Wednesday 8 November 2017

परावलंबनातून स्वालंबनाकडे

परावलंबनातून स्वालंबनाकडे.... 
२०१७ हे वर्ष हे शेवटच वर्ष असेल कि आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारत कोणत्या दुसऱ्या देशाची मदत घेईल. १९६९ सालापासून सुरु झालेला अविरत प्रवास आता स्वालंबनाकडे येऊन पोहचला आहे. इतके वर्ष भारत आपल्या गरजांसाठी अनेक उपग्रहांची निर्मिती करत होता. पण ह्या उपग्रहाना प्रक्षेपित करणारी रॉकेट प्रणाली मात्र आपल्याकडे नव्हती. जी.एस.एल.व्ही. मध्ये आलेल्या काही अपयशानंतर रॉकेट ची कार्यक्षमता सिद्ध होण्यासाठी आणखी काही चाचण्यांची गरज होती. त्यामुळे ४ टन वजनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आपल्याला एरियन ह्या संस्थेची मदत घ्यावी लागत होती. पण ह्या वर्षी झालेल्या जी.एस.एल.व्ही. मार्क ३ च्या यशाने इस्रो ला ती स्वायत्तता प्राप्त करून दिली ज्यासाठी इतके वर्ष भारत प्रयत्न करत होता.
जी.एस.एल.व्ही. मार्क ३ ह्या रॉकेट च्या यशस्वी आरोहणामुळे भारत उपग्रह प्रक्षेपण करण्यामध्ये पूर्ण सक्षम झाला आहे. भारत सरकारने तब्बल ८६५८.७४ कोटी रुपये खर्च असणाऱ्या ३१ रॉकेट उड्डाणाना परवानगी दिली आहे. ह्यापेकी १५ पी.एस.एल.व्ही, १३ जी.एस.एल.व्ही. ३ जी.एस.एल.व्ही मार्क ३ रॉकेट उड्डाण अजून बाकी आहेत. ह्यातील १० उड्डाण इस्रो ने आतापर्यंत यशस्वी केली आहेत. येत्या ५ वर्षात इस्रो २१ रॉकेट अवकाशात पाठवत असून त्यावर ७० पेक्षा जास्ती उपग्रहांच प्रक्षेपण केल जाणार आहे. ह्यात भारतासोबत अनेक देशातील उपग्रहांचा समावेश आहे. २०२० पर्यंत पी.एस.एल.व्ही. हे रॉकेट पूर्णतः व्यापारी तत्वावर चालवण्याचा इस्रो चा मानस आहे. पी.एस.एल.व्ही. प्रायवेट इंडस्ट्री कडे दिल्यामुळे इस्रो ला अजून जास्ती क्षमतेच्या रॉकेट आणि पुढल्या पिढीतील रॉकेट वर काम करता येणार आहे.
भारत खूप वेगाने उपग्रह निर्मिती मधील एक हब म्हणून जागतिक पटलावर पुढे येतो आहे. त्याचवेळी न्यानो तसे मायक्रो उपग्रह प्रक्षेपणा मधील एक भरवशाचा भागीदार. ह्या पुढे मोठ्या उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रो ने कंबर कसली आहे. इस्रो ने निर्माण केलेले उपग्रह जागतिक दर्जात उच्च मानले जातात. सध्या इस्रो एका नव्या दमाच्या उपग्रहाची निर्मिती करत आहे. फुल फ्लेज इर्थ ओब्झर्वेषण उपग्रह अर्थात हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह. हा उपग्रह पृथ्वीपासून ६३० किमी अंतरावरून ५५ स्पेक्ट्रल किंवा वेगवेगळ्या कलर च्या माध्यमातून बघू शकणार आहे. ह्या तंत्रज्ञानावर जगात संशोधन सुरु असून इस्रो ने निर्माण केलेल्या चीप मुळे पृथ्वीकडे बघण्याची एक वेगळी नजर भारताला अवकाशातून मिळणार आहे.
हायसीस तंत्रज्ञाना वर अजून शोध आणि काम सूर आहे. पण ह्या तंत्रज्ञानाचे फायदे खूप आहेत. अवकाशातून निसर्ग, शेती, सोबत सैनिकी आणि सामरिक दृष्ट्या अवकाशातून लक्ष ठेवण्यात कमालीचा उपयोग होणार आहे. तसेच ह्या आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या जमिनीखाली दडलेल्या अनेक मिनरल्स तसेच ओईल आणि ग्यास चा शोध अवकाशातून घेण शक्य होणार आहे. हायसपेक्स इमेजिंग मुळे एखाद्या वस्तू, मटेरियल किंवा प्रोसेस ला त्याच्या प्रत्येक चित्राच्या पिक्सेल मधील स्पेक्ट्रम मोजता येणार आहे. हे सगळ अवकाशातून शक्य होणार आहे. जगातील काही मोजक्या स्पेस एजन्सी कडे हे तंत्रज्ञान असून भारत त्यातील एक लवकरच भाग होणार आहे. ह्याच तंत्रज्ञानावर आधारित जर्मन उपग्रह एनम्याप हा भारताच्या रॉकेट मधून २०१८ साली प्रक्षेपित केला जाणार आहे.
उपग्रह प्रणाली सोबत रॉकेट प्रक्षेपण ह्या बाबतीत पूर्णपणे भारत स्वयंपूर्ण बनला आहे. अशी सिद्धता राखणाऱ्या मोजक्या देशात भारताचा समावेश झाला आहे. अमेरिका, चीन आणि रशिया ह्यांच्याशी तुलना करून आपल्याला अवकाश क्षेत्रात खूप मोठी मजल अजून मारायची बाकी आहे हे खर असल तरी भारताचा कार्यक्रम कोणत्याही महत्त्वाकांक्षे शिवाय अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पुढे वाटचाल करत आहे. एकेकाळी आपले सर्व उपग्रह बाहेरून प्रक्षेपित करणारा आपला देश आता आपले सर्व उपग्रह तर आपल्या भूमीवरून तर प्रक्षेपित तर करतोच पण दुसऱ्या देशांचे उपग्रह हि आपल्या भूमीवरून प्रक्षेपित करताना ३०० बिलियन अमेरिकन डॉलर मार्केट चा भारत हिस्सा होतो आहे. हा परावलंबनातून स्वालंबनाकडे केलेला प्रवास भारताची पताका अवकाशात अभिमानाने फडकवत ठेवतो आहे ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment