Wednesday 16 June 2021

रामसेतू... विनीत वर्तक ©

 रामसेतू... विनीत वर्तक © (Re-Post)


'सायन्स' ह्या दूरचित्रवाणीवरील वाहिनीने २०१७ साली 'रामसेतू'वर कार्यक्रम करताना 'रामसेतू' हा मानवनिर्मित असल्याचं म्हणताच एकच धुरळा उडाला आहे. डिस्कवरी चॅनेलच्या उपवाहिनीने, सायन्स वाहिनीने हे मांडताना काही शास्त्रीय आधार घेतले आहेत. ह्यातील राजकारणाचा आणि आपल्या भावनांचा भाग बाजूला ठेवून ''रामसेतू' म्हणजे काय?', हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. 

'रामसेतू' म्हणजे ज्याला जगाच्या इतर भागात 'ऍडम्स ब्रिज' असं म्हटलं जातं. भारताच्या पामबन बेटापासून ज्याला रामेश्वर बेट असही म्हटलं जातं, तिथपासून ते  श्रीलंकेच्या मन्नार बेटापर्यंत चुनखडीच्या दगडांची एक रांग आहे. ही रांग ५० किमी लांबीची असून ती मन्नारची सामुद्रधुनी आणि पाल्क स्ट्रेट-ला वेगळं करते. रामायणात उल्लेख असल्याप्रमाणे प्रभू श्रीराम याच सेतूवरून लंकेला गेले होते. याची निर्मिती वानरसेनेने समुद्रात दगड टाकून केली असं रामायणात लिहीलेलं आहे. या दगडांवर 'श्रीराम' असं लिहील्यानंतर हे दगड पाण्यावर तरंगायला लागले, असं लिहीलेलं आहे. हा झाला पौराणिक इतिहास. त्यात मला जायचं नाही, पण आत्तासुद्धा या भागात समुद्र खोल असूनही या इथल्या पाण्याची खोली ही १ ते १० मिटर ( ३ ते ३० फुट ) इतकीच आहे. ह्या छोट्या खोलीमुळे इकडून नौकांचं वहन करण्यात अडचणी येतात. आजही जहाजांना मन्नारच्या सामुद्रधुनीतून पाल्क स्ट्रेट-ला जाण्यासाठी श्रीलंकेला वळसा घालून जावं लागतं. २००७-०८ साली भारतातल्या राज्यकर्त्यांनी असा कोणता सेतू आस्तित्वात नाही, असं सुप्रीम कोर्टाला सांगून इकडे 'सेतूसमुद्रम प्रॉजेक्ट' सुरु केला होता. या प्रोजेक्टच्या अंतर्गत इथल्या खाडीची खोली वाढवून इकडून मोठ्या जहाजांना ये-जा करता येईल असा प्रस्ताव होता. पण यासाठी संपूर्ण 'रामसेतू'ला उध्वस्त करावं लागणार होतं. इकडे गुंतलेल्या धार्मिक भावना, लोकांचा होणारा विरोध तसेच इकडे असलेली जैवविविधता या गोष्टींमुळे हा प्रस्ताव मागे पडला.   

'रामसेतू' हा स्थापत्यशास्त्राचा आणि रामायणाच्या इतिहासातील नोंदीचा एकमेव साक्षीदार आहे अस म्हटलं जातं. ह्यावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामध्ये इथल्या कोरलचं रेडिओकार्बन वय हे ४०२० वर्षं (+- १६० वर्षं) इतकं आढळून आलं आहे. 

(The conventional radiocarbon age is a report that conforms to International Standards using: • a half-life of 5568 years (the Libby standard); • Oxalic Acid I or II as the modern radiocarbon standard; is calculated from the δ13C-corrected Fraction Modern according to the following formula: Age = -8033 ln (Fm))

हे वय रामायण ज्या काळात घडलं त्याच काळाशी मिळतंजुळतं आहे. (रामायण साधारण ४०००-५००० वर्षांपूर्वी घडलेलं आहे असं सांगितलं जातं) आता हे मानवनिर्मित कसं आहे, यासाठी इथे अजून संशोधन केलं गेलं. 

या इकडे पाण्याच्या खाली दगड-मातीच्या दोन वेगवेगळ्या लेअर आढळून येतात. जर हा नैसर्गिक भाग असेल, तर खाली असणाऱ्या दगडमातीचं वय हे वर असणाऱ्या दगड मातीपेक्षा जास्ती असायला हवं हे विज्ञान सांगते. इकडेच खरी मेख आहे. संशोधनानंतर असं आढळून आलं, की वर जे दगड आणि मातीची रचना (लेअर) आहे ती खालच्या दगड मातीशी संपूर्णपणे वेगळी आहे. तसेच त्याचं वय हे साधारण ५०००- ६००० वर्षांच्या घरात आहे. जी खालची लेअर अथवा भौगोलिक रचना आहे तिचं वय साधारण ३०००-४००० वर्षं इतकं आहे. वर असलेली दगडांची रचना ही नैसर्गिक नाही यावर शिक्कामोर्तब होते. ज्या दगडांनी  रामसेतू बनला आहे, ते दगड दुसरीकडून कुठून तरी आणून त्यांची ब्रिज प्रमाणे रचना केली गेली आहे. म्हणजेच हा सेतू मानवनिर्मित आहे. आता हे दगड कसे आणले आणि हे काम कसं केलं गेलं असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. पण संशोधकांच्या मते त्या काळी असा सेतू बांधणं हे अभियांत्रिकी, विज्ञान, स्थापत्यशास्त्र ह्याचा एक चमत्कार असेल ह्यात वाद नाही. इतिहासातील नोंदींप्रमाणे १५ व्या शतकापर्यंत 'रामसेतू' हा पाण्याबाहेर होता. त्यावरून चालत जाता येत असे. १४८० साली आलेल्या वादळामध्ये समुद्र आत शिरल्याने पाण्याखाली गेला असावा असं म्हटलं जातं. 

नासाच्या उपग्रहांनी जे टिपलं आहे, तो ऍडम्स ब्रिज किंवा रामसेतू हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे, ह्याला दुजोरा देणारी अजून एक गोष्ट किंवा नैसर्गिक रचना म्हणा, इकडे आढळून येते. रामायणात सांगितल्याप्रमाणे समुद्रात टाकलेले दगड हे पाण्यावर तरंगत होते. वानरसेनेनी 'श्रीराम' लिहून टाकलेला प्रत्येक दगड हा तरंगायला लागला आणि त्यावरून मग वानरसेनेने लंकेत पाउल ठेवलं असं रामायणात सांगितलं गेलं आहे. तर असे तरंगणारे दगड या भागात विपुल प्रमाणात आढळून येतात. हे दगड पाण्यावर कसे तरंगतात, ह्यामागचं विज्ञान बघणं हे महत्वाचं आहे. 

तरंगणारे दगड किंवा ज्याला 'प्युमाईस' असं म्हणतात, ते ज्वालामुखीच्या उद्रेकात तयार होतात. ज्वालामुखीतील आतला भाग प्रचंड दाबाखाली असतो आणि  त्याचं तापमान १६०० डिग्री सेल्सियस पर्यंत असतं. जेव्हा हा ज्वालामुखी बाहेर येऊन हवेशी किंवा समुद्राच्या पाण्याशी संपर्क करतो, तेव्हा पाण्याची वाफ तात्काळ होते. पण त्याचवेळी तापमानातील हा प्रचंड फरक गरम लाव्हारसाला 'कोल्ड शॉक' देतो. अचानक झालेल्या तापमानातील फरकामुळे लाव्हा तिथल्या तिथे फ्रोझन (द्रवरुपातून घनरूपात बदल) होतो. ह्या प्रक्रियेत तयार झालेले पाण्याची वाफ होऊन तयार झालेले गॅसचे बुडबुडे आतमध्ये अडकून राहतात. ह्यामुळे ह्या दगडाला स्पंज सारखं सच्छिद्र बनवतात. काही प्युमाईस दगडांमध्ये मध्ये हे बुडबुडे ९०% जागा व्यापतात. ह्या अडकलेल्या गॅसमुळे किंवा रिकाम्या जागेमुळे ह्या दगडांची घनता प्रचंड कमी असते. इतकी कमी की आत असलेल्या सच्छिद्र पोकळ्यांमुळे हे दगड पाण्यात टाकल्यावर काही काळ तरंगतात. जेव्हा पाणी हळूहळू त्यात असलेल्या हवेची जागा घेतं तेव्हा हे दगड पाण्यात बुडतात.

हे 'प्युमाईस' किंवा तरंगणारे दगड ह्या परिसरात विपुल असून 'रामसेतू'च्या वेळेस असे दगड वापरले गेले असण्याची खूप दाट शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. ज्याला आपण एक भावनिक आणि धर्माचा रंग दिला, तरी त्यात एक विज्ञान आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. खरे तर ह्या 'रामसेतू' मुळे इकडे नैसर्गिक कोरल झालं असून समुद्रातील एक विश्व इकडे राहते आहे. इकडे मानवाने हस्तक्षेप करून जर ह्या 'रामसेतू'ला धक्का लावला, तर एक विश्व आपण नष्ट  करणार आहोत. त्यामुळे हा सेतू रामाने बांधला हे आज सांगणं किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट करणं आज कठीण असलं, तरी तो मानवनिर्मित आहे हे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झालेलं आहे. तसेच तेथील खडक, सागररचना तसेच येथील जैवविविधतेला जतन करण्याची गरज नक्कीच आहे. 'रामसेतू'ला फक्त धार्मिक आणि राजकीय चष्म्यातून न बघता त्यामागचं विज्ञान आणि त्याचं महत्व समजून घेतलं तर ते 'रामसेतू'चं रक्षण आणि महत्व येत्या कित्येक पिढयांना आपण सांगू शकू, ह्यात शंका नाही.

तळटीप :- पोस्टचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावनांना खतपाणी घालणे, राजकीय चिखलफेक अथवा अन्य कोणत्याही कारणांसाठी नाही. 'रामसेतू'ला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याचा एक प्रयत्न आहे. तरी या पोस्टचा वापर कोणत्याही राजकीय, धार्मिक आणि संस्थांच्या उद्देशांना पूर्ण करण्यासाठी करू नये ही  नम्र विनंती.     

फोटो स्त्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत 'रामसेतू'चा उपग्रहातून फोटो आणि दुसऱ्या फोटोत एक २० डॉलरची नोट प्युमाईस दगडाचं वजन पेलताना. )

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: