Friday 29 October 2021

खड्यात घातलेली लाल परी... विनीत वर्तक ©

 खड्यात घातलेली लाल परी... विनीत वर्तक ©

मुंबई ही कर्मभूमी असली तरी मुंबईतल्या बेस्ट पेक्षा एस.टी. म्हणजेच लाल परीशी आयुष्यात जवळचा संबंध होता. मुंबईतल्या डबल डेकर मधला एक प्रवास सोडला तर बेस्ट च्या आठवणी कमी आहेत. पण लाल परीशी जोडलेल्या आठवणी अनेक आहेत. मला ड्रायव्हींग च वेड कोणी लावलं असेल तर मी लाल परीच नाव घेईन. लहानपणी माझ्या आजोळी किंवा गावी जाताना या लाल परीची साथ ठरलेली असायची. गणपती असो वा दिवाळी नेहमीच तीच आणि तिला हाकणाऱ्या ड्रायव्हर काकांसोबत त्या गर्दीत हिशोब चोख ठेवणाऱ्या कंडक्टर काकांच अप्रूप नेहमीच वाटत आलं. ड्रायव्हर काकांच्या बाजूला असणारा बॅटरी बॉक्स म्हणजे माझं एस.टी. मधील सिंहासन होत ज्यावर विराजमान होऊन मी अनेकवेळा जग जिंकल्याचा अनुभव घेतला होता. 

डिझेल चा दरवळणारा सुगंध, गरम झालेली सिट आणि त्यावर बिन बाह्यांचा गंजी घालून थोडं तिरकस बसत फेरारी पेक्षा जास्त वेगात आणि बॉम्ब पेक्षा जास्ती कर्कश आवाज करत बदलणाऱ्या त्या गियर च्या साथीने मी प्राण कंठाशी घेऊन त्या लाल परीच्या ड्रायव्हर काकांसोबत प्रवास करण्याचा अनुभव अनेकदा घेतला होता. आजही ते सगळं आठवलं की ते सगळं चित्र जसच्या तसं समोर उभं रहाते. काळाच्या ओघात परिस्थिती बदलली आणि लाल परीचे जणूकाही पंखच छाटले गेले. आता तर अशी अवस्था आणून ठेवली आहे की बिचारीला जगणं ही मुश्किल करून ठेवलं आहे. लाल फितीचा फास मुद्दामून या लाल परीच्या मानेभोवती हळूहळू आवळला गेला. तिची होणारी धडपड दिसत असून सुद्धा राजकारण करून आता तिचं अस्तित्व जवळपास संपवल्यात जमा केलं आहे. 

लाल परी नेहमीच सामान्य माणसाच्या प्रवासाची साक्षी राहिली आहे. आजही पैसा खिशात आल्यावर थंडगार एस.सी. च्या त्या कारमधून प्रवास करताना बाजूने जाणारी ती लाल परी का कोणास ठाऊक आजही अशी लपवून बोलवत असते. पण गेल्या काही दिवसात तिला जिवंत ठेवणाऱ्या लोकांचे चाललेले हाल बघून कुठेतरी मन खट्टू झालं आहे. लाल परीला जिवंत ठेवणाऱ्या लोकांना आज पगार वेळेवर मिळत नाहीत. दिवाळी तोंडावर आलेली असताना सानुग्रह अनुदान आणि इतर गोष्टींची वानवा आहे. हे सगळं कशामुळे झालं असा विचार केला तर अनेक गोष्टी समोर येतात. काळानुरूप बदल करण्यात लाल परी अयशस्वी ठरली हे महत्वाचं कारण असलं तरी तिचे पंख गेल्या अनेक दशकात राजकारण्यांनी आणि त्याच राजकारण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी छाटले हे स्पष्ट दिसून येते. कोणता पक्ष आणि कोणता नेता यामागच्या राजकारणात मला जायचं नाही. कारण कोणीही आलं आणि कितीही केलं तरी लाल परीचा पद्धतशीरपणे गळा गेल्या काही वर्षात घोटण्यात आला हे वास्तव नाकारता येत नाही. 

आजही एकमेकांकडे बोट दाखवणारं राजकारण केलं जाते आहे पण मुळात खड्यात घातलेल्या लाल परीच कोणालाच काही वाटत नाही. रोज तिचे कर्मचारी दिवाळीच्या तोंडावर आपलं आयुष्य संपवत आहेत पण त्याच ना तिच्या भोवती फास आवळणाऱ्या लोकांना पडलं आहे न रोज २४ तास पैश्याच्या जोरावर मस्तवाल झालेल्या लोकांना हिरो दाखवण्याच्या कामात जुंपलेल्या मिडीयाला. नशेडी लोकांच भवितव्य काय हे आमच्यासाठी जास्ती महत्वाचं आहे कारण स्वतःचा जीव संपवणारे ते काका आमच्या स्टेटस मधे येत नाहीत. किंबहुना किती करोड रुपये कोणी खाल्ले आणि कोणाचा धर्म, जात आणि पंथ उकरून काढणे हे आद्य कर्तव्य समजणारे राजकारणी आणि मिडिया हे आपलं आद्य कर्तव्य करण्यात सध्या व्यस्त असल्याने शेवटच्या घटका मोजत असलेल्या लाल परीकडे कोणाचं लक्ष जात नाही. 

लाल परीच्या मरणाला कोणी एक राजकारणी अथवा पक्ष कारणीभूत नाही तर गेल्या काही दशकात राजकारण, भ्रष्टाचार आणि व्यवस्थापन अश्या चोहोबाजूने ती पोखरली गेली आहे. कोणे एके काळी शान असलेली लाल परीची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची आजची अवस्था बघवत नाही. महाराष्ट्राच्या अगदी टोकाच्या गावापर्यंत आपलं जाळ पसरलेल्या लाल परीचा खड्यात जाणारा प्रवास नक्कीच क्लेशदायक आहे. अजूनही लाल परीला सावरता येऊ शकते फक्त राजकीय आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या इच्छाशक्तीची गरज आहे. मला विश्वास आहे की या लाल परीला खड्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पण तसे जर केले गेले नाहीत तर नक्कीच या मातीशी नाळ असलेली लाल परी काळाच्या ओघात आपलं अस्तित्व नक्कीच हरवून बसेल.  

तळटीप :- लेखाचा वापर कोणत्याही राजकीय कुरघोडी अथवा पक्षीय राजकारणासाठी करू नये. पोस्टचा उद्देश दिवसेंदिवस खालावत चाललेल्या एस.टी. ची व्यथा मांडण्याचा आहे.  

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



1 comment:

  1. होय. खरय हे. आमच्या सारख्या सत्तरीतल्या लोकांनी लालपरिचा तो उर्जित काळ पाहिला आहे. आत्ताची अवस्था पाहून मन विषण्ण होत. जर राजकारण्यांनी हि अवस्था केलीय म्हणाव तर मग ती जबाबदारी आपल्या वरच येते. आम्ही का या राजकारण्याच्या पिढ्यान् पिढ्या पोसल्या. कधी जातीच्या नावावर कधी पैशासाठी कधी वैयक्तिक स्वार्थासाठी आम्हीच हे भस्मासूर पाळले. त्यांचा काय दोष.

    ReplyDelete