Monday 3 February 2020

काळ्या मातीचं सोनं करणारे परीस सरपंच पद्मश्री पोपटराव पवार... विनीत वर्तक ©

काळ्या मातीचं सोनं करणारे परीस सरपंच पद्मश्री पोपटराव पवार... विनीत वर्तक ©

१९७२ ला महाराष्ट्रात दुष्काळ पडला. ह्या दुष्काळाचा फटका सगळ्यात जास्ती बसला तो अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाला. दुष्कळाने गावाची परिस्थिती पूर्णपणे खालावली. गावातील सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या. सगळी पिकं नष्ट झाली. उत्पादनाचं अजून कोणतं साधन नसलेल्या गावात लोकांना नैराश्य आलं. सगळीकडे दारूचं व्यसन पसरलं. गावातील जवळपास  ९०% लोकांनी गावाला रामराम केला. अश्या बिकट परिस्थिती मध्ये गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाचा चेहरा बदलवायचा निर्णय घेतला. १९८९ ला त्यांनी ह्याच नेतृत्व त्यांनी सोपवलं एका तरुण सरपंचाकडे त्यांचं नाव होतं 'पोपटराव बागुजी पवार'.

छोट्या छोट्या मदतीसाठी मुंबई आणि दिल्लीची वाट बघून चालणार नाही. जे काही करायचं ते आपल्याला करायचं आहे हे पोपटराव पवार ओळखून होते. सरपंच झाल्या झाल्या पहिला निर्णय होता तो म्हणजे दारू आणि सिगरेट बंदीचा. गावातील सगळीच्या सगळी दारूची दुकाने त्यांनी पूर्णपणे बंद केली. त्या पाठोपाठ गावाच्या हद्दीत सिगरेट अथवा दारू पिण्यावर पूर्णपणे बंदी आणली. हिवरे बाजार गाव ज्या भागात आहे तिकडे वर्षोनुवर्षे पावसाचं प्रमाण वर्षाला १५ इंच इतकं तुटपुंज आहे. त्यामुळे दुष्काळासाठी दरवेळेला निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. गावातील पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर 'पाणी अडवा पाणी जिरवा' हे त्यांनी ओळखलं. महाराष्ट्र सरकारकडून कर्ज काढून पावसात वाहणाऱ्या पाण्याचा अभ्यास करून त्यांनी गावात ३२ दगडाचे आणि ५२ मातीचे बंधारे बांधले. योग्य ठिकाणी पाणी साठवणाऱ्या टाक्या बांधल्या.  त्या सोबत गावातील सर्व लोकांना पाणी कसं वाचवायचं त्याचा अपव्यय कसा थांबवायचा ह्याच शिक्षण दिलं. इतकं करून पोपटराव पवार थांबले नाहीत तर पूर्ण गावात त्यांनी लाखो वृक्षाची लागवड आणि त्याच संगोपन करण्याचं काम सुरु केलं.

पोपटराव पवार ह्यांनी घेतलेल्या मेहनतीची फळ काही वर्षात दिसायला लागली. गावाने केलेल्या 'पाणी अडवा पाणी जिरवा' कामामुळे गावातील जमिनीत पाण्याची पातळी कमालीची वाढली. १९९० ला ९० कोरड्या विहिरी असणाऱ्या गावात आज ३०० पेक्षा जास्त विहारी पाण्याने भरलेल्या आहेत. पोपटराव पवार ह्यांनी काळ्या मातीत उसाच्या आणि केळीच्या शेतीवर बंधन आणली. ह्या दोघांच्या शेतीसाठी पाण्याची खूप गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी आपल्या जमिनीतून कमी पाण्यात नाविन्यपूर्ण उत्त्पन्न घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रेरीत केलं. गाई- म्हशी च्या दुधाच्या जोरावर त्यांनी शेतकऱ्यांना श्रीमंत केलं. ज्या गावातून लोकं पळून गेली होती ती परत आली. एकेकाळी गरीबी रेषेच्या खाली १८२ पैकी १६८ कुटुंब असणाऱ्या गावात आज फक्त ३ कुटुंब गरीबी रेषेच्या खाली आहेत तर ६० लोकं लक्षाधीश आहेत. ह्या यशाच्या मागे पोपटराव पवार ह्यांच व्हिजन तर गावाने ह्याच व्हिजन ला आपलं मिशन मानून त्यावर केलेलं काम कारणीभूत आहेत. हिवरे बाजार गावाचं १९९५ ला दरडोई उत्पन्न ८०० रुपये होतं ते आज ३०,००० रुपयांपेक्षा जास्ती आहे.

पोपटराव पवार ह्यांनी गावातील सगळ्याचं आयुष्य नुसतं समृद्ध नाही केलं तर पूर्ण गावाचा कायापालट केला. सरपंच बनल्यावर त्यांनी स्वच्छतेचा विडा उचलताना सगळीकडे स्वच्छतागृह बांधली. प्रत्येक घरात संडास बांधून दिलं. प्रत्येक घरात बायोगॅस वापरणं अनिवार्य केलं. सगळ्या लोकांना शिक्षणाची व्यवस्था केली. शाळेत पुतळे उभारण्यापेक्षा त्याच पैश्यात त्यांनी शाळेचा दर्जा वाढवला आणि मुलांसाठी लागणारी शालेय साधनं उच्च दर्जाची केली. ह्याचा थेट परीणाम म्हणजे आज हिवरे बाजार गावातील ६०% पेक्षा जास्ती मुलं मेडिकल चं शिक्षण घेतं आहेत. आज हिवरे बाजार गावात बाहेरच्या गावातून मुलं शिक्षणासाठी येतं आहेत. त्यांच्याकडून पैसा न घेता एका कागदावर लिहून घेतलं जाते की शिकल्यावर त्यांनी गावात राहून सेवा करायची. पोपटराव पवार इथेच थांबले नाहीत तर लग्नाआधी एच.आय.व्ही. / एड्स चाचणी त्यांनी गावातील लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला अनिवार्य केली.

“Show me one mosquito in Hiware Bazar and I will give you Rs 100."

आज अभिमानाने पोपटराव पवार जेव्हा असं सांगतात तेव्हा त्यामागे गेल्या ३० वर्षाची त्यांची दूरदृष्टी आणि गावातील लोकांची प्रामाणिक मेहनत, त्यांच्या स्वप्नावर ठेवलेला विश्वास कारणीभूत आहे. हिवरे बाजार आज नुसत्या भारतात नाही तर पूर्ण जगात प्रसिद्ध झालं आहे. तब्बल २१ देशातील अनेक मान्यवर संस्था आणि इतर लोकांनी ह्या गावाला भेट दिली आहे. हिवरे बाजार गावाचं मॉडेल आज देशासाठी एक अभिमानाची गोष्ट झाली आहे. हिवरे बाजार च्या ह्या कायापलटात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या सरपंच पोपटराव पवार ह्यांच्या कामगिरीला सलाम करताना भारत सरकारने त्यांचा २०२० सालच्या पद्मश्री सन्मानाने गौरव केला आहे. हिवरे बाजार चं आदर्श मॉडेल हे दुसऱ्या गावात निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांची नेमणूक Executive Director of Maharashtra state government’s Model Village programme वर केली आहे.

एकेकाळी दुष्काळात होरपळणाऱ्या, अडी-अडचणी नी ग्रासलेल्या गावाला एक नवी उभारी देताना गावातील लोकांसोबत गावातील निसर्ग, स्वच्छता राखताना  तसेच वाईट प्रवृत्तीचा नायनाट करून संपूर्ण गावाला एका नव्या उंचीवर नेऊन पूर्ण जगात 'हिवरे बाजार' हा मापदंड तयार करणाऱ्या पोपटराव पवार ह्यांना माझा सॅल्यूट. पोपटराव पवार ह्यांचा सन्मान केल्यामुळे आज पद्मश्री सन्मानाची शोभा वाढली आहे. त्यांना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment