Thursday 24 August 2017

माहितीच सेन्सॉर... विनीत वर्तक

कोणताही चित्रपट बघण्यापूर्वी जगात सगळीकडेच हा चित्रपट कोणता प्रेक्षक वर्ग बघून  बनवला गेला आहे. किंवा त्या चित्रपटातील घटना, पात्र, विषय हे कोणत्या वयासाठी योग्य आहेत ह्याच प्रमाणपत्र घ्यावं लागते. त्यालाच आपण सेन्सॉर सर्टिफिकेट अस म्हणतो. चित्रपटाला मिळालेल्या प्रमाणपत्रा वरून प्रेक्षक हि ठरवू शकतात कि चित्रपट बघावा कि नाही. तसेच आपल्या मुलांच्या वयोगटासाठी तो योग्य आहे का नाही.
ह्या प्रमाणपत्र देण्यावरून अनेकदा गोंधळ हि झालेले आहेत. एक काळ होता कि चित्रपटाचा सामान्य लोकांवर विशेषतः तरुणाई वर प्रभाव प्रचंड होता. एखादी नवीन प्रथा मग ती कपड्यांची असो वा केसांची चित्रपटामुळे लोकप्रिय होत असे. पण जस जस माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विस्तारू लागल तस तस ह्याचा प्रभाव कमी झाला आहे किंबहुना होतो आहे. आज अश्या प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींची जागा फेसबुक आणि व्हात्स अप ने घेतली आहे.
चित्रपटातून आभासी आयुष्य जगता येत होत. स्वप्न बघता येत होती. पण फेसबुक आणि व्हात्स अप ने हे सगळ जगायला शिकवलं आणि ह्याचा प्रभाव तरुणाई वर पडणार नाही अस शक्यच नव्हत. तरुणाई आपसूक त्यात ओढली गेली. इकडे एक खूप मोठा फरक झाला तो म्हणजे नियंत्रण नसलेल माहितीच मायाजाल. ह्याचे काही चांगले फायदे होतेच पण वाईट भाग हि जास्तच होता. अनियंत्रित माहिती जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने नको त्या वयात नको त्या पद्धतीने मिळू लागली. कोणी म्हणेल कि पुढारलेल्या समाजाच ते द्योतक होत. पण प्रत्यक्षात त्याचे तोटेच जास्ती दिसून येऊ लागले.
फेसबुक वर तर काही प्रमाणात नियंत्रण असल तरी व्हात्स अप वर ते पूर्णतः नष्ट झाल आहे. फेसबुक आणि व्हास्त अप ने कन्टेन्ट वरची बंधन तोडून टाकली. त्यामुळेच अनेक विचित्र विडीओ, फोटो, फाईल्स वयाची बंधन सोडून सगळीकडे वाळवी सारख्या पसरू लागल्या. त्यांनी हळूहळू आतून संस्कृती, समाज आणि एकूणच जनमानसातील एकूण विश्वासाला पोखरायला सुरवात केली. आता त्याचे भयानक परिणाम आपल्याला दिसू लागले आहेत ते म्हणजे माणसाच्या संपलेल्या भावना.
अपघातात मधले विडीओ, जिवाची पर्वा न करता लागलेलं सेल्फी च वेड, शब्दातील संपलेला विनयपणा, एकमेकांकडे भोगी वस्तू प्रमाणे बघण्याचा वाढलेल स्तर त्यामुळेच व्हात्स, फेसबुक वर मागचा, पुढचा विचार न करता आंधळेपणाने आणि कौर्याची परिसीमा गाठलेल्या गोष्टी अतिशय सहजतेने पुढे ढकलल्या जातात. त्या मागची भावना माहिती ची देवाणघेवाण असली तरी नकळत ती माहिती आपण कोणत्याही वयोगटाला शेअर करत पुढे जात आहोत. कोणती माहिती कोणी वाचायची ह्याचा निर्णय घेण्याच स्वातंत्र्य आपल्याला असल तरी नकळत आपण त्या वाळवी ला समर्थन आणि चेकाळत आहोत हे सत्य आहे.
कुठेतरी सेन्सॉर करण्याची गरज आहे. जर ते कायद्याने सगळ्याच वेळा शक्य नसेल तर ती भूमिका आपण निभावूच शकतो. आपल्या पर्यंत आलेला मेसेज, फोटो किंवा विडीओ जर योग्य नसेल किंवा क्रूरता, हिंसा, नकारात्मक भावना ह्याचं समर्थन करत असेल किंवा आलेली बातमी खरी आहे किंवा सांगितलेली घटना खरी आहे कि नाही ह्याची शाहनिशा करता येत नसेल तर निदान ते पुढे पाठवण्यापासून आपण स्वतःला थांबवूच शकतो. वाळवी मुळापासून उखडता येत नसेल तर आपल्यापुरती तर सावरुच शकतो. कारण हा वाळवीचा भस्मासुर ज्या तर्हेने पुढे जातो आहे. तो लवकरच हि व्यवस्था मुळापासून उद्धवस्त करेल ह्यात शंका नाही. आपल्या सारख्या सुजाण नागरिकांनी सेन्सॉर बनण्याची आज गरज आहे.

No comments:

Post a Comment