Tuesday 17 May 2022

विजयाचे शिल्पकार... विनीत वर्तक ©

 विजयाचे शिल्पकार... विनीत वर्तक ©

रविवारी भारताने अतिशय प्रतिष्ठेचा आणि बॅडमिंटन या खेळातील वर्ल्ड कप मानल्या गेलेल्या थॉमस कप स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. भारताच्या या विजयाची तुलना १९८३ साली भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वकप स्पर्धेशी करता येईल. या स्पर्धेअगोदर पर्यंत भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट च्या क्षितिजावर कुठेच नव्हता. काही चांगले खेळाडू भारतीय क्रिकेट मधे झाले होते आणि त्या वेळेस संघाचा भाग होते. पण एक संघ म्हणून भारत क्रिकेट जगतात कुठेच नव्हता. अगदी तशीच परिस्थिती आज भारताची बॅडमिंटन स्पर्धेत होती. बॅडमिंटन च्या इतिहासात काही निवडक खेळाडू जसे की प्रकाश पदुकोण, पी. गोपीचंद, सायना नेहवाल आणि व्ही. सिंधू ते आता संघाचा भाग असलेला कधी काळी जागतिक मानांकन स्पर्धेत क्रमांक एक राहिलेला के.श्रीकांत. पण या सगळ्यांन पलीकडे भारतीय बॅडमिंटन संघ अशी दखल कोणीच घेतली नव्हती. १९८३ च्या विजयानंतर भारतीय क्रिकेट ला जी कलाटणी मिळाली आज तीच कलाटणी भारतीय बॅडमिंटन ला रविवारच्या विजयामुळे मिळाली आहे. त्यामुळेच या विजयाचे अनेक शिल्पकार आहेत. काही पडद्यासमोरचे तर काही पडद्यामागचे. त्या सर्वांच आपण भारतीय म्हणून अभिनंदन केलं पाहिजे. 

१९०० साली जॉर्ज ऍलन थॉमस या ब्रिटिश खेळाडूने बॅडमिंटन या खेळासाठी फुटबॉल विश्वचषक आणि टेनिस मधील डेव्हिस कप प्रमाणे सांघिक स्पर्धा जागतिक स्तरावर घेण्यात यावी अशी कल्पना मांडली. १९४८ साली त्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळालं. त्याच्याच नावाने हे बक्षीस द्यायचं निश्चित केलं गेलं. प्रत्येक दोन वर्षांनी ही स्पर्धा होते व यात जगातील १६ देशांचे संघ भाग घेतात. आजवर झालेल्या ३२ स्पर्धांपैकी फक्त १३ वेळा भारत या शेवटच्या १६ संघात पात्र ठरला होता. याही वर्षी सामील झालेला भारतीय संघ हा एकमेव असा संघ होता ज्याचा खर्च कोणीही स्पॉन्सर केलेला नव्हता. त्यांच्या टी शर्ट अथवा पॅन्ट किंवा रॅकेट वर कोणत्याही स्पॉन्सर च नाव नव्हतं. यावरून लक्षात यावं की क्रिकेटमुळे इतर खेळांवर किती अन्याय भारतात केला जातो. त्यामुळेच भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम फेरी पर्यंत जाईल असा कोणी स्वप्नात पण विचार केला नव्हता. 

आजवर फक्त दोन ऑल इंग्लड चॅम्पियन्स आणि दोन ऑलम्पिक मेडल जिंकलेल्या भारतातून जगातील या खेळात वरचढ आणि रँकिंग मधे अव्वल असलेल्या देशांना भारतीय संघ मात देईल हा विश्वास खुद्द भारतीय संघाला नव्हता. पण म्हणतात न जेव्हा गमावायचं काही नसते तेव्हा सर्वस्व पणाला लावायला माणूस कचरत नाही. एक- एक गेम जिंकत भारताची वाटचाल पुढे सरकत राहिली. प्रत्येक गेम नंतर आत्मविश्वास वाढत गेला. लक्षात घ्या की या स्पर्धेत विजय मिळवला म्हणून त्यांचे रँकिंग वाढणार नव्हतं की त्यांना भरघोस रक्कम पुरस्कारातून मिळणार होती. फक्त एकच लक्ष्य की तो तिरंगा एकदा फडकवायचा आणि ट्रॉफी भारतात आणायची. मलेशिया आणि डेन्मार्क सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मात दिल्यावर अंतिम फेरीत गाठ होती ती गतविजेता आणि तब्बल १४ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या इंडोनेशिया शी. इंडोनेशिया ची टीम जबरदस्त होती. त्यांचा धाक इतका होता की प्रतिस्पर्ध्याला स्पर्धेआधीच पराभवाची चाहूल लागावी. मोहम्मद एहसान आणि केविन संजया यांनी भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज राणिकारेड्डी यांना तब्बल ११ - ० अशी मात दिल्याचा इतिहास दाखवत होता. त्यामुळे भारतीय बॅडमिंटन टीम अंडर डॉग वगरे पण नव्हती. फक्त या वेळेस किती फरकाने हरणार याची वाट जगातील बॅडमिंटन तज्ञ बघत होते. 

सांघिक स्पर्धेत तुम्हाला स्वतःचे इगो बाजूला ठेवून खेळ खेळायचा असतो. वेळ प्रसंगी आपल्या जोडीदाराला एक पाऊल पुढे जायला द्यायचं असते. जेव्हा ही भावना प्रबळ होते तेव्हा आणि तेव्हाच संघ म्हणून तो देश जिंकतो. सिंगल, डबल अश्या दोन्ही वेळेस प्रत्येकाने आपलं सर्वोत्तम द्यायचं असते. पण भारतात बॅडमिंटन खेळाडू बनणं इतकं सोप्प आहे का? एक काळ होता जेव्हा भारतीय संघाचा राष्ट्रीय प्रशिक्षक पी.गोपीचंद सामना झाल्यावर कोर्टवर पडलेली शटर्स गोळा करून त्याचा वापर शिकण्यासाठी करत असे. त्या दिवसात देशाचं प्रतिनिधित्व स्वखर्चातून करावं लागत होतं. तुम्ही जिंकलात तर ते देशासाठी आणि हरलात तर स्वतःसाठी स्वखर्चाने. पी. गोपीचंद ला इंग्लड ला पाठवण्यासाठी त्याच्या आईला दागिने विकावे लागले. वडिलांनी वडिलोपार्जित जमीन विकली, कर्ज काढलं. पी. गोपीचंद ची आई स्वतः कॉल करून टी. व्ही. आणि न्यूज चॅनेलला त्याच्या खेळाची माहिती देत असे. पण टी.आर.पी. साठी चालणारा मिडिया दखल सुद्धा घेत नव्हता. इतकच काय तर खेळाडूंना घेण्यासाठी भारतातल्या क्रीडा मंडळाचे कोणतेच प्रतिनिधी हजर नसत. पण पी. गोपीचंद ने जिद्द न हारता आपल्या डॉक्टर ला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ऑल इंग्लड चॅम्पियन्स जिंकून दाखवलेली होती. 

खेळातून निवृत्त झाल्यावर बॅडमिंटन या खेळाला देशात नाव देण्यासाठी त्याने मनापासून प्रयत्न केले. एक बॅडमिंटन अकॅडमी उघडण्यासाठी सगळ्या लाल फितीच्या अडचणी आणि अक्षरशः प्रत्येक वीट बांधत त्याने ती उभी केली. एक कोच म्हणून पी. गोपीचंद ने बॅडमिंटन कसा प्रोफेशनली खेळायचं हे भारताच्या नवीन पिढीला शिकवलं. त्याचाच परीणाम म्हणजे आज जगातील पहिल्या सर्वोत्तम ३० खेळाडूंपैकी ७ खेळाडू हे त्याच्या अकॅडमी मधून तयार झालेले आहेत. रविवारी जिंकलेल्या थॉमस कप स्पर्धा जरी भारतीय खेळाडूंनी जिंकली असली तरी पडद्यामागे सिंहाचा वाटा पी. गोपीचंद चा आहे. आज एकापेक्षा एक बॅडमिंटन खेळाडूंचा उदय भारतीय क्षितिजावर होतो आहे. बॅडमिंटन खेळाला करीअर म्हणून स्वीकारणारे जवळपास ३००० नव्या दमाचे खेळाडू पी. गोपीचंद च्या अकॅडमी मधे तयार होत आहेत. त्यांच्यासाठी भारताचा हा विजय पुढे येणाऱ्या एका सुवर्ण काळाची एक सुरवात आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

आज भारताच्या बॅडमिंटन असोसिएशन ने १ कोटी रुपयांच बक्षीस भारतीय चमू ला तर २० लाख रुपयांच बक्षीस सपोर्ट स्टाफ ला जाहीर केलं आहे. क्रिकेट मधे खेळल्या जाणाऱ्या जुगारापेक्षा ही रक्कम कुठेच नाही. एक आय. पी.एल. खेळाडू काहीच न करता १० ते १५ कोटी कमावतो. पण देशासाठी बॅडमिंटन स्पर्धेत जिंकलेल्या सर्वांसाठी एक कोटी रुपये ही रक्कम निश्चित कमी आहे. पण मला कुठेतरी आशा आहे की चक्र फिरायला लागलं आहे. या विजयानंतर १९८३ सारखा बदल बॅडमिंटन च्या वाट्याला नक्कीच येईल. के. श्रीकांत, लक्ष्य सेन, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज राणिकारेड्डी ही नाव भारतीयांच्या मनावर आता अधिराज्य करतील असं मला मनापासून वाटते.

राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद, टीम मॅनेजर विमल कुमार आणि या स्पर्धेत भाग घेऊन भारताचा तिरंगा पहिल्यांदा फडकवणाऱ्या सर्व बॅडमिंटन खेळाडूंना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   





No comments:

Post a Comment