Wednesday 8 November 2017

Do You Have It In You?…

Do You Have It In You?… 
इंडियन आर्मी च हे वाक्य कानावर पडल कि आजही माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. आर्मी मध्ये भरती होण्याची माझ स्वप्न हे स्वप्नच राहील. पण आजही हे वाक्य कानावर पडते तेव्हा माझ्या मनात प्रश्नांचा डोंगर उभा राहतो. खरच माझ्यात ते तेज आहे का? खरच मी लायक आहे का? ह्या प्रश्नांची उत्तर मी आजही शोधतो आहे. पण लेफ्टनंट स्वाती महाडिक ह्यांच्या कडे ते होत जे तो युनिफोर्म अंगावर घालायला लागते. त्याला तुम्ही देशभक्ती म्हणा, शौर्य म्हणा किंवा धाडस म्हणा किंवा जिगर म्हणा. शब्द फिरवले तरी ते सगळच आत असावं लागते आतून जेव्हा ते पेटून बाहेर येत तेव्हाच तो मान, ती शान तुमच्या अंगावर तुम्ही घालू शकता.
कर्नल संतोष महाडिक एलाईट अश्या २१ प्यारा शुटर मध्ये ऑफिसर असलेला महाराष्ट्राचा एक वीर सुपुत्र. एका दुधवाल्याचा मुलगा ते एक आर्मी ऑफिसर असा प्रवास त्यांनी केला होता. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कुपवाडा मध्ये झालेल्या दशहतवादी हल्यात शहीद झाले. आपल्या सीमेजवळच्या जंगलात अतिरेक्यांना शोधताना डोक्यात आणि पोटात गोळी लागल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या ह्या शौर्याबद्दल भारत सरकारने गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाला त्यांना शौर्य चक्राने सन्मानित केल. हा सन्मान शांतता काळात अतुलनीय शौर्यासाठी क्रमांक दोन चा पुरस्कार समजला जातो. आपल्या दिवंगत पतीच्या अतुलनीय शौर्याचा पुरस्कार स्वीकारताना ह्या शूरवीर पत्नीच्या मनात काही वेगळच घोळत होत. आपल्या घरात टांगलेला तो रिकामा आर्मी युनिफोर्म तोच प्रश्न विचारत होता Do You Have It In You?
स्वाती महाडिक ह्यांनी त्याच उत्तर शोधलं. आपल्याला जर काही हव असेल तर तो युनिफोर्म. एका जाज्वल्य विचारांनी प्रेरित झालेली स्त्री काय करू शकते हे त्यांनी पूर्ण भारताला, जगाला दाखवून दिल. विचार येण आणि ते प्रत्यक्षात उतरवण ह्यात खूप मोठा फरक असतो. तो युनिफोर्म आपल्या अंगावर घालण्यासाठी जाव्या लागणाऱ्या अग्निदिव्याची कल्पना त्यांना होती पण कसही करून आपण तिकडे जायचच हा निर्धार त्यांनी केला. आपल्या पतीच राहिलेलं काम पूर्ण करण हीच सगळ्यात मोठी आदरांजली त्यांना होतीच पण त्याही पलीकडे देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. पुणे विद्यापीठातून पदवी धारक असलेल्या स्वाती महाडिक ह्यांनी आर्मी मध्ये भरती होण्यासाठी अर्ज केला. एका शूरवीर सैनिकाची पत्नी म्हणून आर्मी च्या कोणत्याच नियमातून त्यांना मुभा मिळाली नाही.
सगळ्यात मोठी अडचण होती वयाची. स्वाती महाडिक वय वर्ष ३८ दोन गोंडस मुलांची आई कार्तिकी १२ तर स्वराज ६. वयाच्या नियमामुळे कुठेतरी हे स्वप्न धुळीला मिळते का अस वाटायला लागल. पण त्यावेळचे भारतीय आर्मी चीफ जनरल दलबीर सिंग ह्यांच्या सांगण्यावरून त्याकाळचे डिफेन्स मिनिस्टर मनोहर पर्रीकर ह्यांनी परीक्षेला बसण्याची मुभा दिली. इकडे एक लक्षात घ्यायला हव कि वयाची फक्त अट शिथिल केली होती. परीक्षा वगळून किंवा कोणत लेटर घेऊन त्यांची शिफारीस केली नव्हती हे खूप मह्त्वाच आहे. कारण एका सामान्य सैनिकाला ज्या सगळ्या प्रक्रियान मधून जाव लागते. त्या सर्व प्रक्रियांन मधून स्वाती महाडिक ह्यांना जाव लागणार होत. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी एस.एस.बी. बोर्डाची परीक्षा पास केली. मुलाखत ते मेडिकल पास केल्यावर जे समोर होत ते कठीण होत. ११ महीन्याच लष्करी ट्रेनिंग. एका स्त्री साठी एका माउली साठी हे किती खडतर असेल ह्याची कल्पना पण करू शकत नाही. भारतीय आर्मी च हे ट्रेनिंग जगात सर्वोत्तम पेकी एक समजल जाते. ह्यावरून त्यांच्या समोर काय वाढून ठेवल आहे. ह्याची कल्पना त्यांना आली होती. आपल्या दोन्ही मुलांना बोर्डिंग शाळेत टाकण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. मुलांनीही आईच्या स्वप्नांसाठी बोर्डिंग शाळेत प्रवेश घेतला. मग सुरु झाल आपल्या शरीराच्या, मनाच्या क्षमतांना टोकाला नेणार ट्रेनिंग. जिकडे त्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा १० वर्ष लहान असणारे इतर मुल- मुली होत्या. पण मनात एकच होत तो प्रश्न Do You Have It In You?
अखेर सर्व अडथळे पूर्ण करत स्वाती महाडिक ह्यांनी चेन्नई च्या ऑफिसर ट्रेनिंग अकाडमी मधून ३३२ इतर ऑफिसर सोबत आपल्या अंगावर तोच युनिफोर्म घालत आपल्या स्वप्नांना गवसणी घातली. काल त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट ह्या पदावर रुजू करण्यात आल. पुण्याच्या ऑर्डनन्स कोर्प मध्ये ऑफिसर ह्या पदावर नियुक्ती केली गेली आहे. एकूणच त्यांचा हा प्रवास थक्क करणारा, एका स्त्री च्या क्षमताना उंचीवर नेणारा तर जिद्द, देशभक्ती, जाज्वल्य देशाभिमान ह्या पलीकडे आपल्या मनात रुंजी घालणाऱ्या त्या प्रश्नाच उत्तर देणारा होता. तो प्रश्न म्हणजे Do You Have It In You? ह्या भारतीय सैन्यातील एका शूरवीर ऑफिसर ला माझा मानाचा कडक स्याल्युट. एकच सांगतो You Have It In You.
जिकडे मोलकरणीची जात आणि एअरपोर्ट वर कोण्या एका अभिनेत्री चा पोरगा रडला म्हणून ब्रेकिंग न्यूज देऊन त्यावर खमंगपणे चर्चा फेसबुक आणि व्हात्स अप वर होत असताना ह्या माउलीचा प्रवास कोणाला दिसला पण जात नाही. हीच आपली शोकांतिका आहे. इकडे कोणी जात बघणार नाही? इकडे कोणी विचार नाही करणार त्या माउलीच्या दोन मुलांच्या रडण्याचा कारण इकडे वेळ कोणाला आहे. आम्हाला फक्त स्वातंत्र्य हव. आमची कर्तव्य पूर्ण करायला बाजूचे आहेत. आम्ही फक्त सिस्टीम बद्दल बोलणार. पंतप्रधान आणि बाकी कोणी काय करावे ह्याच्या गोष्टी करणार. एकमेकांची जात बघत त्यांना शिव्या घालणार कारण आमच्यात नाही ते न आम्हाला कधी असे प्रश्न पडतात कि खरच Do You Have It In You??

No comments:

Post a Comment