Wednesday 18 May 2022

डेफलिम्पिक... विनीत वर्तक ©

 डेफलिम्पिक... विनीत वर्तक ©

डेफलिम्पिक हा शब्द अनेक भारतीयांसाठी नवा असेल. आत्ता कुठे क्रिकेट सोडून आमचं लक्ष गेल्या काही वर्षात ऑलम्पिक स्पर्धांकडे वळाल. त्यातून मग भारताने पॅराऑलम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यावर आमच्या लक्षात आलं की अश्या पद्धतीचं पण ऑलम्पिक असते. हाच विचार अनेकांच्या मनात आला असेल. १४० कोटी लोकसंख्या असणारा देश क्रिकेट सारख्या खेळात इतका गुंतलेला असतो की त्या शिवाय दुसरं काही खेळात करीअर नाही अशीच भावना अनेक भारतीयांची काही वर्ष आगोदर होती. पण क्रिकेट पलीकडे जेव्हा इतर खेळांच्या मूलभूत विकासासाठी लक्ष दिलं गेलं. त्याचे परीणाम आता दिसायला लागले आहेत. २०२० मधे झालेल्या ऑलम्पिक आणि त्या पाठोपाठ झालेल्या पॅराऑलम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा चढता आलेख या खेळांकडे भारतीयांना खिळवून ठेवून गेला. हळूहळू का होईना भारतीय प्रेक्षक आणि भारतीय खेळाडू आता क्रिकेट च्या गर्तेतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धांना जागतिक म्हंटल जाते त्याकडे लक्ष द्यायला लागले आहेत. त्याचाच एक पुढला टप्पा म्हणजे 'डेफलिम्पिक'. 

डेफलिम्पिक ही इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटी म्हणजेच (IOC) कडून आयोजित केली जाणारी जागतिक स्पर्धा आहे. यात ज्या व्यक्तींना ऐकू येत नाही. शिटी, बंदुकीच्या गोळीचा आवाज, हॉर्न अश्या कोणत्याही आवाजाला पकडण्याची क्षमता नाही अश्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. १९२४ पासून प्रत्येक ४ वर्षांनी ही स्पर्धा होत असते. आजवर भारतीय खेळाडूंचा यातील प्रभाव एक प्रकारे दुर्लक्षित होता. खेळाडू, क्रीडा मंत्रालय, सरकार आणि एकूणच राजकीय पातळीवर अश्या स्पर्धांकडे लक्ष दिलं जात नव्हतं. अर्थात याकडे दुर्लक्ष होण्याचा सगळ्यात मोठा वाटा भारतीयांचा आहे. कारण जगात क्रिकेट सोडून कोणते खेळ आणि स्पर्धा असतात हेच इतके वर्ष त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. गेल्या काही वर्षात मात्र अश्या स्पर्धांकडे आणि खेळांकडे सरकारी पातळीवर लक्षणीय बदल झाला. अश्या स्पर्धांमधे भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी आणि तसे खेळाडू घडवण्यासाठी पावलं टाकली गेली. त्याचाच परीणाम नुकत्याच पार पडलेल्या डेफलिम्पिक या जागतिक स्पर्धेत दिसून आला आहे. 

भारताने कॅक्सिस डो सुल, ब्राझील इकडे पार पडलेल्या डेफलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्ण पदकं , १ रोप्य पदक तर ९ कांस्य पदकांची कमाई केली आहे. हे भारताचा या स्पर्धेतील आजवरच सगळ्यात चांगल प्रदर्शन राहिलेलं आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ६५ भारतीय खेळाडू पात्र ठरले जे आजवरचे सगळ्यात जास्त आहेत. भारताने एकूण २१ पदकांची कमाई केली. ज्यात बॅडमिंटन सांघिक विजयाची पदके आहेत. भारतीय खेळाडूंनी ११ वेगवेगळ्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारताने पदतालिकेत आजवरचा सगळ्यात चांगला क्रमांक म्हणजेच ९ व स्थान पटकावलं. ५ मेडल भारताला शूटिंग मधे तर ४ मेडल बॅडमिंटन मधे मिळाली आहेत. जर्लीन अनिका या एकटीने बॅडमिंटन खेळात ३ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. माझ्या मते तीन ऑलम्पिक मेडल मिळवणारी  पहिली भारतीय खेळाडू असेल. 

२१ मे ला भारतीय पंतप्रधानांनी संपूर्ण डेफलिम्पिक खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांच अभिनंदन आणि भारताच्या तिरंग्याची शान जागतिक स्पर्धेत वाढवल्याबद्दल सर्वाना त्यांच्या निवासस्थानी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. ही भेट या सर्वच खेळाडूंना एक नवीन आत्मविश्वास देईल या बद्दल माझ्या मनात शंका नाही. सरकारी पातळीवर हे बदल नक्कीच आनंददायी आहेत पण त्याच सोबत आपण भारतीयांनी क्रिकेट इतर खेळंबद्दल असलेल्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे. हा बदल जेव्हा होईल तेव्हा ऑलम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत भारत एक नवीन उंची गाठेल असं मला मनापासून वाटते. 

डेफलिम्पिक स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंच अभिनंदन आणि त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




No comments:

Post a Comment