Tuesday 6 July 2021

एक छोटी सी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©

 एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©


काही गाठी त्यानेच बांधलेल्या असतात. काळ, वेळ, परिस्थिती कशीही आली तरी त्या टिकून राहतात. अजरामर होतात. कोणीतरी असं आपल्या आयुष्यात असणं आणि आपण कोणाच्या तरी आयुष्याचा असा भाग असणं म्हणजे परमभाग्य. खूप कमी जणांच्या वाट्याला ते येतं आणि खूप कमी जण असं जगू शकतात. बॉलिवूड किंवा हॉलिवूडमधल्या प्रेमकथा चिल्लर वाटतील, अशी एक छोटीसी लव्ह स्टोरी आजही खऱ्या आयुष्यात जगणारे ते दोघे आहेत. प्रेम म्हणजे काय? प्रेमात त्याग काय असतो? प्रेमात जगणं म्हणजे काय? प्रेमात साथ-सोबत करणं काय असतं? अश्या सर्व गोष्टींना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारी ही "छोटी सी लव्ह स्टोरी". 

१९९५ चं वर्षं होतं. पंजाब विद्यापीठात एक तरुण मुलगा आणि मुलगी इंग्रजी विषयातून एम.ए. करत होते. एकत्र शिकत असताना त्यांच्यात गाठीभेटी सुरू झाल्या आणि त्या कोवळ्या वयात प्रेमाचे धुमारे फुटले. तो तरुण ध्येयवेडा होता. देशप्रेम त्याच्यात ठासून भरलं होतं. देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा तो तिला नेहमीच  सांगायचा आणि ती सुद्धा त्याला त्याच ताकदीने आत्मविश्वास द्यायची. १९९६ साल उजाडलं आणि त्याच्या स्वप्नांना पंख मिळाले. इंडियन मिलिट्री एकेडमी, डेहराडून  इकडे त्याची भारतीय सेनेत वर्णी लागली. त्याचं पहिलं प्रेम तिला माहीत होतंच, त्यामुळे तिने कधीच त्याला विरोध केला नाही. उलट ज्या दिवशी त्याला ही बातमी कळली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ना तो आपलं शिक्षण पूर्ण करू शकला न तिने पुढे आपलं शिक्षण पूर्ण केलं. जणूकाही त्यानेच त्या दोघांची भेट घडवून आणण्यासाठी त्या विद्यापीठाची निवड केली असावी. कारण शिक्षण अपूर्ण राहिलं तरी त्यांचं प्रेम आणि सोबत जोडली गेली ती कायमची. 

तो डेहराडून आणि ती चंदीगढला. अंतर वाढलेलं होतं, पण त्याचसोबत प्रेमसुद्धा. अंतराची लांबी त्यांचं प्रेमसुद्धा वाढवून गेली. जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा तो तिला भेटायला यायचा. चंडीगढ इथल्या मंदिरात आणि गुरुद्वारामध्ये ते दोघे भेटायचे. देवाचं दर्शन घेऊन मंदिराची परिक्रमा झाल्यावर एकदा तो तिला म्हणाला, ''झाले की चार फेरे, आता तू माझी झालीस". ती त्याच क्षणी थबकली. घरातून लग्नाचा दबाव तिच्यावर वाढत होता. त्यांच्या भेटीमधे ती नेहमीच तो विषय त्याच्याकडे बोलायची. तो एकदा तिला म्हणाला, 

"तुला जे आवडते ते कर, नाहीतर दुसऱ्यांना जे आवडते ते तुला आवडून घ्यावं लागेल... "

त्याचे हे शब्द तिला खूप काही आत्मविश्वास देऊन गेले. पण कॉलेजमध्ये सुरू झालेलं आपलं प्रेम असं मध्ये तुटणार नाही ना! याची तिला नेहमीच काळजी वाटत होती. अनेकदा त्याने समजावूनही तिच्या मनात थोडी धाकधूक होतीच. कारण तो होताच राजबिंडा मिलिट्री ऑफिसर, ज्याच्यावर कितीतरी जणी जीव ओवाळून टाकतील. तिच्या मनात असलेली धाकधूक त्याने ओळखली. चक्क एक दिवस त्याने आपल्या पॉकेट मधून चाकू काढला. आपला अंगठा चिरला आणि त्यातून वाहणाऱ्या रक्ताची धार तिच्या कपाळावर लावून तो म्हणाला, 

आज, "तुम्हारी मांग मैंने अपने खून से भर दी हैं. मैं तुम्हारा हुं, कोई तुमसे मुझे अलग नहीं कर सकता"..  
 
यानंतर ती त्याला नेहमी 'पूरा फ़िल्मी हो' असं म्हणत त्याला चिडवायची, पण मनातून त्याच्या याच व्यक्तिमत्वावर तिने आपला जीव ओवाळून टाकला होता. 

बघता बघता ४ वर्षं सरली. १९९९ साल उजाडलं. आता तो इंडियन आर्मीचा एक कमिशन्ड ऑफिसर होता. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण त्याच आधी त्याच्या पहिल्या प्रेमाने त्याला जीव वाचवण्यासाठी साद घातली होती. त्यानं मागचा पुढचा विचार न करता "तानाजी मालुसरें" सारखं, "आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे" म्हणत आपल्या देशप्रेमासाठी स्वतःला झोकून दिलं. आपल्या लग्न झालेल्या सहकाऱ्याला मृत्यूच्या दाढेत जाऊ न देता तो शत्रूवर चाल करून गेला. ४२ गोळ्या अंगावर झेलूनसुद्धा त्याचे शेवटचे शब्द होते. "जय हिंद" !!!. भारताने आपल्या इतिहासातील एका सर्वोत्तम सैनिकाला गमावलं. त्याची आणि तिची एक छोटीसी लव्ह स्टोरी इकडे संपली नाही तर इकडे सुरू झाली. कारण तिने कधीच त्याला आपलं मानलं होतं. तो आधीच तिच्या आयुष्याचा भाग झाला होता. तो शरीराने नसला तरी तो सदैव तिच्याचसोबत होता. तिच्या शब्दात, 

"माझ्या मनात मला माहीत आहे, की मी पुन्हा तिला भेटणार आहे. फक्त काही क्षणांचा हा आपल्यातील दुरावा आहे. तू आहेस माझ्या श्वासात, प्रत्येक क्षणात आणि आपण लवकरच भेटू. तेव्हा आपल्याला परिस्थितीपण वेगळं करू शकणार नाही".

त्याचा त्याग, पराक्रम, बहादुरी आणि त्याचं प्रेम आज सगळंच भारताच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण बनून राहिलं आहे. आपल्या सर्वोच्च बलिदानासाठी त्याला भारताच्या सर्वोच्च सैनिकी सन्मान परमवीर चक्राने गौरवण्यात आलं. आजही शत्रूसुद्धा ज्याच्या नावाला सॅल्यूट करतात तो "शेरशहा" म्हणजेच कॅप्टन विक्रम बात्रा आजच्याच दिवशी ७ जुलै १९९९ ला धारातीर्थी पडून हुतात्मा झाला. त्याची 'डिंपल चिमा' सोबतची ही छोटीसी लव्ह स्टोरी प्रेमाच्या राज्यात अमर झाली. आजही ती वाट बघते आहे त्या वेळेची, जेव्हा तिची भेट त्याच्याशी होईल. आता फक्त काही क्षणांचा अवकाश आहे..... 

भारतमातेच्या या सुपुत्रास माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

मर गए, मिट गए वतन के लिए,
फिर भी कोई गम न होगा।

वतन के लिए ही जीना है और,
वतन के लिए ही मरना,

ये फ़िल्ज़ का जुनून कभी कम न होगा।
हम आज़ादी के परवाने हैं,

अमन -चैन की लौ में जलते है।
वतन के लिए जलने -मिटने का,

ये सिलसिला कभी खत्म नही होगा।
मेरी हस्ती भी मेरे वतन से है,

मेरी शोहरत भी मेरे वतन से है।
मेरी हर जीत का आगाज़ अब वतन,
के इक़बाल से होगा।

निधी अग्रवाल... 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




1 comment: