Sunday 22 January 2017

विनयाचा भंग... विनीत वर्तक
बंगळूरू मद्धे झालेल्या प्रकाराने अस्वस्थ झालो आहे. पुन्हा एकदा पुरुषी राक्षसाने एका मादीला आपल शिकार बनवलं. मी मुद्दामून मादी म्हणतो आहे. कारण स्त्री बोलतो तेव्हा तिच्याविषयी कुठेतरी एक आदर मनात असतो. पण मादीकडे भोगी नजरेनेच पाहिलं जाते. विनयभंग हा कसा ही असू शकतो. स्पर्श, बोलण, हावभाव आणी इच्छेविरुद्ध केलेल कोणतही वर्तन हे त्याच सदरात मोडते. अगदी टोमणे आणी जोक सुद्धा विनयभंगाचा एक भागच आहेत.
कामाच्या ठिकाणी तर असले प्रकार सर्रास घडतात. पण एकतर स्त्री त्याच्याकडे दुर्लक्ष करते किंवा त्याबद्दल कुठेही बोलत नाही. अब्रू चा ठेका समाज त्यावरून ठरवत असतो म्हणून जवळपास ७०% जास्ती स्त्रिया आजही ह्याबद्दल आपल तोंड उघडत नाहीत. अस आत्ताच एका सर्वेक्षणातून पुढे आल आहे. स्त्रियांना कामाच्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने ३ सप्टेंबर २०१२ रोजी एक वेगळ विधेयक संमत केल. Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 ह्या नावाने त्याच ९ डिसेंबर २०१३ साली कायद्यात रुपांतर झाल.
स्त्री ला भोगी वस्तू किंवा मादी म्हणून बघण्याच्या पुरुषाच्या दृष्टीकोनात अजून खूप मोठा बदल घडवण्याची गरज आहे. नाही म्हंटल तरी एक स्त्री ला कामाच्या ठिकाणी मिळणारा आदर आणी तीच स्थान अनेक ठिकाणी दुय्यम आहे. २०१३ च्या ह्या कायद्याने स्त्री ला खूप मोठा पाठींबा मिळाला आहे. पण अस असून सुद्धा अनेक कंपन्या ह्या कायद्याच्या अंबलबजावणी साठी टाळाटाळ करतात हे ही तितकच उघड सत्य आहे. फिक्की च्या मताप्रमाणे ३६% भारतीय तर २५% परदेशी कंपन्या अजूनही ह्या कायद्याच्या शिफारशी लागू करण्यापासून लांब आहेत. कारणे काही असतील पण अजूनही मानसिकतेतील बदल किती महत्वाचा आहे. हेच ह्यातून अधोरेखित होते आहे.
काही गोष्टीला अपवाद असतात तसे इथेही आहेतच. ह्याच कायद्याचा आधार घेऊन किंबहुना समाजाचा पुरुषाकडे बघण्याचा आधार घेऊन स्त्रिया ही गैरवापर करत आहेत हे ही तितकच समजून घ्यायला हव. कायद्याने सक्षम करण्यासाठी केलेल्या कायद्यांचा आधार जर स्त्री स्वताच्या फायद्यासाठी अस्त्र म्हणून पुरुषविरोधी वापरत असेल तर अश्या स्त्रीयांचा विरोध स्त्रीयांनी पण करायला हवा. जाणून बुजून अपशब्द बोलणे, टोमणे मारणे, नजरेतून हावभाव, अश्लील वर्तन, शब्दांचा गैरवापर ते कोणताही स्पर्श सगळच विनयभंग प्रकारात येत ह्याची जाण प्रत्येक पुरुष आणी स्त्री ने ठेवायला हवी. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून किंवा कोणत्याही प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीचा विनयभंग करत नाही आहोत ह्याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी.
स्त्री किंवा पुरुष ह्यांना त्यांच्या लिंगावरून ओळख्ण्याआधी आपण एक माणूस म्हणून त्यांचा स्वीकार केला आहे का? हा प्रश्न आपण स्वताला विचारायला हवा. कारण आपण लिंग बघून कस वागायचं ते ठरवतो. लिंग जर विरुद्ध असेल तर ती भावना उफाळून बाहेर येते. मग आपण त्या व्यक्तीकडे भोगी, मादी किंवा इतर सगळ्या रुपात बघू लागतो. लिंगाला जर आपल्या विचारसरणीत स्थान नाही दिल तर विनयाचा भंग कधीच होणार नाही. कारण विनय, नम्रता ह्या गोष्टी लिंगावर अवलंबून नसतील. तर त्या माणूस असण्यावर अवलंबून असतील. मग घडणारी प्रत्येक गोष्ट सन्मान देणारीच असेल. जोवर आपण ह्या लिंगाच्या साच्यातून बाहेर येत नाही. तोवर असले विनायाचे भंग होतच रहाणार. मग ते कामाच ठिकाण असो वा घर असो.

No comments:

Post a Comment