहे आणि आता संघर्षाचा वणवा चीन आणि अमेरीका ह्यांच्यात वाढत जातो आहे. अमेरीकेने चीनवर दबाव वाढवायला सुरवात केली. ह्युस्टन मधील चीन च वाणिज्य कार्यालय बंद करण्याची घोषणा केली. त्याला चीन ने अमेरिकेचे वाणिज्य कार्यालय बंद करणाच्या सुचना केल्या आहेत. कोणत्याही देशातील वाणिज्य कार्यालय बंद करायला सांगणे हा त्या दोन देशातील संबंधाचा तळ गाठणे असं समजलं जाते. सध्या अमेरीका आणि चीन ह्यांचे संबंध सगळ्यात तळाला पोहचले आहेत. हा भडका इकडे थांबणारा नाही. अमेरीका सारख्या स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या देशाला अपमान पचणारा नाही आणि चीन अमेरीकेच्या पुढे दबणारा नाही. हा भडका वाढत जाणार हे उघड आहे.

ह्या सगळ्याचा भारताला कितपत फायदा अथवा नुकसान हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट मात्र नक्की की भारत एकटा नाही. ज्या शत्रूशी भारत लढतो आहे किंवा जे भारताचे शत्रू आहेत त्यांच्या विरुद्ध आता जग एकटवलं आहे. पाकीस्तान असो वा चीन ह्या दोघांच्या विरुद्ध जनमत उभं राहते आहे. हा फायदा नक्कीच भारताला होणार आहे. अमेरीका आणि चीन ह्यांच्यामधील संघर्षाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ भारताला सगळ्याच पातळीवर होणार आहे. आर्थिक, सामरिक, जागतिक अश्या विविध पातळीवर भारताची भुमिका येत्या काळात निर्णायक राहणार आहे हे निश्चित आहे. कोणी म्हणेल की अमेरीका सोबत जाणे बरोबर नाही. अमेरीका फायदा घेऊन बाजुला होईल वगरे पण ना भारत तेवढा कमजोर राहिलेला नाही न अमेरीकेला भारताला फसवणारं परवडणारं आहे. भारताची सद्य स्थितीतील भुमिका अतिशय योग्य आहे. अमेरीका जवळ जरी आपण जात असलो तरी रशिया ची साथ आपण सोडलेली नाही. अमेरीका आणि रशिया ह्यांच्या संबंधाचा समन्वय साधत आपला तो फायदा करून घेणे हीच चाणक्यनिती आहे. इकडे आपल्या घरातील माणसं साथ सोडून जातात तिकडे कोणत्याच देशाचा भरवसा देता येतं नाही. त्यामुळे काळाची गरज ओळखून पावलं टाकली तर भारत ह्या सगळ्या बाबतीत सर्वात महत्वाचा आणि पारडं फिरवणारा घटक जागतिक पटलावर बनू शकतो.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


1 comment:

  1. माहितीपूर्ण विश्लेषणात्मक लेख👌👍

    ReplyDelete