Thursday 24 August 2017

लक्ष्य... विनीत वर्तक

२००४ साली लक्ष्य चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट खूप गाजला. ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला होता त्या सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांना आपण भारतीय ओळखत पण नाही. लेह – लडाख ला जाऊन आपण पेंगोंग लेक ला फोटो काढतो. का तर करीना कपूर आणि आमीर खान तिकडे गेले होते किंवा ३ इडियट चित्रपटाच शुटींग तिकडे झाल. पण ज्या टायगर हिल ला मिळवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले. जे येण्यामुळे आज लडाख भारताच अविभाज्य अंग आहे ते काबीज करणाऱ्या त्या भारतीय सेनेतील सैनिकांच्या स्मृतीला भेट द्यायला आपल्याला वेळ नसतो. लक्ष्य काय असते ते जाणून घ्यायला चित्रपट बघण्याची नाही तर त्या लक्ष्यासमोर उभ राहून ते अनुभवण्याची गरज आहे.
सुभेदार योगेंद्र सिंह यादव १८ ग्रेनेडीयर बटालियन च्या घातक तुकडीत कार्यरत होते. ४ जुलै १९९९ ला त्यांना टायगर हिल शत्रूकडून हिसकावून घेण्याची जबाबदारी देण्यात आली. १६,५०० फुट उंचीवरील त्या कड्यावर जाण्याची जबाबदारी सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांनी स्वमर्जीने उचलली. अर्धी चढण पूर्ण केल्यावर शत्रूने मशीनगन ने गोळ्यांचा मारा सुरु केला. त्यात त्यांच्या प्लाटून चा कमांडर आणि २ जण धारातीर्थी पडले असताना व स्वतःच्या शरीरात ३ गोळ्या लागल्या असताना सुद्धा कोणत्या मदतीशिवाय चढण सुरु ठेवली. शेवटचे ६० फुट त्यांनी अश्या अवस्थेत पार केल. तब्बल १६,५०० फुटावर ६० फुट चढण ती पण सुळक्या वरची आपण इकडे ए.सी. रूम मध्ये किंवा सिनेमागृहात बसून नाही अनुभवू शकत. त्यासाठी निदान १५,००० फुट उंचीवर जाऊन तिथलं वातावरण अनुभवाव लागते.
३ गोळ्या लागून सुद्धा सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांनी सुळक्यावर यशस्वी आरोहण केल. शत्रूच्या गोळ्यांना चुकवत. जमिनीवर लोळत जाऊन त्यांनी पाकिस्तानी बंकर मध्ये ग्रेनेड हमला केला. ह्यात अंधाधुंद गोळीबार करणारे ४ पाकिस्तानी सैनिक गतप्राण झाले. त्यांच्या ह्या शौर्यामुळे मागून येणाऱ्या इतर सैनिकांना आरोहण करणे सोप्पे झाले. इकडेच न थांबता वर आलेल्या आपल्या ७ साथीदारांसह सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांनी पाकिस्तान च्या दुसऱ्या बंकर वर हमला केला. प्रचंड धुमश्चक्री झाली. पाकिस्तान च ते बंकर उध्वस्त झाले. ह्या मध्ये फक्त सुभेदार योगेंद्र सिंग परत आले. तेव्हा त्यांच्या शरीरात १५ गोळ्या घुसल्या होत्या. दोन ग्रेनेड मुळे झालेल्या जखमा तर एक खांदा पूर्णपणे निखळून लटकत होता. अश्या हि परिस्थितीत सुभेदार योगेंद्र सिंह यादव ह्यांनी शत्रूच्या पुढच्या हालचालीची माहिती आपल्या कमांडिंग ऑफिसर ला दिली. तब्बल १६ महिने हॉस्पिटल मध्ये राहून पुन्हा एकदा त्यांनी भारतीय सैन्यात आपल काम सुरु केल.
अश्या अचाट शौर्य दाखवणाऱ्या विराला आधी मरणोत्तर परमवीर चक्र जे कि भारतीय सैन्यातील सर्वोच्च पदक आहे ते देण्यात आल. पण नंतर ह्या विरापुढे मृत्यू हि हरला. तब्बल १५ गोळ्या, दोन ग्रेनेड च्या जखमा अश्या अवस्थेतून त्यांनी मृत्यूला परत पाठवत पुन्हा आयुष्य सुरु केल. हे नव आयुष्य हि भारताच्या सेवेसाठी अर्पण केल. हा पराक्रम जेव्हा त्यांनी गाजवला तेव्हा त्याचं वय होत अवघ १९ वर्ष. वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय सैन्याचा सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र मिळवणारे ते सगळ्यात तरुण सैनिक आहेत. ज्या काळात आयुष्याची स्वप्न सुरु होतात. आपण आयुष्याच लक्ष्य ठरवतो. तेव्हा त्यांनी आपल लक्ष्य तर गाठलंच पण त्या पलीकडे आपल्या देशाला सार्वभौम ठेवण्यासाठी आपल्या प्राणाचा हि विचार केला नाही. अश्या ह्या शूरवीर, बहादूर, देशभक्त सैनिकाला माझा कडक स्याल्युट.
लक्ष्य काय असते तर ते अनुभवण्यासाठी एकदा त्या टायगर हिल च्या समोर उभ राहून अनुभवा. पुढल्या वेळी लडाख ला जाताना कारगिल स्मारकाला भेट द्या. हा अनुभव तुमच्या आयुष्यात नक्की बदल करेल. २०१५ मध्ये जेव्हा कारगिल च्या स्मारकासमोर उभ राहून टायगर हिल आणि तोलोलिंग च्या शिखरांना बघितल तेव्हा लक्ष्य ठरवताना त्या १९ वर्षाच्या जवानाच्या मनात काय चालू असेल ह्याचा विचार करत होतो. क्यापटन विक्रम बात्रा, सुभेदार योगेंद्र सिंह यादव, रायफल म्यान संजय कुमार ह्या शूरवीर भारतीय सैनिकांमुळे आज आपण लडाख ला जाऊ शकतो. मला तिथे लिहलेल एक वाक्य नेहमीच स्मरणात रहाते. ते म्हणजे
“शहीदो के चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का यही बाकी निशॉ होगा”
जय हिंद.

No comments:

Post a Comment