Friday 1 January 2021

खारे वारे मतलई वारे (भाग ६)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग ६)... विनीत वर्तक ©

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अश्या काही गोष्टी होत आहेत, ज्याची कल्पना भारतीयांनी आणि जगाने कधी केली नव्हती. भारताची अनेक राजकीय नेतृत्वं आजवर अनेक देशांना भेटी देत असतात, यात नवल असं काही नाही. भारताचे राजकीय, मैत्रीचे, आर्थिक तसेच व्यापाराचे संबंध वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने अश्या भेटी आजवर होत आलेल्या आहेत. संरक्षण संदर्भात भारताचे संरक्षण मंत्री हे भारताचा चेहरा त्या देशांसमोर असत. संरक्षण संदर्भात होणारे करार आणि शस्त्रांची देवाणघेवाण याबद्दलच्या गोष्टी भारताचे संरक्षण मंत्री मांडत असत, जे की योग्य आहे. पण तिथेही संरक्षण मंत्री हे राजकीय नेतृत्व असल्याने त्याला राजकीय भेट म्हणून बघितलं जात होतं. पण गेल्या काही महिन्यात वारे वेगळ्या दिशेने वाहायला लागले आहेत. भारताचे सैन्य प्रमुख जनरल एम.एम.नरवणे हे सध्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. गेल्या महिन्यात म्यानमार, नेपाळ नंतर त्यांनी सौदी अरेबिया, यु.ए.ई. चे दौरे केले, तर गेल्या आठवड्यात ते दक्षिण कोरियाच्या ३ दिवसीय दौऱ्यावर जाऊन आले. 

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे सैन्यप्रमुख हे दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. ह्या दौऱ्यात त्यांची भेट दक्षिण कोरियाच्या तिन्ही सेनांचे प्रमुख ज्यांना चीफ ऑफ जॉइंट स्टाफ म्हटले जाते, त्या जनरल वोन इन चौल यांच्याशी झाली. त्यांच्या सोबत शस्त्र खरेदी-विक्री संबंधीच्या संस्थेचे प्रमुख गॅंग इन हो आणि त्यांचे संरक्षण मंत्री सुन ऊक यांचीसुद्धा भेट आणि चर्चा झाली आहे. या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याचा तपशील बाहेर आला नसला, तरी चर्चेचा मूळ उद्देश हा संरक्षण संबंध अजून वृद्धिंगत कसे होऊ शकतील ह्यावर होता. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे, की दक्षिण कोरियाचे सैन्यदल जगात अतिशय प्रगत आणि मजबूत मानले जाते. अमेरिकेसोबत त्यांच्या सैन्याचा नेहमीच युद्ध सराव सुरु असतो. दक्षिण कोरिया भारताचा मित्र असून भारताला संरक्षण क्षेत्रात दक्षिण कोरिया नेहमीच मदत करत आला आहे. दक्षिण कोरियाला उत्तर कोरिया सारखा शत्रू देश शेजारी आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाची सेना नेहमीच युद्धासाठी सज्ज असते. तसेच साऊथ चायना सी मध्ये चीनच्या वर्चस्व, अरेरावी आणि दादागिरीमुळे दक्षिण कोरिया त्रस्त आहे. त्यामुळेच चीनच्या शत्रूसोबत भारत आपले सैनिकी संबंध अजून मजबूत करत आहे. 

गेल्या आठवड्यात भारताच्या आकाश क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आकाश क्षेपणास्त्र हे जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. जवळपास २.५ मॅक वेगाने ३० किलोमीटरच्या क्षेत्रातील आणि जमिनीपासून ३० किलोमीटर उंचीवरून जाणारं कोणतंही लढाऊ विमान, क्षेपणास्त्र किंवा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राला निष्प्रभ करण्याची ह्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णतः भारताने बनवलेलं आहे. प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. पण जगातील ह्या श्रेणीतील कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा ही किंमत जवळपास १/३ आहे. त्यामुळेच हे क्षेपणास्त्र घेण्यासाठी व्हिएतनाम, फिलिपाइन्स आणि यु.ए.ई हे देश अतिशय उत्सुक आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने ह्याच्या विक्रीसाठी मान्यता दिल्याने भारत आता ह्या देशांसोबत विक्रीचे करार करू शकणार आहे. ह्या कराराने खूप जास्ती प्रमाणात परकीय चलन तर उपलब्ध होणार आहेच पण भारताचे ह्या देशांशी संबंध अजून घट्ट आणि वृद्धिंगत होणार आहेत. आकाश सोबत ब्राह्मोस ह्या क्षेपणास्त्रासाठी सगळेच देश रांगेत उभे आहेत. जवळपास ह्यातील सगळेच देश साऊथ चायना सी भागातील आहेत. 

व्हिएतनाम हा देश ब्राह्मोससाठी अतिशय आग्रही आहे. ह्याला कारण म्हणजे ब्राह्मोसला निष्प्रभ करणं तूर्तास शक्य नाही. ह्याशिवाय ब्राह्मोसचे नवीन व्हर्जन १५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. व्हिएतनामच्या भूमीवरून चीनची ६ महत्वाची शहरे ब्राह्मोसच्या टप्यात येतात. त्यामुळेच चीनची आगतिकता वाढली आहे. ब्राह्मोसबद्दल ह्या सगळ्या घडामोडी पडद्यामागे घडत असताना तिकडे भारताने आपली एक पाणबुडी म्यानमारला भेट दिली आहे. २५ डिसेंबर, २०२० ला आय.एन.एस. सिंधुवीरचं नामकरण UMS Minye Theinkhathu करून म्यानमारच्या नौदलात समाविष्ट केली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताने कोणत्या देशाला आपली पाणबुडी भेट म्हणून दिली आहे. ह्या पाणबुडीसाठी म्यानमारने एक गुप्त ठिकाणी तळ बनवला आहे. चीन ज्या पद्धतीने अतिपूर्वेकडील छोट्या देशांना आपल्या पंखाखाली दाबतो आहे, त्यामुळे हे देश कुठेतरी अश्या एका मित्राच्या शोधात आहेत जो चीनला सगळ्याच बाबतीत टक्कर देऊ शकेल आणि त्याचवेळी त्यांचं सार्वभौमत्व अबाधित ठेऊ शकेल. भारत हा त्याच राष्ट्रांचा पर्याय बनून समोर येत आहे. 

गेल्या काही महिन्यातील घटना बघितल्या तर कोणाच्याही लक्षात येईल, की भारत चीनच्या विरुद्ध असणाऱ्या देशांसाठी एक पर्याय म्हणून एक पाऊल पुढे जात आहे. भारताच्या सैन्य प्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांनी ज्या देशांना भेटी दिल्या आहेत त्या भेटीत चर्चा झालेल्या गोष्टी जेव्हा जगासमोर दृश्य स्वरूपात येतील तेव्हा भारताने जागतिक वाऱ्यांची दिशा बदललेली असेल. चीनला हे हळूहळू लक्षात येते आहे. गेल्या आठवड्यात नेपाळमधली परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी चीनचं शिष्टमंडळ नेपाळमध्ये दाखल झालं होतं, पण त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावं लागलं आहे. भारताने पडद्यामागून जी सूत्रं हलवली आहेत, त्याची चाल कळायला चीनला उशीर झालेला आहे. व्हिएतनामला ब्राह्मोस विकणं, हे भारत हुकूमाचा एक्का म्हणून लाईन ऑफ कंट्रोलवर चीनला माघार घेण्यासाठी वापरू शकतो, इतक्या चाली गेल्या काही महिन्यात भारत शांतपणे खेळला आहे. अर्थात शह-काटशह चा खेळ येत्या काळात अजून जास्ती मनोरंजक होणार आहे. पण ज्या चाली भारत खेळतो आहे त्यामुळे चीन, पाकिस्तान सध्या तरी पूर्णपणे बॅकफुटवर गेले आहेत. 

क्रमशः 

फोटो स्त्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment