Saturday 25 January 2020

ब्लॅक टायगर... विनीत वर्तक ©

ब्लॅक टायगर... विनीत वर्तक ©

भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात अनेक लोकांचं रक्त सांडलं आहे. आजही त्यांच्या बलिदानाची दखल घेतली जात नाही. काही मूठभर लोकांच्या बलिदानाचे मात्र सगळीकडेच गोडवे गायले जातात. पडद्यावरचे कलाकार तर सगळ्यांना दिसतात पण त्या पडद्यामागे असलेल्या लोकांचं आयुष्य मात्र नेहमीच अंधारात राहते. आज सगळीकडे प्रजासत्ताक दिवस साजरा होतो आहे. पण ह्या देशाच्या सीमांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या आणि शेजारच्या शत्रूच्या प्रत्येक हालचालींची माहिती भारताच्या सैन्य दलाला देणाऱ्या भारताच्या सर्वोत्तम गुप्तहेराला आज आपण सगळेच विसरलो आहोत. 'ब्लॅक टायगर' ह्या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला भारताच्या ( Indian Research and Analysis Wing (RAW) रॉ चा गुप्तहेर म्हणजेच रविंद्र कौशिक (नाबी अहमद शकिर पाकिस्तानी नाव )च्या बलिदानाची जाणीव आपण आजच्या दिवशी ठेवायला हवी. 

भारताच्या 'ब्लॅक टायगर' म्हणजेच रविंद्र कौशिक चा जन्म ११ एप्रिल १९५२ ला राजस्थान झाला. लहानपणापासुन रविंद्रला अभिनयाची प्रचंड आवड होती. त्याच्या ह्याच आवडीमुळे तो रॉ च्या अधिकारांच्या नजरेत आला. रॉ चा एजंट बनल्यावर त्याला अनेक खडतर प्रशिक्षणातुन जावं लागलं. रॉ ने त्याला पाकिस्तानात जाऊन तिथली माहिती भारताला पुरवण्याची जबाबदारी दिली. ह्यासाठी रविंद्र ला उर्दू शिकावी लागली. पाकिस्तानातील अनेक भागांचा अभ्यास करावा लागला. ह्याशिवाय कुराण आणि धार्मिक गोष्टी ही शिकाव्या लागल्या. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रॉ चा एजंट बनुन रविंद्र कौशिक आता नाबी अहमद शकीर बनला. भारतात त्याच्या नावाचे सर्व रेकॉर्ड रॉ ने पुसून टाकले. आता नाबी अहमद शकीर ने पाकिस्तान च्या कराची विद्यापिठात प्रवेश घेऊन वकीलाची पदवी मिळवली.

ह्या नंतर नाबी अहमद शकीर पाकिस्तान सैन्यात भरती झाला. पाकिस्तान सैन्यात यशस्वीपणे मिसळुन जाताना नाबी अहमद शकीर ने पाकिस्तान सैन्यात मेजर बनण्या पर्यंत मजल मारली. पाकिस्तानात असताना त्याने अमानत नावाच्या मुलीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी पण झाली. १९७९ ते १९८३ पर्यंत पाकिस्तानी सैन्याच्या सगळ्या हालचालींची माहिती रविंद्र कौशिक उर्फ नाबी अहमद शकीर भारताच्या रॉ ला पुरवत राहिला. त्याच्या अमुल्य माहितीमुळे भारताने पाकिस्तानचे अनेक मनसुबे मोडीत काढले. त्याच्या ह्या पराक्रमासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांनी त्याला 'ब्लॅक टायगर' ही उपाधी दिली.

१९८३ साली इनायत मसीहा नावाचा अजुन एक रॉ एजंट पाकिस्तानात गेला असताना पाकिस्तानी सैनिकांनी त्याला पकडलं व चौकशी च्या वेळी त्याने रविंद्र कौशिक चं नाव उघड केलं. पाकिस्तानी सैनिकांनी नाबी अहमद शकीर म्हणजेच रविंद्र कौशिक ला ताब्यात घेऊन त्याचा अतोनात छळ केला. १९८५ साली त्याला फाशीची शिक्षा झाली पण नंतर त्याला आजन्म कारावासात टाकण्यात आलं. जेल मधुन रविंद्र कौशिक ह्याने आपल्या पत्नीला पत्रे पाठवली होती. एका पत्रात त्याने हताश होऊन लिहिलं होतं,

"क्या भारत जैसे बडे देश मैं कुर्बानी देने वालो को यही मिलता हैं?"

भारताचा ब्लॅक टायगर २००१ साली क्षय रोग आणि हृदयाच्या रोगाने पाकिस्तान मधल्या मुलतान जेल मध्ये शहीद झाला. आज पर्यंत रविंद्र कौशिक ह्यांच कुटुंब भारत सरकारकडे त्यांच्या ह्या कामगिरीची पोचपावती मागत आहे. पण आजही पडद्या मागचा हा ब्लॅक टायगर उपेक्षित आहे. आपण विचार करू शकतो का? वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आपलं संपुर्ण अस्तित्व देशाच्या पटलावर पुसून टाकत भारताचा हा टायगर एकटाच पाकिस्तान च्या अंधारात भारतासाठी लढला. पण आपण आज त्याची साधी दखल घेऊ शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे.

आम्ही फक्त पुतळे उभारतो आणि फोटोंना फुले वाहतो. आमच्यासाठी संघर्ष फक्त आणि फक्त दिसणारे लोकं करतात. अर्थात ते ही आमचे हिरो नसतात. चित्रपटात शर्ट काढून नाचणारे आमचे आदर्श तर कोट्यावधी रुपयांचे घोटाळे करून पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या लोकांच्या आम्ही पाया पडतो. चित्रपट गृहात चित्रपटाच्या आधी सुरु होणाऱ्या राष्ट्रगानाला उभे राहायला आमचे पाय लटपटतात आणि साध्या सैनिकाला आम्ही सलाम करत नाही तर पडद्यामागच्या ब्लॅक टायगर चं कोणाला काय पडलं आहे. आज २६ जानेवारी ची सुट्टी रविवारी आली म्हणुन हळहळणारे आम्ही कुठे रविंद्र कौशिक च्या पराक्रमाची नोंद ठेवणार.

कोणाला काही वाटत असलं तरी भारताच्या सर्वोत्तम गुप्तहेराच बलिदान आजच्या दिवशी वाया जाऊ देणार नाही. आजच्या प्रजासत्ताक दिवशी भारताच्या ब्लॅक टायगर ला कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. 

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

17 comments:

  1. आम्हाला त्यांचा पत्ता द्यावा आम्ही आमच्या पद्धतीने जमेल तेवढे मदत करु
    9822599132
    उदय जगताप

    ReplyDelete
  2. Please send address & contact Number of family

    ReplyDelete
  3. त्यांच्या कुटुंबाचा पत्ता द्या.

    ReplyDelete
  4. त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे

    ReplyDelete
  5. "दिव्यत्वाची जेथे प्रचिती| तेथे कर माझे जुळती" ||
    अशा तऱ्हेची माहिती शाळा-कॉलेजातील व्हाट्सअप ग्रुप्स ्वर जरूर पाठवावी असे वाटते ..!

    ReplyDelete
  6. जय हिंद सेना

    ReplyDelete
  7. त्रिवार वंदन,त्रिवार वंदन, या मृत्युंजय वीराला 🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. जे सैनिक आजपर्यंत शहीद झालेत त्यांची शिकवण शाळेमध्ये देण्याची व्यवस्था करायलाच पाहिजे.
    आतां हयाची गरज आहे.

    ReplyDelete
  9. Tyancha number nahi mazyakade. milala tar nakki kalwen

    ReplyDelete
  10. राजस्थान सरकारकडेच याची माहिती मिळू शकेल असे वाटते

    ReplyDelete
  11. सरकार अशा गोष्टी गुप्त ठेवते़ याची जाणीव मिशन वर असणाया माणसाला असते, या वीरांना आमचे कोटी कोटीप्रणाम

    ReplyDelete
  12. सर्व वर्तमान पत्रात या शूरवीराची माहिती प्रसिद्ध केली पाहिजे,पेड न्युज वाल्याना याच काही पडलेलं नाही
    पुढील पिढीला समजण्यासाठी शाळा-कॉलेज मध्येही प्रबोधन केल पाहिजे.
    शुरा मी वंदितो....जयहिंद

    ReplyDelete
  13. अशा सर्व गोष्टींंमुळे भारताला काश्मीर प्रश्र्नात यश मिळत नाही ये जेव्हा तुम्हाला देवाची मदत अपेक्षित असते तेव्हा तुमची क्रुती स्वच्छ असावी लागते. मी सुमारे तीस पसतीस लोकांना माझे काश्मीर वरील पुस्तक स्वखर्चाने वा प्रत्यक्ष भेट घेऊन दिले वा पाठवले, पण एकानेही त्या बद्धल आभार तर जाऊ द्या पण पोहोच किंवा मतही कळवले नाही. एवढी माणसे क्रुर का वागतात हे मला आजपर्यंत कळलेलं नाही, असो .

    ReplyDelete
    Replies
    1. Sir ..would like to read ur book ... please provide details

      Delete
  14. 19:54
    अशा कामासाठी गुप्तता बाळगणे आवश्यक असल्याने या संबंधीची माहिती मिळणे खूपच अवघड असते. त्यांच्या कार्याला प्रणाम.

    ReplyDelete
  15. Raw and indian government will have

    ReplyDelete