Wednesday 8 November 2017

पर्सनल मेसेजिंग.. आगीतून निघून फुफाट्यात...

पर्सनल मेसेजिंग.. आगीतून निघून फुफाट्यात... 
पर्सनल मेसेजिंग हा प्रकार खरे तर याहू ने पहिल्यांदा सुरु केला. आपल्याला अनोळखी तसेच ओळखीच्या व्यक्तीशी इंटरनेट च्या माध्यमातून संवाद साधण सोप्प झाल. फेसबुक ने त्याला अजून वेगळ्या उंचीवर नेल. फोटो, विडीओ शेअरिंग सह व्यक्तीच प्रोफाईल बघून बोलण्याची सुरवात करावी कि नाही हा एक मोठा प्लस पोइंट फेसबुक ने दिला. सराहा ने तर आता सिक्रेट मेसेजिंग चा पर्याय समोर उपलब्ध करून दिला आहे. पण ह्या सगळ्यात स्त्री आणि पुरुष दोघांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात अशीच होते आहे.
सराहा काय भानगड आहे म्हणून मी त्यात अकाऊंट काढल तशी पोस्ट हि इकडे टाकली. त्यावर अनेकांनी निनावी मेसेज केले. तुमच्या लेखनाचा फ्यान ते तुम्हाला कधी भेटू अस म्हणत अनेक मेसेज आले. पहिल्यांदा वाचताना खूप मज्जा वाटली कारण अस कोणाला तरी वाटते हे जाणून घेण खूप मस्त होत. पण एक अडचण समोर आली तिचा विचार करताना जे भयावह सत्य जाणवलं त्यामुळे सराहा ला कायमचा रामराम ठोकला. जेव्हा मला कोणीतरी निनावी मेसेज केला “मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे” तेव्हा पूर्ण दिवस हा मेसेज डोक्यात घोळत होता कि कोण हि व्यक्ती असेल? आपण ओळखतो का? आपल्या फेसबुक च्या मित्र यादीत आहे का? वगरे. ह्या सगळ्यात मला जाणवलं कि ह्या सिक्रेट मेसेजिंग मध्ये ना आपण त्याला उत्तर करू शकत ना ती व्यक्ती कोण आहे ह्याचा उलगडा होत होता. तरीपण एक पूर्ण दिवस ते कोण असेल ह्याचा विचार करण्यात मी घालवला.
समजा हाच मेसेज काही घाणेरड्या अंगाने किंवा सूडबुद्धीने आला असता तर? हा विचार करता मी तिकडेच थबकलो. कारण जर चांगल्या विचारांनी केलेल्या मेसेजसाठी मनात दिवसभर चलबिचल असेल तर वाईट मेसेजस ने काय होईल? एक साधा मेसेज कि काल मी तुला बोरिवलीत बघितल? असा विचार केला तरी त्या पूर्ण दिवसाचा आढावा आपण घेत बसू. कोण असेल? कुठे बघितल? कोण होत आपल्यासोबत? कोणी पाठलाग करते आहे का? बघण्याच प्रयोजन आणि मेसेज च प्रयोजन काय? इतके सगळे प्रश्न मनात उभे राहिले. वास्तविक लपवण्यासारख काही नसताना पण कोणीतरी अनाहूतपणे आपल्या खाजगी आयुष्यात डोकावते आहे. असच मला वाटल. चांगल – वाईट हा भाग नंतर पण माझ्या गोष्टीत कुठेतरी कोणी लक्ष देते हाच विचारमुळी प्रचंड ताण वाढवणारा वाटला. त्यामुळे ह्या प्रकारापासून लांब राहण चांगल हेच मनाशी ठरवलं.
फेसबुक वरील स्त्रियांचे मेसेज बॉक्स म्हणजे दाणे टाकण्याच्या प्रवृत्तीची जिवंत उदाहरण आहेत. हाय कशी आहेस? ते छान लिहतेस, कविता काय सुंदर, खूप छान दिसतेस ते अगदी त्या रंगाच्या कपड्यात उठून दिसतेस पासून सुरु झालेला प्रवास स्वतःचे रावडी भाषेत “यो” फोटो, रोज गॉगल लावून महागाच्या गाड्या / बाईक सोबत म्याचोम्यान फोटो पाठवून कोणी सावज हाताशी लागते का चा केलेल्या प्रयत्नांनी भरलेले असतात. रोज २०-३० जणींना वय न बघता असे मेसेज करायचे. त्यातल्या काही नाही तर ६-७ तरी हुरळून जाऊन रिप्लाय करतात. त्यातल्या २-३ जणांशी संवाद सुरु होतो आणि एखाद सावज मिळतेच. इतक्या प्री प्लान पद्धतीने फेसबुक वर खेळ खेळणारे अनेक महाभाग आहेत. ह्यातल्या कोणी जर बंड केले तर अतिशय अर्वाच्च भाषेत शिव्यान पासून स्त्री च्या इभ्रतीचे धिंडवडे काढायचे. लज्जेखातर एकतर अश्या गोष्टी पुढे येत नाहीत. शेवटी ब्लॉक करण हा एकच ऑप्शन समोर रहातो. पण ह्या सगळ्यात निर्माण झालेल्या तणावाच काय? सगळेच पुरुष तसे नसतात पण चांगला- वाईट ठरवणार कस? बर आधी चांगला वाटलेला जेव्हा नंतर तीच री ओढतो तेव्हा निर्माण होणारा ताण कित्येक पट असतो. पण जिकडे आपलच जळते तिकडे कोण कोणाला आधार देणार?
फेसबुक मेसेज नी एकमेकांना बोलण्याच स्वातंत्र दिल पण त्या सोबत एक अनामिक दडपण पण लादल ह्यातून स्त्री आणि पुरुष कोणीच सुटलेलं नाही. नक्कीच स्त्रियांच्या बाबतीत हे जास्ती असते ह्यात दुमत नाही. पण काही स्त्रीयांना हेच आवडते म्हणून पुरुष चेकाळतात हे सत्य हि लपवता येणार नाही. कोणी तरी आपल्याला छान म्हंटल कि स्वर्गात जाऊन अप्सरा बनणाऱ्या स्त्रिया हि कमी नाहीत न त्यांना तो दर्जा देणारे दाणे टाकणारे पुरुष हि. प्रत्येकाला पडद्यामागची मज्जा हवी असते. मेसेंजर तो पडदा दिला. त्या मागे कोणी कोणाला घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्या गोष्टी चव्हाट्यावर आणताना आपण हि तितकेच जबाबदार असतो ह्याच भान दोन्ही बाजूने ठेवायला हवच.
सराहा ने तर ह्यापुढे जाऊन स्वातंत्र्य दिल आहे. म्हणजे आधी निदान कोणाला ब्लॉक करयाच ते कळत तरी होत. आता ती पण सोय नाही. म्हणजे कोण कोणाला वाटेल त्या भाषेत काहीही लिहू शकत. समोरच्याने फक्त ऐकून घ्यायचं आणि वाचायचं हे वन वे स्वातंत्र्य आधी मज्जा वाटत असल तरी आपल्या मनाला कधी पारतंत्र्यात घेऊन जाते कळणार पण नाही. सराहा ने मनातल्या गोष्टी सांगण्याचा एक अभिनव मार्ग दिला असला तरी तो आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखाच आहे. तो स्वीकारायचा का नाही हे ज्याच त्यानेच ठरवायचं पण दो पल कि मजा जीवनभर कि सजा होऊ शकते हा विचार करून त्यात उडी मारलेली बरी.

No comments:

Post a Comment