Sunday 25 April 2021

वळवाचं प्रेम... विनीत वर्तक ©

 वळवाचं प्रेम... विनीत वर्तक ©

एका संध्याकाळी आकाश निरभ्र असताना अचानक मळभ भरून येते आणि मग हळूहळू काळोख होतो. इतका वेळ शांत असणारं सगळं काही अचानक आपला सूर बदलतं. आकाश काळ्या ढगांनी भरून जातं. वाऱ्याचा जोर वाढतो. अचानक निसर्ग कूस बदलून एका वेगळ्या रंगात येतो. वारा आता सरळ न वाहता चक्राकार वहायला लागतो. धुळीची छोटे भोवरे अचानक निसर्गाच्या ह्या उधाणात पिंगा घालू लागतात. आकाशाच्या त्या काळ्या नभातून मग विजेचा खेळ सुरु होतो. कडाडणारा आवाज आणि चिरत जाणारा प्रकाश दोन्ही वातावरणात एक भय निर्माण करतात आणि काही क्षणात जलधारा कोसळतात ते त्या जमिनीला तृप्त करण्यासाठीच. त्यांचा आवेग वाढत जातो. क्षणाक्षणाला आधी छोटे वाटणारे थेंब टपोरे होतात आणि मग त्याचं रुपांतर होते ते गारांमध्ये. अचानक गरम असलेल्या वातावरणात त्या गारांचा पसारा निसर्गाचा पूर्ण रंग एका क्षणात बदलवून टाकतो. सगळीकडे पांढरी चादर ओढली जात आहे असं वाटतानाच अचानक सगळं थांबतं. पाऊस, हवा सगळं एका क्षणात शांत होतं. तो आवेग कुठेतरी संपून जातो. काळ्या नभांनी भरलेलं ते आकाश पुन्हा एकदा निरभ्र होतं. आकाशात ते काळे मेघ पुढे जात असताना आपल्याला काही देऊन जाताना आपल्यातलं जणूकाही घेऊन जातात आहेत असा भास होतो. निसर्गात होणारा काही क्षणांचा बदल पण तो त्या धरणीचं रूपच बदलवून जातो.
आयुष्यात एका अनोळख्या वळणावर येणारं प्रेम पण असचं असतं नाही का? आपलं सगळं आयुष्य सुरळीत सुरु असते. काही कमी नसते. पण अचानक काही नसताना ती व्यक्ती समोर येते. कूस बदललेल्या निसर्गासारखी.... शांत असलेलं मन मग कुठेतरी अशांत होतं. काहीतरी वेगळं होते आहे ह्याची जाणीव होई पर्यंत हातातून काहीतरी निसटलेलं असतं. पण ते सगळंच आवडत असतं. क्षणभर भीती तर वाटतेच ,आपल्याला वाटणाऱ्या भावना जेव्हा आपल्या आयुष्याच्या चौकटीत बसवण्याचा विचार करतो तेव्हा चुकल्यासारखं वाटतंच पण ती ओढ तरी हवीहवीशी वाटते. हे सगळं चालू असताना अचानक जेव्हा भावना शब्द घेऊन बाहेर येतात तेव्हा त्यात धुंद होण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. अगदी काही क्षण असेच बेधुंद करणारे असतात त्या गारांप्रमाणे... सगळीकडे जशी पांढरी चादर पसरते अगदी ,अगदी तसंच त्या क्षणांच्या आठवणीत आपण सगळंच विसरून जातो..
कुठेतरी काहीतरी आपल्याला ओढत असते. सगळी बंधनं तोडून टाकण्यासाठी. हेच ते जे मला हवं होतं, हीच ती व्यक्ती जिच्यामुळे मी संपूर्ण होतो. असं वाटत असताना अचानक सगळं थांबतं. तीच काही क्षण सर्वस्व वाटणारी व्यक्ती दूर जाते. कारण काही असो पण ते जाणं मनाला चटका लावून जातं. जाणारे मेघ जसे जाताना मागे वळून बघत नाही, तसेच ती व्यक्ती पण मागे वळून बघत नाही. येताना रिकामी आलेली व्यक्ती जाताना मात्र आपल्यातलं खूप काही घेऊन जाते. पण त्या सोबत खूप काही देऊनही जाते. भकास असलेलं आयुष्य अचानक त्या वळवाच्या पावसात नाहून निघालेल्या मातीसारखं सुंदर होते. त्याचा सुगंध पूर्ण आसमंतात दरवळायला लागतो. त्यात अनेक नवीन गोष्टींचे अंकुर फुटतात. पावसाचा शिडकावा झाल्यावर नकोशी वाटणारी जमीन आता सुंदर वाटायला लागते.
आपल्या बाबतीत ही तेच होते नाही का? ज्यांची कधी नजर पण आपल्यावर पडत नव्हती त्यांना आपल्यात झालेले बदल सुखावणारे असतात. अचानक काय झालं, ह्याची जाणीव जशी जमिनीला होतं नाही तशी आपल्याला काय झालं हे आपलं आपल्यालाच माहित असतं.
वळवाचा पाऊस जसा अनेक प्रश्न निर्माण करून पुढे जातो; तशी अनेक उत्तरे ही देऊन जातो.पाण्याला तरसलेल्या जमिनीला हा वळवाचा पाऊस जसं एक वेगळंच आयुष्य देतो तसचं वळवाचं प्रेम...अचानक आयुष्याच्या वाटेवर ते कधी कोणाकडून मिळेल काही माहित नसते. अचानक कोण कसं आपल्या आयुष्यात प्रवेश करतं हेच आपल्याला कळत नाही. जोवर कळायला लागतं तोवर ते निघून पण गेलेलं असतं एका असीम आनंदाचा शिडकावा करून, ज्याचा सुगंध येणारे कित्येक क्षण आपल्याला आपल्या आतच भिजवत राहतो. जाताना खूप सारे प्रश्न निर्माण करून जाणार हे प्रेम अनेक उत्तर ही देऊन जातं.
आयुष्य म्हणजे गणित नाही. सगळचं जमा खर्चात बसवता येतं नाही. कोण कशासाठी आपल्या आयुष्यात येतं? किती काळासाठी? आणि का? ह्याची उत्तर कधीच मिळत नाही. फक्त मिळतात ते वळवाच्या पावसाचे क्षण जे आपल्या मनाच्या कुपीत फक्त वेचायचे, त्या पडलेल्या गारांसारखे ! कारण, पुन्हा कधी वळवाचा पाऊस येईल हे न निसर्गाला माहीत असतं न आपल्याला...

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

2 comments: