Wednesday 14 October 2020

पद्मश्री मिळवणारे जपानी प्रोफेसर... विनीत वर्तक ©

 पद्मश्री मिळवणारे जपानी प्रोफेसर... विनीत वर्तक ©

१५० वर्षानंतर इंग्रजांच्या गुलामीतुन भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण जाता जाता आपल्याच भाषेला इंग्रज चिकटवून गेले. आज त्या इंग्रजी भाषेचा पगडा भारताच्या येणाऱ्या पिढ्यांवर इतका बसला आहे की आपल्याच मातृभाषेतून बोलणं भारतीय मागासलेपणाचे लक्षण समजतात. इंग्रजी ही जागतिक पटलावर अभ्यासाची, संवादाची आणि बोलली जाणारी भाषा आहे ह्यात दुमत नक्कीच नाही. त्यामुळे ती शिक्षण आणि आत्मसात करणं हे गरजेचं नक्कीच आहे पण हे करताना आपल्या मातृभाषेला दुय्यम दर्जा देणं हे तितकच चुकीचं आहे. भारतामध्ये विविधतेत एकता आहे. भारतात २२ प्रमुख भाषा तर जवळपास १९,५०० बोली भाषा बोलल्या जातात. ह्या सगळ्यांना जपण्यासाठी त्यांचा वापर होणं गरजेचं आहे. आज इंग्रजीच्या पुढाकारात ह्यातील अनेक भाषांची गळचेपी  होते आहे. भारतीयांना भारताच्या भाषांच महत्व सांगून कित्येक भारतीय भाषा आत्मसात करून त्याच महत्व जपान आणि जागतिक पातळीवर सांगुन जपान आणि भारत ह्यांच्या संबंधातील एक महत्वाचा दुवा ठरलेले जपानी प्रोफेसर 'टॉमीओ मिझोकामी'. 

टॉमीओ मिझोकामी ह्यांचा जन्म १९४८ साली कोबे, जपान इकडे झाला. लहानपणापासून त्यांच्या मनात भारताविषयी कुतूहल निर्माण झालं. भारताच्या विविध भाषा आणि संस्कृती ह्याबद्दलच सुप्त आकर्षणाने त्यांना भारताकडे ओढत नेलं. आपलं शिक्षण पुर्ण करत असताना त्यांनी दिल्ली विद्यापीठातुन हिंदी भाषेवर अभ्यास करून त्यात मानाची डॉक्टरेट मिळवली. हिंदी भाषेतुन डॉक्टरेट नुसती मिळवून ते थांबले नाहीत तर हिंदी भाषा त्यांनी आत्मसात केली. आजही ज्या अस्खलितपणे हिंदी भाषा बोलतात की ऐकणाऱ्याला त्यांची मातृभाषा कोणती असा प्रश्न पडेल. हिंदी सोबत उर्दू, पंजाबी ह्या भारतीय भाषा शिकुन त्यांनी आत्मसात केल्या. भारतीय भाषांसोबत फ्रेंच भाषेवर ही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. 

भारतीय भाषांवर प्रेम आणि प्रभुत्व मिळवल्यावर त्यांनी जगभर ह्याचा प्रसार सुरु केला. मानाच्या अश्या केलिफोर्निया विद्यापीठ, अमेरीका इकडे पंजाबी शिकवणारे शिक्षक म्हणून काम केले. ह्याशिवाय ओसाका विद्यापीठ, जपान इकडे भारतीय भाषांचे शिक्षक म्हणुन आयुष्यभर अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. आपल्या निवृत्ती नंतर ही एमिरेट्स म्हणजेच सन्मानीय शिक्षक म्हणून ओसाका विद्यापीठात आजतागायत कार्यरत आहेत. पंजाबी भाषेत संशोधन करताना त्यांनी 'जपजी साहेब' ह्या शिखांच्या प्रार्थनेच जपानी भाषेत अनुवाद केला आहे. जपान आणि भारत ह्यांच्या बद्दल बोलताना ते नेहमी सांगतात की दोन्ही देशांना खुप जुनी संस्कृती, परंपरा आहे. दोन्ही देशांच्या संस्कृतीत मानवी नितीमूल्य जपली गेली आहेत. हिंदी भाषेवर नाही तर हिंदी गाण्यांवर ही त्यांच खुप प्रेम आहे. 

I like "unity in diversity". India is multilingual and multicultural. In spite of so much diversity, there is Indianess. I like old Hindi songs. Mera juta hai japani.  

टॉमीओ मिझोकामी जवळपास एक वर्ष पुण्यात वास्तव्यास होते. ह्या कालावधीत आपण मराठी पुर्णपणे न शिकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. आपल्या संस्कृतीचा गाभा हाच मुळी आपली भाषा आहे. जरी इंग्रजी रोजच्या व्यवहाराची भाषा असली तरी संवाद हा मातृभाषेतून व्हायला हवा असं त्यांच प्रांजळ मत आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान ला दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी मोदींना खास पत्र लिहुन जपान मध्ये हिंदीतुन संवाद करण्याची विनंती केली होती. हिंदी किंवा कोणत्याही मातृभाषेतुन बोलणं जेव्हा भारतीय कमी पणाच समजतात तेव्हा मिझोकामी म्हणतात, 

“I get angry when Indians speak to each other in English. They seem to look down upon Hindi speakers". 

 एका जपानी प्रोफेसर च भारतीय भाषांवरील प्रेम हे जगावेगळं आहे. आपली जापनीज संस्कृती जपताना त्यांनी भारतीय भाषांचा प्रसार आणि त्याच महत्व जागतिक पटलावर विषद केलं आहे. भारतीय भाषा शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. भारतात भारतीय भाषांच्या प्रसारासाठी त्यांनी अमुल्य योगदान दिलं आहे. अश्या जपानी प्रोफेसर टॉमीओ मिझोकामी ह्यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेताना त्यांना २०१८ साली पद्मश्री सन्मानाने गौरवांकित केलं आहे. पद्मश्री सन्मान मिळाल्यानंतर ही त्यांचे शब्द खुप काही सांगुन जातात, 

I don't know why I was chosen (smiles), at least I contributed something to Hindi and other Indian languages.

भारतीयांना भारतीय भाषांची ओळख करून देताना इंग्रजीच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपल्या संस्कृतीची, भाषांच स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमुल्य असच आहे. एक जपानी प्रोफेसर भारतीयांना सांगतो की आपल्याच भाषेतुन बोलणं, संवाद करणं म्हणजे मागासलेपणाच लक्षण नाही तर ते आपल्या अमुल्य ठेव्याच लक्षण आहे. त्यामुळे पुढल्या वेळी संवाद करताना आपल्या भाषेतुन करा कारण आपल्या संस्कृतीला हजारो वर्षाचा वारसा आहे आणि तो जपणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. भारतीयांना भारताच्या संस्कृतीची, भाषेची ओळख करून देणाऱ्या जपानी प्रोफेसर टॉमीओ मिझोकामी ह्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच हे पवित्र कार्य शेवटपर्यंत चालण्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा. 

जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल, भारत सरकार  

फोटो स्रोत:- गुगल     

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment