Friday 26 May 2017

अनुभवांच अनुभवण... विनीत वर्तक

माणसाची प्रगल्भता अनुभवातून समृद्ध होते अस म्हणतात. प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवून जातो आपण अस म्हणतो. पण खरच आपण अनुभवातून शिकतो का? हे शिकण म्हणजे तरी नक्की काय असते? आपल्या चुका शोधण? स्वतःला अथवा दुसऱ्यांना दोष देण कि काहीच नाही तर परिस्थितीच्या डोक्यावर त्याच खापर फोडून मोकळ होण. अगदी ते पण नसेल तर डेस्टिनी आणि देव असतातच आपल्या अनुभवांच्या शिकवणीसाठी.
अनुभवाच अनुभवण आपण कधी अनुभवतो का? आपली कोणी तरी सतत मस्करी करते किंवा सतत कोणी आपला वापर करून घेते. तर आपण त्या व्यक्तीला दोष देत रहातो. आपण आपल्या बदलान बद्दल कधी बोलत नाही. अनुभवातून आपण काय शिकतो तर त्या व्यक्तीपासून लांब रहाण किंवा ती व्यक्ती तशीच आहे असा स्वताचा समज. पण हेच नेहमी होत असेल तर आपली शिकवण तशीच रहाते. मुळात लोकांना आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करून देतो तिथेच आपण चुकत असतो. जर आपल्या प्रतिक्रिया बदलल्या नाहीत तर येणारे अनुभव कसे बदलतील? वेगळे अनुभव अनुभवण्यासाठी गोष्टीनकडे वेगळ्या रीतीने बघण्याची खूप गरज असते. फेसबुक वरच्या कमेंट नी लोक प्रचंड अपसेट होतात. मला कोणी अस बोलू कस शकते? किंवा माझ्या मुद्याला कोणी खोडूच कस शकते? असे अनेक मुद्दे आपण नकळत स्वतःच्या अंगाला चिकटवून घेत असतो. फेसबुक च्या कमेंट किंवा लिहण्याने खरच आपला स्वाभिमान इतका दुखावला का जातो? ह्या सर्वातून आलेल्या अनुभवांच अनुभवण आपण अनुभवत नाही. म्हणून त्याच त्याच चुका पुन्हा करत रहातो. शेवटी कशातच मन रमत नाही व फेसबुक पण नकोसे होते.
खऱ्या आयुष्यात हि अनेकदा माणसांचे वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात. जवळपास सगळ्याच वेळी अनुभावंची शिदोरी एकतर वाट्याला जाऊ नका अथवा गेलात तर समोरच्या च्या कलेने घ्या असच सांगत असते. परिस्थिती सगळ्याच वेळी सारखी किंवा माणस सगळ्याच वेळी सारख्या प्रतिक्रिया देतील अस नसताना आपल्या प्रतिक्रियेमुळे आपल्याला सारखेच अनुभव येत रहातात. कोणताही धंदा, व्यवसाय किंवा कोणतही काम ज्यात अनुभावंची शिदोरी जास्त तो जास्ती तालावून सुखावून निघालेला असतो अस म्हणतात. पण खरेच तस असते का? कोणी एका अनुभवातून शिकते तर कोणी अनेकदा सारखे अनुभव येऊन पण शिकत नाहीत. आपल्या चांगल्या- वाईट दोन्ही काळात आपण अनुभवातून किती स्वतःला प्रगल्भ करतो त्यावर आपला पुढला टप्पा अवलंबून असतो.
अनुभव घेण म्हणजे प्रगल्भ होण नाही. तर त्यातून आपण काय शिकलो? त्या अनुभवातून पुढे काय? काय करता आल असत? ह्या सर्वांचा एक माणूस म्हणून आपल्यावर होणारा परिणाम व त्यातून आपला प्रवास हेच तर अनुभवण असते. वयाने वाढल म्हणजे अनुभव जास्ती अस नसते. १०० वेळा अनुभवून सुद्धा माणूस त्याच प्रतिक्रिया देत असेल तर झाडावरून पडलेल्या सफरचंदा मध्ये आपल्याला नवीन अस काहीच दिसणार नाही. तो सुद्धा आपल्याला एक अनुभव देईल. पण ते का? ते कस? ह्याचा नेमक अनुभवण जगाच विज्ञान बदलवणाऱ्या एका शोधाचा उगम पण असू शकते. म्हणून अनुभवातून अनुभवण जमल कि बऱ्याच गोष्टीनकडे आपण वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या प्रकारे त्याची प्रतिक्रिया देऊ शकतो आणि काहीवेळा तर अनुभवण्या आधीच अनुभव कळून येतात.

No comments:

Post a Comment