Wednesday 11 May 2022

आणि बुद्ध पुन्हा एकदा हसला... विनीत वर्तक ©

आणि बुद्ध पुन्हा एकदा हसला... विनीत वर्तक ©

१९९५ च वर्ष होतं. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी आण्विक चाचणी घेण्यासाठी भारतीय संशोधकांना परवानगी दिली. १९७४ च्या पोखरण येथील पहिल्या अणु चाचण्यांनंतर भारताने तंत्रज्ञानात खुप प्रगती केली होती. त्या प्रगतीतून आलेले निष्कर्ष पडताळून बघण्याची गरज भारतीय संशोधकांना वाटत होती. त्यामुळेच भारताने पुन्हा एकदा पोखरण इकडे अणु चाचणीसाठी काम सुरु केलं. अमेरिकेच्या टेहळणी करणाऱ्या उपग्रहांनी पोखरण इकडे चालू असलेली लगबग ओळखली. अमेरिकेच्या सी.आय.ए. ने याचा अहवाल तत्कालीन क्लिंटन प्रशासनाला दिल्यानंतर त्यांनी सर्व मार्गाने भारतावर आणि राव प्रशासनावर दबाव टाकला. भारताला त्यामुळे माघार घ्यावी लागली. पण या निमित्ताने भारताला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे भारताच्या प्रत्येक हालचालींची होणारी टेहाळणी. १९९६ ला जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर त्यांनी राष्ट्रासाठी महत्वाच्या असणाऱ्या या अर्धवट राहिलेल्या कामाला कोणत्याही परिस्थितीत तडीस नेण्याचा पण केला. याची जबाबदारी त्यांनी भारताचे मिसाईल मॅन आणि त्यावेळचे डी.आर.डी.ओ. चे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल कलाम आणि अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर. चिदंबरम यांच्यावर सोपवली. त्यांना दीड वर्षाचा वेळ ही चाचणी करण्यासाठी देण्यात आला. 

भारताला पुन्हा एकदा अणुचाचणीची गरज ही फक्त तांत्रिक क्षमता साध्य करण्यासाठी नव्हती तर संपूर्ण जगात भारताची एक नवीन प्रतिमा बनवण्यासाठी होती. या चाचण्या करण्यामागे तीन मुख्य उद्दिष्ट होती. एक म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची पडताळणी, दुसरं म्हणजे भारत आता आण्विक क्षमता आणि अस्त्र असलेला देश आहे याची जगाने नोंद घेण्यास भाग पाडणे. तिसरं म्हणजे भारत एक शांतताप्रिय पण त्याच सोबत जबाबदारीने आण्विक शस्त्र हाताळणारा देश आहे याची जाणीव करून देणे. १९९५ साली आलेल्या अनुभवावरून अतिशय गुप्तपणे या गोष्टी करण्याच्या सुचना संशोधकांना देण्यात आल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत भारत असं काही करणार आहे याची थोडी सुद्धा कल्पना जगाला येता कामा नये असं एक आव्हानात्मक लक्ष्य डॉक्टर कलाम आणि त्यांच्या टीम ला देण्यात आलं होतं. 

भारताने या काळात अवकाश क्षेत्रात मजल मारली होती. भारताचे स्वतःचे टेहाळणी उपग्रह अवकाशात होते. त्यामुळे अवकाशातुन ते काय टिपू शकतात आणि काय नाही तसेच कोणत्या वेळी या सर्वाचा अभ्यास केला गेला. अमेरिकन टेहाळणी उपग्रहांची क्षमता, त्यांच्या भारतावरून परिवलन करण्याच्या वेळा या सर्वांचा अगदी बारकाईने अभ्यास केला गेला. त्या नंतर या कामासाठी योग्य वेळ काय ती निश्चित करण्यात आलं. काम करत असताना भारतीय संशोधक एकाचवेळी एका ठिकाणी जमलेले दिसू नये म्हणून अनेक उपाय योजना केल्या गेल्या. रेडिओ संदेश वहनात त्यांची नाव गुप्त राहतील अशी व्यवस्था केली गेली. कोड वर्ड वापरले गेले जसे की व्हाईट हाऊस, विस्की, ताज महाल. डॉक्टर कलाम बनले मेजर जनरल पृथ्वी राज तर आर. चिदंबरम 'नटराज'. 

११ मे १९९८ दुपारी पावणे चार च्या सुमारास अमेरिका, सी.आय.ए. आणि संपूर्ण जगाला वेड्यात काढत पोखरण च्या त्या वाळवंटात बुद्ध पुन्हा एकदा हसला... 

 आज या घटनेला २४ वर्षाचा काळ लोटून गेला. पण आजही १९९८ च्या पोखरण अणू चाचण्या अमेरिकेच आणि त्यांच्या गुप्तचर संघटनेचं सगळ्यात मोठं अपयश मानलं जाते. भारताने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून या चाचण्या केल्या. संतापलेल्या अमेरिकेने भारतावर अनेक बंधन टाकली. जगाने आक्रोश केला पण भारताच जागतिक पटलावर एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून झालेलं आगमन ते थोपवू शकले नाहीत. आज भारत आणि अमेरिका कधी नव्हे इतके जवळ आहेत. अमेरिका आज भारताला आपला जवळचा मित्र, भागीदार मानते. एकेकाळी साप आणि गारुडी लोकांचा देश म्हणून भारताला हिणवणारा ब्रिटन आणि युरोपातील अनेक राष्ट्र ज्यात जर्मनी, फ्रांस, इटली सह अनेक देशांचा सहभाग आहे. भारताला आपला सोबती मानतात. याला एक कारण भारताची आर्थिक क्रयशक्ती असली तरी त्यामागे भारताची आण्विक शस्त्रसज्जता आणि तांत्रिक क्षमता तितकीच आहे. 

आज भारत जबाबदारीने आपल्या आण्विक क्षमतेत भर टाकत आहे. पण ही भर कोणाला दाखवण्यासाठी, कोणाला खिजवण्यासाठी, कोणत्या राष्ट्राला भिती दाखवण्यासाठी किंवा त्याच्या जोरावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी कधीच करत नाही. त्यामुळे आज एक पाकिस्तान सोडला तर भारताच्या आण्विक क्षमतेची भिती कोणत्याच लहान- मोठ्या, जवळच्या किंवा लांबच्या राष्ट्राला वाटलेली नाही. हेच आपलं सगळ्यात मोठं यश आहे. आपल्या हातात असलेली तलवार कधी आणि कोणावर वापरयाची याची जाणीव भारताला आहे. पण ही तलवार आपल्या म्यानातून काढून जगाला त्याची नोंद घ्यायला लावणारी घटना आजच्या दिवशी घडली होती. 

तेव्हा ही बुद्ध हसला होता आणि आजही बुद्ध पुन्हा एकदा हसतो आहे...... 

भारताला आजच्या दिवशी एक नवीन प्रतिमा देणारे पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर. चिदंबरम, भाभा अणू संशोधन केंद्र इथले संशोधक, अभियंते आणि कर्मचारी, भारतीय सेना आणि त्यांचे अधिकारी सैनिक तसेच या चाचण्या यशस्वी करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचललेल्या सर्वांना माझा कडक सॅल्यूट. 

ता.क. :- १९९८ साली मी ही भाभा अणू संशोधन केंद्रात कामाला होतो. मला सांगायला अभिमान वाटतो की पोखरण इथले अणूबॉम्ब हे आमच्याच विभागातून पोखरणसाठी रवाना झाले होते. ज्या व्यक्तींनी हे बॉम्ब आणि साधनं योग्य रीतीने पोखरण इकडे पाठवली अश्या लोकांसोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. या घटनेच्या अनेक गोष्टी माहित आहेत पण त्या इकडे मांडणं योग्य राहणार नाही. पण नक्कीच त्या आठवणी माझ्यासाठी स्पेशल आहेत.    

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment:

  1. सर तुम्हाला सुद्धा माझा कडक सॅल्यूट.. तुम्हाला माहित असलेला गोष्टी ज्या आताच्या तरूण पिढीला माहित असायला हव्यात.. अशा आमच्यापर्यंत पोहचवता त्यासाठी खुप खुप धन्यवाद

    ReplyDelete