Tuesday 8 June 2021

#मंदिरांचे_विज्ञान गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट... विनीत वर्तक ©

#मंदिरांचे_विज्ञान - गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट... विनीत वर्तक ©

१६८७ चं वर्षं होतं. सर आयझॅक न्यूटन यांनी त्यावेळच्या Philosophiae Naturalis Principia Mathematica (1687), किंवा ज्याला 'the Principia' असं म्हटलं जायचं, त्या मासिकात जगाच्या येणाऱ्या कित्येक वर्षांचा कायापालट करणारे गतीचे नियम पहिल्यांदा जगापुढे मांडले. आजही ते तीन नियम न्यूटनचा पहिला, दुसरा आणि तिसरा नियम म्हणून ओळखले जातात. आपल्यापैकी प्रत्येकाने त्याचा अभ्यास शालेय जीवनात केला असेल. त्याच काळात न्यूटन ह्यांनी गुरुत्वाकर्षण आणि त्याचं बल कश्या पद्धतीने पृथ्वीवरच्या कोणत्याही वस्तूवर कार्य करते हे नियमांतून सिद्ध केलं. गुरुत्वाकर्षणामुळे काम करणाऱ्या बलाला निश्चित अशी दिशा आणि परिणाम असतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी अजून एक गोष्ट जगापुढे मांडली, ती म्हणजे हे बल 'व्हेक्टर क्वांटिटी' आहे, याचा अर्थ हे बल एका सरळ रेषेत अथवा एखाद्या निश्चित अश्या बिंदूपाशी एकवटलेले असते. या बिंदूलाच त्यांनी नाव दिलं 'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी'.

'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी' म्हणजे काय? अजून थोडं खोलात समजून घेतलं तर गुरुत्वाकर्षणाचं बल जरी कोणत्याही वस्तूवर सगळीकडे काम करत असलं, तरी त्या बलाची संपूर्ण शक्ती एखाद्या बिंदूपाशी अथवा एका रेषेत एकटवलेली असते. संपूर्ण वस्तूचं वजन किंवा त्या वस्तूला स्थिर ठेवण्यासाठी एका बिंदूवर किंवा एका रेषेत जर आपण प्रतिबल निर्माण केलं तर ती वस्तू जशीच्या तशी 'इक्विलिब्रियम' (समतोल) स्थितीत आपण स्थिर करू शकतो. न्यूटननी शोधलेल्या या शोधांबद्दल इतकं सगळं लिहीण्यामागचं कारण हेच की या सगळ्या संज्ञा भारतीयांना कित्येक हजारो वर्षांपूर्वी माहित होत्या. गुरुत्वाकर्षण कसं काम करतं? किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सारख्या नियमांची  जाणीव भारतीयांना आधीच होती. याचे पुरावे देणारं एक मंदिर तब्बल १००० वर्षांपेक्षा जास्ती काळ निसर्गाचं चक्र, परकीय आक्रमणं आणि काळाच्या ओघात होणाऱ्या झीज अश्या सगळ्या प्रतिकूल गोष्टींना झेलत आजही उभं आहे. गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या या मंदिराचं नाव आहे "ककनमठ शंकर मंदिर".     

'ककनमठ मंदिर' हे मध्य प्रदेशमधील मोरना जिल्ह्यातील सिहोनिया या गावात उभं आहे. साधारण १३० फूट उंच असणाऱ्या या मंदिराचं निर्माण १०१५ ते १०३५ मध्ये कीर्तिराजाने केल्याचा शिलालेख आहे. हे मंदिर जेव्हा बांधून पूर्ण झालं होतं, तेव्हा एक मुख्य मंदिर होतं आणि त्याच्याबाजूला ४ मंदिरं होती. पण गेल्या १००० वर्षांपेक्षा जास्ती कालखंडात आता मुख्य मंदिर उभं आहे. या मंदिराचं बांधकाम अर्धवट राहिलेलं वाटतं. कारण मंदिर बघितलं तर अनेक गोष्टी अर्धवट सोडलेल्या वाटतात. या मंदिराबद्दल अशी एक आख्यायिका आहे, की या मंदिराचं बांधकाम भुतांनी आपल्या सर्वोच्च शक्तीला प्रसन्न करण्यासाठी एका रात्रीत केलं. शंकर म्हणजेच शिवा हा देवांसोबत असुरांचाही देव आहे. हिंदू धर्मात शंकराला सर्वोच्च स्थान आहे ते यामुळेच. 'गॉड ऑफ क्रियेशन आणि डिस्ट्रक्शन' असं शंकराच्या बाबतीत म्हटलं जातं. एका रात्रीत बांधकाम करता करता सकाळ झाल्याने भुतं पळून गेली आणि मंदिराचं बांधकाम अर्धवट राहिलं. आजही रात्री इकडे राहण्यासाठी लोक घाबरतात. 

भुतांच्या गोष्टीत मला जायचं नाही, पण या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची रचना. वर सांगितलं त्याप्रमाणे न्यूटनने शोधलेल्या 'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी' नियमांचा वापर बांधकामात केला गेला आहे. या संपूर्ण मंदिराच्या बांधकामात कुठेही सिमेंट किंवा बायंडिंग मटेरियलचा वापर केला गेलेला नाही. याचा अर्थ या मंदिराचं बांधकाम दगडाच्या चिरा एकमेकांवर रचून केलं गेलं आहे. हे सर्व दगड विशिष्ट पद्धतीने रचले गेले आहेत आणि ते रचताना 'सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी' तत्त्वाचा वापर केला गेला आहे. हे दगड एकमेकांवर अश्या पद्धतीने बल टाकतात, की एक दगड दुसऱ्याला त्याच्या जागेवरून हलू देत नाही. हे बल इतकं मजबूत आहे, की निसर्गाच्या कालचक्रात मग तो ऊन, वारा, पाऊस असो वा परकीय शक्तीच्या आक्रमणातही टिकून राहिलं आहे. मंदिर बघताना आपल्याला असं जाणवेल, की वाऱ्याची झुळूक आली तर सगळं कोसळून जाईल आणि एक धक्का लागला तर सगळं नष्ट. पण गुरुत्वाकर्षणाच्या त्या अदृश्य बलापुढे सगळे हतबल आहेत. 

न्यूटन जन्माला यायच्या ६०० वर्षं आधी भारतीयांना गुरुत्वाकर्षणाबद्दल माहित होतं, तसेच हे बल 'व्हेक्टर क्वांटिटी' आहे हेही ज्ञात होतं. त्यामुळेच हे बल एका रेषेत आणि एका बिंदूत एकटवण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने दगडाच्या चिऱ्यांना आकार दिले. हे आकार विशिष्ट पद्धतीमध्ये गुंफवून ककनमठ शिव मंदिराचं भव्य स्वरूप उभं केलं, जे आजही तग धरून उभं आहे. मुळातच एखाद्या वस्तूवर काम करणाऱ्या या बलाचा इतका सुंदर वापर मंदिर निर्मितीसाठी केला जाऊ शकतो हा क्रांतिकारी विचार, तसेच त्यावर गणित आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय अशी कलाकृती उभी राहणं अशक्य आहे. आज आपण सगळी मोजमापं घेऊन जरी याची प्रतिकृती उभारण्याचा विचार केला, तरी ती अशक्य आहे. एवढंच काय, 'आर्कियॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया'नेही मंदिराला कोणत्याही पद्धतीने दुरुस्त करणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. कोणता दगड कोणत्या साच्यासाठी बसवला गेला आहे, याचा अंदाज येणं कठीण आहे. तसेच एखादा असा प्रयास संपूर्ण मंदिर नष्ट होण्यास कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळेच आज त्याच्या त्या अर्धवट रूपात आपण बघू शकतो. 

'ककनमठ शिव मंदिर' राष्ट्रासाठी महत्वाचा सांस्कृतिक वारसा असल्याचं आर्कियॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने घोषित केलं आहे. आजही असं म्हटलं जातं, की गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम जिकडे थांबतात ती वस्तू म्हणजे 'ककनमठ शिव मंदिर'. न्यूटनने भले ४०० वर्षांपूर्वी एखाद्या मासिकात हे नियम गणितातून तत्वतः सिद्ध केले असतील, ते आम्ही शिकतो पण त्या नियमांना समजून, तशी उभी राहिलेल्या कलाकृतीबद्दल कोणी आम्हाला सांगत नाही, हेच आमचं अपयश आहे. आम्ही 'ककनमठ शिव मंदिर' ओळखतो ते भुतांनी निर्माण केलं म्हणून, ना की 'गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणारे मंदिर' म्हणून. जेव्हा हा दृष्टिकोन बदलेल तेव्हाच त्या शंकरापर्यंत आपली प्रार्थना पोहोचेल असं मला मनापासून वाटतं. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



4 comments:

  1. खूप.महत्वाचे आहे हे article...aani mhanoon tumche nav कायम.ठेवून शेअर केले

    ReplyDelete
  2. Please plan a tour to visit such astonishing places after this virus menace.

    ReplyDelete
  3. Sir should I share this excellent informative article with your name and permission

    ReplyDelete