Friday 26 May 2017

ढोला सादिया (भूपेन हझारिका ) पूल... विनीत वर्तक

आज पंतप्रधानांनी ढोला सादिया ह्या भारतातील सगळ्यात लांब पुलाच उद्घाटन केल. ह्यामागे कोणाच श्रेय हा राजकारणाचा विषय बाजूला ठेवून हा पूल कसा महत्वाचा आहे. हे लक्षात घेण महत्वाच आहे. ढोला आणि सादिया ह्या दोन गावांना जोडणारा पूल खरे तर आसाम आणि अरुणाचल प्रदेश ह्या भारताच्या दोन महत्वाच्या राज्यांना जोडतो. ९.१५ किमी लांबीचा हा पूल संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. ( मुंबईतील वांद्रे- वरळी सेतूच्या लांबीपेक्षा हा ३.५५ किमी अधिक लांब आहे.)
अरुणाचल प्रदेशवर चीन नेहमी आपला हक्क सांगत आला आहे पण भारताने नेहमीच हा आपला भूभाग असल्याच म्हंटल आहे. चीन शी आपली सीमारेषा ह्या राज्यातून जुळते. तसेच हा प्रदेश भूकंप प्रवण क्षेत्रात असल्याने इकडे असे पूल बांधणे तितकच कठीण आहे. लोहित, ब्रह्मपुत्रा, दिबांग ह्या तीन नद्यांनी वेढलेला हा प्रदेश आहे. अश्या अभियांत्रिकीच्या दृष्टीने गुंतागुंतीच्या प्रदेशात सामरिक दृष्ट्रीने अतिशय महत्वाचा दुवा हा पूल ठरणार आहे.
हा पूल ५४० किमी दिसपूर जी कि आसाम ची राजधानी आहे तर ३०० किमी इटानगर जी कि अरुणाचल प्रदेश ची राजधानी आहे. तिथे वसलेला आहे. म्हणूनच दळणवळणाच्या दृष्ट्रीने हा पूल एक मैलाचा दगड ठरणार आहे. ह्याचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणाला होणार असेल तर भारतीय सैन्याला. ह्या आधी भारतीय सैन्याच्या तुकडीला ह्या भागातून बोटीतून प्रवास करावा लागत होता. सीमेवर जाणाऱ्या वाहनांना तर १० तास खर्ची घालून २५० किमी चा वळसा घालून अरुणाचल च्या सीमेवर जाव लागत होत. हे लक्षात ठेवूनच रणगाड्यांच्या वजनाला पेलेल अस ह्याच बांधकाम करण्यात आल. ह्या पुलावरून ६० टन वजनाचा रणगाडा नेला जाऊ शकतो. तसेच ह्याचे १८२ पिलर्स वर सेसमिक बफर्स लावण्यात आले आहेत. ह्यामुळे कोणत्याही आपात स्थिती ची कल्पना आधी मिळण्यास मदत होणार आहे.
ह्या पुलामुळे सीमेवर जाणऱ्या वाहनांच्या प्रवासात खूप बचत होणार आहे. भारतीय सेनेच्या वाहनांना ज्या प्रवासाला आधी दोन दिवस लागत होते तोच प्रवास आता काही तासांवर आला आहे. दररोज १० लाखांचं इंधन ह्या पुलामुळे वाचल जाणार आहे. इथे राहणाऱ्या अनेक लोकांची प्रचंड सोय ह्या पुलामुळे होणार आहे. एरवी रात्रीच्या प्रवासाठी इथे कोणताही रस्ता उपलब्ध नव्हता तसेच ब्रह्मपुत्रा आवेशात वाहत असताना हा प्रदेशाचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असायचा पण ह्या पुलामुळे सगळच बदलून जाणार आहे. लष्करी रहदारी सोबत इथली इंडस्ट्री तसेच टुरिझम हि प्रचंड वाढणार आहे. ख्यातनाम गायक भूपेन हझारिका ह्याचं जन्मगाव हे सादिया आहे. म्हणूनच ह्या पुलाला त्यांच्या स्मरणार्थ भूपेन हझारिका ह्याचं नाव देण्यात आल आहे. हे आणि असे अनेक कार्यक्रम राष्ट्राच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप महत्वाचे असतात. हे अवघड अस अभियांत्रिकी मधल एक शिखर गाठणाऱ्या सर्वाना सलाम.

No comments:

Post a Comment