Tuesday 12 January 2021

एका 'कृष्ण-सुदाम्या'ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका 'कृष्ण-सुदाम्या'ची गोष्ट... विनीत वर्तक ©

आपल्या देशातील अशी अनेक रत्नं इतिहासाच्या पानात अशी लुप्त झाली, की त्यांचं आयुष्य आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम नुसता वाचला, तरी आपल्या अंगावर मूठभर मांस चढेल. ही गोष्ट आहे अश्याच एका इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या 'सुदामाची', ज्यांच्यामुळे हजारो भारतीय सैनिकांचे प्राण वाचले. ज्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भागही न घेता भारताच्या सैन्याला एकहाती विजयश्री मिळवून दिली होती. भारताचे सर्वांत पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी खुद्द हेलिकॉप्टर पाठवून त्यांच्यासोबत एकत्र भोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सॅम माणेकशॉ या सुदामाला विसरले नव्हते. सतत त्याचं नाव घेत होते. जे ऐकून खुद्द त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर बुचकळ्यात पडले होते, की कोण आहे हा सुदामा? ज्यांच्या पराक्रमासाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने आपल्या पोस्टचं नामकरण त्यांच्या नावावरून केलं होतं. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांचा विशेष सन्मान केला होता. भारतीय सेना, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स , पोलीस ज्याच्या कार्यापुढे नतमस्तक होते, तो सुदामा कोण होता? असं काय शौर्य गाजवलं होतं त्याने, की ज्यामुळे संपूर्ण भारतीय सेना ते  फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ त्याचे फॅन होते? 

त्या 'सुदामा'चं पूर्ण नाव 'रणछोरदास पगी' असं होतं. त्यांचा जन्म गुजरात राज्याच्या बनासकांठा जिल्ह्यातील वसरडा गावी झाला. रणछोरदास पगी यांचं संपूर्ण आयुष्य गुराखी बनून कच्छच्या रणात गेलं होतं. आयुष्यभर गुरांना चारा खाऊ घालताना रणछोरदास पगी यांनी निसर्गाला आपलंसं केलं होतं. या प्रदेशातील कोपरा न कोपरा त्यांना माहीत होता. पण त्यापलीकडेही अशिक्षित असूनसुद्धा त्यांनी अनुभवातून एक विलक्षण शिक्षण घेतलं होतं, ते म्हणजे गुरांच्या पावलांच्या मातीत उमटलेल्या ठश्यांवरून ते कुठे हरवले आहे, कोणत्या दिशेला गेलं आहे, त्याशिवाय कोणतं जनावर हरवलं आहे ह्याची माहिती अचूक सांगण्याचं. १९६५ साल उजाडलं, भारत-पाकिस्तान युद्धाचे बिगुल वाजले. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तान कच्छच्या रणातून भारतावर आक्रमण करण्याचे मनसुबे रचत होता. भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्यातरी गुप्तहेराची गरज होती, जो पाकिस्तानी सैन्याच्या नजरेत न येता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकेल. 

रणछोरदास पगी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. गुरांसोबत जाताना त्यांच्या पाठीवर बसून रणछोरदास पगी सीमेपलीकडे फक्त नजरेने मातीत उमटलेल्या खुणांचा अभ्यास करत असत. त्यांचा अभ्यास इतका विलक्षण होता, की नुसत्या खुणांवरून पाकिस्तानी सैन्य तिकडून गेलं आहे का? गेलं तर किती संख्येने ते होते? त्यांच्यासोबत दारुगोळा, तोफा होत्या का? जाताना ते बसले होते का? किती वेळापूर्वी ते त्या ठिकाणावरून गेले होते? कोणत्या दिशेला गेले आहेत याची बित्तंबातमी रणछोरदास पगी यांनी भारतीय सैन्याला दिली. त्यांच्या या माहितीमुळे पाकिस्तानी सेनेच्या प्रत्येक चालीची माहिती भारतीय सेनेला मिळाली. एकदा तर तब्बल १२०० पाकिस्तानी सैनिकांची माहिती रणछोरदास पगी यांनी भारतीय सेनेला दिली. त्यामुळे पाकिस्तानी सेनेचा खूप मोठा कट उधळला गेला. याच युद्धात भारताने सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाची विद्याकोट पोस्ट गमावली. १०० भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती ही पोस्ट वाचवण्यासाठी दिली, पण तरीही पाकिस्तानने त्यावर आपला हक्क प्रस्थापित केला. कसंही करून ही पोस्ट पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी भारताने १०,००० सैनिक या पोस्टकडे रवाना केले. पण पाकिस्तानची रसद येण्याअगोदर त्यांना तिकडे पोहोचणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा भारतीय सेनेला सगळ्यात भरवशाच्या रणछोरदास पगी यांची आठवण झाली. रणछोरदास पगी यांनी अवघ्या ३ दिवसात तब्बल १०,००० सैनिकांना शॉर्टकट रस्त्याने त्या पोस्टवर पोहोचवलं आणि पाकिस्तानची रसद येण्याअगोदर भारतीय सैनिकांनी त्या पोस्टवर पुन्हा एकदा तिरंगा फडकवला. 

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातसुद्धा रणछोरदास पगी यांनी पुन्हा एकदा मोलाची भूमिका बजावली. तब्बल एक वर्ष ते पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नगरपारकर इकडे गुप्तहेर बनून राहून, पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींची बित्तंबातमी भारतीय सैन्याला देत होते. १९७१चं युद्ध संपल्यानंतर त्यांच्या पराक्रमापुढे आणि अद्भुत अश्या अभ्यासापुढे तत्कालीन भारतीय सेनेचे अध्यक्ष फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ प्रभावित झाले. त्यांनी चक्क ढाका इकडे रणछोरदास पगी यांना जेवणाचं निमंत्रण दिलं व तिकडे येण्यासाठी भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरची सोय केली. गुजरातमधून रणछोरदास पगी यांना हेलिकॉप्टरमध्ये बसून हेलिकॉप्टरने उड्डाण भरलं पण आपली एक पिशवी मागे राहिल्याचं रणछोरदास पगी यांच्या लक्षात आलं. त्यांची पिशवी घेण्यासाठी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा जमिनीवर उतरवलं गेलं. त्या पिशवीत असणाऱ्या दोन ज्वारीच्या भाकऱ्या आणि कांदा घेण्यासाठी भारतीय सेनेनं आपलं हेलिकॉप्टर पुन्हा जमिनीवर उतरवलं होतं. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी रणछोरदास पगी यांना भेटल्यावर आपल्या पदाचा कोणताही गर्व, अभिमान किंवा मोठेपणा न ठेवता त्यांना जेवायला आपल्यासोबतच बसवलं. जेवायला बसल्यावर रणछोरदास पगी यांनी आपल्या त्या पिशवीतून दोन ज्वारीच्या भाकऱ्या आणि कांदा खाण्यासाठी काढला आणि चक्क भारताचे सर्वोच्च अधिकारी फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी अगदी आनंदाने त्या ज्वारीच्या भाकरीचा आणि कांद्याचा आस्वाद रणछोरदास पगी यांच्यासोबत घेतला. रणछोरदास पगी यांनी देशासाठी केलेल्या सेवेसाठी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला, याशिवाय संग्राम मेडल, पोलीस मेडल, समर सेवा स्टार अश्या अनेक पदकांनी त्यांना गौरवण्यात आलं. 

भारतीय सेनेचा सर्वोच्च अधिकारी एका अशिक्षित असणाऱ्या गुराख्याला चक्क भारतीय सेनेचं हेलिकॉप्टर पाठवून, त्याला त्याच्या घरापासून (गुजरात) ते अगदी ढाका, बांगलादेश इकडे बोलावून घेतो, त्याच्यासोबत जेवण करून त्याने केलेल्या अमूल्य कार्याचा, पराक्रमाचा आणि त्याच्यामुळे जीव वाचलेल्या त्या हजारो सैनिकांच्या वतीने त्याचे आभार मानतो, इतकंच नाही तर त्याच्यासोबत आनंदाने त्याने पिशवीत आणलेली कांदा-भाकर खातो. मला वाटतं यासारखं 'कृष्ण-सुदामा'चं  दुसरं कोणतं उदाहरण कलियुगात असू शकत नाही. ही मैत्री तिथवर संपत नाही, तर २००८ साली मृत्यूशय्येवर असतानाही फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या तोंडातून रणछोरदास पगी यांचं नाव निघतं, हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे. रणछोरदास पगी हे वयाच्या ११२ व्या वर्षी २०१३ मध्ये अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्याचसोबत फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि रणछोरदास पगी यांचं 'कृष्ण-सुदाम्या'चं नातं इतिहासाच्या पानात लुप्त झालं. 

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि रणछोरदास पगी यांना आणि त्यांच्या मैत्रीला या भारतीयाचा मनापासून सॅल्यूट. सर खंत एकाच गोष्टीची वाटते, की तुमच्या सारख्या माणसांना आम्ही आमच्या आयुष्यात स्थान दिलं नाही. तुमचा इतिहास कधी आम्हाला शिकवला आणि सांगितला गेला नाही, ना आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. युद्धं भले शस्त्रांनी जिंकता येत असतील, पण माणसं जिंकायला 'कृष्ण-सुदामा' सारखं काळीज असावं लागतं. धन्य ते लोक ज्यांना तुमचा सहवास लाभला. तुम्ही होतात म्हणून आज भारत अखंड आहे. रणछोरदास पगी तुम्हाला ह्या भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!! 

फोटो स्त्रोत :- गुगल    

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



12 comments:

  1. Great...Thanks for this valuable information

    ReplyDelete
  2. जबरदस्त पोस्ट!!!!!!!!!

    ReplyDelete
  3. अपना भी सलाम भाय !


    ReplyDelete
  4. अपना भी सलाम भाय !


    ReplyDelete
  5. उद्बोधक आणि जबरदस्त माहिती. धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.

    ReplyDelete
  6. एकदम मस्त लेख आहे खूपच आवडला

    ReplyDelete
  7. सुंदर लेख आहे खूपच आवडला

    ReplyDelete
  8. तुमचे लेख खूप छान व माहितीपूर्ण असतात. मी जमल्यास काहींचे संस्कृत रूपांतर करून संस्कृत समूहावर पाठवू इच्छितो.

    ReplyDelete
  9. Great read! Thanks to let us know such a bravery through your writting. My salute!

    ReplyDelete
  10. Great people ..nice information

    ReplyDelete