Sunday 22 January 2017

लाईन ऑफ कंट्रोल... विनीत वर्तक
नवीन गोष्ट शिकताना, अडचणीत असताना आपल्याला मदत लागतेच. पण तीच मदत सतत आपल्याला मिळाली तर आपल्याला चीड येते. म्हणजे पहिल्यांदा पाण्यात सूर मारतो तेव्हा रबराची ट्यूब जवळ लागते. पाण्यात बुडू नये म्हणून तिची साथ अगदी हवीहवीशी वाटते पण पोहायला आल्या नंतर पण ट्यूब घालून सूर मारायला सांगितलं तर? सायकल चालवताना पहिल्यांदा ते साईड व्हील खूप जवळचे वाटतात. ते नसतील तर सायकल चालवूच शकत नाही अस आपल्याला वाटत रहाते. सायकल शिकलो की ते साईड व्हील नकोसे वाटतात. साईड व्हील लावूनच सायकल चालवायला लावली तर?
रबराची ट्यूब असो वा सायकलचे साईड व्हील. असतात तर आपल्या मदतीला. पण एका क्षणापलीकडे त्याचं अस्तित्व आपल्याला बर्डन वाटायला लागते. ते नकोसे होतात. भले त्यांची इच्छा, कर्म, कर्तव्य मदतीच असेल तरी आपल्याला ते नको असते. आयुष्यात आपण पण असेच असतो न. कोणासाठी रबराची ट्यूब तर कोणासाठी सायकल चे साईड व्हील. कोणत्याही नात्यात मग ते मैत्रीच, जोडीदाराचा, आई- वडिलांचं, जवळच असो वा लांबच मदतीचे साईड व्हील व्हायला आपण तयार असतोच निदान आपल्या माणसांसाठी. पण हे करताना आपण लाईन ऑफ कंट्रोल कधी ओलांडतो ते आपल्याला कळत नाही.
लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात न घेण. मदतीच्या वेळी मी तुझ्या सोबत आहे म्हणताना आयुष्यातील प्रत्येक निर्णय जर मला विचारून घे अस झाल तर ती सोबत होईल का? ती मदत होईल का? अनेकदा अडचणीच्या वेळी आपल जवळच माणूस विचलित होत, हरवून बसत, कोन्फीडन्स कमी होतो, अश्या वेळी आपण नाही उभ राहणार तर कोण राहणार? अश्या वेळी गरज असते ती सावरायची, त्याला आत्मविश्वास देण्याची आणी परिस्थिती ची जाणीव करून देण्याची. मग अश्या वेळी हवीच असते रबराची ट्यूब बुडताना वाचवणारी, हवीच असतात साईड व्हील पडताना वाचवणारी. पण एकदा की तो आत्मविश्वास आला किंवा ते क्षण गेले की आपण एक्झिट करण क्रमप्राप्त असते. नाहीतर तसेच राहिलो तर नकोसे व्हायला वेळ लागत नाही.
अनेकदा मदतीच्या नावाखाली आपण रिमोट कंट्रोल होतो. दुसर्याने आपण सांगितल्यावर हे बटन दबाव किंवा हे दाबू नये अस सतत सांगत जातो. हेतू वाईट नसतो पण त्याला वाचवण्याच्या नादात ती मदत मग नकोशी वाटते. मदत नक्की करावी पण लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून न देता. आपण सगळ्याच गोष्टी जर का स्पून फीडिंग करत राहिलो. तर दुसऱ्याच्या आयुष्यात आपण अतिक्रमण करत जातो. हे रिमोट कंट्रोल मग आपल्या आयुष्याचा भाग होत. ते एकदा हाती आल की सोडावस वाटत नाही. सतत ते आपल्याकडे असण्यासाठी मग आपला अट्टाहास चालू राहतो. नकळत का होईना ती लाईन जेव्हा क्रोस होते तेव्हा हाती फक्त निराशा येते. मग आपण म्हणतो इतक केल तरी ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते.
आपण खूप ब्लेस आहोत. कोणाला तरी मदत करावी वाटण हा विचारच किती मोठा आहे. आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात जर काही चांगल होत असेल तर का नाही? आपल्या जवळच्या माणसांसाठी तर ही आपली जबाबदारी आहे. पण त्या सोबत येते ती लाईन ऑफ कंट्रोल पार न करण्याची जबाबदारी. मदत करताना त्याच्या जबाबदारीची जाणीव झाल्यावर आयुष्याचे निर्णय घेण्याची मोकळीक आपण देऊ शकलो तर त्या लाईन चा आपण सन्मान केला असच मी म्हणेन. महाभारतात कृष्णाने अर्जुनाला तो जेव्हा कुरुक्षेत्रात हताश झाला होता तेव्हा गीतेने उपदेश केला पण त्याने कोणते बाण निवडावेत किंवा ते किती कोनातून कोणत्या स्पीड ने सोडावेत हे नाही सांगितल. कृष्णाने अर्जुनाला परिस्थिती ची जाणीव करून दिली पण निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य हे अर्जुनाला दिल. हीच तर आहे लाईन ऑफ कंट्रोल.
आपल्या मुलांविषयी, जोडीदाराविषयी, मित्र-मैत्रिणी विषयी किंवा अगदी घरातल्या नात्यात मदतीची ओढ वाटण स्वाभाविक आहे. नक्की व्हाव आपण ह्या सर्वांची ट्यूब आणी साईड व्हील अगदी हक्काने. पण ते करताना लाईन ऑफ कंट्रोल चा आदर नक्की करावा. युद्धाची सुरवात ही नेहमीच लाईन ऑफ कंट्रोल पार केल्यावर होते हे नेहमीच लक्षात ठेवायला हव. ते लक्षात असल की नात्यांचा मानसन्मान तसाच राहतो. किंबहुना थोडासा वाढतोच. बघा किती नात्यांमध्ये आपण लाईन ऑफ कंट्रोल चा आदर केला आहे. किती नात्यात आपण ती क्रोस करून रिमोट कंट्रोल हातात घेतला आहे.

No comments:

Post a Comment