Friday 7 February 2020

दोन स्पेशल... विनीत वर्तक ©

दोन स्पेशल... विनीत वर्तक ©

दूरचित्र वाहिनी वरचे कार्यक्रम बघण्याचा योग तसा मला कमीच येतो. पण जेव्हा कधी बघतो तेव्हा काहीतरी आनंद आणि समाधान देणारे कार्यक्रम. काल अश्याच एका कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कलर्स मराठी वाहिनी वरचा 'दोन स्पेशल' हा कार्यक्रम खूप काही देऊन गेला. मला आवडणारे दोन प्रसिद्ध कलाकार. अभिनयाच्या उंचीपेक्षा माणूस म्हणून त्यांची उंची मला नेहमीच आवडत आलेली आहे. त्यांचे चित्रपट, नाटके किती प्रसिद्ध आणि किती पैसे कमावतात ह्यापेक्षा अभिनयाचा उच्च दर्जा, त्याच टायमिंग आणि त्याला वास्तवतेची जोड अश्या काही गुणांमुळे आवडत असणारे दोन स्पेशल कलाकार कालच्या आणि त्या आधीच्या भागात आले होते. ते म्हणजे मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे. 

ह्या दोन्ही कलावंताचा प्रवास त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे एक पर्वणी. कोणताही गॉडफादर चित्रपट सृष्टीत नसताना आपलं नाव चित्रपट सृष्टीत आणणं  ते प्रसिद्धीच्या टोकावर असताना सुद्धा आपल्या मातीशी पाय घट्टपणे रोवून उभं राहणं हे दोघांकडून पण शिकण्यासारखं आहे. कदाचित ह्याच रहस्य त्यांनी ह्या शिखरावर येण्यासाठी केलेल्या मेहनतीत असेल. अगदी घरची परिस्थिती बेताची आणि खिशात पैसे नसताना आपल्या अभिनयाच्या जोरावर झगडत ह्या दोघांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यासाठी अगदी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म झोपणं असो किंवा नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर आपली रात्र काढणं असो. आयुष्याच्या दोन्ही टोकांना अनुभवलेले हे अभिनेते रुपेरी पडद्यावर काम करूनपण आजही आयुष्याच्या खऱ्या प्रवासाशी नाळ बांधून आहेत. त्यामुळेच कालच्या कार्यक्रमात त्यांचा प्रत्येक शब्द, अनुभव सगळच कुठेतरी आतून येतं होतं आणि ते आतून येतं होतं म्हणून आतवर रुजत होतं.

एका क्षणी बेभान होऊन हसत असताना दुसऱ्या क्षणाला डोळ्यांच्या पापण्या ओल्या होण्याचा अनुभव हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाने अनुभवला असेल. त्यामुळेच हे कलाकार म्हणून जितके मोठे आहेत त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून जास्ती मोठे आहेत. कारण एकाचवेळी आसू आणि हसू प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर यायला त्या गोष्टी कुठेतरी खूप आतवर जाव्या लागतात. समाजात एक विशिष्ठ उंची गाठल्यावर पण आपल्या त्या दिवसांना न विसरता ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्याला परत काहीतरी देण्याचा उदात्त विचारच त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची उंची दाखवतो. नुसत्या विचारांवर न थांबता त्याची सुरवात अगदी स्वतःपासून करून पूर्ण समाजाला त्यात सामील करून घेण्यासाठी चाललेला त्यांचा प्रयत्न आदर्श म्हणून घ्यावा असाच आहे. नाम फौंडेशन असो वा सयाजी शिंदे ह्यांची वृक्ष बँक. त्यांच्या प्रत्येक शब्दात ह्या कामासाठी असलेली तळमळ दिसत होती. कुठेतरी हे काम आतून आलेलं आहे म्हणून आज त्याला कोणत्याही स्पॉन्सर शिवाय प्रसिद्धी आणि समाजाचा हात मिळत आहे.

रुपेरी पडद्यावर असो वा सामाजिक जीवनात इतकं सगळं काम करत असताना पण घरच्या लोकांशी त्यांच जोडलेलं असणं पण काल निशब्द करून गेलं. आपल्या आईचा फोटो बघताना भावनिक झालेले सयाजी शिंदे बघताना काल माझ्या डोळ्यांच्या पापण्या कधी ओल्या झाल्या माझं मलाच कळलं नाही. कारण ते दिसण्यासाठी नव्हतं जे काही होतं ते खरं होतं म्हणून ते सरळ आत गेलं आणि मेंदूने विचार करायच्या आगोदर डोळ्यांना ते कळलं होतं. धरणावर एक कारकून म्हणून काम करणारे सयाजी शिंदे आणि फोटो नाहीत म्हणून चित्रपटासाठी फोटोची झेरॉक्स पाठवणारे मकरंद अनासपुरे ह्यांच्या प्रवासाने मला निशब्द तर केलच पण आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिला.

ह्या सगळ्या प्रवासात आलेल्या अनुभवांनी ह्या दोघांचं आयुष्य किती समृद्ध केलं असेल ह्याचा विचार मनात डोकावला. घरातील तीन लोकांनी आत्महत्या केली म्हणून नाम फौंडेशन ने एका शाळेतल्या विद्यार्थिनी ला केलेली मदत तिने हुंडा हवा म्हणून लग्न होऊ न शकलेल्या मुलींसाठी द्यावी ह्या अनुभवाने मला पण काहीकाळ निशब्द केलं. खारीचा वाटा उचलून खूप काही केलं अश्या अविर्भावात माझ्यासह अनेकजण असतात. पैसे दिले म्हणजे खूप काही आपण समाजासाठी केलं अशी भावना अनेकदा मनात येते पण असे काही अनुभव ऐकले की आपण किती खुजे आहोत हे आरश्यात दिसून येते.

कालचा दोन स्पेशल खरच माझ्यासाठी खूप स्पेशल होता. एक माणूस म्हणून त्या दोघांकडून खूप काही हाताशी लागलं. त्यांच्या इतकी मोठी चळवळ उभी करण्या इतपत मी मोठा नसलो तरी त्यांचा आदर्श मला नक्कीच प्रेरणा देतं राहील. मोठं असून पण मोठेपणाचा लवलेश नसलेल्या ह्या दोन स्पेशल कलाकारांना माझा कडक सॅल्यूट. सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे ह्यांनी जितेंद्र जोशी च्या दोन स्पेशल ला नुसतं स्पेशल नाही केलं तर अविस्मरणीय केलं.

फोटो स्रोत :- गुगल

2 comments: