Monday 28 June 2021

'अग्नी-पी' (प्राईम) एक नवं तंत्रज्ञान... विनीत वर्तक ©

 'अग्नी-पी' (प्राईम) एक नवं तंत्रज्ञान... विनीत वर्तक ©


२८ जून २०२१ रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी ओरीसामधील अब्दुल कलाम बेटावरून 'अग्नी-पी' (प्राईम) या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डी.आर.डी.ओ. ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही चाचणी १००% यशस्वी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भारताकडे सध्या 'अग्नी' या सिरीजमधील अग्नी १, अग्नी २, अग्नी ३, अग्नी ४ आणि अग्नी ५ अशी बॅलेस्टिक मिसाईल आहेत. मग असं असताना हे नवीन क्षेपणास्त्र काय आहे? त्याने भारताच्या तांत्रिक क्षमतेत कश्या पद्धतीने बदल होणार आहेत हे समजून घेतलं पाहिजे. 

१९८० मधे  डी.आर.डी.ओ. ला  Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) या प्रोग्रॅमच्या अंतर्गत बॅलेस्टिक मिसाईल बनवण्याचं काम देण्यात आलं होतं. पुढे जाण्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे, की बॅलेस्टिक मिसाईल म्हणजे काय? बॅलेस्टिक मिसाईल म्हणजे जे मिसाईल (क्षेपणास्त्र) जमिनीवरून अवकाशात जातात आणि तिथून पुन्हा जमिनीवर येऊन आपलं लक्ष्याचा वेध घेतात. दुसरी म्हणजे क्रूझ मिसाईल (उदाहरण म्हणजे 'ब्राह्मोस' जे की क्रूझ मिसाईल आहे). तर क्रूझ मिसाईल जमिनीलगत प्रवास करतात आणि आपला लक्ष्याचा वेध घेतात. तर वेगवेगळ्या अंतरावर असणाऱ्या लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी डी.आर.डी.ओ. ने अग्नी बॅलेस्टिक मिसाईल सिरीज बनवलेली आहे. त्यांच्या नंबरप्रमाणे यांची लांबच्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता वाढत जाते. तूर्तास अग्नी ५ हे मिसाईल सगळ्यात जास्ती अंतरावर जाऊ शकते. याचा पल्ला ५००० किलोमीटरपेक्षा जास्त असून १५०० किलोग्रॅम वजनाचं न्यूक्लिअर वॉरहेड नेण्याची याची क्षमता आहे. आपल्या टर्मिनल फेज म्हणजेच शेवटच्या टप्यात अग्नी ५ चा वेग हा २४ मॅक (ध्वनीच्या वेगाच्या २४ पट ) इतका प्रचंड असतो. त्यामुळे याला रोखणं अशक्य आहे. अग्नी ५ चा पल्ला ६००० किलोमीटर पलीकडे असल्याचा अनेक तज्ञांचा अभ्यास आहे. भारत जाणूनबुजून याची क्षमता कमी सांगत असल्याची चर्चा आहे. तर इतक्या लांबच्या क्षमतेमुळे संपूर्ण चीन भारताच्या अवाक्यात येतो. याचा अर्थ भारताच्या भूमीवरून आपण अग्नी ५ सोडलं तर चीनच्या कोणत्याही गावाला, शहराला लक्ष्य करण्याची आपली क्षमता आहे. 

अग्नी ४ आणि अग्नी ५ बनवताना डी.आर.डी.ओ. ला अनेक नवीन तंत्रज्ञानं विकसित करावी लागली. म्हणजे मिसाईलला इतक्या लांब जाण्यासाठी रस्ता दाखवणारी नेव्हिगेशन प्रणाली, त्याला लागणारं जी.पी.एस., त्याच्या निर्मितीत वापरलं जाणारं इंधन तसेच त्याला हलकं करण्यासाठी आणि शत्रूच्या रडारपासून वाचवण्यासाठी लागणारं कंपोझिट मटेरियल. या दोन्ही मिसाईलच्या यशस्वी चाचण्यानंतर असं लक्षात आलं की हे तंत्रज्ञान आपण आधी निर्माण केलेल्या मिसाईलमध्ये वापरून बघितलं तर? त्याचं उत्तर आहे, डी.आर.डी.ओ. ने विकसित केलेलं संपूर्ण नवीन तंत्रज्ञानावर आधारित 'अग्नी-पी' (प्राईम) हे मिसाईल. 'अग्नी-पी' हे आपल्या भावंडांपासून अतिशय वेगळं मिसाईल आहे. या मिसाईलची क्षमता १०००- २००० किलोमीटर वरील लक्ष्याला नष्ट करण्याची आहे. जी की आपल्याकडे अग्नी १ आणि अग्नी २ मधे आहे. पण 'अग्नी पी' ला सगळ्यात जास्ती तंत्रज्ञानातील लाभ होतो तो वजनात. याचं वजन तितकीच क्षमता असताना अग्नी ३ च्या अवघं ५०% आहे. याच्या निर्मितीत कंपोझिट मटेरियल वापरल्यामुळे ते जास्ती स्टेल्थ आणि हलकं झालं आहे. 

'अग्नी-पी' हे कॅनिस्टर डिझाईन मिसाईल आहे. तर याचा अर्थ काय? तर कोणतंही मिसाईल हे हल्ला करण्यासाठी एखाद्या ठिकाणाहून डागता येते. त्याच्या वजनामुळे किंवा त्यात वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे त्याची ने-आण दुसरीकडे करणं सहज शक्य नसते, तसेच त्यात धोका असतो. पण समजा आपण मिसाईल आणि त्याच्या इंधनाला एखाद्या कंटेनरमध्ये सील केलं ज्याप्रमाणे शीतपेय एखाद्या कॅनमध्ये ठेवलेली असतात. त्यांची ने-आण आपण कुठेही सुरक्षितरीत्या करू शकतो जरी त्यात गॅस दाबाखाली असला तरी. त्याचप्रमाणे 'अग्नी पी' हे एखाद्या कॅनिस्टर मधे बसवलेले असते. ते त्याच्या वाहनावरून भारताच्या कोणत्याही भागात रेल्वे, रस्ते, बोटीतून नेले जाऊ शकते. म्हणजे उद्या लडाखमधून डागायचं आहे तर तिकडे ट्र्क नेऊन थांबवला. उद्या मुंबईच्या दादरमधून किंवा पुण्याच्या डेक्कनवरून पण ते डागता येऊ शकते. यामुळे 'अग्नी-पी' नक्की कुठून डागलं गेलं याचा अंदाज शत्रूला येतं नाही. त्याचवेळी ते जवळपास १५०० किलोग्रॅम (अंदाजानुसार) न्यूक्लिअर वॉरहेड घेऊन जाण्यास सक्षम आहे.

'अग्नी-पी' मध्ये दोन स्टेज सॉलिड इंधनाचा वापर केला असून याचा circular error probable (CEP) हा जवळपास १० मीटर आहे. याचा अर्थ काय तर जे लक्ष्य मिसाईलला दिलं आहे त्याच्या १० मीटरच्या क्षेत्रात ते मिसाईल गाठणार. 'अग्नी-पी' हे २००० किलोमीटरवरील लक्ष्य १० मीटरच्या अचूकतेने वेध घेऊ शकते. इतकी अचूकता मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या नेव्हिगेशन प्रणाली यात बसवाव्या लागतात. आधी सांगितलं तसं हे बॅलेस्टिक मिसाईल असल्याने जेव्हा अवकाशातून पुन्हा जमिनीवर यायला सुरूवात करते, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे याचा वेग प्रचंड वाढतो. इतक्या प्रचंड वेगात जागा बदलणाऱ्या लक्ष्याचाही वेध ते घेऊ शकते. त्यासाठी यात रिएन्ट्री वेहकल मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. ज्या कंपोझिट मटेरीअलने बनवलेल्या आहेत. नेव्हिगेशन प्रणालीकडून मिळालेल्या संदेशाला ग्रहण करून लक्ष्याच्या बदललेल्या जागेप्रमाणे मिसाईलला गाईड करतात. एक प्रकारे लक्ष्याचा मागोवा घेत त्याला नष्ट करण्याची प्रणाली 'अग्नी-पी' मध्ये आहे. 

काल झालेल्या चाचणीत अश्याच प्रकारे लक्ष्य देऊन त्याला डागण्यात आलं. उड्डाणापासून ते लक्ष्याचा वेध घेईपर्यंत प्रत्येक मार्गाचा वेध निरनिराळया सॅटेलाईट्स गायडन्स आणि नेव्हिगेशन यंत्रणांकडून घेण्यात आला. डी.आर.डी.ओ. ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे 'अग्नी-पी' ने १००% अचूकतेने लक्ष्यभेद केला. याचा अर्थ ते ज्या पद्धतीने मिसाईल जाणं अपेक्षित होतं, त्याच मार्गाने त्याने संपूर्ण चाचणीत मार्गक्रमण केलं. ही अचूकता 'अग्नी-पी' ला पहिल्याच प्रयत्नात मिळालेली आहे. यासाठी डी.आर.डी.ओ. चे वैज्ञानिक, संशोधक, अभियंते आणि 'अग्नी-प्राईम' च्या संपूर्ण चमूचं अभिनंदन आणि पुढल्या चाचण्यांसाठी शुभेच्छा. 'अग्नी-पी' भारताच्या सुरक्षितेत महत्वाची भूमिका येत्या काळात बजावेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल  (पहिल्या फोटोत 'अग्नी-पी' उड्डाण भरताना तर दुसऱ्या फोटोत कॅनिस्टर डिझाईन ) 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: