Saturday 24 July 2021

एका वजनाचा प्रवास... विनीत वर्तक ©

 एका वजनाचा प्रवास... विनीत वर्तक ©


असं म्हणतात की एका रात्रीत यश मिळण्यासाठी अनेक रात्री जागाव्या लागतात. कदाचित हाच अनुभव आज 'मीराबाई चानू' घेत असेल. आज संपूर्ण देश तिचं ऑलिम्पिकमधील यश साजरं करतो आहे. पण या यशासाठी गेली कित्येक वर्षं घेतलेली मेहनत आहे. यश-अपयश यांच्यातून रस्ता शोधताना आलेले कटू अनुभव आहेत. यशाच्या शिखरावर असताना आलेला पराभव हा तिच्या आत्मविश्वासाला तडा देणारा ठरला. वेटलिफ्टिंगमधली आपली लय हरवल्यावर तिने आपली आणखी पडझड न होऊ देता आपल्या पुढल्या लक्ष्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि आज ते पूर्ण करून तिने इतिहास घडवला आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक जिंकणारी आणि ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. 

भारतातील सो-कॉल्ड सुशिक्षित लोक आणि समाज ज्या भारताच्या भागाला आणि तिथल्या लोकांना आपलं मानत नाही, त्याच भागातून मीराबाई चानू येते. मणिपूरसारख्या भारताच्या अतिपूर्वेकडील राज्याचं ती प्रतिनिधित्व करते. अतिशय साधी राहणी आणि दोन वेळची चूल पेटवण्यासाठी जंगलातून लाकडं आणून ती घरी द्यायची. ते करताना आपला वेटलिफ्टिंगचा छंद तिने जोपासला. वजन उचलायचे प्राथमिक धडे जंगलात भटकताना लाकडाचं वजन उचलून तिने गिरवले. कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना तिने आपला प्रवास सुरू ठेवला. 

एकामागोमाग एक स्पर्धा जिंकत आपल्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं घेत ती २०१६ साली रिओ ऑलिम्पिकला पोहोचली. लहानपणापासून खेळाडू होण्याचं आणि देशासाठी मेडल जिंकण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ती वेळ होती. पण छोट्या कुटुंबातून जागतिक स्तरावर खेळताना अपेक्षांचं ओझं मात्र तिला डोईजड झालं, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठ्या कटू अनुभवाला ती सामोरी गेली. स्पर्धा संपताना आपलं भविष्य आणि स्वप्न कोलमडून पडल्याची तिला जाणीव झाली. यात ती निराशेच्या गर्तेत अडकली. पण संपूर्ण तोल जाण्याआधी तिने स्वतःला सावरलं. यात तिचे कोच, भाऊ, कुटुंबीय यांचं मोठं योगदान होतं. मानसिक स्वास्थ सुदृढ करण्यासाठी तिने प्रोफेशनल कोचची मदत घेतली. पुन्हा एकदा तिने २०१७ ला आगमन केलं. आपला दर्जा उंचावत नेला. पण पाठीच्या दुखण्याने आणि खांद्याच्या दुखण्याने ती चाचपडत होती. ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर होत्या, पण खांद्याच्या दुखण्याने तिला आपला सर्वोत्तम खेळ खेळायला अडचणी येत होत्या.

भारत सरकार, खेळ मंत्रालाय आणि वेटलिफ्टिंग फेडरेशनकडे तिने उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची मदत मागितली. गेल्या काही वर्षांत खेळ-मंत्रालयानेही  कात टाकली आहे. जिकडे उपचाराच्या नावावर पार्ट्या व्हायच्या, पैसे इकडून तिकडे व्हायचे आणि खेळाडूंच्या पदरी निराशा यायची. ह्या सगळ्यांत आता बदल झाला आहे. त्यामुळेच जेव्हा तिने सरकारकडे याबद्दल मदत मागितली, तेव्हा तिच्या उपचारांची गरज लक्षात घेऊन भारत सरकारने तिच्या अमेरिकन दौऱ्यासाठी तब्बल ७१ लाख रुपयांचा खर्च केला. अमेरिकेत जाऊन योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेतल्यावर ती टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार झाली. 

आज जेव्हा भारतासाठी तिने पहिलं पदक जिंकलं, तेव्हा देशाने तिच्यावर केलेल्या खर्चाची तिने व्याजासकट आणि ऋण न फेडता येणाऱ्या अश्या क्षणांनी परतफेड केली आहे. जंगलातून लाकडं गोळा करणारी मुलगी ते ऑलिम्पिक रौप्य पदक हा तिचा प्रवास सगळ्यांना प्रोत्साहन देणारा आहे. पण त्याचवेळी भारतीयांसाठी अनेक गोष्टी उघड्या पाडणारा आहे. आज जिकडे सगळ्या सुखसोयी उपलब्ध असणारी तरुणपिढी ड्रग्स, सेक्स, दारू, नशा आणि जस्ट-चिल म्हणत आपल्या उद्दिष्टापासून भरकटते आहे, तिकडे गावांतून कोणत्या सोयी उपलब्ध असणाऱ्या भारताचे खेळाडू भारताला पदक मिळवून देत आहेत. 

१३४ कोटी भारतीयांमधून फक्त १२७ भारतीय १८ विविध खेळांसाठी पात्र ठरले आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाबही आहे. आपल्यापेक्षा कितीतरी छोटे देश सुविधा नसताना ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपलं नाणं खणखणीत वाजवत असतात. पण आपण मात्र दरवेळी त्यात कमी पडतो यावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे. एकावेळी जिकडे हा विरोधाभास दिसून येतो, तिकडे 'मीराबाई चानू'चे यश अजून जास्ती खुलून दिसते. तिने केलेला वजनाचा प्रवास भारताच्या चमूतील इतर खेळाडूंना प्रोत्साहन देणारा ठरेल आणि अशी अनेक पदकं भारताच्या नावावर लागतील, याच आशेने तिचं आजचं यश साजरं  करतो आहे. मिराबाई चानू, प्रत्येक भारतीयाला तुझा अभिमान आहे आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


  


No comments:

Post a Comment