Thursday 24 August 2017

कॉर्पोरेट शाळा... विनीत वर्तक

सध्या तरी पालकांच्या पुढे सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न असतो तो म्हणजे मुलांच्या शाळेचा प्रवेश. चहाच्या टपरी प्रमाणे सगळ्या कोपऱ्यांवर उगवलेल्या शाळा आणि सगळ्यात मोठी गोची असते ती तिकडे मिळणारा वेगवेगळ्या पद्धतीचा चहा. म्हणजे शाळेचा अभ्यासक्रम एस.एस.सी., सी.बी.एस.सी., आय.सी.एस.सी., आय.जी.सी.एस.सी, आय.बी. आणि लिस्ट गोज ऑन. आता हाच चहा ग्लास मधून देणार कि कप - बशी मधून कि त्यासोबत एखाद बिस्कीट पण ह्यावर त्याची किमंत ठरते. बिचारे पालक आपण रडत खडत इथवर आलो तर आपल्यासारख त्यांना रडायला नको म्हणून मुलांसाठी प्रोडक्ट प्याकेज घ्यायला तयार असतात. एकदा एक चटक लागली मग तेच प्रोडक्ट घ्यावं लागते. त्यात होणारी पालकांची परवड त्यांची त्यांना माहित.
बदलणाऱ्या वाऱ्यांनी शाळेला पण नाही सोडल. १९८० च्या दशकात म्हणजे माझ्या पिढीतील अनेक जण हे मराठी माध्यम आणि राहणाऱ्या आजूबाजूच्या परिसरात उत्तम नाव असणाऱ्या शाळेत शिकले. त्यावेळी एकच बोर्ड होत. मुलगा / मुलगी पुढे काय करील हे पालकांना माहित नव्हत म्हणा किंवा त्यांना जन्माआधीच अमेरिकेची स्वप्न पडलेली नसतील म्हणा. मुलांवर चांगले संस्कार होण हे जास्ती महत्वाच असायचं. म्हणूनच असे संस्कार करणाऱ्या शिक्षक असलेल्या शाळेत मुलांना घालायचा पायंडा होता. म्हणजे शाळा ओळखली जायची ती त्या मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांवरून. शाळेत ग्राउंड आहे कि नाही? त्यांच्या सहली कुठे जातात? कि एका वर्गात विद्यार्थी किती? ते शाळेत किती पुस्तक आहेत? शाळेत माझ्या मुलावर लक्ष किती दिल जाईल? असले प्रश्न कधी पडले नाहीत आणि पडले असले तरी त्याच महत्व अतिशय दुय्यम असच होत.
१९९० नंतर अमुलाग्र बदल झाले. माहिती तंत्रज्ञानात दिसत असलेला पैसा आणि अमेरिकेची वारी जन्माआधीच दिसायला लागली. त्याच सोबत सरकारी कामात आरक्षणानाने अनेक चांगल्या शिक्षकांच्या जागा जातीवरून भरायला सुरवात केली. ज्या शिक्षकांच्यासाठी शाळा प्रसिद्ध होत्या ते शिक्षक हरवत जात होते आणि त्याच वेळेस अमेरिकेची स्वप्नात दिसलेली वारी चागल्या शाळांच्या आणि स्पेशली मराठी शाळांच्या टक्केवारीत कमालीची घट करत गेली. अचानक आपल्या पाल्याला जागतीकरणात सामावायाचे असेल तर इंटरनेशनल बोर्ड शिवाय पर्याय नाही ह्याच बाजारीकरण करण्यात आल. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे शाळा काढण आता एक बिझनेस झाला. बिझनेस आला कि त्यात नफा-तोटा आणि जाहिरात सगळच आल. त्यात कॉर्पोरेट कल्चर आल. एम.डी., सी.एम.डी., प्रेसिडेंट अश्या जागा हि आल्या. ह्या जागांपलीकडे मार्केटिंग स्ट्राटर्जी हि आलीच.
प्रत्येक शाळा आपल्या परीने अभ्यासक्रम राबवू लागल्या. म्हणजे एका शाळेतील धडा दुसऱ्या शाळेत असलेच अस नाही. गणवेश आणि सर्व प्रकारच साहित्य इन हाउस घेण्याची सक्ती करण्यात आली. म्हणजे व्हरपूल ची मशीन घेतलीत तर एरियल टाकायला हवी नाहीतर कपडे साफच होणार नाहीत. म्हणजे मशीन घ्यायची तर पावडर पण घ्यायला हवीच. मग पावडर डबल पैसे मोजून विकू लागली कारण जो मशीन घेऊ शकतो त्याला दोन पैसे जास्ती पडले पावडरीसाठी तर तो आवाज करणार नाही हे मार्केटिंग गिमिक शाळेच्या कॉर्पोरेट जगताला चांगलच माहित झाल. शाळेत येण्याआधीच ई.एम.आय. आणि फी चे आकडे आले. नर्सरी मध्ये सुरवात करतानाच टाय आणि सूटबूट च्या कपड्यांनी आपला पाल्य उद्याचा सी.ई.ओ. बनणार अश्या भाबड्या स्वप्नात पालकांना रमवण्यात शाळा यशस्वी ठरल्या.
शाळेत प्रवेश घेण्याआधी आय.टी रिटर्न्स आणि पगाराचे आकडे सांगण बंधनकारक होऊ लागल. कारण गिऱ्हाईकाची खरेदी पातळी समजल्या शिवाय त्याला प्रवेश देण म्हणजे धंद्याच नुकसान करण कोणालाच परवडणार नव्हत. ह्या सगळ्या बिझनेस डील मध्ये आपण आपल्या पाल्यांच्या आयुष्याशी किती खेळ करत आहोत. ह्याच भान न पालकांना राहील न शाळांना. शाळांचं तर ठीकच कारण त्यांनी बिझनेस मांडला होता पण पालक सुद्धा चांगल देण्याच्या गडबडीत मुल म्हणून बघण्यापेक्षा मुलाकडे प्रोडक्ट म्हणून बघू लागले. माझ प्रोडक्ट किती चांगल आहे हे सांगण्याची अहमिका सुरु झाली. अगदी तद्दन परीक्षेत मेडल किंवा सर्टिफिकेट हि फेसबुक आणि व्हास्त अप वरून वायरल व्हायला लागली. प्रोडक्ट चांगल तर आपण पालक म्हणून खूप चांगले असाच अडाणीपणाचा समज पसरवला गेला किंबहुना आजही जातो आहे.
ह्या सगळ्यात आपण मुलाला किती समजून घेतल हे कोणीच पालक अथवा शाळा सांगत नाही. मुलाची जडणघडण, त्याचे विचार, त्याची आवड, त्याची वाढ बौद्धिक पेक्षा मानसिक ह्यावर विचार करताना न पालक दिसतात न शाळा. मार्कांचे रकाने ९९% पर्यंत भरले कि मुलाने आयुष्य घडवलं असच पालकांना वाटते. खर तर तुमच प्रोडक्ट छान आहे ह्याचा अर्थ तुमच मुल एक माणूस म्हणून चांगल आहे असा होत नाही. आजकाल होणारी गेट टू गेदर बघितली तर ती सगळीच १९९० च्या अलीकडच्या मुलांची होतात. कारण १९९० नंतर जे काही वळण शाळेने घेतल ते शिक्षक आणि विद्यार्थी ह्या नात्यापेक्षा इनपुट आणि आउटपुट ह्यावर अवलंबून होत. म्हणूनच आउटपुट आल्यावर इनपुट चा विचार कोणाला करवत हि नाही.
विद्यार्थी,शिक्षक आणि शाळा ह्याचं घट्ट नात बघायचं असेल तर १९९० च्या अलीकडे कोणत्याही विद्यार्थाला विचारा तो एकतरी आठवण त्याच्या शिक्षकांची सांगेल, त्याला एकतरी कविता-धडा आठवत असले, एकतरी शिक्षकाने त्याच्या आयुष्याला आकार दिला असेल. तो आकार एक माणूस म्हणून असेल न कि एक प्रोडक्ट म्हणून. कॉर्पोरेट शाळांनी प्रोडक्ट चा स्तर नक्कीच वाढवला असेल पण एक माणूस म्हणून विद्यार्थांना घडवण्यात त्या साफ अपयशी ठरत आहेत. ह्याचा थोडा दोष माझ्या पिढीतील पालकांचा हि आहेच. कारण आपण सामान्य म्हणून असामान्य जगलो. पण मुलांना सामान्य जगायला लागू नये म्हणून असामान्य गोष्टी देण्याच्या नादात आपण त्यांना सामान्य पण बनवत नाही आहोत. हीच आपली खरी शोकांतिका आहे.

No comments:

Post a Comment