Thursday 27 February 2020

मुंबई लोकल... विनीत वर्तक ©

मुंबई लोकल... विनीत वर्तक ©

अनेकांसाठी सात बारा चा अर्थ जमिनीशी संबंधित असला तरी मुंबईकरांच्या दृष्टीने सात बारा ला एक वेगळं स्थान आहे. ते स्थान म्हणजे मुंबई लोकलची वेळ.  मुंबईकरांच्या धमन्या म्हणजेच 'मुंबई लोकल'. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या प्रत्येक मुंबईकराच मिशन असते म्हणजे लोकल मध्ये जागा मिळवणं. जागा मिळाली नाही तरी निदान लोकल मध्ये शिरायला मिळालं तरी प्रत्येक मुंबईकराच्या मानाने ते मिशन इम्पॉसिबल सफल झालं असच असते. हे मिशन एका दिवसासाठी किंवा एका वेळेसाठी नसते तर जेव्हा जेव्हा मुंबईकर किंवा मुंबईत आलेला प्रत्येकजण लोकल ने जाण्याचा विचार करतो तेव्हा ते एखाद्या युद्धापेक्षा कमी नसते. हे असं का हे जाणून घेण्यासाठी एकदा मुंबई लोकल चा प्रवास करायला हवा किंवा त्याची माहिती तरी जाणून घ्यायला हवी.

१)  मुंबई लोकल ची लांबी जवळपास ४०० किलोमीटर आहे. (मुंबई-पुणे-मुंबई अश्या प्रवासापेक्षा ही जास्ती). ह्यावर रोज २३४२ पेक्षा जास्ती ट्रेन धावतात. प्रत्येक दोन ते तीन मिनिटाला एक ट्रेन स्टेशन वर येत असताना रोज जवळपास ७.५ मिलियन लोक (७५,०००,००) मुंबई लोकल ने दररोज प्रवास करतात . ह्याचा अर्थ जगातील १३० देशांची पूर्ण लोकसंख्या एकट्या मुंबई लोकल ने प्रत्येक दिवशी प्रवास करते. एका वर्षात मुंबई लोकल ने जवळपास २.३ बिलियन लोकं प्रवास करतात. जगाच्या पूर्ण लोकसंख्येच्या १/३ लोक एका वर्षात मुंबई लोकल ने प्रवास करण्याइतपत आकडा मोठा आहे.

२) रोज ७.५ मिलियन प्रवाशांची ने आण करणाऱ्या मुंबई लोकल वर पडणारा भार  ठरवलेल्या व्याख्येच्या असल्याने त्याला 'सुपर डेन्स क्रश लोड' असं नावं ठेवण्यात आलेलं आहे. २००० लोकांची ने आण करण्याची क्षमता असलेल्या मुंबई लोकल मधून जवळपास ५००० पेक्षा जास्ती लोक प्रवास करतात. एका स्क्वेअर मीटर मध्ये जवळपास १५-१७ लोक प्रवास करतात. ( आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार साधारण ६ लोक १ स्क्वेअर मीटर मध्ये प्रवास करणं हे सगळ्यात जास्ती समजलं जाते. ६ पेक्षा जास्ती लोक असल्यास त्याला क्रश लोड म्हणतात. ) त्या मापदंडातून मुंबई लोकल ने प्रवास करण्याऱ्या लोकांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे आहे. म्हणूनच गर्दीच्या वेळी विरार ट्रेन किंवा कल्याण ट्रेन मध्ये चढायला मिळणं हे आय.आय.टी आणि आय.आय. एम. मध्ये प्रवेश घेण्यापेक्षा जास्ती कठीण आहे.

३) मुंबई लोकल किंवा मुंबई रेल्वे जगातील सगळ्यात व्यस्त रेल्वे व्यवस्था आहे. २४ तासात मुंबईची लाईफ लाईन फक्त ९० मिनिटे विश्रांती घेते.

४) मुंबई लोकल जगातील सगळ्यात स्वस्त रेल्वे प्रणाली मधील एक आहे. अवघ्या ३० रुपयात प्रवाशी १२० किलोमीटर चा प्रवास करू शकतात.

५) बॉम्बस्फोट आणि अतिरेकी सुद्धा मुंबई लोकल ला थांबवू शकले नाहीत. गरज म्हणा वा लाचारी पण मुंबई लोकल ह्या घटनेनंतर अवघ्या १६ तासात पूर्ण क्षमतेने काम करत होती.

गर्दीने भरलेल्या मुंबई लोकल मध्ये चौथ्या सीटवर बसायला मिळेल ह्याची स्वप्न बघणारा मुंबईकर रिकाम्या लोकल मध्ये मात्र उभं राहून प्रवास करतो. ठरलेला डब्बा आणि ठरलेली जागा पकडण्यासाठी कधी कधी ट्रेन सोडणारा मुंबईकर व्हिडीओ कोच मधून अर्ध्या डब्यात नजर मात्र कटाक्षाने ठेवतो. (व्हिडीओ कोच
 हा काय प्रकार काय हे अस्सल मुंबईकराला चांगलच माहित आहे. ). कोणत्या स्टेशनचा कोणता प्लॅटफॉर्म कोणत्या बाजूला येईल ह्याच गणित करणारा मुंबईकर गणित चुकल्यावर सगळ्यात जास्ती आपटतो. प्लॅटफॉर्म वर येणाऱ्या मुंबई लोकलला हळू करण्यासाठी हात दाखवणारा फक्त मुंबई लोकलचा प्रवासी असतो.

एक दिवस मुंबई लोकल बंद झाली तर पूर्ण मुंबई थांबते हे पूर्ण जगाला माहित आहे. पाऊस आला काय गेला काय मुंबई लोकल थांबून का होईना धावत असते.  मुंबई लोकल ही मुंबईकरांची संस्कृती आहे. जिकडे श्रीमंत- गरीब, जात- पात, धर्म- पंथ अशी सगळी लक्तरं बाजूला ठेवावी लागतात. जेव्हा आपण त्या संस्कृतीचा होतो तेव्हा मुंबई लोकल सगळ्यांना सामावून घेते आणि एक आपल्याला हवा असलेला प्रवास घडवते.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment