Friday 26 May 2017

चेनानी – नशरी टनेल... विनीत वर्तक
गेल्या रविवारी पंतप्रधानांनी चेनानी – नशरी टनेल च उदघाटन केल. एखाद्या टनेल च्या उद्घाटनासाठी खुद्द पंतप्रधानांनी जाणच ह्या टनेल च महत्व विशद करते. जम्मू ते श्रीनगर ह्या महत्वाच्या ठीकाणानां जोडणारा हा टनेल देशासाठी खूप महत्वाचा होता. हिमालयाच्या पर्वतरांगान मधुन प्रवास करणे नेहमीच जिकरीच राहील आहे. बदलणार हवामान, गोठवणार तापमान, अचानक होणारी ढगफुटी, दरड कोसळण्याची कधीही शक्यता अश्या सगळ्या प्रतिकूल गोष्टी असताना हा मार्ग देशाच्या सुरक्षितता आणि एकूणच जनजीवनासाठी महत्वाचा होता. अश्या कठीण परिस्थितीत बोगदा किंवा टनेल बांधणे किती जिकरीच असू शकते ह्याची कल्पना आपण करू शकत नाही. कोकण रेल्वे ज्या सह्याद्रीच्या भागातून जाते. तिथल्या पेक्षा ठिसूळ दगडांनी आणि प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशात असे टनेल उभारणे अभियांत्रिकीच्या दृष्टीने एक कठीण लक्ष आहे. म्हणूनच चेनानी – नशरी टनेल च महत्व जास्ती आहे.
चेनानी – नशरी टनेल भारतातील सगळ्यात लांब रस्त्यावरील टनेल आहे. तब्बल ९.२८ किमी. लांब हा टनेल आहे. ह्या टनेलमुळे जम्मू ते श्रीनगर मधील ४१ किमी मधील अंतर आता अवघ ९.२८ किमी कमी झाल आहे. जम्मू ते श्रीनगर हा प्रवास २९३ किमी आहे. चेनानी – नशरी सारखे तब्बल १२ टनेल बांधले जात आहेत. त्यामुळे हे अंतर अवघ्या ६२ किमी इतक कमी होणार आहे. चेनानी – नशरी टनेल बांधायला तब्बल ३७२० कोटी रुपये खर्च आला आहे. १५०० अभियंते, जीओलॉजीस्ट, कामगार ह्यांच्या अथक मेह्नीतून आकाराला आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा देशातील सर्वात सुरक्षित टनेल आहे.
६००० एल.ई.डी लाईट, ११८ सी.सी.टी.व्ही क्यामरे म्हणजे प्रत्येक ७५ मीटर ला एक ह्या प्रमाणे, ११८ एस.ओ.एस. प्रत्येक १५० मीटर ला एक ह्या प्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा, स्मोक आणि हिट डिटेक्टर ह्यात ठेवले गेले आहेत. तसेच ह्या टनेल मधील रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी ऑटोम्याटिक इंटिग्रेटेड सिस्टीम बसवण्यात आली आहे. कोणत्याही गाडीच तापमान अधिक झाल्यास त्या गाडीला थांबवून तिला योग्य त्या तापमान असताना पुढे जाऊन देण्याची अशी हि यंत्रणा २४ तास X ३६५ दिवस कार्यरत असणार आहे. ह्या टनेल मधील वीज व्यवस्था हि त्रिस्तरीय ब्याक अप यंत्रणेने सपोर्ट केलेली आहे.
इतक्या लांबीच्या टनेल मध्ये हवेची योग्य ती पातळी ठेवण्यासाठी प्रत्येक १२ मीटर वर सेन्सर बसवण्यात आले आहेत. जे हवेतील कार्बन डायओक्साईड आणि कार्बन मोनोओक्साईड च प्रमाण मोजून एक्झोस्ट पंख्यांची दिशा तसेच हवेची शुद्धता मेंटेन करणार आहेत. ह्या टनेल मध्ये आपत्कालीन किंवा रहदारीच्या वेळी मार्गिका बदलण्यासाठी २९ क्रोस रोड ठेवले आहेत. तसेच एक वेगळी मार्गिका हि राखीव ठेवण्यात आली आहे.
एन.एच. ४४ ह्या महामार्गावर बनवण्यात आलेल्या ह्या टनेल मुळे तब्बल दररोज २७ लाख रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. ह्या टनेल मध्ये जी.एस.एम. नेटवर्क असणारे फोन चालू शकणार आहेत तर प्रत्येक गाडीला ९२.७ एफ.एम हे रेडीओ स्टेशन लावण बंधनकारक असणार आहे. आपत्कालीन स्थितीत ह्याच च्यानल वरून संदेश देण्यासाठी हि व्यवस्था केली गेली आहे. ज्याने कोणत्याही स्थितीत गोंधळ न होता. गाडयांच नियंत्रण करणे सोप्पे जाणार आहे. अश्या वेगवेगळ्या व्यवस्थांनी परिपूर्ण असलेला हा टनेल मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया ह्या प्रोग्राम च्या माध्यमातून बनवलेला आहे. स्वदेशी अभियंते पण जगातील एक सर्वोत्तम टनेल उभारू शकतात हा आत्मविश्वास ह्या निमित्ताने सगळ्यांनी दाखवून दिला आहे. १४ किमी लांब असणाऱ्या झोझिला टनेल ची मुहूर्तमेढ हि ह्या टनेल च्या मुळे यशामुळे रोवली गेली आहे. ह्या प्रोजेक्ट वर काम केलेल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन.

No comments:

Post a Comment