Sunday 19 January 2020

जेम्स बॉंड ऑफ इंडिया... विनीत वर्तक ©

जेम्स बॉंड ऑफ इंडिया... विनीत वर्तक ©

पाकिस्तान हा ज्याला भारताचा जेम्स बॉंड असं म्हणतो. ज्यांच्या नुसत्या नावाने शत्रूच्या गोटात खळबळ माजते असे भारताचे जेम्स बॉंड अर्थात भारताच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित धोवाल ह्यांचा आज जन्मदिवस. त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना असं का म्हंटल जाते हे खूप कमी भारतीयांना माहित आहे. अजित धोवाल ह्याचं कार्य किती महत्वाच आहे हे त्यांची कामगिरीच सांगते. सगळीच युद्ध सैन्याने जिंकता येतं नाही. पडद्यामागची मुत्सुद्देगिरी हि तितकीच महत्वाची असते. शत्रूची बलस्थान, त्याची कमजोरी, कुठे काय बोलायचं? कुठे तोंडाची भाषा वापरायची तर कुठे हत्यारांची ह्या सर्व गोष्टीची पुरेपूर जाण असलेलं व्यक्तिमत्व आपल्या देशाचे सुरक्षा सल्लागार आहेत हे भारताच सुदैव आहे. आज ज्या सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट हल्ला  ने पाकिस्तान हादरला त्या सर्जिकल स्ट्राईकची आणि बालाकोट हवाई हल्याची रणनिती अजित धोवाल ह्यांची होती.

असं काय आहे कि त्यांच्या नावाने शत्रूच्या गोटात चिंता होते. अजित धोवाल ह्याचं पूर्ण करियर म्हणजे एक गाथा आहे. युद्ध न लढता पण त्यांनी अशी कामगिरी केली आहे कि शत्रूला पळता भुई थोडी झाली आहे. हे शत्रू भारताच्या आतले पण आहेत आणि बाहेरचे पण आहेत. प्रत्येकांना त्यांच्या शब्दात उत्तर देण्याची पद्धत अजित धोवाल ह्यांना भारताचा जेम्स बॉंड बनवते.

१) अजित धोवाल पहिले पोलीस अधिकारी आहेत ज्यांना अतुलनीय शौर्यासाठी भारताच्या शांतीकाळात देण्यात येणाऱ्या दुसऱ्या सर्वोत्तम शौर्य पुरस्कार किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे (१९८८). ह्या आधी हा पुरस्कार फक्त भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांना दिला जात होता.

२) अजित धोवाल ह्यांना भारताच्या आजवरच्या सगळ्या १५ विमान अपहरणाच्या घटना सोडवण्याचा अनुभव आहे. ह्या सगळ्या विमान अपहरण घटनांना योग्य रित्या सांभाळून भारतीय नागरिकांची सुटका करण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे.

३) भारताचे सिक्रेट एजंट म्हणून गुप्तपणे त्यांनी पाकिस्तानात ७ वर्ष वास्तव्य केलेलं आहे. पाकिस्तानात राहून त्यांच्या हालचालींची माहिती त्यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांना पुरवलेली आहे. ह्या काळात एका पाकिस्तानी व्यक्तीने त्यांना मुसलमान नसल्याच ओळखलं होतं. त्यांचे कान टोचलेले होते हे सूक्ष्म निरीक्षण त्या व्यक्तीच्या नजरेतून निसटलं नव्हतं. कारण मुसलमान लोकात कान टोचले जात नाहीत. तो स्वतः एक हिंदू होता. त्याने ओळखल्यावर अजित धोवाल ह्यांनी त्याने कसं ओळखलं हे विचारल्यावर त्याने ओळख दिली होती. आपल्या घरात त्यांना नेऊन कपाटात शंकराचा आणि दुर्गा मातेच्या लपवलेल्या प्रतिमा दाखवल्या होत्या.

४) जून २०१४ मध्ये इराक मध्ये ४६ भारतीय नर्स ची सुटका करण्यामागे अजित धोवाल ह्यांची मुत्सुद्देगिरी महत्वाची होती. जून २०१४ मधेच अजित धोवाल ह्यांच्याकडे अतिशय गुप्त मिशन (Top Secret Mission) ची जबाबदारी देण्यात आली होती. अजित धोवाल ह्यांनी इराक मध्ये गुप्तपणे जाऊन इराक सरकारच्या अतिशय वरच्या स्थानावर असणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून ह्या नर्स च्या सुटकेसाठी खुप प्रयत्न केले होते.

५) अजित धोवाल हे पोलीस मेडल सगळ्यात कमी कालावधीत मिळवणारे पोलीस अधिकारी आहेत. हा बहुमान त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी अवघ्या ६ वर्षात देण्यात आला जेव्हा कि ह्या पुरस्कारासाठी १७ वर्ष सेवेची अट असते.

६) नॉर्थ इस्ट मधे शांतता प्रस्थापित करण्यात फिल्ड एजंट म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. इथल्या लालडेंगा ह्या अतिरेकी संघटनेच्या ७ पेकी ६ कमांडर ना मारण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. ह्या नंतर ह्या संघटनेच्या प्रमुखाने शांती करार केला होता.

७) सुवर्ण मंदिरात खलिस्तानी प्रमुख लपले असताना त्यांच्या प्रमुखाला एक रिक्षावाला आपल्या परिसरात नवीन वाटला. अनेक दिवस त्याच्यावर पाळत ठेवल्यावर त्याला चौकशीसाठी पकडण्यात आलं. पकडल्यावर त्याने आपण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय.एस.आय. चे एजंट असल्याच सांगितल. आपल्याला पाकिस्तानी संघटनेच्या बॉस ने खलिस्तान ची मदत करण्यासाठी पाठवलं असल्याच त्यांने सांगितलं आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात तो यशस्वी झाला. ऑपरेशन ब्ल्याक थंडर च्या दोन दिवस आधी तो रिक्षा चालक सुवर्ण मंदिरात जाऊन आतमध्ये असलेल्या अतिरेक्यांची खडानखडा माहिती घेऊन आला ज्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी झालं. तो रिक्षा चालक म्हणजेच अजित धोवाल.

८) म्यानमार इकडे आर्मी चीफ सोबत सैनिकी ऑपरेशन करताना त्यांनी ५० पेक्षा जास्ती अतिरेक्यांना कंठस्थान घातलं होतं. सप्टेंबर २०१६ च्या भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईक मागे अजित धोवाल ह्याचं डोक होतं. डोकलाम विवादात चीन च्या सैन्याला संयमी पण त्याच वेळी ताकदीने उत्तर देऊन हा प्रश्न चर्चेने सोडवण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती.

९) १९९६ मध्ये जम्मु काश्मीर मध्ये शांततेने निवडणुक पार पाडण्यात त्यांची मोलाची भुमिका होती.

१०) ५ ऑगस्ट २०१९ ला जम्मु काश्मीर चा विशेष दर्जा काढुन त्याला भारताचं अविभाज्य भाग बनवण्याच्या ऐतिहासिक निर्णयात मोलाची भुमिका अजित धोवाल ह्यांची आहे. पडद्यामागुन ह्या निर्णया नंतर तिथली परीस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या मागे अजित धोवाल ह्यांच डोकं आहे.

११) पाकीस्तान ने पकडलेल्या भारताच्या वायु दलाचा पराक्रमी पायलट अभिमन्यु वर्धमान ह्याला कोणत्याही अटीसह सोडवुन आणण्यात अजित धोवाल ह्यांचा हात आहे. सतत अणुबॉम्ब ची धमकी देणाऱ्या पाकीस्तान वर भारताने ब्राह्मोस रोखताना आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरीकेचे सुरक्षा सल्लागार, सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारताचे इतर मित्र देश ज्यात ब्रिटन, रशिया, इस्राईल, फ्रांस ह्या सह आखाती देश ज्यात सौदी अरेबिया, यु.ए.ई. ह्यांना भारताची आक्रमक भुमिका विशद करून होणाऱ्या परीणामांची जबाबदारी पाकीस्तान वर असेल हे भारताने ठणकावून सांगितल्यावर अमेरीकेच्या आणि इतर देशांच्या दबावाखाली पाकीस्तान ला अभिमन्यु वर्धमान ह्याला सोडण्याशिवाय कोणता पर्याय शिल्लक राहीलेला नव्हता. आंतरराष्ट्रीय मुसुद्देगिरीत भारताचं नाणं खणखणीत ठेवण्यात अजित धोवाल ह्यांचा मोलाचा वाटा होता. 

अजित धोवाल ह्यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगताना सांगितलेलं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे.

“ तुम्ही परत एकदा मुंबईसारखा हल्ला केलात तर बलुचीस्तान तुमच्या हातातून गेलचं म्हणून समजा”

“You do one more Mumbai, You lose Balochistan”

हे वाक्य बोलण्याची हिंमत आणि त्या शब्दांमध्ये असलेला सूचक इशारा हा पाकिस्तान सारख्या मुर्दाड देशाला आणि तिथल्या अतिरेक्यांना दोन वेळा विचार करण्यास अजून पर्यंत भाग पाडत आहे ह्यात सगळं आलं.

आज भारताच्या ह्या जेम्स बॉंड चा जन्मदिवस आहे. त्यांच्या कार्यापुढे एक भारतीय म्हणून नतमस्तक आणि त्यांची अशीच सेवा भारताला ह्या पुढे सुरक्षित ठेवेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

5 comments:

  1. भारतीय जेम्स बाँड अजित डोवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  2. प्रिय अजित डोवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂🎂🎂💐💐💐💐

    ReplyDelete
  3. अजित केळकर .👍👍👍

    ReplyDelete
  4. हा लेख माझ्या मूल्य शिक्षणाला वाहिलेल्या साप्ताहिक श्रीमत दर्शन मध्ये वापरायची परवानगी द्याल का?

    ReplyDelete